- Swapnaja Pawar
मी वाचले आहे हे पुस्तक .....
वाचताना त्यांचे हाल पाहून काही ठिकाणी अंगावर शहारा येईल पण जरी ही भयावह आणि वेदनादायक सत्य कथा असली तरी त्याचा दुसरा पण एक परिणाम आहे .....
जपानचा जलद विकास झाला आणि जपान सैनिकांच्या विळख्यात जाण्यापासून वाचला .....
मानवी अस्तित्वाच्या बाबतीत एक विसंगती आहे की अतिशय कठीण, जीवनाची परीक्षा बघणाऱ्या वेदनेच्या अंधारातही माणसाला प्रगतीच्या वाटेवर नेणारे , आनंददायी असे लखलखीत क्षण सापडतात ...📖
- KIRAN BORKAR
मात्सुयामा-चो येथील टेनिसच्या मैदानावर 500 मीटर अंतरावर येऊन फुटण्यास फॅट मॅनला 43 सेकंद लागले .जमिनीवरून एक प्रचंड आगीचा लोळ आकाशात तयार होताना दिसला. त्यानंतर एक प्रचंड दाबाची लाट आली .आणि पाठोपाठ स्फोटाचा कानठळ्या बसवणारा आवाज . ज्यांनी त्याचा अनुभव घेतला त्यांनी त्याला प्रकाशाची लाट असे नाव दिले .या स्फोटाच्या केंद्रापासून जवळजवळ एक किलोमीटर परिसर पूर्ण उदवस्त झाला.माणसे प्राणी तत्क्षणी मेले.माणसाच्या शरीरातील पाणी त्या उष्णतेच्या लाटेने सुकून गेले .अतिउष्णत्यामुळे जळण्याजोगे सगळे जळत गेले .स्फोटानंतर निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे बरेचजण गंभीर भाजले .
हे होते नागासाकी शहरावर अणुबॉम्ब पडल्यानंतरचे वर्णन . हिरोशिमा बॉम्बमुळे झालेला संहार खूप भयानक होता . तरीही बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रांना बंदी होती . जपानव्यतिरिक्त कोणीही कल्पना केली नव्हती की अमेरिका अजून एक बॉम्ब टाकणार आहे . काही दिवसातच नागासाकीवर दुसरा बॉम्ब पडला.
बॉम्ब टाकण्याची पूर्व तयारी... त्याची हाताळणी. वैमानिकांची मानसिक तयारी ..बॉम्बची जोडणी याचे अंगावर काटा येणारे वर्णन या पुस्तकात आहे .
क्रेग कोली यांनी या भयानक विध्वंसाची कथा अनेक पातळ्यांवर लिहून आपल्यासमोर उभी केली आहे .८० हजार लोकांचा मृत्यू हे या अणुस्फोटाचे तात्पर्य होते . आपण हे पुस्तक वाचत नाही तर प्रत्यक्षात बघत आहोत असे वाटते ..संपूर्ण जगात या घटनेनंतर बदलले . अणूशक्तीची ताकत काय आहे हे आजही समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतो .
- Varsha Kulkarni, Thane
I picked up this book out of curiosity during my last visit to MPH bookstore in Pune. Before this, I had read `Burnt Shadows` (written by Kamila Shamsie and translated by my daughter Reshma Kulkarni-Pathare), which was a fictional story set on the background of Hiroshima. Thus, I was curious to read a non-fictional account of Nagasaki, and this book shook me to the core! The wonderfully written and translated real accounts, makes one shiver in fright and think, whether such a tragedy was really necessary to fuel a few egos? A must-read book for anyone who likes real, non-fictional reading.
- MILUN SARYAJANI MASIK JULY 2019
सोमवार, ६ ऑगस्ट १९४५. सकाळी ८.०५ला ‘लिटल बॉय’ हिरोशिमाच्या दिशेनं झेपावला. हिरोशिमातील हानीचे वृत्त सर्व जपानला कळण्याआधीच ९ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ११वाजता नागासाकी शहरावर ‘फॅट मॅन’ हा दुसरा अणुबाँब टाकण्यात आला. दोन्ही हल्ल्यात निरपराध अज्ञातांचा निरंकुश संहार झाला. ६ ऑगस्ट ते ९ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत हिरोशिमा व नाकासाकीतील प्रत्यक्ष घटनांचा अभ्यास करून क्रेग कोली यांनी पुस्तक लिहिले. क्रेग कोली हे ऑस्ट्रेलियन दूरचित्रवाणी निर्माता व दिग्दर्शक आहेत.
