- Rashmi Sasane
कालखंड कोणताही असो, एखाद्या दर्यावर्दी खलाशाचं जीवन हे नेहमीच रोमांचकारी घटनांनी भरलेले असतं. दर्यावरच्या मोहिमेत प्रत्येक दिवस हा त्याच्यासाठीचा एक नवीनच अनुभव असतो. आजच्या विज्ञानयुगात माहिती मिळवण्याची अनेक साधने हाताशी आहेत. अनेकानेक गोष्टींविषयीच ज्ञान सहजपणे मिळू शकतं. त्यामुळे कदाचित या सागरी मोहीमा थोड्याफार सुकर झालेयत, अस आपण नक्कीच म्हणू शकतो. पण जर समजा , हा कालखंड अठराव्या शतकातील असेल तर? ज्यावेळेस माहिती मिळवण्याची साधनं तुटपुंजी होती. अगदी समुद्राच्या एखाद्या भागाची, एखाद्या बेटाची माहिती मिळवायची असेल तर त्या भागात भेट देऊन आलेल्या व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून राहावं लागायचं. त्या व्यक्तीने दिलेली माहिती ही परीपूर्ण असेलच अस ही नव्हतं.पुढे ती माहिती एकमेकांना सांगताना तिखटमीठ लावून सांगितली जायची. आणि मग त्या माहितीच्या गुढरम्य कहाण्याच बनून जायच्या.
` Typee ` ही पण एक गुढरम्य कहाणीच आहे. १८४२ मध्ये हर्मन मेलव्हिल हा खलाशी एका सागरी मोहिमेत सहभागी झाला. या प्रवासातील घटनांचे शब्दचित्र म्हणजे
हे पुस्तक, ` Typee ` या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केलाय भानू शिरधनकर यांनी ` पाचूचे बेट ` या नावाने.
पँसिफिक महासागरात मासेमारीच्या मोहीमेसाठी जहाजे उतरत. या मोहिमा अगदी चार - पाच वर्षे सतत चालत. या मुदतीचं वर्णन करताना लेखक म्हणतो, या मोहिमेत सहभागी झालेले कोवळे तरुण आपल्या आईचा निरोप घेऊन रवाना झाले ते पुन्हा परत आपल्या बंदरात आले त्यावेळी अर्धम्हातारे झाले होते.
जहाजावरील सोयी- सुविधांच्या अभावी निर्माण झालेली गचाळ परिस्थिती, कधीकधी जहाजाला मिळालेला विक्षिप्त, हट्टी कप्तान आणि महिनोनमहिने दुर्लभ झालेल जमिनीच दर्शन यामुळे या सागरी मोहिमा म्हणजे एक नाईटमेर असत. लेखक हर्मन मेलव्हिल ` डॉली ` नावाच्या जहाजावर खलाशी म्हणून सहभागी होतो. ही मोहिम एवढी लांबते की जहाजावरील अन्नधान्य संपत येऊ लागतं, जहाजावरील खलाशांच मनोधैर्य डळमळू लागत. आणि अशा परिस्थितीत लेखक जहाजावरुन फरार होण्याचा निर्णय घेतो, जो फार धोकादायक निर्णय असतो.
नुकूहेवा नावाच्या बेटावर त्यांचे जहाज थोड्या काळासाठी थांबले असताना लेखक त्या जहाजावरुन फरार होण्यात यशस्वी होतो. यात त्याला जहाजावरचा आणखी एक खलाशी ही सामील होतो, ज्याचं नाव असतं, टॉबी. आणि इथून सुरु होते ,त्यांची थरारक,
` फरार - सफर `. या प्रवासाच वर्णन लेखकाने बहारदार केलयं. समुद्राच्या लगत असणाऱ्या बेटावरचं हवामान, वातावरण, उंचच उंच टोकदार डोंगर, खोल दऱ्या, घनदाट जंगलाने व्यापलेला परीसर अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर साकारतो. या बेटावरील रहिवासी तर खासचं. त्यांची पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणारी जीवनशैली, त्यांची अगम्य भाषा आणि हो, त्यांच्या नरभक्षी असण्याच्या अफवा (?) शेवटी कितीही भिती वाटत असली , जीवघेणा धोका वाटत असला तरी या दोन फरार लोकांना या बेटावरच्या आदीम लोकांनाच धरून राहावं लागणार असतं.
