- नमिता नितीन आफळे
वपुंच्या आधी आणि नंतरही कोणीही वपु होणं अशक्यातीत. ज्यांची पुस्तकं पारायणं करुन वाचली तरीही एकीकडे तितकीच कोरी करकरीत आणि त्याच वेळेस अगदी आपलीशी वाटतात, त्या वपुंच्या पुस्तकाचा परिचय देणं हे माझ्या दृष्टीनं सभ्यसभ्य अवमानच खरं तर.......
कारण
वपु वाचायचे असतात,
उद्धृत करायचे असतात,
हळव्या क्षणी आठवायचे असतात,
रोमान्स करतानाही ते पटतात,
कातर वेळी सोबत करतात,
घोळणारी वाक्यं तिच्याही मनात,
अन् त्याच्याही डोळ्यात.....
अहो, वपु तर.....
वाचायचे असतात हो !!!!
पण आज धारिष्ट्य करणार आहे मी हे. माझ्या स्वतःच्या समाधानासाठी.
गुलमोहर - कथासंग्रह ज्या कथेच्या नावानं आहे त्या गुलमोहर कथेतले दिवाकरपंत.
"आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की धकाधकीची वाटचाल सरळ वाटते. निखारे सौम्य होतात. काट्यांची टोकं बोथट होतात आणि सारं कसं सोपं होऊन जातं." असं भाग्य लाभलेले दिवाकरपंत. त्यांचं त्यांच्या लेकीच्या "चक्कर" नवऱ्याच्या वागण्यानं आवारात गुलमोहर असलेल्या बंगल्याचं आयुष्यभर जपलेलं स्वप्न विसरून जाणं आणि आपल्या मुलीला पायावर उभं राहण्यासाठी ती रक्कम ठेवण्याचा विचार करणं. एखाद्या संकटानं दोन जवळच्या व्यक्तींवरही किती वेगळे परिणाम होतात, याचं उदाहरण. "आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना निरनिराळ्या असतील. आनंद वेगळे आहेत; पण दुःख एकच आहे.."
गांधारीपण म्हणजे नियतीनं आपल्याला देऊ केलेल्या परिस्थिती आणि माणसांना स्वीकारणं, त्यांच्या पातळीला जाऊन. गांधारी होणं हे आजन्म जाणूनबुजून घेतलेलं दुष्कर असं व्रत आहे. "एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ एकदाच येते. तो क्षण निसटू द्यायचा नसतो."
"स्वर माणसांची फसवणूक नाही करत कधी. स्वर हा नेहमी सच्चा असतो. आपण तो नीट लावला की तो हजर होतो समोर." किती खरं लिहावं नाही !!! हे वपु !!
"एकटा" कथेतला विशा..विश्वनाथ. भूकेपोटी चोरी करण्याच्या कृत्याची क्रूर शिक्षा भोगतोय म्हणून एका हळव्या क्षणी मोकळं होण्याऐवजी आजन्म घेतलेला सल...अनपेक्षित चटका लावणं हे वपु.....
"भरती" कथेतल्या उपेंद्र-इरावतीचं लग्नानंतर कित्येक वर्षांनही आकंठ प्रेमात असणं....."या चाकोरीची या देहाला इतकी सवय झालीय की, आता अभिनय उरलाच नाही." असंही युगुल असतं !!! वपुंच्याच कथेतनं पटतं....
"आपल्या नजरेनं पाहणं" म्हणजे काय असावं, याची पराकोटीची परिस्थिती "नजर" कथेतनं वाचली.
मालकानं "आपल्या नजरेनं पहावं" या भोळ्या समजुतीनं चक्क आपला एक डोळा त्यांना देणारा आणि कमाल म्हणजे त्याचा गवगवा न करणारा सच्चा कामगार आबा देवकुळे.
"दहावा ग्रह" म्हणजे लग्नसंस्थेवरचे भिन्न विचारांचे वडील आणि मुलगा. "उत्तम विचाराची मुलगी हवी" या विचारानं मुलाच्या तोंडून "...विचारांचं साहचर्य कधी मिळालं नाही आणि सौंदर्याचाही उपभोग लुटता आला नाही."
हे असं थेट लिहितात ते वपु !!!
लगेचच चाचपणी होते मनातल्या मनात गुपचूप....विचारांचं साहचर्य....??
