- Suhas Deshmukh
स्त्री-पुरुष आणि रिलेशनशीप्सला हात घालावा तर वपुंनीच!
त्यामुळे त्यांच्या पलीकडं मराठीत तर किमान मला आजवर जाता नाही आलं... :)
- प्रभा जोग
देखण्या, बोलक्या कथांची ‘संवादिनी’...
‘संवादिनी’ हा वसंत पुरुषोत्तम काळे यांचा कथासंग्रह. या संग्रहातील सर्व कथा पूर्वी निरनिराळ्या मासिकांतून येऊन गेलेल्या आहेत. पण त्याच कथांवर त्यांनी नवा प्रयोग केला. फक्त संवाद माध्यमातून ह्या कथा लिहिल्या आहेत. याचं कारण देतांना लेखक सांगतात की ‘मनांतले विचार व्यक्त करताना आपण संवाद वापरतो आणि घडून गेलेली घटना सांगतानाही आपण संवादच वापरतो. समोरच्या माणसाला रोखण्याचा प्रयत्न होतो तो संवादातूनच, म्हणून संवादच वापरून कथा लिहिण्याचा प्रयत्न. एखादी रुपवती स्त्री एकदाच दागिना घालून कशी सुरेख दिसते. तसंच झालंय इथे. मुळांत निवडलेल्या कथा उत्तम, आणि संवाद हे माध्यम. एखाद्या तन्मणीसारखे शोभले आहे, अत्यंत संतोषाची गोष्ट म्हणजे हा प्रयोग शंभर टक्के सफल झाला आहे. केवळ संवादांतून मनोव्यथा, मनोविश्लेषण, वातावरणनिर्मिती हे साधले आहे आणि सर्व कथा मनांवर ठसून जातात. सर्व कथांचे विषय निरनिराळे आहेत. पण ते आपल्या नेहमीच्याच जीवनांतील असल्याने आपण चटकन त्यांत शिरतो. लेखकाचे काही विचार नि:संशय धाडसी आहेत. पण व्यवहारीही आहेत असे विचार वरचेवर बोलून दाखवले गेले पाहिजेत म्हणजे ते मवाळ होतील, त्यांतील लाज वाटणारी भयकथा निघून जाईल. ‘निरंजन, मला उत्तर हवय् या कथेत पत्नीपासून मूल होणार नाही म्हणून दु:खी झालेल्या पत्नीला पति ट्यूबबेबीचा प्रयोग करण्याची संधि देतो, नव्हे तशी इच्छा व्यक्त करतो. पहिल्यांदा ह्याला नकार देणारी. त्याची पत्नी आपल्या प्रथम प्रियकरांपासून हवे ते मिळवते. पण माणसाच्या त्यागाची, मोठ्या मनाची कल्पना असलेला तो प्रियकर तिला ब्लॅकमेल करून तिच्या कडून पैसा उकळण्याचे ठरवतो. पण हा पति श्रीधर उलटेच करतो. त्यांचे पितृवात्सल्य हेलावते. आणि मग पत्नी प्रियकराला विचारते, ‘निरंजन, मला उत्तर हवय्, आता तू काय ठरवलस्’’ फार मोठ्या मनाचा माणूस पाहिजे ह्याला. पण असे झाले तर काही चांगले, दुष्ट लागण्यासारखे संसार तरीच देखणे राहतील. काळ्यांच्या संवादांत अत्यंत घरगुतीपणा आहे. आहे त्याच संसारात माणूस किती सुखी होऊ शकतो. पण समज नसते काही वेळा, काही वेळा परिस्थिती माणसाला सुख् लाभू देत नाही. ‘धरलं तर चावतं’ ह्या कथेत दोघही नवराबायको मिळवती, आर्थिक स्वास्थ्य भरपूर– ह्या सदैव नोकरीसाठी बाहेर असणाऱ्या स्त्रीला तिच्या स्वत:च्याच मुलांच्या मनांत अजिबात स्थान नसते. तिच्यावाचून त्यांचं काहीही अडत नाही. हे मोठे दु:ख परिस्थितीने निर्माण केले आहे. ‘‘शिक्षण घेतलेल्या बायका प्रकाशासारख्या पसरल्या त्या जिथे तिथे शिरल्या त्यांना आता पुन्हा घराकडे कसे वळवायचे हे सांगता येणार नाही. गंमत म्हणजे जे प्रश्न निर्माण झाले ते माणसाच्या चांगुलपणातून त्यामुळे दोषही देतां येत नाही.’’
