- Vijay Patil
`टारफुला`
......आज ग्रामीण कथालेखक शंकर पाटील यांचं `टार फुला `पुस्तक वाचण्यात आलं.या पुस्तकात स्वातंत्र्य पूर्वीच्या व काही स्वातंत्र्य उत्तर काळात महाराष्ट्रात असलेल्या खेडे गावाची परिस्थिती वर्णन आपल्याला दिसून येते.यात वर्णन केलेल्या खेड हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील आहे.
सुरुवातीला या गावात सुभानराव पाटील या नावाच्या गाव पाटलांचा खूप वचक असतो आणि त्याच्याच वचकांमुळेच गावात चोरीमारी खून दरोडा या गोष्टी कमी होत असतात आणि गाव व्यवस्थित नांदत असतं...पण त्याच्या अचानक मृत्यू गावात कसं गावगुंडांचा हैदोस वाढतो.म्हणतात ना.... वाघाच्या मेल्यानंतर, कोल्ही सुद्धा वाघ बनतात... गावात कुणाचा कुणाला पायपूस राहत नाही आणि गावात अराजक माजत...याच काळात पाटील मेल्यामुळे पाटलीन ही एकाकी होते.पाटलाला मूल नसल्यामुळे कुणाचा मूल पाटलांना दत्तक जाणार यासाठी गावात दोन तट पडलेले असतात एका बाजूला केरू नाना दुसऱ्या बाजूला, देसायांचा गट असतो.. पाटलांचे जुने सहकारी गाव वतन दार कुलकर्णी यांना मात्र यातून काहीच निर्णय घेता येत नसतो तो जरी वतनदार माणूस जरी असला तरी त्यांच्या कडे काहीसे करण्याची काही धमक नसते व गाव गुंडांना सामोरे जाण्याची ताकद त्यांच्यात नसते, त्यांच्या पाठीमागे उभा होणारा तसा कोणताच माणूस नसतो...पाटलीन बाई घाबरून गाव सोडून जातात आणि आपल्या भावाच्या मुलाला दत्तक विधान करण्यासाठी कोल्हापूरातच रहतात. या दरम्यानच्या काळात गावातील गुंडांना वाटते की कुलकर्णी यांनी पाटलीणबाई ना सल्ला दिला आणि भावाच्या मुलाला दत्तक घ्यायला लावलं.त्यामुळे त्यांचाही खून होतो गावात परत एकदा आणखी अराजक माजते...आणि याच दरम्यान गावातील लोक पाटलांची शेती बळकावतात काही शेती केरू ना ना काही देसाई यांचा
पण नंतर गावात बदली पाटील येतात, बदली पाटील परशुराम आणि त्याची तीन भावंडं त्याचा सगळा लवाजमा आल्यानंतर गावातील पूर्ण परिस्थिती बदलून जाते त्यांनी गावावर एकछत्री अंमल करायला सुरुवात करतात आणि गावातील सर्व गावगुंडांना सगळ्यांनाच धडा शिकवतात पण त्याच बरोबर त्यांची नियत काही साफ नसते, गावातल्या गरिबांना कसे नाड तात, वेळोवेळी पोलिसांचा वापर करून कसे ते गावातील लोकांना अडकून आपला गावावर कसा हक्क राहील वर्चस्व राहील याचा प्रयत्न सुरू होतात. यानंतर गावात गट पडल्यामुळे, गरिबांना कोणीच वाली राहत नाही पण एक वेळ अशी येते की ते परशुराम पाटील यांना सुद्धा त्यांच्या तालमीत तयार झालेला हिंदुराव आव्हान देतो आणि परशुरामना सुद्धा असे दिसून येते की शेरास सव्वाशेर हा कोणी तरी असतो
एकंदरीत काय या गावगाड्यात चालणारी उलाढाल आणि गावाकडचे तिरक व बेरकी राजकारण शंकर पाटील यांनी अतिशय उत्कृष्टपणे मांडले आहे.खोबरं तिकडं चांगभलं म्हणणारी म्हादू कोळी सारखी मंडळी व गादीची इमानाने चाकरी करणारी महादू तराळ सारखी माणसं ही गावात भेटतात....म्हणजेच गावातील राजकारण हे कोणत्या पद्धतीने खेळलं जातं,गावातील मंडळी कशी एकमेकाची जिरवा जिरवी करण्यासाठी, कुठल्या थराला जातात आणि या गावातला मोठ्या मंडळी च्या नादात जी गावातील लहान मंडळी किंवा सरळ मंडळी असतात त्यांचा कसा बळी दिला जातो हे अतिशय वेधक पणे मांडले आहे
गावात होणारे सण, समारंभ जत्रा याचाही त्यांनी अचूक वर्णन केलेले आणि यामुळे गावातील मातीचा गंध आपल्याला आल्यावाचून राहत नाही.
