- B Poorva
#पुस्तक_ओळख
#आपण_माणसात_जमा_नाही
#रिवणावायली_मुंगी
#राजन_गवस
कधी कधी काही काही पुस्तकं फार उशिराच हातात पडली असं वाटतं, त्यातलीच ही दोन.
आजवर जरी पुस्तकं वाचली तरी पुस्तक वाचताना आपण पुस्तक वाचत आहोत ही जाणीव मनाच्या तळाशी जिवंत असायची पण राजन गवस यांचे कथासंग्रह त्या अर्थाने मला वेगळेच भासले. त्याच्या कथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे मनःपटलावर जिवंत होतात,स्मृतीत रेंगाळत राहतात.
हे कथासंग्रह प्रत्येक मनाचे आहेत.स्त्री आत्ताची असो वा ऐंशी नव्वदीच्या काळातली असो ,तिची जीवनमूल्ये,तिची घुसमट ,तिची बदलत जाणारी दृष्टी हे जितकं राजन गवस यांनी अस्सल पणे मांडलं आहे तितकंच प्रभावीपणे बदलत्या गावगाड्यातल्या माणसाचे औद्योगिकरण बदलत जाणारे राहणीमान,पालटत जाणारे दोन पिढ्यातील अंतर त्यातून होणारी मानवी मनाची उलाघाल याचे अतिशय प्रभावी चित्रण या कथासंग्रहातून केले आहे.एकसंघतेतून विस्कळीत होत व्यवहारी आणि भोगवादी बनत गेलेली पिढी आणि त्यातून जुन्या संस्कारातील मानवी मनावर येणारा ताण अशा मानवी मनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर या कथा प्रकाश टाकतात.
राजन गवस यांच्या कथा जितक्या श्रेष्ठ आहेत तितक्याच विविधांगी आहेत.वाचकाला चौकटीबाहेर विचार करायला लावून जीवनार्थाने समृद्ध करतात.
-©पूर्वा बडवे
- Manasi Lad- Gudhate
मनाला अत्यंत अस्वस्थ करून जाणार्या आणि अंतर्मुख करणार्या कथा. समाज म्हणून आपली लायकी काय? संस्कृती म्हणून ज्याला यथेच्छ मिरवावे त्याचे खरे रूप काय? नात्यांमधला जिव्हाळा वगैरे, धार्मिकतेचा आधार वगैरे, व्यभिचार आणि अनैकता वगैरे.... सगळ्या सगळ्याची मूळ जातकुळी काय? सगळा निव्वळ चिखल आहे. फक्त अन्याय आहे. दडपणूक आहे. - सारे केवळ वाचल्याने अस्वस्थता येत नाही. खरी अस्वस्थता येते ती या भिववणार्या विचाराने की - ’हो. हाच माझा समाज आहे!’ आपल्याला आपले खरे स्वरूप समजत जाणे भयावह आहे! पण आवश्यकही आहेच.
समाजरचनेच्या संपूर्ण डोलार्यात नि:शब्द गाडल्या गेलेल्या एका वेगळ्याच मानल्या जाव्या अश्या ’रिवणावायल्या’ व्यक्तिरेखांची गुदमरवणारी कथामालिका म्हणजे हा कथासंग्रह आहे! या कथा एका अंतापाशी पोचून संपत नाहीत. तशा तर त्या सुरूही एका निश्चित प्रसंगातून होत नाहीत. पण जे सारे आपल्या डोळ्यांसमोर मांडले जाते ते आपला सारा अनादी अनंत अवकाश व्यापून राहते.
- Nitiraj Jagadale
एक वेगळ्या धाटणीचा कथासंग्रह समाजातील भयानक वास्तवता मांडून याला तश्याच भयानक पद्धतीने प्रतिकार करताना कथानायकांची होणारी ससेहोलपट त्यांची मानसिकता अंतरंगाचे विविध पदर उलघडनारे राजन सर खरोखर ग्रेट आहेत आता ठरवलंय संपूर्ण राजन गवस वाचायचेच.....
- DAINIK TARUN BHARAT 10-02-2002
शोषणाविरुद्ध बंड करणाऱ्या स्त्रियांची कहाणी...
ज्याच्या नावावर ‘चौंडक’, ‘भंडारभोग’, ‘धिंगाणा’, ‘कळप’ नावाच्या कादंबऱ्या जमा आहेत ज्याला ‘तणकट’ कादंबरीसाठी नुकताच ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार मिळालाय आणि जो महाराष्ट्र फाउंडेशनने पुरस्कृत केलेल्या ‘बोली’च्या प्रकल्पावर सध्या काम करतोय तो लेखक म्हणजे डॉ. राजन गवस!
१९८० नंतर मराठी साहित्य क्षेत्रात ज्यांनी कथासंग्रह वाङ्मयातील इतर (विशेषत: कादंबरी) प्रकार हाताळायला सुरुवात करत आपलं नाव वाचकांसमोर आणलं त्या गवस यांचा एक निवडक कथांचा संग्रह ‘रिवणावायली मुंगी’ संग्रहात एकूण १३ कथा आहेत. या कथासंबंधी आणि एकूणच आपल्या लिखाणासंबंधी गवस म्हणतात, ‘रिवणावायली मुंगी’ या संग्रहातील स्त्रिया शोषणविरुद्ध बंड करणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज काढणाऱ्या आहेत याचं कारण वास्तवातील बदल हेच आहे. खेड्यापाड्यातल्या मुली शिकू लागल्या, परंपरेच्या चौकटीने जाच सैल होत गेले, विविध चळवळी, शहरांशी येणारा संपर्क यामुळे वातावरण बदलत गेलं. त्यामुळे परिस्थतीच्या रेट्यातून बदललेल्या वास्तव स्त्रीचं या कथांमधून येते. ती लेखकिय मनातील नाही हे निश्चित.’’
तर १९७५ पासून डॉ. गवस हे देवदासी चळवळीचा तसा सहप्रवासी चळवळीतला हा कार्यकर्ता आणि अनेक वृत्ती-प्रवृत्तींची माणसं जवळून पाहत अनुभवांती लिखाण करणारा हा लेखक जेव्हा स्त्रीविषयक लिखाण करतो तेव्हा तिची व्यथा, तिची जगण्याची धडपड आणि तिचा तो एकूणच अन्यायाविरुद्धचा लढा हा मनाला खूप भिडतो.
