DAINIK SAKAL 17-11-2002गुलजारांच्या ‘त्रिवेणी’चा सारस्वत अनुवाद...
गुलजार संवेदनशील कवी, तर शांता शेळके भावग्राही अनुवादक. या सुरेख संगमामुळेच साकारली उर्दू, हिंदी नि मराठीची त्रिवेणी. त्रिवेणी हा गुलजारांनी घडवलेला त्रिपदी छंद. तीन दशकांच्या निरंतर रियाजानंतर तो समृद्ध झाला.
शांता शेळके यांना हिंदी, उर्दूची चांगली जाण होती, हे गुलजारांच्या मूळ हिंदीत लिहिलेल्या ‘त्रिवेणी’ या त्रिपदी गझल संग्रहाचा मराठी अनुवाद वाचत असताना लगेच लक्षात येते. त्यात त्यांचा पिंड कवयित्रींचा त्यामुळे भाव नि भाषेचा सुरेख संगम या अनुवादात पदोपदी लक्षात येतो. हा अनुवाद हिंदी-मराठीस जोडणारा दुग्धशर्करा योग होय. फाळणीनंतर जी माणसं पाकिस्तान सोडून भारतात आली, त्यापैकी गुलजार एक होत. फाळणीच्या वेदनांनी त्यांचं काव्य ओथंबलेलं आहे. ते अशा त्रिपदी गझल वाचताना तीव्रतेनं जाणवतं.
मी आपले सारे समान घेऊन आलो होतो बॉर्डरच्या अलीकडे
माझे मस्तक मात्र कुणी कापून ठेवून दिले तिकडेच
माझ्यापासून अलग होणे रुचले नसेल तिला कदाचित!
गुलजारांची त्रिवेणी नामक त्रिपदी अल्पाक्षरी गझल होय. पहिल्या दोन ओळींचा शेर असतात गंगा-यमुना. हा असतो विषय विस्तार. तिसरी ओळ असते सरस्वती. तीत गझलचा आशय अमूर्त, अव्यक्त असतो. सरस्वतीसारखा गुप्त. काव्य वाचकांनी स्वानुभवांच्या समृद्धीवर स्वविवेक नि स्वतर्क इत्यादीच्या बळावर तो जाणून घ्यायचा त्यामुळे ‘त्रिवेणी’ समजायची तर कवी नि वाचक यांच्यात अद्वैत भाव, भाषा, भंगिमांचा त्रिवेणी संगम होणं पूर्वअट असते. गुलजारांची कविता अनुभवाच्या समृद्धीसह भाषांतरित करायची तर अनुवादकामध्ये ते सारस्वत कौशल्य ती साहित्य प्रतिभा असणे अनिवार्य. ती शांता शेळकेमध्ये होती. ज्या मराठी वाचकांना त्यांच्या कॉफी हाऊस प्रत्येक टेबलावर नवा पाऊस! सारख्या हायकूचं त्रिपदीचं सौंदर्य पेलता आलं, त्यांना या त्रिवेणी म्हणजे नवी पर्वणीच वाटल्याशिवाय राहणार नाही. त्रिवेणी अनुभवजन्य तशीच भावसमृद्ध! मराठी अनुवाद करताना शांता शेळके यांनी मूळ त्रिवेणीतील आशयास धक्का लावू न देता त्यांचा अनुवाद केला आहे. काही ठिकाणी तर हा अनुवाद मूळ रचनेच्या बरहुकूम झालेला आढळतो.
वह जिससे साँस का रिश्ता बंधा हुआ था मेरा
दबा के दाँत तले साँस काट दी उसने
कटी पतंग का माझा मुहल्ले भर ते लुटा!
सारख्या या हिंदी त्रिवेणीचा शांता शेळकेंनी केलेला खालील मराठी अनुवाद याचा ठळक पुरावा म्हणून सांगता येईल.
जिच्याबरोबर श्वासाचे धागे जोडले होते मी
ते नातेच, दातांनी धागा तोडावा तसे तोडले तिने! आणि...
आता काटलेल्या पतंगाचा तुटका मांजा लुटला जातो आहे मोहल्यात!
ही गोष्ट अलाहिदा की ‘जोडले’च्या ठिकाणी ‘जडले’ नि ‘मोहल्ल्यात’च्या ठिकाणी ‘गल्लीत’ शब्दांची रचना चपखल ठरली असती.
