- Nayana Bagul
पुस्तक क्रमांक ६९
#सागरी_पर
हे पुस्तक आपल्याला चार वर्षे चाललेल्या सागर परिक्रमा या मोहिमेची सफर घडवून आणते. पहिल्या दर्यावर्दी भारतीयाची ही यशोगाथा आहे. भारतात प्रथमच बांधलेल्या #म्हादेई_या_शिडाच्या_बोटी च्या बांधणी पासून अविश्वसनीय #पृथ्वी_प्रदक्षिणा कशी पूर्ण केली याचे अद्भूत आणि चित्तथरारक वर्णन पुस्तकात आहे. हे पुस्तक वाचकाला खिळवून ठेवते. सागराचा एव्हरेस्ट मानल्या गेलेल्या सागरी प्रदेशांमधून केलेले प्रवास वर्णन वाचून आपण थक्क होतो. अडचणींचे डोंगर पार करून आपले ध्येय साध्य करणाऱ्या दिलीप दोंदे यांची ही कहाणी प्रेरणा देणारी आहे. उदासीन नोकरशाही आणि सरकारी लाल फितीत अडकलेल्या फाइलींn look I`ll iio ना लीलया तोंड देणारा सागर वीर आपल्याला पुस्तकातून भेटतो. सिंदबादच्या सफरी आपण वाचल्या आहेत पण दहा वर्षांपूर्वी केलेली ही सागरी परिक्रमा वाचनीय आहे. तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस आपले ध्येय कसे गाठतो हे वाचून तरुण पिढीला नक्कीच स्फूर्ती मिळेल.
शिडाच्या बोटीतून एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा करणारे भारताच्या सागरी इतिहासातले पहिले भारतीय ,दिलीप दोंदे आहेत. ते भारतीय नौदलात कॅप्टन आहेत. त्यांनी प्रवास केलेली बोटीची बांधणी, एका भारतीयाने भारतात सुयोग्य रितीने बांधली हे तिचे वैशिष्ट्य आहे. भारतीय नौदलाने त्यांना पाठबळ दिले. विरंगुळा म्हणून छोट्या होड्या घेऊन नौकाविहाराला जाणे आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा समुद्रावर आनंद लुटायला जाणे एवढाच मर्यादित अनुभव त्यांच्या गाठीशी होता. नेव्हीने या संपूर्ण मोहिमेचा खर्च करण्याची तयारी दाखवली हे ऐकल्यावर त्यांना या मोहिमेमध्ये भाग घ्यावा असे वाटले. सागरी इतिहासात प्रथमच एकट्याने आणि न थांबता शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करणाऱ्या सर रॉबिन यांच्याबरोबर काम करून मार्गदर्शन मिळवावे असे नेव्हीने त्यांना सांगितले. त्यासाठी ते लंडनला गेले प्रत्यक्ष बोटीवर काम करण्याचा अनुभव मिळवला. बोटीची तळकाठी घासून गुळगुळीत कशी करायची, जोडणी कशी करायची, बोटीवर उपकरणे कशी बसवायची हे सर्व ते तेथे शिकले. एखाद्या मस्तवाल जनावराला काबूत ठेवणे जितकी कठीण तितकेच बोट चालवायला कठीण असे वर्णन लेखकाने केले आहे. एक मोठी बोट म्हणजे प्रचंड मोठी गुंतवणूक असते. सागरी परिक्रमेच्या संकल्पनेमुळे केवळ भारतीयांची सागरी सफरी करण्याची क्षमताच जगापुढे सिद्ध होणार नव्हती तर बोट बांधणीच्या कौशल्यातही भारतीय कमी नाहीत हे सगळ्या जगाला दिसणार होते.
