- Trupti Walunjpatil
"हिज डे". पुस्तकाच्या नावातल्या दोन शब्दांतली जागा काढली की झाला शब्द "हिजडे". हो, हे पुस्तक "हिजडे" अर्थात तृतीयपंथीयांवरचं आहे. रस्त्यावर, रेल्वे गाड्यांमध्ये भीक मागताना, टाळ्या वाजवताना किंवा शुभकार्याच्या प्रसंगी हक्काने पैसे मागणारे हे लोक आपण पाहिलेले असतात. त्यांच्या बद्दल भीती, किळस, कुतूहल, अनुकंपा अश्या कितीतरी वेगवेगळ्या भावना प्रत्येकाच्या मनात असतात. अश्या सगळ्या अनुभवांना सोबत घेत, कशालाही चूक ना ठरवता आपल्याला त्यांच्या जगात घेऊन जाणारं; त्यांच्या भावना दाखवणारं हे पुस्तक आहे.
- Mohini Joshi
ह्या पुस्तकाचा विषय तुमच्यासाठी वेगळा आहे..
कदाचित ह्या जगण्याला, असण्याला समाज काडीचीही किंमत देत नसेल. पण आम्ही आहोत.. स्त्री, पुरुष या जातीत मोडत नसलो तरी बाईमाणूस आहोत.. आजचा अभिप्राय " हिज डे" या पुस्तकासाठी .. मी स्वतः एक crossdresser आहे..
स्वाती चांदोरकर या लेखिकेने आम्हा तृतीय पंथी लोकांची व्यथा ह्या पुस्तकातून मांडली आहे.
.. कथेची सुरुवात होते ती हेलीना नावाच्या 20 वर्षीय लाजर, बुजरया आणि शारीरिक वाढ पूर्ण न झाल्यामुळे खचलेल्या, जगापासून अलिप्त रहाणार्या मुली पासून.
मानसोपचार तज्ज्ञ म्हणून शिक्षण घेत असताना तिची मैत्री होते ती चमेली बरोबर जी एक तृतीय पंथी असते.. आणि जया जिला मुलींन बदल आकर्षण असते..
अश्या ह्या तिघींची कथा..
शरीर आणि मन दोन्ही भिन्न असणार्यांची ही कथा..
नक्किच वाचा..
मीही त्यातलीच आहे.. शरीर पुरुषी मन मात्र स्त्री च...
- Suhas Jadhav
ही कादंबरी मती सुन्न करते तसेच या लोकांबाबत सहानुभूतीने विचार करण्यास प्रवृत्त करते. ’हिज डे कादंबरी ही ट्रान्स जेंडर, त्यांच्या वेदना क्लेश समस्या यावर आधारित असून ती सत्य आणि काल्पनिक यांची गुंफण. नक्की वाचा मन सुन्न करणारी आणि वाचनात एक नवीन भर टाकणारी कादंबरी.