‘त्रिवेणी’ या गुलजारांच्या नवरचित छंदांच्या संग्रहाचा मराठी अनुवाद ही शांता शेळके यांनी मराठी साहित्यास दिलेली शेवटची देणगी नि म्हणून तिचं ऐतिहासिक मूल्य राहिल. हा अनुवाद गुलजारना इतका भावला की, त्यांनी तो खालील शब्दांत शांताबार्इंना समर्पित केला.
शान्ताबाई,
आप सरस्वती की तरह मिली।
और सरस्वती की तरह गुम हो गयी।
ये ‘त्रिवेणी’
आप ही को अर्पित कर रहा हूँ।
- गुलजार
मूळ रचनाकरानं अनुवादकाचा केलेला असा सन्मानही माझ्यासारख्या अन्य अनुवादक, अभ्यासकास वैश्विक घटना वाटल्यावाचून राहणार नाही. अशी दर्दी कलाकारच देऊ जाणे!
सरस्वतीच्या प्रतीकात्मक चिन्हाचं साधं परंतु आशयघन मुखपृष्ठ लाभलेला हा मराठी भाषांतरित काव्यसंग्रह मूळ हिंदी ग्रंथाच्या एक तृतीयांश किमतीत मराठी काव्यरसिकांना त्यांच्या बोलीत उपलब्ध करून देऊन मराठी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘मराठी पुस्तके महाग असतात’ हा आरोप अपवादाने खोटा ठरवला आहे. तो नियम होईल. तर मराठी साहित्याचा प्रसार होण्यास साह्य होईल. ‘त्रिवेणी’ या भाषांतरित गझल संग्रहात विषय वैविध्य आहे. प्रेम, प्रणय, विरह, मीलन, फाळणी, जगणं, शोषण, नाती, इच्छा, आकांक्षा, पर्यावरण सारे विषय समावून घेण्याची कुवत असलेल्या या त्रिपदीत मनुष्य निसर्ग व जीवनसंघर्षाचा त्रिवेणी संगम आहे. उर्दू, अरबी, फारसी शब्दांजागी समर्पक मराठी शब्दरचना करून शांता शेळके यांनी मराठी त्रिवेणी मूळ हिंदी इतक्याच दर्जेदार बनवल्या आहेत. या त्रिवेणीत जीवनाचा सुस्कारा जसा आहे, तशी जीवन सुसह्य करण्याची शक्तीपण. जे लिहाल त्याची साक्ष देईन मी बिनचूक सारख्या ओळीतून शांताबार्इंच्या मनातील अनुवादकाचा आत्मविश्वासच एका अर्थाने प्रकट झाला आहे. हा आत्मविश्वासच या अनुवादाचं आत्मबळ होय. हिंदी ‘त्रिवेणी’चा मराठी अनुवाद मात्र शब्दांची टांकसाळ नसून भावनेनं गुंफलेली ती मोहनमाळ होय! गुलजार नि शांता शेळके यांच्या काव्यातील भावबंधांचा धांडोळा घेणाऱ्यांना हा अनुवाद भाव नि भाषा सेतू ठरल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो.
-सुनीलकुमार लवटे
DAINIK LOKMAT 01-09-2002तीन ओळींचा अर्थवाही संगत – ‘त्रिवेणी’…
‘त्रिवेणी’ हा ज्येष्ठ-श्रेष्ठ हिंदी कवी गुलजार यांच्या कवितांचा नवा आकृतीबंध. त्याचाच मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांनी केलेला मराठी अनुवाद ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने नुकताच प्रसिद्ध केला आहे.
यातील कविता तीनच ओळींच्या. अल्पाक्षरातच खूप काही सामावणाऱ्या. तरल भाव-भावनांचं उत्कट दर्शन आपल्याला या छोट्या-छोट्या कवितांमधून होतं.