विनोदाचा झरा
काळ्यांच्या कथेत एक विनोदाचा झुळझुळता झरा असतो. तो कलावृत्तीसारखा चमकतो. त्यामुळे ह्या कथा जिवंत आहेत. कथा जणू नागाने वेटोळे सोडावं तशा सरसर उलगडत जातात. निवेदन नाही, वर्णन नाही हे जाणवत नाही.
‘आत्मानस्तु कामाय’ ही कथा सर्वांत उजवी आहे. एका स्वाभिमानी परंतु तितक्याच हळव्या, प्रेमळ नार्वेकरची ही कथा. मुलाप्रमाणे त्याला वाढवले, प्रेम केले शिकवले, तोच मुलगा, त्यांच्याच ऑफिसातील कलांतराने नार्वेकरांचा बॉस म्हणून त्यांच्याच ऑफिसांत येतो. बॉसने बॉससारखेच वागले पाहिजे. त्याच्या गुणांवर तो बॉस झाला आहे. त्याने माझ्यापुढे नग्न होता कामा नये. असे नार्वेकरांचं म्हणणे. पण वर्तकांवर फार उपकाराचं ओझ असतं. दोघांची अतिशय कुतरओढ, नार्वेकर स्वत:च्या नोकरीचा राजीनामा देतात. पण नंतरच्या काळात बायकोबाबत त्यांची फार फसगत होते. फार वाईट अनुभव येतो. केवळ शब्दांची सहानुभूती तर राहोच, पण नार्वेकर वैवाहिक सुखालासुद्धा बायकोच्या दृष्टीकोनांतून अपात्र ठरतात. हा अपमान सहनशीलपलीकडचा असतो. नार्वेकर म्हणतात, प्रेमात पडण्याचा जसा एकच क्षण असतो. तसा एकाबद्दल उबग आणावलाही एकच क्षण पुरतो.’’
अशा तऱ्हेच्या या कथा आहेत. दिवस उद्याचा भविष्याबद्दल सतत काळजी करणारा, विचारणारा नवरा आणि आजचं सुख आज मिळवावं, उद्याचं दु:ख पाहून आज कशाला दु:खी व्हायचं’ अशा विचाराची बायको ह्यांची ही कथा. चार चाकाच्या वाहानांपासून भय असे भविष्य आणि अखेर खेळण्यातल्या मोटारीवर पाय पडून घरात होणारा अपघात हा शेवट सुंदर आहे.
‘नव्या युगातले शोध हे कल्पवृक्षासारखे आहेत, आपण त्याचा डोळसपणाने स्वीकार करायला हवा’’ हा विचार कृतीत आणण्याजोगा आहे. ‘‘एकदां, बायको रागावली प्रथम, तेव्हा तिची तळपायाची आग मस्तकांत गेली. ती मस्तकांतच राहिली. अशी काही वाक्ये आपल्याला खुदकन् हंसायलाच लावतात.
एकदम देखण्या व बोलक्या कथांची ही ‘संवादिनी’ सर्वांना प्रिय होईल अशी खात्री द्यायला हरकत नाही.
- VISHAL SAHYADRI 20-02-1983
विलक्षण प्रभावी कथा, संवादांनी विखुरलेली...
आटोपशीर प्रवाही कथा
वसंत पुरुषोत्तम काळे एक प्रसिद्ध कथाकार... त्यापेक्षाही उत्तम कथाकथनकार म्हणून मराठी साहित्य जगतात दिमाखाने मर्दुमकी गाजवीत आहेत. कथा क्षेत्रात काहीतरी नवे हवे असे त्यांना वाटते! केवळ प्रयोग म्हणून त्यांनी हे सहा कथांचे नाविन्यपूर्ण पुस्तक काढायचे ठरविले. १९६५ साली काळ्यांनी केवळ संवादमय एक कथा लिहिली. कथा लघुकथा ह्या फॉर्मचा त्यांना कंटाळा आला. कथेचा तोच तोच पण उबग आणणारा वाटला. तीच ती वर्णनं, बारीक बारीक तपशील, भरण्याला व. पु. काळे कंटाळून गेले. त्या कंटाळ्यातूनच कथेच्या एका नवीन स्वरुपाचा उदय झाला. मनातले विचार व्यक्त करताना आपण संवाद वापरतो आणि घडून गेलेली घटना सांगतानाही आपण संवादच वापरतो. समोरच्या माणसाच्या संवादातूनच आपण त्याला जोखण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करतो... आणि म्हणूनच फक्त संवादाच्या माध्यमातूनच कथा पुढे पुढे सरकवायची अशी ही कल्पना. तसा हा एकदम नवीन विचार नाही. कथेत बऱ्याच वेळा संवाद पेरलेले असतातच. पण इतर बारीक सारीक तपशीलाला इथे संपूर्ण मज्जाव आहे. त्या दृष्टीनेच पुस्तकाचे नाव ‘‘संवादिनी’’ समर्पक वाटते.
