- DAINIK SAMANA 08-04-2018
पुन्हा एकदा हिटलर...
जगात जसे रावण, कंस आणि दुर्योधनाचे अवतार जेवढे क्रूर तेवढे लोकप्रिय का असतात? आधुनिक काळातील हिटलर काय किंवा सद्दाम, लादेन, इदी अमीन यांच्यासारखे राक्षस वर्षानुवर्षे सत्तेवर राहतात आणि इतिहास रक्ताने भरून टाकतात. अशा सत्तांध, नराधमांची चरित्रे किंवा आत्मचरित्रे प्रचंड प्रमाणात वाचली जातात, असे का? फ्रॉइडने म्हटले आहे, ‘प्रत्येक माणसात एक पशू लपलेला असतो.’ या विधानाचा प्रत्यय रोज छोट्या पडद्यावर बघायला मिळतो. ‘हिटलर’ हा असाच एक दानव होता, जो मानवाच्या जिवावर उठला होता.
दरवर्षी हिटरलविषयक नवनवी पुस्तके येत असतात. जग जिंकण्याच्या लालसेने पिसाटलेला हा दैत्य अखेर ‘दो गज जमीन के नीचे’ गेला. पहिल्या महायुद्धात जर्मनी हरला होता, परंतु दुसऱ्या महायुद्धात त्या देशाने प्रचंड विजय मिळविला. या यशामागे होता हिटलर. अर्थात त्याचे चाहते त्याचे भक्तिभावाने समर्थन करतात, हा भाग वेगळा.
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाच्या कला अकादमीत ते चित्रकला शिकत होते, पण नापास झाल्याने तिथे आणि म्युनिक (जर्मनी)मध्ये वयाची १८ ते २५ वर्षे वाया घालवली. वयाच्या तिसाव्या वर्षी तो एका राजकीय प्रवासाकडे निघाला आणि पुढे तब्बल २६ वर्षे तो सतत यश मिळवत गेला. त्याच्या आयुष्यात अनेक लावण्यवती आल्या. त्याला ठरावीक वेळी त्या हव्याशा वाटत. इतर वेळी तो अन् त्याचे राजकारण हेच महत्त्वाचे वाटत असे. या बारीकसारीक तपशिलांसह लेखकाने सखोल अभ्यास करून या चरित्रग्रंथाची वेगळी मांडणी केली आहे.
हिटलरच्या अनेक उत्तम गुणांपैकी एका होता त्याचा अफाट वाचनाचा छंद. बेकारीच्या काळात त्याने जे असंख्य ग्रंथ वाचले होते त्यांचा उपयोग पुढे फार झाला. अर्थात वाचन कधीच वाया जात नाही? (हिंदुस्थानातले किती राजकारणी वाचन करतात याचा शोध घ्यायची गरजच नाही. अनेक घरांचे मालक असणारे मंत्री शाही घरात एक पुस्तक ठेवतील तर शपथ!) असो, हिटलरची जडणघडण त्याने स्वत:च केली. निग्रही वागणे, धाडसी स्वभाव, धैर्याबरोबर शौर्य आणि पराजय मान्य न करण्याची चिकाटी हे सद्गुण होते तर दुराग्रही वागणे, बदला घेण्याची क्रूर वृत्ती, कुणावरही विश्वास न ठेवण्याची सवय हे त्याचे दुर्गुण. या गुणदोषांचे बरे-वाईट परिणाम त्याला आणि त्याच्या सहवासात आलेल्या/असलेल्या अनेक निष्ठावंतांना भोगावे लागले.
प्रस्तुत चरित्रग्रंथात कहाते यांनी हिटलरच्या गुणावगुणांचे समर्थपणे दर्शन घडवले असून त्याचे यश, त्याच्या चुका आणि यासंबंधी अनेक मुद्दे अधोरेखित केले असून त्याच्या शोकांतिकेनंतर काय काय घडले, हेही सविस्तर संदर्भासहित सांगितले आहे. ३० एप्रिल १९४५ या शुभविशी ईव्हा ब्राऊनसह त्याने दुपारी ३.३० वाजता आत्महत्या केली. पुढे त्याच्या साथीदारांनी काय केले. ते कुठे लपले व पळाले हेही चित्तथरारक प्रकरण आहे. रशियन सेनेने जर्मनी ताब्यात घेऊन युरोपात शांती प्रस्थापित कशी केली. जर्मन लोकांना हेही समले की, एका क्रूरकर्मा व्यक्तीच्या भूलथापांना भुलून आपण कंगाल झालो; पण तेव्हा उशीर कसा झाला होता, हा सारा इतिहास वाचायलाच हवा.
