- Sankalp Patil
महाराष्ट्र साहित्यात सर्वोत्कृष्ट १० किंवा ५ कादंबऱ्यांची नावे घेतली तर त्यात यायातीचे नाव अग्रक्रमाने येईल. तशी ही कादंबरी आहेच.कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केली आहे आणि मुखपृष्ठ देखील त्यांच्या तर्फेच रेखाटण्यात आले आहे. मुखपृष्ठ पांढऱ्या आश्वाच्या चित्राने रंगवले आहे. पुस्तक वाचून झालं की मग तुम्हाला त्यामागचा अर्थ कळेल की आश्वाचं चित्र का आहे ते ?
ययाति ही खांडेकरांची सर्वोत्कृष्ट रचना. वाचल्यावर हे उमगेलच. कथा महाभारतकालीन आहे. ययाति या राजाच्या आयुष्याची कहाणी. पण फक्त ययातिच नाही तर कच , देवयानी , शर्मिष्ठा या पात्रांचीही ही गोष्ट आहे. कथा ही पौराणिक असून कथेचा जो गाभा पुराणात आहे तोच इथेही आहे पण खांडेकरांनी काही धागेदोरे स्वतंत्र रीतीने यात गुंफले आहे. फार ताकदीने लेखन केलंय खांडे करांनी. यातल्या मुख्य चार पात्रांना एकमेकांविषयी प्रेम वाटते पण ते पुढे असफल , क्षणिक आणि अपुरे राहते.
कामवासना हा या कादंबरीचा गाभा ! मनुष्य शरीरसुखामागे / क्षणिक सुखामागे धावतो , त्याला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देतो आणि विनाशाकडे जात अनेकवेळा उपभोग घेऊनही अतृप्तच राहतो. हा या कादंबरीचा थोडक्यात सार . कथा जशी जशी पुढे जाते तसे तसे नवनवीन पात्र येत जातात. मुख्य चार पात्रे यात आहेत. जी शेवटपर्यंत राहतात.
यातला कच हा आधुनिक काळातल्या आदर्श पुरुषाचा नेतृत्वकर्ता. महाभारतातला खरा कच वेगळाच आणि या कादंबरीतला खांडेकरांचा कच वेगळा. फारच उत्कृष्टपणे त्यांनी तो रेखाटलाय . तो ध्येयवादी आहे. आसपास तो वासना बळावू देत नाही. तो संयमी आहे. प्रत्येक प्राणीमात्रावर तो निरपेक्ष प्रेम करतो , त्याचे देवयानी वरचे प्रेम जरी असफल झाले असले तरी तो थांबला नाही तो निर्मळ सरितेसारखा अविरत वाहतच राहिला. एकेकाळची आपली प्रेयसी आता संसारी स्त्री बनली आहे हे ध्यानात धरून ज्याप्रकारे तो देवयानी सोबत संवाद साधतो ते वर्णन तर उत्कृष्टच आहे.
देवयानी या पात्राचे तिच्या आयुष्यात ध्येय काहीच नव्हते. लाडात वाढलेली पोर ती. हे किती प्रातिनिधिक आहे बघा. आजच्या काळातही परिस्थिती एकदम अभिन्न. श्रीमंत घरात वाढलेली बहुतांश मुले ध्येयहिन असलेली दिसतात. बऱ्याचदा आंतरिक विचार त्यांच्या ठायी नसतो. इथेही तसच होतं. कुठलही योग्य निर्णय न घेता , पुरेसा विचार न करता फक्त शर्मिष्ठेचा बदला घेण्यासाठी - तिला आपली दासी बनवण्यासाठी देवयानीने यायातिशी लग्न केलं. त्यानंतर ती ययातिला ना प्रेम देऊ शकली ना शारीरिक - मानसिक सुख ! उलट आई झाल्यावर देखील तिच्यातली अवखळ , हट्टी आणि अविचारी लहान पोर दिसून येते.
आणि कदाचित याच कारणामुळे ययाति शर्मिष्ठेवर प्रेम करू लागला. एका आदर्श पत्नीने जे पतीला द्यायचे असते ते सर्व शर्मिष्ठेने ययातिला दिले. श्रीमंत वडिलांची मुलगी असूनही स्वतः च्या एका चुकीमुळे ती आयुष्यभर दासी बनून राहते. सर्व समस्यांना तोंड देते. सुख - विलासाचा त्याग करते , हे धाडसच !
कादंबरीत भावनात्मकतेचा मजबूत स्पर्श आहे. खांडेकरांची भाषा , त्यांची कल्पनाशक्ती आणि अधून मधून येणारी जीवन आणि वासना यांच्यावर भाष्य करणारी मजबूत वाक्ये खूप भावतात. कादंबरीची मांडणी खरंच खूप सुरेख आहे.
कादंबरी वाचताना अनेकदा व्यक्ती भावनातीत होऊन जातो. मीही झालो होतो. अनेक प्रसंग तर असे आहेत जे वाचल्यावर एखादा मर्मभेदी बाण काळजातून चर्र भेदून जावा असा धक्का लागून डोळ्यातून अश्रू येतात. कथेतल्या अलका आणि माधवी यांच्या प्रसंगात हे होईल !
वाचताना आपण प्रत्येक पात्राशी समरस होऊन जातो त्यामुळे एक एक प्रसंग जसा येतो तसं राग , द्वेष , मत्सर , अश्रू , दया , कणव , करुणा , आसुया या भावना अंतर्मनात युद्ध करतात. हरवून जायला होतं. खांडेकर जीवनाचं अंगभूत दर्शन घडवतात.कादंबरीतलं प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतं.
काही कादंबऱ्या मादक असतात. त्या भुरळ पडतात , ययाति - मृत्युंजय या कादंबऱ्या त्याच पट्टीतल्या.
ययाति समजून घ्यावी लागते !
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कादंबरी प्रातिनिधिक आहे. ती प्रातिनिधिक आहे आजच्या काळाशी - आजच्या समाजाशी. यातली सर्व प्रमुख पात्रे आजच्या पिढीतल्या मनुष्याचे प्रतिनिधी आहेत.
लहान - सहान गोष्टींचा मनात दंश धरणारे. सतत शर्यतीत असणारे , दिखाऊगिरीच्या पक्षातले, जीवनाचं आकलन नसलेले , धैर्य आणि ध्येय यांच्या गावीही न गेलेले अशा असंतोषी प्रवृत्तीच्या माणसांची देवयानी ही प्रतिनिधी आहे.
जगात अगदीच थोडे का असेना पण , इतरांवर निखळ प्रेम करणारे , चुका केल्यावर त्याची योग्य ती शिक्षा भोगणारे , परिस्थितीला समर्थपणे तोंड देणारे , त्याग करणारे , समर्पित होणारे , या प्रवृत्तींच्या लोकांची शर्मिष्ठा ही प्रतिनिधी आहे.
जीवन म्हणजे काय हे कळलेले , निर्णयक्षम , अवघड परिस्थिती योग्य प्रकारे हाताळणारे , जीवनात वासनेला अती महत्त्व न देता , धैर्याच्या मार्गाने चालणारे , संयमी , विचारी , प्रेमाचा वेगळा अर्थ उमजलेले , समाजासाठी खऱ्या अर्थाने आदर्श असणारे , अशा व्यक्तींचा कच हा प्रतिनिधी आहे.
भरकटलेले , जीवन सीमित समजणारे , कर्तृत्ववान परंतु चुकीच्या मार्गाला लागलेले. शरीराचे गुलाम झालेले , कामवासना हीच उच्च प्रकारचे सुख आहे असं समजणारे , दृष्टी अशुद्ध झालेले , बिघडलेले , मोहाला बळी पडलेले , अशा प्रकारच्या व्यक्तींचा ययाति हा प्रतिनिधी आहे. दुर्दैवाने आजच्या काळात ये ययातिच जास्त आहेत. कच कमी !
ही कथा तर वाचाच पण पुस्तकात कदाचित मुद्दाम दिलेली पार्श्वभूमी वाचाच वाचा. कादंबरी कशी जन्माला आली फक्त हेच नाही तर आजचा समाज , यातले व्यक्ती , भरकटलेली मानसिकता , पिसाळलेली कामवासना या सर्वांवर खांडेकरांनी अगदी आग ओकल्याप्रमाणे परखड भाष्य केलंय. चुकीच्या मार्गाने चालत असलेल्या समाजाबाबत त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे तर कामवासना ही एका विशिष्ट मर्यादेत असायला हवी असेही ते म्हणतात. जर तुम्ही ही पार्श्वभूमी वाचली नाही तर पुस्तक अर्धवट वाचल्या सारखं होईल.
कादंबरी वाचल्यावर तुम्हाला अनेक गोष्टी कळतील , समजतील , नव्याने उमगतील. खऱ्या अर्थाने वाचकांना मोठं करणारी कादंबरी !
खांडेकरांच्या लेखणीला सलाम ! 🙌
#ययाती #विसखांडेकर
- आकाश काशिनाथ साठे
#ययाति_कुणाची..🐎
..ययाति.. इंद्राला पराजित करुन स्वार्गावर विजय मिळवणाऱ्या एका शापित नहूषमहाराजांच्या वंशजाची..
..ययाति.. एका शापित पित्याच्या दोन पुत्रांची,सुखा च्या शोधात भटकत असलेल्या यती आणि ययाति या दोन राज पुत्रांची..
..ययाति.. एक राजकन्या असून पण आपल्या एका चुकी मूळ, आपल्या पित्याचे राज्य वाचवावे म्हणून जन्मतः दासी तत्व स्वीकार करणाऱ्या एका शर्मिष्ठा नावाच्या राजमातेची..
..ययाति.. एका अहंकारी स्त्रीची, घमंडी महाराणीची, स्वतःच्या सुखात मग्न झालेल्या पत्नीची, एका तपसव्याच्या पुत्रीची.. हा त्या क्रूर देवयानीची..
..ययाति.. त्या एका महान असलेल्या कचदेवाची, मित्रा साठी प्राणपणाला लावणाऱ्या त्या माधवाची, आपल्या बोबड्या बोलाणी मंत्र मुग्ध करणाऱ्या त्या तारकेची..
..ययाति.. त्या सोनेरी लट असणाऱ्या काहीही गुन्हा नसतांना मरण पतकाराव लागणाऱ्या अल्केची.. वासनेने भरलेल्या ययातिची, दासी मुकुलकीची,
..ययाति.. एक अश्या ययाति राज्याची ज्याच्या आयुष्यात शरीर सुखा शिवाय त्याला आयुष्यात सुख म्हणजे काय याची जाणीवच नसतं.. तब्बल अठरा वर्ष नव-नवीन सुंदरी भेटून पण अतृप्त राहणाऱ्या त्या राजाची ही ययाति..
.. ययाति.. त्या आपल्या सारख्या प्रत्येक वाईट नजरेच्या पुरुषाची, ययाति आता च्या जगात जगत असणाऱ्या त्या प्रत्येक अहंकारी स्त्री ची..
.. शरीर सुख हेच आयुष्यात सर्व काही नसतं त्या पलीकडे पण जग असतं,वासनेच्या इतक्या पण आहारी जायला नको की आपलाचं उपशाप आपल्या प्रियंजनानवर आपण लादण्यास कुचराई करू नये, वासने साठी आपले वर्धाक्य आपल्या पुत्रा ला देतांना आपल्या मनात कोणताही विचार येऊ नये..
..शेवटी ययाति मधीलचं काही ओळी जश्याच्या जश्या लिहावं वाटतं आहे..
🔸शरीरसूख शेवटी दुःखालाच कारणीभूत होत.. मग ते सुख स्पर्शाचा असो, अथवा दृष्टीच असो.. शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.. त्याच्या वर विजय मिळवण्याकरिता सतत धडपडत राहणं हेच या जगात मनुष्याच प्रमुख कर्तव्य आहे..
🔸माणूस शरीरावर प्रेम करतो, त्या प्रेमाला अंत नसतो.. पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करीत नाही.. प्रसंगी ते त्याचे वैर साधते..
..वी.स.खांडेकरांची ही कादंबरी त्या प्रत्येकासाठी एक उत्तम मार्गदर्शन करते जे आयुष्यात शरीर सुख हेच सर्वस्व आहे असे मानून त्यांचे आयुष्य जगत आहे.. त्यांच्या शब्दांनी या सर्व पात्रांच्या बोलण्यात जिवंत पणा आणला आहे..
.. कचदेवाचे पात्र हे मनाला भिडून जाते जरी या कादंबरीत दोन नायिका आणि एक नायक आपल्याला दिसतं असला तरी कच देव सुद्धा त्यात दुसऱ्या नायकाची भूमिका पार पाडून जातोय..
..थोडक्यता काही तरी घेऊ पाहणाऱ्यांसाठी अप्रतिम कादंबरी..
#जग_माणसाच्या_मनातल्या_दयेवर_चालत_नाही..
#ते_त्याच्या_मनगटातल्या_बळावर_चालत..
( टीप :- मागील "मूकद्दर" या कांदंबरीची पोस्ट केली असता काही अपुऱ्या इतिहास अभ्यास करणाऱ्यांनी ज्या कमेंट केल्या त्यांची हुशारी बघण्यासाठी ही पोस्ट.. मेन्शन करू वाटतं नाही.. आपण समोरच्याचा गैरसमज दूर करू शकतोय पण त्याच्या डोळ्याला लागलेला गैरसमजचा चष्मा काढू शकत नाही.. )
.
- Sharad Kharde Patil
आज वाचुन पुर्ण झाले.
मानवी मनाचा व त्याच्या भावनांचा अनके छटाच सोप्या शब्दात परंतु खुप गहिऱ्या अर्थात गुंफले आहेत.
वि. स. खांडेकर ना सलाम
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏
- सामना २१-२-२०२१
कादंबरी लिखाण हा एक जगमान्य साहित्य प्रकार आहे. त्यासाठी सशक्त कथानक व जबरदस्त मांडणीची गरज असतेही. अशातच वि. स. खांडेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली `ययाती` ही कादंबरी ६० वर्षांपासून वाचकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. याच कादंबरीला मराठी राजभाषेतील पहिला सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार (१९७६) मिळाला. या घटनेला २६ फेब्रुवारी रोजी ४५ वर्षे पूर्ण होत आहेत.
मराठी साहित्यातील सुवर्णाक्षरांनी अलंकारित नाव म्हणजे विष्णू सखाराम उपाख्य वि. स. खांडेकर होय. त्यांनी लिहिलेली अजरामर कादंबरी `ययाती` ही आज ६० वर्षाची ज्येष्ठ श्रेष्ठ झाली असली तरी आजही या कादंबरीचा केशरी गोडवा टवटवीत आहे. बेस्ट सेलर, बेस्ट भाषा, वाचकप्रिय असलेल्या या कादंबरीला आजही विक्रमी मागणी आहे. अस्सल भाषा वाचकांना खिळवून ठेवण्याची अमोघ शैली, अजोड कथेचा सुगंधी दर्प खांडेकरांच्या साहित्यात असल्यामुळे ते वाचकप्रिय लेखक ठरले आहेत. म्हणूनच इतर मराठी लेखकांच्या तुलनेने खांडेकर हे वरचढ ठरतात.
खांडेकरांच्या लेखन प्रवासात जे काही लिखाण झाले, त्यातील `अमृतवेल व ययाती` या दोन कादंबऱ्या खास वाचकप्रिय ठरल्या. लघुकथा, विनोदी लेखन, ललित निबंध, स्फुट लेखन, कविता, नाट्य व्यक्तिचित्रण अशा अनेक साहित्य प्रकारातून त्यांनी लिखाणाची चुणूक दाखवली. तेवढी त्यांच्यात प्रतिभा होतीही. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने कादंबरी व कथालेखनात विशेषत्वाने रमलेले दिसतात. यात त्यांच्या १५ पेक्षा अधिक कादंबऱ्या तर २७ पेक्षा अधिक कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. झपाटून लिहिताना दर्जेदारपणा व संयमितता पाळून वाचकांसमोर आदर्शवाद ठेवण्यावर त्यांनी त्यांनी भर दिला हे विशेष होय.
कुठलेही साहित्य हे ध्येयावर प्रेरित असते साहित्यातील लेखनाची प्रतिभा आणि तिची वास्तविकता यावरून साहित्य निर्मितीची बैठक कळते. सर्वोत्तम लिखाणामागची प्रेरणा काहीही असली तरी त्यातील वस्तुपाठ नाकारता येत नाही. या तत्वाप्रमाणे वाचकांसाठी आदर्शवादाचा वस्तुपाठ वाचकांसमोर ठेवण्याची किमया खांडेकर करू शकले.
सन १९६० हे वर्ष साहित्य क्षेत्रासाठी नवप्रतिभेचे ठरले. याच वर्षात खांडेकरांची `ययाती` प्रकाशित झाली आणि तिने सर्वच विक्रम प्रस्थापित केले. या विक्रमाची घोडदौड आजच्या डिजिटल युगातही अबाधित आहे. कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या १६ व्या वर्षी म्हणजे २६ फेब्रूवारी १९७६ मध्ये या कादंबरीस मराठी भाषेसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आज या गौरवशाली परंपरेला ४५ वर्षे झाली आहेत. येत्या ५ वर्षात या गौरवाची ५० वर्षे होणार आहेत.
यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर असा सन्मान मराठी राजभाषेला मिळालेला नव्हता. ही उणीव `ययाती` ने भरून काढली. अभिमानाची बाब म्हणजे खांडेकरांनंतर मराठीतील तीन लेखकांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. खांडेकरांनंतर ११ वर्षांनी प्रसिद्ध कवी तथा ज्यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणू साजरा केला जातो ते वि. व शिरवाडकर उपाख्य कुसुमाग्रज याना १९८७ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गपूरविण्यात आले. पुरस्कार मिळविणारे ते मराठीतील दुसरे लेखक ठरले. यानंतरच्या १६ वर्षांनी म्हणजे २००३ मध्ये कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. याचप्रमाणे १४ वर्षांनी म्हणजेच २०१४ मध्ये समीक्षक भालचंद्र नेमाडे याना ज्ञानपीठ पूरसाकर मिळाला. ते मराठीतील चौथे मानकरी ठरतात. असाच राष्ट्रीय पुरस्काराचा वारसा स्वाभिमानाने पुढेही चालू राहणार आहे.
वाग्देवीची मूर्ती, मानचिन्ह, प्रमाणपत्र, लाखांपेक्षा अधिक रोख रक्कम अशा स्वरूपाचा हा सर्वोच्च साहित्य पुरस्कार राष्टपतींच्या हस्ते प्रदान करण्याची परंपरा आहे. १९७६ मध्ये प्रदान ज्ञानपीठ पुरस्काराच्या वेळी भारतीय ज्ञानपीठचे अध्यक्ष शांतिप्रसाद जैन, उमाशंकर जोशी यांच्या सहीचे भव्य प्रशस्तीपत्र स्वीकारताना खांडेकर यांच्यासोबत तमाम मराठी भाषकांचा उर भरून येणे स्वाभाविकच होते.
महाभारतातील रंजक कथानक म्हणजे ययाती शुक्राचार्यांची मुलगी देवयानी व दासी शर्मिष्ठा. देवयानी जरी ययातिची पत्नी असली तरी तिचे प्रेम कचावर असते, तर ययातीचे शर्मिष्ठावर प्रेम जडते. अहंकारातून अग्निज्वाला प्रकटतात त्यातून वानवा पेटतो...जिवाची लाही लाही होते. महत्वकांक्षेतून देवयानी ययातीशी लग्न करते, पण यात तिच्या वाट्याला दुःख येते. शर्मिष्ठा या दोन नायिकांना समजावून सांगता सांगता कथेत ययाती सुखाच्या गाद्यांवर लोळत असला तरी अतृप्त राहतो याउलट कचाचा स्वभाव असतो. विचारशील संयमी जीवन जगणारा कच निरपेक्ष प्रेम करतो. शुक्राचार्यांसारखीच विद्या कचाने प्राप्त केली होती. कृत्रिम वार्ध्याक्य दूर करण्याची सिद्धीविद्या त्याने प्राप्त केली होती. याच सिद्धीनुसार कचाने शर्मिष्ठेचा पुरुचे यौवन त्यास पुन्हा परत मिळवून दिले होते . याच पुरूने वडिलांचे म्हणजे ययातीचे वार्ध्यक्य घेऊन आपले यौवन ययातीला दिले होते. आपला भाऊ यदूसाठी त्याने राजसिंहासन नाकारले होते, पण पुढे तोच महाराजा होतो.
अशी ढोबळमानाने `ययाती` कादंबरीची रचना असली तरी मानवी जीवनातील अक्षांश-रेखांशाचा आलेख आहे.कादंबरीतील ययाती हा सम्राट महाराजा आजच्या सामान्य व्यक्तीचा प्रतिनिधी आहे अशी स्वतःच कबुली खांडेकर देतात. यासंदर्भात `ययाती` कादंबरीच्या शेवटी २५ पानांची विस्तृत पाःर्वभूमी देऊन खांडेकरांनी कादंबरी लिखाणामागची प्रेरणा कथानुभव, कथाविष्करण याबाबत स्पष्टीकरण केले आहे.
आज ६१ वर्षांच्या या कादंबरीने वाचकांची मने जिंकून निस्सीम प्रेम केलेले आहे. डिजिटल युगातही हि कादंबरी पुनः पुन्हा वाचाविशी वाटते.
*दोन पिढ्यांचा संस्कार*
खांडेकरांच्या `ययाती` कादंबरीचे पहिले प्रकाशन रेडबुक अँड कंपनीतर्फे १९५९ मध्ये झाले होते. सध्या या कादंबरीचे हक्क पुण्यातील मेहता पब्लिशिंग हाऊसकडे आहेत. कादंबरीची आज तब्बल ४१ वी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. यासंदर्भांत मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्याशी थेट संपर्क केल्यानंतर त्यांनी मराठी राजभाषेचा गौरव आणि खांडेकरांविषयी आपुलकी व्यक्त केली. प्रचंड खपाची ही कादंबरी ६० वर्षात दोन पिढ्यांमधील संस्कार आहे. वाचकांनी कादंबरीवर प्रचंड प्रेम केल्याचे सुनील मेहता यांनी अभिमानाने सांगितले. २०१३-१४, २०१६ मध्ये `ययाती` च्या तब्बल दोन छोट्या आवृत्या काढाव्या लागल्या. `ययाती` ची दरवर्षी १० हजार प्रतींची विक्री होत असली तरी आज प्रकाशित पुस्तकांच्या आवृत्या छोट्या झाल्या आहेत. आज ६ ते ८ हजार प्रतींची आवृत्ती निघत असल्याची खंतही मेहता व्यक्त करतात. मराठीत ललित लेखनाला मोठी परंपरा आहे. मराठीचा राष्ट्रीय पातळीवर जेवढा गौरव व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. अशा परिस्थितीत ७० च्या दशकात खांडेकरांना `ज्ञानपीठ` रूपाने मराठी राजभाषेसाठी राष्ट्रीय नामांकन मिळाले ही अभिमानाची गोष्ट आहे.`ययाती` मधील कथानक विलक्षण आणि एकमेवाद्वितीय आहे. महाकथात्मक स्वरूपातील `ययाती` दर्जेदार कादंबरी आहे असे सांगत मेहता यांनी जात जात आज घडीला दर्जेदार नवसाहित्य निर्माण व्हायला पाहिजे असा आशावादही व्यक्त केला.
- Sambhaji Patil
मनाला एका नवीन विश्वात घेऊन जाणारी कादंबरी....
- Kadambari Mate
#ययाति
***** ययाति ( कादंबरी ) वि.स.खांडेकर ******
----- कादंबरी मते.
मराठी साहित्यविश्वातील मैलाचा दगड ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी `ययाति`म्हणजे वि.स.खांडेकर यांच्या एकुण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील मेरुमणीच होय. ययातिच्या लोकप्रियतेचे गारूड मराठी मनावर आजही कायम आहे. वासना आणि मोह एका मर्यादेपलीकडे गेले की त्याने येणारं आंधळेपण आपल्याकडून काय काय घडवून आणू शकतं याचं उत्तम दर्शन म्हणजे ही कादंबरी.
खरंतर देवयानी आणि ययाति हे महाभारतातील एक अतिशय छोटे उपाख्यान आहे. त्यामुळे या कथेचा आत्माही लहान आहे. पण खांडेकरांनी या कथेवर विस्तारपूर्वक कादंबरी लिहिली आहे.
वि. स. खांडेकर स्वतः म्हणतात, ययाती ही शुद्ध पौराणिक कादंबरी नाही. पुराणातल्या एका उपाख्यानाच्या कथासूत्राचा आधार घेऊन लिहिलेली स्वतंत्र कादंबरी आहे.
उदाहरणच द्यायचे झाले, तर संजीवनी विद्येचे हरण करून देवलोकी गेलेला महाभारतातील कच पुन्हा आपल्याला कधीच भेटत नाही. मात्र या कादंबरीत तो शेवटपर्यंत येत राहतो.
मुळ आख्यान नीट वाचले तर लक्षात येते, देवयानीचे खरे प्रेम कचावर होते, पहिलेवहिले आणि उत्कट प्रेम होते. तिने ययातिशी लग्न केले ते महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन.. तिने शर्मिष्ठाला आपली दासी केले ते सुडाच्या समाधानासाठी... अशी अहंकारी, महत्त्वाकांक्षी, प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी....
या कादंबरीत ययाति हा आजच्या सामान्य मनुष्याचा प्रतिनिधी आहे. पुराणातल्या ययातिची अनिर्बंध कामवासना किती अमानुष स्वरूप धारण करू शकते आणि भोगाच्या समुद्रात मनुष्य किती ठेवला तरी त्याची वासना तृप्त होत नाही याचे चित्रण आले आहे.
आजचा मनुष्य केवळ अंधत्वाने क्रूर कामवासनेला बळी पडत आहे असे नाही तर त्याचे सर्वच मनोविकार अनिर्बंध आणि अनियंत्रित होऊ पाहत आहेत.
कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत.
"ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी," अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.
ययातिची जन्मकथा सांगताना खांडेकर म्हणतात, "संसार हा संकटांनी भरलेला असावयाचाच!कुणाचे हे ओझे हलके असते,कुणाचे थोडे जड असते,कुणाच्या पायात चार काटे अधिक मोडतात, कुणाच्या चार कमी मोडतात. एवढाच काय माणसा-माणसात फरक असतो.आपण सारेच नियतीच्या जात्यात भरडले जाणारे दाणे आहोत."
" मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी,त्यागाची पुराणं देवळात ठिक असतात!पण जीवन हे देवालय नाही ते रणांगण आहे."
यति हस्तीनापुरात परत न येण्यामागचे कारण सांगताना म्हणतो की,`या जगात खरा आनंद एकच आहे तो म्हणजे ब्रम्हानंद.`आसक्तीन मनुष्य शरिरपुजक होतो.दु:खी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी होण्याची यतिची इच्छा होती. "जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोप नाही." .
कचरुपात वि.स.खांडेकर यांनी अखिल मानवतेसाठी या संसाररुपी भवसागरातुन आनंदाने तरुन जाण्यासाठीचे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितले आहे. `धर्माचे उल्लंघन न करणाऱ्या उपभोगात पाप नाही.पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे तो म्हणजे त्यागाचा .` "संसार करणं हीच मनुष्याची सहजप्रवृत्ती आहे. साहजिकच त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या उपभोगांना स्थान आहे. माणसाने उपभोग घेवू नयेत अशी ईश्वराची इच्छा असती तर त्याने शरीर दिलचं नसतं.परंतु केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे,
"मृत्यु हा अष्टोप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे."
"प्रिय व्यक्तीचा तिच्या गुणदोषांसह स्विकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते."
कच म्हणतो, "जीवन नेहमी अपूर्ण असतं तस ते असण्यातच त्याची गोडी सामावलेली असते.` खरं प्रेम नेहमीच निरपेक्ष, निस्वार्थी,निरंहकारी असते.जीवनात प्रेम ही उच्च भावना आहे पण कर्तव्य प्रेमापेक्षाही श्रेष्ठ भावना आहे, कर्तव्याला वेळप्रसंगी कठोर व्हावे लागते; पण कर्तव्य हाच धर्माचा मुख्य आधार आहे."
मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम. विविध इंद्रिय म्हणजे रथाचे घोडे उपभोगाचे सर्व विषय त्याचे मार्ग इंद्रिये आणि मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता. इंद्रिय रूपी घोड्यांना मनाच्या लगामाच बंधन सतत हवं. मनावर बुद्धीचे नियंत्रण हवं बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात. ` संसार हा श्रेष्ठ आणि पवित्र यज्ञ आहे सहस्त्र अश्वमेध यांचं पुण्य त्यात सामावलेले आहे`
ययाति कादंबरीचे गारूड रसिकांच्या मनावर असे राज्य करणारे आहे. म्हणूनच की काय हिंदी, इंग्रजी, मल्याळम, गुजराथी या भाषिकांनाही ययाति आपलीसी करावीशी वाटली. ययाति वाचत असतानाच मराठी भाषेतील असणाऱ्या अलंकारित शब्दांनी वाचकाचे मन दिपून जाते. खांडेकरांची कथेला कलाटणी देण्याची सुसूत्रता वाचकांना थक्क व्हायला लावते. त्यातील रहस्यरम्यता, यातील प्रत्येक पात्र जणू स्वतंत्रपणे स्वतःशीच संवाद साधत आहे. मात्र, तसे करताना तेच पात्र मात्र त्यांची जीवनगाथा सर्वांनाच सुपरिचित करून देतात.
सुखलोलूप ययाती, अहंकारी देवयानी, प्रेमळ शर्मिष्ठा, कोपिष्ट शुक्राचार्य, शूर-धीर-त्यागी पुरू, संन्यासाश्रमाच्या अतिरेकातून विकृत झालेला यती, संन्यस्त तरीही जीवनातील द्वैत-संघर्ष-सौंदर्य यांचा समंजस स्वीकार करणारा कच या या कादंबरीच्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.
संसारात पैसा, कामवासना सुखं या सगळ्यांपासून असमंजसपणे पळून जाणारा, प्रत्येक सुख म्हणजे पाप आहे असं समजणारा यती विकृतीचं एक टोक आहे तर फक्त सर्वसुखोपभोग म्हणजेच आयुष्य असं मानणारा ययाती हे विकृतीचं दुसरं टोक.
जीवनातलं सुख-दुःख, प्रेम-वासना, आयुष्याचा आनंद घेणं- त्यामध्ये वाहून जाणं याबद्दल ही उद्बोधक चर्चा आहे. लेखकाचं वैशिष्ट्य असं की ही चर्चा कथेच्या ओघात येते, पात्रांच्या सहज संवादात येते, चर्चा नीरस होत नाहीच उलट कथानक पुढे घेऊन जायला, प्रसंगाची परिणामकारकता वाढवायलाच मदत करते.
ययाति वाचताना एक गोष्ट लक्षात येते , काळ बदलतो प्रवृत्ती नाही. ऐतिहासिक पात्रांच्या प्रवृत्तीची एखादी तरी आवृत्ती काळाच्या प्रत्येक टप्प्यावर पाहिला मिळते. असंख्य यती, ययाति, कच, देवयानी, शर्मिष्ठा आपल्या आजुबाजूला असतात . फक्त आपण त्यांना समजून घेऊ शकत नाही. दैव माणसाला खेळवतं, अगदी वाटेल तसं पण म्हणून जो सारीपाट विध्यात्यानं रचला आहे तो क्षणार्धात आपण उधळून लावू शकत नाही.
भोगा: न भुक्ता: वयम् एव भुक्ताः
तप: न तप्तं वयम् एव तप्ताः।
काल: न यात: वयम् एव याताः
तृष्णा न जीर्णा वयम् एव जीर्णाः॥
आम्ही भोग भोगले नाहीत, तर आम्हीच भोगांकडून भोगले गेलो। आम्ही तप केले नाही, पण आम्हीच तापवले मात्र गेलो। काल गेला नाही (आम्ही काल व्यतीत केला नाही), तर, आम्हीच कालमुखी गेलो। तृष्णा (अतृप्ती) जीर्ण (कमी) झाली नाही, तर, आम्हीच जीर्ण (म्हातारे) झालो।
या जगात जन्माला येण्याचा एकाच मार्ग आहे, तसं मरणाच नाही…
मृत्यु अनेक वाटांनी येतो! कुठून ही येतो तो!
***
आत्मप्रेम
या जगात जो तो आपापल्याकारिता जगतो हेच खरे.
वृक्षवेलीची मूळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात…..
याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रिती म्हणते, तर कधी मैत्री……..पण खरोखरच हे “आत्मप्रेम” असते….
***
आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे,
असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते………
***
अपहार
ते फूल पाहून माझ्या डोळयांना जे सुख होईल ते सुख प्रत्येक दिवशी मी घेणार आहे.
ते फार चांगलं उमललं म्हणजे वेलीजवळ जाउन त्याचा वासही घेणार आहे मी.
पण ते तोडणार मात्र नाही. आज वासासाठी एक फूल खुडलं तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फूलामागून फूलं खुडाविशी वाटतील मला.
मग दूस-यांच्या फूलांचा अपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल……..
अपहारासारखा अधर्म नाही……….
***
सुख
या जगात सुख लूटण्याचा काळ एकच असतो—–ते मिळत असते तेव्हा…….!
***
प्रिती
प्रिती ही कधी उमलणा-या फूलासारखी हसते तर कधी उफाळणा-या ज्व़ाळेसारखी दिसते.
ती कधी चांदणी होते, तर कधी वीज होते. ती कधी हरिणीचे रूप घेते, तर कधी नागीणीचे… ती कधी जीव देते, तर कधी जीव घेते………!!
***
जीवन
जीवन नेहमीच अपूर्ण असतं. नी असं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे…
***
प्रेम
प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो,
ते कशावरही जड़लेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते स्वार्थी, लोभी, किंवा फसवं असता कामा नये.
खरं प्रेम नेहमीच नि:स्वार्थी असतं, निरपेक्ष असतं… मग ते फूलावरलं असो, प्राण्यावरलं असो, सृष्टिसौंदर्यावरलं असो, आई-बापावरलं असो,
प्रियकर-प्रेयसी यांच्यावरलं असो, कुल, शांति, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो. नि:स्वार्थी, निरपेक्ष,
निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते………..
असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो!
