- Jagannath Garje
आज डाॅ.आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा शेवटचा खंड काचवेल हे पुस्तक वाचून पुर्ण झाले.सुरूवातीला जेव्हा झोंबो वाचली तेव्हा पुढे काय झालं असेल याची खूप उत्सूकता लगली होती.मग मी झपाटल्यासारखा पुढचे भाग नांगरणी,घरभिंती,आणी काचवेल वाचत गेलो.प्रत्येक पुस्तक वाचताना पुढे काय झाल असेल याची ओढ लागत होती.एखादा राग आळवावा तसा लेखक झोंबीपासून काचवेलपर्यंत आपल्या आयुष्याचे प्रसंग आळवीत होते.ह्या कलापूर्ण आळवण्यामूळे हा केवळ त्यांच्या आयुष्यातील नानाप्रकारच्या कडूगोड घटनांचा अहवाल न होता ही एक सुंदर कलाकृती झाली.ललित साहीत्यात घटना केवळ सत्य असून चालत नाही तर सत्य हे कल्पनेहून अदभूत असते हे जरी खरे असले तरी त्यातला अदभूतपणा कीवा त्या घटनेतील नाट्य जाणवायला त्या घटनेच्या कथानाला मिडासाच्या स्पर्शासारखा कलेचा स्पर्श घडवावा लागतो..तो इथे झाला आहे.हे आत्मचरित्र वाचताना सतत कधी स्वस्थ करणारे,कधी अस्वस्थ करणारे,कधी सुखावणारे,कधी खूप दुखवून जाणारे,नानाप्रकारच्या भाववृत्तीचा कल्लोळ उत्पन्न करणारे असे हे आत्मचरित्र म्हणजे एक शब्दशिल्प आहे.....
हे चारही भाग जेव्हा मी वाचले तेव्हा खरच मला असे वाटू लागले साने गूरूजींची श्यामची आई वाचताना जी आपल्या मनाची अवस्था होते तसी अवस्था वारंवार होत होती..लेखकाच्या हळव्या मनाची,संवेदनशिल मनाची,समाजाच्याप्रती कृतज्ञता असणा-या मनाची प्रचिती येते.
शेवटचा भाग वाचताना सतत जाणवत होते आज लेखक पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुख झाले होते,साहीत्यक्षेत्रात कथा कांदबरी कवितांचा लेखक म्हणून त्यांचे कर्तूत्व गौरवाला पात्र ठललेले आहे..हे सगळे असून सुद्धा ते ज्या मातीत वाढले ज्या समाजात लहानाचे मोठे झाले ,ज्या गावात आयुष्याची झोंबी सुरू झाली त्या सर्वांशी त्यांची नाळ अजूनीही घट्ट होती..ती आंतरिक ओढ अजून कायम होती..
हे पुस्तक वाचताना लेखक ही आता आयुष्याच्या शेवटाकडे झूकलेले आहेत आणि आत्मचरित्राचाही शेवट होत असताना लेखकाच्या मनाची अवस्था खूप हळवी झालेली दिसून येत असतानाच आपल्याही मनाची अवस्था तशीच शुन्यात गेल्यासारखी होते....
आनंद यादव यांचे हे पुस्तक वाचल्याशिवाय त्यांचे आत्मचरित्र वाचल्याचे समाधान होत नाही तेव्हा आपणही नक्की वाचा....
- Saroj Bhattu
मी ही चारही पुस्तकं वाचली आहेत, दीर्घकाळ स्मरणात राहणारी अशी पुस्तके
- Manisha Dhande
"काचवेल" हे पुस्तक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा शेवटचा चौथा भाग आहे.
पहिल्या तीन भागात (झोंबी, नांगरणी,घरभिंती) यात लेखकाचा अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून, कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना प्राध्यापक पदापर्यंतचा प्रवास मांडलेला आहे.
तर पोटापाण्याचा प्रश्न सुटून, आर्थिक स्थैर्य लाभलेल्या, गावाकडच्या आपल्या घरातील माणसांच्या प्रापंचिक जबाबदारीतून मुक्त झालेल्या लेखकाची प्रतिथयश साहित्यिक म्हणून झालेली यशस्वी वाटचाल या पुस्तकात आहे...