– अरविंद दोडे
- Ranga Joshi
हिटलर नसता तर ज्यु शास्त्रज्ञाना देश सोडावा लागला नसता आणि अजूनही चांगले चांगले शोध लागून मनुष्य सृष्टी आनंदी झाली असती
- Amruta Chougule
विसाव्या शतकामधला सगळ्यात गाजलेला माणूस म्हणून आपण अॅडॉल्फ हिटलरचं नाव घेऊ शकतो. पहिल्या महायुद्धात मानहानी झालेल्या जर्मनीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या ध्येयानं भारून गेलेल्या हिटलरनं अत्यंत अनपेक्षितरीत्या जर्मनीची सत्ता आपल्याकडे खेचून घेतली आणि भल्याभल्यांना जमणार नाही अशी कामगिरी करण्याचा चंग बांधला. एकामागून एका देशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत हिटलरनं सगळ्या जगाची झोप उडवली. त्याचं आसुरी स्वप्न मात्र नंतर भंगत गेलं. केवळ डझनभर वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत हिटलरनं अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्यू लोकांचा संहार, आपल्या शत्रूंशी अत्यंत क्रूरपणे वागणं, आपल्याच सहकाऱ्यांवर विलक्षण अविश्वास दाखवणं, माणुसकीचा अंशही वागण्याबोलण्यातून न दाखवणं, अशा त्याच्या अनेक अवगुणांचं त्याच्या गुणांबरोबरच विश्लेषण करणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं. हुकूमशाही आणि एकाधिकारशाही यांचं थैमान त्याच्या कारकिर्दीत बघायला मिळालं. जगाला वेगानं दुसNया महायुद्धाकडे नेणाऱ्या या खलनायकाविषयी अनेक जणांना सुप्त आकर्षण वाटत असतं. मुळात हिटलर इतका लोकप्रिय कसा झाला आणि त्याच्याविषयी आजसुद्धा इतकं का बोललं जातं, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा सखोल ऊहापोह अत्यंत सोप्या भाषेत सगळ्या वयोगटामधल्या मराठी वाचकांसाठी या पुस्तकात केला आहे. नव्यानं या जगात हिटलर निर्माण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, यासाठीची दृष्टीही वाचकांना या निमित्तानं मिळेल!
- Yogesh Jadhav
Good book By again my Favorite Author... Atul Kahate...
- दैनिक शिवनातीर औरंगाबाद ३० नोव्हेंबर २०१७
नकारात्मक इतिहास रचणाऱ्या नेत्याचं वादळी चरित्र
अॅडॉल्फ हिटलर या ऐतिहासिक व्यक्तीबाबतचं कुतूहल सर्वसामान्य माणसापासून अभ्यासक, लेखकांना अद्यापही आहे; कारण दुसरं महायुद्ध त्याच्यामुळे सुरू झालं होतं. त्याची जगज्जेता होण्याची महत्त्वाकांक्षा आणि त्याने ज्यू लोकांचं केलेलं शिरकाण या दोन गोष्टींमुळे तो जागतिक स्तरावर चर्चेत राहिला आणि त्याने केलेल्या आत्महत्येमुळे त्याच्याभोवती एक गूढतेचं वलय निर्माण झालं. तर अशा या अत्यंत व्यामिश्र अशा ऐतिहासिक व्यक्तीची व्यक्तिरेखा अतुल कहाते यांनी ‘अॅडॉल्फ हिटलर : द ग्रेट डिक्टेटर’ या चरित्रातून साकारली आहे.
एक राजकीय नेता म्हणून हिटलरची जडणघडण कशी झाली इथपासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास या चरित्रातून शब्दबद्ध केला आहे. जर्मनीत अंदाधुंदी माजलेली असताना हिटलरने चॅन्सेलर पदासाठी अर्ज केला आणि एका रात्रीत तो चॅन्सेलर झाला. त्याआधी त्याने उठाव करून जर्मनीची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला होता; पण तो यशस्वी झाला नाही; मात्र या उठावामुळे त्याच्या बाजूने जनमत तयार झालं. या उठावानंतर त्याने ‘माईन काम्फ’ हे त्याचं आत्मचरित्र लिहिलं.
चॅन्सेलर होताच त्याची वाटचाल हुवूâमशाहीकडे होत गेली आणि हुकूमशहा म्हणून तो ओळखला जाऊ लागला. हिटलरच्या काळातही जर्मनीमध्ये अंतर्गत खळबळ चालूच होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय चालीही तो खेळत होता. ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया, पोलंड, पॅरिस या देशांवर वर्चस्व मिळवून पूर्वेकडील देशांकडेही हिटलरने नजर वळवली. रशियावर आक्रमण करून त्याने बहुसंख्य रशियन सैनिकांना ठार मारलं, काही रशियन सैनिकांना कैदेत टाकून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. रशियन नागरिकही त्याच्या तावडीतून सुटले नाहीत; मात्र येवढं होऊनही रशियावर त्याला पूर्ण कब्जा मिळवता आला नाही. त्यामुळे तो निराश झाला आणि त्यानंतर रशियनांनी जर्मनीचं आक्रमण परतवून लावलं आणि इथूनच हिटलरच्या कारकिर्दीला उतरती कळा लागायला सुरुवात झाली. त्यानंतर त्याला अनेक पराभव पचवावे लागले.
