- Sachin Padul
माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या गोष्टी
- Varsha Kulkarni Khopkar
साधेपणा, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अविरत कार्यरत असलेल्या "सुधा मूर्ती" ह्या माझ्यासाठी एक आदर्शमूर्ती आहेत .. १९ ऑगस्ट १९५० साली कर्नाटकात जन्म घेतलेल्या सुधा मूर्ती मॅडम ह्या उत्कृष्ट प्रतिभावंत लेखिका म्हणून जितक्या नावाजल्या गेल्या तितकंच त्यांचं सामाजिक कार्यातलं योगदान देखील अतिशय गौरवशाली आहे .. काॅम्प्युटर सायन्स ह्या विषयात एम टेक करून पुण्यातल्या "टेल्को" कंपनीत निवड झालेल्या सुधा मूर्ती मॅडम ह्या पहिल्या स्त्री अभियंता आहेत .. समाजकार्यातील असामान्य योगदानाबद्दल "पद्मश्री" पुरस्कार तसेच भारत सरकारतर्फे "राजलक्ष्मी" पुरस्कारांनी भूषवल्या गेलेल्या सुधा मूर्ती मॅडमना समाजिक कामगिरीबद्दल तसेच साहित्यसेवेबद्दल तब्बल सहा डाॅक्टरेट्स मिळालेल्या आहेत .. सदैव हसतमुख शालिन चेह-याच्या सुधा मूर्ती मॅडम मला अतिशय आवडतात यांच्या ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वांमुळेच .. आपणही आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं करून दाखवावं .. ही ऊर्जा आणि प्रेरणा मॅडमकडूनच मिळते
"सुनिता कर्णिक आयोजित स्पर्धे" साठी माझं समीक्षण देताना मला आवडलेल्या ज्या पुस्तकाबद्दल मी लिहिणार आहे ते पुस्तक म्हणजे परवाच अचानक मला गवसलेलं सुधा मूर्ती मॅडमचं एक अतिशय सुंदर पुस्तक - "स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं" हे .. हे अद्भुत पुस्तक वाचताना मी अक्षरशः हरवून गेले .. नव्यानी असंख्य गोष्टींशी मी ज्ञात झाले .. ह्या पुस्तकाचं एक वैशिष्ठ्य म्हणजे सुधा मूर्ती मॅडमनी वाचकांकडून `सत्य घटने" वर आधारित कथा मागवल्या आणि त्यांच्या ह्या ऊपक्रमाला ऊत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .. जमलेल्या असंख्य कथांमधून मॅडमनी निवडक २० कथा वेचून काढल्या आणि त्या कथा स्वत:च्या बाणेदार शैलीत संपादित केल्या .. अनुवादाचं काम लीना सोहोनी ह्यांनी केलं आहे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे
प्रथमदर्शनीच पुस्तकाचं बोलकं मुखपृष्ठ आपलं लक्ष वेधून घेतं .. पुस्तकातल्या कथांच्या लेखकांची नावं मुखपृष्ठावर आकर्षकरित्या छापली गेली आहेत ही सर्वसाधारणपणे न आढळणारी गोष्ट मला अतिशय भावली .. हे सगळे लेखक देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या स्तरांतले भिन्न भिन्न वातावरणातून आलेले आहेत आणि त्यांना जे प्रत्यक्ष अनुभव आले त्या घटनांवर कथांची गुंफण केलेली आहे .. सगळ्याच कथा अतिशय विलक्षण आहेत .. प्रत्येक कथेत मुद्देसूद परिच्छेद व योग्य संवादस्पष्टता ह्या महत्वाच्या गोष्टी साधल्या गेल्या आहेत .. आणि म्हणूनच त्या वाचताना पुस्तकावरची आपली पकड अधिकाधिक घट्ट होत जाते .. पुस्तक आकारानी जरी मोठं वाटत असलं तरीही हातात घेतल्यावर वाचनात खंड पडू न देता वाचायची ओढ लागून राहते
