- Shekar Bhokare
मानवी भावनांचे खूप छान चित्रण. नोबेल पारितोषक विजेते रवींद्रनाथ टागोर ग्रेटच......
- DAINIK LOKSATTA 29-05-2005
रवीन्द्रनाथांच्या सदाबहार कथा...
‘विश्वकवी’ आणि आशिया खंडातील पहिले नोबेल पुरस्कारविजेते रवींद्रनाथ् टागोर यांना कोण ओळखत नाही? ‘गीतांजली’ हा त्यांचा काव्यसंग्रह तर जगप्रसिद्ध आहे. त्यांचे आणखी मोठे योगदान म्हणजे भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकारही तेच आहेत. अशा एकाहून एक सुंदर रचना करणारे टागोरही स्वत:ला कवीच म्हणवून घेतात. परंतु ते जरी स्वत:ला कवी म्हणवून घेत असले तरी ते स्वत: एक तत्त्वज्ञ, विचारवंत, निबंधकार, प्रबंधकार, चित्रकार, संगीतकार, गीतकार, नाटककार, कादंबरीकार आणि कथाकारही होते. त्यांनी बंगालीतून अनेक उत्तम कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या कथांमधून बंगाली समाजाचे दर्शन घडते.
त्यांच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी माणूस असतो. तसेच त्यांच्या प्रत्येक कथेत निसर्गही डोकावतोच. त्यांची कथा म्हणजे एक कविताच आहे, असे वाटते.
‘काबुलीवाला आणि इतर कथा’ या त्यांच्या कथासंग्रहातील १५ कथा अशाच आहेत. त्यात त्यांनी समाजातील जातिभेद, ढोंगीपणा, भेदभाव, श्रद्धा-अंधश्रद्धा हे सर्व दाखवले आहे. त्या काळात बंगालमध्ये जमीनदारीचा समाजावर पगडा असल्याने जमीनदार व त्यांची रयत हे बऱ्याच कथांमधून डोकावते.
काबूलहून, आपल्या गावापासून लांब कोलकत्त्यात व्यापारासाठी येणाऱ्या रहमतची कथा ‘काबुलीवाला’मध्ये आहे. तेथेच त्याला एक छोटी मुलगी मिनी भेटते. ती त्याला स्वत:च्या मुलीची आठवण करून देते. एक दिवस एका गुन्ह्याखाली काबुलीवाला यास अटक करण्यात येते. जेव्हा तो शिक्षा भोगून तुरुंगातून सुटतो तेव्हा मिनी लग्नाच्या वयाची झालेली असते. त्या वेळी त्याला आपल्या मुलीची आठवण येते. या कथेत मुलगी आणि पिता यांचे नाते लेखकाने दाखवले आहे.
‘बलाई’ या कथेत बलाई हा एक छोटा मुलगा म्हणजे मानवरूपातील निसर्गपुत्रच आहे. तो जेवढे निसर्गावर प्रेम करतो तेवढे कोणी करू शकते का? हाच प्रश्न पडतो. तो जेव्हा बोर्डिंगमध्ये जातो, तेव्हा त्यांनी लावलेल्या झाडातच त्यांची काकू त्याला पाहत असते. जेव्हा ते झाड त्याच्या काकाने तोडून टाकले तेव्हा त्याची काकू खरोखरच दु:खी झाली. या कथेत टागोरांचे निसर्गप्रेम दिसते.
‘बलाई’प्रमाणेच ‘सुटी’ या कथेतल्या केंद्रस्थानीही फटीक हा लहान मुलगाच आहे.
रवींद्रनाथांच्या कथा शंभर वर्षांपूर्वीच्या जरी असल्या तरी त्या आजच्याच काळातल्या आहेत, असे वाटते. कारण अजूनही आपल्याकडे जातिभेद, दांभिकपणा आहे. त्यामुळेच त्या वाचताना कालबाह्य वाटत नाहीत. वाईटावर चांगुलपणाने मात केल्यास सर्वांचेच मंगल होते. हा सकारात्मक दृष्टिकोन मांडणारी कथा सौंदर्य व प्रसन्नता यांचा अनुभव देते.
