- Shourya Sutar
प्रतेक नोकरी करण्यारया व्यक्तीने जरुर वाचावे.. या मधे लेखकाने अतिशय सुंदर पणे विविध व्यक्तींचे अनुभव मांडले आहेत. नोकरी करण्यारया माणसाच्या वेग वेगळ्या छटा त्यांचे जिवनातल आनंद, संघर्ष, प्रोब्लेम सर्व काही आहे यात. वाचताना किती प्रसंग आपल्या सोबतही घडुन गेले आहे अस वाटत..!
- सदा कऱ्हाडे
व. पु. काळे यांचा ‘कर्मचारी’ हा संग्रह उल्लेखनीय आहे. मध्यमवर्गीय समाजातील जे स्त्रीपुरुष मुंबईत नोकऱ्या करतात त्यांच्या सुखदु:खांचा पट येथे चित्रित केला आहे. आज महागाई फार भडकलेली आहे. जागेचा प्रश्न अत्यंत कठीण आहे. प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी नवराबायको या दोघांनाही नोकरी करणे अपरिहार्य होऊन बसले आहे. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हे रोजचे प्रदीर्घ प्रवास, जेवणाचे हाल, ऑफिसमध्ये गेल्यावर लहान मुले कोठे ठेवावीत इ. अनेक प्रश्नांमुळे कर्मचारी गांजून गेला आहे. मनातली स्थाने, कठोर वास्तव परिस्थिती, तडजोडी, कुटुंबातल्या व्यक्तींचे गैरसमज, वाढत्या जबाबदाऱ्या आणि शारीरिक शिणवटा या असह्य ओझ्याखालचे तरीही आनंदी वृत्तीने जगू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन वपुंनी मोठ्या मार्मिक, भेदक, प्रवाही शैलीत रेखाटले आहे. या कथांमध्ये कोठेही तोचतोचपणा येत नाही. पुनरुक्ती होत नाही. त्याचप्रमाणे या कथांत खोटा गहिवर किंवा अतिशयोक्त पेचप्रसंगही नाहीत. काही ठिकाणी थोडे चटपटीत, चलाख लेखनही आहे; पण एकंदरीत लेखकाने निकटवर्ती जीवनांनुभवाची स्पंदने सशब्द करून मध्यमवर्गीयांचे जीवन किती अशांत आणि अस्वस्थ आहे हे यशस्वी रीत्या दाखवून दिले आहे.
- सौ. चित्रा प्रधान
दर्जेदार चित्रवेधक साहित्य…
मुंबापुरी ही बहुरंगी नि बहुढंगी नगरी आहे. ह्या नगरीत नाना तऱ्हेचे लोक राहतात, त्यांची नाना तऱ्हेची स्वभाव वैशिष्ट्ये असतात. अशा लोकांच्या व्यक्तिरेखा कागदावर रेखाटणे एक महाकठीण काम. कोणी एखादं दुसऱ्या व्यक्तीचे वा फारतर दोन चार व्यक्तींचे रेखाटन आपल्या साहित्यात करील पण कथालेखक श्री. व. पु. काळे यांनी अशा एक-दोन ना अनेकांचे व्यक्तिचित्रण आपल्या ‘कर्मचारी’ ह्या संग्रहातील कथांत उत्कृष्ट पणे केलेले आढळेल.
व. पुं. च्या त्या साऱ्या व्यक्ती हरघडीच्या जीवनातील आहेत. कोणत्याही कचेरीत, त्यांनी रंगविलेली पात्रे हमखास सापडतील. त्या रंगविताना काळे ह्यांनी त्यांच्या नजरेसमोर आलेल्या परिचित अपरिचितांचे किती सूक्ष्म निरीक्षण केले आहे त्याची तेव्हाच कल्पना येईल. त्यांचे विचार, त्यांच्या सवयी, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे हेवेदावे अशा अनेक अंगांचे बारकावे त्यांत पाहावयास मिळतील. ह्या कथा वाचताना त्यातला तो लहानग्या देवयानीवर असीम प्रेम करणारा देवस्थळी, चमत्कारिकपणे संबंध तोडून वागणारा वकील लांबडे, मुलाच्या मृत्यूनंतरही लगेच ऑफिसात येणारा स्थितप्रज्ञ कारखानीस, स्वत:च्या घरासाठी शिस्त व टापटीपीवर भर देता देता जीवन म्हणजे सहज मानू लागलेला सातवळेकर, भांडण्याच्या कलेत पारंगत झालेला जोशी, साहेबांच्या कच्छपि गेलेली वंदना सामंत, लाचखाऊ गोखले आणि कितीतरी व्यक्तिरेखा जणू आपल्यासमोर वापरत आहेत असा भाग होतो. इतक्या त्या जिवंतपणे आपल्यापुढे उभ्या करण्याचे सामर्थ्य काळ्यांनी आपल्या लेखणीच्या साह्याने दाखवून दिले आहे. त्या सर्व रेखाटतात मध्यमवर्गीय माणसाच्या विविध समस्या त्यांनी लीलया हाताळल्या आहेत. त्यांच्या संवेदनांना वाट मोकळी करून दिली आहे, त्यांच्या सुखदु:खांशी ते एकरूप झाले आहेत.