त्याप्रमाणे हे दोन फरार खलाशी त्यांच्या कल्पनेतही नसणारा असा अनपेक्षित धोकादायक प्रवास करून अखेरीस एका खोऱ्यात उतरतात....टैपी जमातीच्या खोऱ्यात. आणि ही टैपी जमात नरभक्षी म्हणून कुप्रसिद्ध असते. मग या दोन खलाशांना त्यांचा काय अनुभव येतो? ही सगळी कहाणी सांगण्यासाठी ते जिवंत कसे राहतात?सर्व दर्यावर्दी लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे हे टैपी लोक खरचं का नरभक्षी असतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे.
Typee हे पुस्तक म्हणजे लेखक हर्मन मेलव्हिल चा पोलिनीशीनय बेटावर घालवलेल्या चार महिन्यांचा ऐतिहासिक लेखाजोखा आहे की ज्यामध्ये हर्मन मेलव्हिल ने या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी वास्तवात घडल्या आहेत, असा दावा केलाय. १८४६ मध्ये पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुस्तकात वर्णन केलेल्या घटनांच्या सत्यतेबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. हे पुस्तक म्हणजे कल्पनाविलास की वास्तविकता , यावर चर्चा घडू लागल्या होत्या. अगदी हर्मन मेलव्हिल नावाची व्यक्ती खरोखरच अस्तित्वात आहे का? यावरही संशय घेतला जाऊ लागला होता. या वादळी चर्चा शिगेला पोहोचल्यावर ज्यावेळेस हर्मन मेलव्हिलची इतिहासकार म्हणून कारकीर्द धोक्यात येतीय अस वाटल्यावर , त्याने स्वतः त्याच्या डिफेन्स मध्ये एक निनावी लेख प्रकाशित करण्याचे ठरवले पण त्या आधीच या कथेची सत्यता सिद्ध करण्यासाठी लेखकाचा, त्याच्या फरार- मोहीमेतील दुसरा साथीदार, टोबी त्याच्या मदतीला आला. आणि त्याच्या साहाय्याने हर्मन मेलव्हिल ने Typee चा उत्तरार्ध, The story of Toby, A sequal of Typee लिहीला. त्यामुळे या पुस्तकाच्या सत्यतेविषयीचा उठलेला संशयाचा धुरळा खाली बसला.
पुस्तकातील ख्रिश्चन मिशनरी लोकांच्या कामाविषयीच्या नकारात्मक वर्णनावर पण काही वाचक नाराज होतेच, पण लेखक आपल्या त्या मतांवर ठाम राहिला.
एकुणच Typee हे एका अज्ञात संस्कृती चे छोटेखानी दर्शन घडवणारं पुस्तक ठरतं.
एका आयुष्यात अनेक प्रकारच्या आयुष्याचे अनुभव देण्याची क्षमता पुस्तकात असते , मग ते अनुभव आपल्यासाठी काल्पनिक का असेनात . त्यापैकी Typee हे पुस्तक आहे.
अनुवादाविषयी::
Typee या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भाषेत अनुवाद केला आहे, भानू शिरधनकर यांनी ` पाचूचे बेट ` या नावाने. अनुवाद इतका सुंदर, ओघवता झाला आहे की आपण एक अनुवाद वाचतोय हे लक्षातच येत नाही.
- Naresh Mohare
जेव्हा नविन नविन बेटानचा शोध लावला जात होता तेव्हा समुद्रा वरील बोटीतून 2खलाशी पळून जावुन जंगलात जातात आणि तेथे ते जंगलातील नर भक्षक लोकाना भेटतात आणि त्याच्या सोबत काढलेल्या दिवसाचे वर्णन लेखकाने येथे दिले आहेत.
