- Rahul Kamadi
खेकडा🦀 या कथासंग्रहातील सर्वच कथांमधून जे भय जे दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी लागणारे आहे यात भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून वाचकांच्या अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो, तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो. कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत.
- Sameer Vengurlekar
रत्नाकर मतकरी हे गुढकथाकार म्हणून ओळखले जातात. त्यांचे खेकडा हे पुस्तक वाचनात आले. निरनिराळ्या १० गुढकथा यात समाष्ट आहेत. यातील निमाची निमा, शाळेचा रस्ता या कथा वाचताना थक्क व्हायला होते.
- Meghana Rairikar
आज पुस्तक साखळीतला तिसरा दिवस, नेहमी तिसरी घंटा झाली की अद्भुत, गूढ, रहस्य डोळ्यसमोर येते, काहीतरी विलक्षण घडणार असे मन सांगते, अगदी एकाग्रतेने आपण पडद्याची चाहूल घेतो, तसेच कायम आपल्या विलक्षण शैलीने, वाचकांवर परिस्थिती, पात्रे आणि शब्दांचे गारुड घालणारे वाचकप्रिय लेखक, रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचे गाजलेले पुस्तक निवडले आहे खेकडा
खेकडा कथासंग्रहात अकरा छोटया गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्ट गूढरम्य, थरार वाटणारी, काहीतरी वेगळी अनुभूती देणारी आहे. त्यांच्या गोष्टीत कमी पात्रे असतात, बघता बघता त्यातल्या कथानकात आपण गुंतून जातो, भीतीचा, रहस्याचा पगडा मनावर बसू लागतो आणि अतिशय वेगळाच धक्का बसून कथा संपते. त्यांच्या सगळ्याच गोष्टीत एक दृश्यमयता जाणवते, संपूर्ण कथा डोळ्यासमोर उभी राहते, काही दिवस झोप उडेल इतकी ताकद त्यांच्या लेखणीत जाणवते. त्यांचे सर्वच कथासंग्रह वाचनीय आहेत. त्यांची नावे, गहिरे पाणी, एक टोल वाजतायेत, रंगांधळा अशी लेखकांची वेगळी वाट सुचवणारी.मी ग्रंथालयात अगदी प्रतीक्षा यादीत नाव घालून एकापेक्षा एक मतकरींची पुस्तकं आणून वाचली आहेत. विलक्षण भीती, थरार आणि औत्सुक्य वाटून पुढे काय असे नेहमी त्यांच्या कथा वाचताना होते, कथा पुस्तकात आणि चलबिचल होणाऱ्या वाचकाच्या मनातही घडत असते. कधीतरी कॉलेज दिवसात वाचलेल्या या खेकड्याने अजूनही भयकथांची पकड आणि आवड कायम ठेवली आहे.
दुर्दैवाने गूढ, रहस्यमय अशा कोविडमुळेच या प्रतिभावंत लेखकाने आपला निरोप घेतला हा विचित्र योगायोग. साहित्यविश्वात वेगळ्या धाटणीच्या कथांनी वाचकांना समृद्ध करणाऱ्या मतकरींचे कृतज्ञ स्मरण
- Vikas Doke
‘खेकडा’ या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे. या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो, कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत. जसे ‘तुमची गोष्ट’ आरंभीच लेखक सांगतो, ‘ही तुमची गोष्ट आहे म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी’ आणि शेवटीही निक्षून सांगतो, ‘तुमची म्हणून सांगितलिली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली शक्यता सांगितलेली एवढेच.’ पण तरीही या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन आहे, त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श तुमच्या मनीमानसी नसूनही तुमच्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना तुम्ही अनुभवता. रत्नाकर मतकरी हे एक सिध्दहस्त कथाकार आहेत आणि या कथासंग्रहातील कथा मराठी भाषेत तरी दुर्मिळ अशा आहेत. या कथांचे अन्य भाषांतून अनुवाद झाले तर ते फक्त मतकरींचेच प्राप्त यश वृध्दिंगत करतील असे नव्हे, तर परिणामी मराठी भाषेलाही ललामभूत ठरतील.