स्वत: ग्रामीण भागातून आल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना आदर्श साहित्यनिर्मितीची जाणीव व्हावी म्हणून आनंद यादव यांनी ग्रामीण साहित्यिकांचे मेळावे यशस्वीपणे भरविले.असंख्य अडचणींवर मात करून "ग्रामीण साहित्य चळवळ" भारतीय समाजाचा गाभा असलेल्या खेडोपाड्यात यशस्वीरित्या राबविली.
पुण्यामुंबई सारख्या ठिकाणी ग्रामीण भागातील तरुणांना पैशाअभावी येणं जमत नसल्याने आनंद यादव यांनी स्वत: महाराष्ट्रभर फिरून छोट्या छोट्या गावात ग्रामीण साहित्य संमेलने आयोजित केली.व ग्रामीण साहित्य चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.
आता आपण शैक्षणिक बाजारीकरण या विषयावर बरेच वाचतो, ऐकतो पण आनंद यादव यांनी १९७० ते १९८० च्या दशकात शिक्षणविषयक होणाऱ्या बाजारीकरणा बाबतीत परखड मत या पुस्तकात मांडलेले आहे.
एका प्रगल्भ साहित्यिकाचा आपल्या साहित्याविषयी असणाऱ्या प्रगल्भ विचारांचा, जाणिवांचा प्रत्यय म्हणजे "काचवेल".....
- DAINIK PUDHARI
‘झोंबी, नांगरणी, घरभिंती’ नंतर काचवेल...
‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ या तिन्ही पुस्तकांनंतर सुप्रसिद्ध लेखक आनंद यादव यांचे ‘काचवेल’ हे आत्मचरित्राचे पुस्तक आले आहे.
वेगवेगळ्या पंचवीस लेखांच्या मदतीनं ‘काचवेल’ फुलली आहे. या खंडात मुख्यत: त्यांच्या वाङ्मयीन प्रेरणांचा व लेखनाचा आलेख आहे. त्यांची साहित्यिक जडणघडण, त्यांचं लेखन, वाङ्मयीन चर्चांमधून घडत गेलेलं, पक्कं होत गेलेलं साहित्यजीवन, एक खोल अभ्यासक व उत्तम आस्वादक होण्यासाठी त्यांची स्वत:ची मननचिंतनाची ‘प्रोसेस’ त्यांना जीवनप्रवासात भेटलेले-विशेषत: वाङ्मयीन रूचीतून जवळ आलेले त्यांचे मित्र, गुरू, संपादक, त्यांचा विचारांवरचा, लेखनावरचा प्रभाव याचं नेमक्या शब्दात केलेलं चित्रण ‘काचवेल’मध्ये आहे. ग्रामीण साहित्याच्या चळवळीबद्दलची त्यांची तळमळही काही लेखांतून व्यक्त होते व त्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट करते.
श्री. आनंद यादव यांचं कुटुंब, त्यांची आई, त्यांच्या मनात सदैव जागं असलेलं त्यांचं कागल गाव वगैरे उल्लेख प्रसंगात येतात. ‘आईचे शेवटचे दिवस’, ‘मायगावाचा दिवस’, ‘संसार संसार’, ‘मुलींच्या शिक्षणाची फरपट’मधून कौटुंबिक चित्रण आहे.
ग्रामीण साहित्य चळवळीच्या निमित्तानं त्यांनी सगळा ग्रामीण महाराष्ट्र तुडवला आहे. निराशेनं ग्रासलेली तरुण पिढी जवळून पाहिली आहे. ग्रामीण समाजानं शाश्वत स्वरूपाच्या विकासाच्या मार्गानं जाण्यासाठी काय काय सुधारणा त्याला स्वत:ला करायला पाहिजेत त्याबद्दल श्री. आनंद यादव यांची अभ्यासपूर्ण मतं आहेत. तशा परिस्थितीतून ते स्वत: पार पडले आहेत. या वाटचालीचा आलेख आत्मचरित्राच्या रूपानं विस्तृत स्वरूपात नव्या तरुण पिढीसमोर मांडावा या उद्देशानं त्यांनी हे लेखन केलं आहे. श्री. यादव म्हणतात की, ‘आत्मचरित्र हे जीवनभाष्य असतं.’ पण त्यांनी जीवनभाष्य करण्याचं स्वरूप लेखनाला न देता ललित साहित्याच्या अंगानं ‘जीवनदर्शन’ घडवलं आहे.