दैनंदिन व्यवहारात मग्न असणाऱ्या यामागुची निशिओका, टाकिगाव, मिस्त्यू, सातोषी नाकामुरा, फादर तमाया, फादर सायमन, डॉ. नागाई, डॉ. आकिझुकी, युद्धकैदी मॅकग्रथ-कर, चीक या व अशा असंख्य लोकांना या स्फोटांचा चटका बसला. असंख्या जीव गमावले तर अनेकांनी मरणयातना भोगल्या. जवळजवळ एक लाख लोक मरण पावले. प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती, डायऱ्या, पत्र यांच्या आधारे क्रेग कोली यांनी ही ऐतिहासिक सत्यकथा अनेक पातळ्यांवर लिहून त्या भयंकर दिवसांचे यथार्थ चित्रण केले आहे. लेखकाने अनेक व्याqक्तरेखा खूप समरसतेने उभ्या केल्या आहेत. सामान्य लोक नरकयातना भोगत असताना जगाच्या पटावरील अमेरिकन, रशियन व इतर नेते मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न होते. अनुवादक डॉ. जयश्री गोडसे यांना असे वाटते की, हिरोशिमा स्फोटानंतर जपानने लगेच शरणागती पत्करली असती तर नागासाकी वाचले असते. अमेरिकेच्या अधिकाऱ्याची वृत्ती, शास्त्रज्ञांची हुशारी अशी संहारक शस्त्र तयार करण्यासाठी वापरली गेली आणि मानवतेला लाजवणारी घटना घडली. मुखपृष्ठावरील मशरूम आकाराचा ढग, चेहऱ्यावर साकळलेले दु:ख व लाल रंगातील ‘नागासाकी’ अक्षरे हा अनुभव गडद करतात. जगाला कलाटणी देणाऱ्या संहाराविषयीचे हे पुस्तक आवर्जून वाचावे, संग्रही ठेवावे असे आहे.
- सुनीता भागवत, प्रतिनिधी पुणे
- LOKPRABHA 01-02-2019
भयावह आणि वेदनादायक!...
जगातील सर्वाधिक भयावह नरसंहारक दिवस असे ६ ऑगस्ट आणि ९ ऑगस्ट १९४५ या दोन्ही दिवसांचे वर्णन केले, तर ते वावगे ठरणार नाही. सुप्रसिद्ध दूरचित्रवाणी निर्माता क्रेग कोली यांनी त्यांच्या ‘नागासाकी’ या कादंबरीत या नरसंहाराचे अंगावर काटा आणणारे वर्णन केले आहे. डॉ. जयश्री गोडसे यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर तिथे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचे दर्शन ही कादंबरी घडवते.
अमेरिकेच्या पर्ल हार्बर या शहरावर आणि लष्करी तळावर जपानने सागरी मार्गाने हल्ला केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेकडून अणुबॉम्ब हल्ला करण्यात आला. कोली यांच्या कादंबीत अणुबॉम्ब हल्ल्यानंतर या दोन्ही शहरांतील भयानक विध्वंसाची कथा आहे. १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचे आणि हिरोशिमा व नागासाकीतील जनतेच्या दैनंदिन जीवनाचं चित्रण या कादंबरीत करण्यात आलेले आहे. कादंबरीला प्रत्यक्षदर्शीच्या मुलाखती, डायऱ्या, पत्र यांचा आधार आहे. मात्र ही कादंबरी वाचताना आपणच या घटनांचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहोत की काय असे वाटायला लागते.
६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर पहिला बॉम्बहल्ला झाल्यानंतर या कादंबरीला सुरुवात होते. या बॉम्बहल्ल्याचे वर्णन करताना लेखक म्हणतो, ‘शहरामध्ये असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या इमारती सोडल्यास सर्व काही क्षणार्धात नष्ट झाले. जणू काही स्वच्छ केलेले, सपाट पण जळून गेलेले वाळवंट!’ कादंबरी वाचताना अशा अनेक वर्णनावरून त्या भयावह परिस्थितीची जाणीव होते.