..... विजय पाटील
- Deepak Thankre
`लिंब इजंला धार्जिणा असतो` या वाक्याने एकेकाळी मनावर गारूड केलेलं. साहित्य आणि साहित्यप्रकारांतलं फारसं काही कळत नसण्याच्या काळात अभ्यासाच्या पुस्तकांत कथा कादंबर्यांची पुस्तकं ठेऊन गुपचूप वाचायचो, शिवाय आधीच्या इयत्तेत असताना थेट बारावीपर्यंतची मराठीची पुस्तकं आसुसल्यागत वाचायचो, तेव्हा. पुढे हे वाक्य `संदर्भासहित स्पष्टीकरण द्या`मध्ये प्रश्नस्वरूपात आलं तेव्हाही परीक्षकांना कंटाळा येईस्तोवर त्यावर लिहिलं जायचं. आता अभ्यासक्रम संपला, आणि परीक्षाही. पण शंकर पाटलांच्या लक्षात राहून गेलेल्या अनेक वाक्या-वाक्प्रचारा-शब्दप्रयोगांसारखंच हे चार शब्दांचं वाक्य जे मनात कोरलं गेलं, ते कायमचं. आजही कुठं खेड्यात गावात गेलो, की तुफान वळवाच्या पावसात बायकोने धाडलेल्या अंगठीकडे `म्हऊ घातल्यागत` बघणारा म्हातारा तात्या कुठे दिसतो का, ते बघण्यासाठी नजर भिरभिरते.
परवा `वळीव` हातात पडल्यावर झपाटल्यागत पुन्हा वाचून काढली. मग ठरवलं, `टारफुला` पुन्हा एकदा वाचायचं. न कळत्या वयात ते वाचलं होतं, तेव्हा त्यातली `कथा` फक्त कळली होती. भाषेचं सौंदर्य, ग्रामीण संस्कृतीतल्या अनेक गोष्टी-संदर्भ, पाटलांचे अनवट शब्दप्रयोग, मंत्रवून टाकणारी वाक्यरचना आणि गोळीबंद लिखाणाची शैली बहुधा कळायची राहूनच गेली होती.
सिद्धहस्त कथालेखक म्हणून नाव कमावलेल्या शंकर पाटलांची `टारफुला` ही पहिली कादंबरी. २००७ साली निघालेल्या तिसर्या आवृत्तीच्या निमित्ताने या पुस्तकाला नागनाथ कोत्तापल्लेंची सुंदर प्रस्तावना लाभली आहे. १९६४ साली प्रसिद्ध झालेली ही कादंबरी शंकर पाटलांना का लिहावीशी वाटली आणि ती साठच्या दशकातल्या व त्यापुर्वीच्या मराठी कादंबर्यांत कशी वेगळी ठरते याचं सुंदर विवेचन कोत्तापल्लेंनी केलं आहे.
***
एका गावातल्या `पाटीलकी`भोवती फिरणार्या या कथेला रूढार्थाने कुठचाही नायक नाही. तीन भागांत विभागलेल्या या कादंबरीत `हा` नायक आहे, असं वाटेस्तोवर चक्रं फिरतात आणि बदलत्या घडामोडींसोबत नवीन नायक, नवीन प्रसंग आणि नवीन संदर्भ येतात. हा खेळ शेवटपर्यंत चालू राहतो, आणि गावातल्या सत्ताकारणाचा घोडा यापुढेही कुठच्या नायकाला जास्त काळ स्वार होऊ देणार नाही हे आपल्याला कळतं.
गावावर आणि `पाटीलकी`वर वर्षानुवर्षे भक्कम मांड ठोकून बसलेले सुभानराव पाटील अचानक मरण पावतात- इथं `टारफुला` सुरू होतं. गाव हवालदिल होतं. पाटलीणबाई नशिबाला शरण जाऊन गाव सोडून माहेरचा आसरा घेतात आणि पाटलांच्या जरबी आणि हिकमती कारभारात अनेक वर्षे `कुलकर्ण` सांभाळणारे आबा कुलकर्णी एकटे पडतात. पाटलांची भक्कम छत्रछाया आपलं कुलकर्ण बिनधोकपणे चालत राहण्यासाठी किती आवश्यक होती याची जाणीव त्यांना होते. पाटलांच्या काळात `रामराज्य` भासणार्या गावाच्या पोटात किती मळमळ लपून होती हे कळतं. जरब आणि हुकुमत स्वभावात नसलेले कुलकर्णी पाटलांच्या मृत्युनंतर गावात उद्भवलेली सुंदोपसुंदी असहाय नजरेने बघत राहतात. गाव पंखाखाली घेण्याचा कुलकर्ण्यात दम नाही हे ओळखलेले बंडखोर गावातल्या कारवायांना अक्षरशः ऊत आणतात. पाटील-कुलकर्ण्यांकडे आजवर डोळा वर करून बघू न शकणारे राजरोस सोटे-काठ्या घेऊन गावात फिरू लागतात, इतकंच काय, पण कुलकर्ण्यांना दमही देऊ लागतात. या सार्या कारवायांचं मुख्य कारण अर्थातच- पाटीलकी. माहेरी जाऊन बसलेल्या पाटलीणबाई भावाचा मुलगा दत्तक घेणार- या बातमीसरशी पाटलांचे भाऊबंद आणि विरोधक समांतर पाटीलकी सुरू करतात, आणि यातच दोन्ही दरडींवर पाय ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू बघणार्या आबा कुलकर्ण्यांचा खून होतो.
कुलकर्ण्यांचा शेवटचा अडसर निघाल्यानंतर गावात बेबंदशाही माजते. पाटलांची शेतं परस्पर बळकावून नांगरली जातात. जमिनीच्या खुणांचे दगड रातोरात सरकतात. पाटलांच्या `शंभर आखणी चिरेबंद` वाड्यात भूत असल्याची आवई उठवली जाते, आणि सत्तेचं प्रतीक असलेल्या ज्या वाड्याने मानमरातब, न्यायनिवाडे, सनद्यांचे जोहार आणि खानदानी ऐश्वर्य बघितलं होतं, त्या वाड्याच्या नशीबात स्वतःच्याच कोसळत चाललेल्या भिंती आणि अंधार बघणं येतं.