बोट बांधणीची जागा शोधणे, नक्की करणे, टेंडर्स मागवणे, करार करणे आणि शेवटी बोटीची बांधणी अशा अनेक खडतर टप्प्यांमधून जावे लागणार होते नेव्हीने सहा कोटी या मोहिमेसाठी सॅंक्शन केले होते. त्यापैकी चार कोटी कोटीसाठी आणि दोन कोटी उर्वरित प्रकल्पासाठी खर्च होणार होते. मोहिमेसाठी लागणाऱ्या निधीच्या कागदपत्रांची फाईल पुढे का सरकत नव्हती हे बघायला ते दिल्लीला गेले. सरकारी कारभार कसा असतो याचे यथार्थ वर्णन वाचायला मिळाले. अडेलतट्टू भारतीय नोकरशाही कडून काम करून घेताना होणारी दमछाक इथे मांडली आहे. तीन वर्ष यासाठी ते झगडत होते. पृथ्वी प्रदक्षिणा करताना फक्त चार ठिकाणी थांबण्याचा सल्ला नेव्हीने त्यांना दिला. 19 ऑगस्ट 2009 ला त्यांनी मोहिमेला सुरुवात केली. वाऱ्याचा झंजावात, लाटांचे तांडव नृत्य, समुद्रपक्षी तसेच डॉल्फिन आणि सील मासे तसेच बोट दुरुस्ती त्यानेच करायची, बोट चालवायची त्यानेच, वादळाला तोंड देताना बोटीवरच्या उपकरणांची काळजी घेणे तसेच स्वयंपाक हे त्यांनीच करायचे या सर्व आघाड्या एकट्याने सांभाळायचे म्हणजे कॅप्टन दोंदे किती ग्रेट होते साहसी होते हे समजते.
पुस्तकात रंगीत फोटो बघून वादळाची, लाटांची आणि पाण्याची भिंत का म्हंटले आहे त्याची जाणीव झाली. विषुववृत्त आणि मकरवृत्त कसे पार पडले, प्रत्येक ठिकाणी सागरी मैल किती अंतर पार केले तसेच सागरातले एवरेस्ट कसे जिंकले याची वर्णने वाचून अंगावर काटा आला. दक्षिण गोलार्धातून उत्तर गोलार्धात येताना वाऱ्याचा वेग कसा होता, चक्रीवादळ झाल्यावर बोटीची काय परिस्थिती होते हे खूप थरारक आहे. पूर्ण झोप मिळायचे नाही डुलक्या कसे काढायचे, तसेच बोटीवरला गॅस सिलेंडर संपल्यावर हवाबंद डब्यातले जेवण कसे खावे लागले यावरून ही साहस यात्रा होती हे मनोमन जाणवले. पुस्तकाच्या शेवटच्या पानात नौकानयन यासंबंधीच्या संज्ञा दिल्या आहेत तसेच बोटीच्या प्रत्येक भागांची नावे चित्र काढून दाखवली आहेत त्यामुळे बोट बांधणी किती कठीण असते, शिडे कशी लावतात, डोल काठी कशी असते, रडार कुठे बसवतात, चालकाची जागा कुठे असते याची कल्पना आली.
नऊ महिन्यांनी कॅप्टन दिलीप दोंदे यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. मुंबई बंदरावर त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. पुस्तक वाचून आत्मविश्वास काय असतो, अडचणींचा डोंगर कसा शिताफीने पार पडता येतो, मनोधैर्य कसे टिकवायचे याची माहिती मिळाली. आणि पुस्तक वाचल्यानंतर कॅप्टन दोंदे यांचे युट्युब वरचे व्हिडीओ बघावेसे वाटले हे त्या पुस्तकाचे श्रेय आहे.
सौ नयना बागुल
२३/८/२१
- DAINIK SAKAL 06-06-2021
सागरी परिक्रमेचा अविस्मरणीय अनुभव...
सागरी परिक्रमा करणारे पहिले भारतीय म्हणून दिलीप दोंदे यांना ओळखलं जातं. भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी असून गोव्यात राहतात. त्यांच्या या परिक्रमाने प्रेरित झालेल्या आठ जणांनी यांच्याच मार्गदर्शनात नंतर सागरी परिक्रमेचा अविस्मरणीय अनुभव घेतला. त्यापैकी सहा महिलांच्या चमूची कामगिरी लक्षणीय आहे.