नॅरेशनच्या कंटाळ्यातूनच ह्या संवादिनी कथा बाहेर पडल्या. १९७०च्या स्त्रीच्या दिवाळी अंकात एका मिठीची कथा प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर काळ्यांनी सत्तर सालच्या दिवाळी अंकात पाच कथा पुन: एकदा संवादावर भर देऊन लिहिल्या. संवादामुळे कथा एकदम आटोपशीर होते. कथाप्रवाह जोराने वाहतो.
ह्या संग्रहातील सहाही कथा अत्यंत दर्जेदार अशाच आहेत. ‘एका मिठीची कथा’, ‘आज तरी भांडशील ना,’ ‘‘निरंजन मला उत्तर हवंय!’ आणि ‘दिवस उद्याचा’ ह्या सहा कथा! संपूर्ण संवादाच्या आधाराने पुढे पुढे चालणाऱ्या इतकेच काय पण पुस्तकांची प्रस्तावना ही संवादानेच नटलली आहे.
एका मिठीची कथा
एका मिठीची कथा... ह्या संवादामधील सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण कथा! छोट्या पंपूपासून... मिठी आणि मुके... ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणारे जोडपे... पंपूने कोणत्या प्रकारचा सिनेमा पाहिला ह्यावरून उद्विग्न होतात... आणि शेवटी त्यांना सिनेमाचा फ्लॉट कळतो. अगदी साधी स्टोरी नऊ वर्षांच्या मुलीची एक बाहुली सापडावी म्हणून काय काय करते, कुठे कुठे शोधते त्याचं पिक्चर शेवटी ती बाहुली सापडते. ती मुलगी बाहुलीला मिठी मारते... भराभरा मुके घेत राहते... इथे पिक्चर संपते! ...व संवादांनी नटलेली कथा येथेच संपते!
समर्थ लेखणीची ऐट
काळ्यांच्या इतर कथाही अशाच वरच्या... आर्थिकदृष्ट्या सुस्थितीतील समजाबद्दल आहेत. त्यांच्या कथानायिका ना. सी. फडके यांच्या नायिकाच्या सारख्याच वाटतात!
‘धरलं तर चावतं’ ...ही कथा नोकरी करणाऱ्या बायकी बद्दलची आहे. कामावरून दमून आलेली पत्नी. पतीला, मुलांना आनंद देऊ शकत नाही. आगरकरांच्या काळात स्त्रियांना शिक्षण कसं देता येईल. हा प्रश्न आगरकर सोडवू शकले नाहीत. तो प्रश्न नंतरच्या पिढीने सोडवला. ‘‘शिक्षण म्हणजे ज्ञान साक्षात प्रकाशच! शिक्षण घेतलेल्या बायका प्रकाशसारख्या पसरल्या. ह्यांना आता पुन्हा घराकडे कशा वळवायच्या खरोखरीच बायकोने नोकरी करावी का सोडावी ह्या बाबतीत धरलं तर चावत आणि सोडलं तर पळत अशीच आजची अवस्था झाली आहे. काळ्यांच्या कुशल लेखणीतून एक चांगली कथा निर्माण झाली.
स्पर्धा नको, साथ हवी!