पहिलीच "स्वीकार" नावाची कौटुंबिक कथा जी चेन्नईस्थित भास्कर मुखर्जी यांची आहे ती वाचायला सुरवात करतानाच आपल्याच घरातील वाटू लागते .. घरोघरी जे चित्र दिसतं ते लेखकानी सफाईदाररित्या रेखाटलं आहे .. ह्या कथेमधला नायक अशोक हा वर्तमानपत्र वाचत असताना एका वेगळ्याच विषयावरची बातमी त्याच्या नजरेत येते की समाजातल्या तृतीयपंथींनाही मानानी सन्मानानी जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे .. माणूस म्हणून त्यांना देखील सर्व हक्क समानतेनी मिळाले पाहिजेत .. अशोकची पत्नी रमा तिची कामवाली काम सोडून गेल्यामुळे अतिशय त्रासलेली असते .. घरातली सगळी कामं ऊरकणं .. स्वत:च्या ऑफिसमधून सुट्टी मिळणे अशक्य असणं आणि काही दिवसांसाठी आलेल्या आपल्या सासूवर कामांचा भार टाकायची रमाची इच्छा नसणं ह्या सगळ्यां समस्यांमधून कसा मार्ग काढावा याबद्दल रमा तिच्या पतीशी चर्चा करत असते .. शिवाय त्यांच्या तीन वर्षाच्या छोट्या विजयला सांभाळण्यासाठीही त्यांना घरात बाईची गरज असते .. आणि त्याचवेळी त्यांच्या दारात अचानक अनपेक्षितपणे एक तृतीयपंथी व्यक्ति येऊन ऊभी ठाकते .. तिला बघून आधी घाबरून गेलेली रमा मनातून माणुसकीच्या दृष्टीनी तृतीयपंथींबद्दल विचार करत असते .. ती व्यक्ति खरं तर कामाच्या शोधातच आलेली असते पण अशा कुणाला आपल्या घरात कामासाठी ठेवायला अशोक आणि त्याची आई अजिबातच तयार नसतात .. रमाचा तसा विचार चालालय हे बघून तिची सासू तिच्यावर खेकसते .. अशोक आपल्या पत्नीची समजूत घालू बघतो पण नंतर कथेच्या ऊत्तरार्धात असा काही प्रसंग घडला की अशोकच्या मनाचा कायापालट होतो आणि तो स्वत:हून त्याच तृतीयपंथीला घरात कामासाठी ठेवण्यासाठी आनंदात तयार होतो .. हा मधला थरारक प्रसंग कथेत खूप सुरेख हाताळला गेला आहे .. रमाच्या लहान मुलाच्या बाबतीत काही क्षणांत घडलेला प्रसंग वाचताना समोर टीव्हीवर चालू असलेल्या चित्रपटातला एखादं दृश्य आपण बघतोय .. असंच वाटतं
दुसरी कथा "लाल गुलाब" सौरभ कुमार यांची आहे .. त्यात त्यांनी आजोबांचे नातवडांवर असलेले ऊत्कट प्रेम अनेक घटनांद्वारे सुंदर दाखवले आहे .. कडक शिस्तिच्या आणि मुलांना वळण लावणा-या आजोबांबद्दल वाचताना भान हरपून जातं .. नातवालाही आपल्या आजोबांच्याप्रती असलेला अत्यंत आदर पाहून त्याचं कौतुक वाजल्यावाचून राहवत नाही
आजोबांच्या समजूतदार व प्रेमळ स्वभावाच्या अगदी ऊलट स्वभावाच्या असलेल्या आपल्या आजीबद्दल देखील लेखकानी छान लिहिलं आहे .. कधीच समाधानी नसलेल्या, कुककुरी चिडचिडी वृत्तीच्या आजीला तिनी स्वत: निगा राखून फुलवलेली तिची बाग जीव की प्राण होती .. बागेचं सुंदर वर्णन वाचताना ती बाग डोळयासमोर ऊभी राहते .. आजीनी लावलेल्या त-हेत-हेच्या गुलांबाच्या रोपांवरची फुले व इतर फुले लेखकाला नेहमीच भुरळ घालत असत .. आजीचा डोळा चूकवून ती फुले तोडून आपल्या घरी नेण्यासाठी केलेल्या वाह्यातपणामुळे अनेकदा त्यानी आजीचा मार खाल्ला हे वाचून नक्कीच गंमत वाटली .. लेखक पुढे असंही म्हणतो की आजीच्या असंख्य झाडांवरच्या फुलांपैकी त्याला लाल गुलाबाचे प्रचंड वेड होते .. तो लाल गुलाब मिळवण्यासाठी त्याची अधिकच धडपड चाले पण त्यासाठी त्याला आजीच्या रागाला सामोरं जावं लागे