पृथ्वी पालथी घालायची, पण सागरी मार्गाने, तीही एकट्याने आणि शिडाच्या बोटीतून नऊ महिने चालेलेल्या मोहिमेतून. ही सुरस व चमत्कारिक कथा नसून दोंदे यांनी साहसी समुद्र पर्यटन क्षेत्रात रचलेला अनोखा इतिहास आहे. ते म्हणाले, ‘‘एकोणीस ऑगस्ट वीसशे नऊ रोजी मुंबईपासून सुरू झालेली ही सागर परिक्रमा एकोणीस मे वीसशे दहाला पुन्हा मुंबइला पोहोचून संपली. या नऊ महिन्यांत, नेमवंâ सांगायचं तर दोनशे त्र्याहत्तर दिवसांपैकी एकशे सत्तावन दिवस मी पाण्यात होतो. चार बंदरांवर मुक्काम केला. या प्रदक्षिणेत मी तेवीस हजार सागरी मैल अंतर पार केलं. या मोहिमेत वापरण्यात आलेली बोट भारतीय बनावटीची होती. रत्नाकर दांडेकर यांनी ती तयार केली होती. ही साहसी परिक्रमा भारतीय नौदलाचा एक उपक्रम म्हणून करण्यात आली. यासाठी मी स्वेच्छेने पुढाकार घेतला होता. अशा तNहेचा कुठलाही पूर्वानुभव नसताना निर्धार, कौशल्य व कमालीच्या धाडसाची आवश्यकता होती. ते करू शकलो. यासाठी नंतर ‘शौर्यचक्र’ या पुरस्कारासह आणखी काही मानाच्या पुरस्करांनी मला गौरविण्यात आलं.’’
- SAPTAHIK SAKAL 24-04-2021
रोमांचक प्रवास...
फर्डिनांड मॅगेलन आणि खिस्तोफर कोलंबसच्या काळातल्या आणि आजच्या शिडाच्या नावांमध्ये प्रचंड फरक असला तरी आजही समुद्र तोच आहे, हवामान तितकेच बेभरवशाचे आहे. तुमच्या हाताशी नानाविध साधने असली तरी उधाणलेल्या समुद्रावर स्वार होऊन पुढे जाण्यासाठी आजही तितकेच कौशल्य आवश्यक आहे. यामुळेच एकविसाव्या शतकातही असे धाडस कुणी करायला गेले तर त्याचे जगाला अप्रूप वाटतेच. दिलीप दोंदे यांनी हे धाडस केले आणि शिडाच्या नावेतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिलेच भारतीय ठरले! त्यांच्या कामगिरीची रोचक कहाणी म्हणजेच त्यांनी लिहिलेले पुस्तक ‘द फर्स्ट इंडियन.’
या विलक्षण कामगिरीची सुरुवात होण्यामागे प्रेरणा होती, ती व्हाईस अॅडमिरल मनोहर आवटी यांची. ‘भारतीय व्यक्तीची शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा’ हे त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न होते. ते स्वप्न भारतीय नौदलाचे कमांडर दिलीप दोंदे यांनी साकार केले. दिलीप दोंदे यांना आपल्या कामाचा भाग म्हणून नौदलाच्या बोटीवर काम करण्याचा अनुभव होता, परंतु याट (Yacht) मधून नौकाविहार करण्याचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता, तरीही त्यांनी आव्हान स्वीकारले.
या प्रकल्पासाठी दोंदे यांना नौदलाच्या परवानगीपासून अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागली आणि भारतीय नोकरशाही काय चीज आहे याची खऱ्या अर्थाने जाणीव होऊ लागली. समुद्रातल्या दिव्यातून पार पडण्यापूर्वी लालफितीच्या दिव्यातून पार पाडण्यासाठी काय काय करावे लागले याचे तपशील पुस्तकाच्या पूर्वार्धात विस्ताराने मांडले आहेत. पुस्तकाचा हा भाग अतिशय उत्तम प्रकारे जमून आलेला आहे.
‘आपल्या देशातच तयार झालेली नौका या प्रवासासाठी वापरली जावी,’ असा नौदलाचा आग्रह होता. पृथ्वीप्रदक्षिणेच्या या मोहिमेत एक खूप मोठे आव्हान होते ते म्हणजे नौकाबांधणीचे. भारतात हौशी नौकानयन हा प्रकार मुळातच इतका कमी आहे, की स्वाभाविकपणे त्यासाठी लागणाऱ्या नौकेच्या बांधणीबद्दलही अतिशय थोडी माहिती भारतातल्या कंपन्यांना आहे. अशा परिस्थितीत गोव्याच्या नौकाबांधणी कंपनीचे प्रमुख रत्नाकर यांनी स्वत:देखील नौकाबांधणीच्या या संधीकडे एक आव्हान म्हणून पाहिले. देशविदेशांतून कच्चा माल मिळवणे, त्यामध्ये ऐनवेळी काही समस्य असल्याचे निदर्शनास आल्यावर आपले संपूर्ण व्यावसायिक ज्ञान, अनुभव यांचा वापर करून चटकन दुसरे पर्याय शोधणे, ‘डेडलाईन्स’चे संपूर्ण भान राखत सर्व अडचणींवर मात करत दिलीप दोंदे आणि रत्नाकर यांच्या समन्वयातून आकाराला येत जाणारी बोट आणि अखेर ती बोट सज्ज होऊन समुद्रात उतरणे हा प्रवास मुख्य सागरप्रवासाइतकाच खिळवून ठेवणारा आहे.