‘मनात येणाऱ्या भावभावना, विचार आणि एकूणच अस्वस्थ करणारे जीवनातील अनुभव संपूर्ण विश्वासानं आणि निर्वेधपणानं ज्याच्याजवळ सांगावेत असं आयुष्यात एकमेव ठिकाण म्हणजे साहित्य असं मला वाटलं. हे ठिकाण मला मिळालं नसतं तर संवेदनशील आणि जगाची अकारण चिंता वाहणाऱ्या भावनाशील मनाचं आरोग्य बिघडलं असतं.’ अशा शब्दांत त्यांनी साहित्याशी ‘जवळीक’ त्याच्याशी असलेलं नातं व्यक्त केलं आहे. तर अंतर्बाह्य निरोगी राहण्याची देणगी आपल्याला साहित्यानं दिली असं साहित्याचं ऋण ते मानतात.
ग्रामीण भागात सोप्याच्या भुईवर ‘काचवेल’ काढण्याची लोकप्रथा आहे. काचेच्या बांगड्यांच्या (काकणांच्या) तुकड्यांनी ही वेल काढली जाते. वंशवेलीचं प्रतीक असणारी ही दैवी लोककला त्यांनी आईच्या हातून रेखलेली पाहिली. वेळावेळी, जागोजागी त्यांना भेटलेल्या कसबी कारागीरांनी त्यांना ते प्रेमानं देऊ केलं. त्यांचे स्वभावगुण, स्वभावरंग बनलेल्या या तुकड्यांनी सजलीय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी काचवेल!
- NEWSPAPER REVIEW
‘जीवघेण्या’ साहित्य प्रकाराची मीमांसा…
झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चार भागांत ज्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे, त्या डॉ. आनंद यादव यांनी आत्मचरित्राची वाङ्मयीन व तात्त्विक चर्चा करण्यासाठी ‘प्रस्तुत ग्रंथाचा प्रपंच’ केला आहे. कथा-कादंबरीपेक्षा हा साहित्यप्रकार वेगळा कसा, तो वेगळा साहित्यप्रकार म्हणून मानला गेला आहे का, स्वातंत्र्योत्तर काळात आत्मचरित्रे कथा-कादंबऱ्यांपेक्षा जास्त प्रमाणात का आली, तरीही त्यांची एकूण संख्या कमी का, अशा तऱ्हेचे विवेचन कुठेही डॉ. यादव यांना मराठीत आढळले नाही. ही उपेक्षा दूर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.
आत्मशोध ही कल्पना भारतीय तत्त्वज्ञानात पूर्वीपासूनच असली, तरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासूनच मराठीत आत्मचरित्रे येऊ लागली आहे. त्यामध्ये ‘स्व’चा भौतिक शोध असला, तरी पाश्चात्त्य आत्मचरित्रांपेक्षा ती भारतीय दृष्टिकोनामुळे वेगळी झालेली आहेत. आत्मचरित्र लेखनामागे विविध प्रेरणा असू शकतात. दादोबा पांडुरंग किंवा बाबा पद्मनजी यांच्या आत्मचरित्रांमध्ये वैयक्तिक जीवन गौण स्थानी; तर सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे इतिवृत्त सांगण्यावर भर होता. सार्वजनिक जीवनात प्रसिद्ध अशा व्यक्ती, आपल्याबद्दल गैरसमज होऊ नयेत म्हणून आत्मवृत्त लिहितात. व्यक्तिगत इतिहास लिहिणे ही काही आत्मचरित्रांची प्रेरणा असते. तर काही भूतकाळात रमण्याच्या उद्देशाने लिहिली जातात. लिखाणाच्या प्ररेणेप्रमाणे त्या त्या आत्मचरित्राला विशेष आकार प्राप्त झालेला असतो.
