- Kudekar Subhash
It`s best readable collection of scientific concepts and ideas of the human mind.
Great sir...
- TUSHAR KUTE
डॉ. जयंत नारळीकर, निरंजन घाटे व बाळ फोंडके यांच्यानंतर मी वाचलेले डॉ. संजय ढोले हे चौथे विज्ञान कथा लेखक आणि त्यांचा "डिंभक" हा विज्ञान कथासंग्रह! आपल्या आवडत्या विषयात वाचन करण्याची मजाच काही और असते. `मनोरंजनाबरोबरच कुतूहल जागृत करणाऱ्या लक्षवेधक विज्ञानकथा` या सारांशाने मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. विज्ञानाला अनुसरून लिहीलेल्या जवळपास सर्वच कथांची भट्टी छान जमून आलीये.
पुस्तकाच्या मलपृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे कथांचा सारांश असा...
नॅनो तंत्रज्ञानाद्वारे मृतांना जिवंत करण्याचा प्रयोग... मृत माणसाच्या मेंदूचे रोपण जिवंत कुत्रीच्या शरीरात करणे... भविष्यात नेऊ शकणारी खुर्ची आणि एका राजकीय नेत्याने तिचा केलेला गैरवापर... शिशाच्या अणूचे सोन्याच्या अणूमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झाल्याने मालामाल झालेला शास्त्रज्ञ... परग्रहावरील डिंभक... पिंजकामुळे लाभलेल्या अदृश्य होण्याच्या शक्तीमुळे एका शास्त्रज्ञाने अतिरेक्यांचा केलेला खात्मा... क्लोननिर्मिती... गर्भाबरोबरच वाढणाऱ्या ट्युमरला शास्त्रज्ञाने दिलेली मात... ग्राफीनच्या कणांवरचे संशोधन... विशिष्ट प्रयोगाद्वारे खुन्यापर्यंत पोहोचणारा शास्त्रज्ञ... एक विचित्र कीटक. अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांचा सदुपयोग व दुरुपयोग करणारे शास्त्रज्ञ. त्यातून घडणारे मानवी मनाचं दर्शन. वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी मन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या रंजक विज्ञान कथांचा वाचनीय संग्रह...
थोडसं वेगळं सांगायचं तर बऱ्याच कथांमध्ये ध्येयवेडे शास्त्रज्ञ व त्यांची प्रयोगशाळा अशी कथा रचना तयार झाली आहे. त्यामुळे कथेचा मूळ गाभा जरी वेगळा असला तरी त्यात सारखेपणा जाणवत राहतो. लेखकाने विज्ञानाच्या सर्व अंगांचा विचार केल्याचेही दिसते. एकंदरितच विज्ञान प्रेमींनी हे पुस्तक वाचावे असेच आहे.
- DAILY LOKSATTA LOKRANG 29.9.19
मराठीत कसदार विज्ञानकथालेखन हे अभावानेच आढळते. विज्ञानकथांचा उद्देश हा विज्ञान समजून सांगण्याचा नसला, तरी त्यातून नकळत वाचकाला विज्ञानातील संकल्पनांचा आपोआप परिचय होत जातो. त्याशिवाय विज्ञानातील शक्यतांचा आवाकाही लक्षात येतो. अर्थात या विज्ञानकथांचे सूत्र हे नेहमीच मानवी मूल्यांशी नाळ जोडणारे असावे लागते. डॉ. संजय ढोले यांच्या ‘डिंभक’ या विज्ञानकथासंग्रहात आपल्याला जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, नॅनो तंत्रज्ञान अशा असंख्य विज्ञान शाखांतील नवनव्या संकल्पनांची सांगड घातलेली बघायला मिळते. ‘डिंभक’ हा त्यांचा पाचवा विज्ञानकथासंग्रह. नव्या दमाचे विज्ञानकथाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहेच. त्याला साजेशा अशाच या कथा आहेत.