‘रिवणावायली मुंगी’ ही कथा बघूया. २५ वर्षांची ती दहावी झालेली मुलगी जेव्हा आपल्या जातीबांधवांसाठी परिवर्तनवादी चळवळीत आपणहून उतरते आणि मनापासून त्यात काम करते तेव्हा सुरुवातीला ती चळवळ, ते कार्यकर्ते आणि एकूणच ती ‘बंडखोरी’ भावते, पण त्यातील भंपकपणा जेव्हा तिला जाणवतो तेव्हा ती पुन्हा ‘घरा’ का परतते. निमूटपणे परिस्थितीला/चालीरितींना ‘शरण’ जाते. लग्न करते. सुखी संसाराचं स्वप्न पाहू लागते. पण नवरा जेव्हा बाहेरख्यालीपणा करत तिला ‘दासी’ ठरवू पाहतो तेव्हा ती त्याला भर बाजारात ‘उघडं’ करते आणि आपल्यातली ‘कार्यकर्ती’ अजूनही जिवंत आहे हे दाखवून देते बंडखोरी करते.
‘बाई’ ही कथा नवऱ्याने फसवल्यामुळे धंद्याला लागलेली आणि दोन माणसांनी (एकाचवेळी) ठेचलेल्या एका कमळी नावाच्या बार्इंची. कुठेही गेलं तरी बाईला शेवटी उपभोग्य वस्तू म्हणूनच गणलं जातं आणि त्याच एका नजरेनं बघत वागवलं जातं याचं ज्ञान जेव्हा कमळीला होतं तेव्हा ज्यांनी ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांचा संसार कशाला उधळायचा, असा सुज्ञ विचार करत ती पुढे निघते. ‘ह्याला जीवन ऐसे नाव’ म्हणत आहे त्याचं समाधान मानत ‘कुणाच्या तरी वळचणीला जगू’ म्हणते.
संग्रहातील ती बंडखोर मुलगी म्हणा, कमळा म्हणा वा इतर स्त्रिया म्हणा त्या जेव्हा अन्यायाविरुद्ध बंड करून उठतात. परिस्थितीचं भान राखत जेव्हा आवाज उठवतात वा आहे त्या परिस्थितीशी सामना करत स्वत:चं अस्तित्व दाखवून देतात, तेव्हा त्याचं ‘अस्तित्व’ त्याचं वागणं/बोलणं, त्यांचं ‘बंड’ हे मनाला भावून जातं. त्यामुळे लेखक म्हणतो त्याप्रमाणे ‘परिस्थितीच्या रेट्यातून बदललेली वास्तव स्त्रीचं या कथांमधून समोर येते.
संग्रहात ‘एक होता कावळा’ नामक वेगळ्या विषयावरची एक कथा आहे. हौदात पडलेल्या एका कावळ्याला एक शाळामास्तर बाहेर काढतो. पुढे त्या कावळ्याला बाकीचे कावळे टोचा मारून हैराण करतात. पुरता ठार मारतात. ‘कावळा माणसावर डूक धरतो का हो?’ ही शंका मनात धरून बसलेल्या त्या मास्तरामागे पुढे कावळ्यांची जमात लागते. ते कावळे त्याला पार सतावून सोडतात. मास्तरांसह सर्व घर ‘कावळेमय’ होत चिडतं. मास्तराची अन्नावरची वासना उडते. इकडे शाळेतील मुलांना कावळ्यांचा त्रास होईल. ही शंका बोलून दाखवत पालक, शिक्षक त्यांना रजा घ्यायला, घरी बसायला सांगतात. मास्तर घरी बसतो.
पुढे तो तापाने फणफणतो. अख्खं घर अस्वस्थ होतं. शेवटी तो गावी जातो. मास्तराची आई त्याला बरं करते आणि ‘जा रं शाळेला, कुठला कावळा येतोय बघतो. म्हणत धीर देते आणि त्यानंतर कावळे त्रास देणं सोडतात. ‘एक होता कावळा’ प्रमाणेच एका राजकारणी कावळ्याची गोष्ट आहे ती ‘दादा कोतोलीकर’ नामक कथेत. संग्रहातील ‘संप, ‘झळ’, ‘उचकी’, ‘ढव्ह आणि लख्ख ऊन’ या कथादेखील उल्लेखनीय आहेत.
लेखक ज्या सीमाभागालगत राहतो, ज्या परिसरात कन्नड-मराठी मिश्रित बोली बोलली जाते आणि जिथल्या प्रथा परंपरा तसेच ‘गाव उचापती’ लेखकाला अस्सलपणे ज्ञात आहेत, त्यातलं मर्म त्याला कळलंय त्या सर्व गोष्टींचा ‘ठसा’ या कथांवर व्यवस्थितरित्या उमटलाय.
तर माणसामाणसातील संबंध, संघर्ष, ताणतणाव, जगण्याची जीवघेणी धडपड आणि स्त्रियांची शोषणविरुद्ध ‘बंड’ करून उठण्याची, लढा देण्याची प्रवृत्ती याचं समग्रदर्शन या ‘रिवणावायली मुंगी’ कथासंग्रहात घडतं.
-चंद्रा जळगावकर
- DAINIK TARUN BHARAT 02-12-2001
‘रिवणावायली मुंगी’ समर्थ माणसांच्या कथा...
चौंडक, भंडारभोग, धिंगाणा, कळप आणि तणकट अशा एकाहून एकेक सरस कादंबऱ्यांमधून ज्वलंत विषय अत्यंत सामर्थ्याने सूक्ष्मतेने हाताळून मराठी कादंबरी चिंतनपीठाला समाज परिस्थितीचे गंभीर भान देणारे साहित्य जगातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित असणारे आजचे कसदार लेखक डॉ. राजन गवस यांचा ‘रिवणवायली मुंगी’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. १९८१ ते १९९९ या दरम्यान बखर, साप्ताहिक सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, सत्यकथा, स्त्री, किर्लोस्कर, साहित्य शिवार, रानमळा, या दिवाळी अंकांमधून पूर्व प्रसिद्धी पावलेल्या कथा एकत्रितपणे या संग्रहात आल्या आहेत. लसलसत्या जीवनानुभवावर आधारित असलेल्या या कथांमधून राजन गवस पर्याप्त समाज चौकटीत घुसमटणाऱ्या स्त्री-पुरुषांचा नेमकेपणाने वेध घेतात. समाजधर्म शरीरधर्म तसेच अस्तित्वाचा प्रश्न या सर्वाखाली भरडत निघालेल्या मानवप्राण्याची अगतिकता विदारक या कथा प्रकट करतात. कथागत व्यक्तिरेखांचा आंतरवेध घेताघेता प्रस्थापित संकेत व्यवस्था आणि अनुभवाला प्राप्त होणारा आकार यांचे अस्तित्वात असणारे परस्परावलंबित्वही लेखकाच्या प्रतिभेने फार सामर्थ्याने टिपले आहे. ढव्ह आणि लख्ख ऊन, बाई, हुंदका, एका होता कावळा, रिवणावायली मुंगी, उचकी, संप इ. कथांमधून व्यक्ती आणि अस्तित्वनिर्मिती प्रश्न, व्यक्ती आणि पर्यावरण, सामाजिकता, मध्यमवर्गीकरण यातील गुंतागुंतीच्या परस्पर संबंधाचे चलनवलनाचे व त्याचे संवेदनशील मनावर होणाऱ्या परिणामाचे, शोषणाचे, आविष्करण सक्षमपणे केले आहे.