***
जग माणसाच्या दयेवर चालत नाही.
ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं.
माणुस केवळ प्रेमावर जगुच शकत नाही.तो इतरांचा परभव करुन जगतो.
मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी ! !
त्यागाची पुराणं देवळातच ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही,ते रणांगन आहे.
***
मुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का ?
फुलाचे चित्र काढून कधी त्याचा सुगंध घेता येईल का ?
प्रीतीची अनुभूती सुद्धा अशीच आहे.
***
दैव हे मोठ क्रूर मांजर आहे माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असतो
***
माणसांन उपभोग घेऊ नये अशी जर देवाची इच्छा असती,
तर त्यानं शरीर दिलच नसतं, पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे.
देवान माणसाला शरीराप्रमाणे आत्माही दिला आहे.
शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याच बंधन हवं
त्यागाची पुराण देवळात ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही ,
ते रणांगण आहे.
1) जगात सर्व गोष्टी मानसाला योग्य वेळी कळतात. झाडांना काही पानांबरोबर फुले व फुलांबरोबर फळे येत नाहीत.
2) मानुस शरीरावर प्रेम करतो. त्या प्रेमाला अंत नसतो. पण शरीर काही त्याच्यावर असे प्रेम करत नाही. प्रसंगी ते त्याचे वैर साधते.
3) सुंदर दिसणाऱ्या आणि गोड असणाऱ्या फळात किड आढळते. जिवन असेच आहे. ते सुंदर आहे, मधुर आहे. पण त्याला केव्हा कोठून किड लागेल याचा नेम नसतो.
4) जिवनाचं रहस्य नेहमीच गुहेत लपलेलं असतं. त्या गुहेच्या दारातून आत जावून आतल्या काही न दिसणाऱ्या अंधारातून आपल्यापैकी प्रत्येकाला हे रहस्य स्वतःच शोधून काढले पाहीजे.
5) मानवी मनाची आणि जिवनाची गुंफण मोठी विलक्षण आहे. त्यामुळे सुख हा अनेकदा मृगजळाचो शोध ठरतो.
6) सुख ही दुखःची छाया आहे, की दुःख ही सुखाची सावली हे न उलगडलेलं कोडं आहे.
7) रुपवती स्त्री जशी विनयानं शोभून दिसते. तसेच अर्थ आणि काम हे धर्माच्या संगतीत सुंदर वाटतात.
8) या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव शापीत असतो. कुणाला पुर्वजन्माचं कर्म भोवतं, कुणाला आई बाबांच्या दोषाची फळं चाखावी लागतात, कुणी स्वभावदोषामुळे दुःखी होतात तर कुणाला परिस्थितीच्या शृंखलात बद्ध होवून जिविताचा प्रवास करावा लागतो.
9) जिवन हा अनेक शापांनी युक्त असा एक वर आहे.
10) मृत्यू हे एक मोठे अस्वल आहे. कितीही उंच झाडावर चढून बसले, तरी ते मानसाचा पाठलाग करते. कुठेही लपून बसा, ते काळे कूरुप प्रचंड धुड आपला वास काढत येते. त्याच्या गुदगुल्यांनी प्राण कंठाशी येतात.
11) मृत्यू हा अष्टौप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे. याला जगात कोणी विरोध करु शकत नाही.
12) सत्य
लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते.
नुकत्याच जन्मलेल्या बालाकाप्रमाने असते ते ! ते तसे असावेच लागते……….
13) बायकांचं लक्ष पुरुषाच्या जिभेकडं नसतं, ते डोळ्यांकडे असतं !
14) मानसाने जिवनाच्या मर्यादा कधी विसरु नयेत.
15) यौवन म्हणजे वार्धक्यातली पहिली पायरी. मृत्यू ही वार्धक्याची शेवटची पायरी.
16) वृक्षवेलीची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात, तशी मानसे सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याचाच जग कधी प्रेम म्हणतं. कधी प्रिती तर कधी मैत्री पण खरोखरच हे आत्मप्रेम असते.
17) द्वंद्वपूर्ण जिवणात तत्वज्ञान हाच मानवाचा अंतिम आधार आहे.
18) या जगात जन्माला येण्याचा एकच मार्ग आहे. पण मरणाचं तसं नाही. तो अनेक वाटांनी येतो. कुठूनही येतो.
19) मृत्यू हा जीवन मात्राला जितका अप्रिय तितकाच अपरिहार्य आहे. तो सृष्टीच्या जन्मानइतकाच नाट्यपूर्ण आणि सहस्यमय भाग आहे.
20) सौंदर्याची पुजा हा “स्त्री’चा धर्म आहे. ती कुठल्याही सुंदर वस्तूचा नाश करु शकत नाही.
21) जो घाव घालतो, त्याला तो विसरुन जाणं सोपं असतं. पण ज्याच्या कपाळावर घाव बसतो, त्याला त्याचा कधीच विसर पडत नाही.
22) प्रिय व्यक्तिचा तिच्या दोषांसह स्विकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते. असली पाहिजे.
23) जिवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे. पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे.
24) आपल्यासाठी दुसऱ्याच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहण्यात अपूर्व आनंद असतो.
25) डोळ्यांत अश्रू येणे हे दुबळ्या मनाचे लक्षण आहे.
26) विचारांच्या सहाय्याने विकारांवर विजय मिळविण्यातच खरा पुरुषार्थ मनुष्यधर्म आहे.
27) दैव मोठं लहरी आणि निर्दयी आहे. ते एका क्षणात आकाशातील उल्केला पृथ्वीवरला पाषाण करुन सोडते.
28) कुणाचंही दुखः असो. ते कळण्याचा मार्ग या जगात एकच आहे. तो म्हणजे त्याच्या जागी आपण आहोत, अशी कल्पना करणे.
29) जी नदी तहानेनं व्याकूळ झालेल्या मनुष्याची तृष्णा शांत करते, तिच पुढे खोल पाण्यात गेला की त्याचा प्राण घेते.
30) ज्याचा आत्मा स्वार्थाच्या वासनांच्या आणि भोगांच्या आहारी जातो, तो मनुष्य या जगात सदैव दास्यात खितपत पडतो.
31) स्त्रीयांच्या बरोबर चिरकाल स्नेह राहणं शक्य नसते. कारण त्यांची ह्दयं लांडग्याच्या हृदयासारखी असतात.
32) पापाचा विषवृक्ष विश्वव्यापी असतो. त्याची पाने मोहक दिसतात. त्याची फुलं धुंद करुन सोडतात. पण त्याची फळं…. त्याच्या प्रत्येक फळात तक्षक लपुन बसलेला असतो. त्याचा दंश कुणालाही केव्हाही होवू शकतो.
33) दुःखाचे सात समुद्र ओलांडल्याशिवाय आनंदाचे कधीही न सुकणारे फुल मानसाला मिळू नये, असा जिवनाचा नियम आहे की ?
34) मानुस हा देव आणि राक्षस यांचा विचित्र संकर आहे.
35) संयोग आणि वियोग यांच्या अद्भुत रसायनालाच जीवन म्हणतात का ?
36) समुद्राच्या किनाऱ्यावर लहान मुलं वाळूचा किल्ला बांधतात. भरतीची एक लाट येते आणि तो किल्ला कुठच्या कुठं नाहिसा होवून जातो. त्या वाळूच्या किल्ल्यापेक्षा मानसाचे जीवन काय निराळे आहे ?
37) जे जीवन वाट्याला आलं आहे, ते आनंदानं जगणं… त्या जिवनातील रस किंवा सुगंध शोधनं, तो सर्वांना आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.
38) निराशेपेक्षा खोटी आशा फार वाईट असते.
39) जिवनाच्या जमा खर्चात उधारीला जागा नाही. जो आज सुगंधी फुलांचा वास घेत नाही. त्याला तो उद्या मिळेलच असे नाही. या जगात उद्याची सोनेरी सकाळ उगवेल, उद्याची सोनेरी फुले फुलतील पण त्या उद्याच्या जगात हा वास घेणारा असेलच असे नाही.
40) जीवन क्षणभुंगुर आहे. या जगात कोणत्या क्षणी मानसाला मृत्यू येईल याचा नेम नाही. म्हणून आपल्याला मिळणारा प्रत्येक क्षण हा मानसाने सुवर्णक्षण मानला पाहिजे. त्यातला रस, सुगंध आनंद अगदी कठोरपणे पिळून घेवून मानसाने आपली सुखाची तृष्णा शांत केली पाहिजे.
सुख
या जगात सुख लूटण्याचा काळ एकच असतो—–ते मिळत असते तेव्हा…….!
जीवन
जीवन नेहमीच अपूर्ण असतं. नी असं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे…
- Uday Dhamal
ययाती एका वेगळ्या कारणासाठी लोक वाचतात हे सगळ्यांना च माहीत असेल बहुधा तरुण वाचक शृंगार म्हणून. पण मला थोडी वेगळी वाटली ययाती
आपण ठरवा माझे निरीक्षण
1.ययाती आणि यती हे दोघे भाऊ भाऊ लहानपणीच वेगळे होतात
ययाती ला वाटत असते संसाराची सर्व सुखे उपभोगली तरच जन्माचे सार्थक ( मोक्ष मिळतो )होते(जशी कायम तरुणाई ची कल्पना आहे ये नही किया/पिया तो क्या जिया वगैरे वगैरे )
आणि यती ची मात्र धारणा अशी होती की शरीर फक्त साधन आहे आत्म्याचे. त्यामुळे जे करायच ते आत्म समाधानासाठी शरीरासाठी नाही किंवा शरीराला त्रास वेदना देवून, शारीरिक सुखांचा त्याग करून तो भटकत असतो आयुष्य भर (त्याच्या कल्पनेतील मोक्षाच्या )शोधात.
पण आयुष्याच्या एका कालावधीनंतर दोघे एकमेकांना भेटतात आणि आयुष्य काय आहे यावर तात्विक चर्चा करतात बरं का दोन्ही भाऊ मिळून( सारासार)
(आजच्या काळात नवल वाटेल पण आजही काही परिवार अश्या चर्चा करतात आणि आपला उत्कर्ष प्रगती करतात बरं का विषयांतर)
तर त्या दोघांना अस जाणवलं की आयुष्यात येवून दोघेही दोन टोकांना आयुष्याचा ( मोक्षाचा) शोध घेत होते एक पूर्ण उपभोग/भोग घेवून आणि दुसरा सर्व भोग सोडून किंवा त्यागून, पण त्यांच्या लक्षात आल आयुष्य जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग तर मध्यम मार्ग आहे ना फक्त सुख भोगून ना सर्व सुख त्यागून, म्हणजे तुकाराम महाराज सांगतात तस संसारात राहून जमेल तसा परमार्थ करावा त्यात गुंतून पडू नये.
2.बहुतेकांनी पुस्तकाची शेवटची मीमांसा 50पाने वाचलीच नाहीत पुस्तकाची कथा संपली म्हणून पुस्तक बाजूला केले. पण खरा मतितार्थ तर तिथेच आहे. त्यात एक संस्कृत श्लोक आहे ज्यात लेखक सांगू इच्छितात की कामेछ्या ही यज्ञातील आगीप्रमाणे असते आपण जसेजसे हवीर्द्रव्य त्याला आहुती देतो किंवा आगीत टाकतो ( आपण जेवढा जास्तीत जास्त प्रणयाचा विचार करतो ) तशी तशी ही आग जास्तच भडकत जाते मनावर संयम ठेवला तर भडकत नाही. त्यामुळे ह्या यज्ञाला चांगले विचार करून शांत नियंत्रित ठेवा.
पर्यायाने लोक ह्याच्या उलट कारणासाठीच ययाती वाचतात हे दुःख आहे.
असो तरीपण जास्तीत जास्त लोकांनी ही कादंबरी वाचावी आपण पु. ल./व. पु. वाचत असालच पण कालातीत वाचायच असेल तर वि. स. खांडेकर(क्रौंच वध) पण वाचाल अशी अपेक्षा करतो
आपले ही असे काही निरीक्षण असल्यास कुठलाही किन्तु न बाळगता कळवावे.
- Sanket Chinchkhede
वासनेचा आधार घेऊन प्रत्येकातल्या ययातीच्या कानशिलाखाली लगावण्याचं काम ही कादंबरी करते. वासना आणि मोह एका मर्यादेपलीकडे गेले की त्याने येणारं आंधळेपण आपल्याकडून काय काय घडवून आणू शकतं याचं ऊत्तम दर्शन घडवणारी ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी अशीच आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेली ही कादंबरी वि.स.खांडेकर यांच्या अजोड लेखणीचं ऊत्तम ऊदाहरण आहे. 🍀💯❤
- Swapnil Kadu Patil
मराठी साहित्यविश्वातील मैलाचा दगड ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी `ययाति`म्हणजे वि.स.खांडेकर यांच्या एकुण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील मेरुमणीच होय.ययातिच्या लोकप्रियतेचे गारूड मराठी मनावर आजही कायम आहे.
ययातिची जन्मकथा सांगताना खांडेकर म्हणतात,
"संसार हा संकटांनी भरलेला असावयाचाच!कुणाचे हे ओझे हलके असते,कुणाचे थोडे जड असते,कुणाच्या पायात चार काटे अधिक मोडतात, कुणाच्या चार कमी मोडतात. एवढाच काय माणसा-माणसात फरक असतो.आपण सारेच नियतीच्या जात्यात भरडले जाणारे दाणे आहोत."
लेखक म्हणतात ययाति शुद्ध पौराणिक कादंबरी नाही. पुराणातल्या एका उपाख्यानातील कथासुत्राचा आधार घेऊन लिहलेली स्वतंत्र कादंबरी आहे. ही कादंबरी ययातिची कामकथा,देवयानीची संसारकथा,शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि कचाची भक्तीगाथा समजून वाचकांनी वाचली तर मला आनंद वाटेल असे खांडेकर सांगतात.
सकस दर्जेदार कथा,पात्रांची सुंदर गुंफण,जीवनरूपी रथ अध:पतनाच्या खोल दरीत जाण्याची कारणे,मानवी जीवन सुंदर आनंदी होण्यासाठी कथेतील पात्रांतुन मांडलेले मौलिक तत्त्वज्ञान प्रभावीपणे मांडल्याने वाचक चिरकाल कादंबरीच्या प्रेमात पडतो.
"अर्थ व काम यांच्या स्वैर संचारावर आणि नग्न वर्तनावर ज्या समाजात धर्माचे नियंत्रण नसेल मग तो धर्म जुन्या काळातील ईश्वर श्रद्धेसारखा किंवा कर्तव्यनिष्ठेसारखा अथवा नव्या काळातील समाजसेवा,मानवसेवा,सहजीवन यांसारखा असो त्या समाजाचे अध:पतन झाल्याशिवाय राहत नाही."ही ययाति कादंबरीची चिरंतन स्वरूपाची शिकवण आहे.
`हा नहुष आणि याची मुले कधीही सुखी होणार नाहीत!`असा शाप असलेल्या हस्तीनापुरच्या नहुषमहाराजांचा ययाति मुलगा होता. आपली कथा सांगताना ययाति म्हणतो की,
"राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कौतुकाने पाहतात."
ययाति आपली कथा उलगडवुन सांगण्यामागची प्रेरणा सांगताना म्हणतो की,
"जग चुकते,त्या चुकीविषयी ऐकते ,पण शिकत मात्र नाही!प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो,पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी."
ययाति बालपणीचा रम्य काळ सांगताना म्हणतो की,`बालपणीच्या आठवणी नाजुक, मोहक,बहुरंगी जणु काही मोरपिसेच होती.`
ययातिचा मोठा भाऊ यति शापाच्या भितीने विरक्तीचा ध्यास घेऊन राजमहाल सोडून पळून गेलेला असतो त्याचे दुःख राजमातेच्या मनात सलत होते. वृद्ध अमात्याचे बोल ययातिच्या मनावर कोरले जातात व जडणघडणीवर विपरित परिणाम करतात.
`जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं.`
"मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी,त्यागाची पुराणं देवळात ठिक असतात!पण जीवन हे देवालय नाही ते रणांगण आहे."
दिड वर्षे अश्वमेधाच्या घोड्याबरोबर सृष्टीची विविध रूपे अनुभवताना पुर्व आर्यावर्तात ययाति व यतिची भेट घडून येते. यति हस्तीनापुरात परत न येण्यामागचे कारण सांगताना म्हणतो की,`या जगात खरा आनंद एकच आहे तो म्हणजे ब्रम्हानंद.`आसक्तीन मनुष्य शरिरपुजक होतो.दु:खी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी होण्याची यतिची इच्छा होती.
"जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोप नाही."
देव दानवांचे युद्ध होऊ नये म्हणून अंगिरस ऋषी शांतियज्ञ आरंभतात. या शांतियज्ञाचा प्रमुख ऋत्विज देवगुरु बृहस्पतींचा मुलगा कच व यज्ञाचा प्रमुख रक्षणकर्ता ययाति असतो.कच आणि ययाति यांची वैचारिक चर्चा घडुन प्रसंगी शाब्दिक चकमक उडते.कचरुपात वि.स.खांडेकर यांनी अखिल मानवतेसाठी या संसाररुपी भवसागरातुन आनंदाने तरुन जाण्यासाठीचे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितले आहे.