-श्रेया खरे
- DAINIK LOKMAT 26-06-2005
रवींद्रनाथांच्या बहरातील गोष्टी…
रवींद्रनाथ टागोर हे भारतीय सारस्वताला पडलेले एक सुंदर स्वप्न. त्यांच्या लेखणीतून साकार झालेल्या ‘काबुलीवाला आणि इतर कथा’ यांचा मृणालिनी गडकरी यांनी केलेला अनुवाद वाचकांना नक्कीच आकर्षित करील.
संग्रहात एकूण १५ कथा आहेत. पैकी पहिली बहुचर्चित ‘काबुलीवाला’ यामध्ये रंगविलेल्या सहृदय पिता थेट हृदयाला भिडतो. ‘अपरिचित’मधला पिता प्रवाहाविरुद्ध जाऊन मुलीला असंस्कृत घराण्यात खितपत पडण्याएवेजी मांडवात लग्न मोडून मातृभूमीची सेवा करण्याची मुभा देतो. ‘परतफेड’ मध्ये मालक-नोकर संबंधांविषयीची चर्चा केली आहे, तर ‘प्रथम तिज पाहता’ मध्ये निखळ प्रेमकथेचा सहजसुंदर आविष्कार बघायला मिळतो. रवींद्रनाथ विनोदाच्या माध्यमातून समाजदोषांवर नेमके बोट ठेवतात. कथेतील माणसे तुमच्या-आमच्यासारखी सामान्य असतात राग, लोभ, द्वेश, मत्सरयुक्त पण प्रसंगी खंबीरपणाने निर्णय घेण्याची त्यांच्यात कुवत दखविण्याचे रवींद्रनाथांचे कसब वाखाणण्यासारखे आहे. वाईटावर चांगुलपण नेहमीच मात करते. आपल्या कथांमधून रवींद्रनाथ आशीर्वाद पेरताना दिसतात. तोही अगदी हळुवारपणाने.
रवींद्रनाथांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली कथा मग ती सामाजिक आशयाची असो वा ऐतिहासिक, ती काव्यात्मक असते. निसर्गाचे बहुविध विभ्रम, पदन्यास आणि प्रतिमा यांची वाचकाला मेजवानी मिळते. वाचक त्या त्या पात्राबरोबर कथानकात गुंतत जातो. संवाद साधतो आणि त्याचा पुरेपूर आस्वाद घेतो. मनोविश्लेषणाच्या अंगाने जाणारी रवींद्रनाथांची कथा मनाचा ठाव घेते, मग सहज अनुभूतीचा प्रत्यय येतो.
लेखिकेने अनुवाद करताना पुरेसे भान राखले आहे. रवींद्रनाथांच्या लालित्यपूर्ण शैलीला विचारसौंदर्याला आणि वैचारिक संक्रमणाला पूर्ण न्याय दिला आहे. इतक्या त्या मराठी भाषेत उतरल्या आहेत.
मुखपृष्ठावरचे काबुलीवाल्याचे सुचक चित्र आणि मलपृष्ठांवरचे रवींद्रनाथांचे तरतरीत छायाचित्र दोन्ही रसिकमान्य ठरावीत.