त्यांच्या या कथांमधील नायक हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने वाचकाला या कथा परक्या वाटत नाहीत. यातील कथासूत्रे मांडताना त्यांना ते विज्ञान विषयाचे प्राध्यापक असल्याचा निश्चितच फायदा झालेला आहे. कुठलीही संकल्पना आधी माहीत असेल तरच ते कथासूत्र विस्तारणे व सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडणे शक्य असते. त्यामुळे त्यांचे लेखन हे सामान्य माणसाला समजेल असे आहे. त्यासाठी वाचकाला विज्ञान शाखेचा परिचय असलाच पाहिजे, असे मुळीच नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वच प्रश्नांना विज्ञानात उत्तरे आहेत असे नाही, कारण त्याहीपलीकडे असे काही आहे तेही यातून जाणवते. निसर्गचक्रात बदल करून आपण वाटेल ते करू शकतो हा माणसाचा अहंगंड असतो. त्यालाही टाचणी लावणाऱ्या कथा यात आहेत.
त्यामुळेच या कथा वाचकाला अंतर्मुख करतात. क्लिष्ट वैज्ञानिक परिभाषा सोपी करत ते या कथांची गुंफण अशा लालित्यपूर्ण पद्धतीने करतात की, कथाबीज भाषेशी एकरूप होऊन जाते. कुठेही तांत्रिक पद्धतीने माहितीवजा काही तरी सांगितले आहे, असे वाटत नाही. कथांतील वैज्ञानिक प्रयोगातील शक्यता व प्रसंगी धोकेही अंगावर शहारे आणतात. यातील कथांमध्ये समाजजीवन, त्यातील भावभावनांची गुंतागुंत, मानवी संवेदना, विज्ञान परिकल्पना, रहस्यमयता, अद्भूतता आहे. वाचकांची उत्कंठा ताणून धरण्याचे कसब ढोले यांना साध्य झालेले आहे.
‘डिंभक’ या मुख्य कथेत उल्केवर सापडलेल्या अंडकोशाच्या फलनातून निर्माण झालेला डिंभक कसा बाटलीतला राक्षस बनून जातो.. हे दाखवले आहे. त्याला स्वत:ची बुद्धी व शक्ती असण्याची वेगळी कल्पना या कथेत दिसते. मग त्याला नियंत्रणात आणण्यासाठी प्रा. शेंडे व प्रा. नाथ यांची धावपळ, खोल खड्डा खणून त्यात ती उल्का व ती डिंभकाची बाटली शिशाच्या वेष्टनात घालून गाडून टाकण्याची युक्ती.. हे सगळे वेगळे जग आहे. यात डॉ. नाथ हे प्राणिशास्त्रज्ञ आहेत, तर प्रा. शेंडे हे भौतिकशास्त्रज्ञ आहेत. याचा अर्थ, एखाद्या संशोधनात केवळ एकाच शाखेचे ज्ञान असूनही उपयोगाचे नसते. काही वेळा त्यात इतर ज्ञानशाखांची जोड लागते- ती शेंडे यांच्या रूपाने दिली आहे. ‘सुगाव’ या कथेतही गुन्ह्यंच्या तपासात भूतकाळातील ध्वनिलहरींची जशीच्या तशी निर्मिती करण्याच्या तंत्रज्ञानाने गुन्ह्यचा छडा लावण्याची युक्ती तशी गुंगवून ठेवणारी. यातील परिसर व पात्रे मात्र जवळची वाटणारी, त्यामुळे ही कथा प्रभाव पाडून जाते. आजकाल लोकसंख्या वाढतच असली तरी अनेक जोडपी ही अपत्यसुखापासून वंचित असतात. ‘विळख’ या कथेतील मीनल व मिलिंद या कलावंत दाम्पत्याची कथा अशीच वेगळ्या अंगाने जाणारी आहे. मीनलच्या गर्भाशयात एकाचवेळी बाळ व कर्करोगाच्या पेशी वाढत असतात. यात सरतेशेवटी मीनलला वाचवण्यासाठी गर्भाशय काढून टाकण्याची वेळ येते, पण मीनलची अपत्याची आस तसे होऊ देत नाही. मग बाळ जन्मालाही येते, पण नंतर मीनलच्या पोटात कर्करोग वाढतो. अशा वेळी भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सुरेश गोसावी तिला वाचवण्यात मदत करतात. या कथेतील आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलवणारे चित्रण खिळवून ठेवणारे आहे. यात कोणतेही एक शास्त्र एकटय़ाने आपल्या समस्या सोडवण्यास पुरेसे नाही, हेच पुन्हा डॉ. ढोले येथे दाखवून देतात.‘सोनियाची खाण’ ही कथा माणसाला असलेल्या सोन्याच्या हव्यासाची आहे. यात डॉ. शिवराम मानेशिंदे हे सोने तयार करण्याच्या वेगळ्या प्रक्रियेचा शोध लावून श्रीमंत होतात, पण त्यात त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. निसर्गातील रंगद्रव्यांवर आधारित ‘पिंजक’ या कथेत मूळ काश्मीरचे वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. हमीद रेहमान हे व्यक्तीला अदृश्य करण्याचे तंत्रज्ञान शोधून काढतात, पण नंतर ते तंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती लागू नये यासाठी प्राणांचे बलिदान देतात. या संग्रहातील प्रत्येक कथा काही तरी वेगळेपण घेऊन आलेली आहे. त्यामुळे आपण शेवटच्या कथेपर्यंत कधी येऊन ठेपतो ते कळतही नाही.