`धर्माचे उल्लंघन न करणाऱ्या उपभोगात पाप नाही.पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे तो म्हणजे त्यागाचा .`
"संसार करणं हीच मनुष्याची सहजप्रवृत्ती आहे. साहजिकच त्याच्या जीवनात सर्व प्रकारच्या उपभोगांना स्थान आहे. माणसाने उपभोग घेवू नयेत अशी ईश्वराची इच्छा असती तर त्याने शरीर दिलचं नसतं.परंतु केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे,ऐषआरामी जडणघडणीमुळे कचाचे तत्त्वज्ञान म्हणजे ययातिला निव्वळ पोपटपंची वाटे."
अंगिरस ऋषी ययातिला उपदेश करतात की धर्म, अर्थ आणि काम हे राजाचे मुख्य पुरुषार्थ आहेत, पण अर्थ आणि काम हे मोठे तीक्ष्ण बाण आहेत. अर्थ आणि काम हे धर्माच्या संगतीत सुंदर वाटतात.`
नहुषमहाराज मृत्यूशय्येवर असताना ययातिची व्यवस्था सर्व आरामदायक सुविधांयुक्त अशोकवनात केली जाते.
"मृत्यु हा अष्टोप्रहर अश्वमेध करणारा विजयी सम्राट आहे."
नहुषमहाराजांच्या मृत्युनंतर ययाति हस्तिनापुरचा सम्राट होण्याअगोदर यतिचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.तेव्हा एवढेच समजते की जगातल्या सर्व स्त्रियांची पुरुषांत रुपांतर करून टाकण्याची महत्वकांक्षा मनात बाळगून दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या शोधात यति राक्षसराज्यात निघून गेलेला असतो.ययातिच्या मुखातून खांडेकर म्हणतात की,
राजवाडा-सत्तेचे किंवा संपत्तीचे प्रमुख केंद्र हा एक प्रंचड अजगर असतो.तो अत्यंत भयंकर रहस्ये लिलेने गिळु शकतो.
ज्याप्रकारे कलिका दासीची मुलगी अलका जिचा नवरा जुगारी असल्याने प्रंचड छळ करत असे तिच्या विषप्रयोगाचे रहस्य या वाड्याने गिळले होते.
दैत्यगुरु शुक्राचार्य व देवयानी या पिता पुत्रींचे निराळेच आत्मकेंद्रित विश्व होते. आपल्या सौंदर्याचा अहंकार असलेल्या देवयानीचे खरे उत्कट प्रेम कचावर होते,परंतु केवळ महत्वकांक्षेने प्रेरित होऊन देवयानी हस्तीनापुरची महाराणी बनते.दैत्यराज वृषपर्वा महाराजांची कन्या शर्मिष्ठेपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करण्याचा देवयानीचा अष्टोप्रहर अट्टहास सुरू असे.आपल्या सुडाच्या समाधानासाठी शर्मिष्ठेला दासी म्हणून हस्तीनापुरात घेवुन जाण्यासारख्या देवयानीच्या अहंकाराच्या हजारो गोष्टी होत्या.
"दासीपण म्हणजे काय?मरण-माणसाच्या अभिमानाचे मरण;त्याच्या मोठेपणाचे मरण!"
देवयानी हट्टी, तापट ,अहंकारी असुनही कचाचे निस्वार्थी प्रेम देवयानी वर होते.
"प्रिय व्यक्तीचा तिच्या गुणदोषांसह स्विकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते.
कच म्हणतो,
"जीवन नेहमी अपूर्ण असतं तस ते असण्यातच त्याची गोडी सामावलेली असते.`
खरं प्रेम नेहमीच निरपेक्ष, निस्वार्थी,निरंहकारी असते.जीवनात प्रेम ही उच्च भावना आहे पण कर्तव्य प्रेमापेक्षाही श्रेष्ठ भावना आहे, कर्तव्याला वेळप्रसंगी कठोर व्हावे लागते; पण कर्तव्य हाच धर्माचा मुख्य आधार आहे."
विवाहानंतरच्या पहिल्याच दिवशी ययाति व देवयानीचे मद्यावरून कडाक्याचे भांडण होऊन शयनगृहात मद्य न घेण्याचे वचन देवयानी ययातिकडून घेते.आपले सहजीवन रम्य,सुंदर,अद्भुत घडवण्यासाठी धडपड करण्याऱ्या ययातिला देवयानीकडून उत्कट प्रेमाची अपेक्षा होती.
"अतृप्त शरीर व अपमानित मन यांची टोचणी मोठी विचित्र असते अगदी सर्पविषासारखी!बाह्यत: सुक्ष्म पण आतुन तीव्र परिणाम करणारी!"
समुद्रात पोहायचे सुख यथेच्छ हवे असेल तर किनारा सोडून आत दूरदूर जावे लागते. निळसर समुद्रात तरंगत राहून दूरच्या निळ्या क्षितीजाला मिठी मारावी लागते. प्रितीच्या राज्यात स्वतःला विसरून जावे लागते हे आत्मकेंद्रित देवयानीच्या गावीही नव्हते.ययातिला हवी होती पत्नीरुपी मैत्रीण परंतु ययातिला वाटे देवयानीचे प्रेम केवळ राजवैभवावर,राज्ञीपदावर ययाति हे केवळ तिच्या इच्छापुर्तीचे साधन आहे.
"आत्मपुजेत दंग असलेली माणसे नकळत मनाने आंधळी आणि ह्रदयाने बहिरी होतात."
कच ययातिला सांगतो कि यतिच्या बुद्धीभ्रशांच मुळ त्याच्या एकांगी आणि सदोष विचारसरणीत आहे!यतिच्या जीवनविषयक धारणा आत्यंतिक टोकाच्या,सर्वस्वी चुकीच्या असल्याने तो विकृत बनलाय हा उपदेश समस्त मानवजातीसाठी आजही कालातीत आहे.
मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम. विविध इंद्रिय म्हणजे रथाचे घोडे उपभोगाचे सर्व विषय त्याचे मार्ग इंद्रिये आणि मन यांनी युक्त असा आत्मा हा त्याचा भोक्ता. इंद्रिय रूपी घोड्यांना मनाच्या लगामाच बंधन सतत हवं. मनावर बुद्धीचे नियंत्रण हवं बुद्धी आणि मन मिळून संयमानं हा रथ चालवू शकतात.
` संसार हा श्रेष्ठ आणि पवित्र यज्ञ आहे सहस्त्र अश्वमेध यांचं पुण्य त्यात सामावलेले आहे` मात्र संसार यज्ञ सफल होण्यासाठी पती-पत्नींना आपापल्या अहंकाराची आहुती द्यावी लागते.
प्रेमळ विवेकी, मर्यादशील कच म्हणजे शर्मिष्ठेसाठी अखंड प्रेरणास्रोत होता. पुरुष अमूर्त गोष्टींच्या मागे सहज धावतो; कीर्ती, तपस्या, आत्मा, पराक्रम परमेश्वर अशा गोष्टींचे त्याला आकर्षण.
ययातीपासून देवयानीला यदु व शर्मिष्ठेला पुरू हे पुत्ररत्न प्राप्त होतात.
` पर्णभार हे वेलीचे वैभव आहे; पण फुल हे तिच्या सौंदर्याचे आणि सुखाचे सार आहे`.
देवयानीच्या भयंकर कटातून सोडविण्यासाठी ययाती महाराज शर्मिष्ठेला हस्तिनापूरच्या बाहेर सोडतात. तेव्हा तब्बल अठरा वर्षे शर्मिष्ठा हस्तिनापुर पासून दूर राहते. मदधुंद ययाती व देवयानी यांचे कडाक्याचे भांडण होते. ययातीने देवयानीला कधीही स्पर्श करायचा नाही. अशी शपथ देवया नी ययातिला देते.
मंदाररुपी ढोंगी, पाखंडी गुरुचे तत्वज्ञान ययातिला अधःपतनाच्या खोल दरीत ढकलते. जीवनाविषयी सदोष समजुती, शापाची भीती मंत्रतंत्र ,जादूटोणा यांच्या सापळ्यात अडकून यति विकृत बनतो. कचा सोबत अथक चर्चेतून सुवर्णमध्य साधला जाऊन यती पुन्हा जीवनाच्या मुख्य प्रवाहाकडे वळतो.
` जे जीवन वाट्याला आलं आहे ते आनंदाने जगणं. त्या जीवनातील रस किंवा सुगंध शोधणं तो सर्वांना आनंद आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे`.
देवयानी पासून दुरावलेला ययाती उपभोगाच्या, विलासाच्या, व्यसनांच्या गर्तेत आकंठ बुडून जातो. ययातीस वाटेे कि नीतीच्या, कर्तव्याच्या, पाप-पुण्याच्या साऱ्या कल्पना मद्याच्या मोहक दाहकतेत वितळत आहेत.मंदारचे अखंड उपभोगाचे क्षणभंगुर तत्वज्ञान ययातीला विवेकशून्य असंयमी बनवून असंख्य निष्पाप जीवांना त्यात भरडून टाकते.
शुक्राचार्य रुद्रावतार धारण करून अशोक वनात भोग विलासात डुंबलेल्या ययातीस `तुझं यौवन या क्षणी नष्ट व्हावं` असा शाप देतात. पुरु उश्शाप स्वीकारून ययाती चे वार्धक्य स्वीकारतो. लंपट मनाच्या वासनेची क्षणिक तृप्ती करण्यासाठी ययाती पुरुला शर्मिष्ठेला दुःखाच्या खाईत लोटतो. पुरुच्या त्यागाने देवयानीत अमुलाग्र बदल होऊन ययातीस मनुष्य धर्माचे आकलन होते. कच आपल्या विद्येने पुरुचे यौवन परत करून ययातिचा मृत्यू टाळतो.
ययातिस आकलन होते की विश्वास, श्रद्धा, निष्ठा, प्रीती, भक्ती, सेवा यांच्या बळावर मनुष्य जगतो.
शर्मिष्ठा, ययाती, देवयानी, यती कचासह वानप्रस्थासाठी निघताना सम्राट पुरुला संदेश देतात की, `काम आणि अर्थ महान प्रेरक पुरुषार्थ पण स्वैर धावणारे केव्हा अंध होतील नेम नाही. त्याचे लगाम अष्टौप्रहार धर्माच्या हातात ठेव.
पाणिग्रहणाने हृदय मिलन होतेच असे नाही. देवयानी, ययातीच्या नात्यात उत्कटता, उदात्तता येऊ शकली त्यामुळे सहजीवन निरस बनून ययाती अधपतीत होतो. देवयानी यति ययाती यांना अधपतनाच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी कच प्रामाणीक प्रयत्न करतो.
वि. स खांडेकर म्हणतात, यंत्रयुगाने आलेल्या वेगाने भौतिक सौंदर्य व नैतिक कुरूपपणा यांच्या विचित्र मिश्रणाने सामान्य माणसाची दुःख वाढत जातील.
` या द्वंद पुर्ण जीवनात तत्त्वज्ञान हाच माणसाचा अंतिम आधार आहे.`
सामान्य मनुष्य मुळातच प्रवाहपतित असतो. अंतर्मुख होऊन विचार करण्याची स्वतंत्र विचारशक्ती फार कमी लोकांजवळ असते पूर्वीचा मनुष्य नैतिकतेच्या पोलादी चौकटीत होता. परंतु आजचा मनुष्य मुक्त आहे त्यात काहीच गैर नाही. ते आवश्यक आणि अपरिहार्यच परंतु आजच्या मनुष्याचे सर्वच मनोविकार अनिर्बंध आणि अनियंत्रित होऊ पहात आहेत. स्वतः विषयी, जीवनाविषयी चिंतन हे मृगजळ ठरत असून आत्मानंद, उदात्त विचार, ध्येयाशी जिवश्यकंठश्य मैत्री दुर्मिळ होत चालली आहे. `संयम म्हणजे आपले स्वतंत्र गमावणे नव्हे तर दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला अवसर देणे होय` कामवासना ही अन्नाच्या गरजेइतकेच स्वाभाविक तिचे मानवी जीवनातील अस्तित्व, सौंदर्य, सामर्थ्य महत्त्वाचे पण त्याला उदात्ततेचा स्पर्श आवश्यक.
कामवासना, कामभावना, प्रीतीभावना आणि भक्तिभावना ही एकाच वासनेची क्रमा क्रमाने अधिक सूक्ष्म सुंदर, उन्नत आणि उदात्त होत जाणारी रूपे. या रूपांचे जीवनातील स्थान सामान्य माणसाने सतत मनावर बिंबवत राहिले पाहिजे.
- S.Govindarajan
Sir,
I am a tamilian and as such have no knowledge in Marathi language. However I am very much interested to know much about the intrinsic details of Hinduism and its mythology . I am craving to read the books written by Sriyukth.V.S.Khandekar a great writer in Marathi language on whom I have a very great respect .Will you please advise me whether his books in tamil or english translation is available and its details of its availability. With my thanks to you in advance. I remain sir, With grateful thanks. S.Govindarajan. ( e. mail id., govind_rajan 2000 @ yahoo.com.)
- Vishal Lonari
पुराणकथांतील तत्वज्ञान लालिट्यतेने उलगडवणारी ययाति
ययाति! केवळ नाव ऐकण्या-वाचण्यात आलं तरी रसिकांच्या अंगावर शहारे उमटावे. अशी कादंबरी कै. विष्णु सखाराम खांडेकर उर्फ वि.स.खांडेकरांनी पन्नासाव्या दशकाच्या उत्तरार्धात मराठी वाचकांच्या हाती सुपुर्द केली. प्रकाशित झाल्याच्या इतक्या वर्षानंतरही या कादंबरीबद्दलचे अस्सीम प्रेम रसिकांच्या मनातून कमी झालेलं नाही. ययाति याच कादंबरीसाठी वि.स.खांडेकर यांना मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रसिध्द पौराणिक कथेला स्वतंत्र कथेत गुंफताना तिला लालीट्यपूर्ण शैलीत खांडेकरांनी सादर केले आहे. बालपणापासून त्यांनी ऐकलेल्या पुराणकथांतील काव्यात्मकता, तत्वज्ञान अन नाट्यमयतेला त्यांनी ययातिसारख्या कादंबरीत आविष्कृत केले आहे. पुराणकथांचेही मंथन करून त्यातूनही जीवनाबद्दलचे चिरंतन तत्वज्ञानाचा वस्तुपाठच कै. वि.स. खांडेकर यांनी ययाति रूपाने प्रसिध्द केला आहे.
संयम म्हणजे काय हे ज्याला ठाऊक नाही, मनुष्याने जीवनाला विलासीवृत्तीने भोगणे हाच पुरूषार्थ समजणारा ययाति, अहंकारी, मत्सरी अन प्रेमभंग झाल्यानंतर मनाचे दोन भेद झालेली देवयानी, राजकन्या म्हणून वाढूनसुध्दा पित्याच्या वचनासाठी आपलं सबंध आयुष्यात खाचखळग्यात टाकणारी, केवळ शरीर अन वासनातृप्तीच्या पलीकडे जात ययातीवर प्रेम करणारी शर्मिष्ठा अन विवेकी, संयमी वागणारा निरपेक्षपणे कुणावरही प्रेम करणारा ध्येय्यावर अटल राहून त्यासाठी जीवनाची वाटचाल करणारा कच या प्रमुख पात्रांमध्ये ययातिचे अतिशय प्रतिभासंपन्नतेने गुंफण्यात आले आहे. लेखकानेच प्रत्यक्षपणे ही कादंबरी ययातीची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची त्यागकथा अन कचाची भक्तीगाथा म्हणून वाचावी अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
ही कादंबरी पहिलीच अशी असेल जी मी वाचायला घेताच चार-पाच दिवसांत मी हातावेगळी करून दिली. तसे असले तरी ती अजूनही मला मनावेगळी करता आलेली नाही. जणू काही ययाति, कच, शर्मिष्ठा, देवयानी यांच्याशी नकळत माझं एक नातंच जोडले गेलं आहे. ते माझे सख्खे-सोबती कुणी झाले असावेत. ययाति कादंबरीचे गारूड रसिकांच्या मनावर असे राज्य करणारे आहे. म्हणूनच की काय हिंदी, इंग्रजी, मल्याळम, गुजराथी या भाषिकांनाही ययाति आपलीसी करावीशी वाटली. ययाति वाचत असतानाच मराठी भाषेतील असणाऱ्या अलंकारित शब्दांनी वाचकाचे मन दिपून जाते. खांडेकरांची कथेला कलाटणी देण्याची सुसूत्रता वाचकांना थक्क व्हायला लावते. त्यातील रहस्यरम्यता, यातील प्रत्येक पात्र जणू स्वतंत्रपणे स्वतःशीच संवाद साधत आहे. मात्र, तसे करताना तेच पात्र मात्र त्यांची जीवनगाथा सर्वांनाच सुपरिचीत करून देतात. अत्यंत सशक्तपणे सादर झालेल्या या कादंबरीने समीक्षक, रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे.