- Mrunal Joshi
काही काही लेखकांच्या साम्राज्यात मी गेलोच नव्हतो, का जावेसे वाटले नाही ह्या आणि तत्सम असल्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने काही काहीच उत्तर नसते. नसावे. घराच्या जवळ एक छोटे पण अत्यंत सुंदर असे वाचनालय आहे, तिथला सदस्य झालो, अनेक विविध विषयांवर पुस्तक तिथे वाचली, पण एक मोठे पुस्तक विश्व माझी वाट पाहत होते किंबहुना मीच त्या विश्वाची वाट पाहत होतो हे कटाक्षाने जाणवले. एका कोपऱ्यात सुमारे २२-२३ पुस्तकांची थपकी मारलेली दिसली, थोडा जवळ गेलो तर अक्षरशः अतोनात आनंद व्हावा असं माझं झालं. एक अतुलनीय लेखक, जितकी पुस्तके वाचली त्याहून काही वेगळी पुस्तके एक वेगळी शैली, कन्टेन्ट युक्त पुस्तकं म्हणजे एकच नाव आणि ते म्हणजे "रत्नाकर मतकरी", मनात फार काळापासून संपूर्णपणे मतकरी, एलकुंचवार, भाऊ पाध्ये, विलास सारंग, गौरी देशपांडे, नगरकर ह्या लेखकांना वाचावं असं वाटत होतं त्यातील पहिला टप्पा रत्नाकर मतकरी इतक्या लवकर वाचायला मिळावेत, त्यातून मी अनेक लेखकांचे विविध कथासंग्रह वाचले पण त्यातच एक सुंदर कथासंग्रह म्हणजे मतकरींच्या "खेकडा" हा कथासंग्रह आहे.
"खेकडा" कथासंग्रहात एकूण कथेचा गाभा, कथेत येणारे ट्विस्ट, पात्रांची निर्मिती आणि सर्वात महत्वाचा एकूण त्या कथेचा क्लायमॅक्स इतका जबरजस्त आहे ज्याला खरोखर तोड नाही, जवळ जवळ सर्वच कथेत "भय" हा मुख्य भाव आहे, आणि हेच भय वाचकाला वेळोवेळी दंश करत जाते, जिव्हारी लागत जातं, कथा वाचताना आपण त्यात अविरत गुंतत जातो, आणि एके ठिकाणी मतकरी आपल्याला त्यातून बिनबोभाट पणे बाहेर काढतात, खरं म्हणजे त्या वेळी मला लेखकावर भयंकर प्रेममयी राग येतो, तो यासाठी कि आपण मोठ्या हिम्मतीने त्या कथेच्या पात्रात रमलेले असताना कथेला ट्विस्ट करून आपल्याला त्यातून बाहेर का काढावे? आणि ते ही मोठ्या शिताफीने. इथे खरी लेखकाची शैलीचा कस लागतो, इतकी साधी - लाघवी भाषा, आणि सुंदर लिखाण शैली मतकरींची आहे. निर्विवाद.
कथासंग्रहात एकूण ११ कथांचा समावेश आहे - खेकडा, कुणास्तव कुणीतरी, अंतराय, कळकीचे बाळ, पावसातील पाहुणा, शाळेचा रस्ता, ती- मी आणि तो, निमाची निमा, एक विलक्षण आरसा, आल्बम, आणि तुमची गोष्ट. प्रत्येक कथा वेगळ्या उंचीवर घेऊन जाते, प्रत्येक कथेचा प्लॉट अत्यंत रेखीव - आखीव आणि तितकाच भयकारी.
शेवटल्या कथेत म्हणजेच "तुमची गोष्ट" ह्यात एक वाक्य आहे - "ही गोष्ट तुमची आहे, म्हणजे तुमच्या बाबतीत ही घडू शकेल अशी" आणि ह्या कथेचा शेवट आहे - "तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली एक शक्यता सांगितलेली एवढेच". खरं म्हणजे हाच भाव मतकरींच्या प्रत्येक कथेत जाणवतो, कथेची सुरवात अतिशय लाघवी असते, सगळं काही गोडी - गुलाबीने चाललेलं असतं, कथा हळू हळू पुढे जाते, इथे आवर्जून सांगावेसे वाटते कि कथा आपोआप पुढे जाते तिला जबरजस्तीने पुढे ढकलावे नाही लागत आणि अचानक कथेच्या पात्रांसोबत आपल्याही गळ्याभोवती एक अदृश्य फासाचा स्पर्श होऊ लागतो, आपण त्यात गुरफटून जातो, आणि ह्यावेळी आपण त्या पात्राचे काय होणार ह्याचे मनोरे आपल्या मनात बांधू लागतो, हा प्रयोग हमखास फसतो, कारण मतकरींच्या "स्पेशल ट्विस्ट" पुढे कुठल्यातरी वळणावर आपली लपून वाट पाहत असतोच, आणि आपण कथेत त्यांच्या पात्रांसोबत गाफील अस्ताला मोठ्या शिताफीने त्यात आपण अडकतो.