"सर" मधल्या अपरिचित आहेत म्हणून मन मोकळं करणाऱ्या आईचं अगदी आपल्या आसपासच वावरणारं मन .....स्पष्ट आठवतं आणि त्याच वेळेस सगळं सगळं सांगणारी "तारी" आपल्यालाही दिसू लागते आणि तिला पटकन मागे वळून उत्तर देणं योग्य नाही, हेही पटतं !!!
"अढळपद" - दिवंगत पत्नीच्या बहिणीशी विवाह झाल्यानंतर पुरुषाची होणारी उलघाल, मनाची आंदोलनं, त्या पत्नीचीही नवी ओळख होण्यासाठी चाललेली धडपड आणि मग मात्र दिलेली प्रांजळ कबुली...पुरुषातला हळवेपणा आणि स्त्रीची सक्षम बाजू वाचावी ती वपुंच्याच लिखाणातनं.
"मुक्तछंदा"तल्या मुक्ताचा पाहताक्षणी जडलेला जीव आणि मेव्हण्यापाशी दिलेली "हरवण्याच्या क्षणाची" कबुली....मी फक्त वाहत होते....तसा क्षण एकदाच आला...आणि तो येण्यापूर्वीच गेला...मोहोरण्यापूर्वीच सुकला."
"शिळा अहिल्या" तरल भावना, वाटणारा विश्वास आणि समाजमान्यतेचे संकेत....ही कथा समजण्यासाठी पुन्हा एकदा वाचावी लागली मला....तेव्हा साकारली शिळेतून मुक्त होणारी अहिल्या !!
"पुरुष" वाचल्यावर चीड संताप आणणारे समाजात उजळ माथ्यानं वावरणारे कितीतरी "बाॅस"....
आठवलेच.
"शोध" मधला डिप्लोमॅटिक रवींद्रचा नाहीसं होण्याचा प्रसंग !! सगळी उलघाल आणि मिश्किलपणा...
"घरोघरी" मधल्या जगाच्या रंगभूमीवरचा प्रेमलताबाईंचा आदर्श संसार वाचून आपणही त्या अभिनयसम्राज्ञीपुढे लवतो नकळतच....
वपुंच्या एका टेलिस्कोपमधनं ते एकंदरीतच किती भावना टिपू शकतात याची कल्पनाही येत नाही.
मानवी भावभावनांचा जर स्पेक्ट्रम धरला तर पलीकडून वपुंचं लिखाण असेल तरच ती सप्तरंगांची उधळण दिसेल असं मला कायम वाटतं. त्यापलीकडेही त्यांच्या लिखाणाच्या सहजतेची जादूच वाटते. एकेक प्रसंग नाटकाचा पडदा दूर व्हावा तसा उलगडत जातो. आणि आपण त्या कथेत गुंगून, रंगून जातो.
गुलमोहर हा एक कथासंग्रह आहे ज्याचा परिचय देण्याचा मम अल्पमतीनुसार मी तोकडा प्रयत्न केला आहे.
ता.क. - चांगली बाब अशी आहे की मी परिचय कसाही दिला असला तरी त्यामुळे वपुंच्या आपल्या मनातल्या स्थानात तिळमात्र फरक होणार नाही कारण ते तर अढळपदी विराजमान आहेत आणि राहतील. वपुमय वाचनाच्या आणि तत्पश्चात लिखाणाच्या मनभरून शुभेच्छा !!!
|| इति लेखनसीमा ||
- Shailaja Khade-Patil
आयुष्यातील सुखाधीन तृप्ततेचा आनंद घेताना आपण स्वत:च गुलमोहरातलं तांबड फुल होणं म्हंजे नेमकं काय असतं..हे वेड लावणा-या व.पुं. च्या शब्दांमुळे कळत. याहुनही "दु:खातही एक सौख्य असतं" अशी कधी कधी मनाची विलक्षण अवस्था होऊन, आहे त्या परिस्थितीत, आपल्या आनंदाची जागा दुस-याच्या समाधानाला द्यावी इतकी सुप्त, तीव्र त्यागी वृत्ती माणसाची बनते न्हवे तर ती बनावी असचं काहीसं `गुलमोहर` वाचताना होतं. "ज्या माणसात मन नाही त्याला `मनुष्यपण` नाही" असा स्वर व.पुं. आपल्या काळजाचा ठाव घेणा-या कथांमधुन, थेट अंत:करणाच्या तळापर्यंत पोहोचतो तेव्हा मनाला चकवा देणा-या कित्येक गोष्टी आपसुक आठवुन डोळ्यांमध्ये टच्च भरुन येऊन, व थेट पानांवरच़्या शब्दांवर जाऊन ओघळतात..तेव्हा शब्दही माणसांसारखे बोलु चालु लागतात ह्याला म्हणतात लेखणीची ताकद..!