-सुनीता नागपूरकर
- DAINIK AIKYA 29-10-2006
‘कथाकार’ रवींद्रनाथांच्या ‘माणूस’ कथा…
विश्वकवी रवींद्रनाथ टागोर हे आशिया खंडातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते. ‘गीतांजली’ या काव्य संग्रहामुळे साऱ्या जगाचे त्यांच्याकडे लक्ष गेले. शांतीनिकेतनचे निर्माते रवींद्रनाथ अनेकांना परिचित आहेत, पण कथाकार म्हणून ते नव्या पिढीला अपरिचित होते. त्यांच्या कथांमधून त्यांनी विविध विषयांना बंगाली भाषेतून स्पर्श केला आहे. या ‘मानवी’ स्पर्श लाभलेल्या कथा मेहता प्रकाशनने मराठीत आणल्या आहेत. मृणालिनी गडकरी यांनी रवींद्रनाथांच्या पंधरा कथांचे मराठीत अनुवाद केले आहेत. वेगवेगळ्या विषयाच्या या कथांमधून रवींद्रनाथांच्या वैशिष्ट्यांचे मनोरम दर्शन घडते. बंगालच्या मातीमधील या कथांमधून बंगाली समाज, त्यातील जातीभेद, गरीब-श्रीमंती भेद, श्रद्धा-अंधश्रद्धा, ढोंगीपणा, माणुसकी यांचे दर्शन होते.
पूर्वीच्या काळी बंगालमध्ये जमीनदारांचा दबदबा होता. जमीनदार आणि रयत यांच्यातील नाते गुंतागुंतीचे होते. स्वत: रवींद्रनाथ जमीनदार होते. त्यामुळेच जमिनदारी हा त्यांच्या अनेक कथांचा विषय झालेला आहे. स्त्री शिक्षण, बालविवाह, विधवा विवाह, हुंडा, स्त्री-स्वातंत्र्य या साऱ्यांचे भेदक चित्रण त्यांच्या कथेत अशा काही रितीने मांडले आहे, की तत्कालीन परिस्थिती पाहता त्याचे श्रेष्ठव लक्षात यावे. रवींद्रनाथांच्या साऱ्या कथा या ‘माणूस’ केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या आहेत. माणसांचे मन, त्याचे अनेक पदर रवींद्रनाथांनी अतिशय कल्पकतेने या कथांमधून उलगडलेले आहे. ‘निसर्ग’ हा त्याच्या कथेचा स्थायीभाव आहे. माणसाचे निसर्गाशी असलेले नाते त्यांनी छान दाखवून दिलेले आहे. त्यांच्या साहित्यात निसर्गाला अढळपद दिलेले आहे. कवी रवींद्रनाथ तर त्यांच्या प्रत्येक कथांमधून डोकावतात. कथेतील अनेक वर्णने तर आपण एखादी कविता तर वाचत नाही ना असे वाटते. हे काव्यात्मक वर्णन या कथेच्या ओघात येतात, पण त्याला अडथळा ठरत नाहीत.
रवींद्रनाथांच्या कथेत माणुसकीला जसे केंद्रस्थान आहे तसेच त्यांच्या कथेत येते या घराचे ‘घरपण’. सामान्य माणूस, संस्कार, हळवेपणा हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्ये आहे.
‘काबुलीवाला, दुर्बुद्धी, अपरिचिता आणि चोरलेले धन या चार कथांमध्ये एक समान सूत्र आहे. या कथांमधून एका पित्याचे आपल्या मुलींबद्दलचे हृदय व्यक्त केले आहे. ‘काबुलीवाला’ या कथेतील रहमत हा अफगाण फेरीवाला संपादकांच्या मिनी या छोट्या मुलीच्या बडबड्या स्वभावामुळे तिच्यासारखाच हळवा होतो. या मिनीमध्ये तो हजारो मैल दूर असलेल्या अफगाणातील त्याच्या मुलीला पाहत असतो. तुरुंगातून सुटून आल्यावर वधुवेशातील मिनी त्याला ओळखत नाही. आपली मुलगीही आपल्याला ओळखणार नाही म्हणून तो हवालदिल होतो. संपादकाचे बापाचे मन कळवळते. रोषणाई, वाजंत्री याला फाटा देऊन तो ते पैसे काबुलीवाल्याला देतो व आपल्या मुलीला भेटून येण्यास सांगतो.