आत्मचरित्र हा चरित्राचाच उपप्रकार आहे हे आन्द्रे मौरॉज यांचे मत डॉ. यादव यांना मान्य नाही. ‘नायका’च्या व्यक्तिमत्त्वावरून आत्मचरित्रांचे अंतर्मुख व बहिर्मुख असे प्रकार करता येतील. त्यातील पहिला प्रकार वैयक्तिक, प्रापंचिक, आत्मकेंद्रित असा असून सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची आत्मचरित्रे बहिर्मुख स्वरूपाची असतात. लेखनाच्या मांडणीला प्राधान्य देऊन आत्मचरित्रांचे तत्त्वज्ञानात्मक, इतिहासात्मक आणि साहित्यरूपी असे वर्गीकरण करता येईल. बहुसंख्य आत्मचरित्रे इतिहासात्मक वर्गीकरण करता येईल. बहुसंख्य आत्मचरित्रे इतिहासात्मक असतात. कादंबरीच्या स्वरूपात लिहिलेली ‘पोएटिक’ आत्मचरित्रे (श्यामची आई, तुंबाडचे खोत) ही डॉ. यादवांच्या मते कादंबऱ्याच असतात; कारण त्यात काल्पनिक घटना व पात्रे निर्मिलेली असतात. ‘साहित्यरूपात्मक आत्मचरित्र मला आत्मचरित्रच वाटत नाही,’ असे म्हणतात.
निदान ६० वर्षांचे होईपर्यंत आत्मचरित्र लिहू नये, असे सांगून डॉ. यादव म्हणतात की, १९७० नंतर नवजागृत समाजातल्या तरुण पिढीने लिहिलेली आत्मचरित्रे रोचक असली, तरी अर्धकच्ची झाली आहेत.
स्वत:पासून अलिप्त होऊन स्वत:बद्दलचा विचार करण्याची एक विघटनाची प्रक्रिया आत्मचरित्रात असते. घटनाची निवड, रचना, त्यातून आकृतीबंध व नीटसपणा यासाठी प्रतिभेची आवश्यकता असते. त्यात स्मरणशक्ती, संवेदनशक्ती, कल्पकता, उत्कटता इत्यादींचाही सहभाग असतो. आत्मचरित्रातील संभाव्य दोषांबद्दल विवेचन करतानाच ते कसे टाळता येतील, अशीही चर्चा डॉ. यादव यांनी केली आहे. विस्मरण, निवडक स्मरण, वस्तुस्थिती विपर्यास, लज्जास्पद गोष्टी टाळणे असे अनेक धोके या लिखाणात संभवतात. त्यावर कालिक परिणामही होतो. मराठीत आत्मचरित्रांची लाट आल्यावर जी आत्मचरित्रे लिहिली गेली, त्यात उत्साह जास्त, अभ्यास कमी होता. तत्कालीन प्रश्नांना प्राधान्य दिल्याने ती खूप प्रसिद्धी पावली; पण नंतर कालबाह्य ठरली.
‘जो ललित लेखक असतो तो आपल्या कथा, कादंबरी किंवा नाटकात एक प्रकारे आत्मचरित्रच लिहीत असतो... त्यामुळे एखाद्या साहित्यिकाचे समग्र साहित्य हे त्याचे एका अर्थाने परिपूर्ण आत्मचरित्रच असते,’ असे मत जयवंत दळवी यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’च्या प्रस्तावनेत लिहिले आहे. परंतु डॉ. यादव यांच्या मते प्रत्यक्ष घटना व त्यावर आधारित साहित्यकृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे साहित्यिक आत्मचरित्र लिहू शकतो व त्यात त्या त्या घटनांचा साहित्याचा कसा वापर केला हेही सांगू शकतो; परंतु अनेक साहित्यिकांची आत्मचरित्रे फसली आहेत. कारण त्यात जीवनाचा सर्वांगीण अभ्यास दिसत नाही.
‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ हा डॉ. यादवांना वदतोव्याघात वाटतो. कारण आत्मचरित्र हे घटित; तर कादंबरी काल्पनिक असते. आत्मचरित्र लिहिण्यासाठी लेखनकौशल्य हवेच. घटनांची काटेकोरपणे निवड न केल्यास ‘कऱ्हेचे पाणी’तल्याप्रमाणे अस्ताव्यस्तपणा येतो. निवडीत अतितटस्थता आली तर ते महर्षी कर्वे यांच्या ‘आत्मवृत्ता’प्रमाणे कोरडे होते. एकाच हेतूने लिहिलेली आत्मचरित्रे संकुचित होतात. उदाहरणार्थ, आनंदीबाई विजापुरे, कांचन घाणेकर, कमल पाध्ये यांची आत्मचरित्रे.