- DAINIK SAKAL (SAPTRANG) 28-04-2019
सामाजिक जाणिवांच्या विज्ञानकथा...
डॉ. संजय ढोले यांचा ‘डिंभक’ हा विज्ञानकथांचा संग्रह अलीकडंच प्रकाशित झाला आहे. डॉ. ढोले यांचा हा पाचवा विज्ञानकथासंग्रह. नव्या पिढीचे ते वैशिष्ट्यपूर्ण कथाकार आहेत. ‘डिंभक’मध्ये बारा कथा आहेत. प्रत्येक कथा दुसऱ्या कथेपेक्षा निराळी आहे. आशय, विज्ञानसूत्र असो वा व्यक्तिरेखांचं चित्रण असो. या कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. विज्ञानकथेमध्ये आत्तापर्यंत निर्माण झालेल्या परंपरेला वेगळी दिशा देणारी ही कथा आहे. ढोले यांची पार्श्वभूमी दुर्गम आदिवासी भागातली आहे. पुढं संशोधन आणि अध्यापन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतरही त्यांना या पार्श्वभूमीचं विस्मरण झालेलं नाही. हे या कथा वाचताना सतत जाणवत राहतं. त्यांचे कथानायक सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. त्यांच्या विज्ञानकथांमधून चित्रीत झालेल्या प्रश्न आणि समस्यांचा पायाही सामान्य समाजजिवनाचाच आहे. त्यांचे कितीतरी कथानायक प्रतिकूल परिस्थितीशी झगडून विज्ञानाच्या संशोधन क्षेत्रात स्थिर झाल्यावर त्यांची पाळंमुळं विसरत नाहीत, हे ढोले यांच्या कथानायकांचं वेगळेपण आहे.
‘डिंभक’मधल्या कथा वाचल्यानंतर त्यातली चार सूत्रं लक्षात येतात. पहिलं सूत्र म्हणजे निसर्गात माणसानं हस्तक्षेप केला, तर निसर्ग माणसाला क्षमा करू शकणार नाही, या वास्तवाची जाणीव जितक्या लवकर मानवी समाजाला होईल तितकं ते त्यांच्या भल्याचं आहे. दुसरं सूत्र म्हणजे इतर क्षेत्रांप्रमाणं विज्ञान-संशोधनक्षेत्रातदेखील नैतिकता हे मूल्य पाळणं गरजेचं नव्हे अटळ आहे. विज्ञान-संशोधनात हे विचारात घेतलं नाही, तर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि याबाबतची जबाबदारी वैज्ञानकिांना नाकारता येणार नाही. तिसरं सूत्र म्हणजे विज्ञानाचा समाजासाठी विधायक वापर व्हायला हवा. चौथं सूत्र म्हणजे कोणत्याही क्षेत्रात मानवी संवेदना महत्त्वाची असते. ही संवेदनाच खऱ्या अर्थानं मानवाबद्दल करुणा, प्रेम, सहानुभूती निर्माण करू शकते.
डॉ. संजय ढोले यांच्या कथांमधून प्रकटणारी ही सूत्रं पाहिली, तर त्यांच्या लेखनाची प्रेरणा आणि प्रयोजन लक्षात येतं. केवळ रंजन म्हणून या कथा लिहिल्या गेल्या नाहीत. या कथांमध्ये काही प्रमाणत रहस्यमयता, अद्भुतता, उत्कंठा या गोष्टी आढळतात; पण या रहस्यकथा नाहीत. डॉ. ढोले हे चांगल्या रहस्यकथा लिहू शकतात. त्याच्या खुणा या कथालेखनात आढळतात. मात्र, त्यांना विज्ञानकथाच लिहायच्या असल्यामुळं कथानकाची गरज म्हणून रहस्यमयता, अद्भुतता या कथांमध्ये आली आहे. विज्ञानातली परिभाषा ही बऱ्याचदा क्लिष्ट आणि बोजड असते. सर्वसामान्य माणसाला त्याचं आकलन होत नाही. याची जाणीव लेखकाला असल्यामुळं त्यांनी विज्ञानकल्पना, गृहितकं, परिभाषा सुबोध पद्धतीनं मांडली आहे. इंग्रजीतल्या अवघड संकल्पना त्यांनी सोप्या मराठीत उलगडून दाखवल्या आहेत. त्यामुळं वाचक अडखळत नाही.
‘डिंभक’ या कथासंग्रहातून मानवी भावभावनांचा गुंता अधोरेखित झाला आहे. त्याप्रमाणं समकालीन समाजातल्या प्रश्नांचा भविष्यकालीन वेध आहे. ‘विळखा’ कथेतल्या मीनल आणि मिलिंद या कलावंत दाम्पत्याला अपत्यप्राप्तीचं सुख लवकर प्राप्त होत नाही, परंतु डॉ. थत्ते यांच्यामुळं ते शक्य होतं; पण प्रसूतीकाळात जे नाजूक प्रश्न निर्माण होतात त्याची सोडवणूक डॉ. सुरेश गोसावी कशा पद्धतीनं करतात याचं चित्रण ढोले यांनी केलं आहे. ‘द डे आफ्टर’ या कथेत अणुबॉम्ब स्फोट झाल्यावर कोणत्या प्रकारचा विध्वंस होतो, त्याचं अंगावर काटे आणणारं, भयचकित करणारं चित्रण वाचायला मिळतं. एखाद्या माथेफिरूनं जाणीवपूर्वक असा स्फोट घडवला तर मानवी संहाराची काय अवस्था असू शकते याचं वर्णन सुजाण वाचकाला अंतर्मुख करतं. ‘अभय’ कथेतले प्रा. सोमादित्य बॅनर्जी हे शास्त्रज्ञ मृत माणसांना जिवंत करण्याचा शोध लावतात; पण हा शोध त्यांच्या अंगलट येतो. त्यांच्या मृत मित्राच्या शरीरावर प्रयोग करून ते त्याला जिवंत करतात आणि मित्राच्या मनातली डॉ. बॅनर्जी यांच्याविषयीची द्वेषभावना तीव्रतेनं उफाळून येते आणि तो डॉ. बॅनर्जींना ठार करतो. विज्ञानशोधामुळं मृत माणसं जिवंत झाली, तर मानवी जीवनव्यवहारात अधिकच गुंता निर्माण होऊ शकतो आणि तो विज्ञानाच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतो ही बाब ढोले यांनी फार समर्पकपणे समोर ठेवली आहे.
‘सोनियाची खाण’मधले डॉ. शिवराम मानशिंदे सोन्याचा शोध लावून प्रचंड श्रीमंत होतात; पण या शोधप्रक्रियेत त्यांच्याच शरीरावर विपरीत परिणाम होतात. ‘पिंजक’ कथेतले डॉ. हमीद रहेमान हे एखादी व्यक्ती अदृश्य होऊन दहशतवाद्यांना बिनदिक्कत कशी मारू शकते याचं प्रात्यक्षिक करतात; पण हे तंत्रज्ञान दहशतवाद्यांच्या हाती लागलं, तर ते देशच उद्ध्वस्त करतील, या जाणिवेनं ते तंत्रज्ञान नाहीसं करून दहशतवाद्यांशी प्रत्यक्ष लढून धारातीर्थी पडतात. या संग्रहातल्या कथा मुळातूनच वाचाव्या अशा आहेत. एका वेगळ्याच शक्याशक्यतांचा वेध लेखकानं रंजकपणे घेतला आहे. वाचक त्यात गुंतून पडतो आणि विचारप्रवृत्तही होतो. विचारांना चालना देणं आणि मनात प्रश्न निर्माण करणं हे जर कथाकाराकडून घडत असेल, तर तो उत्तम कथाकार म्हटला पाहिजे. डॉ. संजय ढोले या निकषाला उतरतात. याबद्दल संदेह नाही.
– डॉ. मनोहर जाधव
- Kiran Paithankar
Nice book by dhole sir.