हे असं बरेच दिवस चालू राहिल्यानंतर एक दिवस अचानक गावात दीड पुरूष उंची असलेल्या अरबी घोड्यावर बसून विंचवाच्या नांगीसारख्या मिशीला पीळ देत बंदूकधारी मर्द गडी येतो आणि त्याच्या खास शैलीत एकेका सनद्याची हजेरी घ्यायला सुरू करतो, तेव्हा अवाक झालेल्या गावाला कळतं, हे दादा चव्हाण नावाचं वादळ म्हणजे `थोरल्या` महाराजांनी नियुक्त केलेला गावचा `नवीन पाटील`. सारं गाव येडबडून जागं होतं. कुणाला आनंद होतो, तर कुणाला दु:ख. कुणा मेल्या मढ्यात चैतन्य येतं, तर कुणाची भितीने पाचावर धारण बसते. सहज शरण न येणार्या बंडखोरांनाही त्यांच्याच पद्धतीने उत्तर मिळतं, आणि सारे दांडगट हळुहळू सरळ होतात. भलेभले शरण येतात. जुन्या पाटलांच्या दुसर्याच्या ताब्यात गेलेल्या पेरणी झालेल्या जनिमी सुद्धा परत दिल्या जातात. बांध आणि वाटणीच्या खुणेचे दगड पुर्ववत होतात. दादा पाटलांमुळे वाड्यातली भुतं पळतात. सनदी पुन्हा नेकीने काम करू लागतात. चावडीवर, वाड्यावर पुन्हा पहिल्यासारखा नित्यनेमाने `जोहार` होऊ लागतो. शंभर आखणी वाड्यातली सारी भुतं शंभर मैल दूर पळतात. वाडा आणि ढेलज पुन्हा समया, निरांजनं आणि मशालींनी उजळतो.
राऊनानांसारख्या जुन्या पाटलांच्या विश्वासातल्या बुजूर्गाला आणि स्वतःच्याच तीन तगड्या भावांना हाताशी धरून दादा पाटलांचा कारभार सुरू होतो. जुने सारे हिशेब मिटवले जातात. पाटलीणबाई वर्षाच्या उत्सवासाठी सन्मानाने वाड्यात येऊन पुन्हा समाधानाने माहेरी जातात. गाव सुटकेचा नि:श्वास सोडतं आणि दादा पाटलांचा एकछत्री अंमल सुरू होतो.
पण सत्ता आणि तारतम्य- हे दोघं नेहमीच एकत्र सुखाने नांदते, तर आणखी काय हवं होतं? सत्तेपाठोपाठ नशा आली की विवेकबुद्धी हरते. मुठीत आलेल्या सत्तेच्या आयाळीमुळे सारासार विचार, सम्यक विचार अडगळीत पडतो. एकछत्री अंमलाच्या कैफात गावचा पोशिंदा आणि जुलमी राज्यकर्ता यातल्या सीमारेषा दादा चव्हाण अस्पष्ट करत जातात. सत्तेसोबतच पैशाचीही हाव त्यांना सुटते. राऊनानांच्या खुनाचं निमित्त होऊन असंतोष पुन्हा धुमसु लागतो. या असंतोषाचा फायदा घेत विरोधक पुन्हा सक्रिय होतात. जुनं शत्रुत्व विसरून ते दादा पाटलांच्या विरोधात गुप्त कारवाया सुरू करतात. भरीस भर म्हणून ज्या नव्या दमाच्या गड्यांच्या जोरावर दादांनी गावावर दहशत बसवलेली असते त्या तरूण फळी पर्यंतही हा असंतोष पोचतो. राजकारण आणि सत्ताकारण नेहमीच अगम्य आणि अविश्वसनीय अशी नवी समीकरणे जन्माला घालत असतं. तसं इथेही होतं आणि भल्याभल्यांना हादरवणारे दादा पाटील अस्वस्थ होऊन चुकीची पावलं उचलत राहतात.
अनेक नवीन शक्यता दाखवत, गावाला पुन्हा अस्थिरतेच्या गर्तेत ढकलत, अधांतरी अवस्थेत ही कथा संपते तेव्हा आपल्याला कळतं- ती संपलेली नाही. अशी कथा संपत नसते. सत्ताकारणाची ही भोवरी अशीच उडत राहणार आणि भल्याभल्यांना धूळ चाटवून पुन्हा नवा प्रवास करत राहणार..
***
शंकर पाटलांनी या साधारण तीनेकशे पानांच्या कादंबरीचे सरळसरळ तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात आबा कुलकर्णी; दुसर्या भागात दादा पाटील आणि तिसर्या भागात दाजीबा, केरूनाना, हिंदुराव असे ठळक नायक म्हणून समोर येतात. शेवटी राऊनाना, दाजीबा, केरूनाना, आबा कुलकर्णी यांच्या मुलांचं वागणं आणि बंड शेवटी अनेक नवीन शक्यता सुचित करून जातं. पिढ्या बदलतात, मात्र सत्तेचं चक्र अव्याहत फिरत राहत. या तीन स्वतंत्र दीर्घकथा किंवा लघुकादंबर्याही म्हणता येतील खरं तर. पण लेखकाने विणलेल्या गावाच्या अफाट आणि विस्मयजन्य पटापुढे या साहित्यप्रकाराला नक्की काय म्हणावं हा प्रश्न फारच गौण ठरतो. ग्रामीण जीवन जगलेले, अनुभवलेले शंकर पाटील ज्या पद्धतीने आणि बारकाईने तपशील आपल्यासमोर मांडत जातात ते आपल्याला थक्क करून सोडतं. गावातल्या रीतीभाती-पध्दती, विचार आचार, समाज आणि संस्कृती यांचा अख्खा पट आपल्यापुढे तर उभा राहतोच; पण एवढ्याशा गावातलं सत्ताकारण किती कल्पनेपलीकडलं आणि जीवघेणं असू शकतं याचीही कल्पना येते. यानिमिताने आपल्यासमोर शेकडो प्रकृतीच्या माणसांच्या वागण्याच्या, स्वभावांच्या, गुणदोषांच्या असंख्य पोतांचं नयनमनोहर चित्र आपल्यासमोर उभं राहतं.