ह्या कथांचे सारे सामर्थ्य संवादांतच आहे! काळ्यांचे संवाद काही काही ठिकाणी फारच धारदार विलक्षण प्रभावी झाले आहेत. नाटकातील संवादाइतकेच ताकदीचे, आचार्य अत्रे म्हणत, नाटकातील संवाद बंद्या रुपयासारखे खणखणीत वाजायला हवेत म्हशीच्या शेणासारखे फदाफदा पडून वाकणार नाहीत!’’ काळ्यांच्या कथांचे संवाद इतके प्रभावी झाले आहेत की कथा वाचताना ती पात्रे आपल्या डोळ्यासमोर रंगमंचावर वावरतच आहेत. असे वाटते. कथा वाचून होते... आणि मग आपण भानावर येतो... अरेच्या हो कथा आहे! संवादांनी नटलेली नाटक नव्हे! ते संवाद चटकदार आहेत... खणखणीत आहेत. उदा. ‘‘पुरुषाला स्वयंपाक येऊ नये आणि बायकोला नोकरी करता येऊ नये. एकमेकांच्या मार्तृत्वाचे प्रांत अनभिन्नच हवेत. तरच एकमेकांच्या कर्तबगारीच कौतुक टिकतं. त्यात काय आहे. मी पण करीन! इथे अर्पण भाव संपला. स्पर्धा आली. कौतुक संपलं. तुलना आली. साथ संपली, स्वत्वाची जाणीव आली!’’
‘‘घरात एकदा संगती पावल उमटली, काचेच्या वस्तु फुटायला लागल्या, खेळण्याचा पसारा पडायला लागला. गालीच्यावर रंगीबेरंगी नकाशे उठायला लागले म्हणजे मधु. पहिल्या रात्रीनं घातलेला उखाणा आपोआप सुटेल?’’
संवाद : कथांचा प्राण
असे विलक्षण प्रभावी संवाद, सर्वकथांतून विखुरलेले आहेत नव्हे संवाद हाच ह्या कथांचा प्राण आहे.
कथांतील वर्णनाचा बारीक बारीक तपशील वाचून वाचून कंटाळलेल्या वाचकांना इथे जरा नवे आढळते. काळ्यांच्या संवादाचे वैशिष्ट्य आणली आहे. हे संवाद कंटाळवाणे रुक्ष होत नाही. इथे सारे स्पष्ट आहे व संवादातून कथेचा ओघ वहात राहतो. पुस्तकाची सजावट श्री. काळे यांनी स्वत:च केली आहे त्यांतही निराळेपण आहे. एकूण वपु काळ्यांच्या कथाकथनाइतकेच ‘संवादिनी’ पुस्तक लोकांना आवडेल असे वाटते.
-शकुंतला बोरगावकर
- NEWSPAPER REVIEW
केवळ संभाषणातून फुलत जाणाऱ्या नाट्यपूर्ण कहाण्या...
‘संवादिनी’ या कथासंग्रहामधील सहाही कथा या संवादात्मक आहेत; आणि तरीही नाट्यपूर्ण अनुभूती देणाऱ्या आहेत. वपुंच्या आशावादी, उत्साही व आनंदवादी दृष्टिकोनाचे दर्शन घडविणाऱ्या आहेत.
‘उद्याचा दिवस’ मध्ये राजाभाऊ आपल्या एका मित्राला व त्याच्या पत्नीला सांगतात, ‘‘भाई, अष्टमेश मंगळ बाराव्या घरातून जातोय; तुम्हाला जपायला हवं.’’ राजाभाऊ हे पत्रिकेपेक्षा संख्याशास्त्रावर भर देतात. ते ताईला एक अंक मनात धरायला सांगतात. ती सदतीस अंक सांगते. तेव्हा राजाभाऊ इशारा देतात, ‘‘भाई, तुम्ही स्वत:ला वाहनापासून जपायचं.’’ भाई विचारतो, ‘‘हे मोघम बोलणं झालं. वाहन कुठलं? किती चाकाचं?’’ तेव्हा राजाभाऊ पुन्हा एक अंक धरायला सांगतात. त्यावर राजाभाऊ म्हणतात, ‘‘चार चाकी वाहन. पुढचे पंधरा दिवस जपायला हवे.’’ या पंधरा दिवसात भाईच्या लांबच्या बहिणीची, सुमनची डिलिव्हरीची तारीख येत असते. पंधरा वर्षानंतर ती प्रथमच गरोदर असते... धास्तावलेला भाई पंधरा दिवसांची चक्क रजा काढतो. तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्येच राहतो... तेव्हा राजाभाऊंनाच वाटतं की आपण उगाचच यांना भविष्य सांगितलं. ते ताईला म्हणतात, ‘‘मी भविष्य सांगितलं ही एक मोठी चूक केली.’’ पण पत्रिका न बघताही मला माणूस कळतो असे म्हणणारी ताई तरीही विचारते, ‘‘भार्इंना खरोखरच तशी काही भीती नाही ना? राजाभाऊ, कितीही चमत्कार घडला तरी रस्त्यावरची मोटार फार तर फूटपाथवर चढेल; पण तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत घुसणार नाही.