‘दुर्बुद्धी’ या कथेतील बापाला मुलगी गमावल्यानंतर बापाच्या हृदयातील दु:ख जाणवते. मग तो गावातील सर्वच मुलीचा आणि पित्यांचा ‘अपरिचिता’ कथेतील पिता अबोल, पण सुशिक्षित, खंबीर आहे. लाडक्या लेकीला संस्कृतीहीन पैशाचा हव्यास असलेल्या घरात देण्याऐवजी तो लग्न मोडतो आणि नवरदेवाला मंडपातून हाकलतो. ‘चोरलेले धन’ या कथेतील पिता आपल्या लेकीचे प्रेम, मन ओळखतो व तिचा तिच्या आईच्या इच्छेविरुद्ध विवाह घडवून आणतो.
बलाई आणि सुटी या दोन कथेत लहान मुले नायक आहेत. ‘बलाई निसर्गपुत्रच आहे. त्याने लावलेले सावरीचे झाड जसजसे मोठे होत जाते. तसतसा तो मोठा होत जातो. परदेशात जाण्यापूर्वी त्याला त्या झाडाचा फोटो हवा असतो, पण शेतातील वाटते येणारे ते झाड त्याचे काका जेव्हा तोडतात, तेव्हा बलाईवर पुत्रवत प्रेम करणारी काकी अबोल होते. ‘सुटी’ या कथेतील फटीक गावात दंगामस्ती करतो म्हणून कोलकात्याला मामा घेऊन जातो, पण शहरातील निसर्गाशिवायच्या वातावरणात तो गुदमरतो. आजारपणात तो मी घरी जातो असे बरळत राहतो. निसर्गात त्याला विलीन व्हायचे असते.
‘संस्कार’ आणि ‘तपस्विनी’ या कथांमध्ये रवींद्रनाथांनी उपहास आणि विनोद यांच्या सहाय्याने समाजातील ढोंगी चालीरितीवर टीका केली आहे. ‘संस्कार’ मधील धुव्रवता ‘खादी वापरून जातीभेदावर पांघरूण घालते’ असे म्हणते. पण प्रत्यक्षात स्पृश्य-अस्पृश्य भेद तिच्या मनातून जात नाही. कथानायक ‘माझ्या बायकोचा नवरा’ अशी स्वत:ची ओळख करून देतो व समाजातील भोंदूपणा, कावा, लबाडी यावर भेदक भाष्य करतो. ‘तपस्विनी’ मध्ये जुने जमीनदार वातावरण आहे. पण नायिकेच्या खिडकीतून बाहेर दिसणारे जग चैतन्याने सळसळणारं आहे. ज्या घरात पतीचे स्थान शून्य आहे, त्याच घरातून पती बेपत्ता होऊन संन्याशी झाल्याचे समजताच तीही संन्याशिनी होते. त्यानंतर ती स्वत:चं स्थान निर्माण करते, पण जेव्हा तिचा पती परत येतो तेव्हा तो एक फिरता विक्रेता बनून येतो. तेव्हा तिला भयंकर धक्का असतो, पण ती संन्याशिनीच राहते.
‘त्याग’ कथेत रवींद्रनाथांनी सिंधुबंदी, जातीभेद, विधवा विवाह या समस्यांचा वेध घेतला आहे. जाती-जातीतच नव्हे तर एकाच जातीतील भिन्न श्रेणीत विवाह होत नसताना कथानायक खालच्या जातीतील तेही विधवेशी विवाह करतो. त्यापायी त्याला घर, वडील आदी पाश तोडावे लागतात. ‘परतफेड’ ही कथाही कुलीनता, मालक-नोकर नात्यातील गुंता आदी समस्यांना तोंड फोडते. आपल्यापेक्षा हीन जातीतल्या मालकाकडे नोकरी करणाऱ्या उच्च कुलीन नोकराच्या पत्नीची घुसमट तिला सहन करावे लागणारे अपमान, मालकाच्या पडत्या काळात गळून पडतात. तेव्हा तिची कुलीनता उच्च कोटीत पोहोचलेली असते.
