- KIRAN BORKAR
ही आहे एका मुस्लिम कुटुंबात घडणारी कथा . कथेत एक आंधळी आजी आहे . तिच्या घरात ... मुलगी ..जावई ..आणि तिची नातवंडे राहातायत.
तिचा एक नातू अमर या कथेचा नायक. तो नास्तिक आहे . नमाज पडणे त्याला मान्य नाही . आपला भाऊ आणि बहिणीबद्दल त्याला फारसे प्रेम नाही . स्वतःच्या स्वप्नरंजनात तो मग्न आहे .त्याने आपल्या मोठ्या बहिणीचा अपघाती मृत्यू अनुभवला आहे . तर नानीला झोपेचे औषध खिरीतून पाजताना आईला पाहिले आहे .वडिलांचा हृदविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू पहिला आहे . वयाच्या सव्वीसाव्या वर्षी तो आपली कथा काल्पनिक श्रोत्यांना सांगतोय आणि या कथेतून बऱ्याच आठवणी बाहेर पडतात .हे पुस्तक म्हणजे एका कुटुंबाची गुंतवून टाकणारी कथा आहे . एका कुटुंबाची जगण्यासाठीची धडपड...भीती...कष्ट ...महत्त्वाकांक्षा अश्या सर्व गोष्टी आहेत .
नायकाने ही कथा सांगताना विनोदाचा साज चढविला आहे . त्यामुळे त्यांचे संवाद वाचताना खूप हसू येते .
"द हिंदू "चे 2013 सालचे पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट पुस्तक .
- TEJA KULKARNI
नुकतेच वाचून सम्पवलं.
एकदा वाचण्याजोगे आहे. एका कुटुंबाचे अधःपतन नर्म विनोदी पद्धतीने लिहिले आहे.
अनुवादही चांगला आहे, त्यामुळे वाचावेसे वाटते.
- DAINIK LOKMAT 07-04-2019
करुण विनोदाने भरलेली कादंबरी...
‘व्हॅनिटी बॅग’चे लेखक अनीस सलीम यांच्या ‘द ब्लाइंड लेडीज डिसेंडट्स’ या इंग्रजी कादंबरीचा ‘आंधळ्या बाईचे वंशज’ या नावाने मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. कादंबरीची कथा एका भारतीय मुस्लीम कुटुंबाची असून, यात त्या मुस्लीम कुटुंबाच्या रोजच्या आयुष्यातील धडपड, भीती आणि महत्त्वाकांक्षा रंगवल्या आहेत. अमर हा या कादंबरीचा नायक असून, सव्विसाव्या वर्षी फ्लॅशबॅक पद्धतीने तो आपली कहाणी सांगतो आहे. रेल्वे रुळाच्या जवळ जुन्या-पुराण्या घराला बंगला संबोधून तो कहाणी सांगू लागतो आणि बंगल्यातल्या प्रत्येक कपाटातून बाहेर येऊन आठवणींची भुते नाचू लागतात. अमरला आपलं आयुष्य दुर्घटनांच्या फेऱ्यातच गरगरत राहणार आहे, अशी भीती नेहमी वाटायची. पुढे दुर्दैवानं ही भीती सत्यात उतरते. करुण विनोदानं भरलेली ही कादंबरी वाचकाला गुंतवून ठेवते.
- DAINIK LOKMAT 24-06-2018
कटुता रेंगाळत ठेवणारी कलाकृती…
‘द ब्लाइंड लेडीज डिसेंडंट्स’ या अनीस सलीम यांच्या कादंबरीचा ‘आंधळ्या बाईचे वंशज’ या नावाने श्यामल चितळे यांनी मराठीत अनुवाद केला असून, तो मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. ही एका कुटुंबाची गुंतवून टाकणारी कथा आहे. त्यात एका भारतीय मुस्लीम कुटुंबाच्या रोजच्या आयुष्यातील धडपड, भीती आणि महत्त्वाकांक्षा रंगविल्या आहेत. तसंच कुटुंबाचं पूर्ण अध:पतनही वर्णन केलं आहे. कारुण्याला विनोदाचा साज चढवून गुंतवून ठेवणाऱ्या या कादंबरीची कथा एखाद्या उमरावकथेच्या थाटात उलगडत जाते. अमर हम्साचा जन्म एकमेकांशी अबोला धरलेल्या आणि कायम युद्धाच्या पवित्र्यात असणाऱ्या पालकांच्या पोटी झाला. आपलं आयुष्य दुर्घटना आणि बदनामी यांनी भरलेलं असणार, असं त्याला नेहमी वाटायचं आणि त्याच्या मनात येणाऱ्या उदास कल्पना खऱ्याच ठरल्या.