ग्रामीण जीवन व परिसर ही या कथांची पार्श्वभूमी आहे. पण ही पार्श्वभूमी असली तरी आणि कथा या साहित्य प्रकाराचा परंपरागत आकृतीबंध घेऊन या कथा अवतरत असल्या तरी आशय-आविष्कारदृष्ट्या त्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. परिसर, व्यक्तिरेखा, भाषा, निवदेन, घटना, प्रसंग, भाष्य, परिणाम असे सर्व घटक परस्परात अभिन्नत्व स्वरूपात एकरूप होऊन येतात. या कथा म्हणजे माणसांचा अनुभवांच्या तळाचा वेध घेणाऱ्या व त्यातून जैविक, सामाजिक, सांस्कृतिक पातळ्यांचे तसेच नव जागरणाचे स्वरूप उलगडणाऱ्या अस्सल कथा आहेत. या सर्व पातळ्यांशी निगडित असणाऱ्या स्त्री-पुरुषांवरील प्रभाव रेषांचे आलेख म्हणजे या कथा. स्त्री-पुरुष संबंधाचे सांस्कृतिक, सामाजिक पातळीवरून आकारास येणारे रूप आणि आदिम प्रेरणा यामधील द्वंद्व, ग्रामीण परिसरातील विविध संक्रमण, माणसाच्या परात्मतेची विविध अंगे व कारणे व त्यातून निर्माण होणारी परवड, कसेबसे स्वत:ला तगवून जगवत ठेवण्यासाठी शोधलेले हताशपणे स्वीकारलेले अनिवार्य मार्ग पण त्यातूनही आत्मनिष्ठा अन्यायला प्रतिकार करण्याची ... होणाऱ्या ग्रामीण शोकात्मिका, या पार्श्वभूमीवर दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाची होणारी दयनीय अवस्था लेखकाचे संवेदनशील, सजग मन अत्यंत पारदर्शकतेने टिपले आणि सामाजिक, आर्थिक, भावनिक अशा विविध कारणांनी कोंडीत सापडलेल्या या व्यक्तिरेखांना त्यांच्या स्वाभाविक शक्यतानुसार कधी गूढ विद्येच्या आधीन होताना तर कधी बंडखोरीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करीत पर्याय शोधताना, प्रतिकाराचा प्रयत्न करताना दर्शविते. अर्थात हा अन्याय मिटविण्याचा त्यांचा प्रयत्न काही यशस्वी होत नाही. परंतु या प्रकारच्या क्रियाशीलतेमध्येच जीवनाची गती अस्तित्वात असते. म्हणून विचार आणि तद्नुषंगाने कृती प्रत्यक्षात उतरविणाऱ्या या व्यक्तिरेखा फार महत्त्वाचा वाटतात. प्रत्येक कथेतील केंद्रवर्ती व्यक्ती ही आपल्या अनुभूतीचा, संबंधितांच्या म्हणण्याचा, वर्तनाचा बारकाव्याने विचार करणारी त्यावरील चिंतनात खोल जाणारी अशीच आहे. असा खोलवर विचार करणाऱ्या त्या माणसांना प्रस्थापित यंत्रणा अमानुषपणे कशी चिरडून टाकते पण म्हणून त्यांचा प्रतिकार संपत नाही. याचे चित्रण रिवणवायली मुंगीतील प्रत्येक कथेतून राजन गवस यांनी आपल्या नेहमीच्या ताकदीने प्रत्ययकारकतेने केले आहे.
आता आपण कथा संग्रहातील काही कथांकडे दृष्टिक्षेप टाकू. खरे तर या संग्रहातील कथांचा मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, चिन्ह विश्वेषणार्थ, स्त्रीवादी अशा विविध दृष्टिकोनातून अभ्यास करता येण्यासारखा आहे. या अभ्यासातून व्यक्तीमानस, समाजमानस तसेच आपल्या पारंपरिक ढांच्याचे विश्लेषण स्पष्ट स्वरूपात मांडता येईल. समाजात अस्तित्वात असणाऱ्या अनेक शोषण परंपरांवर प्रकाशझोत टाकता येईल. पण प्रस्तुत लेख या कथासंग्रहाचा परिचय करून देणे या उद्देशाने लिहायला घेतला आहे. त्यामुळे वर्तमानपत्रीय मर्यादा लक्षात घेऊन आपण येथील काही कथावस्तूंचा धावता आढावा घेत जाऊ म्हणजे या कथाशयातले सत्त्व आपल्या ध्यानात येईल.
रिवणावायली मुंगी
मुंग्या नेहमी एकापाठोपाठ अशा ठराविक पद्धतीने रांगेतून चालत असतात. त्याला रिवण .....
या कथेमधून केवळ वीस पानी भाषिक अवकाशातून केंद्रवर्ती आशयातल्या व्यथेतल्या असहाय्यतेला प्रकट करतानाच लेखक नायिकेसह आई, काकू, बाबा, आजी, भाऊबंद, नातलग, गावकरी, परिवर्तनाच्या चळवळीशी संबंधित व्यक्तिरेखा, मुलगी बघायला येणारे कुलवंत मराठे गरीब पेन्शनर व त्याचे मुलीबाळीचे कुटुंब, नवरा, शाळा, आजूबाजूच्या आयाबाया, सासरचे पर्यावरण यांची चित्रणे जिवंतपणे रेखाटली आहेत. प्रथम पुरुषी निवेदनातून अतिशय प्रवाहीपणे कथाशय आकारास येत जातो. कथेच्या शेवटच्या वाक्यातून वाचकालाही या कथावकाशाचा भाग केलेले आहे. त्यामुळे कथा आणि समाजजीवन यात काही अंतरच शिल्लक राहत नाही. हे लेखकाचे एक वाङ्मयीन बलस्थान म्हणावे लागेल.