सेलिंग (Sailing) म्हणजेच नौकानयन ही अशी गोष्ट आहे, की ‘थिअरी’ कितीही व्यवस्थित असली तरी प्रत्यक्ष ‘प्रॅक्टिकल’ कसे पार पडेल, कुठली आव्हाने उभी राहतील याबद्दल खात्रीशीरपणे काही सांगणे अशक्य असतं. दिलीप दोंदे यांना समुद्रप्रवासातही अकल्पित संकटांचा सामना करावा लागला. कधी शिडाच्या डोलकाठीला तडा जाणे, कधी शीड फाटणे, कधी जनरेटर बंद पडणे, कधी महत्त्वाचा भाग तुटणे अशा गोष्टींचा त्यांना भर समुद्रात सामना करावा लागला. कधी आपल्या पूर्वानुभवांच्या, आपल्या अंतर्मनाच्या कौलाच्या जोरावर त्यांनी पटापट निर्णय घेत त्या समस्यांवर ज्या प्रकारे मात केली ते वाचून दिलीप दोंदे यांच्या कौशल्याला आणि समयसूचकतेला दाद द्यावीशी वाटते.
दिलीप दोंदे यांचे अनुभव अनोखे असले, तरी पुस्तक अतिशय वाचनीय होण्यास कारणीभूत ठरली आहे ती त्यांची निवेदनशैली! उपहास, कोपरखळ्या, मिश्किलपणा यांचे मिश्रण असलेली दोंदे यांची लेखनशैली पुस्तकाला कमालीचे प्रवाही करते. त्यांच्या सागरपरिक्रमेचे अनुभव वाचण्यासाठी उत्सुक असलेल्या वाचकाला मोहिमेच्या पूर्वतयारीला वाहिलेल्या पुस्तकाच्या पूर्वार्धात कुठेही कंटाळा येऊ न देणे हे लेखक म्हणून दोंदेंचे यश आहे. भारतासाठी पहिल्यावाहिल्या असणाऱ्या या मोहिमेसाठी परवानग्या मिळवण्यासाठी, फाइल्स पुढे सरकवण्यासाठी नौदलाचे प्रोटोकॉल पाळत, कोरड्या आणि अज्ञानमूलक सरकारी प्रश्नांना उत्तरे देत एकट्याने धावपळ करणे, त्याचवेळी एकीकडे शिडाच्या बोटीच्या निर्मितीवर जातीने लक्ष ठेवणे आणि या सगळ्यांतून वेळ काढून शिडाची बोट चालवण्याचा सराव करणे या सगळ्या गोष्टी मोहीम सुरू होण्याआधीच थकवणाऱ्या ठरल्या. पण त्या सगळ्या रगाड्यातही दोंदे यांची विनोदबुद्धी शाबूत राहिली आणि त्यांनी आपल्या बोचऱ्या अनुभवांना खुसखुशीतपणाचे वेष्टण चढवले ही गोष्ट विशेष म्हटली पाहिजे.
दिलीप दोंदे यांचे अनुभवकथन हसरे, खेळकर असले तरी त्याला भावनेचे अस्तरही आहे. सागरपरिक्रमेत अचानक एक सागरी पक्षी काही दिवसांपुरता बोटीवरचा वास्तव्याला येतो तेव्हा दोंदे यांच्या बोटीवरच्या वावरामध्ये नकळत झालेले बदल, समुद्रावरच्या त्या अफाट एकांतात एका छोट्या पक्ष्याची सोबतही हवीहवीशी वाटणे, त्या पक्ष्याची काळजी घेणे हा आपल्यासाठीही हृद्य अनुभव ठरतो. दोंदे यांचे आपल्या ‘म्हादेई’ या बोटीशी असणारे नाते पुस्तकात मोजक्याच शब्दात फार छान उलगडले आहे.