सगळ्या कथा वाचल्यावर कुठेतरी मला एक छुपा स्त्रीवाद दिसला - जाणवला, तो स्त्रीवाद प्रत्येकाला जाणवेलच असेही नाही. प्रेयसीसाठी आपल्या खेकड्याप्रमाणे वावरणारी पोलियो ग्रस्त मुलीला मारणे किती जिकीरचे आहे हे खेकडा कथेत जाणवते, इथे आपल्याला प्रेयसीची चीड येते कारण आपण इथे आजाराला सहनशक्तीची कड ह्या भूमिकेतून पाहतो- ह्या कथेत प्रेयसी विरुद्ध मुलगी हे तुलनात्मक विश्लेषण फार वेगळे ठरते.
कुठल्यातरी मुलाला धरून भिकेला लावणे त्यातून त्याला अश्या जागी बसवणे जिथे एक म्हातारी धड मरत पण नाही धड जगत पण नाही त्यातून एक अनामिक हुरहूर त्या मुलाच्या मनात चाललेली, म्हातारी जगली पाहिजे कारण ती जगली तरच भिकेत पैसे जास्त मिळतील हा उद्देश्य, आणि मरताना म्हातारी एकदा डोळे उघडहून त्या मुलाकडे बघते आणि "कुणास्तव कुणीतरी" कथा इथे जिवंत होते.
आपल्या प्रेयसीच्या मरणानंतर तिच्या नवऱ्याच्या मनात मेलेल्या बायको विरुद्ध विष पेरणारा प्रियकर आणि मित्र ह्यात समाजातली विकृत माणसे कसे असतील हे "अंतराय" कथेत मांडले आहे, ही संपूर्ण कथा "पत्र फॉरमॅट" मध्ये पुढे सरकत जाते.
मला आवडलेली आणि अतिशय अंगावर येणारी कथा म्हणजे "कळकीचे बाळ" , बाळ नसणारी आईला ज्या वेळी बाळ होतं आणि अतिशय विकृत - बेढंगी बाळ निपजते, आणि नंतर तेच बाळ त्याच आईला मृत्यूच्या काळात कसे गडप करते ही कथा आपल्याला खिळवून तर ठेवतेच पण त्याच सोबत कथेचा वस्तुपाठ कसा असावा ह्याकडे मी आपले लक्ष निर्देशित करते.
इतिहासात एक जुन्या राजवटीत डोकावणारी "पावसातील पाहुणा" कथा अप्रतिम आहे.
टेलीपॅथी ह्या एका शास्त्राच्या आधारे "शाळेचा रस्ता" कथा खुलत जाते.
माणूस खून का करतो पासून सुरु झालेली "ती, मी आणि तो" अत्यंत छोटी कथा रंजकरित्या फुलात जाते.
लहानपणी मुलं सगळ्यात जास्त रमतात ते त्यांच्या बाहुली - गाडी यासम खेळण्यात, मुलांसोबत जसे आपण वागू तसे ते त्या खेळण्यांसोबत वागतात, बालमानास शास्त्र किती महत्वाचे आहे हे ह्या "निमाची निमा" ह्या कथेतून अधोरेखित होतं जाते, एक वेगळा प्लॉट असलेली आणि वेगळी उंची गाठलेली ही कथा.
अपंग मुलीच्या वैरण आयुष्यात उदासीनता काठोकाठ भरलेली असताना त्या उदासीनतेचे जिव्हार आणि दंश तिच्या अभिनेत्री बहिणीला कमी करता येत नाही, समोर एक वेगळा आरसा असताना आपण किती सुंदर आहोत हे अपंग मुलीला जाणवते ती हळू हळू सुधारते आणि एकाएकी कोसळून पडते त्यावेळी जाणवते कि आरसा दुभंगला आहे.
जुन्या विक्रम वेताळाच्या कथेप्रमाणे आल्बम ही कथा आहे, एकाच घरातले माणसे भराभर अपॉईनमेंट असल्या सारखी मरू लागली.
शेवटी साधारण आयुष्य चाल-ढकल करणाऱ्यांच्या आयुष्यात खुनांची आणि गुन्ह्यांची मालिका रचली जावी, इतकी क्रूर थट्टा आयुष्याने का करवून घ्यावी...शेवटी काय "तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली एक शक्यता सांगितलेली एवढेच".