***
`टारफुला` प्रसिद्ध होण्याच्या आधीही कादंबरीच्या कॅनव्हासवर हे असं माणसाच्या स्वभावाचे असंख्य पोत चितारणं हे मराठी कादंबरीला नवीन नव्हतंच. पण इथलं हे असं पोतांचं चित्र नुसतं चित्र राहत नाही. ती चित्रं हाडामांसाची माणसं बनून समोर येतात, इतकं ते वास्तव आहे. अत्यंत बारकाईने तपशील देत लेखक ही सारी पात्रं चितारत राहतो. ज्याने गावातलं खेड्यातलं आयुष्य थोडंफार का होईना अनुभवलं आहे, त्याला हे सारे कल्पनेचे घोडे नाहीत हे लगेच कळतं. असं वास्तव चितारणं हे मात्र मराठी कादंबरीला मात्र फारसं परिचयाचं नव्हतं. कल्पनाशक्तीला जास्त न ताणणं हा लेखकातला दोष मानला जात होता. `बनगरवाडी`, `धग` सारख्या फारच थोड्या कलाकृती वास्तवतेची कास धरून, विस्तवाचा चटका बनून वाचकांच्यासमोर आल्या होत्या. परदेशी साहित्याची नक्कल करत इथल्या संस्कृतीशी-मातीशी अजिबातच नाळ नसलेल्या भावबंबाळ-शब्दबंबाळ शहरी कथा-कादंबर्या लिहिण्याची चढाओढ जिकडेतिकडे दिसून येत होती. एकतर झाडाखाली प्रेम करणारे टेनिस खेळणारे नायक नायिका, गुलाबी प्रेमपत्रं लिहिणारे आणि पाश्चात्य पद्धतीचे प्रेमभंग करवून घेऊन इगो कुरवाळणारे नायक नायिका; किंवा मग इथल्या फाटक्या देशी पद्धतीच्या जगण्याला न परवडणारे खोटे आणि कधीही वास्तवात न येणारे ध्येयवाद बाळगणारी त्यागी आणि `सो आयडियल टू बी ट्र` अशी पात्रे- अशी जिकडेतिकडे रेलचेल होती. `कोसला`सारखा धक्कादायक आणि नवीन प्रयोग आलेला असला, तरी अजून तो अजून पचायचा होता. बर्यापैकी दुर्लक्षित होता, आणि त्याचा गवगवा अजून व्हायचा होता. ज्या काळात `टारफुला` आली, त्या काळचं हे फारसं सुखद नसणारं वास्तव बघितलं, तर मराठी कादंबरीच्या प्रवासातलं तिचं स्थान थोडंफार लक्षात येईल.
`टारफुला` म्हणजे पिकामध्ये बेगुमान वाढणारं तण. नको असलेलं, मूळ पिकावर वाईट परिणाम करणारं, आणि जे नष्ट करण्यासाठी शेतकर्याला जीवाचं रान करावं लागतं, असं तण. एकदा नष्ट झालं म्हणजे झालं, असं म्हणून चालत नाही. ते पुन्हा येतंच. आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न अव्याहत चालूच राहतो. एकदा नष्ट करण्यातच ते पुन्हा उगवण्याची बीजं जमिनीत लपतात. वेळ येताच पुन्हा ते उगवतं, फोफावतं. पिकाला आणि शेतकर्याला आव्हान देतं. सत्ताकारण हे असंच चक्र ते अव्याहत चालूच राहतं. सत्ताकारणातले नायक बदलतात. पण सत्ताकारणाचा संघर्ष तोच राहतो. माणसाच्या शेकडो प्रवृत्ती शेवटी फक्त सत्ताधारी आणि विरोधक या दोनच जातींत शेवटी विभागल्या जातात. इकडचे भिडू तिकडे कधी होतात, हे त्यांनाही समजत नाही. ही सत्ताकारणाची जादू. हे तण आजही निरनिराळ्या रुपांत जिवंत दिसतं, मारलं तरी पुन्हा फोफावतं. `टारफुला`तलं सत्ताकारण आज साडेचार दशकांनंतरही जिवंत वाटतं, हे या कथेचं यश. त्या दृष्टीने `टारफुला` कालातीत आहे, असं वाटतं.
