- Yashashri Rahalkar
पुस्तक:- सर्पाचा सूड
लेखन :- सुधा मूर्ती
अनुवाद:- लीना सोहोनी
प्रकाशन :- मेहता
प्रकार:- कथासंग्रह
महाभारत हा अनेक कथांचा महाकोष म्हणावा लागेल इतकी लहानमोठी कथानके आणि उपकथानके त्यात आहेत. बहुतेक युद्ध आणि त्याची पार्श्वभूमी ह्यासंबंधी कथा आपल्या वाचनात सहजी येतात पण काही कथानके अशीही आहेत जी फारशी प्रचलित नाहीत त्याच सगळ्या कथांना ह्या संग्रहात सुधाजींनी समाविष्ट केले आहे ... त्या मनोगतात अगदी प्रामाणिकपणे मांडतात की ह्या सगळ्या कथा लहानपणी त्यांनी आजीकडून ऐकलेल्या कथा आहेत... एकूण 34 कथांचा ह्यात समावेश आहे... त्यातल्या काही कथा कदाचित आपल्या पिढीच्या वाचनात आल्याही असतील जसे जन्मेजयाचा सर्पयज्ञ, यक्षाचे प्रश्न वगैरे पण सध्या जी मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताहेत त्यांच्यासाठी सगळ्याच कथा नवीन आहेत... खरेतर हे बालसाहित्य नाही पण मुलांना वाचायला द्यायला हवे इतके छान आहे... कथा रंजक पद्धतीने सांगितल्या आहे आणि काही तर खरेच नवीन आहेत जशी उडुपी राजा, बार्बारीक, घटोत्कचाची चतुराई, अर्जुनाची नावे... भन्नाट आहेत. जेमिनी ऋषींची माहितीही मला ह्याच पुस्तकातून झाली. कुरु वंश त्याचे नाव कसे पडले, वंशावळ अगदी सोपे करून मांडले आहे.
मला सुधा मूर्तींच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य कायम भावते ते म्हणजे आपली संस्कृती, आपली मूल्ये त्याची पाळेमुळे ह्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि ती त्या प्रभावीपणे मांडत जातात. लीनाजींचा अनुवाद नेहमीसारखा चपखल... कुठेही ओढून ताणून दिलेले शब्दाला शब्द नाहीत...👍 महाभारतातल्या ह्या फारश्या प्रचलित नसणाऱ्या कथा .. जरूर वाचा!
✒️यशश्री रहाळकर, नाशिक
- Vaishali Patil Waghirkar
सुधा मूर्तींच अजुन एक पुस्तक आज वाचुन संपवल. महाभारतातील अनेक न ऐकलेल्या प्रसंगांना आणि व्यक्तीरेखांना दिलेलं हे कथारुप अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मांडलेल आहे.खूप छान पुस्तक आहे.नक्की वाचा.
- Pankaj Datare
अर्जुनाची एकूण नावे किती? यमाला शाप का मिळाला? लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला? महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळ माहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं.
- Vikas Parab
सुधा मूर्ती, ह्यांचे हे १७५ पानांचे पुस्तक म्हणजे जणू संपूर्ण महाभारताचा सारांश म्हटला तरी अतिशोयक्ती ठरणार नाही.
महाभारत सुरू होण्या पूर्वची पार्श्वभूमी, महाभारत मधील घटना आणि महाभारत समाप्ती नंतर घडलेल्या घटनाक्रम याच्याशी निगडित बरयाच लहान लहान गोष्टी ह्या पुस्तकामध्ये दिल्या गेल्या आहेत.
विविध घटना कश्या प्रकारे निर्माण झाल्या, त्यामागील पार्श्वभूमी, वरदान, शाप त्यांचे परिणाम, विविध महानुभवांनी घेतलेले निर्णय आणि त्यांचे बरे वाईट परिणाम अश्या सर्व विषयांवर ह्या पुस्तका मध्ये गोष्ट स्वरूपात माहिती दिली गेली आहे.
ह्या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, हे पुस्तक लहान मुलं उत्साहाने गोष्टी स्वरूपात वाचू शकतील आणि प्रौढ माणसं हे पुस्तक वाचून महाभारत मधील घनाक्रम आणि इतर बरीच माहिती समजून घेऊ शकतील.
- DAINIK SAMANA 22-12-2019
ज्ञात-अज्ञात महाभारत...