एक अतिशय सुंदर असा मेहता पब्लिकेशन ने काढलेला सिद्धहस्त असलेले लेखक रत्नाकर मतकरी यांचा "खेकडा" कथासंग्रह आवर्जून वाचावा.
मृणाल जोशी
२७.०३.२०२०
- Smita Joglekar
माणसाचे मन हे अनाकलनीय ,अथांग आहे .माणूस कितीही वाईट किंवा चुकीचा वागला तरीही त्याची सदसद विवेकबुद्धी त्याला त्याची जाणीव करून देत असते,मतकरींच्या कथांमध्ये हे दिसून येते
- Shailesh Adivarekar
हे छान पुस्तकं आहे. रत्नाकर मतकरी प्रामुख्याने गूढकथा लिहितात, त्यात कधी कधी भयाचा स्पर्श होऊन जातो हे अगदी खरे आहे पण भयकथा आणि गूढकथा यात बराच फरक आहे. मतकरींनी तो अंतर्बाह्य या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत दिला आहे.
- Pinesh Jadhav
भयकथा किंवा गूढकथा यांच्या वाट्याला मी सहसा कधी गेलोच नाही. एव्हढेच नाही तर, रात्री उशिरा दूरचित्रवाणी वरच्या अशा मालिकाही मी कधी बघितल्या नाही.पण इथेच(फेसबुक) काही समूहामध्ये अश्या कथां, भयपटाबद्दल माहिती वाचली.आणि माझ्या लक्षात आले की गूढकथा लिहिणे किंवा असे चित्रपट तयार करणे हे कोणाचेही काम नाही! साहित्यात नऊ रसांचा अंतर्भाव असतो, हे आपण सर्वजण जाणतोच, आणि त्यात `भयानक` हाही एक रस आहे.त्यात भीतीदायक निर्मिती असते.....मुळात चित्रपटात आपण मान्य करू शकतो की ,तिथे तंत्रज्ञानाचा वापर करून तशी वातावरणनिर्मिती आपण करू शकतो.पण पुस्तकाचे काय? फक्त शब्दांतून गूढ किंवा भयाची भावना लेखक कशी काय निर्माण करू शकतो? असा विचार मी करू लागलो. आणि याचा अनुभव घेण्यासाठी म्हणा किंवा अभ्यास करण्यासाठी म्हणा मी असे पुस्तक वाचायचे ठरवले! आणि मग शोध सुरू झाला मराठीत गूढकथा/भयकथा लिहिणाऱ्या लेखकांचा. त्यात श्री.नारायण धारप आणि श्री. रत्नाकर मतकरी यांच्या नावाला चांगलेच वलय आहे. तर..रत्नाकर मतकरी हे फक्त याच प्रकारचे लेखन करतात असे मुळीच नाही. नाटकांचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन, संगीत अश्या सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमठवला आहे.त्यांनीच लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून` खेकडा` हा कथासंग्रह मी वाचण्यासाठी घेतला!
या कथासंग्रहात एकूण 11 गूढकथा आहेत.ह्या सर्व कथा याअगोदरच हंस या मासिकातून प्रकाशित झालेल्या आहेत.खेकडा, कुणास्तव कुणीतरी, अंतराय,कळकीचे बाळ, पावसातला पाहुणा, शाळेचा रस्ता, ती मी आणि तो, निमाची निमा, एक विलक्षण आरसा, आल्बम, तुमची गोष्ट अशी कथांची नावे आहेत.
यातील खेकडा ही कथा बरीच प्रसिद्ध आहे. खेकड्याचा यांत रुपकासारखा उपयोग केला आहे.माणसाचे मन हेच एक गूढ आहे. ते कोणत्या प्रसंगी काय विचार करेल कोणीही सांगू शकत नाही.स्वच्छंदी, आनंदी आयुष्याची व्याख्या काय करता येईल?
कुणास्तव कुणीतरी या कथेमध्ये रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांचे विदीर्ण वास्तव, त्यांचे मनोविश्व, रेखाटले आहे.
अंतराय या कथेत दोन मित्रांची गोष्ट सांगितली आहे.संशयाचा फास असा काही यात ओवला आहे की आपण त्या गूढ वातावरणात हरवून जातो.
कळकीचे बाळ ही कथा वाचताना `मन गलबलून जाणे` या वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ मनात रिंगा घालतो.
पावसातला पाहुणा-रोमांचक शेवट कसा असू शकतो! हे पहायचे असेल तर ही कथा वाचायला हवी.