- D.Nitin
`टारफुला` एका मित्राच्या आग्रहाखातर वाचायला घेतल होतं..तेव्हा ८ वीत होतो..त्यानी लय तारिफ केली होती..पण
पुस्तकाच्या पहिल्या काही पानात सुबानराव पाटील मेल्यानी गावावर मरण कळा आली होती..त्यात.बुळगा कुलकर्णी गाव कारभार चालवत होता..100 पान वाचली नी पुस्तक मित्राला परत करायच ठरवल..ईतक बोरींग पुस्तक असतय का रे?? अस म्हटल्यावर त्यानी विचारल तु फक्त १००-एक पान वाचलीत..कहानीत अजुन बदली पाटील यायचाय..तिथुन खरा मुड होतो
..मी परत वाचायवा सुरुवात केली.. आणि काही वेळात कहानीतला सुरुवातीला हिरो वाटणारा आणि नंतर व्हिलन होणारा दादा पाटील !
तो आल्यापासुन संवाद आणि स्टोरीमधी वेगळंच चैतन्य आलं..
"परसराम देखत का हो ? लगाव बत्ती.हाण मुस्काटीत एकेकाच्या!"
"तेरा नाम क्या है"
"जी सुलेमान हुजुर!"
"तु सुलेमान तो वह क्या मुसलमान है क्या ?"
हे दादा पाटलाचै डायलॉग जाम आवडले होते..
शेवटपर्यंत दादा पाटील कहानीत वर्चस्व गाजवतो..तो आल्यापासुन पुस्तक ठेवुच वाटत नाही..एकदम जबरी पात्र !
- GIRISH KHARABE - INSIDE MARATHI BOOKS
टारफुल म्हणजे शेतात, रानात उगवणारं अनावश्यक तण/गवत जे कितीदा जरी काढलं तरी जरासं खतपाणी मिळताच डोकं वर काढतं. त्याच्या नष्ट होण्याच्या प्रक्रियेतूनच त्याच्या नव्या अस्तित्वाची सुरवात होते असं म्हणतात ते याचमुळे. अशी कित्येक टारफुले आपणास समाजात जगत असताना, वावरत असताना पाहायला मिळतात आणि त्यातून जर प्रश्न राजकारणाचा, सत्ताचक्राचा असेल तर असं अनावश्यक तण सर्रास माजायला वेळ तरी किती लागतो. १९६४ साली लिहलेल्या आपल्या पहिल्यावहिल्या कादंबरीमधून शंकरराव पाटलांनी गावागावात पसरलेल्या या विषयाला आपल्या अस्सल गावरान भाषेत हात घातला. तत्कालीन पाटीलकी सारख्या हुद्द्यावर हे कथाचक्र फिरतं. राजकारणातील ईर्ष्या व त्यातून बदलत जाणाऱ्या मानवी स्वभावाचा प्रवास या कथेतून आपल्याला घडतो. तसं पाहता राजकारणासारख्या क्षेत्रात नायक हा केवळ काही काळापूरता स्थायी असतो, कारण सत्तेची चक्र बदलताच नायकही बदलतो. शंकररावांनी बहुदा याच निरीक्षणाच्या जोरावर कथेतला नायक कोणा एका पात्राला/व्यक्तीला केले नाही. कादंबरी वाचताना जो सुरवातीला नायक वाटतो तो पुढच्या क्षणी बदललेला पाहायला मिळतो आणि ही सगळी किमया शंकररावांच्या लिखाणाची आहे.
वर्षानुवर्षे पाटीलकी सांभाळणाऱ्या सुभानराव पाटलांच्या मृत्यूनंतर टारफुलास खऱ्या अर्थाने सुरवात होते. पाटलांचा कारभार सांभाळणाऱ्या कुलकरण्यांना त्यांच्या निधनानंतर गावगाडा सांभाळण्यात आलेल्या असमर्थतेचा फायदा गावातला बंडखोर गट उठवतो. पाटीलकी सोबत होणाऱ्या गावाच्या हेळसांडीमध्ये आबा कुलकरण्यांचा निर्घृण खून होतो. हे सगळं बेबंदपणे सुरू असताना अचानक एक दिवस गावात दादा चव्हाण नावाचं वादळ येऊन धडकत. थोरल्या महाराजांनी नेमलेल्या या नवीन पाटलामुळे गावगाडा सुरळीत चालू होतो. सनदी काम करू लागतात, चावडीवर नेमाने जोहार सुरू होऊन दादा पाटलांचा एकछत्री अंमल सुरू होतो. किंतु सत्ता कधी एकटी येत नाही त्यासोबत येणारी सत्तेची नशा, पैशांची लालसा माणसाला पोखरून टाकते. आपसूकच मग त्यातून विवेकबुद्दीचा लोप होत जातो आणि सुरवात होते माणसाच्या ऱ्हासाची! अशीच काहीशी अवस्था दादा चव्हाणांची झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते. सर्वस्वाचा ऱ्हास होत असताना, सत्ताचक्र बदलत जाऊन, उगम पावतो पुन्हा नवा नायक.
तीन अंकांमध्ये रंगणारी ही कथा अनेक रंगानी नटलेली आहे शंकररावांनी ते मुक्तपणे उधळले देखील आहेत. वाचक म्हणून आपल्याला गुरफटणाऱ्या अशा कथा कधीच संपत नाहीत, त्या सत्ताचक्रात अडकलेल्या मानवी वृत्तींमुळे अजरामर होतात. गावातली संस्कृती, तिथल्या रीती रिवाज आणि मानवी विचारांमधली विविधता यांचं सांगोपांग दर्शन कादंबरीतून घडतं. एका सध्या खेडेगावातील सत्ताकारण देखील किती भयंकर असू शकत याच वास्तव दर्शन शंकरराव आपणास घडवतात, पिढ्या बदलल्या तरी राजकारणाचा पोत बदलत नाही याची जाणीव देऊन जातात.
