DAINIK AIKYA 03-09-2017मम सुखाची ठेव...
‘पेन्शन घ्यावं अन् पुण्यात रहावं.’ अशा सुख कल्पनेतलं हे गाव. इंग्रजीमध्ये म्हण आहे, ‘वेल बिगन इज हाफ डन.’ तसं पुण्यात राहायला मिळालं म्हणजे सुखाचा अर्धा टप्पा गाठल्यासारखंच आहे. शिवरायांनी सोन्याच्या नांगरानं भूमिपूजन केलेली ही पुनवडी! निसर्गानं मुळा-मुठे सारख्या नद्या बहाल करून पुण्याला देखणं केलं तर पर्वती, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी अशा मध्यमवर्गीय टेकड्यांनी या गुलजार पुण्यात सकाळ-संध्याकाळ स्वच्छ हवेचा आस्वाद त्या एकदम महाकाय पर्वतासारख्या नाहीत की ‘आम्ही मधूनमधूनच परत आलो’ असं खचून जाणारं कोणी बोलेल. त्या इतक्याही लिंबू टिंबू नाही की थोडीसुद्धा धाप लागत नाही. पुणेकरांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात यासाठी किती उंचीवर चढून आलं म्हणजे माफक व्यायाम होईल याचा हिशोब करूनही अगदी ‘मेड टू ऑर्डर’ अशा या टेकड्या निसर्गानं बनविल्या. ‘अॅटॅच्ड गार्डन’ असं फ्लॅटवाले जसं कौतुकानं सांगतात तसं पुणेकर अगदी ‘घराजवळ पर्वती’ असं भरल्या मनानं सांगतात. पंधरा वर्षांपूर्वी रुपया फुटानं जागा घेतली. आता विकायला काढली तर दहा लाख रुपये सहज येतील, हे सुखही बऱ्याच पुणेकरांच्या वाट्याला आलं हे त्यांनी होऊन दिलेल्या माहितीमुळं कळतं.
विद्येच्या या माहेरघरात एक नव्हे तर दोन विद्यापीठे आहेत. शिवाय एक एक शिक्षणसंस्था म्हणजे एका एका विद्यापीठासारखंच. शाळेत जर्मन विषय घेतात हे मी इथंच पाहिलं. आमच्या लहानपणी अॅल्युमिनियमच्या भांड्यांना जर्मनची भांडी म्हणायचे. तेवढाच या शब्दाशी आलेला माझा संबंध. मी मुलीला म्हटलं, ‘तू जर्मन घेतलंस ना? जसं काय ती आता जर्मनीला जाणार अशा कौतुकानं भारावलेलं ते वाक्य. त्यावर ती म्हणाली, ‘जमन’ म्हणायचं. आपल्याकडे जशी सरस्वती नदी गुप्त आहे तसा हा ‘र’ म्हणजे सायलेंट असतो. आता मी मनातच म्हटलं, ‘अरेरे!’ हे मी मनातच म्हटल्यामुळं त्यातले बहुसंख्येने असलेले ‘र’ हे शांतच बसले असणार. पुण्यात जेवढे म्हणून अभ्यासक्रम शिकवले जातात त्या सर्वांची एकत्र माहिती घेण्याचा एखादा अभ्यासक्रम आहे का याची तेवढी चौकशी करायची बाकी आहे.
पुणं म्हणजे सुखाची गुरुकिल्ली म्हणायचं कारण म्हणजे इथं कोणाला कशामुळं आनंद होईल सांगता येत नाही. पण आनंदच होतो. रडगाणी कमी. जीवनगाणी, आनंदगाणी जास्त. कुणाला टेल्को, बजाज, कमिन्ससारखी आधुनिक तीर्थक्षेत्रं आहेत म्हणून आवडेल. ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांशिवाय लग्नासाठी भरपूर स्थळं मिळणारं गाव म्हणजे पुणं. आमच्या सातारच्या बहुतेक मुली पुण्यात लग्नानंतर लहान मुलांना घेऊन फिरताना दिसायच्या. एखादी पुढ्यातच भेटली तर त्या मुलाला ‘हा तुझा मामा बघ’ अशी ओळख करून देणार आणि आपला भर रस्त्यात मामा करणार. ओळखीची माणसं दिसणारं गाव म्हणूनही कुणाला पुणं आपलंसं वाटत असणार.
