- नीतिन आरेकर
राजदीपजी, नमस्कार,
मी प्राध्यापक नीतिन आरेकर.
तुम्ही क्रिकेट खेळत होता तेव्हाही तुम्हाला पाहिलं होतं, अकाली क्रिकेट का सोडलंत तो प्रश्न मनात ठेवून मी तुमचे विविध शोज नेहमीच पाहात होतो.
आज तुमचं डेमॉक्रसीज इलेव्हन हे पुस्तक वाचून पूर्ण केलं.
हा केवळ क्रिकेटचाच नव्हे तर भारतीय लोकशाहीचा घेतलेला धांडोळा आहे. प्रत्येक खेळाडूला अभ्यासताना तुम्ही समकालीन सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक घडामोडी यांचा अर्थ भारतीय मानसाशी लावण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे.
संस्कृतीच्या विविध क्षेत्रांशी जवळीक असल्याने व स्वतः क्रीडापटू असल्याने तुम्हाला हे सर्व अतिशय चांगल्या रीतीने तपासता आलं.
भारतात अशी पुस्तकं लिहिली जात नाहीत. तुम्ही ती उणीव भरून काढलीत, मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद!!
- SAPTAHIK SAKAL 13-07-2019
क्रिकेटचा रंजक इतिहास...
‘डेमोक्रसीज इलेव्हन – भारतीय क्रिकेटची महान गाथा’ हे पुस्तक म्हणजे क्रिकेटचा रंजक इतिहास आहे. या पुस्तकामधून भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ११ महान खेळाडूंचा प्रवास मांडलेला आहे. १९६०च्या दशकामध्ये खेळणारे दिलीप सरदेसाई आणि नवाब पतौडी यांच्यापासून सुरुवात होते आणि आत्ताच्या महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहली या खेळाडूंपर्यंत लेखक आपल्याला आणून सोडतो. भारतीय क्रिकेटच्या उत्क्रांतीची गोष्ट सांगणारे हे पुस्तक भारतीय क्रिकेट आणि भारतीय समाज कसा बदलत गेला हे स्पष्ट करते.
- Daily Lokmat 9th June 19
एक देश म्हणून भारताची जी काही जागतिक स्तरावरील वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये लोकसंख्येचा विचार करता ‘सर्वांत मोठी लोकशाही’ आणि ‘क्रिकेटवेड्यांचा देश’ यांचा समावेश होतो. देशावर ब्रिटिशांचा अंमल असताना त्यांनी आपल्या विरंगुळ्यासाठी क्रिकेट नावाचे जे रोपटं इथं लावलं, रुजवलं... त्याचा आता महावृक्ष झालाय. या महावृक्षाचा पसारा इतका विस्तारलाय, की या खेळाच्या जन्मदात्यासह संपूर्ण क्रिकेटविश्व त्याच्या कवेत आलं आहे. या खेळाची रुजवात भारतात होत असताना येथील मातीचा गुणही त्याला लागला. क्रिकेट जगतात ठसा उमटविणारी अनेक रत्नं आपल्या देशानं दिली. अशा ११ रत्नांच्या आयुष्याचा ‘लोकशाहीमय’ पट वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या शैलीनं मांडण्याचा यशस्वी प्रयत्न ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि एका क्रिकेटपटूच्या पोटी जन्मलेले राजदीप सरदेसाई यांनी या पुस्तकातून केला आहे. सर्वकालीन महान भारतीय संघाविषयी हे पुस्तक नाही. भारतीय क्रिकेटला आकार देणाºया, यशाचा बॅटन पुढील पिढीच्या हाती देणाऱ्या, जगण्याच्या लढाया लढण्याचं बळ देणाऱ्या, भारतीयांना स्वप्न पाहण्याची; ती पूर्ण करण्याची हिंमत देणाऱ्या ११ खेळाडूंविषयी हे पुस्तक असल्याचं लेखक नमूद करतात.