ढव्ह आणि लख्ख ऊन : आधुनिकतेच्या प्रभावातून निर्माण झालेल्या मध्यमवर्गीय जीवनसरणीत वाहात निघालेल्या पण भांबावून स्वत:चा शोध घेत निघालेल्या पेशांने कारकून असलेल्या ग्रामीण गृहस्थाची ही कथा आहे. पगाराबाहेर कमाई करत बंगला, गाडी, फ्रिज, बायकोची कडवी शिस्त या फेऱ्यात तो अडकला आहे. नोकरीच्या प्रारंभी गावाकडे त्याच्या वरचेवर चकरा असत पण हळूहळू अंतर वाढत जाऊन त्या थांबल्या. पण मनाच्या तळाशी गाव, आई, वडील हे विश्व पडून आहेच. एक दिवस त्याची आई गावाकडून ओढीनं भेटायला येते. खेडूत आईशी शहरी बायकोचे पटत नाही. त्यातून निर्माण होणाऱ्या घरातील दबावग्रस्त पर्यावरणाच्या दहशतीखाली वावरत असताना आईने स्वत:चे म्हणणे सुनेला दडपून सांगितल्यामुळे आत कुठेतरी हायसे वाटणे अशी त्याची कोंडीग्रस्त अवस्था फार सामर्थ्याने येथे प्रतिबिंबीत झाली आहे. निवेदक आणि त्याची बायको व आई या बिंदूच्या सहाय्याने येथे एक विस्तृत कथाशय आकारतो. ‘ढव्ह आणि लख्ख ऊन’ म्हणजे जुन्या व नव्या धारांमुळे आकारास येणाऱ्या जीवनमानाचं प्रातिनिधक चित्र होय. आईच्या व्यक्तिचित्रणातून ग्रामीण आणि पारंपरिक जीवनपद्धतीचे स्वरूप स्पष्ट होते तर बायकोच्या ....... प्रकारचे अनुभवविश्व (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही जीवनात) साकार होऊ शकते हे पाहून मती बधीर होते. ‘घुसमट’ मध्ये शरीरधर्म आणि सांस्कृतिकता यातला संघर्ष कथारूप झाला आहे. सांस्कृतिकतेच्या नावाखली स्त्रीचे कसे शोषण होत असते याचे सूचन ही कथा करते. ‘तिच्या वळणाची गोष्ट’ मधून तुळसाबाई साताप्पा मिसाळ या अक्करमाशापैकी असणाऱ्या बुद्धिमान मुलीचे प्रखर अनुभवविश्व ठसठशीतपणे साकारते. ‘हुंदका’ या कथेमध्ये शालू नावाच्या उपवर मुलीला बापाच्या घरातली भाऊबंदकी कशी डिवचून मारू लागते. तिचे लग्नच जमवू देत नाहीत. याचे प्रत्ययकारक चित्रण आहे. ‘उचकी’तून गरीबीची कथा तर ‘खांडूक’ ही डोंगराला सोडलेल्या म्हादबाची कथा स्वत:वर लादण्यात आलेल्या या जोगतेपणाच्या मुळापर्यंत जाऊन तो त्याचा धिक्कार करताना दिसतो. बंडखोरीचे विचार त्याच्या मनात येतात. तो धुमसू लागतो, असे चित्रण येते. ‘झळ’ मधून दारू विकणाऱ्या बाईची मुलगी कल्ली घरातील पर्यावरणामुळे आपले लग्न ठरणे कसे अशक्य होईल, असे वाटून त्या पर्यावरणाचा स्पष्ट निषेध व्यक्त करते. ‘एक होता कावळा’ मध्ये माणसाच्या डोक्यावर परंपरागत चालत आलेल्या रूढ संकेतांचे (कावळा शिवणे) किती जबरदस्त दडपण असते आणि त्या खाली त्याच्या जगण्यातला कशा प्रकारचा आकार प्राप्त होतो, ते जिवंत स्वरूपात रेखाटले असून हा संकेत कथेच्या केंद्रवर्ती ठेवून त्यातून प्रस्थापित व्यकती व समाजमन फार सामर्थ्याने येथे शब्दबद्ध झाले आहे.
एकूणच मानवी जीवनपटाला अनेकविध छिद्रे असतात. ही छिद्रे कधी व्यक्तीमन निर्माण करते तर कधी परिस्थिती किंवा समाजमन निर्माण करत असते. पुरुष, पैसा, सत्ता, वर्ण, वर्ग, राजकारण यांच्या परस्पर लागणीतून जे रसायन निर्माण होईल ते या व्यवस्थेच्या केंद्राशी आहे. कथेमध्ये जी व्यक्ती केंद्रस्थानी आहे तिच्या शोषणाला वरीलपैकी एखादा घटक कमी जास्त अग्रेसर रुपात असते. जीवनातील छिद्रे व ती निर्माण करणारी यंत्रणा राजन गवस अत्यंत सजगपणे टिपतात याचा प्रत्यय या कथांतून येतो. या संग्रहातून लेखकाने साकार केलेल्या जीवनाशयाच्या अनुषंगाने येणाऱ्या केंद्रवर्ती व्यक्तिरेखा प्राप्त झालेल्या अन्यायकारक परिस्थितीचा अत्यंत नेटाने खंबीरपणे सामना करताना दिसतात. राजन गवस यांनी कथांतून आणलेले हे स्त्री-पुरुष अजिबात दुबळे दिसत नाहीत. परंपरा, परिस्थिती त्यांना दुबळे करण्याचा प्रयत्न करते. पण या प्रतिकून परिस्थितीतूनही काचक रूढींना बगल देत आपला स्वतंत्र मार्ग निर्माण करण्याचाच यांचा प्रयत्न चाललेला दिसतो. यातून लेखकाचे जागृत समाजभान तर स्पष्ट होतेच. पण त्याचबरोबर शोषित जीवनाची नवी व्यवस्था लावण्याचा व्यापक सहानुभाव त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची साक्ष ठरतो. या प्रगल्भतेमुळे कथागत स्त्री-पुरुष व्यक्तिरेखांशी वाचकाचा जो संवाद साधला जातो त्यातून परिस्थिती तळमुळातून समजून घेण्याचा अवकाश निर्माण होतो.
लेखकाची भाषा आणि कथागत वाङ्मयीन वैशिष्ट्ये मुळातून पाहण्यासारखी आहेत. ग्रामीण बोली आणि लोककथेतील कथनशैली यामधील सामर्थ्य राजन गवस यांनी सहज पचवलेली असल्याचा प्रत्यय या कथाही देतात.
-प्रा. शोभा नाईक
- DAINIK SAMANA 06-01-2002
खेड्यातील बदलते जीवन...
‘रिवणावायली मुंगी’ हा राजन गवस यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या कथांमधील काही निवडक कथांचा संग्रह. १९८२ ते १९९८ या कालावधीत विविध दिवाळी अंकांमधून प्रकाशित झालेल्या या कथांनी मराठी कथेत श्रेष्ठ स्थान मिळवले आहे.
प्रस्तुत कथासंग्रहातील कथांविषय पांढरपेशा वर्गाचा नाही. समाजातील खालच्या वर्गातील लोकांच्या जीवनातील घटिते, त्यामागची कारणे, त्या वर्गाची विशिष्ट विचारसरणी, जीवनशैली यांचे चित्रण या कथांतून येते. या वर्गाचे जीवन स्थितीवादी नाही. आधुनिक जीवनशैलीचे, विकासाचे पडसाद खेडोपाडीही झिरपत गेले. याचा प्रभाव कथा वाचताना जाणवतो. म्हणूनच कथेचा आशय व अभिव्यक्तीची शैली यामुळेही कथा वेगळ्या ठरतात.