‘प्रथम तिज पाहता’ ही कथा एका तरुणाची मन:स्थिती स्पष्ट करते. खेडेगावातील सुंदर लावण्याला भुलून हा तरुण सोयरीक करतो, पण जिला त्याने पाहिले असते ती आपल्या जीवनसाथी नसल्याचे विवाहादिवशी लक्षात येताच त्याचे सारे जग अंध:कारमय होऊन जाते. पण जेव्हा एकाक्षणी त्याच्या हृदयातील ‘ती’ तरुणी मुकी आणि अजाण असल्याचे त्याच्या लक्षात येते तेव्हा पत्नी बनून त्याच्या आयुष्यात आलेल्या तरुणीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. ‘आजोबा’ या कथेतील नायक गत्वैभवात रमणाऱ्या एका आजोबाची थट्टा करतो, पण त्यांची आई होऊन त्यांना सांभाळणाऱ्या नातीकडून नायकाची कानउघडणी होते, तेव्हा त्याच्यातील हीनता गळून पडते.
‘गुप्तधन’ कथेत मात्र एक आगळवेगळा संदेश देण्याचा प्रयत्न रवींद्रनाथांनी केला आहे. संन्याशाची सेवा करणाऱ्या पूर्वजांकडे तो संन्याशी धनप्राप्तीचा एक कागद देतो. त्याच्याच घराण्यातील एकजण त्याचा शोध लावेल. अशी भविष्यवाणी करून तो निघून जातो. स्वत:च्या भावापासून लपवून ठेवलेला तो कागद आताच्या पिढीतील तरुणाकडून हरवला जातो. घरदार सोडून तो तरुण त्या कागदामागे धावतो. अखेर एका जंगलात तो संन्याशी दिसतो. त्याच्यापाठीमागे जात तो तरुण त्या खजिन्याजवळ पोहोचतो. तेथे असलेल्या संन्याशाला तो ठार मारण्याचा प्रयत्न करतो, पण संन्याशी वाचतो. संन्याशाला त्या खजिन्याकडे घेऊन जाणारी गुरुकिल्ली माहीत असते. म्हणून तो तरुण त्याच्या मागे लागतो. अखेर तो संन्याशी त्या ऐहिक ऐश्वर्यातून सहजसुंदर जीवनाचा मार्ग त्या तरुणाला दाखवून देतो. ‘चित्रकार’ या कथेतील चुनीलाल पैशाच्या मार्गाकडे नेणाऱ्या काकाऐवजी आईकडून मिळालेला कलेचा वारसा जोपासतो आणि ‘इंद्रदेवा’ची म्हणजे स्वत्वाची पूजा करतो. त्यासाठी त्याची आईच त्याला त्या मार्गावर नेते. ‘अतिथी’ ही कथाही भावस्पर्शी आहे. या कथेतला नायक तारापद लोभस, सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे. समाजाच्या स्वार्थी बंधनात तो अडकतो. घुसमटतो. पण आपल्या ‘मी’चे दर्शन होताच तो त्यातून मुक्त होतो. रवींद्रनाथ जेव्हा जमीनदारीची देखभाल करण्यासाठी त्यांच्या ‘पद्मा’ या नौकेतून कोलकात्यापासून दूर जात, तेव्हा त्यातून ते गावे, माणसे निरखत. ताल संवेदनक्षम कवीच्या मन:पटलावर ठसा उमटलेल्या क्षुल्लक गोष्टींनी कथेचे रूप घेतले. निसर्गाशी त्यांनी नाते जोडले. या कथेत त्याचा पुरेपूर परिचय येतो. राजश्री प्रॉडक्शनच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटाचे कथासूत्र याच ‘अतिथी’ कथेवर आधारित आहे.