हिरोशिमामध्ये बॉम्बमुळे झालेला संहार भयानक असला तरी त्या वेळच्या वृत्तपत्रांमध्ये त्याबाबत त्रोटक माहिती होती. एकतर बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रांवर बंदी होती, त्याशिवाय काही वृत्तपत्रांनी ही घटना गांभीर्याने घेतली नाही. हिरोशिमावर हल्ला होतो, त्या वेळी नागासाकीतील ‘मिनयू’ या वृत्तपत्राचा पत्रकार नाकामुरा तिथे उपस्थित असतो, मात्र या घटनेची बातमी देण्यासाठी या शहराचे राज्यपाल परवानगी देत नाहीत. एकूण हिरोशिमावरील हल्ल्यानंतर मोठी जीवितहानी होऊनही प्रसारमाध्यमांना ही घटना प्रभावीपणे पोहोचवता आली नाही, असे या कादंबरीतून दिसते. त्यामुळे ही कादंबरी लिहिताना लेखकाला मदत झाली ती केवळ जे जिवंत राहिले, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि त्या काळी असणारी पत्रे, डायऱ्या यांची.
लेखकाने या कादंबरीत अनेक व्यक्तिरेखा खूप समरसतेने उभ्या केल्या आहेत. त्यांचे परस्परसंबंध, स्वभाव, कृती याचे वर्णन आणि घटना डोळ्यांसमोर उभ्या राहतात. ‘तो प्रकाशाचा लोट बघितल्यानंतर जुन्जी सातो अंत:स्फूर्तीने सायकल टाकून स्वत:ला जमिनीवर झोकून एका अरुंद बोळात शिरला. आपला चेहरा सुरक्षित राहावा म्हणून त्याने तो जमिनीत अक्षरश: दाबून धरला. त्याची जी कातडी उघडी होती, ती त्या मोठ्या आवाजानंतर आलेल्या धक्क्यामुळे सुजली. तो आवाज एखाद्या राक्षसासारखा धडधडत त्याच्या डोक्यावरून गेला आणि नंतर हळूहळू कमी कमी होत शांतता पसरली...’ अशी वर्णने पुस्तकात वाचायला मिळतात.
रशिया-अमेरिका-ब्रिटन यांनी पोस्टडॅम येथे घेतलेली परिषद, त्यानंतर जारी केलेला जाहीरनामा, हिरोशिमावर आणि नागासाकीवर बॉम्ब टाकण्याआधी अमेरिकेने केलेली तयारी, बॉम्ब टाकल्यानंतरची अमेरिकेची प्रतिक्रिया, जपानची राजकीय भूमिका या राजकीय घटनांचा तपशील या कादंबरीत सातत्याने येतो. नागासाकीवर बॉम्बहल्ला झाल्यानंतर जपानी नागरिकांची माणुसकी आणि देशप्रेम याचे दर्शन अशा अनेक घटनांमधून घडते. माणसातील क्रौर्य, नरसंहार दाखवणाऱ्या या कादंबरीत दुसऱ्या बाजूला माणसांमधील मानवतावाद सेवाभावी वृत्तीही दिसून येते.
दुसऱ्या महायुद्धातील ही घटना या युद्धाला कलाटणी देणारी, युद्धाचं पारडं पूर्णपणे फिरवणारी किंबहुना महायुद्ध समाप्तीकडे नेणारी होती. पण त्याच बरोबर हे कृत्य अतिशय क्रूर आणि नृशंस असे होते. मानवाने विज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या या संहारक अस्त्राचे दुष्परिणाम किती खोलवर जाऊ शकतात हेच यातून दिसून आले. या भयावह घटनेनंतर जग बदलले आणि त्यानंतर अद्याप अणुबॉम्बचा वापर झालेला नाही. जपान जणू काही राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा उभा राहिला. पण हा नरसंहार किती भयावह आणि मानवतेला काळिमा फासणारा होता, हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी महत्त्वाचा हा दस्तावेज आहे.
–संदीप नलावडे
- Anjali Patwardhan
काही चित्रं पाहिली की मन कळवळून जातं. वेदनेचा गहिवर मन पोखरत जातो. अशीच मानवी इतिहासात चिरंतन राहिलेली वेदना म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकीवरचा अणुबॉम्ब हल्ला..या हल्ल्याची क्षणचित्रं पाहिली तरी थरकाप उठतो. पण इतिहासातल्या चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून जुन्या वेदनांचं स्मरण होत राहिलं पाहिजे.