आत्मचरित्रे ही झाडाझडती नसून त्यात घटनांची निवड केलेली असते. निवडीचा दृष्टिकोन लेखकाचा असतो आणि तो मान्य करूनच आत्मचरित्र वाचायचे असते, असे डॉ. यादव सांगतात. ‘आत्मचरित्र हा एका व्यक्तीने स्वत:च, स्वजीवनाचा नेटकेपणाने काढलेला चैतन्यपूर्ण व कलात्मक आलेख असतो’ या वस्तुस्थितीद्वारे आत्मचरित्र समीक्षेची सूत्रे निश्चित करता येतील असे मत मांडून अखेर आत्मचरित्र हा एक जीवघेणा साहित्यप्रकार आहे, असा समारोप डॉ. यादवांनी केला आहे. प्रत्यक्ष जीवन जगलेला ‘मी’ आणि आत्मचरित्र लिहिणारा ‘मी’ यांच्यातील सखोल ताणाचा अपरिहार्य परिणाम अभिव्यक्तीवरही होणारच!
आत्मचरित्रांसंबंधी स्वतंत्र असे हे पहिलेच पुस्तक असले तरी ‘चरित्र आणि आत्मचरित्र’ या श्री. सदा कऱ्हाडे यांच्या ग्रंथात आत्मचरित्रावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे; परंतु त्यातल्या पहिल्याच वाक्याशी डॉ. यादव सहमत नाहीत. ते वाक्य असे, ‘आत्मचरित्र हा चरित्राचाच एक प्रकार आहे.’ आत्मचरित्रातील सत्यासत्यता हा फारच गुंतागुंतीचा प्रश्न वाटतो. स्वाभाविक विस्मरण, औचित्यासाठी केलेला सत्यापलाप, आठवणींची कल्पनाशक्तीने केलेली भरपाई, इत्यादींमुळे आत्मचरित्रातील सत्य धूसर बनत जाते. चरित्रातील सत्याप्रमाणे ते पडताळून पाहता येत नाही, हे खरेच आहे; परंतु आत्मचरित्राच्या वाचकांनी लेखकावर पूर्ण विश्वास टाकावा, की इतर मार्गांनी त्याच्या लेखनातील खरेखोटेपण शोधून काढावे, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळेच ‘प्रांजळपणा’ हे मूल्य कसे सिद्ध करता येईल, ते कळत नाही.
‘एका पानाची कहाणी’च्या प्रस्तावनेत आत्मकथा हा लेखनाचा सर्वांत अवघड प्रकार आहे, असे मान्य करून वि. स. खांडेकर म्हणतात की, ‘पूर्ण सत्य सांगता आलं नाही, तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा, असं मला वाटू लागलं,’ आणि म्हणून त्यांनी आत्मकथा लिहिली. तर आत्मचरित्र हा एक लपवाछपवीचा खेळ आहे, असे जयवंत दळवींचे मत असल्याने ते आत्मचरित्राऐवजी लेख लिहितात!
घटनांच्या निवडीइतकेच त्यांचे शब्दांकनही कठीण असते. कारण लेखनसरावाचा आत्मचरित्राला उपयोग होऊ शकत नाही. हे म्हणजे, ‘पहिल्याच बॉलवर षटकार मारण्याची जोखीम’ आहे, अशा योग्य शब्दात डॉ. यादव त्याचे वर्णन करतात. ज्या आत्मचरित्रांमध्ये स्वत:च्या कर्तृत्वाबद्दल अतिशयोक्ती दिसते ती ‘आत्मपूजेची खाजगी देवळे वाटतात’ हे विवेचनही अतिशय नेटके वाटते. तर ‘मनातली मळमळ व्यक्त करण्यासाठी आत्मचरित्रे लिहिणे म्हणजे ढेकूण, डास मारण्यासाठी तोफा डागण्याचा प्रकार असतो’ या विधानात त्यांना आत्मसमर्थनाची वाटणारी चीड व्यक्त होते.