-संदीप अडनाईक
- DAINIK LOKSATTA 29-05-2005
‘विश्वकवी’ आणि आशिया खंडातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांना कोण ओळखत नाही? ‘गीतांजली’ हा त्याचा काव्यसंग्रह तर जगप्रसिद्ध आहे. त्यांचे आणखी मोठे योगदान म्हणजे भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकारही तेच आहेत. अशा एकाहून एक सुंदर रचना करणारे टागोरही स्वत:ला कवीच म्हणून घेतात. परंतु ते जरी स्वत:ला कवी म्हणवून घेत असले तरी ते स्वत: एक तत्त्वज्ञ, विचारवंत, निबंधकार, प्रबंधकार, चित्रकार, संगीतकार, गीतकार, नाटककार, कादंबरीकार आणि कथाकारही होते. त्यांनी बंगालीतून अनेक उत्तम कथा लिहिल्या आहेत. त्यांच्या कथांमधून बंगाली समाजाचे दर्शन घडते.
त्यांच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी माणूस असतो. तसेच त्यांच्या प्रत्येक कथेत निसर्गही डोकावतोच. त्यांची कथा म्हणजे एक कविताच आहे, असे वाटते.
‘काबुलीवाला आणि इतर कथा’ या त्यांच्या कथासंग्रहातील १५ कथा अशाच आहेत. त्यात त्यांनी समाजातील जातिभेद, ढोंगीपणा, भेदभाव, श्रद्धा-अंधश्रद्धा हे सर्व दाखवले आहे. त्या काळात बंगालमध्ये जमीनदारीचा समाजावर पगडा असल्याने जमीनदार व त्यांची रयत हे बऱ्याच कथांमधून डोकावते.
काबूलहून आपल्या गावापासून लांब कोलकत्यात व्यापारासाठी येणाऱ्या रहमतीची कथा ‘काबुलीवाला’मध्ये आहे. तेथेच त्याला एक छोटी मुलगी मिनी भेटते. ती त्याला स्वत:च्या मुलीची आठवण करून देते. एक दिवस एका गुन्ह्याखाली काबुलीवाला यास अटक करण्यात येते. जेव्हा तो शिक्षा भोगून तुरुंगातून सुटतो तेव्हा मिनी लग्नाच्या वयाची झालेली असते. त्या वेळी त्याला आपल्या मुलीची आठवण येते. या कथेत मुलगी आणि पिता यांचे नाते लेखकाने दाखवले आहे.
‘बलाई’ या कथेत बलाई हा एक छोटा मुलगा म्हणजे मानवरूपातील निसर्गपुत्रच आहे. तो जेवढे निसर्गावर प्रेम करतो तेवढे कोणी करू शकते का? हाच प्रश्न पडतो. तो जेव्हा बोर्डिंगमध्ये जातो, तेव्हा त्यांनी लावलेल्या झाडातच त्यांची काकू त्याला पाहत असते. जेव्हा ते झाड त्याच्या काकाने तोडून टाकले तेव्हा त्याची काकू खरोखरच दु:खी झाली. या कथेत टागोरांचे निसर्गप्रेम दिसते.
‘बलाई’प्रमाणेच ‘सुटी’ या कथेतल्या केंद्रस्थानीही फटीक हा लहान मुलगाच आहे.
रवींद्रनाथांच्या कथा शंभर वर्षापूर्वींच्या जरी असल्या तरी त्या आजच्याच काळातल्या आहेत, असे वाटते. कारण अजूनही आपल्याकडे जातिभेद, दांभिकपणा आहे. त्यामुळेच त्या वाचताना कालबाह्य वाटत नाहीत. वाईटावर चांगुलपणाने मात केल्यास सर्वांचेच मंगल होते. हा सकारात्मक दृष्टिकोन मांडणारी कथा सौंदर्य व प्रसन्नता यांचा अनुभव देते.
-श्रेया खरे