आयुष्यातल्या चांगल्या व वाईटाची खुपच साधी, सोप्पी व सरळ व्याख्या या निमित्ताने आपल्याला कळते.."ज्या काही घटनेत आपण स्वत:ला विसरुन जातो ते चांगलं" असं जेव्हा व.पु. बोलुन जातात तेव्हा ऊगाचच मन मारुन, मुटकून जगताना व तत्वांच्या अधिष्ठानात स्वत:ला पारखतानाच्या कसोट्या निव्वळ शुन्य होऊन जातात. एवढ सोप्पय जगणं.. फक्त आपल्याला लालगच्च, मोहोरलेल्या `गुलमोहरासारखं` इतरांना आनंद देणारं, सदोदित टवटवीत पण वेळप्रसंगी स्वत:च्या यातनाही स्वत:शी कवटाळुन, कोसळण्याइतपतची तयारी करत जगता यायला हव..!
©️®️✍️शैलजा खाडे-पाटील, शब्दशैली❤
कोल्हापुर.🤘
- Manoj Mohale
मला असं वाटत कि वपु चे पुस्तक वाचताना ते काय लिहतात आणि ते लिहलेलं समजण्यासाठी माणसात एक वेगळा गुण असावा लागतो! अस मला राहुन राहुन वाटत कारण कोणाला हि वपु समजेल अस नाही आवड आपली आपली 😊 बर मी जेव्हा हे पुस्तक आणलं दोन कथा वाचत असतांना मला जास्त रस वाटला नाही.मला वाटलं साल आता हे काही पुस्तक माझ्या पचनी पडणार नाही तरी हि तिसरी कथा वाचली मग काय जसे पत्ते खेळत असताना एक दोन डाव हरल्या नंतर चला तरी तिसरा😉डाव खेळावा म्हणून तिसरी कथा वाचली मग काय मी चाट 😇🤔😁वपु जिंकले होतो नेहमी प्रमाणे माझा सुद्धा वाचायला हुरूप वाढला खर म्हणजे माझी मनापासून वाचायची ईच्छा नव्हती/ मुड नव्हता तरी तिसऱ्या कथे पासुन जे चटक😉😋लागली काही विचारू नका मी तर मस्त मजेत वाचत गेलो पण शेवटी नेहमी प्रमाणे विचारात मी पडलो वपु किती मनातलं लिहतात हे सगळं कुठे तरी घडलं आहे किव्हा घडणार आहे किव्हा घडेल असेल,वाटतं वपु चे विचार काय भन्नाट असतात मला खरच नेहमी म्हणावं वाटत वपु आपण ग्रेट आहात किती मोठा खाऊ तुम्ही आमच्या सारख्या रसिक वाचक वेसनी लोकांना साठी तुमचा अनमोल ठेवा तुम्ही निघुन गेले तुम्ही विचारांच्या किती तरी पुढे होता हे निदान मला आज तरी समजलं v p u you`re really ग्रेट 🙏 म्हणूच तर तुम्ही आम्हा सर्वांचे ग्रेट आहात आणि राहणार आहात...
- अरुण घाटे
लोकविलक्षण माणसांच्या चाकोरीवेगळ्या कथा...
व. पु. काळ्यांच्या कथा नेहमी वेगळे, चाकोरीबाहेरचे असे काहीतरी सांगतात. त्यांच्या कथांतून आपणांस भेटणारी माणसेही विलक्षण वरवर पाहायला सामान्य, पण सर्वांहून वेगळी आहेत. प्रत्येक माणसाचे काही लोकविलक्षण असे वेड आहे. जगावेगळी निष्ठ आहे. प्रत्येक माणसाची जगाला न पटणारी, सामान्य माणसांपेक्षा वेगळी विचारसरणी आहे. त्यांच्या कथेतील अनुभवही वेगळ्या धाटणीचे काही वेळा अतर्क्य आहेत. त्यांची बांधणी पुष्कळ वेळा योगायोगातून होते.