अर्थात ‘डेमोक्रसीज इलेव्हन -`Democracy`s XI - The great Indian Cricket Story`... भारतीय क्रिकेटची महान गाथा’ या पुस्तकामध्ये राजदीप यांनी वडील दिलीप सरदेसाई यांच्यासह मन्सूर अली खान पतौडी, बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, कपिलदेव, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या आजी-माजी दिग्गजांची जडणघडण, खेळाडू आणि व्यक्ती म्हणून वाटचाल, यश-अपयश, आव्हाने, विक्रम, निवृत्तीनंतरचं जीवन, त्यांचं भावविश्व, मजेशीर किस्से यांसह भोवतालची सामाजिक परिस्थिती अशा खुबीनं शब्दबद्ध केली आहे, की वाचणाºयाला जणू हे आपल्या नजरेसमोर घडत असल्याचा भास होतो. ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत कार्यरत पत्रकार मेघना ढोके यांनी तितक्याच ताकदीचा अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. हे पुस्तक उपरोक्त ११ खेळाडूंबद्दलच माहिती देत नाही, तर १९६०च्या दशकाच्या प्रारंभी कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे दिलीप सरदेसाई ते वर्तमान भारतीय संघाचा कर्णधार कोहलीच्या काळापर्यंत भारतीय क्रिकेटचा इतिहासदेखील सांगते.
गोव्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ते भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज म्हणून नाव कमावलेले सरदेसाई... राजघराण्यात जन्माला आलेले, अपघातात उजवा डोळा निकामी झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी भारतीय संघात स्थान मिळविणारे, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे ‘टायगर’ हे नाव सार्थ ठरविणारे मन्सूर अली खान पतौडी... भारतीय संघाची नकारात्मक मानसिकता बदलून ताठ मानेने खेळण्याची प्रेरणा देणारे, विंडीजसकट जगभरातील वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना करून सर्वांत प्रथम १० हजार कसोटी धावांचा टप्पा गाठणारे विक्रमादित्य सुनील गावसकर... फिरकीपटूंचा देश ही ओळख मिटवून सर्वाधिक कसोटी बळींचा विक्रम आपल्या नावे करणारे वेगवान गोलंदाज तसेच जागतिक दर्जाचे अष्टपैलू कपिलदेव... हैदराबादच्या गल्लीत वाढलेला मुस्लिम तरुण ते नजाकती मनगटी फटक्यांचे नैसर्गिक कोंदण लाभलेला आणि ऐतिहासिक पदार्पणाद्वारे जगभरातील समीक्षकांची वाहवा मिळविणारा अझर, मुंबईत प्राध्यापकाच्या घरी जन्माला येऊन आपल्या अफाट कर्तृत्वाद्वारे फलंदाजीला नवे जागतिक आयाम देणारा सचिन... संपन्न घरात जन्मलेला बंगाली मुलगा ते इतर संघांना ‘अरे’ला ‘कारे’ म्हणून उत्तर देण्याची सवय भारतीय संघाला लावणारा आक्रमक कर्णधार सौरव गांगुली... रांचीतला पेट्रोल पंप आॅपरेटरचा मुलगा ते भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देणारा कर्णधार, अशा आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविणारी वाटचाल करणारा धोनी... बालपणापासून बेधडक आणि काहीसा मुजोर स्वभाव असलेला, १८ व्या वर्षी रणजी सामना खेळत असताना वडिलांचे निधन झाल्याचे दु:ख बाजूला ठेवून त्याच दिवशी संघाला संकटातून बाहेर काढणारी खेळी करणारा विराट ते कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा सर्वच प्रकारांत स्वत: चांगली कामगिरी करून सहकाºयांना प्रेरणादायी नेतृत्व देणारा कर्णधार... असा खिळवून ठेवणारा या खेळाडूंचा प्रवास राजदीप यांनी चितारला आहे.