- Manisha Sanndip
#पुस्तकंविवेचन
#हिज_डे
आजचा पुस्तकाचा विषय वेगळा आहे कदाचित या विषयाला, या जगण्याला, त्यांच्या असण्याला काडीचीही किमंत देत नसेल समाज पण ते आहेत,स्त्री, पुरुष या जातीत मोडत नसले तरी माणूस आहेत.. त्यांना हक्क आहे जगण्याचा, मानसम्मान मिळवण्याचा.. आजचा अभिप्राय "हिज डे" या पुस्तकासाठी...स्वाती चांदोरकर या लेखिकेने त्रितियपंथी लोकांची व्यथा आपल्यासमोर या पुस्तकातून मांडली आहे....फार पूर्वी शेहनशाह, त्रितियपंथी लोकांना त्यांच्या प्रामाणिकपणामुळे जनानखाण्यात सुरक्षारक्षक म्हणून ठेवत असत... पण पुढे त्यांचा प्रामाणिकपणा इंग्रजांसाठी धोकादायक ठरू शकतो या हेतूने त्यांना विनाकारण बंदी बनवण्यात आले आणि त्यांचा अतोनात छळ करण्यात आला पण एक दिवस एका जेलरला या सगळ्यात प्रकरणात या लोकांची काहीही चुक नाही हे लक्षात येते अन दया दाखवून त्यांना तो एक दिवस मुक्त जगण्यासाठी सोडतो आणि म्हणतो "वन डे इज ऑन्ली हिज डे"आणि त्यांना त्यादिवशी पासून यांना "हिजडे" म्हंटले गेले हा शब्द त्यांच्यासाठी मुक्तीचा दिवस म्हणून मानाचा आहे असें ते मानतात..कथेची सुरवात होते ती हेलीना नावाच्या वीसवर्षीय लाजऱ्याबुजऱ्या अन शारीरिक वाढ पूर्ण न झाल्यामुळे खचलेल्या, जगापासून अलिप्त राहणाऱ्या मुलीपासून..मानसोपचार तज्ज्ञ म्हणून शिक्षण घेत असताना तिची मैत्री होते ती चमेली सोबत जी एका त्रितियपंथी "हाला "ची मुलगी असते तिला लोकांनी जवळपास वाळीत टाकल्यासारखेच असते.. दुसरी मैत्रिण जया तिला मुलींबद्दलचं आकर्षण का वाटतं असते याची नुकतीच जाणीव झालेली.. चमेली अन जया सोबत मैत्री झाल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णतः बदलून जाते.. चमेलीसोबत राहून ती त्रितियपंथी लोकांना साधे पोट भरण्यासाठी किती कठीण आयुष्य जगावे लागते याचे प्रचिती येते.. या वस्तीतील, शामची श्यामली होताना, आणि "सुक्की"ची "तो" होताना जी शरीराची, मनाची वेदनादायी चिरफाड होते ते वाचून तर अंगावर काटा उभा राहतो.. शरीर अन मन दोन्ही भिन्न असणारी ही लोक निसर्गाची ही दुष्ट्ट देणगी नाकारतात तेंव्हा प्रामाणिकपणे देवाची माफीही मागतात.. प्रामाणिकपणा यांच्यात जन्मतः असतो.. पैशासाठीची खरं तर जगण्यासाठीची धडपड, त्यामुळे करावी लागणारी देहविक्री आणि अस्वछता त्यातून होणारे जीव घेणारे भयंकर आजार, स्वतःच्या लोकांनी नाकारलेले, समाजाने नाकारलेले अश्यामधे हे लोक एकमेकांचा आधार बनतात.. अतिशय हृदयद्रावक व्यथा या पुस्तकातून समोर आणणाऱ्या धाडसी लेखिकेला सलाम, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा तपशील अगदी बेडरपणे पुस्तकात मांडला आहे.. हेलीना, चमेली, जयाचा आणि त्रितियपंथी लोकांचा जीवन प्रवास यातून कसा होतोे जाणून घेण्यासाठी नक्की हे पुस्तकं नक्की वाचा...
©Manisha Sandip
- SHABD RUCHI, MARCH 2018
तृतीय पंथीयांच्या वेदनामय जगाचं करुण दर्शन...
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विश्वास मेहेंदळे यांनी एक आठवण सांगितली होती. दूरदर्शनवर विविध कार्यक्रम सादर करताना तृतीय पंथीयांवर एक कार्यक्रम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. तेव्हा त्यांनी एका तृतीय पंथीयाला विचारलं होतं, ‘तुमच्यामध्ये माणूस मेल्यानंतर प्रेतयात्रा काढत नाहीत का?’ त्यावर त्या तृतीय पंथीयाने उत्तर दिलं होतं, ‘काढतात; पण मध्यरात्रीनंतर. प्रेताला तिरडीवर बसवलं जातं आणि मग आम्ही सगळे त्या प्रेताला चपलांनी खूप मारतो. परत त्याने या जन्माला येऊ नये म्हणून.’ त्या तृतीय पंथीयाचं हे उत्तर तृतीय पंथीयांच्या वाट्याला येणाऱ्या अनंत यातनांची कल्पना आणून देणारं आहे. तृतीय पंथीयांच्या या वेदनांचा प्रवास स्वाती चांदोरकर यांनी ‘हिज डे’ या कादंबरीतून शब्दबद्ध केला आहे.