..आणि पंधराव्या दिवशी, घरातून बाहेर न पडताही, भार्इंचा डावा हात संपूर्ण प्लॅस्टरमध्ये असतो.
हे कसे घडले ?... ते येथे सांगण्यात मतलब नाही. पण राजाभाऊंना भाई फैलावर घेतो, ‘‘तुझं संख्याशास्त्र एकदम बोगस आहे. मला धोका रस्त्यावर, म्हणजे घराबाहेर नव्हताच. मी घरातच पडलो.’’ .... तुझं ते संख्याशास्त्र आणि त्यावर मी विकत आणलेली ती पाच पुस्तकं माझ्यासमोर जाळून टाक.’’ राजाभाऊ मग ताईशी बोलतात. ताई त्यांना सांगतात, ‘‘ये बाबा, आलास. तुझी वाटच पाहत होते.. तू सांगितलंस तसंच घडलं... त्यांना अजून ते माहित नाही... त्यांना कळलं तर ते संख्याशास्त्रावरची आणखीन ४०/५० पुस्तकं घरात आणून टाकतील.’’
वाचकमित्रहो, आता या ताई-राजाभाऊंच्या संभाषणावरून काय लक्षात येते, त्याचा तुम्हीच मागोवा घ्या. राजाभाऊंचे भविष्य तर खरे ठरलंय, आणि भाई आपल्या तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून पंधरा दिवसात एकदाही बाहेर पडले नाहीत हेही खरे! अपघात वाहनाने, तोही चार चाकी वाहनाने झाला हेही खरे!...
वपुंचे कौशल्य या अशा नाट्यपूर्ण घटनांची उत्कंठापूर्ण रंगत वाढवण्यात दिसते. राजाभाऊंशी होणाऱ्या या जोडप्याच्या गप्पांची लज्जत तर चाखता तर येतेच, त्यापेक्षाही जास्त गंमत ताई-भाई यांच्यातील जुगलबंदीने येते.
‘‘माझ्याकडे का पाहताय?’’
‘‘मग कुणाकडं पाहायचं? तू माझी बायको. मला जपायला हवं ही सूचना राजाभाऊंनी तुला तुला दिली आहे. बघा, राजाभाऊ, कसं हसण्यावारी नेते, पाहा.’’
‘‘अहो पण...’’
‘‘आता काही सांगू नकोस. पाहिलंत राजाभाऊ? घरातल्या माणसांनी जर गंभीर गोष्टीची अशी चेष्टा चालवली तर आमचं रक्षण आम्हीच करायला हवं की नको?’’
‘‘तुम्ही अगदी कमाल करतांय हं. जपायला हवं असं हे म्हणतात. पण त्यांना आधी विचारा की कशापासून जपायचं? किती दिवस? कशा तऱ्हेने? हे सगळं विचाराल की नाही?’’
‘‘तू जर ह्याच तऱ्हेने बोलणार असशील तर मला तुझ्यापासून आधी जपलं पाहिजे.’’
‘‘उत्तम. मला परवानगी द्या. की मी चालले.’’
‘‘कुठं?’’
‘‘अर्थात माहेरी.’’
‘‘हे पाहा राजाभाऊ. माझ्या जिवाला अपाय आहे असं तुम्ही सांगताय आणि ही निघाली माहेरी, बघून ठेवा.
‘‘अहो पण भाई...’’
‘‘मी कसा संसार केला असेन हे जाणून घ्या. ह्यांना बायकोची मुळीच गरज नाही...’’