असं हे अनावश्यक असणार, समाजात खोलवर फोफावलेलं व वेळोवेळी आपली मान जमिनीतून वर काढणार तण काही क्षणात होत्याच नव्हतं करून जात. ते मरत नाही, मिटतही नाही कारण त्याच्या नाशातच त्याच बीज रोवलेले असतं. असं हे टारफुल सत्ताचक्रातही आढळतं, ते अव्याहत पणे पसरतं, त्याला ना आदी ना अंत! माणसांना मात्र ते सत्ताधारी व विरोधक या दोन गटांत सहज विभागून टाकतं अन त्यातून उद्भवत जातो राजकारणाचा रक्तरंजित डाव! टारफुला साहित्यकृतीच्या साडेचार दशकानंतरही ते तसंच आहे, जनमानसात फोफावत आपलं काम चोख बजावत आहे. शंकररावांनी ते शब्दातीत केलं तेच या कथेचं अन त्यांचं यश!
टारफुला नक्की वाचा, ते जीवनाचाच भाग आहे, इर्षेने पेटलेल्या समाजाचं वास्तव त्यात आहे, आज गरज आहे त्यातून धडा घेत या माजणाऱ्या टारफुलाला प्रत्येकवेळी थोपविण्याची अन माणूस म्हणून त्यावर विजय मिळविण्याची!
- Rajesh Rankhamb
1966मध्ये लहीलेलं पुस्तक 3 महिन्यात एकही पुस्तक वाचलं नाही शेवटी नेट पॅक बंद केला आणि 7,8 पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण सुरुवातीचे 1,2भाग वाचून बंद केले पण काल शंकर पाटलांचे पुस्तक मिळाले आणि एका दमात पुर्ण झाले वाचत असताना 1पान मनाला टोचून गेले आणि तोंडातुन आपसूकच व्हा... रे...पाटील.
तरी कसली भीती? मृत्यू काय दु:ख देणार? दु:ख देणारा तर जन्म आहे! ...जन्म दु:खाचा अंकु र । जन्म शोकाचा सागर । जन्म भयाचा डोंगर ।...हा जन्म, हा संसार, हे आयुष्य हेच चिंतेचा आगर आहे! यात कसला आलाय लोभ? कसलं सुख! सुखाचा िवसर म्हणजे हा जन्म! मोह या वाटेवरचा हा अडथळा... हे विश्व आहे! हा भोग आहे. हे विश्व मृत्यूणेच दूर होणार. हा भोग मृत्यूणेच टळणार! सर्व दु:खांचा नाश म्हणजे हा मृत्यू! आपल्या जन्माला लागलेली सगळी चिंता, काळजी, वेदना, यातना, नाना व्यधि आिण नाना उपाधी यांचा हा होम आहे! त्याला का भय? का भव्य आणि का काष्टी व्हव? कटकटीनं कटकटींनय भरलेल्या या संसाराचा कसला लोभ धरायचा? स्वतःच्या जीवाचा? म्हणून हे लोभाचं कमळ सोडवत नाही? अरे कसला हा जीव आिण कसला हा जन्म!...जन्म हा अति कुडाळ । नरक पतन ।...पाहतां शरीराचे मूळ । या ऐसे नाही अमंगळ । राजस्वलेचा जो िवटाळ ।त्या मध्ये जन्म यासी ।। अत्यन्त दोष ज्या वि िवटाळा । त्या िवटाळाचा िच पुतळा । तेथे नियम वितालपणाचा सोहळा । केवी घडे ।। राजस्वलेचा जो िवटाळ । त्याचा आळोन जाला गाळ । त्या गाळाचेच के वळ । शरीर हे ।।...आळोन जाला गाळ...गाळ... त्या गाळाचेच...! ...गाळ!.... .....
- DAINIK AIKYA 22-07-2007
खेड्यातील सत्ताचक्राचे आवर्तन...
टारफुला ही ग्रामीण कथा-पटकथाकार शंकर पाटील यांची एकुलती एक कादंबरी १९६४ मध्ये प्रसिद्धी झाली. तिचे लेखन १९६२-६३ मध्ये झालेले असावे. एक वर्षभर त्यांनी केवळ या कादंबरीच्या लेखनासाठी दिले. १९४७ पासून पाटील यांचे कथालेखन चालू होते. १९६२ मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने कादंबरीसारख्या लेखनप्रकल्पासाठी एक अभ्यासवृत्ती देऊ केली होती. पाटील यांनी पाठवलेली कादंबरीची रुपरेखा संबंधित समितीला आकर्षक वाटली आणि दरमहा मिळणाऱ्या विशिष्ट रकमेमुळे वर्षभर त्यांनी या कादंबरीच्या लेखनासाठी दिले. परीक्षक समितीचे अध्यक्ष अनंत काणेकर यांनी ‘टारफुला’ ही कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे त्यावेळी नमूद केले आहे.
या कादंबरीचे तीन भाग आहेत. त्यामुळे काही समीक्षकांनी तीन लघुकादंबऱ्यांचा संग्रह असेही तिचे स्वरूप जाणवल्याचे म्हटले आहे; तर काही जणांनी या तीन स्वतंत्र कथा आहेत असे म्हटले.
कोल्हापूरजवळच्या एका खेड्यातील सत्ताचक्राचे एक आवर्तन ही कादंबरी प्रकट करते.