© विशाल नारायण लोणारी, नाशिक २०२०
- GIRISH KHARABE - INSIDE MARATHI BOOKS
मराठी माणसाच्या मनात घर करून असलेली व जनमानसांकडून चर्चा ऐकलेली ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी! कुरु वंशातील राजा ययाती आणि त्याच्या जीवनचरिताचा आधार घेऊन मानवी जीवनातील अनेक पैलू, वलये व संक्रमणे यांना ही कादंबरी अलगद स्पर्श करते. पिढ्यानपिढ्या वाचणाऱ्या वाचकाला ती नेहमीच समकालीन वाटते याचे गूढ वि.स.खांडेकरांनी रेखाटलेल्या पात्रांच्या धाटणीत लपलेलं आहे. इंद्रावर विजय मिळवणारा राजा नहूष स्वर्गाचा राजा झाल्यावर उन्मादाने इतका हुरळून जातो की ऋषींनाच तो आपल्या पालखीचे भोई बनवतो. “नहुषाची मुलं कधी सुखी होऊ शकत नाही” हा त्यातल्याच एका ऋषीकडून मिळालेल्या शापाने यती आणि ययाती यांच्या वाट्याला येत ते केवळ अन केवळ अतृप्त आयुष्य! असा हा राजा नहूष आपल्यातही असतो आयुष्याच्या अनेक प्रसंगात तो आपण जनमानसात पाहतही असतो. वासनांध ययाती, गर्विष्ठ देवयानी, कोपिष्ट आचार्य शुक्राचार्य, आयुष्याचं तत्वज्ञान कळलेला कच, पितृआज्ञेपोटी दासीत्व स्वीकारणारी शर्मिष्ठा व दोष नसतानाही हलाखीतलं मरण लाभलेली सोनेरी केसांची अलका आजही अवतीभवती आपल्याला सहज पाहायला मिळतात.
माणसाच्या ठायी असणाऱ्या दुर्गुणांना तो जोपर्यंत जोपासत राहतो तोपर्यंत ते त्याचा छळ करतात आणि हे सांगताना खांडेकर म्हणतात कि, “वासना ही अशी गोष्ट आहे जिचा आपण जितका उपभोग घेऊ तितकी ती फोफावत जाते!” आचरणात आणाव्यात अशा कित्येक गोष्टी ययाती आपणास सहज देऊन जाते फक्त वाचणाऱ्याकडे तो घेण्याचा दृष्टिकोन हवा. सामान्य वाचकाला ती फक्त वासनेने भरलेली अश्लील कहाणी वाटू शकते आणि तीथेच खरेतर आपली वाचक म्हणून लेखक कसोटी पाहतो! यात तुम्ही जिंकलात तर आयुष्यातही जिंकाल यात शंका नाही.
आपल्या बापाच्या कृत्यामुळे आपण कधीच तृप्त होऊ शकत नाही या भयाने ऐन उमेदीत राज्य, ऐशोआराम, विलासी आयुष्य या वासनेने भरलेल्या गोष्टींपासून यती दूर जंगलात निघून जातो पण त्या ब्रह्मचर्यातही त्याला तृप्ती लाभत नाही. संकटांपासून पलायन करून ती कधी संपत नाही याच हे उत्तम उदाहरण लेखक आपल्याला देतो. त्याग केला म्हणजे सुख मिळेलच असं नाही, जोपर्यंत लालसा मरत नाही तोवर तृप्ती लाभत नाही हे जीवनसुत्र ययाती आपणास देऊन जाते.
ययाती सारखा राजा नवरा मिळून देखील देवयानीला तो कधीच मिळाला नाही. आपण शुक्राचार्यांची कन्या आहोत आणि हा ययाती मला सोमरस प्राशन करून स्पर्श करतो हे तिच्या गर्विष्ठ मनाला पटत नाही. पदोपदी ती त्याला आपण कसे श्रेष्ठ आहोत याची जाणीव देत असते. शरीरसुखासारख्या नाजूक क्षणी देखील नवऱ्यापुढे तिच्यातला अहंकार विजयी ठरतो. या न अशा कित्येक कारणांमुळे ययाती तिच्यापासून दूर होऊन व्यसनात अडकत जातो, यात दोष केवळ देवयानीचा नाही पण तिचा अहंकार त्याला कारणीभूत ठरतो हेही नाकारता येत नाही. राजकन्या असूनही दासीत्व स्वीकारणाऱ्या शर्मीष्ठेचा समोर येणाऱ्या परिस्थितीला न डगमगता तोंड देण्याच्या गुणाला लेखक पुरेपूर न्याय देतो हे कथेच्या शेवटी ध्यानी येतं.
हरएक पात्र साकारताना मानवी जीवनाला भुरळ पाडणाऱ्या कित्येक प्रसंगांना आपण कसं सामोरं जावं याच जिवंत विश्लेषण म्हणजे ययाती!
ययाती वाचताना आपण रमून जातो ते याच कारणांमुळे. आपल्याच जीवनातल्या काही मोहाच्या, अतृप्तीच्या वासनांध क्षणांना आपण स्वतः ययाती बनून भेट देतो ते केवळ अन केवळ खांडेकरांनी त्यात ओतलेल्या भाषेच्या विविध रसांमुळे, अलंकारांमुळे. अशी विविध रूपांनी नटलेली ही कादंबरी म्हणजे मराठी वाचकाला मिळालेली पर्वणीच. तिचा आपण यथेच्छ लाभ घ्यायलाच हवा कारण ययाती सारख्या रचना ह्या रोज रोज घडत नसतात आणि त्यातून लाभणारा ठेवा हा इतरत्र सापडत नसतो!
- Uday Bhat
जीवन जसे भौतिक तितकेच आत्मिक, या सत्याचे आकलन म्हणजे "ययाति"
ययातिची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा, कचाची भक्तिगाथा...
- Vijay Andhere
वि . स खांडेकरांची गाजलेली ययाती... देवयानी आणि ययाती यांच्या निखळ प्रेमाची साक्ष देणारी ययाती...
- Prasad aware
Apratim kadambari...
- Nimish Sonar
अगदी मस्त कादंबरी. ऐतिहासिक किंवा पौराणिक प्लस फँटसी ऍड केली आहे. शुक्राचार्य देवयानी शर्मिष्ठा ही सगळी पात्रे आहेत त्यात. महाभारत होण्या आधीचा किंवा त्याच्या आसपासचा थोडा काळ आहे.
- Rahul Halgulkar
चिरतरुण राहण्याची इच्छा असलेल्या अतृप्त राजाची कहाणी आहे.......प्रभावी पात्र .....उच्चकोटीचे लिखाण
- Harshda Maheshwari
ययाती ...मुलगा पुरु चे तारुण्य घेणारा व त्याला आपले वार्धक्य देणारा विषयासक्त राजा ,अन् तितक्याच सहजपणे तारुण्य देनारा व वार्धक्य स्विकारणारा पुरु ...विलक्षणय हे सर्व कादंबरी वाचायला घेतली व अधाशासारखी वाचुन काढली पुर्ण...मानसाच्या दैनंदिनवसुखासीन कल्पनांना हादरा देणारी कादंबरी...शर्मिष्ठा व देवयानी ही भेटतात जवळुन.. काल्पनिक की वास्तविक या फंदात न पडता वाचावी अशी ययाती...
- Chetan Jivarak
ही कादंबरी आज वाचायला घेतली आहॆ.
वि.स.खांडेकर यांनी खूप छान लेखन केल आहॆ.
- Parag Sawarkar
सुख, सुख म्हणजे नेमकं काय...?
काय असतं सुख...?
सुख शोधल्याने सापडतं का...?
जगी सर्व सुखी असा कोण आहे..?
दुसऱ्याच्या दुःखाचे ओझे आपल्यापेक्षा कमीच आहे, असं सर्वच सर्वसामान्यांना वाटतं. सुख शोधण्याचा प्रवास कधी संपतो का..?
मी डॉक्टर आहे. त्यामुळे नुकत्याच जन्मलेल्या `मासाच्या गोळ्या`पासून तर `मास गोळा` झालेल्या जख्खड म्हाताऱ्यापर्यंत वेगवेगळ्या, थांब्यावरचे लोकं मृत्यूच्या थांब्यावर कायमचे थांबताना पाहिले. मरतांना बघितले. नव्वद वर्षाचा वृद्धही, `आता मी सुखाने मारतो`, असं म्हणत नाही. त्याची जगण्याची इच्छा कधी संपतच नाही. कस्तुरीमृगासारखी अवस्था येथील प्रत्येकाचीच आहे. सुगंध त्याच्या आतच असतो अन तो दारोदार भ्रमिष्ठासारखा हिंडतो..
धडपडतो...!
उधारीत पुस्तके वाचायची माझी सवय कधीचीच सुटली,तुटली. मागे सात आठ महिण्याअगोदार आत्याकडून सहज "ययाती" आणली आणि ठेवली ती ठेवलीच..! कारण फुले,आंबेडकर, गांधीजी काही मला फुरसत मिळू देत नाही. आत्याचा फोन आला...`झालीच नाही का म्हणे अजून वाचून..?`, मी म्हटलं..."थांब, सात दिवसात आणून देतो.". फुकटात भेटली वाचून घ्यावं म्हटलं.. बकाबक..!
खरंतर कादंबरी वाचायची हौस आणि हवस आता मला राहिली नाही. लहानपणी चाचा चौधरी, इसापनीती, नागराज वाचायचो...हिरवा नागराज तर माझ्या आताही स्वप्नात येतो. नवतरुणाईत निमा, हैदोस हेही वाचनात आलं. नंतर लोकप्रभा, सिनेस्टार, क्रिकेटविश्व असे मासिक वाचायचो. नंतर लागला शौक कादंबरीचा..! त्यातल्यात्यात ऐतिहासिक आणि पौराणिक. "मृत्युंजय" पासून झालेली सुरवात श्रीमान योगी, राऊ, छावा, स्वामी, पानिपत, युगांधार करत... कधी संपली कळलंच नाही. मातृभाषेतील नामांकित अकराचा आकडा गाठला आणि छकडा थांबला. एक `ययाती` राहिली होती... ती आत्ता..! योगायोगाने..!
मला सर्वात भावला तो कादंबरीतील "शहंशाह"... "रिशते मे तो हम तुम्हारे बाप लगते है... नाम है...शहंशाह..है साला..!" हा तो वाला `शहंशाह` नाही..!
हा शंहशाह "रणजित देसाई" यांचा `शहंशाह.`..
....आलमगीर...!
`कालक्रमण आणि कालग्रहण` यासाठी आता मी वाचत नाही. "मृत्युंजय" नंतरच पौराणिक कादंबरीची माझी आवड संपली. त्यानंतर ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्या. तरीही अधीमधी आणि कधीकधी "राधेय, युगांधार, वाचल्या. आणि आता "ययाती"..!
माझं स्पष्ट मत आहे की ययाती सारख्या कादंबऱ्या आपल्याला भ्रमात पाडतात. गोलगोल आभासी जगात फिरवतात. खाली आणतात.. परत वर नेतात.. जत्रेतील उंच झोपाळ्यासारखं. कल्पना सागरात गटांगळ्या खात खात.... कारण सत्याचा अंत कधीच सुखद नसतो. तरीही मनोरंजनातुन, कल्पनाविलासतेतून आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात. परंतु जिथे जिथे तात्विक आणि तार्किक सत्यतेचा भाग येतो, तिथे तिथे लेखक आपल्या जवळील शब्दसंपत्तीचा विपुल साठा असलेल्या दारूगोळ्याचा यथेच्छ मारा आपल्या मनावर आणि मेंदूवर करतो. जो लेखक आशयघनतेचा अभाव आपल्या संस्कृतप्रचुर भाषेने भरून काढतो. तेव्हा तो लेखक वाचकाच्या मनोराज्यावर विराजमान होतो.
वि.स.खांडेकर या साहित्यमहर्षीबाबत मी ते काय सांगावे..? खांडेकर यांच या अगोदर मी "चांदण्यात" हा ललित लेख संग्रह वाचला होता. दोन ओळीत सांगायची गोष्ट दोन पानात सांगण्याची त्यांची रीत निराळीच. त्यांची भाषा अबबबब......
ही जर मराठी असेल तर... मग आम्ही जी बोलायला लागलो..जेव्हातेव्हापासून बोलतो आणि अजूनही बोलतो...ऐकतो.. ती भाषा कोणती...?
वि.स.खांडेकर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जेष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक होते. आताच्या सारखं नाही कोणीही जेष्ठ-श्रेष्ठ होतं. आज शब्दांची किमंत सुद्धा रुपयासारखी कोसळली असं वाटतं. खांडेकर यांनी मराठीच्या प्रत्येक साहित्य प्रकारात विपुल लेखननिर्मिती केली. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील अलौकिक योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या नागरी सन्मानाने गौरविले. `ययाती` या कादंबरीला १९७२ साली भारतीय "ज्ञानपीठ" पुरस्कार प्राप्त झाला होता. १९५८ साली लिहिलेली ही कादंबरी आजही सहा दशकानंतरही वाचकांची आवडती आहे. या कादंबरीत लेखकाने मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या छटा रंगवल्या आहे. त्यांच्या लिखाणात गांधीवादी आणि समाजवादी विचारांचा प्रभाव जाणवतो.
"ययाती" ही कादंबरी `ययाती` नावाच्या राज्याची कहाणी आहे. त्यात ययाती, देवयानी, शर्मिष्ठा आणि कच असे मुख्य पात्र आहेत. नहूष महाराज, शुक्राचार्य, राजमाता अशी चरित्र अभिनेते सुद्धा आहेत. अलका, मुकुलीका, माधव,माधवी, तारका हे पात्र ययातीच्या जीवन प्रवासात येतात.
सात दिवस सांगून पंधरा दिवस झाले; मी ययाती वाचतोय. हे सर्व देवयानी, शर्मिष्ठा, अलका, मुकुलीका, तारका पंधरा दिवसांपासून माझ्या घरात, दवाखान्यात खेळत आहेत... आज त्यांची सांगता. यातील प्रत्येक व्यक्ती आपल्यासोबत बोलतो, त्याचा आनंद दुःख सांगतो, आपणही त्याच्या सुखदुःखात आपलं दुःखसुख शोधतो. थोडीशी शर्मिष्ठा आणि थोडीसा `कच` प्रत्येकाच्या मनात असतो. ययाती आणि देवयानी यांच प्रमाण मनामनात आणि दारादारात अधिक आहे...! अलका, तारका खूप कमी वेळासाठी येतात पण मनाला हुरहूर लावून जातात. त्यांच्या साठी जीव हळहळतो. प्रत्येक पात्रावर एक स्वतंत्र लेख होऊ शकतो पण ती वासना मी येथे टाळतो.
"ययाती"... कुठे शोधायची आवश्यकता नाही. तो प्रत्येकात थोडाबहुत प्रमाणात असतोच. व्यसनाचे आणि वासनेचे प्रकार वेगळे असतीलही. "ययाती" स्वतःमध्येच प्रकर्षाने जाणवते... तो धावणारा `ययाती`....!
कश्यासाठी धावतोय...? पाळतोय..?
धडपडणारा....मी..!
शाळेत वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून वर्गात नंबर एक, नंबर दोन साठी धडपडणारा...मी...!
त्यानंतर क्रमांक सोडून गुणांच्यासाठी, percentage साठी धावणारा, धडपडणारा...मी..!
कॉलेजमध्ये भविष्य, भविष्य future-future साठी...,
प्रॅक्टिसमध्ये सेटलमेंट साठी....मी..!
आणि एक एक करत दुकान, क्लीनिक, गाडी, घर असं करतकरत सेटलमेंटचे मापदंड, स्टँडर्डस (standards) पूर्ण करत EMI च्या महिन्यावरी उकड्यासाठी धावणारा..मी.!
लग्न, लेकरू, क्षुल्लक सामाजिकतेचे इतर टार्गेट्स (targets) पूर्ण करण्यासाठी
धडपडणारा... मी..!
या महावारी लावलेल्या `लचांडा`साठी महिन्याभर लोकांच्या वेदनेकडे, दुःखाकडे आसुसलेल्या लोभी नजरेने बघणारा..मी.!
अजूनही अपूर्ण आयुष्याच्या या अदृश्य दृष्टचक्रात दिवसामागून दिवस, घडाळ्याच्या काट्यामागे धावणारा... पळणारा..
धडपडणारा....!
`ययाती`....मी..!
कादंबरीतील नायक ययाती, हा शरीरसुखासाठी हापापलेला आहे. वासनेने आंधळा झालेला..! जगात असेच ययाती सर्वीकडेच मिळतात... सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेचे भुकेले... वासनाधीन..!
सुख आणि प्रेम हे वाळूसारखं असतं, आपण जितकं ते घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करू तितकं ते निसटून जाईल.
वासना का फक्त शारीरिकच असते..?
माणसाचं शरीर वृद्ध होतं परंतु मन नाही. कितीही इच्छाचा भोग घेतला तरी मन अतृप्तच राहतं. भोगाला दिशा नाही... अंत नाही...!
जीवनाची शक्ती कुठली आणि त्याच्या मर्यादा कोणत्या..?
उपभोग घेऊन मानवाच्या वासना तृप्त होतं नाहीत. उपभोगाने शरीराची भूख अधिक वाढत जाईल... आणि...
जगण्याच्या हव्यासापोटी जगायचचं राहून जाईल...!