‘निरंजन, मला उत्तर हवंय’ या ‘संवादिनी’मधील पहिले दृश्य माथेरानचे आहे. पेडर रोडवर राहणारे जोडपे श्रीधर व माधुरी माथेरानच्या शांत वातावरणात एकमेकांच्या सहवासात रममाण झालेले आहे. ‘‘श्रीधर, चेष्टा नाही. खरंच, मी फार सुखी आहे ह्या क्षणी. अगदी तृप्त आहे.’’ असे ती म्हणते आणि श्रीधरच्या चेहऱ्यावर असे तिला काही दिसते की, ‘‘तुमचा चेहराच सांगतोय, काही लपवायचं नाही माझ्यापासून’’ असे तिला म्हणावे लागते. आणि नंतर विषय निघतो तो मुलाचा, ‘‘मला मूल हवंय. पण ते तुमच्याकडून हवंय.’’ ‘‘मला नकोय का तसं?’’ पण तसं ते होणार नाही म्हणून... टेस्ट ट्युबचा मार्ग.’’ ‘‘श्रीधर, प्लीज वेट, आय कान्ट बेअर इट. इट्स व्हेरी क्रुड. सगळी विटंबना वाटते...’’
या पुढच्या दृश्यात माधुरी दिसते ती निरंजन या नटाबरोबर बोलताना. लग्नाआधी आठदहा वर्षे माधुरीने नाट्यक्षेत्रात काढलेली असतात. निरंजनबरोबर भामिनीची भूमिका केलेली असते. परंतु लग्नानंतर नाट्यक्षेत्राकडे तिने पाठ फिरवलेली असते. आता नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी माधुरीची आणि निरंजनची गाठ पडते. पूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळतो. आणि ती त्याच्याशी एकान्त साधते; आणि नंतर त्याला सांगते, ‘‘आपल्या मिलनाची खूण या क्षणी माझ्या पोटात वाढत आहे.’’ निरंजन चक्रावतो. ‘श्रीधरचं काय?’ असा प्रश्न करतो. ती त्याला समजावून सांगते, ‘‘श्रीधर मला मूल देऊ शकत नाही. म्हणून आम्ही दोघांनी टेस्ट ट्युब बेबीचा प्रयोग करायचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांशी अपॉइंटमेंटही घेतली आहे... श्रीधर दौऱ्यावरून परत आल्यावर डॉक्टरांकडे जायचे आहे.’’ त्याचवेळी ती हेही स्पष्ट करते की डॉक्टरांना विश्वासात घेऊन टेस्टट्युब बेबीचं नाटक करायचं...’’
—‘‘माझा रंगमंच जरा मोठा आहे. त्यात अंक नाहीत. प्रवेश नाहीत. प्रॉम्प्टर नाही. पडदा पडणार तो एकदाच. नंतर मिळणाऱ्या टाळ्याही मालकीच्या नाहीत.’’ - हे खास वपु शैलीतले वाक्यही ती उच्चारते.
‘‘ही श्रीधरची फसवणूक नाही का ? असेलही. पण अनभिज्ञतेच्या दु:खापेक्षा ह्यातली वेदना सौम्य आहे.... काही काही व्यथा पत्कराव्या लागतात. सांभाळाव्या लागतात. ह्या माझ्या कृतीनं श्रीधरपेक्षा जास्त ताण मलाच सहन करावा लागणार आहे....’’ अशी तिची या क्षणीची भावना आहे.
आता पुढची कलाटणी वपु कशी देतात या कहाणीला?
दहा वर्षांनी निरंजनचा फोन येतो.. ‘‘माझी नाटक कंपनी बंद पडली. मी मरता मरता वाचलो. आता एकटा राहतो. बायको माहेरी राहते. नोकरी करून मुलांचे पोट भरते....’’
तो माधुरीकडे कर्ज फेडण्यासाठी चाळीस हजार रुपयांची मागणी करतो. ती नाही म्हणते तेव्हा तो ‘दहा वर्षांपूर्वीचा हिशेब सव्याज वसूल करायची’ भाषा, ब्लॅकमेलची भाषा करतो. ती त्याला सांगते. ‘‘आज पाच हजार दिले की काही दिवसांनी तू पुन्हा मागणी करशील. एवढं करूनही त्या रकमेशी तू प्रामाणिक राहशील असं नाही. अगोदर पैसा घालवायचा आणि शेवटी संसार घालवायचा. त्यापेक्षा पैसा वाचवते. कायम डोक्यावर तलवार नको. तू ये. श्रीधरना जरूर भेट.’’
श्रीधरला निरंजन भेटून हे सर्व सांगतो; तेव्हा श्रीधरची प्रतिक्रिया त्याला अनपेक्षित अशी होते.