महाभारत! जगभरात ज्याची अजूनही पारायणं केली जातात अशी एक महागाथा. महाभारत जेव्हा जेव्हा वाचू तेव्हा तेव्हा नवं काहीतरी गवसतं आणि महाभारत जेव्हा वाचून पूर्ण होतं तेव्हा काहीतरी राहून गेल्याची जाणीव मनात निर्माण होते हीच महाभारताची खरी गंमत आहे. महाभारतात इतक्या व्यक्तिरेखा आहेत, की प्रत्येक व्यक्तिरेखेवर स्वतंत्र पुस्तक लिहावं. लेखिका सुधा मूर्तींनी याच महाभारतातल्या निवडक आणि रंजक गोष्टी निवडून त्याचा संग्रह असणारं ‘सर्पाचा सूड’ हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आणलं आहे. इतर पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकात सुधा मूर्तींची लेखणी वाचकांना खिळवून ठेवते.
व्यक्तिचित्र, प्रवासवर्णनपर, ललित साहित्यात सुधा मूर्तींचा हातखंडा आहेच. ‘सर्पाचा सूड’ वाचल्यानंतर पौराणिक विषयातसुद्धा सुधा मूर्तींची सहज वावरणारी लेखणी प्रत्ययास येते. महाभारतातील काहीशा ज्ञात-अज्ञात गोष्टी ‘सर्पाचा सूड वाचून कळून येतात. काही जुन्या गोष्टी नव्याने कळतात, तर काही अनोख्या गोष्टींचा उलगडा लागतो.
या पुस्तकाची खासियत अशी, की महाभारताचं विशेष असं पर्व न निवडता महाभारताआधी आणि महाभारतानंतर घडलेले काही प्रसंग वाचून आपल्याला थक्क व्हायला होतं. ‘स्त्री झालेला पुरुष’, ‘शापित देवता’, ‘परमेश्वराचा चेहरा’, ‘अर्जुनाची विविध नावे’, ‘शेवटचा पुत्र’, ‘अंतिम प्रवास’ यांसारखी महाभारताशी संबंधित अनेक छोटी मोठी प्रकरणे वाचक म्हणून आपल्याला खिळवून ठेवतात. प्रत्येक प्रकरणामध्ये असलेली समर्पक रेखाचित्रेसुद्धा काहीशी वेगळी आहेत.
सुधा मूर्तींचं प्रत्येक पुस्तक हे त्यांच्या साध्या सोप्या आणि दर्जेदार लेखणीमुळे नेहमीच मनात घर करतं. म्हणूनच वैयक्तिक आयुष्यात आलेले अनुभव ‘वाईज अॅण्ड अदरवाईज’मधून त्या वाचकांसाठी जिवंत करतात तर ‘सर्पाचा सूड’सारख्या पौराणिक कथासंग्रहातून त्या महाभारतातील वाचकांना माहीत असलेल्या गोष्टी नव्याने वाचकांसमोर घेऊन येतात. सुधा मूर्तींची अनेक पुस्तकं लीना सोहोनी यांनी मराठी वाचकांसाठी अनुवादित केली आहेत. ‘सर्पाचा सूड’सुद्धा लीना सोहोनी यांनी नेहमीच्या दर्जेदार मराठी शब्दसंपदेतून वाचकांच्या भेटीला आणलं आहे. जीवनाच्या प्रत्येक गोष्टीची ओळख करून देणारं महाकाव्य म्हणजे ‘महाभारत’. ‘सर्पाचा सूड’चा अनुभव घेऊन महाभारतामधील काहीशा सर्वश्रृत नसलेल्या विस्मयकारी गोष्टी वाचकांना मंत्रमुग्ध करतील यात शंका नाही.
-देवेंद्र जाधव
- Vaibhav Mahajan June 14
महाभारत म्हणले की आपल्या डोऴयासमोर कौरव व पांडव वा त्यांचे युध्द आपल्या मना समोर येते. `सर्पाचा सुड` या पुस्तकात `सुधा मुर्ती `ह्यांनी महाभारतातील अनेक न वाचलेल्या कथा सांगितल्या आहेत. जसे की परिशिती राजाची कथा . अश्या अनेक कथा या पुस्तकात आहेत.
- सकाळ १८ मार्च २०१८
सुधा मूर्ती या गोष्टी वेल्हाळ लेखिका. अनेक लोकांशी बोलण्यातून, कुठल्या प्रसंगातून त्यांना कथांचं बीज दिसतं आणि मूर्ती ते बीज छान फुलवतात. या पुस्तकात त्यांनी महाभारतातल्या अनेक न ऐकलेल्या प्रसंगांना, व्यक्तिरेखांना कथारूप दिलं आहे. प्राचीन कथांच्या सागरातून त्यांनी काही संदर्भ घेऊन थोडा तर्क लावून, न पटणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवून या कथांचं लेखन केलं आहे. अनेक माहीत नसलेल्या गोष्टी, वेगळी बाजू सांगणाऱ्या या कथा खिळवून ठेवतात. लीना सोहोनी यांनी अनुवाद केला आहे.