दोंदे यांचे मोहिमेवर निघण्यापूर्वीपासून एकांतात ‘म्हादेई’शी संवाद करणे, स्वत: मोहिमेवर एकटेच निघालेले असूनही ‘We entered the port`, We sailed safely’ अशा उल्लेखांमधून ‘म्हादेई’ला जणू एक सजीव व्यक्तिमत्त्व बहाल करणे या गोष्टी ‘म्हादेई’चे त्यांच्या मोहिमेतलेच नव्हे, तर आयुष्यातले स्थानही अकृत्रिमपणे अधोरेखित करते. मोहिमेतला एक महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यामुळे अफाट कष्टांचे चीज झाल्याच्या जाणिवेने भावनांचा बांध फुटण्याच्या प्रसंगाचे दोंदे यांनी मोजक्या शब्दांत केलेले वर्णन आपल्यालाही भावूक करून जाते. पहिले सागरपरिक्रमावासी भारतीय म्हणून दिलीप दोंदे यांच्या अनुभवकथनाला महत्त्व आहेच, पण त्यांचा एकूण दृष्टिकोन आणि निवेदनशैली या पुस्तकाला अधिक उंचीवर नेऊन ठेवतात.
– प्रसाद फाटक
- Ajinkya Kulkarni
एका साहसवीराची यशोगाथा....
मला आजही लख्ख आठवतय, साधारणातः एम एस सी च्या पहिल्या वर्षाला असेन मी. सकाळी-सकाळी काॅलेजला जायची गडबड असायची. जाता जाता दारात पडलेला लोकसत्तेवर नजर फिरवून जायची मला सवय होती. एक दिवस अचानक लोकसत्तेच्या पहिल्या पानावर कुणीतरी अभिलाष टाॅमी नामक एका भारतीय नौदलातील अधिकाऱ्याने न थांबता एकल सागर परिक्रमा (solo circumnavigation of the globe) पुर्ण केल्याची बातमी मी वाचली. त्या बातमीतलं अजून एक नाव माझ्या चांगलं लक्षात राहिले. त्याचं कारण म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर अभिलाषच्या आधी सागरी परिक्रमा पुर्ण करण्याचा विक्रम नोंदवला गेला होता. अशी सागर परिक्रमा एकट्याने पुर्ण करणारे ते पहिले भारतीय. ती व्यक्ती म्हणजे कॅ.दिलिप दोंदे होय.
सावरकर म्हणतात त्या सप्तबंदीतली एक बंदी म्हणजे समुद्र न ओलांडणे ! यामुळे म्हणा किंवा `ठेविले अंनंते तैसेचि रहावे` या वृत्तीमुळे साहसी,धाडसी गोष्टी करणे हा प्रकारच आपण गमावून बसलो आहोत. याला अपवाद असतात कॅ.दिलिप दोंदे सारखे काही साहसवीर. " भारतात सव्वाशे अब्ज लोकसंख्या असताना तसेच साडेसात हजार किमी इतका मोठा समुद्र किनारा लाभलेला असताना २०१० पर्यंत कुणीच कसं एकट्याने सागरी परिक्रमा केली नाही?" हा प्रश्न सातत्याने कुणी ना कुणी कॅ. दोंदेंना विचारत असे. भारतीय नौदलात कार्यरत असलेले ॲडमिरल मनोहर आवटी यांनी एकल सागरी परिक्रमा करण्यासाठी नौदलाकडे सातत्याने तगादा लगवालेला होता. पण नौदलाने मात्र त्यांना यासाठी कधीही परवानगी दिली नाही. पुढे अशा परिक्रमेचा जेव्हा नौदलाने विचार केला तेव्हा दिलिप दोंदेंना ती संधी देण्यात आली. विचार करा! या अगोदर कोणत्याही भारतीयाने अशी एकट्याने सागर परिक्रमा केलेली नव्हती. त्यावेळी अशी सागर परिक्रमा करणारे दिलिप दोंदे हे जगातले १७५ वे खलाशी ठरले व भारतातील प्रथम. दोंदेंच्या आईने जेव्हा या मोहिमेसाठी होकार भरला तेव्हा यांचा आत्मविश्वास वाढला. घरची, नौदलाची परवानगी मिळाली म्हणजे झालं का सगळं? अजिबात नाही! खरा संघर्ष इथून पुढे सुरु होतो. या संघर्षाचे दोंदे दोन भाग करतात. एक म्हणजे जो लढा त्यांनी जमिनीवर दिला आणि दुसरा जो त्यांनी समुद्राशी दोन हात करताना केला. नौदलाच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार वाचताना उबग येतो. हे…आपले नौदल अधिकारी आहेत? असा संताप होतो आपला वाचाताना अक्षरशः. सगळ्यात आधी या प्रवासाची अचुक माहीती