Shabdruchee July 2017पिळदार शरीरातलं उधान ..लाल मातीतली झिंग ... ‘आखाडा’.....लालमातीतला धोबीपछाड म्हणजे फक्त मर्दानी कामगिरी, हा पूर्वापार समज. पोटच्या पोरींना मैदानात उतरवत महावीरसिंग फोगाट यांनी त्या समजाला लालमातीतच समाधी दिली. दंगल सिनेमानं फोगाटांच्या या कामगिरीला लोकप्रियतेचे नवे आयाम दिले. या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याचा पट सौरभ दुग्गल लिखित ‘आखाडा’ पुस्तकानं वाचकांसमोर आणला. मेहता पब्लिशिंग हाऊसने लीना सोहोनी यांनी अनुवादित केलेला हा आखाडा मराठीत आणला आहे.
हरियाणातलं बलालीसारखं छोटंसं खेडं. जिथं मुलींना कुस्तीसारख्या मर्दानी खेळाचं प्रशिक्षण देणं म्हणजे कुळाला बट्टा लावणंच मानलं जात होतं. अशा वातावरणात महावीरसिंग फोगाट या अवलियानं निव्वळ मुलींना आखाड्यातच उतरवलं नाही, तर ऑलिम्पिक्समध्ये बाजी मारण्याचं स्वप्न पाहिलं. कुटुंब आणि समाजाचा विरोध पत्करुन त्या स्वप्नाचा माग घेतला. आणि सबंध देशासाठी नवी वाट रुजू दिली. `आखाडा` ही या अत्यंत धैर्यवान नायकाची आणि आपल्या मुलींच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं पाहून ती साकार करण्यासाठी तनमनधन पणाला लावून झटणाऱ्या पित्याची, महावीरसिंग फोगाटांची लोकविलक्षण कहाणी आहे. आपल्या भविष्यात कधी असं काही सुंदर घडू शकेल, अशी कल्पना या पित्याच्या मुलींनी स्वतः कधी स्वप्नातसुद्धा केली नसेल. सौरभ दुग्गल यांनी फोगाट यांचा हा जीवनपट अत्यंत साध्या-सोप्या शब्द्शैलीत वाचकांपुढे मांडला आहे
हरियाणा राज्याच्या उत्तर भागामध्ये स्त्रियांच्या लोकसंख्येचं प्रमाण पुरुषांच्या संख्येच्या तुलनेत फारच कमी आहे. या राज्यातील समाजमनावर पुरुषांचं इतकं वर्चस्व आहे की, प्रत्येक मुलीवर लग्नाची सक्ती करण्यात येते आणि मुलगी विशीला पोहोचण्याआधीच तिचं सक्तीनं लग्न लावलं जातं.
एखादा माणूस या अशा पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो; परंतु त्याची विचारसरणी मात्र त्या समाजव्यवस्थेच्या विचारसरणीच्या अगदी विरुद्ध टोकाची बनते; त्याची तत्त्वं, त्याचे आदर्श पूर्णपणे वेगळे असतात. इतकंच नव्हे, तर त्याच्या त्या मूल्यांना आणि पुरोगामी विचारसरणीला जेव्हा घरीदारी सर्वत्र विरोध होऊ लागतो, तेव्हा खंबीरपणे त्या विरोधाला टक्कर देत आपण हाती घेतलेलं कार्य सुरू ठेवणं सोपं नाही; खूप धैर्याचं काम आहे हे.
महावीर सिंगजींनी कुस्ती या खेळाला आयुष्य वाहून घेतलेलं आहे. महावीर सिंगजींनी घडवलेल्या महिला कुस्तीपटूंनी जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलं, तेव्हा देशातील जनतेचं लक्ष या खेळाकडे वेधलं गेलं. हे असं होण्याचं कारण म्हणजे या मुलींसाठी ते स्वतःच कोच बनले. त्यांनी स्वतःसुद्धा अत्यंत कठोर नियमांचं पालन केलं आणि तेच नियम त्या मुलींनाही घालून दिले. त्यांच्याकडून योग्य तो सराव आणि आवश्यक ती शारीरिक कसरत नियमितपणे करून घेतली. कदाचित सर्व बाजूंनी त्यांना इतका विरोध होऊ लागला, छोट्या छोट्या गोष्टी साध्य करण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला, त्यामुळेच त्यांचा हा निर्धार अधिक पक्का झाला. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
महावीर सिंग फोगाट हे एके काळचे राष्ट्रीय पातळीवरचे कुस्तीगीर. आपल्या या शिष्यांपैकी निदान कुणीतरी ऑलिम्पिक खेळात सुवर्णपदक पटकावून भारताचं नाव उज्ज्वल करावं, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी गेली १६ वर्षं ते झटले होते.