त्यांच्या लेखनशैलीत साधेपणा आहे, मनमोकळेपणा आहे, ललित आहे नि औत्सुक्यवर्धनांची किमयाही आहे. एकदा कथा वाचण्यास प्रारंभ केल्यानंतर ती पूर्ण केल्याविना राहवत नाही आणि मग लगेच मन धाव घेते पुढच्या व्यक्तिचित्राकडे आता ह्या कर्मचाऱ्यात अनेकजण आहेत पण कोणत्याही दोन कथात पुनरुक्तीचा लवलेशही नाही. प्रत्येकीचा साज वेगळा, ढंग वेगळा, रचना वेगळी, प्रारंभ वेगळा नि शेवटही वेगळा- बहुतांश परिणामकारक.
- Aditya Kelkar
तुम्ही
दुधाच्या ,रेशनच्या , साखरेच्या ,
तिकिटांच्या ,बसच्या
रांगेत तासन तास उभे राहता .
चालती गाडी पकडता .
लोकलला लोंबकळता .
लेट मार्क चुकवण्यासाठी
जीव गहाण टाकता .
साहेबाची बोलणी खाता .
कॅन्टीन चा बेचव चहा पिता.
संसारात तर नाना आपत्ती सहन करता
आज हे नाही , उद्या ते नाही .
मोर्चा , हरताळ ,
संचारबंदी , उपोषण
सगळं हलाहल पचवता
तरीही .....
तुम्ही
हसता , हसवता .
गाडीत उभ्या उभ्या पत्ते खेळता .
राजकारणावर
हिरीरीने बोलता .
एखाद्याला मोरू बनवून आनंद
निर्माण करण्याचा
प्रयत्न करता.
बेचव चहाच्या पैजेवरही
खुश होता .
यु आर सिम्पली ग्रेट !
असे तुम्ही जातिवंत
"कर्मचारी "
हा कथासंग्रह म्हणायचा नाही ,
पण ते काही खरं नाही .
हा आहे आरसा !
सर्वाना प्रेम करायला लावणारा आरसा .
उद्या रिटायर्ड होणार हेड क्लार्क पण
लिफ्ट मजल्यावर जाता जाता
तिथल्या आरशात डोकावतो .
तसाच हा आरसा
- Siddesh Patil
वपु काळेसुद्धा एकेकाळी कर्मचारीच होते. रांगा-निरनिराळ्या कारणांसाठी. आणि त्यात ताटकळत उभे राहणे, लोकल पकडण्यासाठी म्हणजे ऑफीस गाठण्यासाठीची घाई, त्या सार्यात आडवे येणारे बंद वगैरे प्रकार, साहेबांसह इतरांची खवचट बोलणी, कँटीन नामे ठिकाणी दिला जाणारा चहा वगैरे वगैरे त्यांनी सुद्धा अनुभवले आहे आणि त्यांनीसुद्धा इतरांप्रमाणेच सारे हसत हसत हसण्यावारी नेले आहे पण सोडून नाही दिले- त्यांच्या लेखकीय मनाने हे सारे मिस्किलपणे टिपले आहे- वेळोवेळी म्हणूनच गोखले, खांबेटे, सातवळेकर, वंदना वगैरेंना बरोबर टिपणार्या ह्या कथा त्यांचे हातून लिहून झाल्या आहेत व ह्याच मंडळीनी त्या डोक्यावर घेतल्या आहेत.