- Prasanna Mindhe
ययाती बद्दल काय सांगू ... बहुदा आपल्या पैकी बऱ्याच जणांनी नक्कीच वाचलं असणार । प्रत्येकाला जीवनाच सार शिकवून जाणारी ही कादंबरी ... ह्यात काही नाही आस नाहीच .. सर्व काही आहे .. हो सर्व काही , म्हणजे यश , अपयश , द्वेष , मत्सर , प्रेम , वासना , भक्ती , अध्यात्म , भीती , आनंद , चिंता , काळजी, मोह , वैराग्य , कट , कपट , कारस्थान , धोका , छळ आणि आणखीही बरच काही ... भाव , भावनांचं रेखाटलेले अफाट विश्वच जणू .. पण सरते शेवटी प्रत्येकाला जीवना बद्दल विचार करायला लावणारी ही अप्रतिम गोष्टच ... प्रत्येक पात्र व त्याचे भाव किती थोडक्या शब्दात सांगितलंय वि स खांडेकरांनी .... त्यात मला सर्वात भावलेल पात्र म्हणजे "कच" , खरच किती संयमी , विनयशील आणि ज्ञानी ... तरी पण अगदी साधा , ना कसला अहंकार , ना गर्व ... बाकी पण काय भन्नाट पात्र आहेत ह्यात ... दारू व वासनेच्या आहारी गेलेला ययाती , अहंकारी व गर्विष्ठ देवयानी , शापित पण हळव्या मनाची शर्मिष्ठा , वेडा झालेला तो यती , रागीट आणि उग्र असा शुक्राचार्य , इतर ही अनेक .... चाणक्य ने सांगितलेलं तत्वज्ञानाशी मला इथे थोडी सांगड घालावीशी वाटते... ते म्हणजे, या जगात सर्वात शक्तिशाली असलेल्या दोन गोष्टी म्हणजे स्त्री च सौन्दर्य आणि पुरुषाची विवेकबुद्धी .. इथेही "देवयानी" च्या यौवन सौंदर्य मोहात अडकून विवेक हीन झालेला "ययाती" आणि विवेकबुद्धीने विवेक वाढवत गेलेला धैर्यवान "कच"... पण यौवनाच्या आयु पेक्षा विवेकाची आयु काही अधिकच .... अगदी काळाला ही पुरून उरतील अशी आयुष्य व त्याची तत्व , भाव , भावना व कित्येक मानवी स्वभाव या कादंबरी द्वारे खूप सुंदर पणे मांडणी करून सादर केलेल अप्रतिम अस शाब्दिक रचनांच चित्र म्हणजे "ययाती" ... कुणी वाचले नसेल तर , एकदा नक्की वाचाच.
- Sundeep Bhaskar
ययाती इतके शृंगारिक लिखाण कदाचित वाचायला मिळेल, कारण ते सतत वाचतच रहावे अस वाटते
- Rushikesh Telange
"ययाति"ही वि.स खांडेकर यांनी लिहिलेली कादंबरी वाचून पूर्ण झाली.अतिशय उत्कृष्ट कादंबरी होती . काही बाबी त्याला "फॅंटसी" बनवण्यासाठी साहाय्यक ठरणाऱ्या आहेत.कुणीतरी मला असं म्हटलं होतं की यातलं तुम्हाला कोणतं पात्र आवडलं ते सांगा यावर मी म्हणेन "कच"चे पात्र आवडलं ;कारण तो दोषमुक्त आहे.सज्जन आहे.आपल्या जागी बरोबर आहे.बिनचूक आहे.कर्तव्यनिष्ठ आहे.
यातले संवाद तर इतके जबरदस्त आहेत की आपण एखादी "सिंघम"सारखी डायलाॅगबाजी असणारा चित्रपट पाहत आहोत याचा क्षणोक्षणी प्रत्यय येतो.प्रत्येक पात्राचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे.ययाति , देवयानी, शर्मिष्ठा,कच ,यति , शुक्राचार्य,या सर्व पात्रांपासून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतेच.आजच्या काळातल्या "बाहुबली"सारखीच ही पौराणिक कथा वाटते जिच्यात अनेक वळणे आहेत.लेखकाने प्रत्येक व्यक्तिरेखा साकारण्यात घेतलेली मेहनत वाचकांना पानोपानी दिसून येते.यात जीवनाविषयी तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचाही समावेश आहे.प्रत्येक पात्र आपल्या जीवनात येणाऱ्या अनुभवावरून तत्त्वज्ञान सांगत असतो.
"ययाति" कादंबरी ही वासनांध - संयम हरवलेल्या , अहंकारी - रूपगर्वितेची ,पतीधर्माचे कटाक्षाने पालन करणाऱ्या ,एका उत्तम प्रेयसीची ,एका सुजाण आत्मसंयमी व्यक्तीची , अधिकाराने आणि पात्रतेने आंधळ्या झालेल्या व्यक्तीची ,जीवनाचा मूळ शोधणाऱ्या व्यक्तीची कथा आहे.
यातील माझ्या काही आवडत्या ओळी मी आपल्यासमोर सादर करतो.
* जगात तीनच गोष्टी खऱ्या आहेत - मद्य , मृगया , मीनाक्षी .
* तिचे अस्तित्व आणि माझे सुख याची दैवानेच सांगड घातली आहे.
* मुत्सद्दी माणसे घोरपडीसारखे असतात.आपल्या मुद्द्याला चिकटून राहण्यात ती कुणालाही हार जात नाहीत.
* प्रीती ,ममता ,वात्सल्य हे सारे जगातले मुखवटे आहेत.मनुष्य फक्त स्वत:च्या सुखासाठी जगतो . केवळ आपल्या अहंकारासाठी जगतो.
* स्त्री - पुरूषांच्या प्रेमातही वासनेचा अग्नी धगधगत असतो .पण तो यज्ञकुंडातला अग्नी असतो.
* अगणित क्षणभंगुर सुखाच्या सिंधूतून अमर सुखाचा एक बिंदूसुद्धा कसा निर्माण होत नाही ?
* या जगात प्रत्येकाचे लहानसहान सुखसुद्धा त्याच्या स्वभावाने ,परिस्थितीने आणि जीवनाच्या अपूर्ण स्वरूपाने मर्यादित केलेले असते.
* वासना म्हणजे वर्षाकाळातील महापुराने बेफाम झालेली नदी .
फक्त इतकेच नाही तर यांपेक्षा जास्त असे सुंदर वाक्य आहेत या कादंबरीत जे मी माझ्या वहीत नोंदवून ठेवले आहेत.ही कादंबरी महाभारतातील एक पौराणिक कथा आहे.एक उपाख्यान ! परंतु वि.स.खांडेकरांनी स्वातंत्र्य घेऊन आपल्या मनाप्रमाणे व्यक्तिरेखेला आकार दिला आहे.परिणामी वाचताच वाचक कथेच्या प्रेमात पडतो.प्रत्येक पात्रांचे मनोगत आणि त्यांची मानसिकता , त्यांनी घेतलेले निर्णय, सर्वच दाद देण्यासारखे आहे.आयुष्याविषयी तत्त्वज्ञानाने ओतप्रोत भरलेल्या संवादाने आणि भाषेच्या आकर्षक उपयोजनाने सजलेली ही कादंबरी आहे.प्रतिक आणि प्रतिमा अगदी सरस ठरतात.वि.स.खांडेकरांचं मौलिक आणि कलात्मक लिखाण वाचकांना श्रीमंत वाचनानुभाव देतं.
योगायोग - अद्भूतता - वर्णनात्मकतता - आलंकारिकतता या सर्व बाबींचा विलक्षण अनुभव ही कादंबरी वाचताना मला आला.
"ययाति"ला जसं दर्शविलं आहे तशी माणसं आजच्या काळात आपल्या समाजात अनेक दिसून येतात.मीही पाहिली आहेत.ययातिविषयी मी खूप कौतुक- प्रशंसा ऐकली होती तसा अनुभव पण मला आला.
ही कादंबरी ज्यांनी अद्यापही वाचली नाही त्यांनी ही कादंबरी जरूर वाचावी असं मी वाचकांना आवाहन करतो.
- Rashmi Mestry
Atishay sunder book mi tin vela read kel ahe..
- Vrushali Gawand
नमस्कार मंडळी,
असं म्हणतात की पुस्तक जेव्हा आपल्या आयुष्यात येतात तेव्हा कळत नकळत ती आपल्याला बरच काही शिकवून जातात. पुस्तकांपासून काही आकलन झालं नाही तर ते नुसतं वर वरच वाचन ठरत. खरं पुस्तक वाचन म्हणजे नुसतं पुस्तक समजून घेणं नव्हे तर पुस्तक वाचता वाचता आपण
स्वतःला समजत जातो ते खर पुस्तक वाचन.
हा माझा अनुभव आहे ययाती कादंबरी बद्दल. माझ्या आयुष्यात वाचलेली मी पहिली पौराणिक कादंबरी. खांडेकरांना ज्या कादंबरी साठी ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला ती कादंबरी.
तीन प्रमुख पात्रांनी त्यांच्याच तोंडून जी स्वतःची कहाणी सांगितलीय ती अतिशय उत्कंठावर्धक आहे. ययाती, देवयानी अथवा शर्मिष्ठा कोणाचीही कहाणी वाचताना असंख्य प्रश्न मनाच्या तळाशी उमटतात, कि हे असं का झालं? यांना नेमकं हवं तरी काय होत? खरंच आपल्या सुखांसाठी, आपले हट्ट पूर्ण करण्यासाठी इतकी का वाहवत जातात माणसं?
या तिघांच्या ही मनोगतांनी जो परिणाम माझ्या मनावर केला त्याचाच हा अनुभव आहे. आवडला तर तसं नक्की सांगा.
माझ्या मते सांगायला गेलं तर, प्रत्येकाची सुखाची व्याख्याच वेगळी होती, म्हणून प्रत्येकाची अपेक्षा बदलत गेली, प्रत्येकाचा जीवनाविषयी दृष्टिकोन बदलत गेला. स्त्रीच्या सर्व रूपात ज्याला फक्त प्रेमच हवं होत असा ययाती. तो दरवेळी प्रेमाला पारखा होत गेला, कधी आईच्या वात्सल्य प्रेमाला, कधी पत्नीच्या प्रेमाला, तर कधी प्रेयसीच्या प्रेमाला. सूडाच्या नि क्रोधाच्या भावनेत अडकलेल्या देवयानीला हवा असतो तो प्रतिशोध. जो तीन कधी कचावर घेतला, कधी शर्मिष्ठेवर, तर कधी ययातीवर. शर्मिष्ठा राजकन्या असूनही देवयानीच्या सूडभावनेमुळे तिला दासी व्हावं लागलं. सर्वच नात्यांना पारखी झालेली ती, तिला हवं असत प्रेम, समजून घेणार माणूस. पण तिला सुद्धा ते कधी कचाला भाऊ मानून मिळवावं लागलं, तर कधी ययातीला पती मानून.
प्रत्येकाच्या सुखाच्या व्याख्या त्यांच्या गरजेनुसार बदलत गेल्या. ययाती पासूनच सुरवात करायची झाली तर . . . .
“ययाती”- त्याच जीवन म्हणजे फक्त प्रेमाचा शोध इतकंच मर्यादित राहिल्यासारखं वाटत. त्यानं मिळवलेलं प्रेम त्याला शेवटपर्यंत कमीच पडत राहत. त्यानं आईच्या प्रेमाची अपेक्षा करावी तर आईला मुलावरच्या प्रेमापेक्षाही स्वतःच सौंदर्य नि राजघराण्याची प्रतिष्ठा महत्वाची वाटली. अगदी एका दासीलाही आई म्हणण्याइतपत ययाती वर वेळ यावी इतका तो आईच्या प्रेमाला पारखा झाला होता. देवयानी पत्नी म्हणून आयुष्यात आली खरी पण देवयानी फक्त आणि फक्त तिला हवं असेल ते मिळवण्यासाठी त्याचा वापर करत राहिली. ययातीवर निरपेक्ष प्रेम कोणी केलं असेल तर ते शर्मिष्ठेनं, पण दुर्दैवानं तिचीही साथ मधेच सुटली. शर्मिष्ठा आयुष्यातून निघून गेल्यानं सैरभैर झालेला ययाती, अजूनच वासनेच्या आहारी गेला. आयुष्यभर तो फक्त आणि फक्त सुखोपभोगच घेत राहिला. वासने पुढे नि मद्याच्या धुंदीपुढे त्यानं सर्व नाती तुच्छ मानली. शेवटी शेवटी तर तो इतका वासनामग्न झाला कि शापामुळे आलेल्या वार्धक्यासाठी त्यानं स्वतःच्या मुलाचं तारुण्य उसनं मागितलं. विषय विकारांच्या पूर्णपणे आहारी गेलेला असा हा ययाती. सार्वभौम राजा असूनही आपण सुखी नाही आहोत, याच विवंचनेत तो जगला. मरणाची भीती कुठून ना कुठूनतरी त्याला जाणवतच राहिली. अगदी आयुष्याच्या शेवटीला कुठेतरी त्याला याची जाणीव झाली कि हे सर्व एक मृगजळ आहे. ज्याच्यासाठी तो जगला ते सर्व सुख शेवटी मिथ्या ठरलं. कदाचित म्हणूनच आपली कहाणी कुठलाही आडपडदा न ठेवता त्याला जगाला सांगावीशी वाटली.
कथेमधील दुसरी व्यक्ती म्हणजे "देवयानी". कचाने जिच्या प्रेमाला प्रतिसाद न देता कर्तव्याला प्रेमापेक्षा जास्त महत्व दिल अशी देवयानी. कच निघून गेल्यावर तिच्या मनावर मोठा आघात होतो. नि या सर्वात भर पडते ती शर्मिष्ठा आणि देवयानीच्या भांडणाची. अहंकारी देवयानी शर्मिष्ठेवर सूड उगवण्यासाठी तिला स्वतःची दासी बनवून हस्तिनापूरला घेऊन येते. अपमानित झालेली व्यक्ती आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते हे खांडेकरांनी देवयानीच्या रूपात पूर्णपणे व्यक्त केलंय. कदाचित देवयानी हि ती स्त्री नसावीच जी ययातीला अपेक्षित होती. पत्नीच्या रूपात त्याला एक मैत्रीण, समजून घेणारी जोडीदार आणि निस्वार्थी प्रेम करणारी व्यक्ती हवी असते. पण देवयानी कायम आपल्या सौंदर्याच्या, अहंकाराच्या जगातच राहिली. शुक्राचार्यांपेक्षा श्रेष्ठ तिच्यासाठी कधीच कोणी नव्हतं. ती कायम जे तिला हवं तेच करत राहिली. मग त्यासाठी तीन कधी आपल्या सौंदर्याचा अधिकार ययातीवर गाजवला, तर कधी महाराणी पदाचा आपला अधिकार दाखवला. खर प्रेम भोगात नसून त्यागात असत हे सत्य तिला देखील आयुष्याच्या शेवटी कळलं.
तिसरी नि महत्वाची व्यक्ती म्हणजे “शर्मिष्ठा”. ती जितकी महत्वाची तितकीच आदरणीय. ययाती आणि देवयानी यांच्यापेक्षा खूप वेगळी असलेली शर्मिष्ठा मनाला खूप भावली. खूप काही शिकवून सुद्धा गेली. तिच्याही वाट्याला दुःख आली, पण त्याहीपेक्षा तिची त्या दुःखाला सोसण्याची तयारी खूप मोठी होती. खरं प्रेम निस्वार्थी असत, नि सुखापेक्षाही जास्त मोठा आपण आपल्या माणसांसाठी केलेला त्याग असतो, तो त्याग आपल्याला सर्वश्रेष्ठ बनवतो हे तिला खूप लवकर उमगलं होत. म्हणूनच तर आई वडिलांसाठी देवयानीची दासी होणं तीन आनंदानं मान्य केलं, ययाती साठी ती सर्व काही सोडून वनवासी सुद्धा झाली. ययातीवर तीन अगदी निरपेक्ष प्रेम केलं होत. कदाचित म्हणूनच १८ वर्ष दूर राहूनही ती मनोमन फक्त ययातिचीच पूजा करायची. जेवढी हट्टी, तापट आणि संतापी देवयानी होती तितकीच शांत, प्रेमळ, नि समजूतदार शर्मिष्ठा होती. त्या दोघी म्हणजे जणू एका नाण्याच्या दोन बाजू. दैवाचे इतके आघात सोसूनही तीच ययातीवरच प्रेम कुठेही कमी होत नाही. कारण तिच्या प्रेमात कुठलाच स्वार्थ नव्हता कि कसलीच मागणी नव्हती. प्रेमात मोठ्यातला मोठा त्यागही तीन आनंदानं स्वीकार केला. कादंबरीच्या बहुतांश पात्रामध्ये काही ना काही दोष असूनही शेवटी सगळ्यात निर्दोष उरते ती शर्मिष्ठा.
कादंबरीतील प्रत्येक पात्रान स्वतःची कहाणी सांगताना, स्वतःच्या स्वभावदोषानुसार अगदी परस्परविरोधी भूमिका मांडल्यात. ज्यामध्ये प्रेम-वात्सल्य, वाद-विवाद, सूड-संयम, कर्तव्य, सर्व काही येत. पण खांडेकरांनी त्यातूनही एक अशी चर्चा आपल्यापुढे मांडलीय कि तिचा सर्वस्वी परिणाम आपल्यावर होतो. या कादंबरी मधे जीवनाचं असं काही तत्वज्ञान सांगितलंय, कि ते या सर्वांना कुठे ना कुठे, कधी ना कधी समजत गेलं तस आपल्यालाही मार्गदर्शक होत राहील.