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधील दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकला, ही जागतिक इतिहासातील सर्वांत भीषण आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना होती. या दोन शहरांवर बॉम्ब टाकल्यानंतर तिथे मृत्यूचं जे तांडव झालं आणि जखमी लोकांना ज्या वेदनांना तोंड द्यावं लागलं, त्याचं साद्यंत वर्णन करणारी कादंबरी आहे ‘नागासाकी.’ या वर्णनाबरोबरच १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचं आणि हिरोशिमा, नागासाकीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रणही या कादंबरीत केलं आहे. क्रेग कोली यांनी संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन ही कादंबरी सिद्ध केली आहे. अनुवाद केला आहे डॉ. जयश्री गोडसे यांनी.
अमेरिकेने हिरोशिमावर बॉम्ब टाकला तो दिवस होता, ६ ऑगस्ट १९४५. हा बॉम्ब पडल्यानंतर हिरोशिमात जो हलकल्लोळ माजतो, इथून या कादंबरीतील नाट्याला सुरुवात होते. मृत्यूच्या तांडवाचं, जखमी लोकांचं वर्णन वाचताना अंगावर शहारे येतात. उदा. हिरोशिमामध्ये कामानिमित्त आलेला नागासाकीचा यामागुची बॉम्बहल्ल्यामुळे जखमी होतो. तो नागासाकीला जाण्यासाठी रेल्वेस्टशनवर चाललेला असतो, त्यावेळचं हे वर्णन - ‘नदीत तरंगणाऱ्या प्रेतांवरून रांगतच त्याने नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्या प्रेतांवरून तो हात आणि गुडघे टेकत पुढे निघाला होता. एक मृतदेह त्याच्या वजनाने बुडाला आणि त्याच्या पाठोपाठ यामागुचीसुद्धा पाण्यात पडला. त्यामुळे त्याची भाजलेली त्वचा ओली होऊन वेदनांचा डोंब उसळला. मग परत कोरड्या जमिनीवर येऊन तो तसाच प्रवाहाच्या वरच्या बाजूने चालत राहिला. मग त्याला पूल सापडला. पूल फक्त एका खांबावर पण शाबूत होता. हळूहळू त्यावरून जाऊन त्याने दुसरा किनारा गाठला. प्रेतांचे ढीग रचण्याचे काम काही माणसे करत होती. त्यांच्यावर पेट्रोल, तेल टाकून ती जाळून टाकण्यात येत होती. त्यामुळे त्या धुळीच्या ढगात या जळणाऱ्या तेलाचा धूरही मिसळत होता.’
हिरोशिमावर बॉम्ब पडतो, तेव्हा नागासाकीतील ज्या व्यक्ती हिरोशिमामध्ये असतात, त्यात नागासाकीमधील ‘मिनयु’ या वर्तमानपत्राचे संपादक ताकेजिरो निशिओका यांचा आणि पत्रकार नाकामुरा यांचा समावेश असतो. नाकामुरा ओकायामाच्या डोमेई वर्तमानपत्राला हिरोशिमावर झालेल्या बॉम्बहल्ल्याच्या संदर्भात छोटा अहवाल पाठवतो आणि हिरोशिमावरील बॉम्बहल्ल्याची घटना निशिओका, नागासाकीचे राज्यपाल वाकामात्सु नागानो यांच्या कानावर घालतात; पण राज्यपाल त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत.