गोळा करणे हे एक मोठे काम होते. दुसरे मोठे काम म्हणजे या प्रवासाला लागणारी अत्याधुनिक शिडाची बोट. अशी बोट ना भारातात उपलब्ध होती ना त्यासंबंधी कुणी जाणकार व्यक्ती उपलब्ध होता. पण आता शिडाची बोट तर भाराताच बांधायची असा निश्चिय दोंदेनी केला. मग अशी बोट भारातात कोण बांधून देणार? हे आव्हान स्वीकारले ते गोव्यातल्या रत्नाकर दांडेकरांनी. त्यांनी व त्यांच्या ॲक्वेरिअस फायबरग्लासचे कर्माचाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन एक भारतीय बनावटीची शिडाची बोट तयार केली व तिचे नामकरण केलं गेलं `म्हादेई`. म्हादेई हेच नाव का? ते कसं आलं ते सविस्तर पुस्तकात वाचावं. या सागर परिक्रमेसाठी आलेला खर्च हा जवळजवळ सहा कोटी रूपयांपेक्षा जास्त होता. सरकारी लालाफितीतून इतकी मोठी रक्कम मंजूर करणे हे ही एक दिव्यच होतं. नोकरशाहीने दिलेला त्रास, दोंदेंचा पदोपदी केलेला अपमान हे सर्व सहन करत दोंदेंनी आपली ही सागर परिक्रमा पुर्ण केली होती.
सागरी परिक्रमा करण्याची कल्पना ज्या कुणाच्या डोक्यात पहिल्यांदा आली असेल त्याला खरोखर मनोमन नमस्कार आहे. त्याने अशी परिक्रमा करण्याचा प्रयत्न केला की नाही तो त्यात यशस्वी झाला का नाही झाला हे गौण आहे. कारण या अशा परिक्रमा करण्यासाठी उदंड साहस अंगात असावं लागतं. स्वतःहून आपला जीव धोक्यात घालावा लागतो. आपल्यात जगातील नवीन क्षीतिजे पादाक्रांत करण्याची उर्मी अनावर असावी लागते. तो उत्साह आपल्याला शेवटपर्यंत टिकवता आला पाहिजे. शारीरिक, मानसिक क्षमतेची प्रचंड कसोटी पाहणाऱ्या या मोहिमा असताता. समुद्रात कधी काय होईल काही सांगता येत नाही. वारा, लाटा तुमच्या बोटीला कुठे घेऊन जातील कशाचा काही भरवसा नाही. समुद्रात ही एकटी बोट पाहून कधी कोणत्या बाजूने समुद्री चाचे हल्ला करतील काही सांगता येत नाही. चहूबाजूने अथांग समुद्र त्यात हे बोटीवर एकटे. बोलायला एकजण सुद्धा कुणीही आसपास नाही. अभिलाष टाॅमीने तंत्र साहायक्काची भूमिका चोख बजावली होती. साहसावर, धाडसावर प्रेम असणाऱ्या कुणीही हे पुस्तक वाचावं. पुस्तकातील फोटो फार सुरेख आहेत.
त.टी - मुक्ता देशपांडे यांनी अनुवादित केलेलं `अ बाॅय इन अ स्ट्रॅप्ड पजामा` हे पुस्तक मी वाचलेलं होतं. मी मुळ इंग्रजी `द फर्स्ट इंडियन` हे पुस्तक मी वाचलेलं नाहीये, तरीपण अनुभवाने हे सांगू शकतो की अनुवाद चांगला झालाय. मुळ इंग्रजी पुस्तकावरच्या मजकुरावर जर चांगला संपादकीय हात फिरला असता तर हे पुस्तक अजून चांगले होऊ शकले असते. तीस चाळीस पानांनी पुस्तकाच्या पानांची संख्या कमी केली असती तर चांगलं आटोपशीर पुस्तक झाले असते. काही ठिकाणी आलेल्या जास्तीच्या मजकूरामुळे पुस्तक मध्ये मध्ये जरा रटाळ होते.
- KALYANI GADGIL
Dear Mukta Deshpande,
I just finished reading Commander Dilip Donde" book translated by you "Saagaree Parikramecha Parakram".
The book is written very well and you have translated it very well too. It sounds like it is written in Marathi itself. I can see your command on the language as well as your efforts to learn new technological words.
Please accept my heartfelt congratulations.
With regards,
Kalyani
- DAINIK SAMANA, 03-NOV-2019
शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करणाऱ्या कमांडरची साहसगाथा...
