Pranav Patwardhanवॉर्सा ते हिरोशिमा
लेखक- वि. स. वाळिंबे
पृष्ठ- ६२६
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत- ₹४००/-
मानवाच्या इतिहासात अनेक घटना अजरामर आहेत. त्या प्रत्येक घटनेचे मोठे पडसाद काळावर उमटलेले दिसतात. फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकेचं स्वातंत्र्ययुध्द इ. घटनांनी नवीन मुल्यांची भर माणसाचा सामाजिक संस्कृतीत घातली. या घटनांची दखल आजही घेतली जाते. पहिले आणि दुसरे महायुध्द हे याच शृंखलेतील. दोन्ही महायुध्दांनी अवघ्या दोन दशकांच्या अंतरात संपूर्ण मानवजातीला जबरदस्त धक्के दिले. प्रचंड उलथापालथ आपल्या सर्वच अंगांवर घडून आली. साहित्य, ललित कला आदींपासून ते अगदी खाद्य संस्कृतीपर्यंत सर्वच क्षेत्रात फार मोठे बदल युध्दांनी घडवले.
१ सप्टेंबर १९३९ या दिवशी आपल्या पाशवी आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जर्मन फौजा पोलंडमध्ये घुसल्या, त्यानंतर ३ सप्टेंबर १९३९ रोजी इंग्लंड आणि फ्रान्स हे दोन्ही देश हिटलरच्या अमानुष इच्छेला आवर घालायला उभे ठाकले, आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या जागतिक युद्धाला सुरूवात झाली. तिथून पुढचे २१६३ चाललेल्या युध्दात कित्येकांचा बळी गेला, विनाशाचं अभूतपूर्व तांडव जगाने पाहिलं. चर्चिल पार्लमेंटमध्ये म्हणाले होते त्याप्रमाणे खरोखरच हे युध्द सागर, आकाश आणि जमीन तिनही ठिकाणी लढलं गेल्यानंतर, २ सप्टेंबर १९४५ रोजी टोकियो उपसागरातल्या मिसूरी युध्दनौकेवर जपानी नेत्यांनी शरणागतीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर युध्दाची समाप्ती झाली.
मानवाच्या इतिहासावर अतिशय खोल, गंभीर परिणाम घडवणाऱ्या या घटनेचा अभ्यास आवश्यक आहे. कदाचित, स्वतः युध्दातल्या प्रमुख देशांपैकी एक असल्याने, इंग्रजीत याबाबत विपुल साहित्या उपलब्ध आहे. संपूर्ण तटस्थवृत्तीने वि.स. वाळिंबे यांनी लिहीलेलं हे पुस्तक या दृष्टीने अतिशय उपयोगी आहे. दुसऱ्या महायुध्दाच्या दोन्ही पक्षांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा स्वतंत्र दृष्टिकोन असतो. असा कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, उपलब्ध साधनांच्या आधारे, वाळिंबे यांचे लिखाण म्हणजे युध्दाचा साद्यंत वृत्तांत आहे. वृत्तांत म्हटलं, तरी ते कुठेही निरस होत नाही, आणि निरस होत नाही म्हटलं तरी कुठेही उथळही होत नाही. युध्दाच्या सुरूवातीची कारणे, त्यातल्या प्रत्येकाचं स्थानारुढ होत जाणं, हे एकएक करून घडत जाताना आपल्या लक्षात येतं. एकाच वेळी बर्लिन, पॅरिस, लंडन, वॉशिंग्टन आदी ठिकाणी घडणाऱ्या घटना, त्यांचा एकमेकांवर पडत असलेला प्रभाव आपल्या लक्षात जातो. युध्दाच्या सुरूवातीच्या धामधुमीचा काळ- ज्यात अनेक घटना एकत्र घडतात, त्याही वाळिंबे उत्तमपणे उलगडून सांगतात. ‘युध्दस्य कथा रम्याः’ म्हणतात, परंतू वाळिंबे यांचं लिखाण त्यात कोरडेपणाही येऊ देत नाही, की भावनेच्या भरात वाहून जात नाही.
वाळिंबे यांच्या पुस्तकाची सगळ्यात चांगली बाब म्हणजे, पुस्तकात युद्धोत्तर जगाबद्दल चालू असलेले विचारविमर्श सुंदर पद्धतीने मांडले आहेत. चर्चिल, रुझवेल्ट, स्टॅलिन या तिन नेत्यांच्या विविध बैठका, त्यांचे आपापासातले वैयक्तिक संबंध याबद्दलही लिहीले आहे. त्यामुळे आधुनिक अथवा युद्धोत्तर जगाबाबत तिनही नेत्यांचे दृष्टीकोन, त्यांचं राजकारण, आपल्या देशाला असणारं स्थान हे आपल्या ध्यानात येतं. सध्याच्या काळातले बहुसंख्य लोक हे युद्धोत्तर जगात जन्माला आलेले, त्यामुळे युद्धाची भीषणता न जाणणारे. त्याचप्रमाणे युद्धोत्तर जगाची घडणही माहित नसलेले. त्या सर्व वाचकांसाठी हे उपयुक्त ठरते. मूळ युद्धइतकेच, आधुनिक जगावर अतिशय दूरगामी परिणाम करणारे निर्णय बड्या तिन देशांनी तेव्हा घेतले. पुस्तकात त्या चर्चांचा साद्यंत उल्लेख येतो, मात्र कुठेही त्यावरचं विवेचन येत नाही.
पुस्तकाचं अजून एक सौंदर्य म्हणजे, एकाच वेळी विविध ठिकाणी घडणाऱ्या घटना त्याच क्रमाने येत राहतात. म्हणजे, युरोपमधील युद्ध एका ठराविक वर्षातल्या विशिष्ट वळणावर आलं, की आशियातल्या जपानी आक्रमणाबद्दल त्याच वर्षातल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेपर्यंत वाळिंबे आणतात. त्यामुळे युद्धाचा पट आपल्यासमोर सहजतेने, विस्तृतपणे उभा राहतो. युद्धातल्या विविध लढायांचं वर्णन कराताना, त्यांचं सामरिक महत्त्वदेखील आपल्याला ते जाणवून देतात.
दुसऱ्या महायुध्दाचा इतिहास लिहीताना, त्यातही विशेषतः हिटलरसारख्या खलनायकाचा समावेश असताना, फार काळजीपूर्वक लिहावा लागतो. हिटलरबद्दलचा द्वेष अथवा ममत्व टाळून वस्तुनिष्ठ पद्धतीने लिखाण करणं आवश्यक आहे. ते न झाल्यास पुस्तक एकांगी होईल. संपूर्ण द्वितीय युद्धात असंख्य घडामोडी विविध ठिकाणी एकाच वेळेस घडत राहिल्या. त्या सर्वांचा वस्तुनिष्ठ तरीही आकर्षक असा परामर्श घेणे अवघड आहे. मात्र वि.स.वाळिंबे यांच्यासारख्या कसलेल्या लेखकांनी ते सहजतेने हाताळले आहे. दुसऱ्या महायुद्धाबद्दल कुतूहल असल्यास वाचनास अतिशय उपयुक्त असे पुस्तक आहे.