‘‘एनी हाऊ,तुम्ही मला विलक्षण ताणातून मुक्त केलंत...एका कलावंताचं रोप माझ्यासारख्या रसिकाच्या घरी वाढतंय याचा मला आनंद वाटतोय... हा पोरगा कोणाचा हे जर समजलं नसतं तर कदाचित त्याचं व्यक्तिमत्त्व फुलवण्याच्या कामात मला अपयश आलं असतं. आता तसं व्हायचं नाही...’’
ब्लॅकमेल करायला आलेल्या निरंजनला श्रीधर सांगतो, ‘‘तुम्हाला काय हवंय ते आता ठरवा.. पैसे हवे असतील तर आकडा सांगा... बाप म्हणून बापाला जी भूक असते ती मी किंवा मधु पुरी करू शकणार नाही. तुम्हाला बाप म्हणून मुलाकडून जे हवं असेल ते फक्त मुलगा आनंद हाच देऊ शकेल... तेव्हा तुमची मागणी सांगा...’’
मानवी स्वभावाचे असे अनोळखी, अपरिचित कप्पे दाखवण्याची वपुंना विलक्षण हौस होती. त्यांची माणसे रूढ चाकोरीतून जात नाहीत; ती काहीतरी वेगळ्या पण स्वत:च्या स्वभावाशी सुसंगत अशी वागतात. अधिक जिवंत वाटतात. खरी माणसे वाटतात. नाही ती अपराधभावना मनाशी जपत आपले आयुष्य नासवायला तयार नसतात. वस्तुस्थितीचा स्वीकार करायची वेळी आली की डगमगत नाहीत; अहंकाराचा वा प्रतिष्ठेचा संभावित बुरखा झुगारून देताना कचरत नाहीत.
कथानकातले वेगवेगळे टप्पे हे अत्यंत कौशल्याने समोर येत राहावेत अशी कमालीची दक्षता वपु घेतात. कौशल्य सारे रचनेत आहे हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे साधे साधे किस्सेही ते रंगतदार बनवून पेश करतात. त्यांची पेशकश ही त्यांच्या कथाकथनतंत्राच्या सगळ्या क्ऌप्त्या चपखलपणे वापरणारी असते.
पती आणि पत्नी घरी निवान्त एकान्ती असताना मिठीत येऊ पाहतात; पण त्यावेळी पप्पूनं आपल्याला बघितलं का अशी शंका पतीला येत राहते; आणि त्या धावत्या भेटीची मजा हरवते. पप्पूनं आपल्याला ओझरतं तरी पाहिलं असावं या शंकेची खातरजमा करून घेण्यासाठी पप्पूला सूचक प्रश्न विचारण्यात येतात. मिठी वगैरे प्रकार मुलांना कळू नयेत ही जबरदस्त नैतिक जाणीव.... पण तिच्या पार ठिकऱ्या होतात. कशा ? पप्पू एका बालचित्रपटाला जातो. नऊ वर्षाच्या मुलीची एक बाहुली हरवते. ती खूप शोधते. शेवटी बाहुली सापडते; आणि ती मुलगी बाहुलीला मिठी मारून तिचे मुके घेत सुटते.... जागरुक नीतिवादी पालकांची अशी दैना होते; आणि वपुंना ती मिस्किलपणे सांगण्यातही थ्रिल वाटते.
आफिसमध्ये अत्यंत सचोटीने, सिन्सिअरली काम करण्याऱ्या ‘गृहिणी’ला -इंद्रायणीला रजा काढून घरी राहिल्यावर काय करायचं तेच कळत नाही. वेळ जात नाही. मुलांनाही तिचं घरी राहणं चमत्कारिक वाटतं. नेहमी फिरतीवर असणारा तिचा नवराही तक्रार करतो, ‘‘ती रजेवर आहे. तिनं आता फुलायला हवं. पण नाहीच रे. आमचे एवढ्यातेवढ्यावरून क्लॅशेस उडत आहेत. मुलांशी क्लॅशेस. घरगड्याशी क्लॅशेस.’’ रजा नकोशी होते मग !
— आणि नोकरी करणाऱ्या बायकांच्या सायकॉलॉजीकडे वपु लक्ष वेधतात.