इतर खेळांप्रमाणे क्रिकेटमध्येही घराणेशाहीला थारा नाही. इथं मैदानावर कामगिरी करा; नाही तर बाहेर व्हा, हाच नियम असतो. हे समजावून सांगताना राजदीप यांनी प्रस्तावनेत सुंदर उदाहरण दिलं आहे... ‘‘राजकीय नेत्याच्या मुलाला राजकारणात सहज जागा मिळू शकते. वाडवडिलांच्या पुण्याईवर विधानसभा-लोकसभेची निवडणूकही जिंकू शकतो. आमदार, खासदार, मंत्री होऊ शकतो. घराणेशाहीचा लाभ घेत बड्या उद्योगपतींची मुलं मोठ्या पदांवर जाऊन बसतात. अभिनेता-अभिनेत्रींच्या मुलांना सिनेमात सहज संधी मिळते. क्रिकेटमध्ये हे शक्य नाही. अफाट गुणवत्ता आणि सर्वोत्तम कामगिरी याशिवाय भारतीय संघात स्थान मिळविणे शक्य नाही.’’
‘कुणाचा तरी मुलगा’ या पात्रतेच्या आधारे भारतीय संघात स्थान मिळत नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी रोहन गावसकर आणि स्वत:चा दाखला दिला आहे. राजदीप यांनी पुस्तक लिहिताना लेखक म्हणून प्रामाणिकपणा आणि तटस्थपणा जपल्याचे सिद्ध करण्यास हे उदाहरण पुरेसं ठरावं. प्रजासत्ताक भारताचा पाया रचताना घटनेने सर्व नागरिकांना समान संधींचं आकाश उपलब्ध करून दिलं. क्षमतेच्या बळावर गगनभरारी घेता येते, हे भारतीय क्रिकेटने सिद्ध करून दाखविलं आहे. संधीची समानता या लोकशाही मूल्यावर विश्वास ठेवून स्वप्ने पूर्ण करता येतात, या वाचकांच्या विश्वासाला बळकटी देण्याचं काम पुस्तकात उल्लेख असलेल्या ११ खेळाडूंची वाटचाल खचितच करते. हेच या पुस्तकाचं यश आहे.
-अमोल मचाले
- Eknath Marathe
डेमोक्रसीज इलेव्हन, भारतीय क्रिकेटची महान गाथा, राजदीप सरदेसाई, मराठी भाषांतर मेघना ढोके.
भारतीयांचे क्रिकेट वेड अफाट आहे. क्रिकेटर तर देवासारखे पूजनीय आहेत. राजदीप सरदेसाई या स्वतः क्लब लेवल क्रिकेट खेळलेल्या पत्रकाराने हे इंग्रजीत लिहिले आहे व हा त्याचा ओघवता मराठी अनुवाद आहे.
क्रिकेटचे विश्व गाजवून सोडणारे 11 भारतीय क्रिकेटपटूंचा अनोखा परिचय, ते जसा उदयाला आले, त्या क्रमाने करून देण्यात आला आहे. सगळ्यात आधी आहेत, लेखकाचे वडील, दिलीप सरदेसाई, गोव्याचे एकमेव कसोटीपटू ! सर्वात शेवटी आहे विराट कोहली ! या पुस्तकात नुसते क्रिकेट नाही तर क्रिकेटला देशाच्या अर्थकारण, राजकारण, समाजकारण या अंगाशी जुळवून बघितले आहे. क्रिकेटवर आधी असलेला शहरी, पदवीधर खेळाडूंचा असलेला प्रभाव ते ग्रामीण व शिक्षण अर्धवट सोडलेले खेळाडू असा छान उलगडला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये झालेली स्थित्यंतरे व तेव्हाचे राजकारण यांची सुद्धा छान संगती लावलेली आहे.
- Shabdruchee January 2019
गुणवंत अकरा क्रिकेटपटूंचा विश्लेषणात्मक जीवनपट..