खेड्यापाड्यातील तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार झाल्याने मागासवर्गातील शिक्षित पिढी उदयास येऊ लागली होती. याचे संदर्भ ‘रिवणावायली मुंगी’ या कथेत आहेत. मागास खेड्यातील पहिल्या एसएससी झालेल्या मुलीचे हे प्रथमपुरुषी निवदेन. आपल्या जातीबंधवांसाठी परिवर्तनवादी चळवळीत उत्साहाने भाग घेणाऱ्या या पिढीच्या कालांतराने चळवळीतील भंपकपणा लक्षात येऊ लागला होता. सुरुवातीला घरच्यांचा विरोध पत्करून उंबरठ्याबाहेर पडते. कार्यकर्ती म्हणून संघर्ष करण्यास व्यवस्थेविरुद्ध बंड करून जातिबांधवांचा उद्धार करण्यास तयार असलेल्या या मुलाचा होणारा भ्रमनिरास हा तत्कालीन पिढीचाच भ्रमनिरास ठरतो. याशिवाय कथेत गावपातळीवरच्या जातीची, वर्गाची उतरंड, या अनुषंगाने येणाऱ्या रूढीपरंपरेच्या शृंखला यांचा उल्लेख येतो. जगात सगळ्या बायकांची लग्न होतातचं असं कुठाय, म्हणणारी कथानायिका परंपरागत विचारांना धक्का देते. शिक्षणानं व बाहेरच्या जगाच्या अनुभवानं आलेलं हे बळ प्रत्यक्ष जीवनात मात्र कामी येत नाही. सर्व पातळ्यावरच्या दबावाला स्त्रीला बळी पडावे लागले. पुरुषप्रधान संस्कृतीचे अवशेष जाणवतात. खेड्यापाड्यातील कष्टकरी वर्गाचे अपार दारिद्र्य कधीच न संपणारे, शेताखेतात राबल्याशिवाय पोटापाण्याचा कोणताही उद्योगधंदा नसल्याने वर्षाचे सहा महिने अर्धपोटी राहणारी, दिवस कंठणारी कुटुंबे ‘उचकी’ कथेत आहेत.
आज शहरी संस्कृतीने आधुनिक विचारसरणीचा, जीवनशैलीचा मुक्त स्वीकार केलेला दिसतो. जातीधर्माची बंधने गळून पडलेली दिसतात. पण गावपातळीवर जातीचा अभिमान, जाचक नियम यांचे काटेकोर पालन होताना दिसते. याबद्दलच्या त्यांच्या भावनाही तीव्र असतात. ‘तिच्या वळणाची गोष्ट’मध्ये दहावी झालेल्या अशा निम्नवर्गाच्या मुलीचे मनोगत आहे.
मागासवर्गीयांतील चळवळीतील राजकारण, त्यातील फोलपणा, दंभ यावर उपाहात्मक कथा म्हणजे ‘दादा कोतीलीकर’ ही कथा नवशिक्षितांमधील या दांभिक तथाकथित पुढाऱ्यांस किंबहुना या वृत्तीस गांधीनंतरचे महात्मे असं संबोधलं आहे. समाजसुधारणेचा बुरखा पांघरलेल्या माणसांचा हा बुरखा लेखकाने ओरबडून काढला आहे. ‘बाई’ कथा पुरुषांमधील कावेबाज, धूर्त, स्वार्थी जनावराचं व बाईच्या जातीच्या व्यथेचं दर्शन घडते. ‘घुसमट’ कथेत मानवी मनाच्या विकृतीचं दर्शन होतं, तर शिक्षणाने, पैशाने दोन पिढ्यात, त्यांच्या जीवनमानात पडलेले अंतर त्यांच्या नात्यातही निर्माण होऊ शकते याचे प्रत्यंतर ‘ढव्ह व लख्ख ऊन’ या कथेत येतं.
‘अंधारवड’, ‘हुंदका’, ‘सप’, आदींसह प्रस्तुत कथासंग्रहातील कथा खेड्यातील जानपथ जीवनावरच्या असून बदलत्या काळाच्या संदर्भातील त्यावर होणारे अपरिहार्य परिणाम चित्रित होत जातात. बारीकसारीक प्रसंगातून लेखक हे गांभीर्याने व्यक्त करून जातो. लेखकाची स्वत:ची अशी एक जीवनसृष्टी जाणवत राहते.
-माधुरी महाशब्दे
- DAINIK SAKAL (KOLHAPUR) 10-03-2002
आधुनिक ग्रामीण कथेचा स्पष्ट चेहरा...
गेल्या वीसेक वर्षात महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचं झपाट्यानं अर्धनागरीकरण झालेलं आहे. कृषिव्यवस्थेशी निगडीत असणारी जीवनशैली, व्यवहार, विविध सेवा संस्थांच्या प्रवेशानं गुंतागुंतीची झाली. ग्रामीण भागात शिक्षणसंस्था वाढल्या, राजकारण केंद्रित झालं. उत्पादन करणारा आणि त्याचा उपभोग घेणारा या दोघांच्या मध्ये तिसरा वर्ग तयार होणं आणि त्यानिमित्तानं संपूर्ण व्यवहार बाजाराधिष्ठित होणं हा मोठा बदल होता. दळण-वळण आणि संकराचा वेग प्रचंड वाढण्याच्या काळातलीच ग्रामीण कथा राजन गवस यांच्या ‘रिवणावायली मुंगी’ या पहिल्याच कथासंग्रहातून वाचायला मिळते.
आधुनिक ज्ञानप्रक्रियांच्या आणि साधनांच्या पार्श्वभूमीवर उभं राहिल्यावर येणारं ‘आयसोलेशन’ या कथांमधून प्राध्यान्यांना व्यक्त होतं. या कथांमधली सगळी माणसं अर्धनागर चेहऱ्यामुळं रिवणावायली झालेली आहेत. भाषिक स्तरापासून आकलनापर्यंत प्रत्येक प्रक्रियेमुळे ती आपल्या भूमीपासून अलग झालेली आहेत. आणि स्वीकार नकाराच्या ताणात वावरत आहेत. संग्रहातल्या सगळ्यांच कथांचं अर्थसूत्र हे नाही; पण कथासंग्रहाचा प्रातिनिधीक चेहरा हाच आहे, असं म्हणावं लागेल.