हेलीना आणि चमेली या दोघींच्या प्रथमपुरुषी निवेदनातून ही कादंबरी साकारली आहे. हेलीनाने सायकॉलॉजी हा विषय स्पेशल घेतलेला असतो. सायकॉलॉजीचा अभ्यास करताना ती तृतीय पंथीय या विषयाकडे ओढली जाते. याचं कारण असतं, तिची मैत्रीण चमेली. चमेली तृतीय पंथीयांच्या वस्तीत राहत असते. तिचे वडील पुरुष असले तरी स्त्रीसारखं राहावं, असं त्यांना वाटायला लागतं आणि मग ते साडी नेसायला लागतात. हेलीनाला चमेलीकडून तृतीय पंथीयांविषयी जी माहिती मिळत असते, त्यामुळे तिचं मन ढवळून निघतं. शरीर स्त्रीचं, पण वर्तन (विशेषत: लैंगिक वर्तन) पुरुषासारखं करावंसं वाटणं किंवा शरीर पुरुषाचं, पण वर्तन स्त्रीसारखं करावंसं वाटणं, हा या लोकांना मिळालेला शाप असतो.
या कादंबरीतून त्यांच्या या शापित जीवनाचे अनेक पदर हेलीनाच्या प्रथमपुरुषी निवेदनातून उलगडतात. तृतीय पंथीयांचं हे जग पाहताना ती मनाने अनेकदा कोलमडते; पण परत उभी राहते. आकाश या मुलाशी तिची ओळख होते. तिच्या या कामासाठी आकाशचा तिला खंबीर पाठिंबा मिळतो. ती आकाशशी लग्न करते आणि त्यांना मुलगाही होतो. तो बायोलॉजिकली मुलगा आहे, पण नंतर जर त्याच्यात तृतीय पंथीयाची लक्षणं निर्माण झाली, तर आपण दोघंही त्याला चांगल्या रीतीने समजावून घेऊ शकतो, अशी भावना हेलीना आणि आकाशची असते. या सकारात्मक भावनेपाशी ही कादंबरी संपते, म्हणण्यापेक्षा एका सकारात्मक प्रवासाची सुरुवात ती करते, असं म्हणायला हरकत नाही.
वसई आणि मुंबईच्या परिसरात ही कथा आकारते. त्यामुळे वसई आणि मुंबईतील जीवनाचं दर्शन या कादंबरीतून घडतं. वसईसारखं गाव आणि मुंबईसारखं महानगर हे दोन्ही परिसर या कादंबरीचा एक भाग बनतात.
हेलीना, चमेली, हेलीनाची आणखी एक मैत्रीण जया (जिला हेलीनाबद्दल शारीरिक आकर्षण वाटत असतं), हेलीनाची आजी, तिचे आई-वडील, आकाश इ. व्यक्तिरेखा हेलीनाच्या निवेदनातून साकारल्यामुळे वास्तव वाटतात. हेलीनाचे आणि त्यांचे भावबंध थेटपणाने समोर येतात.
तर तृतीय पंथीयांमधील मनोकायिक बदल, त्यांच्या लैंगिक जाणिवा त्यांना समाजापासून वेगळं राहण्यास भाग पाडतात. त्यांच्यात नकारात्मकता निर्माण करतात. त्यांच्या या मनोवेदनांचं जग स्वाती चांदोरकर यांनी अतिशय परिणामकारकतेने साकारलं आहे. ओघवत्या निवेदन शैलीमुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. या पुस्तकाचा अभिप्राय म्हणून प्रवीण दवणे यांनी स्वाती चांदोरकरांना लिहिलेलं पत्र या कादंबरीच्या सुरुवातीला उद्धृत करण्यात आलं आहे. त्यामुळे या कादंबरीचं मूल्य आणखी वाढलं आहे.