अशी लोकविलक्षण माणसे, केवळ योगायोगच म्हणावा लागेल असे प्रसंग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाही भेटत असतात. तथापि आपण अशा काही गोष्टी दुसऱ्यांना सांगून त्यांना त्या पटवणे आपल्याला जमत नाही. व. पु. काळे हे अवघड काम सिद्धहस्तपणे करतात. अर्थात अशी सर्वस्वी वेगळी माणसे, अशा योगायोगाच्या गोष्टी एकत्र भेटल्या तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं.
व. पु. काळ्यांच्या ‘गुलमोहर’ या नव्या कथासंग्रहातील कथा तर सांगायचं झालं तर ‘एकटा’, ‘दहावा ग्रह’, ‘शिळा अहिल्या’, ‘पुरुष’ इ. गोष्टी पाहाव्यात. ‘एकटा’चा कथानायक विश्वनाथ खायलाप्यायलादेखील पैसा राहत नाही. तेव्हा चोरी करतो एका लहान मुलीच्या हातांतील बांगड्यांची. चोरी करताना त्याचा मुलीच्या तोंडावर हात दाबला जाऊन श्वास कोंडला जातो व ती मुलगी मरते. पोलिसांच्या नजरेला विश्वनाथ खुनी म्हणून सापडत नाही. पण त्याला स्वत:ला तो अपराध पोखरत असतो. (स्वत:च्या हातून खून झालाय हे त्याला योगायोगानंच– पेपर वाचताना एका छोट्याशा बातमीवर नजर गेल्यानं समजतं. – त्याच्या मनावरचं दडपण योगायोगनंच त्याची आई त्या छोट्या मुलीच्या मृत्यूबद्दल बोलते त्यामुळे वाढतं.) आई आत्महत्येची धमकी देते म्हणून विश्वनाथ लग्न करतो. गुणी बायकोच्या स्वभावामुळे त्याच्या मनावरचं दडपण नाहीसं होण्याचा प्रसंग जेव्हा येतो त्यावेळी विश्वनाथला कळतं की आपले हात जिच्या मृत्यूला कारण झाले. तिची मोठी बहीण म्हणजेच आपली पत्नी.
‘दहावा ग्रह’ मध्ये निवेदक आपल्या बहिणीचे लग्न जमवण्यासाठी एका स्थळाची चौकशी करण्यासाठी जातो. तेव्हा त्याची गाठ सांगून आलेल्या मुलीच्या फोटाचा आलबम करणाऱ्या चमत्कारिक माणसाशी पडते. वीस वर्षानंतर आपल्या मुलीसाठी स्थळ पहायला निवेदक जातो, तेव्हा त्याची गाठ त्या चमत्कारिक माणसाच्या मुलाशी पडते. ‘शिळा अहिल्या’ या कथेतील केशवनाना रात्रीच्या वेळी चौपाटीवर फिरायला जातात. तेथे त्याची बहिण योगायोगाने दिसते. ती चाललेली असते आपल्या प्रियकराकडे, केशवनाना तिचा पाठलाग करतात. प्रियकराच्या खोलीपाशी थांबून त्यांचे बोलणे ऐकतात. योगायोगानेच त्यांची बहिण त्यावेळी प्रियकराला सांगते की रिकामपणाचा उद्योग म्हणून तिने डायरी लिहून ठेवली आहे. तिच्यात आपल्या वेदना लिहून ठेवल्या आहेत. केशवनाना ती डायरी वाचतात व त्यांतून मग कथा उलगडते. असे हे योगायोग.