जर्मनीतही काही लोक त्याच्या विरोधात होते. त्यांनी हिटलरला ठार मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. त्याच्याच लष्करातील एक अधिकारी स्टॅफेनबर्गने त्याला संपवण्याचा कट रचला होता; पण तोही यशस्वी झाला नाही. एकूणच वातावरण हिटलरच्या विरोधात होत गेलं आणि आपला घात झाल्याची भावना त्याच्या मनामध्ये बळावत गेली आणि शेवटी त्याने आत्महत्या केली. त्यानंतर त्याचा जवळचा सहकारी गोबेल्सने आपल्या सहा मुलांना संपवलं आणि आपल्या पत्नीसह आत्महत्या केली.
गोबेल्स आणि हिमलर या हिटलरच्या जवळच्या सहकाऱ्याबद्दलही या पुस्तकातून माहिती मिळते. गेली ही हिटलरची सावत्र भाची. तिच्याबरोबरच्या हिटलरच्या प्रेमसंबंधांबाबतही या पुस्तकात लिहिलं आहे. गेलीने आत्महत्या केली. हिटलरला सुंदर स्त्रियांच्या सहवासात राहायला आवडायचे; मात्र त्याचे लैंगिक वर्तनही विकृत असावे, असा अंदाज बांधता येतो.
ज्यूंच्या छळछावण्यांवर देखरेख ठेवण्यासाठी हिटलरने एसए आणि एसएस या संघटना स्थापन केल्या. या संघटनेतील अधिकाऱ्यानी ज्यूंवर अनन्वित अत्याचार केले. त्यापैकी एसए ही संघटना नंतर हिटलरनेच संपुष्टात आणली. एसएस संघटना मात्र त्याच्या मृत्यूपर्यंत अस्तित्वात होती. हिटलरच्या मृत्यूनंतर या संघटनेच्या काही अधिकाऱ्यानी आत्महत्या केली तर काहींवर खटले दाखल होऊन त्यांना फासावर लाटकवलं गेलं.तर काहींना तुरंगवासाची शिक्षा झाली.
हिटलरच्या मृत्यूमुळे जर्मनीवर आणि जगभर त्याचे काय परिणाम झाले, याचंही वर्णन या पुस्तकात केलं आहे.
तर एका मानसिकदृष्ट्या असंतुलित व्यक्तीमुळे केवळ त्याच्या देशातीलच नव्हे तर जागतिक राजकीय वातावरण नकारात्मकरीत्या कसं ढवळून निघतं, याचं अॅडॉल्फ हिटलर हे उत्तम उदाहरण आहे. त्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे आणि क्रूरतेचे परिणाम ज्यूंना तर भोगावे लागलेच; पण इतर देशांतील नागरिकांनाही भोगावे लागले. त्याच्या स्वभावाच्या नकारात्मक पैलूंना ’लीडरशिप’ असं नाव देण्याची घोडचूक जर्मनीतील नागरिकांनी केली आणि जर्मनीबरोबरच जागतिक विनाशालाही आमंत्रण दिलं. कोणतीही विधायक गोष्ट न करता जागतिक विध्वंसाला कारणीभूत ठरलेल्या हिटलरला आत्महत्या करावी लागली आणि त्याच्या सहकाऱ्याचीही तीच गत झाली.
साध्या-सरळ निवेदनातून हे पुस्तक पुढे सरकत राहतं. त्यामुळे ते कुठेही कंटाळवाणं होत नाही. हिटलरचं व्यक्तिमत्त्वं तर यातून उलगडतंच, पण तत्कालीन राजकारणाची, विशेषत: दुसऱ्या महायुद्धकालीन परिस्थितीची अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकातून मिळते. एकूणच, आवश्यक ते संदर्भ गोळा करून अतुले कहाते यांनी सिद्ध केलेलं ‘अॅडॉल्फ हिटलर : द डिक्टेटर’ हे पुस्तक अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे आणि सर्वसामान्यांनाही भुरळ घालेल असं आहे. यातील छायाचित्रं आणि शेवटी दिलेली संदर्भ ग्रंथांची यादी या पुस्तकाचं संदर्भमूल्य वाढविते.