‘विशेषत: स्त्रियांची आत्मचरित्रे संकुचित भावनेने प्रेरित होऊन पूर्व घटनांच्या केवळ स्मरणावर लिहिली जात असावीत.’ हे डॉ. यादव यांचे मत सहजी मान्य होईलसे वाटत नाही. नवजागृत समाजातल्या तरुण पिढीची आत्मचरित्रे आयुष्यात फार लवकर लिहिलेली म्हणून अर्धीकच्ची राहतात, असे डॉ. यादव म्हणतात; तर चंद्रकुमार नलगे व डॉ. गंगाधर पानतावणे यांना असे वाटते की, त्या आविष्काराला आत्मचरित्र न म्हणता आत्मकथन म्हणावे. आत्मचरित्र आयुष्याच्या मावळतीला लिहिली जातात. प्रौढत्वामुळे ती स्थिर व संयमी असू शकतील; परंतु आत्मकथने आयुष्याच्या ऐन उमेदीत लिहिलेली असतात. त्यात तारुण्याच्या तीव्र प्रतिक्रिया असतात. त्यात प्रवाह असतो. आत्मकथने बहुतांशी नाकारलेल्या समाजघटकांनी लिहिलेली आहेत. त्यामुळे त्यांचा सामाजिक संदर्भ महत्त्वाचा असतो. त्यात आत्मपरीक्षण आढळते, इतिहासलेखन नव्हे.
सैद्धान्तिकदृष्ट्या प्रत्येकच जण आत्मचरित्राचा विषय आहे; परंतु प्रत्यक्ष आत्मचरित्र लेखन हा साहित्यप्रकार किती कसोट्यांमधून उतरावा लागतो हे ‘आत्मचरित्रमीमांसा’ वाचल्यावर लक्षात ये, म्हणूनच तो ‘जीवघेणा’ आहे, या डॉ. आनंद यादव यांच्या मताशी आपण सहमत होतो!
-उषा तांबे
- NEWSPAPER REVIEW
झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चार साहित्यकृतींतून विख्यात साहित्यिक डॉ. आनंद यादव यांच्या साठ वर्षांच्या जीवनाचा पट उलगडलेला आहे.
पहिल्या तीन खंडांत यादवांच्या जन्मापासून १९७५ पर्यंतच्या कालखंडाचे चित्रण येते. या चौथ्या खंडाने १९७५ ते १९९५ हा सुमारे वीस वर्षांचा कालखंड व्यापलेला आहे. शिवाय यादवांच्या तीसबत्तीस वर्षाच्या साहित्यिक जीवनाचा आलेखही या भागात काढलेला आढळतो.
आनंद यादवांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतला, तर त्यांच्या साहित्यावर चांगला प्रकाश पडू शकतो. काही लेखकांचे लौकिक व्यक्तिमत्त्व आणि साहित्यिक व्यक्तिमत्त्व यात एकरूपता नसते. उलट, काही लेखकांच्या लौकिक आणि साहित्यिक व्यक्तिमत्त्वांत एकरूपता असते. त्यांच्या साहित्याकडून त्यांच्या व्यक्तित्त्वाकडे किंवा उलट असा कसाही प्रवास केला, तरी अपेक्षाभंग होत नाही. आनंद यादव यांचा अंतर्भाव या दुसऱ्या प्रकारात करता येतो.
स्वत:चाच चष्मा
यादवांच्या जवळ उपजत प्रतिभा आहे. या प्रतिभेच्या प्रकाशात आपल्याला साठ वर्षांच्या प्रदीर्घ जीवनात आलेल्या अनुभवांचा अर्थ ते लावीत आलेले आहेत. समान अनुभवाचा इतरांनी लावलेला अर्थ परिचित असूनही त्याचा प्रभाव असा यादवांवर पडत नाही. जीवनात काय की साहित्यात काय, लोक स्वत:चे डोळे शाबूत असतानाही उगाचच इतरांचे चष्मे वापरित असतात. यादवांच्या डोळ्यांसमोर चष्मा नाही. असलाच तर तो त्यांचा स्वत:चा आहे. सगळ्याचा भावार्थ असा की यादव कोणत्याही इझम’ खाली वावरत नाहीत. परिणामी त्यांची दृष्टी घाऊक (होलसेल) नसून किरकोळ (रीटेल) अशी राहिलेली आहे. घाऊक नजरेतून सूक्ष्म उदाहरणे निसटतात. यादवांच्या नजरेतून सूक्ष्म गोष्टी निसटत नाहीत.