कवी गुलजारांच्या भाषेत सांगायचे तर त्रिवेणीमधील पहिल्या दोन काव्यपंक्तींचाच गंगा-यमुनाप्रमाणे संगम होतो; पण या दोन प्रवाहांखालून आणखी एक प्रवाह तयार होतो; मात्र तो गुप्त असतो. हा गुप्त नदीचा प्रवाह म्हणजेच सरस्वती अर्थात कवितेची तिसरी ओळ. पहिल्या दोन ओळींमध्येच सामावून जाणारी आणि तरीही स्वत:चे वेगळेपण जपणारी ही तिसरी ओळ आपल्याला गहिरा अर्थ देऊन जाते.
यातील काही कवितांमधून आपल्याला आंतरिक ओढ जाणवते.
उदा. उडून जाताना पाखराने इतकेच पाहिले
किती तरी वेळ फांदी हात हलवित होती,
निरोप घेण्यासाठी, की पुन्हा बोलावण्यासाठी?
तर काही ठिकाणी मेणबत्तीच्या रूपातून स्त्रीसुलभ भावनांचा प्रत्यय येतो–
सांजेला जळणारी मेणबत्ती बघत होती वाट
अजून कसा कुणी पतंग आला नाही इथे
असेल कुणी सवत माझी जवळच कुठे जळत
निसर्गाची विविध रूपे उलगडताना कवी एकीकडे जीवनाचे वास्तवही सांगत असतो.
काळ्यासावळ्या नदीतीरावर गुलमोहराचे झाड
जसा लैलेनं भांगात भरलेला सिंदूर
बघ ना! धर्मच बदलून गेला बिचारीचा!
निसर्गाच्या विविध छटांचा वापर कवीने प्रतीमा, प्रतिकांच्या रूपात उत्कृष्ट पद्धतीने केला आहे. चंद्र हा त्याचा लाडका. त्याचीच नाना रूपे ‘त्रिवेणी’त दिसतात.
आईचा आशीर्वाद चंद्रासारखी
देखणी वधू मिळेल
आज संध्याकाळी ती ‘चंद्रमुखी’
पाहिली फुटपाथवरून
चंद्र भाकरीसारखा जळत राहिला रात्रभर
रात्रीचं आणि चंद्राचं नातं काही औरच. हे सख्य कवीला हवंहवंस वाटतं. यात कुणी अडथळा आणलेला त्याला आवडत नाही– तो म्हणतो’
‘सारा दिवस बसलो होतो, हातात भिकेची कटोरी घेऊन रात्र आली
चंद्राची कवडी आत टाकून निघून गेली
आणि हा कंजूष दिवस ही सुद्धा हिरावून घेईल.’
चंद्र-चांदण्या-रात्र यांच्या घनिष्ट मैत्रीचं आणखी एक उदाहरण म्हणजे–
रात्र चंद्राच्या नौकेत आणते आहे चांदण्या भरून
सकाळ होता-होता त्या विकल्या जात आहेत आधीच
हल्ली रात्रीचा व्यापार फारच भरभराटला आहे.
आरशाचे आणि कवीचे लागेबांधे दर्शविणारे– त्यात आयुष्याचं प्रतिबिंब पडत जातं–
या सारे जण आरसेच वेढून घेऊन अंगावर
साऱ्यांना आपलाच चेहरा दिसत राहील त्यात
आणि साऱ्यांना सारेच सुंदर वाटतील इथे!
– अशी ही ‘त्रिवेणी’, गुलजारांच्या अनुभवातून शांताबार्इंना उमगलेली. शांताबार्इंना ‘त्रिवेणी’त दिसते गुलजारांच्या अंतरातील ‘खामोशी’. ही खामोशी न बोलताही खूप काही सांगून जाते.
जीवनाचं निखळ सत्य त्यातून पाझरत जातं–
उदा. काटेरी तारेवर वाळत टाकले आहेत कुणी ओले कपडे
ठिबकते आहे थेंब-थेंब रक्त, वाहून जाते आहे मोरीतून
काय त्या जवानाची विधवा, रोज धुते सैनिकी वेश इथे – अशी ही जगण्याची नवनवीन परिमाणे सांगणारी ‘त्रिवेणी’. गंगा, जमुना, सरस्वतीच हा फिकट, जांभळ्या पाण्यातून (पानांतून) झालेला हा त्रिवेणी संगम वरवर दिसायला छोटा; पण अंतरंगात तरल संवेदनांची खोली असणारा. वाचकाने यात एकदा तरी मनसोक्त डुंबावं.
-अश्विनी मेढी