शाळेचा रस्ता या कथेत एका शाळकरी मुलीची कथा सांगितली आहे. ह्या कथेचा प्रभाव अनेक दिवस आपल्यावर राहतो.यातच सर्वकाही आले.
ती, मी आणि तो गूढ आणि रोमांचक अशी ही कथा खून करणारा आणि पोलीस यांच्यातील पाठशिवणीचा खेळ आहे. आणि शेवट आश्चर्यचकित करणारा.
निमाची निमा -एका लहान मुलीची ही कथा मनाचा ठाव घेणारी आहे.
एक विलक्षण आरसा या कथेत दोन बहिणींच्या स्वभावामुळे, आणि जोडीला आरसा घेऊन गूढ तयार केले आहे.
आल्बम - घरातील माणसांच्या एकापाठोपाठ हत्या, आल्बमचा संबंध याद्वारे गुढनिर्मिती केली आहे.
तुमची गोष्ट-ही कथा जशी काय तुमच्याबरोबर घडते आहे, अशी वर्णिली आहे! थरारक असे वर्णन यात केले आहे. आणि नकळत आपण स्वतःला अपराधी समजायला लागतो, आणि हेच त्या कथेचं श्रेष्ठत्व ठरते.
वरील सर्व कथा या भय/गूढ आहेत. तरी सुद्धा कथेबद्दल मी जे काही एक दोन वाक्य लिहिली आहेत, त्यावरूनच आपल्या लक्षात येते की त्या वास्तवतेला धरून आहेत. लेखक त्यामधूनही आपल्याला काहीतरी सांगू इच्छितो.आणि म्हणूनच या कथा (गूढ तयार करण्यासाठी काहीतरीच सांगितल्याने)बीभत्स न ठरता वास्तववादी गूढ कथा ठरतात!आणि म्हणूनच या कथांचा परिणाम दीर्घकाळ आपल्या मनावर राहतो. भय ही भावना तुम्हाला अनुभवायची असेल, आणि अवघे मनोव्यापार झपाटून टाकणारे असे काही वाचायचे असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे!!!
- Pramod Dhamangaonkar
Khup vegvan.pustak ahe
- neha Puranik
Chan ahe book
- Hasim Nagaral
छान आहे पुस्तक
- दर्शना चाफेकर
खेकडा` या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे. या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो, कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत.
- DAINIK LOKMAT 17-07-2005
मतकरी शैलीतून खास गूढकथा…
गूढ आणि भयकथाकार रत्नाकर मतकरी यांचा ‘खेकडा’ हा कथासंग्रह नवा मुखवटा घालून आला आहे. यातील सर्व कथांना ‘हंस’ मासिकातून पूर्वप्रसिद्धी मिळालेली आहे.
‘खेकडा’ या पहिल्याच कथेत प्रेयसीबरोबर लग्न करण्यात अडथळा ठरलेल्या, नकोशा झालेल्या लुळ्या-पांगळ्या मुलाचा बळी स्वत: बापच घेतो. वाचकाला अस्वस्थ करणारी ही कथा नंतर प्रेयसीच्या होणाऱ्या मृत्यूने पुन्हा धक्का देते. रोगग्रस्त, मरणासन्न, बेवारस स्त्रीला तिच्या अंतसमयी सुखाचे काही क्षण मिळवून देण्यासाठी तिच्या रोगाचाच स्वीकार आनंदाने करणाऱ्या शामूची ‘कुणास्तव कुणीतरी’ ही वेगळीच कथा आहे. ‘अंतराय’ ही कथा माधवीचे जयंतवरील एकनिष्ट प्रेम आणि शशांकच्या मनातील सूडभावना स्पष्ट करते. उघडपणे काहीच सांगितले नसले, तरी माधवीचे मरणोत्तर अस्तित्व कथेच्या शेवटी जाणवतेच. ‘कळकीचे बाळ’ या कथेतील कळकीचे मूल राक्षसकुळातले निपजावे आणि त्याने तिचाच घ्यास घ्यावा, यापेक्षा अन्य दैवदुर्विलास कोणता? ‘पावसातला पाहुणा’ या कथेत दुसऱ्याची शक्ती शोषून घेऊन स्वत: पुन:पुन्हा तरुण होणाऱ्या, काळावर विजय मिळवणाऱ्या कालदमनाची कथा चिरतरुण बनलेल्या ययातीची आठवण करून देते. ‘शाळेचा रस्ता’ ही कथा शाळकरी मुलीची कथा. ‘न्यूमोनियाने वारली’ हे त्यातील अखेरचे वाक्य मनाला चटका लावून जाते. संपूर्ण कथेचे खरे अकलन या वाक्यानंतरच होते. ती, मी आणि तो’ ही कथा एका माथेफिरू खुनी माणसाची त्यानेच सांगितलेली कथा वाचकाचा तर्क, अंदाज खोटा ठरवते. मूलबाळ नसल्याने मेंदूवर परिणाम झालेल्या विकृत मनोवृत्तीच्या बायोने समंजस, सहनशील निमाचा केलेला छळवाद ‘निमाची निमा’ या कथेत वाचकाला थरारून सोडतो.