कथांचा प्रसिद्धी काळ ८१ ते ९९ आहे. म्हणजे लेखनकाळ ८० पासूनचा धरता येईल. हा काळ भारताच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रांमध्ये घुसळण घडवणारा आहे. या कथासंग्रहात अभिव्यक्त झालेलं स्त्रीचं मनोविश्व हे संग्रहाचे सगळ्यात मोठं बलस्थान. ‘रिवणावायली मुंगी’ किंवा ‘तिच्या वळणाची गोष्ट’ सारख्या कथांमधून प्रदर्शित होणारी स्त्री-जीवनाशी संबंध असणारी व्यामिश्र चर्चा विश्वं संग्रहाचं जीवनभान प्रगल्भ बनवतात. महाविद्यालयीन शिक्षण, परिवर्तनवादी चळवळ या दोहोच्या सहवासामुळे जीवनदृष्टीत आलेला बदल नंतर या दोन्ही संस्थांच्या फोलपणातून आलेला निराशावाद यांच्या कोंडीला प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेला विलक्षण रफ नकार यांची सघन वीण कथांना मूलगामी बनवते. शिक्षणातून जाणवलेली नवी मूल्यव्यवस्था, त्यातून संदर्भ बदलाच निर्माण झालेला संभाव्यक्त या सगळ्याला पराभूत करणारे पारंपरिक कळप आणि या कळपांनी माणसांना टिपून त्यांची केलेली पारध यांची विविध अनुभवविश्व कथांचा प्रत्यय सार्वत्रिक व्हायला मदत करतात. खरे तर या कथा एका भौतिक अवकाशातून दुसऱ्या अपरिचित भौतिक अवकाशात पाय ठेवताना होणाऱ्या अस्तित्व ऱ्हासाच्या निर्देशक आहेत. कथांची कथनशैली, पात्रांची भाषा, त्यांचं आचरण, क्रिया-प्रतिक्रिया हे सगळंच एका दीर्घ परंपरेचा भाग असलं आणि त्या परंपरेच्या पार्श्वभूमीवर उभं राहात असलं तरी कथांच्या अनुभव क्षेत्रामध्ये अनुस्यूत असणारं मोडलेपण संकमण काळातली अपरिहार्यता म्हणून समोर उभं राहतं. ‘ढव्ह आणि लख्ख उन’ ‘अंधारबंड’ ‘दादा कोतोलीकर’ यासारख्या कथा याचं उत्तम उदाहरण आहे.
कादंबरीच्या प्रदीर्घ फलकांशी जास्त संवादी असणारा राजन गवस यांचा जीवनानुभव कथांच्या फॉर्ममध्ये तितक्याच सक्षमतेनं व्यक्त झाला आहे. साहित्य अकादमी पुरस्कारानं त्यांच्यातला कादंबरीकार गौरविला जाण्याच्या काळातच या कथा प्रसिद्ध होणे औचित्यपूर्ण ठरलं आहे. ‘दादा कोतीलीकर’मधला नायक पुढं कळप मध्ये ‘रघू चिलमी’ मध्ये विस्तारित झाल्याचं लक्षात येतं. लघुकथांमधून बेटाबेटावर व्यक्त होणारं जीवनमान कादंबरीमध्ये एकसंध संदर्भांनी जोडलं जातं. गवस यांच्या कथा वाचताना त्यांनी हाताळलेल्या या दोन्ही फॉर्ममध्ये सुसंवादी असणारी, सांधा जोडणारी अदृश्य व्यवस्था प्रत्ययाला येते. अर्धनागरीकरणाच्या कारणपरंपरांचा शोध आणि प्रक्रियेतून होणाऱ्या संचिताच्या विध्वंसाचे परिणाम यांचं सजगपणे घडवलेलं दर्शन या कथांना अत्यंत महत्त्वाच्या बनवतं. या निमित्तानं मराठीतल्या कथावाङ्मयात भर पडते, यात शंकाच नाही; पण हा संग्रह समूहजीवनाच्या बदलांची संवेदनशीलता नोंदवून त्यावर चिंतन करणारा महत्त्वाचा दस्तऐवज ठरतो. एक होता कावळा सारखी कथा वास्तवाच्या रूढ संकेतांना मोडून त्याच्या सत्वाच्या पसाऱ्यात आपला विस्तार पसरते. मराठीतल्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांनंतर प्रकाशित होणारा राजन गवस यांचा हा संग्रह जीवनमानाची अव्यक्त क्षेत्रं उजळ करेल यात शंका नाही. अर्थसघन, मुखपृष्ठ आणि उच्च निर्मितीमूल्य संग्रहाच्या कामगिरीत मोलाची भर टाकतात.
- DAINIK SAKAL (PUNE) 03-2002
ग्रामीण भागातील वेदनांचे प्रभावी चित्रण...
यंदाच्या साहित्य अकॅडमी पुरस्कार सन्मानाचे मानकरी राजन गवस यांचा निवडक कथांचा हा पहिलाच संग्रह. १९८१-९९ या आठ-नऊ वर्षांत प्रकाशित झालेल्या या तेरा कथांतून ग्रामीण स्त्री-पुरुष व मुलांच्या व्यथा वेदना व्यक्त होतात. ग्रामीण भागात स्त्री शिकली तरी तिची बंडखोरी जातीजमातीत चालत नाही. लग्न होणे ही तिथली सर्वांत महत्त्वाची गोष्ट. त्यातही नवरा म्हणून छंदीफंदी मास्तर गाठ पडल्यानंतर तिचे आणखी हाल होतात. माहेरीही ‘लग्न झालं तेव्हाच तू आम्हाला मेलीस’ अशी जबाबदारी झटकली जाते. अशा मुलीची कथा ‘रिवणावायली मुंगी’त आली आहे. तुळसाबाई साताप्पा मिसळ ही बारावीत पहिली आलेली. तिथे तिला नेहमीच्या पुरुषी वृत्तीचा अनुभव येतो. लग्न जुळण्यातही जात, पात, पदर, वरची जात, खालची जात अशा अनेक अडचणी. तिला जवळ जवळ वाळीतच टाकले जाते. अशी तिच्या रिंगणाबाहेरच्या वळणाची ही गोष्ट आहे. ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष संबंध, त्यांच्या भानगडी, त्यात बाईची होणारी घुसमट अनेक कथांत आली आहे. त्यातच ‘दादा कातोलीकर’ या कथेतील गांधींनंतरचे महात्मे, तसेच ज्युनियर महात्मे अफलातून आहेत. ‘बाई’ या कथेत बाईच्या मनाच कशा ठिकऱ्या ठिकऱ्या होतात, हे सांगितले आहे. अनेकदा काही मानसिक समस्या असतात. ‘घुसमट’मध्ये विधवा झालेल्या आपल्या बहिणीला भाऊ घरी घेऊन येतो. पण तिथे तिला भाऊ वहिनीच्या एकांतात डोकावण्याची सवय लागते. त्यांच्या संसारावर तिची काळी सावली पडते म्हणून एक दिवस वहिनी तिला हाकलते. ‘डव्ह आणि लख्ख ऊन’ याच शहरातील सुखसोयींची सवय लागलेल्या सूनेचे आपल्या सासूशी कसे जमत नाही ही कथा येते. डोहाच्या प्रतीकाचा वापर करून आई-मुलाचे जग किती वेगळे झाले आहे हे सांगितले आहे. ‘खांडूक’ कथेत अंधश्रद्धेपोटी एकाला जन्मभर देवाची सेवा करावी लागते. देवदासींच्या व्यथाही त्यात येतात. ‘अंधारवड’मधील बबन्या हॉटेलमध्ये काम करत असतो. तिथे त्याला नको ती दृष्ये बघायला लागतात. त्यातच मुक्ती नावाची मुलगी त्याला भेटते. बबन्याची घुसमट लेखकाने उत्कटपणे व्यक्त केली आहे. तर ‘एक होता कावळा’मध्ये घराची वास्तुशांत न केल्याने एका माणसाच्या मागे कावळे लागतात त्याची कथा आहे.