- महाराष्ट्र टाइम्स १८/२/२०१८.
सुधा मूर्ती यांचे आणखी एक असे रोचक पुस्तक म्हणजे `सर्पाचा सूड`. महाभारतात कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झाले. त्याविषयी तशी बरीच माहिती सर्वत्र मिळते किंवा लहानपणापासून ते आपण ऐकत, बघत आलेलो आहोत. परंतु युद्धाच्या आधी, युद्धादरम्यान असे अनेक प्रसंग घडले, ज्यामुळे महाभारत रंगत गेले. या कथा विस्मयकारक आहेत. एकमेकांमध्ये गुंतलेली नाती, आपापसातील वैर, चांगुलपणा या कथांमधून समोर येतो. अगदी लहान लहान अशा सुमारे ३३ कथा यामध्ये गुंफल्या गेल्या आहेत. यामध्ये अर्जुनाची नानाविध नावे कोणती, यमाला शाप का मिळाला, मुंगुसाने युधिष्ठिराला कसा धडा शिकवला, युद्धाचा शेवट नेमका कसा झाला, या अशा लहान पण कुतूहल जागृत करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे यातून मिळतात. अर्जुनाला आपल्याच मुलाकडून मृत्यूला कसे सामोरे जावे लागले, याचेही वर्णन यामध्ये आहे. कृष्णाच्या मुत्सद्दीपणाची चर्चा नेहमीच होते. पण लहान लहान प्रसंगातून त्याचा हा मुत्सद्दीपणा अधोरेखित होतो. प्रत्यक्ष युद्धकाळादरम्यान सुरू असलेली रणनीती अक्षरशः खिळवून ठेवते. कृष्णाचे धोरण पांडवांच्या यशास कारणीभूत कसे ठरले, हे टप्प्याटप्प्याने उलगडते. कौरव, पांडव यांच्या पलीकडे घटोत्कच, हिडिंबा, बार्बारिक, सुभद्रा, अभिमन्यू, बलरामाची मुलगी शशिरेखा यांच्या जीवनातील प्रसंगही यातून समोर येतात. पांडवांसमोर वनवासातील काळात अनेक आव्हाने समोर आली. परंतु त्यांनी ती समर्थपणे पेलली, यात काही जण दुखावलेही. या एकूणच कथा वरदान, शाप, उ:शाप या भोवती फिरताना आढळतात. सद्सद्विवेकबुद्धीने विचार केला तर आजच्या पिढीला यातून अनेक प्रश्न निर्माण होतील, परंतु समाजातील दुष्टप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी लोकांना शिक्षेचे, शापाचे भय दाखवणे गरजेचे आहे, असे आपल्या पूर्वजांना वाटत असेल, असे लेखिकेने म्हटले आहे. या कथा फारशा लोकप्रिय नाहीत. परंतु अत्यंत रोचक आहेत. या पुस्तकात जागोजागी सध्याच्या भारतातील घटनांचा उल्लेख करून वर्तमानाशी सांगड घालण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. महाभारतात आढळून येणारी स्थळे, गावे आणि सध्याच्या भारतातील ठिकाणे यांचा परस्परसंबंधसुद्धा सूचित केलेला आहे. कुंकरू येथील महामाया मंदिर किंवा राजस्थानातील खाटू श्यामची मंदिर, अशी उदाहरणे यात आहेत. दुष्यंत-शकुंतला यांची पुनर्भेट, भीष्माची ब्रह्मचर्यपालनाची शपथ, आणि त्यातून त्यांचा उद्भवलेला मृत्यू या नाट्यमय घडामोडी यातून उलगडतात. ऋषींनी घेतलेला सूड या कथेतून द्रोणाचार्यांची वेगळी बाजू समोर येते. एकूणच सूडाचं राजकारण यापैकी बहुतांश कथांच्या मुळाशी आहे. या राजकारणातून अनेक नाती विलग झाली. अपरिमित हानी झाली. पांडवांचा वंशज जनमेजयाने हे सूडाचे राजकारण थांबवण्याचा निर्णय घेतला. या कथेने पुस्तकाचा शेवट होतो आणि महाभारतातील प्रत्येक प्रवृत्ती आजही कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्या भोवतालीच आहे, असे क्षणभर वाटून जाते. या दोन्ही पुस्तकांचा अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.