असे हे मूलगामी आणि ताजे व्यक्तिमत्त्व घेऊन यादव जीवनाला सामोरे जातात. आलेले अनुभव शब्दांत बांधतात. प्रचलित फॅशनमध्ये बसविण्यासाठी त्या अनगड अनुभवांची मोडतोड करीत नाहीत. त्यामुळे त्यांचे लेखन झऱ्याच्या निवळशंख पाण्यासारखे भावते यालाच मर्ढेकरांनी ‘आत्मनिष्ठा’ असे नाव दिलेले आहे.
दुपेडी जीवनाचे चित्रण
‘काचवेल’ वाचताना हाच अनुभव येतो आणि मन प्रसन्न होऊन जाते. काही माणसे आपल्या चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंबात इतकी गुरफटून जातात की आजूबाजूला काय घडत आहे इकडे लक्ष द्यायला त्यांना फुरसतही नसते. आणि उमेदही नसते. उलट, काही माणसे आपल्या सामाजिक जीवनात इतकी गुंतून पडतात की प्रपंचाकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष्य होते. प्रापंचिक आणि सामाजिक जीवनात तोल साधणे म्हणजे तारेवरचा नाच असतो. आपल्या उपजत समतोल वृत्तीची काठी करून यादव ही तारेवरची कसरत कशी करतात, हे वाचकाला या ‘काचवेल’ मध्ये बघायला मिळते. या खंडातील एकूण पंचवीस प्रकरणांतून यादवांनी आपल्या प्रापंचिक आणि साहित्यिक जीवनाचे चित्र काढलेले आहे. या दुपेडी जीवनात कितीतरी भल्याबुऱ्या व्यक्ती त्यांच्या अनुभवाला आल्या. भल्या माणसांची भलामण करताना यादव स्वत:कडे नम्रतेची भूमिका घेतात. पु. ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, श्री. पु. भागवत, गो. म. कुलकर्णी, प्रभाकर पाध्ये, कमल पाध्ये, यशवंतराव चव्हाण, पतंगराव कदम, ग. ह. पाटील, अरविंद वामन कुलकर्णी, नागनाथ कोत्तापल्ले, चंद्रकांत बांदिवडेकर, विक्रमसिंह घाटगे, गं. बा. सरदार ही त्यातील काही उदाहरणे. काही व्यक्तींशी यादवांचे मतभेद झाले. काहींनी मुद्दाम गैरसमज करून घेतले, काही जणांशी संघर्ष करावा लागला. अशा सगळ्या लोकांबद्दल लिहिताना यादवांच्या थोर मनाचा प्रत्यय येतो.
ना. सी. फडके यांच्याशी मराठी लघुनिबंधाच्या जनकत्वावरून यादवांचा वाद झाला. जवळ सबळ पुरावे असूनही केवळ फडक्यांच्या वार्धक्याकडे पाहून यादवांनी ग. वा. बेहेरे यांचा सल्ला मानला आणि ते पुढे आणले नाहीत. प्रपाठक पदाच्या स्पर्धेत यादवांचे पाऊल पुढे पडले आणि भालचंद्र फडके यांचे थोडे मागे पडले. साहजिकच भालचंद्र फडके बरेच नाराज झाले. फडक्यांच्या नाराजीला आपण निमित्तमात्र ठरलो ही जाणीव यादवांचे मन सतत कशी कुरतडत राहिली, हे ते सबंध प्रकरण वाचल्याखेरीज समजणार नाही. भाऊसाहेब नगरचे मुख्याध्यापक करंडे यांनी जो अनुभव यादवांना दिला तो पाहता एखाद्या किरकोळ साहित्यिकही चालू भाषेत बोलायचे तर ‘पेटून उठला’ असता. यादव फक्त या अनुभवातून धडा घेतात. पेटणे, भडकणे वगैरे काही नाही.