स्वातंत्र्योत्तर सुरुवातीच्या काळात भारतीय क्रिकेट हा खेळ तत्कालीन संस्थानिक, अभिजन, श्रीमंत अशा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असायचा. ‘शाही रंजन’ असेच क्रिकेटचे स्वरूप होते. संस्थाने खालसा झाल्यानंतर कालौघात बदलत्या राजकीय परिाqस्थतीशी समांतर क्रिकेटची व्याप्ती इतरेजनात वाढत गेली. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक स्थित्यंतर होत असताना भारतीय क्रिकेटमध्ये विकासात्मक परिवर्तन होत गेले. त्या काळापासून ते आजच्या ‘नं-१ पोझिशन’पर्यंत यायला काही दशकांचा कालावधी उलटावा लागला. याच काही दशकांच्या कालावधीत अनेक गुणी खेळाडूंनी क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले.
‘प्रिंट व इलेक्टॉनिक मीडिया’चे नामवंत पत्रकार आणि माजी कसोटीपटू दिलीप सरदेसाई यांचे चिरंजीव राजदीप सरदेसाई यांनी आजवरच्या क्रिकेटपटूंमधील आदर्श ११ जणांची निवड केली (खरेतर बहुतांश वाचकांच्या मनातले हेच आदर्श क्रिकेटर आहेत) आणि प्रत्येक खेळाडूची कारकीर्द वाचकांपुढे मांडली आहे ‘डेमोक्रसीज इलेव्हन’ या पुस्तकातून. या ११ कीर्तिमान खेळाडूंची चरित्रकहाणी राजदीप यांनी शब्दबद्ध केली आहे. प्रस्तुत पुस्तकात त्यांची कारकीर्द आकडेवारीसह येतेच, पण त्यांचे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील आयुष्याचे उद्धृत केलेले संदर्भ संक्षिप्त तरीही परिपूर्ण वाटतात. त्या त्या खेळाडूच्या खेळातील व खेळाबाहेरील गुणदोषांचे सटीक आणि सटीप विश्लेषण राजदीप करतात. या खेळाडूंच्या आयुष्यातील क्रिकेटचा ‘उपोद्घात’ (अर्थात प्रारंभ) आणि ‘सिंहावलोकन’ (अर्थात निवृत्ती) असा सर्वसमावेशक तपशील वाचकांना अवगत होतो.
हे पुस्तक दिलीप सरदेसाईंपासून मन्सूर अली खान पतौडी,बिशनसिग बेदी, सुनील गावसकर,कपिल देव, मोहंमद अझरुद्दीन,सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली,राहूल द्रविड ,महेंद्रसिंग धोनी ते विराट कोहलीपर्यंतच्या क्रिकेटपटूंच्या आयुष्याची गाथा मांडते. १९९९ साली विश्वचषक स्पर्धा सुरू असताना तेंडुलकरचे वडील गेले. तो इंग्लंडहून परत आला, वडिलांचे अंत्यसंस्कार केले आणि पुन्हा लंडनला परतला. थेट मैदानात उतरला आणि त्या सामन्यात त्यानं एक जादुई शतक ठोकलं. हीच कथा विराट कोहलीची. दिल्लीसाठी तो रणजी सामना खेळत होता. जेमतेम अठरा वर्षांचा मुलगा. त्या संध्याकाळी नाबाद घरी परतला आणि त्या रात्रीच काळानं घात केला. त्याचे वडील गेले. सकाळी हा मुलगा मैदानात गेला, खेळला. ९० धावा करून बाद झाला आणि तिथून थेट स्मशानात पोहोचला आणि वडिलांच्या चितेला अग्नी दिला. या कहाण्या भारतीय क्रिकेटचा जुनून सांगतात. क्रिकेटवर जीव ओवाळून टाकणारं बेभान प्रेम सांगतात. याच क्रिकेटनं लाखो भारतीयांना प्रेरणा दिली, जगण्याच्या लढाया लढण्याचं बळ दिलं. मुख्य म्हणजे स्वप्न पाहण्याची हिंमत दिली. हे पुस्तक म्हणजे त्या जिगरबाज मस्तमौला स्वप्नांची, अस्सल गुणवत्तेची एक विलक्षण गाथा आहे.