सव्विसाव्या वर्षी तो कल्पनेतल्या श्रोत्यांना आपली कहाणी ऐकवायचं ठरवतो आणि बंगल्यातल्या प्रत्येक कपाटातून बाहेर येऊन भुतं नाचायला लागतात. कादंबरीत लेखकानं त्या कुटुंबातील रोजच्या जीवनाचे तपशील बारकाईनं टिपले आहेत.
- DAINIK SAKAL 06-05-2018
मानवी जीवनाचं व्यामिश्र दर्शन...
कादंबरीचं कथानक जेव्हा लेखकाला सुचतं तेव्हा ते कशा प्रकारे सादर करायचं, हेही त्याला ठरवावं लागतं. अनीस सलीम यांनी हे कथानक अमर या व्यक्तिरेखेच्या प्रथमपुरुषी निवेदनातून साकारायचं ठरवलं. अमरचं हे प्रथमपुरुषी निवेदन म्हणजे ‘The Blind Lady`s Descendants.’ त्याचं मराठीत भाषांतर केलं आहे श्यामला सी. यांनी ‘आंधळ्या बाईचे वंशज’ या शीर्षकाखाली.
हम्सा आणि अस्मा या जोडप्याला चार मुलं आहेत. जसिरा, अकलम, सोफिया आणि अमर. अमर या सगळ्यात धाकट्या मुलाच्या प्रथमपुरुषी निवेदनातून ही कादंबरी पुढे सरकते. हम्सा आणि अस्मा या दोघांची मनं जुळलेली नाहीत. ते फक्त एकत्र राहतात इतवंâच. अमर त्याच्या दिवंगत मामासारखा दिसतो. अमरला एक रूपगर्विष्ठ बहीण आहे, जसिरा. त्याचा अकमल नावाचा भाऊ भलत्याच मार्गाला लागलाय. धर्मांधतेच्या आहारी जाऊन तो अतिरेकी बनतोय. त्याच्या सोफिया नावाच्या बहिणीचा बुडून अपघाती मृत्यू झालाय.
एके काळी समृद्ध असणाऱ्या या कुटुंबाला उतरती कळा लागलीय. आपल्या आयुष्याला ते कसं तोंड देतायत, तेच या कादंबरीत सांगितलंय.
शाळेच्या दिवसांपासून अमरचा संदीप नावाचा मित्र आहे. त्याचा अमरच्या आयुष्यावर बराच प्रभाव आहे. जसिराची शादी पार पाडण्यासाठी आंधळ्या आजीला फसवून तिचं घर विकतात आणि नंतर ती अमरच्याच घरी राहायला येते.
जसिराच्या शादीच्या वेळी घराची साफसफाई करत असताना त्यांच्या हाती जुने फोटो लागतात. त्यामुळे अमर आणि त्याचा मामा यांच्या आयुष्यात असणारं साम्य स्पष्ट व्हायला लागतं. अमरची आत्या, तिची मुलगी रझिया, संदीप, अमरच्या वडिलांचं दुसरं कुटुंब इत्यादी उपकथानकंही आहेत, त्यामुळे अमरचं स्वभावचित्रण विविधांगाने होत राहतं, कथानक बहुपेडी होतं आणि पुढेही सरकत राहतं.
शेवटी अमरचं भविष्यही त्याच्या मामासारखं ठरतं. खरं तर, सुरुवातीलाच आपल्याला शेवटाची स्पष्ट कल्पना दिलीय. तरीही कथानकाची मांडणी आणि निवेदन आपल्याला गुंतवून ठेवतं.
या निवेदनात वरवर साधेपणा दिसला तरी जीवनाचं, परिस्थितीने अगतिक झालेल्या माणसांचं, माणसांच्या मनोविकारांचं दर्शन या कादंबरीतून घडत राहतं. नानीला फसवून तिचं घर विकणं आणि अमरचं मामासारखं दिसणं आणि मामाच्या जीवनाशी त्याचं असलेलं साम्य या दोन गोष्टींमुळे या कादंबरीत नाट्य निर्माण होतं. अस्माची व्यक्तिरेखा अतिशय व्यामिश्रतेने प्रकटली आहे. तेव्हा जीवनाचा हा व्यामिश्र पट वाचावा असा आहे. श्यामला सी. यांचा अनुवादही उत्तम.
-अंजली पटवर्धन