वेळ काढून नक्की वाचा.
- Kaushik Lele
युरोपियन लोकांच्या धाडशी समुद्र सफरी ऐन भरात असण्याचा काळात इ.स. १८४१ मध्ये या पुस्तकाचा लेखक हर्मन दक्षिण अमेरिकेजवळच्या महासागरात एका समुद्र सफरीवर निघालेल्या जहाजात खलाशी होता. त्यांचे जहाज सतत सहा महिने समुद्रात फिरत होते. शेवटी एकदा त्यांना जमीन दिसली ती पॉलिनेशियन बेटांची. प्रवासाला कंटाळलेला हा खलाशी जहाजावरुन पळून जाऊन त्या बेटांवरच राहायचा बेत आखतो. बोटीवरचा अजून एक जण त्याच्या बरोबर साथ द्यायला तयार होतो. जहाजापासून दूर पळून जातात. बेटावर निसर्गाच्या सान्निध्यात फळं, कंद खात मस्त राहू अशी त्यांची कल्पना. पण कसलं काय. खडतर दिवस त्यांच्या समोर उभे राहतात. डोंगर दऱ्या ओलांडून, भुके तहानलेले राहून ते शेवटी पोचतात त्या बेटावरच्या नरभक्षक “टैपी” लोकांच्या प्रदेशात. आता आपले दिवस भरले अशी त्यांची कल्पना झाली. पण त्या आदिवासींनी त्यांना ठार मारलं नाहीच; उलट त्यांचं चांगलं स्वागत केलं, पाहुणचार केला. त्यांच्या दुखण्यावर उपचार केले.
चार दिवस पाहुणचार घेऊन निघू असा विचार केल्यावर मात्र त्यांच्यापुढे नवंच आव्हान उभं राहिलं. ते आदिवासी त्यांना सोडायलाच तयार नव्हते. ते आदिवासी आपला प्रेमाने पाहुणचार करतायत का पुढेमागे बळी देणाऱ्याची तयारी अश्या द्विधा मनःस्थितीत दोघं तिथे राहिले. बरेच महिने राहिले. युरोपियन खलाशी आणि ख्रिश्चन धर्मोपदेशकांनीं जशी “टैपी” लोकांची प्रतिमा रंगवली होती तसे ते क्रूर नव्हते. या आदिवासिंची संस्कृती जवळून बघितली तेव्हा त्याला जाणवलं की युरोपियन लोकांपेक्षा हे लोक खूप मागास असले तरी निसर्गाशी एकरूप झालेले आहेत, त्यांचा त्यांचा दिनक्रम आनंदाने जगतायत. तथाकथित “प्रगत”, “धार्मिक” जगापेक्षा त्यांची समाजव्यवस्था उलट कमी समस्यांची आहे. युरोपियन लोकांमुळेच उलट इथे रोगराई वाढते आहे असं त्याचं मत बनलं .
लेखकाला या बेटावरचं जग कसं दिसलं, टैपी लोकांचं खानपान, धार्मिक विधी, मनोरंजनाची साधनं, स्त्रीपुरुष समाजरचना, प्राणिवैविध्य, झाडं-झुडपं असं त्याला जे जे काही दिसलं, जसं दिसलं त्याचं वर्णन त्याने या पुस्तकात केलं आहे. ललित स्वरूपात लिहिलेला एक रिपोर्टच. पुस्तकातली ही काही पानं वाचा म्हणजे कल्पना येईल
या बेटांची आधी थोडी ओळख करून घेऊया
- Hemant Latkar
छान आहे.
- DAINIK LOKMAT 05-05-2019
समुद्रसफरीतील रंजक कादंबरी...