कुरुप पांगळी, पण स्वच्छ सुंदर अंत:करणाची माधुरी, तर संकुचित मनाची, मत्सरी रूपगर्विता मोहिनी अशी परस्पराविरोधी व्यक्तिमत्वे एक विलक्षण आरसा या कथेमध्ये वाचकाला पाहायला मिळतात.
‘आल्बम’मधून सरनाईकाचे नेहमीच भले चिंतणारी सई आणि त्याच घराण्याचा सर्वनाश करणारा अंता पुढे येतो अंतानं दिलेल्या आल्बमविषयी सईप्रमाणेच वाचकाच्या मनातही भीती दाटून येते.
‘तुमची गोष्ट’ या कथेच्या सुरुवातीलाच लेखक ‘ही तुमची, म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी’ असे सांगतो. अखेरीसही ‘ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली शक्यता सांगितली, एवढेच.’ असे स्पष्ट करतो. तरीही त्यातील थरारक अनुभव इतके प्रभावी आहेत, की त्या साऱ्या प्रकारातून आपण जात आहोत, असा भास होतो.
मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केले आहे. उमलत्या कळीला कुस्करू पाहणारा लालभडक खेकडा अज्ञात अंधकाराच्या पार्श्वभूमीवर दाखवून सर्व कथांतील भय, गूढता अधिकच दाट केली आहे. रत्नाकर मतकरी हे एक सिद्धहस्त कथाकार असल्याचा पुन:प्रत्यय देणाऱ्या या भीतिदायक गूढकथा मराठी भाषेत तरी दुर्मिळच आहेत.
-गौरी परचुरे
- DAINIK LOKSATTA 28-08-2005
झोंबणाऱ्या गूढ कथा…
मराठी साहित्यात कथाकार म्हणून ज्यांचा लौकिक आहे, असे रत्नाकार मतकरी त्यांच्या लिखाणाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यांची काही पुस्तके आजही आऊट ऑफ प्रिंट आहेत. वाचकांना वाचण्यास मिळत नाही, त्यासाठी मेहता प्रकाशनाने काही निवडक पुस्तकांच्या पुन्हा आवृत्त्या काढल्या आहेत. त्यापैकी ‘खेकडा’ हा कथासंग्रह!
केवळ घाबरण्यासाठी, धक्का देण्यासाठी गूढ कथा लिहू नये, त्यात अपरिहार्यता हवी. ते तेथे होते हे गूढ कथेच्या शेवटी सांगणे गरजेचे असते. या कथांमधून आयुष्याचे निरीक्षण बदलता कामा नये. अशाच गूढ कथा ‘खेकडा’ या कथासंग्रहात आहेत. वाचकाला कडकडून दंश करणाऱ्या आहेत. ‘कळकीचे बाळ’, ‘खेकडा’, ‘निमाची निमा’ व ‘आल्बम’ या कथांमधून भय दाटून राहिलेले आहे. या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो. एखादी कथा वाचण्यास घेतली तर त्या कथेचा शेवट काय होणार याची उत्सुकता लागते. अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची त्यात शक्ती आहे.
रत्नाकर मतकरी यांच्याकडून गूढ कथा सहज साकारल्या जातात. कुठेही तिरकसपणा नसतो. ‘शाळेचा रस्ता’ ही कथा अशीच साकारली आहे.
आपल्याला अपराधाचा स्पर्श करून जाणारी ‘तुमची गोष्ट’ ही कथा आपल्यासारख्या सामान्य माणसाबरोबर घडू शकते असे लेखक एकीकडे सांगतो आणि शेवटीही निक्षून सांगतो. ‘तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली शक्यता सांगितलेली एवढेच. पण तरीही या कथेच्या ज्या थरारक अनुभवांचे निवेदन झाले. त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की, आपल्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना होते.
-सौ. वैजयंती कुलकर्णी