एकूण, खेडेगावातील दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, आधारहीन स्त्रियांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि जगावे लागणारे लाजिरवाणे जिणे, जातपातीतले अहंकार, परंपरेचे आंधळे जोखड, ते फेकून देणाऱ्या स्त्रियांचीही होणारी परवड असे अनेक अनुभव व्यक्त होतात. ग्रामीण वातावरण, तेथील विशिष्ट लकबी व शब्द, निवेदनाच्या वेगळ्या शैली यामुळेही या कथा लक्ष वेधून घेतात. परंपरा आणि नवता यांचे मिश्रण या कथेच्या घाटात नि भाषाशैली व निवेदनात दिसते. शेवटी वाचकांच्या मनावर ठसा उमटतो तो खेडेगावातील दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि स्त्रियांची दु:ख यांचाच. वाचण्यापेक्षा या कथांना सांगण्याचा बाज आहे. त्यादृष्टीने त्या जुन्या ‘गोष्टी’जवळ जातात. हरवेलेले अनेक शब्द इथे भेटतात.
-डॉ. प्रल्हाद वडेर
- NEWSPAPER REVIEW
‘रिवणावायली मुंगी’ हा राजन गवस यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या कथांमधील काही निवडक कथांचा पहिलाच संग्रह. आशय आणि अभिव्यक्तीदृष्ट्या या कथा वेगळ्या असून लेखकाची गंभीर जीवनदृष्टी आणि संपन्न जीवनानुभव प्रकट करणाऱ्या आहेत.
कथात्मक वाङमयाच्या प्रदीर्घ परंपरेचे भान जसे या कथा बाळगतात, तसेच लोककथेतील कथनवैशिष्ट्येही आत्मसात करून वाचकांसमोर येतात. ‘ढव्ह आणि लख्ख ऊन’ ‘रिवणावायली मुंगी’, ‘बाई’, ‘एक होता कावळा’, यांसारख्या कथा मराठीतील श्रेष्ठ कथांच्या पंगतीला बसण्याची क्षमता प्रकट करतात.
- DAINIK LOKSATTA 22-09-2002
अनोखं ग्रामजीवन साकारणारं भन्नाट लेखन...
राजन गवस हे आजचे आघाडीचे लेखक. ‘कळप’, ‘भंडारभोग’, ‘तणकट’ या कादंबऱ्या लिहिल्या नंतर ‘रिवणावायली मुंगी’ या कथा-संग्रहाने या लेखकाने मराठी कथालेखनाच्या प्रांतात पदार्पण केलं आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात ‘सत्यकथा’, ‘बखर’, ‘सा. सकाळ’, ‘साहित्य शिवार’, ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’, ‘म. टाइम्स’, ‘रानमळा’, इ. नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या तेरा कथांचा हा संग्रह ‘अंधारवड’ सारखी एखादी कथा वगळता धगधगतं ग्रामीण विश्व उभं करतो. अनोखं ग्रामजीवन साकार करणारं हे बिनधास्त, बेधडक आणि भन्नाट लेखन वाचकाला चक्रावून सोडणारं आहे.
अंधागची वर्तुळं अवतीभवती घेऊन दु:खभोग भोगणाऱ्या रासवट माणसांच्या या विश्वात स्त्रियांची संख्या अधिक आहे. यातील प्रत्येक नायिका अंतरात भळभळती जखम वागवूनच आयुष्याला सामोरी जाते. सटवीने दु:खभोगच त्यांच्या भाळी कोरला असला तरी प्रत्येकीच्या ‘दु:खाची तऱ्हा वेगळी आहे, आयुष्याची वाट वेगळी आहे.
‘रिवणावायली मुंगी’ या कथेत भेटणारी बिनधास्त, बेधडक तरुण मुलगी आपल्या प्राक्तनाची कथा खुल्लमखुल्ला सांगताना जे अनवट समाजदर्शन घडवते ते सुन्न करणारं आहे. आत्मभान आलेली ही बंडखोर नायिका माणूसपण हरवलेली जाती-व्यवस्था, स्त्रीला खेळणं समजणारी पुरुषप्रधान समाजरचना, अगतिकतेतून जन्मलेली देवदेवस्की, चळवळीतील भंपकपणा, इ. अपप्रवृत्तीविरुद्ध आक्रोश करते, पण ‘रामसीता फेम’ संस्कृती या मनस्विीनचं जगणं अशक्य करते.
‘तिच्या वळणाची गोष्ट’ मधील तुळसाबार्इंचं प्राक्तनही यापेक्षा वेगळं नाही. मराठ्याच्या लेकावळ्या जातीची सुविद्य तुळस मनस्वी आहे. अनेक पुरुष तिच्या आयुष्यात येतात, पण प्रत्येक ठिकाणी जात आड येते आणि प्रेमभंग होतो. बिनधास्त आणि मोकळ्या स्वभावाच्या या स्त्रीवर ‘वाईट चालीची’ म्हणून समाजाचा शिक्का बसतो आणि तिच्या आयुष्यापुढेही प्रश्नचिन्हं उभं राहतं. तुळसा प्रतिगामी समाजव्यवस्थेचीच बळी आहे.
‘घुमसट’ ही वेगळ्या प्रकारची कथा. रंगा-इंदू हे जोडपं आणि रंगाची विधवा बहीण दिवाणसाब अशा मोजक्याच पात्रांवर बेतलेली. दिवाणसाबचं, मनोविश्लेषणपर चित्रण हे या कथेचं बलस्थान. ‘झळ’ची नायिका लगमव्वा ही अस्सल गावरान बाज असलेली रसरशीत व्यक्तीरेखा. ही रांडमुंड बाई पोट जाळण्यासाठी दारू विकण्याचा धंदा करते. दारिद्र्य असलं तरी लगमव्वा स्वाभिमानी आहे. फुललेल्या इंगळांचा डंख, कोल्हापुरी मिरचीचा झणझणीतपणा तिच्या भाषेत आहे. लगमव्वाची भाषा गावरान भाषासौंदर्याचा अस्सल नमुना आहे.