काळाच्या प्रत्येक टप्प्यावर कुठेतरी ययाती, देवयानी, शर्मिष्ठा जन्माला आले आहेत. येत राहतील.खरं तर हि पात्र नसून या समाजातील प्रत्येकाच्या मनात असलेल्या भावना आहेत. ज्या प्रसंगानुरूप बाहेर येत असतात. प्रत्येकाच्या मनात एक ययाती, देवयानी, शर्मिष्ठा, कच, हे कुठेतरी लपलेले आहेत. कारण माणसामध्ये जस अहंकार, महत्वकांक्षा, सूड या विकृती असतात तसं प्रेम, त्याग, ममता या प्रवृत्तीही असतात. कधी कधी आपणही रागाच्या भरात एखादी चूक करून बसतो, मोहामध्ये भरकटून जातो, आपल्या माणसांवर निरपेक्ष प्रेमही करतो.
शेवटी काय जीवनाचं तत्वज्ञान अगदी सहज सोप्या भाषेत, कोणतीही गुंतागुंत न वाढवता जाणून घ्यायचं असेल तर अवश्य वाचा "ययाती".
- Ravji Lute
*मराठी भाषेच्या रत्नहारातील एक रत्न "ययाती"!!
*ज्ञानपीठ प्राप्त अजरामर साहित्य!!
*विष्णु सखाराम खांडेकर* यांच्या प्रतिभेचा परमोच्च बिंदू "ययाती"!
*प्रेम,काम,मैत्री,वात्सल्य,औदार्य यांची वेगवेगळ्या पत्रातून केलेली मांडणी म्हणजे "ययाती"!
- Deepak Gaikwad
ययाती कादंबरीच्या मुख्यपृष्ठावर घोड्याचे चित्र का घेतले असावे?
खरे तर हे एक रूपक आहे.रूपक कथा हा साहित्यप्रकार मराठीत कोणी खऱ्या अर्थाने रुजविला असेल तर तो खांडेकरांनी.
ययाती वाहवत गेला आहे, बरोबर-चूक हे त्याला कळेनास झाले, आणि या अवस्थेत त्याला स्वप्न पडतं. तो एका रथात बसला आहे, रथ एका अरुंद रस्त्यावरून चालला आहे, रस्त्याच्या एका बाजूला उंच पर्वत आणि दुसरीकडे खोल दरी.
पाच घोडे रथ ओढत आहेत, ते बेधुंध होऊन धावत आहे, आणि त्यांच्या या बेधुंधपणाची ययातीला भीती वाटते, आणि ती भीती खरी ठरते, एक घोडा बेभान होऊन दरीकडे पळत सुटतो. ययातीच्या प्रयत्नांना दाद न देता,तो घोडा, रथ आणि स्वत: ययाती दरीत पडतात. आणि ययाती खाडकन झोपेतून जागा होतो.
मदिरा आणि मदिराक्षी (खांडेकरांचे शब्द) यात नखशिखांत डुबलेल्या ययातीची मनस्थिती, त्याला वाटणारी भीती, यांना दर्शवणारं हे रूपक अगदी नकळत पणे संयमाचा संदेश देऊन जातं.
- Mayuri J. Chawathe-Shinde
Yayati vachlay... Apratim
- Vilas-Vishakha Kulkarni
मी ही कादंबरी १९७० ,साली पहिलेंदा वाचली... भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेती ठरली.. मनास भावणारी सुन्दर कादंबरी..
- Swati Thombare
ययाती सुंदर कादंबरी,
वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला
खरच खुप सुंदर कादंबरी,
ययाती, देवयानी, शर्मिष्ठा ह्यांन च मनोगत वाचतांना खरच गुंग होऊन जातो ,
त्या पात्रात हरवून जातो
वाचायला घेतली हि कादंबरी की भान हरपून जात,
सगळ्यांनी एकदा तरी वाचावी,
भाव भावने ची गुंतागुंत ,
लग्न, नातं, प्रेम या सगळ्यांनी परिपूर्ण कादंबरी म्हणजे ययाती
- Somesh Pathak
कुठ तरी वाचलेलं होतं की काही पुस्तकांची तुमच्या आयुष्यात येण्याची वेळ ठरलेली असते . तसच काहीस झालं या पुस्तकाच्या बाबतीत . “ ययाती “ वर्षभरापासून कपाटामधून खुणावत होतं , पण वाचण्याचा योग काही दिवसापूर्वी आला . #ययाती #वि_स_खांडेकर यांना ज्या कादंबरी साठी ज्ञानपीठ मिळाला ती ही कादंबरी .
कादंबरी वाचयला घेतली तेव्हा पहिले १०० पान उलटल्यावर कथेनी वेग घेतला होता . ययाती , देवयानी , शर्मिष्ठा हे तीन प्रमुख पात्र आकार घ्यायला लागले होते , आणि मग त्या त्या पात्राची कथा त्याच्या तोंडून समजत होती . कादंबरी वाचताना डोक्यामध्ये फक्त असंख्य प्रश्न तयार व्हायला लागले होते कि का ? हे असं का व्हावं ?
ज्याला स्वप्नात सुद्धा संयम ठाऊक नाही असा ययाती , क्रोधाने आणि सुडाच्या भावनेने भडकलेली #देवयानी , आणि कुठेतरी खूप वेगळी वाटत राहणारी , ययाती वर निस्वार्थ प्रेम करू पहाणारी #शर्मिष्ठा ; मी गुंतलो होतो यांच्या मध्ये . कादंबरी वाचताना प्रत्येक पात्र आपल्या स्वभाव दोषाप्रमाणे वागत होतं , विषयासक्ती मध्ये अडकलेला ययाती ,कुठल्या तरी गैरसमजा मधून चिडलेली आणि त्यातूनच शार्मिष्ठे विषयी सुडाची भावना मनात ठेवणारी देवयानी , आणि शांत खोल समुद्राप्रमाणे वाटणारी शर्मिष्ठा . राजकन्या असूनही फक्त देवयानी चा हट्ट आणि सुडाच्या भावनेमुळे पदरात पडलेले दासीच आयुष्य .
खर तर कादंबरी लेखातून मांडणे केवळ अशक्य , ती वाचूनच कळू शकते . पण राहून राहून कुठे तरी शर्मिष्ठा म्हणजे ग्रेस यांच्या कवितेमधल्या “जे सोसत नाही असले तू दु:ख मला का द्यावे “ या ओळी सारखी वाटत होती . एका दुःखाची तयारी केलेली असताना त्याहून मोठ काहीतरी दु:ख तिला मिळाव असं का ? १८ वर्ष दूर राहूनही ययाती वर अशी कोणती श्रद्धा होती जी इतक्या काळानंतर सुद्धा कण भर कमी नाही झाली ?
संपूर्ण कादंबरी वाचून झाली आणि मनात समुद्र उधाणला होता . फक्त प्रश्न होते डोळ्यासमोर ययाती ला जर देवयानी त्याला हव असलेले निर्व्याज प्रेम देऊ शकली असती तर कदाचित तो बदलला असता का ? देवयानी ने शर्मिष्ठेला समजून घेतले असते तर ?
सुरवातीला मी विचार करत होतो कि या कथे मध्ये दोष कुणाचा ? पण नाही यांना दोष देणारा मी तरी कोण ? खूप अडकून पडायला होतं या कादंबरी मध्ये . म्हणजे हे फक्त एक पुस्तक नाहीय त्या पुस्तकाच्या पलीकडे काहीतरी वेगळ सांगू पाहते हि कादंबरी . माणसाच्या मनाचे वेगवेगळे कंगोरे आपल्या समोर आणते आणि विचार करयला भाग पाडते .
ययाती वाचावं , डोक्यामध्ये सत्य-असत्य , समज-गैरसमज , चूक-बरोबर यांच युद्ध लावून द्यावं आणि फक्त विचार करावा त्रयस्थ पणे ... कदाचित ययाती शर्मिष्ठेला शेवटी म्हणेल
मी दोष तुला का देऊ
तू साऱ्यातून निर्दोष उरतेस
हे पाप प्रीतीचे करुनी
मी मोक्षाला मुकलो होतो
कादंबरी खरं तर आपल्याला प्रत्येकाची चूक समजून घ्यायला शिकवते . इथे प्रत्येकाला कुठल्या तरी रुपात प्रेमाची गरज होती आणि समोरचा ते देऊ शकला नाही यातून तयार झालेली असूया... आणि त्यातून घडलेले कथानक
ययाती फक्त कादंबरी नाहीय...
माणसाच्या स्वभावाच दर्शन आहे ते . थोड्याफार प्रमाणात आपल्या मनात असलेल्या ययाती , देवयानी किंवा शर्मिष्ठेचा शोध म्हणजे ही कादंबरी...
नियती च्या क्रूर खेळात अडकलेल्या प्रत्येकाची गोष्ट म्हणजे ही कादंबरी...
बास आता थांबतो , नाहीतर या कादंबरी वर एक नवीन पुस्तक व्हायचं लिहून...
पण #मराठी मधील एक दमदार #लेखणी अनुभवायची असेल तर ययाती वाचावच...
बहुत काय लिहिणे
तुम्ही सुज्ञ आहात
- Ashok Patil
ययाती... मराठीतील सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक!
- Preeti Vichare
व्वा! खुप छान
- Bajrang Mhatre
ययाती !
अप्रतिम
- युवराज कुंडलिक पाटील
वाचा ..मस्तच कादंबरी आहे....
- Dhanasing Pardeshi
खुपच छान कादंबरी
- Kaushik Lele
मराठीतील श्रेष्ठ लेखक वि.स. खांडेकर यांच्या "ययाती" या कादंबरीला "साहित्य अकादमी" चा पुरस्कार मिळलेला आहे. ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. पुस्तकातील माहितीनुसार प्रथमावृत्ती १९५९ सालची आहे. त्यामुळे गेल्या ५० वर्षांत कितीतरी वाचकांनी, मान्यवर लेखकांनी, समीक्षकांनी याबद्दल खूप काही लिहून ठेवलं असेल. आता त्यात नव्याने मी काही सांगावं अशी शक्यता नाही आणि तितका माझा अधिकारही नाही. तरी, मी पुस्तक वाचले, मला आवडले हे सांगायचा मोह आवरत नाही म्हणून हे परीक्षण. थोडक्यातच लिहिलेले.
सुखलोलूप ययाती, अहंकारी देवयानी, प्रेमळ शर्मिष्ठा, कोपिष्ट शुक्राचार्य, शूर-धीर-त्यागी पुरू, संन्यासाश्रमाच्या अतिरेकातून विकृत झालेला यती, संन्यस्त तरीही जीवनातील द्वैत-संघर्ष-सौंदर्य यांचा समंजस स्वीकार करणारा कच या या कादंबरीच्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत.
संसारात पैसा, कामवासना सुखं या सगळ्यांपासून असमंजसपणे पळून जाणारा, प्रत्येक सुख म्हणजे पाप आहे असं समजणारा यती विकृतीचं एक टोक आहे तर फक्त सर्वसुखोपभोग म्हणजेच आयुष्य असं मानणारा ययाती हे विकृतीचं दुसरं टोक. आयुष्यभर कामवासनांचा भोग घेत ययाती जगतो आहे. एका शापामुळे त्याला वार्धक्क्य येतं तेव्हाही स्वतःच्या मुलाचं तारुण्य उसनं मागून कामसुख मिळवत राहण्याइतका तो विषयांच्या आहारी गेलेला होता. इतकं होऊनंही जाणवणारी अतृप्ती, सगळ्या सुखसोयी हाताशी असूनही आपण सुखी नाही ही जाणीव आणि वार्धक्क्याची-मरणाची भीती ययातीला कुरतडते आहे.
स्वतःचे सौंदर्य आणि वडील शुक्राचार्य यांच्या तपःसामर्थ्याबद्दलचा अतिगर्व, अहंकार यामुळे स्वतः आणि दुसऱ्यालाही मानसिक त्रास, अपूर्णता वाटण्यात आयुष्य घालवणारी अशी देवयानी आहे.
प्रेम हे फक्त शारिरिक नाही तर मनाने, बुद्धीनेही एकमेकांचा स्वीकार करणं आवश्यक आहे, प्रेमात दुसऱ्याकडून फक्त सुखं मिळवणं अपेक्षित नाही तर दुसऱ्यासाठी त्यागही करावा लागतो हे शर्मिष्ठेला कळतं म्हणून ययातीवरील प्रेमापोटी ती विरह-विजनवासही सहन करते.
एका पौराणिक उपकथानकाचा आधार घेऊन लेखकाने स्वतः ही कादंबरी रचली आहेत. स्वप्रतिभेने असंख्य पात्रं रचली आहेत. कादंबरीच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत उत्सुकता कायम राहते. कादंबरीतील पात्रं स्वगत सांगताना परस्परविरोधी भूमिका मांडतात. त्यांच्या या वाद-संवादातून लेखक आपल्यासमोर एक तत्त्विक चर्चाच उभी करतो. जीवनातलं सुख-दुःख, प्रेम-वासना, आयुष्याचा आनंद घेणं- त्यामध्ये वाहून जाणं याबद्दल ही उद्बोधक चर्चा आहे. लेखकाचं वैशिष्ट्य असं की ही चर्चा कथेच्या ओघात येते, पात्रांच्या सहज संवादात येते, चर्चा नीरस होत नाहीच उलट कथानक पुढे घेऊन जायला, प्रसंगाची परिणामकारकता वाढवायलाच मदत करते.
पुस्तकाच्या शेवटी खांडेकरांनी या कादंबरीची कल्पना त्यांना कशी मिळली, अनेक वर्षं त्यावर विचार, अभ्यास करून शेवटी प्रत्यक्ष लेखनाकडे ते कसे वळले, कथा पौराणिक असली तरी ति आजच्या जगातली प्रासंगिकता याबद्दल भाष्य केलं आहे.
पुस्तकातील कितीतरी वाक्य सुभाषितांसारखी किंवा नित्यसत्यवचनं असावीत अशी आहेत. अगदी टिपून ठेवावीत अशीच.
मी काही वाक्य इथे देणार होतो. पण संदर्भाला सोडून वाक्य देण्यात स्वतःचा "गटणे" व्हायचा; म्हणून तो मोह टाळला आहे. ती वाक्ये, चर्चा आणि नाट्य प्रत्यक्ष कादंबरी वाचूनच अनुभवण्यात, समजण्यात मजा आहे. ती तुम्ही नक्की घ्या.
"ययाती" बद्दल हिंदी विकिपिडिया वर छान श्लोक मिळाला
विषय वासना से तृप्ति न मिलने पर उन्हें (ययाती)उनसे घृणा हो गई और उन्हों ने पुरु की युवावस्था वापस लौटा कर वैराग्य धारण कर लिया। ययाति को वास्तविकता का ज्ञान प्राप्त हुआ और उन्होने कहा-
भोगा न भुक्ता वयमेव भुक्ताः
तपो न तप्तं वयमेव तप्ताः।
कालो न यातो वयमेव याताः
तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णाः ॥
अर्थात, हमने भोग नहीं भुगते, बल्कि भोगों ने ही हमें भुगता है; हमने तप नहीं किया, बल्कि हम स्वयं ही तप्त हो गये हैं; काल समाप्त नहीं हुआ हम ही समाप्त हो गये; तृष्णा जीर्ण नहीं हुई, पर हम ही जीर्ण हुए हैं !
- Ganesh Pawar
yayati evergreen pratyek veli veglach message dete
- Kaushik Lele
नवीन पुस्तक परीक्षण: "ययाति". एका लोकप्रिय, महान अश्या जुन्या कादंबरीबद्दल माझे दोन शब्द.
- Shambhvi Pramod Thite
ययाति वाचताना एक गोष्ट कसोशीने लक्षात येते काळ बदलतो प्रवृत्ती नाही. ऐतिहासिक पात्रांच्या प्रवृत्तीची एवादी तरी आवृत्ती काळाच्या प्रत्येक टप्प्यावर पाहिला मिळते. असंख्य यती, ययाति, कच, देवयानी, शर्मिष्ठा आपल्या आजुबाजूला असतात फक्त आपण त्यांना समजून घेऊ शकत नाही. दैव माणसाला खेळवतं, अगदी वाटेल तसं पण म्हणून जो सारीपाट विध्यात्यानं रचला आहे तो क्षणार्धात आपण उदाळून लावू शकत नाही. ययाति आणि शर्मिष्ठा दैवाचे फासे किती विचित्र पडतात ह्याचे कायम लक्षात ठेवावे असे उदाहरण. ह्या कथेत महत्त्वाकांक्षा, संयम, वात्सल्य, वासना, प्रेमभंग आणि शृंगाराला साजेसा अहंकारदेखील आहे. खांडेकरांनी लिहिलेली ही कादंबरी चिरतरूण आहे कारण काळाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक पिढीत ययाति मधील पात्र जन्माला येतात.
- बाळु कुलकर्णी
ययाती या पुस्तकाची जादू अजूनही वाचकांना आहे.
- Govind Dhakane
Yayati is one of the best novel`s I have ever read.i read it when I was in college.it impressed me so much.Kach is the most ideological character depicted by khandekar sir.