लोकविलक्षण व्यक्ती
‘गुलमोहर’, ‘गांधारी’, ‘भरती’, ‘नजर’, ‘मुक्तछंदा’ या कथांमध्ये आपल्याला लोकविलक्षण स्वभावाची माणसे भेटतात. ‘गुलमोहर’ मधले वडिलांचे बंगला बांधण्याचे स्वप्न पुरे करण्याचा ध्यास घेतलेले दिवाकरपंत केवळ त्यासाठी आपले सर्व आयुष्य वेचतात– पण शेवटी त्यांच्या मुलांच्या संसाराची काच तडकते आहे अशी चाहूल लागल्यावर धास्तीने आपणहूनच त्या स्वप्नाचा निरोप घेतात. स्वप्नांचे प्रतीक गुलमोहराचे झाड तोडून टाकतात. ‘गांधारी’ आंधळा नायक आंधळ्याच पण रुपवान मुलीशी लग्न करतो. तिची फसवणूक करणाऱ्या डोळस माणसांपासून पाठवण्यासाठी. ‘भरती’ मधील उपेंद्र व इरावती या दाम्पत्याला मुलं नाही. त्यासाठी इरावती उपेंद्राला सुखी राखण्यासाठी, त्याला आपल्याजवळ राखण्यासाठी रोज एक विलक्षण नाटक खेळते. त्यांतून आपले जीवापाड प्रेम उपेंद्रवर असल्याचे दाखवून, त्याला आपल्याकडे सतत खेचते ठेवून त्याचे लक्ष विचलीत होऊन देवकुळे, ‘मुक्तछंदा’मधली मुक्ता ही अशीच आणखी लोकविलक्षण माणसे.
अनोखे प्रसंग आणि लोकविलक्षण माणसे एवढेच काळ्यांच्या कथांचे वैशिष्ट्य नव्हे. त्यांची प्रत्येक कथा वाचकांना काही सांगू इच्छिते. काहीतरी नवे आणि वेगळे. जगण्याची भूमिका. एखादा मनोविश्लेषणात्मक सिद्धांत प्रत्येक कथा हे सांगते– जे अर्थातच कथाकारालाच सांगायचं असतं– निरनिराळ्या पात्रांकरवी सांगते. बहुधा पुष्कळशा कथांमध्ये हे सांगणे चपखलपणे बसते. पण काहीवेळा हे सांगणे कथेतील बरीचशी जागा अडवते व कथेने कथापण हरवते. उदाहरणार्थ ‘गांधारी’ ही कथा. ही कथा तर रूढार्थाने कथा होऊच शकत नाही हे एक प्रासंगिक प्रवचन आहे. बहुतेक कथांमध्ये काळे असे कथेतील पात्रांद्वारे स्वत: बोलतात.
हा खटकणारा दोष सोडला तर काळ्यांच्या कथा खूपच देखण्या आहेत. ‘शिळा अहिल्या’ मधील ‘अक्का’ कथा पुढे पुढे जाते तशी आपल्या मनावर कब्जा मिळवते व कथासंग्रह वाचून झाला तरी नंतरही दीर्घकाळ मनांत रेंगाळत राहते. ‘मुक्तछंदामध्ये मुक्ताने कथानायकाला दिलेला धक्का हा वाचकांपर्यंत सरळसरळ पोचतो. ‘सर’ ही कथा पावसाळी हवेतल्या दिवसातली हूरहूर मनाला जाणवून देते. ‘अढळपट’मधील पद्मिनी-जी आपल्या नवऱ्याच्या दिवंगत पत्नीच्या प्रतिमेशी पोचायचा आटोकाट प्रयत्न करते– आपल्या मनांत तिच्याविषयी कणव निर्माण करते. ‘अढळपद’ ‘शिळा अहिल्या’ ‘सर’, ‘मुक्तछंदा’ इ. या कथासंग्रहातील खूपच उजव्या कथा आहेत.
काळ्यांच्या कथा आकर्षक होतात त्याची आणखीही कारणे आहेत. काळ्यांची शब्दांवर हुकमत आहे. आपल्या शब्दसामर्थ्यांवर वाचकांना पाहवत नेण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. शिवाय त्यांच्या कथांमधली माणसे जिवंत आहेत. चैतन्यमय आहेत. तुमच्याआमच्याभोवती वावरणारी अशी ती माणसे आहेत. त्यामुळे या संग्रहातील कथा वाचकाला बांधून ठेवतात. हे यश थोडके नाही.
- Pushpa Naikwadi
वपुची सर्वच पुस्तके छान आहे..अवश्य वाचा.
- Swati Narhekar
Mast ahe pustak
- Haresh Shitole
ये पुस्तक तर आधी वाचावं असं आहे... मनाला भिडतील अश्या कथा आहेत
- Archana Netke Bansode
Chan ahe book
- Yogesh Narvekar
Mehta publishing house is best publishers in maharashtra. Books paper quality is superb. Design all is great