दूरदर्शनवर मराठी बातम्यांत ‘जिल्हा वार्तापत्र’ असा दूरदर्शनच्या प्रतिभेला साजेलसा कंटाळवाणा भाग असतो. त्यामध्ये पाणीटंचाई, लोकन्यायालये, रोजगार योजना, विंझणविहीरी असल्या उजाड बातम्या असतात. पण पुणे जिल्ह्याच्या वार्तापत्रात मात्र साहित्यिक गप्पा, व्याख्यानमाला असा आनंददायी भागही आढळतो. पुणेकर म्हणजे आनंदयात्री. मुंबईत दंगलीनं संचारबंदी होते तर त्याच वेळी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी पंधरा हजार लोक एकत्र गाण्याच्या मौफिलीत रंगलेले असतात. गणेशोत्सव पाहावा तर पुण्याचाच. व्याख्यानं, चर्चामंडळं, गप्पांचे कार्यक्रम, हास्य कविसंमेलन, रोषणाई, श्रीमंत दगडूशेठ गणपतीजवळ नारळाचे डोंगर. सारा गावच या उत्सवात सामावलेला. पुण्याची लांबी, रुंदी जशी वाढलीय तशी उंचीही, इमातींनाही अरोरा टॉवर्स,पर्वती टॉवर्स, इंदिरा हाइट्स अशी नांव आलीत.
तरीही जरा आतल्या बाजूला नजर वळली की ‘श्रमसाफल्य’,‘लताविश्व’ अशी बिनगर्दीच्या भागात निंवातपणा अनुभवणारी निवासस्थानं आहेतच. मुख्य रस्त्यावर आलं की सिटी दिसणारं हे शहर, कॉलनीत गेलं की निसर्गरम्य. चार चौघांची विचारपूस करणारं पुणं वाटतं. जगाच्या गतीत आपणही मागं नाही हे दाखवून देणारं हे पुणं वेगवान झालंय. पूर्वी घरोघरी सायकली होत्या. आता मोपेड्स व स्कूटर्सची गर्दी झालीय. रस्ता क्रॉस करायलाही रिक्षा करायला हवी असं मजेनं म्हणायची वेळ आलीय. पूर्वी दुकानदार समोरच्या हॉटेलातून बोटांच्या इशाऱ्यावर चहा मागवायचे. आता इशारे ऐकू जात नाहीत अन् दिसूही शकत नाहीत. रस्ता क्रॉस करून सांगायला जायची कसरत केली तरी चहावाला मुलगा इकडे येईपर्यंत चहा थंडगार व्हायचा. यावर उपाय म्हणून आपल्या दुकानाच्या बाजूचाच चहावाला शोधायचा.
अशा कितीही अडचणींचे डोंगर असले तरी ‘पुण्यावाचून जमेना, पुण्यावाचून करमेना’ अशीच स्थिती होते. ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या न्यायाने पुण्याबाहेरचे लोक पुणेकरांची अगदी चवीनं थट्टा करीत असतात.
‘पुण्याचे लोक इतके चेंगट की, ‘या हं एकदा चहाला!’ असं आमंत्रण करत पण नक्की केव्हा यायचं हे सांगत नाहीत.
यावर दुसरा म्हणाला, ‘अहो, पुण्यात नेने आणि लेले नावाचे दोन गृहस्थ आपण कसे काटकसरीने राहातो ते सांगत होते. नेने म्हणाले, ‘मी सुपारी बरेच दिवस वापरता यावी म्हणून ती न कापता दोरीने टांगून ठेवली आहे. सुपारी खावी वाटली, तर मी फक्त चाटतो.’