आपली आई, भावंडे, पत्नी, मुले, सगेसायरे, सखेसोबती, शिक्षक, सहकारी, परिचित; तसेच घर, शेत, शाळा, गाव, भाषा, साहित्य इत्यादी सगळ्याबद्दल यादवांच्या पोटात एक सहज जिव्हाळा आहे. यादवांना केवळ मनुष्यमात्राविषयीच प्रेम आहे, असे नाही. तसे असले तर त्यांना नवमानवतावादी वगैरे साहित्यिक असे म्हणता आले असते; परंतु यादवांना माणसांइतकेच प्राण्यांबद्दलही प्रेम वाटते. त्यामुळे त्यांना भूतदयावादी साहित्यिक म्हणावे लागते. खेड्यांतील विद्यार्थ्यांची शिकताना होणारी परवड आणि तरुण लेखकांचा होणारा कोंडमारा याचा अनुभव असल्यामुळे या संदर्भात आपण स्वत: कर्तव्य म्हणून काही केले पाहिजे, या एकाच भावनेनं यादवांनी ग्रामीण साहित्य चळवळ चालविली. तिचा शिडी म्हणून वापर केला नाही. चळवळ चालविताना त्यांना अनेक बरेवाईट अनुभव आले. याविषयी यादवांनी केलेले विवेचन खेड्यातील प्रत्येक होतकरू आणि सुस्थापित लेखकाने वाचण्याजोगे आहे. यादव चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले कधीही म्हणत नाहीत. हा विवेक दुर्लभ असतो.
यादवांना १९९२ मध्ये युरोपचा प्रवास घडला. या प्रवासाची डायरी त्यांनी ठेवलेली होती, असे दिसते. एका स्वतंत्र प्रकरणात युरोपीय काचांचा एक तागोरा या काचवेलीत समाविष्ट आहे. इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि हॉलंड या देशांतून यादवांनी मोटारने संचार केला. तेथील प्राचीन आणि अर्वाचीन वास्तू, चित्रे, शिल्पे, विद्यापीठे, राजवाडे त्यांनी पाहिले. नद्या पाहिल्या. पर्वत पाहिले. पशुपक्षीही निरखले. परदेशातील मराठी माणसांशी केवळ गप्पा मारल्या नाहीत; तर नियोजनबद्ध चर्चा केल्या. परदेशी प्रवास करताना भारतीय माणूस तेथील प्रगती पाहून भारून जातो; आपल्या देशाबद्दल एक प्रकारचा न्यूनगंड त्याच्या मनात घर करतो. त्यातून परदेशातील चंद्रही इकडल्यापेक्षा मोठा असतो, अशा प्रकारचे बोलत राहतो. अन्यथा प्रतिक्रिया म्हणून त्याचा नसलेला देशाभिमान उफाळून येतो; आणि पाश्चात्य भौतिक संस्कृतीच कशी श्रेष्ठ ठरते हे तो सांगू लागतो. यादवांनी ही टोके टाळलेली आहेत.
ज्याचे त्याला देणे
अशा प्रवासात देशपरदेशांची तुलना प्रवाशाच्या मनात आपोआप होतच असते. ती करताना यादवांनी देवाचे देवाला आणि सीझरचे सीझरला दिलेले आहे. यादवांना परदेशांतील सामान्य शेतकऱ्यांशी वेळेच्या अभावी फारसा संवाद साधता आला नसावा; अन्यथा त्याच्याजवळ जाऊन बसून यादवांनी जिवाभावाच्या गोष्टी केल्या असत्या आणि त्या आपल्याला वाचायला मिळाल्या असत्या.
सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या आत्मचरित्रात्मक लेखनात यादवांनी आपल जीवनातील व्यामिश्र अनुभवांना आकृती दिलेली असली, तरी आपापत:च बहुजन समाजाच्या सांस्कृतिक उत्थानाचा तो एक अस्सल दस्तऐवज बनलेला आहे. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या चतुर्खंडी दस्तऐवजाचा पहिल्या दर्जाचा पुरावा म्हणून उपयोग होऊ शकेल. महाराष्ट्रातील नागरी आणि ग्रामीण भागात राहाणाऱ्या प्रत्येक जिज्ञासू स्त्रीपुरुषाने आवर्जून वाचून जो संग्रही ठेवावा. अशा दर्जाचा तो उतरलेला आहे. कारण यादवांनी तो साक्षीभावाने काही एक मूल्यविवेक बाळगून लिहिलेला आहे.