कादंबरीच्या पहिल्या भागात गावचे सुभानराव पाटील अचानक मृत्यू पावतात. गावकऱ्यांवर आणि आजूबाजूला दरोडेखोरी करणाऱ्या चोर-दरोडखोरांच्या टोळ्यांवर त्यांचा चांगला वचक असतो. त्यामुळे खिंडीपलीकडे चोऱ्याचपाट्या होत असल्या तरी गावात कधी घडफोडी झालेली नसते किंवा रानातल्या पिकाला धक्का लागलेला नसतो. डोंगरावरचा फरारी माणूस या गावात कधी येत नसे; जर कधीमधी अगतिकपणे आलाच तर पाटील त्याची नड भागवत; त्याला खाऊपिऊ घालत. पोलिसापर्यंत तक्रार कधी जात नसे. सुभानराव पाटलांना हे गुन्हेगारही मान देत. मुजरा करीत. सुभानरावांना मुलबाळ नसते. दत्तक घेण्याचा त्यांचा विचार असतो. परंतु तो घेण्याआधीच त्यांना मरण येते. पाटलीणबाई हताश होतात. भाऊबंद आपलेच पोर दत्तक घ्यावे म्हणून डावपेच खेळत राहतात. गायकवाड आणि केरुनाना पवार हे पिढीजात वैरी-पाटीलकी मिळवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करू पाहतात. ‘गायकवाड घराण्यातलाच दत्तक आला पायजे, नाहीतर खेळ झाला म्हणून समजा. सगळाच इस्फोट होतोय बघा असे पाटलांचे विश्वासू दफ्तरदार आबा कुलकर्णी यांना आडदांड पिऱ्या सांगतो. या पिऱ्याच्या नावावर पाचसहा खून आणि दहाबारा दरोडे होते. गेली पाच-सात वर्षे तो फरारीच असतो. पाटलीणबार्इंच्या कानावर हे प्रकरण टाकल्यावर पाटलीणबाई म्हणतात, ‘‘माझ्या मनात तर भावाच्या पोराला दत्तक घ्यावं असा विचार आहे.’’
शंभर आखणी चिरेबंदी वाडा, काळा करंद, मऊ लोण्यासारखी मातीची दोन अडीचशे एकर जमीन, बांधीव विहिरी, तळाला झरे... कोणालाही ह्याचा मोह पडणारच. गावातले वातावरण थोडे निवळावे, तोवर सहा महिने तीर्थयात्रा करावी असं पाटलीणबाई ठरवतात; त्यावेळी धुरपा म्हारणीच्या लेकीला रातोरात पळवल्याची बातमी येते. ते प्रकरण हाताळणे ही पाटलीणबाईच्या अखत्यारीतली गोष्ट नसते. त्या तशाच तीर्थयात्रेला जातात.
आबा कुलकर्णीकडे सर्व लोक न्यायासाठी बघतात. पण ते स्वत: वचकून असतात. त्यांची बायको लक्ष्मीबाई आणि दोन मुले - आपल्या जीवाला धोका आहे म्हणून हवालदिल होतात. तशातच खिंडीत लूटमार सुरू होते. शिवा कुंभार आणि त्याचा लेक बाजारहाट करून परत येत असताना त्यांना खिंडीत लुटण्यात येते. गाडीच्या बैलाला पळवण्यात आले. त्या दोघा बापलेकांना भरपूर मारपीट केली जाते. इकडे देसाई अण्णाच्या रानातला एक आराभर मकाच कुणी काढून नेतो. पाटील होते तेव्हा असे काही घडत नव्हते.
गावात पोलीस येतात. ते शंभर अंडी, दहा कोंबड्या, दोन पोती गहू, एक जळणाची गाडी साहेबांसाठी मागतात. जमवाजमव करताना आबांची दमछाक होते. लक्ष्मीबाई म्हणते. आज गावची शिरकाई माझ्या स्वप्नात आली... म्हणाली. अंग माझी खणानारळानं ओटी भर... कधी भरू या?’
पाटलीणबाई आबा कुलकर्णी यांना सांगतात, ‘मी उद्या सकाळीच भावाकडं जाते... दत्तक घ्यायचा विचार केलाय... दत्तकविधान कोल्हापुरलाच करायचा बेत आहे,’ बाई गाव सोडून जातात.
आबांनाही ते गाव सोडून जावंसं वाटतं. तिथे आपल्या जीवाला धोका आहे. पण आपण गाव सोडलं तर पाटलाची जमीन, शेत लोक बळकवून बघतील अशी भीतीही त्यांना वाटते.
बंदूकधारी पोलिसांना घेऊन फौजदार मंडलिक गावात येतात, आबांना फ़ैलावर घेतात, कुलकर्णी गावात बसून काय हजाम ती करता, की गोल्फ खेळता?’
आबा कुलकर्णी यांच्याशी अशा गुर्मीत किंवा अशा तिरसट भाषेत आजवर कोणी बोललेले नसते.... त्या अपमानाने ते अस्वस्थ होतात... आपला आत्मविश्वास गमावून बसतात... आजारी पडतात. विरक्त होतात. गावाची चिंता... आपल्या मागे गावचे काय होणार? पुढं हे ओझं कोण घेणार असा प्रश्न त्यांना पडतो.
सुभानराव पाटील आणि आबा कुलकर्णी या दोघांच्या निर्वाणाने गावातील दरार संपतो. जो तो आपलाच हेका पुढे चालवतो. पाटलांच्या शेतातला काही भाग दाजीबा गायकवाड तर काही भाग केरुनाना पवार बळकावतात. इनामकीची जमीन खाणारे सनदीही चावडीत बसेनासे होतात. गावातील सत्तासंघर्ष तीव्र होतो.