एकूणच, हिरोशिमावर बॉम्बहल्ला झाल्यावर अपरिमित भौतिक आणि जीवितहानी होऊनही प्रसारमाध्यमांपर्यंत ती घटना प्रभावीपणे पोहोचली नाही. हिरोशिमावर बॉम्ब टाकण्याआधी आणि नंतरही अमेरिकेने जपानला शरण येण्याचे आवाहन वारंवार केले होते; पण जपानने त्याकडे दुर्लक्ष केले आणि अमेरिकेने नागासाकीवर बॉम्ब टाकला. हिरोशिमापेक्षाही भयंकर हानी या बॉम्बमुळे झाली. असंख्य माणसे मृत्युमुखी पडली. असंख्य जखमी झाली. त्या संदर्भातील वर्णनं वाचताना मनाला खूप यातना होतात. उदा. ‘या स्फोटाच्या केंद्रापासून जवळजवळ एक किलोमीटर परिसर संपूर्णतः उद्ध्वस्त झाला होता. हिरोशिमाला याच अंतरावरच्या काही इमारती पडल्या नव्हत्या. पण येथे भूकंपातही पडू नयेत म्हणून विशिष्ट पद्धतीने बांधलेल्या काँक्रीटच्या इमारतीदेखील भुईसपाट झाल्या. माणसे आणि प्राणी तत्क्षणी मेले. माणसांच्या शरीरातील पाणी त्या उष्णतेच्या लाटेमुळे सुकून गेले. एक मुलगा एका विटांच्या वेअरहाउसच्या सावलीत उभा होता. जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर त्याने उघड्यावर असलेली आई आणि तिचा मुलगा यांचा अक्षरशः धूर झालेला बघितला.’
अशा प्रकारची वर्णनं या कादंबरीत वारंवार येतात आणि इतका भीषण संहार झालेला असतानाही जपानच्या राज्यकत्र्यांपर्यंत तो पोहोचत नाही आणि जपानच्या राज्यकत्र्यांची ही अनभिज्ञता वाचकाला आश्चर्यचकित करते. रशिया-अमेरिका-ब्रिटन यांनी पोस्टडॅम येथे घेतलेली परिषद, त्यानंतर जारी केलेला जाहीरनामा, जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाला मध्यस्थी करण्याची केलेली विनंती, ती विनंती फेटाळून रशियाने जपानवर केलेला हल्ला, हिरोशिमावर आणि नागासाकीवर बॉम्ब टाकण्याआधी अमेरिकेने केलेली तयारी, बॉम्ब टाकल्यानंतरची अमेरिकेची प्रतिक्रिया, जपानची राजकीय भूमिका या राजकीय घटनांचा तपशील या कादंबरीत साकल्याने आला आहे.
नागासाकीवर बॉम्बहल्ला झाल्यानंतर एवढ्या विपरीत परिस्थितीतही डॉक्टर नागाई, परिचारिका सुगाको मुराई, अन्य डॉक्टर्स आणि काही नागरिक जखमींना जमेल तशी मदत करत असतात. या लोकांची माणुसकी आणि जपानमधील लोकांचं देशप्रेम या सकारात्मक बाबींचं दर्शन या कादंबरीतून घडतं. हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेला बॉम्बहल्ला या ऐतिहासिक घटनेतील वेदनामय नाट्य ‘नागासाकी’ या कादंबरीतून अधोरेखित झालं आहे. एका बाजूला माणसाची क्रूरता, अहंमन्यता, उदासीनता, तर दुसऱ्या बाजूला मानवता, सेवाभाव, परोपकार अशा दोन्ही बाजूंचं दर्शन या कादंबरीतून घडतं. बॉम्बहल्ल्याच्या विनाशकारी परिणामांचं प्राधान्यानं चित्रण करणारी ही कादंबरी वाचलीच पाहिजे.
- लोकमत २१.१०.१८
निरपराध अज्ञातांची संहारकथा - सुप्रसिद्ध दूरचित्रवाणी निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या क्रेग कोली यांचे नागासाकी हे पुस्तक म्हणजे जपानच्या नागासाकी या दुसऱ्या महायुद्धकाळात होरपळलेल्या शहराचे वर्णन आहे. लेखकाने याबाबतच संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन हे पुस्तक साकारले आहे. यात जपानी माणूस त्याचं जाज्वल्य राष्ट्रप्रेम आणि त्याची महत्वाकांक्षा यांचे सुरेख दर्शन घडते. ते घडवताना लेखकाने यातल्या अनेक व्यक्तिरेखा खूप समरसतेने साकारल्या आहेत. त्यांचे स्वभाव-विभाव आणि परस्परसंबंध एखाद्या चित्रकारासारखे चित्रित केले आहेत. त्यातून जपानी माणसांची शिस्त आणि संकटकाळी न डगमगता एकमेकांना मदत करण्याचा स्वभाव यांचे मनोज्ञ दर्शन घडते आणि बुद्धाला मानणाऱ्या या देशाबद्दल वाचकाच्या मनात करुणा जागी होते.