आजीआजोबांचं घर सुरवातीला लेखकाच्या घरापासून लांब होतं .. पण नंतर आजोबांना "अल्झायमर" नावाचा आजार झाला, हळूहळू तो वाढला .. दुर्दैवानी ह्या आजारावर औषध नसल्यामुळे आणि अनेकदा आजोबांच्या ह्या आजारानी हिंस्त्र रूप धारण करून कठीण प्रसंग वरचेवर घडू लागल्यामुळे आजोबाआजींना लेखकाच्या घरातच वरती राहायला आणले गेले .. अर्थातच जिद्दी हट्टी स्वभावाची आजी तिचं राहतं घर आणि त्याहीपेक्षा त्याची प्राणप्रिय बाग सोडून जायला तयार नव्हतीच .. पण लेखकाच्या घरच्यांनी तिला त्यासाठी तयार केले .. इथेही आजोबांच्या आजारामुळे घडलेले विचित्र प्रसंग वाचताना आपण कथेशी एकरूप होऊन जातो .. कधी कधी आजोबा अचानक काही वेळासाठी त्यांचं सगळयांशी असलेलं नातंच विसरतात व त्यामुळे घरात तूरेधातिरपीट ऊडते .. अशाच एका दिवशी आजोबांच्या गफलतीमुळे लेखकाला प्रचंड त्रास सहन करावा लागला पण काही वेळानंतर ते आपोआप कसे पूर्ववत झाले .. हे सांगताना लेखक हेलावून गेला
ह्या पुस्तकातील इतरही कथा खूप सुंदर आहेत .. पुस्तक अतिशय वाचनीय आहे
- DIVYA MARTHI, NASIK 30-9-2016
या कथासंग्रहातून आपापल्या गोष्टी वाचकांसाठी घेऊन आलेले हे सगळे लेखक तरुण पिढीवरचा विश्वास नक्कीच दृढ करतात. जे सत्य आहे, ते तसंच्या तसं कथन करण्यासाठी जे धाडस लागतं, ते त्यांनी केलं आहे. अग्नेया नावाची मुलगी तुमच्या काळजाला हात घालते. खरंतर तिनं जे काही केलं, ते समाजाच्या नजरेतून
सपशेल चुकीचं होतं. पण तरीसुद्धा तिनं ते का केलं, हे वाचल्या वर ही आग्नेया आपलीच मुलगी असायला हवी, असं वाचकाला वाटेल. आणखी एका मुलाची गोष्ट यात आहे. अल्झायमरसारख्या भयंकर आजाराच्या विळख्यात सापडून हिंसक बनलेल्या आपल्या आजोबांच्या पाठीशी हा मुलगा किती खंबीरपणे उभा राहिला आहे, हे यातून दिसतं. वादळामुळे झाडाची फळं रस्त्यावर पडल्यानंतर ती फळं गोळा करण्यासाठी धडपडणारी गरीब मुलंसुद्धा आयुष्याचा खूप मोठा धडा आपल्याला शिकवून जातात. एका कथेतील वडिलांचा चष्मा सारखा हरवत असतो आणि तो त्यांना काही केल्या सापडत नसतो. एक खंबीर आणि करारी मुख्याध्यापिका एका दुष्प्रवृत्त माणसाला अक्षरश: शेपूट घालून निघून जाण्यास भाग पाडतात आणि विकलांग आजी-आजोबांमध्ये घडलेल्या एका लहानशा प्रसंगातून त्या दोघांच्या एकमेकांवर असलेल्या जीवापाड प्रेमाची प्रचिती येते. आणखी एका तरुणाला आपले अंथरुणाला खिळलेले आजोबा हे किती आदरणीय आहेत, याची एका प्रसंगातून अनुभूती येते. त्यामुळेच यातील काही कथा वाचताना आपल्या अंगावर काटा उभा रहोते. एका कथेतील गुंड लक्षात रहातात तर एका कथेतील माकडंदेखील लक्षात रहातात. म्हणूनच हा कथासंग्रह वेगळा ठरतो.
- DAINIK MAHARASHTRA TIMES 4-12-2016
प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या अनुभवसंपन्न संपादक दृष्टीतून निवडल्या गेलेल्या या सत्यकथा आहेत. लीना सोहोनी यांनी या कथांचा अनुवाद केला आहे. अल्झायमरसारख्या आजाराच्या विळख्यात सापडून हिंसक बनलेल्या आजोबांच्या पाठीशी उभा राहिलेला नातू, काळोख्या रात्री एका तरुण मुलीचे गुंडांकडून झालेले संरक्षण, माकडिया जमातीतील एक मुलगी जीवघेण्या संकटातून सुटका कशी करून घेते, आगीतून वाचलेली आई अशा अनेक व्यक्तिरेखा आणि प्रसंग या वीस कथांमधून वाचायला मिळतात. प्रखर वास्तवात आशेचे किरण निर्माण करणाऱ्या या कथा सकारात्मक संदेश देतात.
- SAKAL 16.10.16
जगण्यावरचा आपला विश्वास दृढ होणारी एखादी तरी कहाणी प्रत्येकाकडे असते. अशाच कही सकात्मक, हृदयस्पर्शी, प्रेरणादायी सत्यकथांचा हा संग्रह. पेंग्विन प्रकाशनानं घेतलेल्या कथा स्पर्धेसाठी आलेल्या कथांचं परिक्षण करून जेष्ठ लेखिका सुधा मूतीa यांनी या कथा निवडल्या आणि यांचं संपादन केलं आहे. माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या वाचकाला समृद्ध करतील.