यावर लेले म्हणाले, ‘मी माझ्या नावाचा शिक्का बनविताना फक्त ‘ले’ या एकाच अक्षराचा बनविला व तोच दोनदा वापरतो.
तिसऱ्याने लगेच सरसावून एक किस्सा सांगितला.
‘एका गृहस्थाकडे एक पुणेकर गप्पा मारत असताना बाहेर जोराचा पाऊस पडायला लागला. पाऊस थांबायची काही चिन्हे दिसेना. अंधार पडायला लागलेला. तेव्हा मित्र म्हणाला, आता जेऊनच जा. नंतर त्यानं आत जाऊन बायकोला जरा दचकतच सांगितलं, ‘अगं मी त्याला जेवायला थांबवून घेतलंय. बाहेर जोराचा पाऊस पडतोय, तेव्हा तयारी कर हं!’ बायकोच्या पूर्व संमतीशिवाय मित्राला जेवायला थांबविल्यामुळे बायकोची आत समजूत काढून तो बाहेरच्या खोलीत आला. तर या पुणेकर मित्राचा पत्ताच नाही! हा गेला कुठं? अशा विचारात असतानाच हा पुठ्ठया धापा टाकत पूर्ण भिजलेला असा आला. कुठे गेला होता विचारताच, ‘घरी जेवायला येणार नाही हे सांगून आलो! असा खुलासा त्यांनी केला.
अशी पुणेकरांची थट्टा करण्याची हॅटट्रिक पूर्ण झाली असतानाही एकानं आणखी एक चौकार ठोकला, एकदा नागपूरच्या गृहस्थांना आपल्या मुलानं उधळेपणा कमी करावा, काटकसरीनं राहावं असं वाटल्यानं त्यांनी मुलाला काही दिवस पुण्याला काकांकडे जाऊन राहायला सांगितलं. मुलगा पुण्याला आला. काकांच्या घराशी आल्यावर दारावर बेल दिसली नाही. कडी वाजवावी तर लक्षात आलं की, दार काही लावलेलं नाही. नुसतंच लोटलेलं आहे. त्यानं दार ढकललं. आत काका बसलेलेच होते. ते म्हणाले, ‘ये बाळ, मी कडी का लावली नाही माहीत आहे? ती झिजेल, म्हणून कमीत कमी वेळा लावतो! थोड्या वेळात वीज गेल्यामुळे त्यांनी मेणबत्ती लावून त्या प्रकाशात दोघांनी भोजन घेतलं. भोजनानंतर आता तर नुसतेच ऐकण्याचे काम आहे म्हणून त्यांनी मेणबत्ती विझवली. पुतण्या त्यांना म्हणाला, ‘आता अंधार असल्यामुळे मी पंचाही काढून ठेवला आहे, तोही झिजयला नको!’
अशी पुण्याला नावं ठेवणारी माणसं जेव्हा पुण्यात येऊन काही दिवस राहतात. तेव्हा मात्र त्यांना पुण्यातच स्थानिक व्हावं असं वाटतं. पुण्यात राहायला जागा मिळणं व मुलांना शाळेत प्रवेश मिळणं हे महाकठीण काम. पण एकदा का ते जमलं की मग अगदी ‘पुणं तिथं काय उणं’ अशीच प्रतिक्रिया यायला लागते.
पुण्याचा इतिहास प्रेरणादायी आहे. इथं साहित्यिकांची मांदियाळी आहे. यशस्वी उद्योजकांचं कर्तृत्वपूर्ण वास्तव्य आहे. एकाहून एक सरस नाट्यगृहं आहेत. क्रीडा संकुलं आहेत. अशा पुण्याचा फेरफटका मारायचा आहे आपल्याला. सुरुवात करू या लकडी पुलावरून!