-अंजली पटवर्धन
- Divya Marathi 9-2-18
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विश्वास मेहेंदळे यांनी एक आठवण सांगितली होती. दूरदर्शनवर विविध कार्यक्रम सादर करताना तृतीय पंथीयांवर एक कार्यक्रम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. तेव्हा त्यांनी एका तृतीय पंथीयाला विचारलं होतं, `तुमच्यामध्ये माणूस मेल्यानंतर प्रेतयात्रा काढत नाहीत का?` त्यावर त्या तृतीय पंथीयाने उत्तर दिलं होतं, `काढतात; पण मध्यरात्रीनंतर. प्रेताला तिरडीवर बसवलं जातं आणि मग आम्ही सगळे त्या प्रेताला चपलांनी खूप मारतो. परत त्याने या जन्माला येऊ नये म्हणून.` त्या तृतीय पंथीयाचं हे उत्तर तृतीय पंथीयांच्या वाट्याला येणाऱ्या अनंत यातनांची कल्पना आणून देणारं आहे. तृतीय पंथीयांच्या या वेदनांचा प्रवास स्वाती चांदोरकर यांनी `हिज डे` या कादंबरीतून शब्दबद्ध केला.
हेलीना आणि चमेली या दोघींच्या प्रथमपुरुषी निवेदनातून ही कादंबरी साकारली आहे. हेलीनाने सायकॉलॉजी हा विषय स्पेशल घेतलेला असतो. सायकॉलॉजीचा अभ्यास करताना ती तृतीय पंथीय या विषयाकडे ओढली जाते. याचं कारण असतं, तिची मैत्रीण चमेली. चमेली तृतीय पंथीयांच्या वस्तीत राहत असते. तिचे वडील पुरुष असले तरी स्त्रीसारखं राहावं, असं त्यांना वाटायला लागतं आणि मग ते साडी नेसायला लागतात. हेलीनाला चमेलीकडून तृतीय पंथीयांविषयी जी माहिती मिळत असते, त्यामुळे तिचं मन ढवळून निघतं. शरीर स्त्रीचं, पण वर्तन (विशेषत: लैंगिक वर्तन) पुरुषासारखं करावंसं वाटणं किंवा शरीर पुरुषाचं, पण वर्तन स्त्रीसारखं करावंसं वाटणं, हा या लोकांना मिळालेला शाप असतो. या कादंबरीतून त्यांच्या या शापित जीवनाचे अनेक पदर हेलीनाच्या प्रथमपुरुषी निवेदनातून उलगडतात. तृतीय पंथीयांचं हे जग पाहताना ती मनाने अनेकदा कोलमडते; पण परत उभी राहते. आकाश या मुलाशी तिची ओळख होते. तिच्या या कामासाठी आकाशचा तिला खंबीर पाठिंबा मिळतो. ती आकाशशी लग्न करते आणि त्यांना मुलगाही होतो. तो मुलगा आहे, पण नंतर जर त्याच्यात तृतीय पंथीयाची लक्षणं निर्माण झाली, तर आपण दोघंही त्याला चांगल्या रीतीने समजावून घेऊ शकतो, अशी भावना हेलीना आणि आकाशची असते. या सकारात्मक भावनेपाशी ही कादंबरी संपते, हेलीना, चमेली, हेलीनाची आणखी एक मैत्रीण जया (जिला हेलीनाबद्दल शारीरिक आकर्षण वाटत असतं), हेलीनाची आजी, तिचे आई-वडील, आकाश इ. व्यक्तिरेखा हेलीनाच्या निवेदनातून साकारल्यामुळे वास्तव वाटतात. हेलीनाचे आणि त्यांचे भावबंध थेटपणाने समोर येतात. तर तृतीय पंथीयांमधील मनोकायिक बदल, त्यांच्या मनोवेदनांचं जग स्वाती चांदोरकर यांनी अतिशय परिणामकारकतेने साकारलं आहे. ओघवत्या निवेदन शैलीमुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. या पुस्तकाचा अभिप्राय म्हणून प्रवीण दवणे यांनी स्वाती चांदोरकरांना लिहिलेलं पत्र या कादंबरीच्या सुरुवातीला उद्धृत करण्यात आलं आहे. त्यामुळे या कादंबरीचं मूल्य आणखी वाढलं आहे.