एकोणिसाव्या शतकातील न्यू यॉर्क येथील प्रसिद्ध लेखक आणि तनमनाने दर्यावर्दी असलेले हर्मन मेलव्हिल यांनी १८४१ मध्ये अमेरिकेतील दक्षिणी समुद्राची सफर केली. या सफरीच्या दुसऱ्या वर्षात ते पॉलिनेशियन बेटांवर पोहोचले. या बेटांवरील टैपी या आदिवासी जमातीसोबत त्यांनी काही काळ घालवला. या विलक्षण अनुभवांवर आधारित असलेली ‘टैपी’ ही कादंबरी त्यांनी त्यानंतर पाच वर्षांनी लिहिली. तिचा मराठी अनुवाद आता ‘पाचूचे बेट’ या नावाने नुकताच प्रकाशित झाला आहे. टैपी लोकांसोबत घालवलेले चार महिने आणि सुटकेसाठी केलेले प्रयत्न याचे रोमहर्षक वर्णन असलेल्या या कादंबरीत लेखकाच्या साहसी मनाचे आणि प्रवाही तत्त्वचिंतनाचे छान प्रतिबिंब पडले आहे. लेखकाची कथनशैली वाचकाला बांधून ठेवते.
- LOKPRABHA 12-04-2019
शिरधनकर यांचे साहित्यघन...
साठ ते ऐंशीचे दशक वैविध्यपूर्ण लिखाणाने गाजविणाऱ्या भानू शिरधनकर यांची पुस्तके आज वाचकांना माहिती नसल्याने विस्मृतीत गेली आहेत. त्यांनी अनुवादित केलेली दोन पुस्तके गेली अनेक वर्षे अनुपलब्ध होती. मेहता पब्लिशिंग हाऊसने ती दुर्मीळ झालेली पुस्तके मिळवून त्यांचे पुनर्प्रकाशन केले. त्यानिमित्ताने आपल्याकडील वाचनव्यवहारासोबत शिरधनकर यांच्या साहित्याचा घेतलेला हा शोध...
एकूणच लेखकांना घाऊकरीत्या विसरले जाण्याच्या या आरंभ काळात मेहता पब्लिशिंग हाऊसने वेगवेगळ्या कारणांनी गतस्मृत झालेल्या भानू शिरधनकर यांच्या दोन अनुवादित पुस्तकांच्या केलेल्या जीर्णोद्धाराची घटना ही आजच्या वाचकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. एकोणीसशे चाळीस ते सत्तर या काळात अफाट लेखनप्रपंच करून या लेखकाने मराठी साहित्याला अत्यंत नवख्या असलेल्या विषयांची भर घातली होती. वाचनवेड, प्राणी-पक्षी, सागरी साहस, गुन्हेगारी विश्व, समुद्रामार्गे होणारी सोन्याची तस्करी, क्रीडा अशा सर्वच विषयांवर भाषिक सामर्थ्याने त्यांनी लेखणी चालवली.
चाळीसच्या दशकापासून शिरधनकर यांनी ‘किर्लोस्कर’मध्ये सागरी जीवनावरच्या आपल्या आणि इतरांकडून ऐकलेल्या अनुभवांना शब्दबद्ध करण्यास सुरुवात केली. ‘उधानवारा’, ‘सागर संग्राम’, ‘शिमाळ आलं, शिमाळ आलं!!’ ही रिपोर्ताजरूपी लेखांची सागरी जीवनावरील इत्थंभूत माहिती देणारी मराठीतील पहिली-वहिली पुस्तके शिरधनकर यांच्या नावावर आहेत. त्यामुळे जगप्रसिद्ध अमेरिकी लेखक हर्मन मेलविल यांच्या एकोणिसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या ‘बिली बड’ आणि ‘टायपी’ या सागरी जीवनावरच्या कादंबऱ्या त्यांच्याजवळ अनुवादासाठी आल्या असाव्यात. १९६६ साली दोन्ही कादंबऱ्या ‘पाचूचे बेट’ आणि ‘शिस्तीचा बळी’ या नावाने एकाच पुस्तकाद्वारे प्रकाशित झाल्या होत्या.
– पंकज भोसले