नोकरी करणाऱ्या बायका घरापेक्षा ऑफिसात जास्त प्रसन्न असतात. ऑफिसचं काम अंशमात्र त्यांच्यावाचून खोळंबून राहतं. चार आजूबाजूची माणसं दहा वेळी चौकशी करतात. नवऱ्यापेक्षा ऑफिसातला सहकारी जवळचा वाटतो. आपण आपल्या बायकोचं कधीच ऐकू शकणार नाही. ऑफिसातला तिचा मित्र सगळं ऐकतो. कारण तिच्या संसारातल्या दु:खाला तो मित्र मुळीच जबाबदार नसतो. कोणताही स्वार्थ नसतो तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो. इतक्या कळत नकळतपणे बायको दुरावते. इट इज सॉर्ट ऑफ स्लो पॉयझनिंग.’’ (२१)
पुरुषांना स्वयंपाक येऊ नये आणि बाईला नोकरी करता येऊ नये. एकमेकांच्या कर्तृत्वाचे प्रांत अनभिज्ञच हवेत. तरच एकमेकांच्या कर्तबगारीचं कौतुक टिकतं. ‘त्यात काय आहे, मी पण करीन’ - इथं समर्पणभाव संपला. स्पर्धा आली. कौतुक संपलं. तुलना आली. साथ संपली, स्वत्वाची जाणीव आली. (२२)
‘‘शिक्षण घेतलेल्या बायका. प्रकाशासारख्या पसरल्या. जिथं तिथं बायका. ह्यांना आता पुन्हा घरांकडे कशा वळवायच्या हे तुला मला सांगताच येणार नाही. क्वचित पुढची पिढी सांगू शकेल. तेही ह्या पिढीला गरज पडली तर.’’
दोन पैजांची गमतीदार कहाणीही वपु खुलवून सांगतात. ‘‘रमेश, ही मोहिनी साठे. आमच्या ऑफिसातच काम करते. आज सिनेमाला आम्ही दोघे परस्पर चाललोय. कृपया संजीवनीला निरोप पोचवशील? नाहीतर ती काळजी करील.’’ संजीवनी ही रमेशची बहीण. मिस्टर देवधरांची पत्नी.
संजीवनी, माझी बहीण-तापट स्वभाव... पण हा निरोप ऐकूनही शांतच राहते. कारण? तिने शांत राहण्याची पैज मारलेली असते. शंभर रुपयांची... संजीवनी जिंकते आणि देवधर ? देवधरही ऐंशी रुपयांची पैज हरतात. त्यांची ऑफिसात पैज मारलेली असते. बायको भांडेल म्हणून, पण ती भांडतच नाही.
— वपुंच्या या सारख्या मिस्किल कथा वाचताना मोपासांचे स्मरण होते. शेवटी कलाटणी देण्यात व मानवी मनाचे गुंते दाखवण्यात मोपासांही कुशल होता. वपुंच्या कथांची म्हणून इंग्रजी फ्रेंचमध्ये भाषांतरे व्हायला हवीत.
- DAINIK LOKSATTA 14-07-2002
संवादोत्सुक कथा…
कथा या वाङ्मयप्रकाराचा कौटुंबिक कथा हा जर एक उपप्रकार मानला, तर त्या कथांच्या सदंर्भात कथाकार व. पु. काळे यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. खास मध्यमवर्गीय संसारकथा म्हणजे व. पु असं समीकरण मांडायला अजिबात हरकत नाही, इतक्या विपुल संख्येनं व. पुं. नी ‘आंबटगोड’ कुटुंबकथा लिहिल्या. माणसांमध्ये वाढत चाललेला विसंवाद, एकलेपणा व. पुं. च्या कथांच्या केंद्रस्थानी असल्याचं दिसून येतं. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या पुस्तकांची नवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
संवादाची भूक भागवण्याच्या भावनेतून आपलं लेखन झाल्याचं व.पुं.नी वेळोवेळी म्हटलं आहे. त्यांच्या कथांमधले संवाद वेधक आणि सामर्थ्यशाली असतं, यात काय नवल. संपूर्ण कथा फक्त संवादरूपात लिहिण्याचे प्रयोगही व.पुं.नी केले. अशा सहा कथांच्या ‘संवादिनी’ची ही तिसरी सुधारित आवृत्ती. संवादाची ओढ नेमकेपणानं व्यक्त करणारं या पुस्तकाचं मुखपृष्ठही उत्तम झालं आहे. यातील कथाही व.पु. प्रेमींच्या आवडीच्या आणि आठवणीतल्याच आहेत.