कमांडर दिलिप दोंदे - शिडाच्या बोटीतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे भारताच्या सागरी इतिहासातील पहिले भारतीय. त्यांनी १९ मे २०१० या दिवशी आयएनएसव्ही ‘म्हादेई’ ही शिडाची बोट मुंबई बंदरात आणली आणि हा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला. जगातील २००पेक्षाही कमी लोकांनी साध्य केलेली ही कामगिरी करण्याचा प्रयत्न यापूर्वी आपल्या देशात कोणीही केला नव्हता. या पृथ्वीप्रदक्षिणेचे आणि तिच्या पूर्वतयारीचे अनुभव ‘द फर्स्ट इंडियन’ या पुस्तकात दिलिप दोंदे यांनी शब्दबद्ध केले आहेत. या पुस्तकाचा अनुवाद ‘सागरी परीक्रमेचा पराक्रम’ या शीर्षकासह मुक्ता देशपांडे यांनी केला आहे.
एका नौदल अधिकाऱ्याने सहज बोलता बोलता शिडाच्या बोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करण्याची कल्पना मांडली आणि तितक्याच सहजतेने ती कल्पना प्रत्यक्षात आणण्याची तयारी दिलिप दोंदे यांनी दर्शवली आणि मग सुरू झाली त्या मोहिमेची पूर्वतयारी. अर्थातच त्यासाठी शिडाच्या बोटीतून प्रवास करणे, ती बोट चालवणे, त्या प्रवासादरम्यान बोटीच्या बाबतीतील तांत्रिक गोष्टी शिकून घेणे, त्या प्रवासादरम्यान काय समस्या उद्भवू शकतात, याची चाचपणी करणे इ. गोष्टींचं प्रशिक्षण घेणं आवश्यक होतं. त्या प्रशिक्षणासाठी शिडाच्या बोटीतून जगप्रवास केलेल्या लंडनच्या सर रॉबिन यांच्याकडे दोंदे यांनी उमेदवारी केली. त्या उमेदवारीत दोंदे यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. या उमेदवारी दरम्यानचे अनुभव दोंदे यांनी नोंदवले आहेत. मग बोट चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी म्हणा किंवा अनुभवासाठी म्हणा कोणतीही संधी दवडण्याची दोंदे यांची तयारी नव्हती. दक्षिण आफ्रिकेतून अमेरिकेत एक बोट घेऊन जाण्याची संधी त्यांना दक्षिण आफ्रिकेतील नौदलातल्या कमांडरने देऊ केली होती. त्या संधीचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जी पूर्तता करायची होती, त्यासाठी त्यांच्या हातात फक्त आठ दिवसांचा कालावधी होता. तरीही त्यांनी त्या पूर्ततेसाठी यातायात केली; पण अगदी शेवटच्या क्षणी ती संधी त्यांच्या हातून निसटली. तो अनुभव वाचल्यानंतर वाचकही हळहळतो.
‘समीर’ या जुन्यापुराण्या बोटीवर त्यांचं प्रशिक्षण सुरू होतं. त्यांच्या पृथ्वीप्रदक्षिणेसाठी जी बोट तयार करायची होती, त्यासाठी चार बोट यार्डांकडून निविदा मागवण्यात आल्या. त्यातील जी निविदा कमी खर्चाची असेल, ती निविदा स्वीकारायची असं ठरलं आणि त्यानुसार ‘अॅक्वेरियस फायबर ग्लास’ या कंपनीची निविदा स्वीकारण्यात आली. पृथ्वीप्रदक्षिणेसाठीची बोट या कंपनीचे रत्नाकर दांडेकर करणार होते. गोव्याला हे बोटनिर्मितीचं काम होणार होतं. बोटीची गर्भगृहनिर्मिती, ती बोट तयार करताना रत्नाकर यांना आलेल्या अडचणी, उदा. बोटीचा गाभा बनविण्यासाठी आणलेलं लाकूड पुरेसं वाळलेलं नसणं, बोटीच्या लॅमिनेशनमध्ये आलेली अडचण आणि या अडचणीवर रत्नाकर यांनी शोधलेले उपाय, या बोटीसाठी ‘म्हादेई’ हे नाव कसं सुचलं, रॉबिन यांचं बोटबांधणीच्या संदर्भात रत्नाकर यांना झालेलं मार्गदर्शन, सांगाडा उलटा करून बोट लॅमिनेशनने आच्छादण्याचं कष्टाचं काम, बोट नाळेवर बसवणे, बोटीची रंगरंगोटी, पौर्णिमेच्या दिवशी बोटीची पूजा करून बोटीने नदीत केलेला प्रवेश, बोट तयार करताना सर रॉबिन आणि योहान यांचं झालेलं मोलाचं मार्गदर्शन, बोटीवर उपकरणं बसविण्याचं महत्त्वपूर्ण काम, तिची घेतली गेलेली चाचणी आणि या बोटीने माजी व्हाइस अॅडमिरल आवटी यांच्यासह दोंदे यांनी गोवा ते मुंबई असा केलेला प्रवास इत्यादी या बोटीच्या संदर्भातील तपशीलवार विवेचन वाचताना वाचक अक्षरश: भारावून जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलेल्या वेळेच्या मर्यादेत या बोटीची निर्मिती आणि त्यानंतरच्या चाचण्या, त्या चाचण्यांनंतर करायच्या सुधारणा हे सगळं साध्य करायचं होतं.