राजदीप स्वत: क्रिकेट खेळले आहेत. आनुवंशिक वारसा म्हणून क्रिकेट त्यांच्या रक्तातच आहे. म्हणूनच त्यांचे क्रिकेटविषयीचे विश्लेषण अनुभवाच्या मुशीतून आलेले आहे.
एखाद्या खेळाडूविषयी लिहिताना क्रिकेटमधले धुरीण, बुजुर्ग आणि समकालीन क्रिकेटपटूच्या मतमतांतराची पुस्तकात असलेली पखरण हा तर खास ‘राजदीप टच’ म्हणावा लागेल.
एखाद्या खेळाडूचे फक्त गुणवर्णन, त्याचे विक्रम आणि आकडेवारी, त्याची विश्वस्तरीय कामगिरी, त्याची शैली, त्याचे कौशल्य, देशातील आणि जगभरातील लोकप्रियता याचेच वर्णन पुस्तकात येते असे नाही. तर त्या खेळाडूचे दोष, त्याच्या चुका, त्याच्या वर्तनातील विसंगती, त्याचे फसलेले निर्णय, त्याच्याविषयीचे प्रवाद आणि समज, त्याच्या व्याqक्तमत्त्वाची ‘दुसरी’ बाजू असे समग्र चित्र उभे करताना राजदीप शब्दांची कंजुषी करत नाहीत. उलट त्यांच्या लिखाणाला परखडतेची धार येते.
राजदीप यांची भाषा प्रवाही आहे. त्यात लालित्य आहे आणि सौंदर्यही...
विषयाच्या ओघात आलेली त्यांची काही पल्लेदार वाक्ये पाहू :
त्या सभ्य काळाचं दिलीप सरदेसाई हे ‘प्रॉडक्ट’ होतं...
भविष्याच्या पोटात उमेदीचा गर्भ श्वास घेऊ लागला...
त्याच्या बॅटमधून धावांचे झरे फुटत होते...
आक्रमण हाच बचावाचा उत्तम मार्ग असतो...
रिचर्ड्सच्या उंच उडालेल्या चेंडूवर कपिलची नजर रुतलेली होती...
ज्या वयात गणित शाळकरी मुलांना घाम फोडतं, त्या वयात हा मुलगा
नवीन समीकरणं जुळवत होता...
‘तो’ षटकार म्हणजे आपल्या आगमनाचा तेंडुलकरी ऐलानच होता...
याच काळात क्रिकेटचं कॉमर्सशी लग्न झालं...
विकासाच्या वाटेत इंडिया पुढे निघून गेला; भारत मात्र मागेच राहिला...
पुस्तकात ठायी ठायी असलेली अशी वाक्यं राजदीपच्या प्रतिभेची, लेखनकौशल्याची आणि कल्पनाविलासाची प्रचिती देतात. चिवडा खाताना घासात काजूचा तुकडा यावा, अशीच ही खुमासदार वाक्यं आहेत.
मेघना ढोके यांचं अनुवादकौशल्य लाजबाब आहे. अस्सल मराठीकरणाचा हा उत्तम नमुनाच आहे. राजदीपच्या लेखनाची खुमारी मेघनाने दुणावली आहे.
आजच्या काळात क्रिकेट न आवडणारा विरळाच. पण असलाच, तर त्याने हे पुस्तक आवर्जून वाचावे. कदाचित त्याला क्रिकेट श्वासाइतकेच महत्त्वाचे वाटू लागेल.
- वा. ह. कुलकर्णी