‘दादा कोतोलीकर’ ही व्यक्तिचित्रणपर कथा आजच्या मूल्यहीन राजनीतीचं विदारक दर्शन घडविते. लब्धप्रतिष्ठित भंपक पुढाऱ्यांच्या दंभाचा आणि ढोंगाचा फुगा फोडणारी ही कथा उपरोध आणि उपहासपूर्ण शैलीचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. मुखवटे धारण करणारा चारित्र्यहीन ‘गांधीनंतरचा महात्मा’ आणि दादा कोतोलीकर यांच्यातील नात्यावर प्रकाश टाकणारा कथेचा शेवट मन सुन्न करणारा आहे. अन्य कथांमध्ये ग्रामीण जीवनाचे वेगवेगळे पैलू चित्रित होतात. लोकापवादाने त्रस्त झालेला आणि कावळ्याच्या भयगंडाने पछाडलेला शिक्षक (एक होता कावळा), मंत्रतंत्राचा नादी दादा (उचकी), डोंगरावरच्या देवाला वाहिलेला म्हादबा (खांडूक), संपामुळे नोकरी सुटून गावी आलेला ऐदी पांडू (संप) अशा अनेक पुरुष व्यक्तिरेखा वाचकमनाला भिडतात, अंतर्मुख करतात. ‘ढव्ह आणि लख्ख ऊन’ ही विरोधलयतत्त्वावर बेतलेली कथा. रोज शेणामुतात आणि मातीत वावरणारी चिवट आणि काळजात आठवणीचं ‘गाठुडं’ घेऊन जगणाऱ्या गसवट माणसाचं हे विश्व राजन गवस यांच्या कथांना बावनकशीपणा आणून देतात. या माणसांच्या कथाव्यथा त्यांच्याच अस्सल गावरान भाषेत व्यक्त होतात आणि त्यांना खरीखुरी झळाळी येते.
-नेताजी पाटील
- DAINIK SAKAL 02-03-2002
ग्रामीण भागातील वेदनांचे प्रभावी चित्रण…
यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानाचे मानकरी राजन गवस यांचा निवडक कथांचा हा पहिलाच संग्रह. १९८१ ते ९९ या आठ-नऊ वर्षात प्रकाशित झालेल्या या तेरा कथांतून ग्रामीण स्त्री-पुरुष व मुलांच्या व्यथा वेदना व्यक्त होतात. ग्रामीण भागात स्त्री शिकली तरी तिची बंडखोरी जातीजमातीत चालत नाही. लग्न होणे ही तिथली सर्वात महत्त्वाची गोष्ट. त्यातही नवरा म्हणून छंदीफ़ंदी मास्तराशी गाठ पडल्यावर तिचे आणखी हाल होतात. माहेरीही ‘लग्न झालं तेव्हाच तू आम्हाला मेलीस’ अशी जबाबदारी झटकली जाते. अशा मुलींची कथा ‘रिवणावायली मुंगी’त आली आहे. तुळसाबाई साताप्पा मिसळ ही बारावीत पहिली आलेली. तिथे तिला नेहमीच्या पुरूषी वृत्तीचा अनुभव येतो. लग्न जुळण्यातही जात, पात, पदर, वरची जात, खालची जात अशा अनेक अडचणी. तिला जवळ जवळ वाळीतच टाकले जाते. अशी तिच्या रिंगणाबाहेरच्या वळणाची ही गोष्ट आहे. ग्रामीण भागातील स्त्री-पुरुष संबंध, त्यांच्या भानगडी, त्यात बाईची होणारी घुसमट अनेक कथांत आली आहे. त्यातच ‘दादा कातोलीकर’ या कथेतील गांधींनंतरचे महात्मे, तसेच ज्युनियर महात्मे अफलातून आहेत. ‘बाई’ या कथेत बाईच्या मनाच्या कशा ठिकऱ्या ठिकऱ्या होतात, हे सांगितले आहे. अनेकदा काही मानसिक समस्या असतात. ‘घुसमट’ मध्ये विधवा झालेल्या आपल्या बहिणीला भाऊ घरी घेऊन येतो. पण तिथे तिला भाऊ-वहिनीच्या एकांतात डोकावण्याची सवय लागते. त्यांच्या संसारावर तिची काळी सावली पडते म्हणून एक दिवस वहिनी तिला हाकलते. ‘डव्ह आणि लख्ख ऊन’ यात शहरातील सुखसोयींची सवय लागलेल्या सुनेचे आपल्या सासूशी कसे जमत नाही याचे चित्रण आहे. डोहाच्या प्रतिकाचा वापर करून आई-मुलाचे जग किती वेगळे झाले आहे हे सांगितले आहे ‘खांडूक’ कथेत अंधश्रद्धेपोटी एकाला जन्मभर देवाची सेवा करावी लागते. देवदासींच्या व्यथाही त्यात येतात. ‘अंधारवड’मधील बबन्या हॉटेलमध्ये काम करत असतो. तिथे त्याला नको ती दृष्ये बघायला लागतात. त्यातच मुक्ती नावाची मुलगी त्याला भेटते. बबन्याची घुसमट लेखकाने उत्कटपणे व्यक्त केली आहे. तर ‘एक होता कावळा’मध्ये घराची वास्तुशांत न केल्याने एका माणसाच्या मागे कावळे लागतात त्याची कथा आहे.
एकूण खेडेगावातील दारिद्र्य. शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, आधारहीन स्त्रियांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि जगावे लागणारे लाजिरवाणे जिणे, जातीपातीतले अहंकार, परंपरेचे आंधळे जोखड, ते फेकून देणाऱ्या स्त्रियांचीही होणारी परवड असे अनेक अनुभव व्यक्त होतात. ग्रामीण वातावरण, तेथील विशिष्ट लकबी व शब्द, निवेदनाच्या वेगळ्या शैली यामुळेही या कथा लक्ष वेधून घेतात. परंपरा आणि नवता यांचे मिश्रण या कथेच्या घाट, भाषाशैली व निवेदनात दिसते. शेवटी वाचकांच्या मनावर ठसा उमटतो तो खेडेगावातील दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि स्त्रियांची दु:खं यांचाच. वाचण्यापेक्षा या कथांना सांगण्याचा बाज आहे. त्यादृष्टीने त्या जुन्या ‘गोष्टी’जवळ जातात. हरवलेले अनेक शब्द येथे भेटतात.