गावचे हेडमास्तर म्हणतात, नवी विटी नवं राज्य. येतील ते दिवस बघत राहयचे. दादा चव्हाण आल्या आल्या घोड्यावर बसून गावचा फेरफटका करतात. एकेकाला फ़ैलावर घेतात. शिवलिंग तेल्याला म्हणतात लिंगाडी हैस की मांग? बैलाऐवजी घाण्याला म्हस जुंपतोय? ती म्हस सोड आधी... त्या तेल्यालाच घाण्याला जुंपून घाणा चालवायला लावतात. त्याच्या पाठीवर चाबूक ओढतात. तो आई आई म्हणून ओरडतो. दादा चव्हाण म्हणतात, मग.
म्हाद्या कोळ्याला दादा चव्हाण चाबकानं बडवून विचारतात, पिऱ्या कुठं हाय? त्या दाजीबा गायकवाडाचं आन तुझं लई गळतयं व्हय रे? पाटलाच्या रानात घुसला होतास नाही का?
म्हाद्या वठणीवर येतो, मला वचन द्या... खरं सांगतो... आज खोताचं वऱ्हाड जाणार आहे. त्ये लुटायचा घाट घातलाय पिऱ्यानं. तो ऐतवारी तानूकडं येणार हाय. पाटलाचा खूनबी करायचं ठरलंय.
मंडलिक फौजदारांना ही बातमी कळवण्यात येते. अशाप्रकारे दादा चव्हाण गावावर आपला दरारा प्रस्थापित करतात.
एक दिवस त्यांचा धाकटा मुलगा संभाजी वाड्यावर ओरडत ओरडत येतो. दादा, आबांचा खून झाला हो. गाव पुन्हा एकदा भरडून निघतं. केरुनाना व दाजीबा पुन्हा आरोपी म्हणून तुरुंगात जातात.
तालमीतली पोरं ढाण्या वाघागत गावात फिरू लागतात, दादा निर्धास्त होतात.
दसऱ्याला पाटलीणबाई वाड्यात येतात. दत्तक मुलगाही बरोबर असतो. वाड्याला नवी कळा येते.
दादा पाटील हे आपले स्थान टिकवण्यासाठी गावातील ज्या पोरांना पैलवानकी करायला लावतात, ती पोरेच त्यांच्या विरोधी संघटित होतात असे तिसऱ्या भागात दाखवले आहे. दाजीबा गायकवाड आणि केरुनाना पवार या पिढीजात वैऱ्यांना पाटील एकत्र आणू पाहतात. परंतु ते शक्य नसते. या दोहोंना एकत्र आणण्याचा प्रयत्नात दादा पाटील हे सर्वांच्याच मर्जीतून उतरतात. केरुनानाचा खून होतो. दाजीबा फरार होतो. ही तरुण पोरे दादा पाटलांनाच त्यांच्या घोड्याचा कान कापून डोकेबाज माणसाने कसे वागावे हे सांगायची गरज नाही असा इशारा देतात.
एका परीने संपूर्ण गावच कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे.
सुभानराव पाटील, आबा कुलकर्णी, दाजीबा गायकवाद, केरुनाना पवार, राऊनाना, हिंदुराव गायकवाड या व्यक्ती प्राधान्याने समोर येतात. इतरही व्यक्तींना आपले व्यक्तिमत्त्व प्रकट व्हावे अशाप्रकारे चितारण्यात आले आहे.
कादंबरीचा दुसरा व तिसरा विभागच तेवढा लक्षात घेतला तर बदली पाटील म्हणून आलेल्या दादा चव्हाणांनी आपला दरारा प्रस्थापित करणे आणि त्यांच्या सत्तेला तडे जाणाऱ्या घटनांमुळेही त्याचे आसनही डळमळीत होणे असे सूत्र सांगता येईल.
सत्ता मिळवणे आणि त्या सत्तेच्या बळावर आपणच निर्माण केलेल्या तरुण कार्यकर्त्यांकडून आपल्या सत्तेला आव्हान मिळणे, असा हा प्रवास आहे. संघर्षाचे स्वरूप बदलत जाते. आजचे शत्रू उद्या मित्र होतात. मित्र असतात ते विरोधात जातात. प्रत्येकाचे हितसंबंध वेगवेगळे असतात. एका खेड्याच्या संदर्भात हे सत्ताचक्र कसे काम करते हे शंकर पाटील हे या कादंबरीत दाखवतात.
टारफुला हे प्रतीक सत्तेला आव्हान देणाऱ्या तरुण मंडळीचे आहे तसेच ते गावाचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या सत्तासंघर्षाचेही प्रतीक आहे असे म्हणता येईल. सत्तासंघर्षात आबा कुलकर्णी किंवा राऊनाना यांच्यासारख्या सत्प्रवृत्त नीतिमान व्यक्तींना मृत्यूमुखी पडावे लागते; तर सत्तेसाठी हवे ते करण्याची तयारी असणाऱ्यांना मात्र खून-दंगे करूनही आपले वर्चस्व दाखवण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळत राहते व तग धरून राहता येते असे वास्तव टारफुलामध्ये बघायला मिळते.
‘टारफुला’ची चाळीस वर्षांनंतर निघालेली ही नवी आवृत्ती ग्रामीण जीवनातल्या परिवर्तनाची एक अस्सल झलक प्रकट करते. तिच्यातली पटकथेसारखी दृश्यवार मांडणी आपल्याला गुंतवून ठेवते.