- Daily Tarun Bharat 22-1-17
माणसाच्या मनातील भावना चिरंतन आहेत. सत आणि असत या मधला संघर्ष चिरंतन आहे. माणसाची लैंगिकता त्यातील नैराश्येतून येणारी विकृती या गोष्टी देखील कायम आहेत. म्हणूनच माणसांच्या भाव विश्वावर अचूक बोट ठेवणाऱ्या पौराणिक कथा मग त्या ग्रीक असो अथवा भारतीय वंशातील असो जनमानसावर त्यांचा प्रभाव कायम आहे.
वि. स. खांडेकरांची ‘ययाति’ ही ज्ञानपीठ विजेती कादंबरी अशाच एका पौराणिक कथेवर आधारित आहे. प्रस्तुत कादंबरीत कथेतील संघर्षाला चिंतनाची झालर आहे. हे चिंतन क्षणभंगुर भोगवादी आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहतं. ही नजर एका तत्त्वज्ञाची आहे. या कथेच्या माध्यमातून लेखकाच्या प्रतिभेला गवसलेला जीवनाचा अर्थ कालातीत आहे. म्हणूनच मराठी साहित्य विश्वात ही कादंबरी ‘मैलाचा दगड’ ठरलेली आहे.
हस्तिनापूरच्या नहुष महाराजांच्या पोटी जन्माला आलेल्या ययाति या राजुपत्राची ही गोष्ट. मोठा भाऊ यति संन्यास घेऊन निघून गेला. त्यामुळे हस्तिानपूरचे राज्य सहजगत्या प्राप्त झाले. आता आयुष्याच्या संधिकाली ययाति आपली कहाणी सांगतो आहे अर्थात प्रत्येक मनुष्याला आयुष्याच्या शेवटी जे थोडे फार शहाणपण येते ते दुसNयाला लागलेल्या ठेचानी नाही, तर स्वत:ला झालेल्या जखमांनी ययातिची देखील तीच कथा आहे. जन्मत:च कविमन असलेल्या या भावुक राजपुत्राला घडवलं जातं ते वीरपुरुष म्हणून कारण उघड आहे. कवि मनाचा माणूस राजा म्हणून काय कामाचा? जग माणसांच्या मनातल्या दयेवर चालत नाही, तर ते मनगटातल्या बळावर चालतं. लहानग्या ययातिच्या मनावर एक गोष्ट पक्की ठसवली जाते की, जग शक्तीवर चालतं, स्पर्धेवर जगतं आणि भोगासाठी धडपडत. त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात. जग हे देवालय नसून रणांगण आहे. युवराज ययाति धनुर्विद्या शिकतो. त्याचे पहिले शरसंधान असते. झाडावरची एक पक्षिणी त्याचा नेम अचूक लागतो. राजवाड्यात आनंदाने त्या पक्षाचे मांस शिजवतात. राजमातेच्या कौतुकाची नजर झेलत असतानाच मनाच्या कोपNयात कुठेतरी जिवंत असलेलं कविमन विव्हळत. त्या मनाला प्रश्न पडतो, की घरट्यात अद्यापि पंख न पुâटलेली त्या पक्षिणीची पिल्ले आपल्या आईची वाट पाहत असतील, त्यांचं काय?... मुळात ययातिला प्रश्न पडतो की, आपली आई एक माता असून देखील दुसNया मातेचे दु:ख का जाणत नाही? माणसांच्या जगण्यातील विसंगती खांडेकरांनी खूप प्रभावीपणे टिपली आहे.
युवराज ययातिचा अश्वमेघाचा घोडा पूर्व आर्यावर्तात येतो, तेव्हा निबिड अरण्यातून जाताना त्याची भेट मोठ्या भावाशी म्हणजे योगी झालेल्या यतिशी होते. खरं म्हणजे या आकस्मिक भेटीने मन फुलून यायला हवे, परंतु यतिची जीवनशैली पाहून ते पार गारठून जाते. तोपर्यंत नवतारुण्यात अलका या दासीपुत्रीच्या प्रीतीतला आनंद घेतलेल्या ययातिला वाटतं, या वैराग्याला काय अर्थ आहे. कसली तरी कडू फळे खायची आणि काटेरी शय्येवर झोपायचं, हे कसलं जगणं? कोणाची भीती नाही की कोणावर प्रीती नाही? वैराग्यातील फोलपणा कादंबरीत अगदी सहजगत्या येतो. यति त्याला जाता जाता एक संदेश देतो, तो कोणत्याही काळात जगातील सर्व राज्यकत्र्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. तो म्हणजे जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही. पुढे ऋषिवर्य अंगिरस शांतियज्ञाचा संकल्प सोडतात. त्या संकल्पाची सुरक्षा व्यवस्था ययातिकडे सोपवली जाते. त्यासाठी ययाति अंगिरस ऋषीच्या आश्रमात जातो. जगाला रणांगण मानणाNया ययातिची तिथे भेट होते ती जगाला देवालय मानणाNया बृहस्पतिपुत्र कचाशी. कच आणि अंगिरस यांच्या तात्विक विचारांचा ययाति वर प्रभाव पडतो. ययाति तिथून परततो तेव्हा इथे हस्तिनापुरात वडील मृत्यूशय्येवर असतात. त्याचं वृद्धत्व, शरीराची हतबलता, त्यांची जगण्याची निरर्थक धडपड पाहून ययातिला नैराश्य येतं. त्याच्या स्वत:च्या वृद्धत्वाच्या सावल्या भीती दाखवू लागतात. मृत्यूची अनामिक भीती मन पोखरु लागतं. जन्म काय आणि मृत्यू काय! सृष्टीच्या या अफाट पसाNयात माणूस किती शुद्र आहे. वार्धक्य आणि मृत्यू जर अटळ असेल तर माणसाला त्यांची भीती का वाटते? माणसाला अनादि कालापासून पडणा-या या प्रश्नांचा ययाति शोध घेतो आहे.
दानवांचे गुरु शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या असल्या कारणाने दानवांचे पारडे जड होते. कच ती संजीवनी देवांना मिळावी म्हणून शुक्राचार्यांच्या आश्रमात येतो. देवयानी शुक्राचार्यांची मुलगी कचावर प्रेम करते. कच तिच्या प्रीतीच्या बळावर संजीवनी मिळवतो. कथेचा हा भाग निव्वळ अद्भुत आणि एखाद्या परीकथेत शोभावा असा आहे.
रुपगर्विता देवयानीच्या प्रेमाला कच प्रतिसाद देत नाही. कर्तव्य हे प्रीतीपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी त्याची भावना आहे. तो निघून जातो. आता त्याच्या आठवणी म्हणजे अग्नीच्या ज्वालांचा कल्लोळ. घायाळ झालेली वाघीण सूड मागते आहे. तशातच राजकन्या शर्मिष्ठा तिला ‘भिक्षुकाची मुलगी’ म्हणून हिणवते. दोघींची जुंपते. मनुष्य रागाच्या भरात हिस्र बनतो आणि नको ती चूक करतो. शर्मिष्ठा रागाच्या अतिरेकात देवयानीला विहिरीत ढकलते. ययाति देवयानीला वाचवतो. आणि देवयानीच्या सौंदर्याने मोहित होतो. चाणाक्ष देवयानीला जाणवतं, हीच संधी आहे, कचाचा सूड घेण्याची राजकन्येला धडा शिकवण्याची. प्रेम, मैत्री सब झूठ! सत्ता तेवढी खरी. त्याने मला नाकारलं म्हणून काय झालं, मी हस्तिनापुरची महाराणी होईन. त्या शर्मिष्ठेला तिची जागा दाखवीन. देवानी ययातिला वश करते. आता ती जगातील सामथ्र्यवान स्री आहे. पित्याची बुद्धिमत्ता तिच्या बाजूला आहे. हस्तिनापुरचे साम्राज्य तिला अंकित आहे आणि सौंदर्य तर निसर्गानेच बहाल केले आहे. शर्मिष्ठेला ती दासी बनवून हस्तिनापूरला घेऊन जाते. सूडाचा पहिला अध्याय सुरू होतो. अपमानित स्रीच्या भावनाचे सूक्ष्म पदर वाचकाला विषण्ण करतात.
देवयानीचा राजवाड्यातील प्रवेश सोपा नाही. तिचा राजमातेशी वाद आहे. हा वाद क्षत्रिय आणि ब्राम्हण या दोन वर्णातील आहे की, अहंकार आणि गर्व यामधील आहे? प्रश्न तसा नाजूक आहे. वर्णव्यवस्था इतिहासात जमा झाली. परंतु वाद मात्र मिटलेले नाहीत. मिलनाच्या पहिल्या रात्री मद्य प्यायलेल्या ययातिशी संग करायला देवयानी नकार देते. खरं म्हणजे ययाति क्षत्रिय आहे आणि क्षत्रियांना मद्य वज्र्य नाही. ही गोष्ट देवयानीने समजून घेतली पाहिजे. परंतु मनातली कचाची प्रतिमा पुसली जात नाही. त्याच काय? ठीक आाहे कच मद्याचा तिरस्कार करीत होता. परंतु इथे मद्यबंदी असायला ही थोडीच कचाची पर्णकुटी आहे. हा ययातिचा राजवाडा आहे. इथे ययातिचाच शब्द चालणार. तो राजा आहे. त्याने ठरवलं तर रोज एक नवी! अहंकार आणि गर्व यांच्यातील हा न संपणारा वाद रात्रीला मिलनापासून दूर ठेवतो. अर्थात देवयानीच्या सौंदर्यापुढे ययाति अखेर झुकतो आणि यापुढे शयनगृहात शिरण्यापूर्वी मद्य प्राशन करणार नाही, असे सांगतो. सौंदर्यापुढे साम्राज्य तर झुकले; परंतु पति पत्नीच्या नात्याचे काय? देवयानीच्या अहंकारामुळे या नाजूक बंधनाला तडा तर गेलाच. पति पत्नीच्या नात्यात मनाचा मनाशी संवाद खूप महत्त्वाचा असतो. कठीण प्रसंगी साथ देणारी, समजून घेणारी मैत्रीण पुरुषांना हवी असते. तापट, अहंकारी देवयानीच्या ही गोष्ट लक्षातच येत नाही. बरं राजवाड्यात शर्मिष्ठा दासी म्हणून असली तरी ती राजकन्या आहे. राज घराण्याचा डौल तिच्यात आहे. राजवाड्याच्या जीवनशैलीशी परिचित आहे. मनाने देवयानीपासून दूर गेलेल्या ययातिला तिचा मोह होणं. अगदी नैसर्गिक आहे. थोडक्यात प्रेमाचा त्रिकोण आणि त्यामुळे होणारा संघर्ष अटळ आहे. कथानकातला हा संघर्ष त्यातल्या अतिरंजित भागासह मुळातून वाचण्यासारखा आहे. कारण त्यात असलेले जीवनाचे तत्त्वज्ञान जे आजही मार्गदर्शक आहे. माणसाचा अहंकार, महत्त्वाकांक्षा, कामुकतेसाठी यौवनाचा ध्यास, दंश करताना सर्पालाही लाजवेल अशी वृत्ती आणि हे सारं समोर दिसत असतानाही माणसामधल्या माणसांनी जपलेले निरपेक्ष प्रेम. आयुष्यभर केलेला त्याग या सगळ्या गोष्टींचे यथार्थ दर्शन ययाति कादंबरीत होते. विलासी, भोगवादी ययाति आणि अहंकारी, हट्टी देवयानी या व्यक्तिरेखा जितक्या समर्थपणे उभ्या राहतात तितक्याच समर्थपणे संयमी, ध्येयवादी कच आणि निरपेक्ष प्रेम करणारी शर्मिष्ठा देखील उभी राहते. प्रत्येकाचे आत्मकथन वाचकाला विचार करायला लावते. या कादंबरीचे भाषावैभव निव्वळ अलौकिक आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या कादंबरीने मराठी मनावर राज्य केले हे निश्चित!
- DAINIK SAKAL 20-06-2010
‘ययाती’ने दिली माझ्या अपंग जिण्याला कलाटणी! …
मी आहे एक ग्रामीण युवक. दोन्ही पायांनी पूर्णत: अपंग. ग्रामीण भाग, अपंगत्व आणि अडाणी लोकांचा अपंगांकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आदी गोष्टींना तोंड देत जगणं माझ्या वाट्याला नियतीनं आणलं. हे असं जिणं सुरू असतानाच घरच्यांकडे हट्ट धरून मी शाळेत जाऊ लागलो. १९७०-७२ चा तो काळ. त्या वेळी खेडुत लोक आपल्या धडधाकट मुलांनाही शाळेत पाठवायला कां-कूं करायचे. मग माझ्यासारख्या अपंगाला कोण पाठविणार शाळेत? आणि त्यात दुसरे असे की, मला उचलून शाळेत न्यावे-आणावे लागणार होते. मी परावलंबी होतो. पण माझ्या हट्टाला होकार मिळाला आणि मला घरचे लोक शाळेत नेऊ-आणू लागले.
मला आवड असल्याने मीही शिक्षणात प्रगती केली. मला वाचनाचा मनस्वी छंद जडला. अगदी कागदाचा कुठलाही कपटा वाचायचा सोडत नसे. आवडलेला आणि न आवडलेलाही मजकूरही मी जपून ठेवत असे. १९८० ची गोष्ट. मी सातवीत असतानाची. मी वारंवार नवनव्या पुस्तकांचा तगादा लावू नये म्हणून शाळेतील शिपायाने एकदा वैतागून बारीक अक्षरातले एक जाडजूड पुस्तक माझ्या हाती दिले. हेतू हा की, आता पुढचे दिवस नव्या पुस्तकाची मागणी माझ्याकडून होऊ नये!
शिपायाने माझ्या हाती सोपविलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ गायब होते आणि शीर्षकपानाचाही पत्ता नव्हता. पण मधला मजकूर सुरवातीपासून शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित होता. मी ते पुस्तक आधाशासारखे वाचून काढले. २०-३० दिवसांत मी ते दोनदा वाचले. त्यातील ययाती, देवयानी, शर्मिष्ठा, कच, शुक्राचार्य आदी पात्रांनी मला खूपच भुरळ घातली. कालांतराने मला कळले की, मी जे पुस्तक वाचले ती होती वि. स. खांडेकर यांची विख्यात कादंबरी ‘ययाती’!
त्या शिपायाचा वैताग आणि त्याच्या वैतागापोटी मला मिळालेली ‘ययाती’ ही कादंबरी माझ्या रुक्ष, वैराण आयुष्यात तेव्हा हिरवळ बनून गेली होती. आजही तीच स्थिती आहे. मला या ग्रंथराजाने जगणे बहाल केले, असे मी म्हटले तर अतिशयोक्ती न ठरता वस्तुस्थितीच ठरेल.
मला तशी कळत्या वयापासून वाचनाची आवड लागत गेली. त्यातूनच पुढे लेखनाचीही ऊर्मी जागृत झाली. आपणही काहीतरी लिहून पाहावे, असे मला सारखे वाटायचे. पण दिशा मिळण्यासाठी वाट सापडत नव्हती म्हणा की ठिणगी फुलण्यासाठी फुंकर मिळत नव्हती म्हणा. ‘ययाती’ने ते काम केले. हा ग्रंथराज वाचल्यानंतर शर्मिष्ठा आणि देवयानी या पात्रांवरून मी ‘निर्मला’ नावाची एक लघुकथा लिहिली. विषय होता हुंडाबळी. मी आठवीत असताना ही लघुकथा स्थानिक साप्ताहिकात १९८१ साली प्रसिद्धही झाली. ‘आंतरराष्ट्रीय अपंगवर्षात जत तालुक्यातील एका अपंग विद्यार्थी लेखकाने हा लेखनाचा आरंभ केला आहे,’ असे गौरवोद्गार साप्ताहिकाच्या संपादकांनी कथेसोबत प्रसिद्ध केले. ‘ययाती’ने माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली.
मी लिहित गेलो. लिहित राहिलो. ‘रानपालवी’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. शांता शेळके यांची प्रस्तावना त्या संग्रहाला लाभली. बालकथांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले. स्फुट लेखनही चिकार केले. आकाशवाणीवरून कथा प्रसारित होण्याची व भाषण करण्याची संधी मिळाली. साहित्यक्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले. अनेक मोठ्या साहित्यिकांचा सहवासही मिळाला. ‘मराठी साहित्य सेवा मंचा’तर्फे ग्रामीण भागात साहित्यचळवळीचे काम मी माझ्या परीने पंधरा वर्षांपासून करीत आहे. दरवर्षी एकदिवसीय साहित्य संमेलनही या संस्थेतर्फे भरविले जाते.
‘ययाती’पासून सुरुवात झाली आणि पुढे अनेक पुस्तकांनी माझ्या जगण्याला वळण दिले. सर्वसाधारणपणे अपंगांचे जीवन म्हणजे उपेक्षित आणि अंधकारमयच असते. पण माझ्याबाबतीत मी नक्कीच सांगू शकतो की, वेगवेगळ्या ग्रंथदीपांनी माझ्या जीवनात उजाळा आणला. जगण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. मान-सन्मान मिळाले.
म्हणूनच मी अभिमानाने म्हणू शकतो की
पंखांशिवाय जगणे, जगणे असह्य झाले
संगतीत पुस्तकांच्या जगणे सुसह्य झाले !
- mahesh
wonderfull story
- koaml
best story i ever read... i love the sense of language.