प्रत्यक्ष मोहीम सुरू होईपर्यंतचे अनेक अनुभव दोंदे यांनी सांगितले आहेत. मोहीम सुरू झाल्यानंतर ते ब्लॉग लिहून वृत्तपत्राकडे पाठवत होते. त्या ब्लॉग्जमधून समुद्रसफरीतील त्यांचे अनुभव वाचायला मिळतात. अगदी ते कोणते खाद्यपदार्थ करत होते, कोणती पुस्तकं त्यांनी या प्रवासादरम्यान वाचली, चाचांची भीती, जलचरांचे दर्शन, जीवघेणे प्रसंग इ. वर्णन त्यांनी या ब्लॉग्जमधून केलं आहे. परदेशातील ज्या दोन ठिकाणी ते थांबले होते, तिथेही त्यांचं खूप छान स्वागत करण्यात आलं. तेही अनुभव त्यांनी नोंदवले आहेत.
एकूणच, दोंदे यांनी पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचं ठरवल्यापासून ते त्यांची सफर पूर्ण होईपर्यंतचा हा प्रवास रोमहर्षक आहे; पण त्यादरम्यान नोकरशाहीच्या अडेलतट्टूपणाचं, झापडबंदपणाचं जे दर्शन त्यांना घडलं त्याचेही अनुभव त्यांनी लिहिले आहेत. जसं, त्यांची बोट तयार करायलाही सुरुवात झालेली नसताना त्यांना प्रवासाची तारीख निश्चित करायला लावणे आणि एवूâणच ज्या ज्या वेळेला परवानगीची आवश्यकता होती त्या त्या वेळेला सरकारी ऑफिसेसचे झिजवावे लागलेले उंबरठे, त्यात झालेली दमछाक आणि कालापव्यय याबद्दल त्यांनी लिहिले आहे. कागदी घोड्यांचा हा अट्टहास एखाद्याच्या महत्त्वाकांक्षेची, सहनशक्तीची कित परीक्षा पाहतो, हे या अनुभवांतून सूचित होतं.
कोणतीही चांगली गोष्ट करताना देश-परदेश असा भेदभाव राहत नाही, तर मदतीचे, प्रोत्साहनाचे अनेक हात पुढे येतात, ही जाणीव पुस्तक वाचल्यानंतर होते. त्यांच्या या मोहिमेशी ज्या व्यक्ती जोडलेल्या होत्या, त्यापैकी रत्नाकर दांडेकर यांच्या पहिल्यावहिल्या बोटनिर्मितीला, त्यांच्या समर्पित वृत्तीला सलाम करावासा वाटतो. सर रॉबिन आणि योहान यांचा अनुभव आणि त्यांनी रत्नाकर यांना केलेली मोलाची मदत, यामुळे त्या दोघांबद्दल वाचकाच्या मनात आदर निर्माण होतो. हे दोघं, रत्नाकर आणि माजी अॅडमिरल आवटी यांच्याशी असलेल्या दोंदे यांच्या भावबंधाचंही मनोज्ञ दर्शन या पुस्तकातून घडतं. ८० वर्षांच्या आवटींचा उत्साह स्तिमित करतो. हे सगळे अनुभव दोंदे यांनी अगदी साध्या, सोप्या, ओघवत्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय झालं आहे.
दुर्दम्य जिद्द, जबरदस्त इच्छाशक्ती यांचं दर्शन घडविणारी ही साहसगाथा मुळातून वाचण्यासारखी आणि प्रेरणादायक आहे.