महावीर सिंग यांचा जीवनपट असणारं आखाडा त्यांच्या विचारसरणीची स्पष्ट कल्पना देते . त्यांचा महिलांच्या बाबतीतला दृष्टिकोन स्पष्ट करून सांगताना ते म्हणतात, ``आजसुद्धा आपला समाज पुरोगामी विचारसरणीचा नाही. परंतु मी स्वतः मात्र स्त्री-पुरुष भेदभावाच्या विरुद्ध आहे. याच कारणानं मी माझ्या मुलींना आणि पुतण्यांना कुस्तीच्या क्षेत्राची ओळख करून दिली. खरंतर यासाठी मला खुद्द माझ्या घरच्यांचा, तसंच गावकऱ्यांचा खूप विरोध सहन करावा लागला.
महावीर सिंगांच्या पाच भावंडांना बारा मुलं होती. त्यांत पाच मुली होत्या. एका संध्याकाळी त्यांनी सर्व मुलांना बोलावून, दुसऱ्या दिवशीपासून कुस्तीचा सराव करण्यासाठी पहाटे उठून आखाड्यात जमायला सांगितलं.त्यादिवसापासून
त्यांच्या नशिबात पुढची कित्येक वर्षं नुसते अपार परिश्रम, अंगमेहनत, अंग ठणकणं असं सगळं लिहिलेलं होतं, याची त्या बिचाऱ्यांना काय कल्पना? सर्वांना पहाटे चारच्या ठोक्याला झोपेतून उठावं लागायचं. ठीक साडेचार वाजता, म्हणजे सूर्योदयाला तब्बल एक तास असतानाच त्यांचा `वॉर्मअप्` सुरू होत असे. त्यानंतर आखाड्यात सलग दोन तास कुस्तीचे धडे गिरवणं. शाळेत असतानाच काय ती त्यांना जरा विश्रांती मिळायची. पुन्हा शाळेतून घरी आलं, की अशीच कडी अंगमेहनत आणि सराव सुरू. कुस्तीचे धडे गिरवत असताना कुठलीही पळवाट चालायची नाही. नित्याचा सराव संपवून आखाड्यातून बाहेर पडेपर्यंत महावीरसिंग थोडीसुद्धा दयामाया दाखवत नसत.
सर्व मुलांना रोज अत्यंत कठोर अंगमेहनत करावी लागत होती. त्यामुळे त्यांना वेळच्या वेळी पोषक आहार, कुस्तीगीरांच्या शरीराला आवश्यक असलेला खुराक मिळणं गरजेचं होतं. ही जबाबदारी त्यांनी घरच्या स्त्रियांवर टाकली.
अत्याधुनिक प्रशिक्षणाच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना गीता आणि बबिता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या होत्या. गीता आणि बबिता या २००६मध्ये भिवानीच्या ज्या सरकारी महाविद्यालयात शिकत होत्या, त्या महाविद्यालयानं त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन बलाली येथे त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण मिळावं म्हणून मॅट्सचा नवाकोरा सेट भेट दिला.एशियन कॅडेट चँम्पियनशिप पार पडल्यावर महावीर सिंगजींनी आपलं लक्ष २०१०मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांवर केंद्रित केलं.
२०१० सालच्या राष्ट्रकुल स्पर्धांनंतर फोगाट भगिनींचं आयुष्यच बदलून गेलं. विशेषतः गीता आणि बबिता यांचं. एका रात्रीत त्या दोघी `स्टार` झाल्या. या विजयानंतर त्या दोघींच्या नावाची कीर्ती फक्त यांच्या गावापुरतीच न राहता आजूबाजूच्या परिसरातही पसरली. इतकंच नव्हे, तर देशभरात त्यांचं नाव ज्याच्या-त्याच्या तोंडी झालं. देशातील स्त्रियांच्या सबलीकरणाच्या चळवळीसाठी गीता आणि बबिता आदर्श बनल्या. फोगाट कुटुंबाची कथा फार विलक्षण होती- एका वडिलांनी आपल्या मुलींना आणि पुतण्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचं विजेतेपद मिळवण्यास पात्र बनवण्यासाठी जो काही संघर्ष केला, अगणित संकटांचा सामना केला, ते ऐकून लोकांचं मन द्रवलं. या कहाणीमुळे राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय माध्यमांचं लक्ष फोगाट भगिनींकडे गेलं. त्यामुळे फोगाट घराण्याचं नाव जगाच्या नकाशावर जाऊन पोचलं.
आपल्या घरच्या मुलींनी कुस्तीच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवावं, हे महावीर सिंग फोगाट यांचं वैयक्तिक स्वप्न होतं. पण या स्वप्नामुळे हरियाणाच्या ग्रामीण भागात कुस्तीच्या क्षेत्रात क्रांती घडून येण्यास चालना मिळेल, याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व असलेल्या समाजामध्ये महिलांचं सक्षमीकरण होण्यास सुरुवात होईल, याची खुद्द महावीर सिंगजींना तरी कुठं कल्पना होती? परंतु त्यांच्यामुळेच आज या समाजातील मुलींचा वर्तमानकाळ आशादायी बनला आहे. ज्या मुली अशी स्वप्नं बघण्याचं धाडस करतील, त्यांचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल आहे. त्यांच्या यशोगाथेची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे .