- Surekha Abhang
परिस्थितीवर मात करून बरेच लोक आपले शिक्षण पूर्ण करतात. मात्र त्यांना कुटुंबाची साथ असते मात्र या कादंबरीत थोडं वेगळं चित्र मला अनुभवायला मिळालं गरिबीमुळे स्वतःच्या मुलाच्या शिक्षणाला जन्मदात्या बापाचा विरोध असुनही लेखकाने पोटाला अन्न कमी पण पाठीवर भरपूर मार घेऊन सहा सहा मैल पायी चालून आपली शिकण्याची जिद्द पुर्ण केली . *मी एक प्राथमिक शिक्षिका असल्याने सांगायला अभिमान वाटतो की लेखक लिहीतात जिल्हा परिषदेची शाळा मला माझी वाटत होती तेथील शिक्षक मला समजुन घेत होते. परंतु याचा उलट अनुभव मला माध्यमिक शाळेत आला** .बरे असो .💐💐मात्र ही कादंबरी सर्व वयोगटातील वाचकांसाठी प्रेरणा दायी आहे पण त्याहीपेक्षा आज शिक्षण घेत असलेल्या तरूण वर्गाने या कादंबरीचे वाचन जरूर करावे हे यासाठी की आज आई वडील सहज आपल्याला समजावत असतील तर हे तरूण तरूणी लगेच नाराज होतात एवढेच काय पण नको ते प्रकार आपल्याला आजुबाजुला पाहायला व ऐकायला मिळतात तेव्हा नवसंजीवनी मिळण्यासाठी ही कादंबरी जरूर एकदा तरी वाचणात यायला हवी.💐💐
दहा भावंडात असणारा आंदा काम करून , उपाशी राहून मित्रांची जुनी पुस्तक वापरून आणि दररोज उशीर झाला म्हणून अनवाणी पायाने फडक्यात भाकरी गुंडाळून शालेय शिक्षण घेतो,एवढंच काय पण कामाच खाडं व्हायला नको म्हणून घरीच अभ्यास करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावतो हे वाचताना मन गहिवरल्याशिवाय राहत नाही .💐💐याचाच अर्थ असा की जिद्द, चिकाटी असेल तर ध्येयाचा मार्ग कोणीही अडवू शकत नाही. 💐💐 अजुन लिहीण्यासारख खूप आहे तुर्तास एवढेच पुरे बाकी आपण वाचणातुन अनुभवालच🌹 *हा पुस्तकातील आंदा त्या पुस्तकातच मर्यादित नाही आजही आपल्या आजूबाजूला असे आंदा आपल्याला भेटतात गरज आहे फक्त त्यांना जाणुन घेण्याची आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची
- Dr.Bhushan Phadke
शालेय अभ्यासक्रमात कदाचित नववीत किंवा दहावीत आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील काही भाग धडा म्हणून अभ्यासाला होता, तेव्हाच ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचण्याची ओढ निर्माण झाली. वयाच्या एकविशित पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा अनेकदा रडलो, वयाच्या चाळिशीत पुन्हा जेव्हा ही कादंबरी वाचली तेव्हाही डोळ्याच्या कडा पाणावल्या पण अनेक प्रसंगात विषण्णता आणि असहाय्यता,अनुभवली आहे.
आनंदा यादवांच्या "झोंबी" या आत्मचरित्रात्मक कादंबरीपासून मराठी साहित्याचा एका वेगळ्या दिशेने प्रवास सुरू झाला हेच म्हणणे संयुक्तिक ठरेल.
या आत्मचरित्राला महाराष्ट्रभूषण, महाराष्ट्र दैवत "पु ल देशपांडे" यांची प्रस्तावना लाभली आहे.
झोंबी या आत्मचरित्राचे, नांगरणी आणि घरभिंती हे पुढचे भागही प्रकाशित झाले आहेत. झोंबी च्या अर्पणपत्रिकेत लेखक आनंद यादव पु ल देशपांडे यांचा उल्लेख तीर्थरूप म्हणून का करतात हे वाचकांना झोंबी चा पुढचा भाग नांगरणी वाचल्याशिवाय कळणार नाही. पुलंनी `बाल्य हरवलेले बालकाण्ड` असे झोंबी चे वर्णन केले आहे. आत्मचरित्र असूनही कुठेही आत्मप्रौढी जाणवत नाही. लेखकाने शिक्षणासाठी दारिद्र्याशी केलेली लढाई म्हणजेच "झोंबी".
अनेकांनी गरिबी पाहिली असेल, पण दारिद्र्याचे चटके सोसत जीव जगत ठेवणाऱ्या एका पोराच्या हाती पाटी-पेन्सिल आल्यापासून ते मॅट्रिकची परीक्षा पास होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या झोंबीची ही कहाणी कहाणी वाचकाला अंतर्मुख करते.
आनंद यादव यांचे वडील रतनू, आणि आई तारा यांच्या विवाहाच्या वर्णनापासून कादंबरीची सुरुवात होते. रतन आठ-दहा वर्षाचा तर तारा एक वर्षाची. विवाह चे वर्णन करताना लेखक लिहितात, "एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेल काळभोर मण्यांचे मंगळसूत्र, डोरलं मोठे चमत्कारिक दिसत होत, चिमुरड्या पोरीचा कुंकू मळवट भरला होता. मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रतनची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघाली, एक वर्षाची पत्नी इकडे पाळण्यात गाढ झोपी गेली.तिला यातलं काहीही माहीत नव्हतं. तिकडे तिची नियती परस्पर ठरवली जात होती. सासू-सासरे, विहीणबाई आपली हौस भागवून घेत होते" काय हे वर्णन.
लेखकाची आई तारा सात-आठ वर्षाची झाल्यानंतर सासरी नांदावयास (राहायला) आली तेव्हा तिच्यावर होणारे अत्याचार वाचतांना वाचक दुःखी होतो आणि असहाय्यता अनुभवतो.
तारा ची आई म्हणजेच लेखकाची आजी लवकरच गेली, तिला तेव्हा एक वर्षाचा मुलगा होता त्या वेळेचे वर्णन करताना आनंद यादव लिहितात, "आईच्या मढावरचं (प्रेतावर) तो तिच शेवटचा दुध प्यायला. बायका ताराला म्हणाल्या, पाज पोरी त्याला, हे शेवटच, त्याला पाजलं आणि मढ हलवल."
आनंद यादवांनी शिक्षणासाठी भोगलेल्या व्यथा या कादंबरीत तर आहेच पण त्यासोबतच ग्रामीण जीवन, अशिक्षितपणा, दारिद्र्य, केवळ मार देणे म्हणजे शिकवणे असे मास्तरांचे स्वभाव याचे वर्णन आहे.
या वर्णना सोबत आई वर होणारे होणारे अत्याचार, त्याबद्दल लेखकाची असहायता, शिकणं म्हणजे चैन आणि ती दारिद्र्यात कशी काय परवडणार म्हणून वडिलांनी लाथाबुक्क्यांनी मारणे, पुन्हा आईला होणारे अनेक मुलं आणि त्या मुलांचे अपमृत्यू, गावातल्या जत्रा, उरूस याचे वर्णन या कादंबरीत आहे. आपल्या दारिद्र्याचे हालअपेष्टांचे शिक्षणासाठी घेतलेल्या मेहनतीचे कुठेही भांडवल करण्याचा लेखकाचा हेतू नाही. आपल्याला सहानुभूती मिळावी हा सुद्धा लेखकाचा हेतू कुठेही जाणवत नाही. ग्रामीण जीवन चे काही शब्द शहरी वाचकांना नवीन असले, तरीही वाचक या कादंबरीत रंगून जातो. वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य आनंद यादव यांच्या लेखणीत आहे.
ज्या बाल्यावस्थेत वडिलांचे प्रेम, आईची माया अनुभवायचे असते त्या वयात यादवांनी उपरे पणा अनुभवला आहे. शिक्षणासाठी, पुस्तकांच्या वाचनाच्या गोडीपाई कधीकधी लेखकाने लहान सहान चोरी केल्याचा उल्लेख कुठलाही आडपडदा न ठेवता लेखकाने केला आहे. वडिलांचा शिक्षणाला टोकाचा विरोध म्हणून घर सोडून कोल्हापुरात गेले तेव्हा पोट भरण्यासाठी हरभऱ्याचा पाला आणि कचराकुंडी तील लोकांनी टाकलेल्या केळीच्या साली खाउन, शिकण्याच्या तळमळीमुळे आनंद यादव घडलेत. दहावीचा फॉर्म भरण्यासाठी लेखकाची तगमग त्यासाठी जमवलेले 35 रुपये, त्यासाठी एका मास्तरांनी केलेली मदत, आणि शेवटी दहावीत मिळालेले उज्ज्वल यश....
आत्मचरित्राचा पहिला भाग संपतो. शिक्षणासाठी एवढ्या हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात त्या सोसून जिद्दीने दारिद्र्याशी झोंबून त्यावर मात करत आनंद यादवांना सारखा एक ज्ञानी, ज्ञानयोगी कर्तबगारीने पुढे येतो आणि समाजाला दिशा देण्याचे, आपल्यासारख्या शोषितांचे जीवनमान सुधारण्याचे कार्य करतो.
कादंबरी पूर्ण झाल्यावर वाचक निशब्द होतो.
- Vijay Nimbalkar
बाप अडमुठी, हेकेखोर आणि स्वताच खर करणारा
पोरगा अकरावीच्या बोर्ड परिक्षेला बसला. त्यावर्षी बापाने बारावं पोरगं काढलं. हा सोडला तर सगळी पोरं रोगट. माती खाऊन नाळरोगी झालेली. ती फक्त खायच्याच कामाची. `ह्या पोरांना मी एकटा खायला घालू काय? तुला मळ्यात काम करायलाच लागंन!` पोराची शाळा बंद करण्यासाठी बापाचा युक्तिवाद.
असल्या भयंकर बापाच्या नाकावर टिच्चून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं व प्राध्यापक झाला. तो पोरगा म्हणजेच लेखक आनंद यादव.
- विजय निंबाळकर
लोहगाव, पुणे
- Ragini Bagwe
कालच "झोंबी" वाचून संपवले...
पण मनात रेंगाळत राहिलेय...
वाचत असतानाही बरयाचवेळा वाचन थांबवत होते...
आनंद यादव प्रथमच वाचले...
त्यांच्या जीवंत अनुभवांनी मन त्यांच्यापेक्षा माझेच कुचंबून जात होते...1934 ते 1955 चा काळ आहे ह्यात पण असे वाटते की कुठेतरी आपणच जबाबदार त्यांच्या (आणि त्यांच्यासारख्या ईतर मुलांच्या / शेतकरी कुटुंबाच्या ) हालअपेष्टांना ...
कुठे तो काळ आणि कुठे आजची पिढी...उशीरा येण्यावरून,फी वेळेत भरता येत नाही म्हणून..गरज नसलेल्या मुलांना फ्री शीप दिल्यामुळे त्यांना कसे हायस्कूलला फ्री शीप ला मुकावे लागते..पुस्तकांची व फी ची बेगमी करताना किती हाल सोसावे लागतात...किती आणि कुठे राबावे लागते..हे ते कुठेहि वाचकांकडून सहानुभूतीची अपेक्षा न बाळगता...कुठेही लेखणी न बारगळता(पु लं नी प्रस्तावनेत लिहिलेलं माझ्या विचारात ,शब्दात पकडता नाही आले असते ..असे सत्य) ..
कथन करत जातात...
एवढे हाल ..
घरात भावंडाच्या वाढत्या लेंढरांना बाप कसा जबाबदार..तरिही शाळेला जावू नये म्हणून त्याचा बेदम मार खात...ह्या भल्या माणसाने कसे घरातल्या परिस्थितीची जबाबदारी घेत शिक्षण पूर्ण केले...आपली अभ्यासाची आणि वाचनाची , काव्य लेखनाची आवड कशी जोपासतात...ओल्ड S S C हायस्कूलात तिसरया नंबरने कसे पास होतात....
सारेच डोक्यात घोळत राहते...
त्यांच्या उर्वरित 3 आत्मचरित्र पण घ्यायचीत...
Hats off to you Dr Anand Yadav..
शत शत प्रणाम तुम्हांला🙏🙏
- PRASHANT SUSAR
`झोंबी`
एक आनंदप्रवास...
इयत्ता दहावी ला असताना `झोंबी` नावाचा एक पाठ आम्हाला होता. तेव्हा तो अभ्यासताना मला खूप आवडायचा. पुढे कधीतरी झोंबी कादंबरी वाचून काढू असं मनात होतं. मात्र ते राहिलंच..
काही दिवसांपूर्वी आपल्या `वाचनवेडा ग्रुप` वर एक दिवस झोंबी आणि पुढील तीन भागात आनंद यादव यांचे आत्मचरित्र वाचल्याची पोस्ट बघितली आणि जिज्ञासा जागृत झाली.(त्यातून पुढे मला मिळालेल्या आनंदासाठी त्या वाचकाचे व वाचनवेडा या ग्रुपचे मनापासून आभार👏) तोपर्यंत तोपर्यंत मला झोंबीशिवाय आणखीही भाग आहेत हे माहिती नव्हतं.
मग उत्सुकता लागली आणि झोंबी आणलं आणि एका दमात वाचलं.`पुढे काय..?`
याची ओढ लागली आणि वाचनालयातून `घरभिंती` व `काचवेल` ही मिळवले मात्र `नांगरणी` हा दुसरा भाग मिळेना. पण मनात अतीव इच्छा असली की निसर्गही त्याला साथ देतो (all the universe conspires...द अलकेमिस्ट वाले पाउलो कोहलो यांना स्मरून) शेवटी एका निवृत्त प्राध्यापकांकडून ते मिळवलं आणि सुरू झाला एक अनोखा प्रवास..झोंबी, नांगरणी घरभिंती,काचवेल.... आनंद यादव यांच्यासारख्या एका लहानश्या गावातून विपरीत परिस्थितीशी झगडून, प्रचंड कष्ट,जिद्द आणि आत्मबलाच्या साहाय्याने एक साहित्यिक म्हणून मिळवलेलं यश मला खूपच भावलं. मुळातच `ते` खूपच संवेदनशील असल्यामुळे त्यांच्या लेखनात जागोजागी त्याचा प्रत्यय येतो.आजपर्यंत खूप आत्मचरित्र वाचले पण या आत्मचरित्राशी एकरूप, एकजीव झालो खरं म्हणजे त्या कथानकाशी कुठेतरी स्वतःला रिलेट करत होतो म्हणून ही गोष्ट आपलीच आहे असं वाटलं.त्यांच्याइतके कष्ट मी सोसले नाहीत किंवा इतकी बिकट परिस्थितीही नव्हती पण तरीही त्या परिस्थितीची जाणीव कुठेतरी मनात होती. म्हणून अनेक प्रसंगात डोळे पाणावले.विशेषत झोंबी आणि घरभिंती वाचतांनाचे काही प्रसंग त्यामुळे हे पुस्तक संपूच नये असं वाटत होतं म्हणून ते पुरवून पुरवून महिनाभर वाचलं. मातीतून आलेल्या या माणसाने स्वतःला शेवटपर्यंत मातीशी जुळून ठेवलेलं होतं. स्वतः पी.एच. डी.असूनही त्यांच्या नावापुढे कुठेच डॉक्टर अशी पदवी लावलेली दिसली नाही. त्यांच्या नावाची आणि कर्तृत्वाची उंची सांगण्यासाठी केवळ `आनंद यादव` हे दोनच शब्द पुरेसे आहेत.
झोंबीमध्ये दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठीचा संघर्ष, नांगरणी मध्ये कॉलेज ते एम.ए.पर्यंतची जडणघडण आणि घरभिंती मध्ये नोकरी लागून ते गावाकडचे घर त्यांनी कसं उभं केलं त्याचे चित्रण आहे.काचवेल मध्ये साहित्यिक म्हणून झालेली जडणघडण आहे. झोंबी मध्ये पोटासाठी चा संघर्ष, अपार कष्ट तरीही शिकण्याची तळमळ व दुर्दम्य इच्छाशक्ती सुंदरपणे रेखाटली आहे,नांगरणी मध्ये तरुण वयात झालेली मनोवस्था वैचारिक जडणघडण ,इतरांनी केलेल्या सहकार्य आणि अभ्यासाच्या बळावर केलेली प्रगती दिसते. घरभिंतीमध्ये कौटुंबिक पातळीवर नात्यांचा संघर्ष ,आर्थिक संघर्ष आणि ग्रामीण ते शहरी असं असं स्वतः च केलेलं समायोजन आहे. ही तारेवरची कसरत त्यांनी खऱ्या जीवनात व लेखनातही यशस्वीपणे निभावली आहे. विशेषतः घरभिंतीमधले काही प्रसंग तर खूपच अप्रतिम आहेत. हिराच्या मृत्यूनंतर तिच्या व्यक्तिमत्त्वाचे केलेले भावस्पर्शी चित्रण कोणत्याही संवेदनशील वाचकाचे डोळे ओले करतात,दादाच्या
मृत्यूच्या प्रसंगी आईच्या कुशीत शिरून रडतानाचा प्रसंगही तसाच भावनिक आहे.चारही पुस्तकांत कितीतरी वेळा वाह असे उद्गार सहजपणे व आपोआप निघतात.ती कोल्हापूरी ग्रामीण बोलीभाषा ,ते निसर्गवर्णन आणि नात्यांची,पैशांची, भावनांची ओढाताण आपल्याला खूप काही शिकवून जाते. खरं म्हणजे आपला व्यक्तिमत्व विकासच होतो.लहानपणी भरपूर मार खाल्लेला असला तरीही कुठलंही किल्मिष किंवा आकस मनात न ठेवता त्यांनी शेवटपर्यंत हा `गोतावळा` जोपासला.आजच्या आपल्या `स्वतःपुरतं` पाहण्याच्या काळात `त्यांनी` गावाकडच्या घरासाठी केलेल्या कष्टामुळे आपणही अंतर्मुख होऊन जातो.( त्यामुळेच गेला महिनाभर जणू मी कागल आणि कोल्हापुरातच फिरत होतो.)
मला वाटतं कोणतेही मोटिवेशनल पुस्तक वाचण्याऐवजी जर `हे` आत्मचरित्र वाचलं तर नक्कीच अंतर्बाह्य बदल घडून येईल यात शंका नाही.
ग्रामीण साहित्याबद्दल ची त्यांची तळमळ जबरदस्त आहे. `नटरंग` कादंबरीवर आधारित `नटरंग` हा चित्रपट त्यांच्या दमदार साहित्याचं प्रमाण आहे.मी तर त्यांचा चाहता(फॅन) झालो आहे त्यांचं सगळं साहित्य वाचणार आहे. पण आज लेखक काहीसे दुर्लक्षित झालेले वाटतात. खरं म्हणजे त्यांच्या जीवनावर एखादी मराठी मालिका किंवा वेब सिरीज काढली तर ती प्रचंड हिट होईल इतके त्यांचे आत्मचरित्र अप्रतिम आहे. ते जिवंत असते तर त्यांची पायधूळ घेण्यासाठी नक्कीच गेलो असतो मात्र ते आता शक्य नाही. ते आता मागे उरलेत ते त्यांच्या साहित्यरूपाने. ते वाचूनच त्यांचा सहवास भोगायचा. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या ग्रामीण साहित्याच्या महापुरुषाला माझा मानाचा मुजरा...👏
{शेवटी कोणी कितीही चांगली सिनेमाची `ष्टोरी` सांगितली तरी प्रत्यक्ष `थेटरात` जाऊन सिनेमा पाहिल्याशिवाय त्याची प्रत्यक्ष आंनदानुभूती घेता येत नाही, म्हणून प्रत्येकाने प्रत्यक्ष जरूर वाचावेतच....झोंबी ते काचवेल}
🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रशांत सुसर,
बुलडाणा
- Vinay Mane
झोंबी: एक बाल्य हरवलेलं बालकांड.
एक सुंदर आत्मचरित्रात्मक कादंबरी।
- Vinay Mane
झोंबी: एक बाल्य हरवलेलं बालकांड.
एक सुंदर आत्मचरित्रात्मक कादंबरी।
- Sachin Bhanje
घरात दारिद्र्य,गरिबी, स्वतःच्या वडिलांचा शिक्षणाला असलेला विरोध, मनात जिद्द असेल तर अत्यंत प्रतिकुल परिस्थिती वर मात करून शिक्षण घेता येते हे झोंबी कांदबरी वाचल्यावर कळते...
- Gaurav Prakash Dalvi
खुप सुंदर पुस्तक आहे वाचताना ग्रामीण भाषा आणि लाईफस्टाईल ची ओळख होते
- Deva Zinjad
मी आत्मकथन लिहायला घेतल्यावर कुठलंच त्या संदर्भात वाचणार नव्हतो पण झोंबी हातात पडल्यावर भूतकाळातली माझीही झोंबी डोळ्यातून ओघळत राहिली...
झोंबी अजरामर आहे
- D.S. P. Patil
मी वाचलो... मला जगवलं... मी जगलो...❤️
झोंबी झोंबलीय...
- Balasaheb Ghongde
झोंबी : नव्या आगाजाला सुरुवात करून देणारं पहिलं पुस्तक.
- Tridipkumar Shende
संपूर्ण निवेदनासहित आगरी बोलीतील पहिला कथा संग्रह. यातील सर्व कथा अस्सल आगरी भाषेत
लिहिलेल्या आहेत. सदर कथा वाचताना आगरी बोली, लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा यांचे दर्शन होते.
- शैलजा जाधव
हो, खरचं अप्रतिम कादंबरी आहे
वाचताना ग्रामीण भागातील भयाण वास्तव अनुभवायला मिळते
- Dipti Patil
झोंबी हा आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग आहे जो अतिशय वाचनीय आहे. त्यानंतर नांगरणी, घर-भिंती आणि काचवेल असे तीनही भागसुद्धा अतिशय वाचनीय आहेत.
- Rushikesh Telange
#झोंबी - माणूस बनण्यासाठीचा संघर्ष !
"झोंबी" ही आत्मकथनात्मक कादंबरी आज वाचून संपली.झोंबी ही कादंबरी मी वाचली नाही तर जगलो.एक एक शब्द माझ्या काळजावर टाके पाडणारा वाटला.मी जन्मण्याच्याही खूप अगोदर आलेली ही कादंबरी मला माझीच समकालीन कादंबरी वाटली.जबरदस्त भाषाशैली,मार्मिक आणि खुमासदार संवाद यामुळे कादंबरी एकदा वाचायला सुरुवात केली की कंटाळा क्षणभरही येत नाही."टिकास्वयंवर" मध्येही नेमाडेंनी याची प्रशंसा केली आहे.
रत्नाप्पा जकाते ,आंद्या ,तारा ,कंबळा ,हिरा ,शंकरआण्णा ,आनसा ,लिंगाप्पा ,गोप्यातात्या,अक्कोळकर मास्तर ही पात्रे आपल्याला कायमची लक्षात राहतात. संवादावर आणि कथेचा आवाका यांवर तंतोतंत घेतलेली काळजी आणि मेहनत यामुळे आपण या कादंबरीत देहभान विसरून जातो.आंद्याचा प्रवास कुठंतरी आपला प्रवास वाटू लागतो.माझीही परिस्थिती काहीशी अशीच असल्यामुळे कथेशी मी लवकर जुळवून घेऊ शकलो.कुठंकुठं भरपूर विनोदाचे संवाद ,कुठं कुठं भरपूर गंभीर घटना ,गरिबी ,गावातील चालीरीती, रूढीपरंपरा ,अंधश्रद्धा या वेगवेगळ्या विषयांवर ही कादंबरी घटनांशी साधर्म्य साधते.
संवाद सर्वात जास्त परिणामकारक मला वाटले.कमी शब्दांत सत्य परिस्थितीचं दर्शन घडविणारे ,मजबुरी-लाचारी सांगणारे हे संवाद कथेला पूरक वाटतात.पात्रांच्या आयुष्याची जडणघडण कोणत्या परिस्थितीतून होतेय आणि आपल्या आयुष्यातल्या आभाळाएवढ्या संकंटांनीही ते न हारता ,जीव न देता लढत राहतात,हे यांतून समजते.कादंबरीचे लेखक आनंद ऊर्फ आंद्याची शिकण्याची धडपड ,दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी त्याने केलेली धडपड आपल्याला "झोंबी" च्या माध्यमातून वाचायला मिळते.
एका प्रसंगात "नशिबात भोग हाईत तर नगं फिरायला ?" असं आंद्याचा मामा म्हणतो तर
वडिलांच्या दृष्टांताच्या अज्ञानाविषयी आंद्या सांगत असतो तेव्हा "तुझी शाळा खुळ्यानं झवलेली हाय" असं त्याचे वडील म्हणतात.हिराच्या माती खाण्याच्या सवयीला कंटाळून मळ्यात आंद्या तिला म्हणतो "आयला तुझ्या ! किती खाशील माती ! माती खाऊन खाऊन सारं घरदार मातीत घाटलंस की !.असे रोजच्या जगण्यातले खुमासदार ऐकीव आणि वास्तविक संवाद आपल्याला इथे ऐकायला मिळतात.उत्तम भाषारचनेचं एक जिवंत जिवंत उदाहरण आहे हे !
"झोंबी" माझ्या आयुष्यातील महत्त्वाची कादंबरी राहील.कारण तो एक भावनिक प्रवास होता जो 414 पानात संपला.याचे पुढील "नांगरणी",`घरभिंती"काचवेल" हे भागही निघाले आहेत.आनंद यादवांची साहित्यिक कामगिरीही उत्तम आहे. नटरंगसारखा सिनेमा त्यांच्या कादंबरीवर बेतलेला असून साहित्य अकादमीसारखा मानाचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.82 व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते.
बाप - मुलाचं वास्तविक नातं ,नात्यांतला जीवघेणा संघर्ष, परिस्थितीतला संघर्ष, सामाजिक संघर्ष ,सामाजिक स्थान मिळवण्यासाठीची धडपड हे सर्व झोंबीच्या अनुषंगाने वाचायला मिळते.झोंबीतला नायक काय करतो आणि कसं करतो ? याच्यापेक्षा तो का करतो आणि कशासाठी करतो हे उद्दिष्ट जरी समजलं तर झोंबी वाचण्याचं सार्थक झालं आणि आपण कादंबरीच्या जवळपास पोहोचलो असं म्हणण्यास हरकत नाही.
"झोंबी" हे पुस्तक कसं आहे विचारल्यावर अनेकांनी मला कमेंट्स करून प्रतिक्रिया दिल्या होत्या आणि त्या का दिल्या हे झोंबी वाचल्यावर मला कळालं.कोणतेच ओढेवेढे न घेणारी ,विषयापासून न भरकटणारी ,कोणतीही बाष्कळ वर्णने ,काव्यात्मकता न दाखवता वास्तवाशी सुसंगत शब्दरचना आणि भाषाशैली हे झोंबीचे वैशिष्ट्य आहे. यामुळे झोंबीचा दर्जा उच्च ठरतो.ही एक वाचनीय ,प्रेरणादायी आणि वास्तववादी कादंबरी ठरते
- ऋषिकेश तेलंगे
- Jyashree Gite
खूप छान आहे, ही कादंबरी म्हणजे गरीबांच्या मुलांची शिक्षणाकरीता व समाजात जगतांना करावी लागणारी धडपड होय.
वाचताना कथा आपल्या समोर घडतीयं असं वाटतं
शेवटपर्यंत उत्सुकता वाटते ,पुढे काय याची उत्कटता लागुन राहते
- Ashwini Rawool
झोंबी सोबत नांगरणी, घरभिंती आणि काचवेली ह्या कादंबर्या देखील वाचाव्यात. झोंबी विषयी सांगायचं झाल्यास , कादंबरी एकदा हातात घेतलीत की ठेवावी असा वाटणारचं नाही. ही कादंबरी आपल्याला जगण्याची नवी उमेद देते.
लेखक आनंद यादव यांनी परिस्थितीशी दोन हात करत कठीण प्रसंगातून यशाकडे कश्या प्रकारे वाट चाल केली ह्याचं एकंदरीत वर्णन ह्या कादंबरीत केलेलं आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचावी अशी कादंबरी आहे
- Shailendra Kale
आनंद यादव यांची आत्मकथने म्हणजे ग्रामीण तरुणाच्या भावजीवनाचे महाभारतच....केवळ झोंबी इतकंच नव्हे तर नांगरणी,घरभिंती,काचवेल हे सर्व वाचावेच.
झोंबीतील आंद्या,परिस्थितीशी झोंबतो.नांगरणीतील युवा-तरुण आनंदा स्वतःच्या आत्मभावनेची मशागत करतोय जसे,नांगराच्या धारधार पात्याने जमीन स्वतःची उभी आडवी उरसफोड करुन घेते.पुढे पांढरपेशा...प्राध्यापक झालेला आनंद घराच्या सुरक्षित घरभिंती बांधतो.अशा सुखदुःखासह आपल्या माणसातल्या घरापुढे सारवलेल्या शेणामातीत चककणारी काचवेल रांगोळी काढतो....
- Bhaskar Bade
वाचलीच पाहिजे अशी /असे आत्मकथन(बाल),यादवकुटुंब.दारिद्रय ,पाळीवप्राणी,भूकेला पर्याय,,,,.वगैरे,
आत्मकथन वाचून आनंद यादवांचे गाव-कागल जि.कोल्हापूर;कागल गाव,शेतशिवार अनुभवून आलो,त्यांच्या घरी मुक्काम केला.त्याच्या भावाने माझे आगत स्वागत केले.तर त्यांच्या पुतण्याने यादवांच्या साहित्यातील शिवार.घटक,,,,सर्व हिंडून दाखवले,
झोंबी..घरभिंती,,,,नांगरणी जरुर वाचा,
- Dipali Khillare
प्रत्येकाने अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे.मी तीन वेळा वाचले हे पुस्तक आणि अजूनही वाचावेसे वाटते.
- Savita Kamble
आत्मचरीत्र आहे ते.सुंदरच आहे.आम्हाला तर शाळेत धडा होता.त्यावरून मग मी हे पुस्तक वाचलं
- Abhijit Raskar
वाचली आहे. खरोखर वाचनीय आहे. जरूर वाचा
- Ganesh Mali
"आंदा" ची "झोंबी" वाचली की, पुढ किमान महिणाभर तरी दुसर कुठलच पुस्तक चांगल वाटत नाहि.सतत डोळ्यासमोर सरांची झोंबी येत रहाते...!
- Sandip Patole
झोम्बी खूप वाचनीय आहे..
त्यानंतर नांगरणी,घरभिंती आणि आता काचवेल वाचतोय खूपच सुंदर आत्मचरित्रपर कादंबऱ्या आहेत....
- Savita Kamble
आत्मचरीत्र आहे ते.सुंदरच आहे.आम्हाला तर शाळेत धडा होता.त्यावरून मग मी हे पुस्तक वाचलं
- Harshad Khawadkar
भविष्याच्या शोधात फिरणा-या प्रत्येकाने वाचावी प्रयत्न कसे असावे आणि ध्येयाकडे जाताना होणारी फरफट कशी सोसावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे झोंबी
नंतर नांगरणी, घरभिंती, काचवेल पण वाचा आयुष्याला कलाटणी देणार त्यांच आयुष्य, आत्मचरीत्र आहे
- Ravindra Bhogal
Khup khup खूप खूप छान आहे .... सगळे खरे अनुभव आहे त्यांचे त्यात ....
मार खावा तर किती खावा त्या माय लेकराने .... 😥😥😥
खूप मेहनत घेतलेय आनंद सरांनी
- Jyoti Chaure
पुस्तक छान आहे...
- Pravin Vibhute
शिक्षणासाठी किती संघर्ष करावा? स्वत: च्या बापालाच मुलाने किती विनवण्या कराव्या? दारिद्र्याची आणि दुःखाची परिसीमा तरी किती?
हे पुस्तक तुम्हाला जुन्या काळात, तुमच्या बालपणात, शालेय जीवनात, गावातील दारिद्र्यात, गरिबी, दुख: आणि तुम्हाला न अनुभवलेल्या सर्व गोष्टी मध्ये घेऊन जाते.
भाषा शैली आणि वर्णन इतके अप्रतिम कि डोळ्यासमोर चित्र जसेच्या तसे उभे राहते. लेखकाची प्रत्येक बारीक गोष्टीचा तपशील सांगणारी भाषाशैली अप्रतिम आहे.
संघर्ष... अगदी जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच...
आपण खूपच सुखी आहोत याची वारंवार, प्रत्येक पानापानावर जाणीव होत रहाते.
तुम्हाला जर तुमच्या जीवनाबद्दल काहीही तक्रार असेल तर नक्की हे पुस्तक वाचा.
तुम्ही पुन्हा कधीच तक्रार करणार नाही.
पुस्तक वाचाताना रडू येते का? हे पुस्तक त्याच्याही पुढे घेऊन जाते. परिस्थितीशी किती झुंजावे याला कोणतीही मर्यादा नाही.
नक्की वाचा एकदा...
पुस्तकातील दोन उतारे:
सगळे म्हातारे अगदी जख्ख होते. एकटे एकटे असायचे. तरणी माणसं कशी भराभर इकडून तिकडं जात असत, एकमेकांशी बोलत असत, कामं करताना दिसत असत... पण हे म्हातारे-म्हाताऱ्या गिधाडासारखे दिसायचे. सावल्यांसारखे हिंडायचे. ते इतके म्हातारे होते की, ते कधी तरूण असतील असं वाटायचंच नाही.
जाताना मामानं आपल्या खरखरीत सुकलेल्या हातानं कुडत्याच्या खिशातनं एक आणा काढला नि माझ्या हातावर ठेवला. माझा मुका घेटला. डोक्यावरनं हात फिरवून तो ‘‘चलतो, गं तारा.’’ म्हणून निघाला. ‘‘लिंग्याचा संसार सुरळीत सुरू झाला; ह्यातच यंदाची दिवाळी साजरी झाली म्हणायची बघ.’’ तो पुन्हा एकदा बोलून वाट चालू लागला.
- Vrushali Gawand
मराठी पुस्तकप्रेमी ग्रुप वरील माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना माझा नमस्कार. आज पुन्हा एकदा मी माझा एक छानसा पुस्तक अनुभव घेऊन आलीय. अथक प्रयत्नांची, जिद्दीची अशी हि कादंबरी आपल्याला आवडेल अशी मला आशा आहे. आज तुम्हाला मी आनंद यादव यांच्या साहित्य क्षेत्रातील मानाचा "साहित्य अकादमी पुरस्कार" मिळालेल्या झोंबी या कादंबरीबद्दलचा माझा अनुभव सांगणार आहे. यातून जे काही मला अनुभवाला आलं, मला शिकायला मिळालं ते तुम्हाला उलगडून सांगतेय तुम्हा सर्वाना आवडेल अशी अपेक्षा करते, तुमचे अभिप्राय नक्की कळवा.
झोंबी म्हणजे लढा, युद्ध. पुस्तक वाचल्यावर हे शीर्षक पुस्तकाला किती समर्पक आहे हे लक्षात येत, कारण आनंद यादव यांच हे पुस्तक म्हणजे सुद्धा असाच एक लढा आहे. एक विरुद्ध अनेक असा लढा. मग तो लढा त्यांनी अनेक आघाड्यांविरुद्ध लढला, परिस्थिती, जातीव्यवस्था, गरिबी, वशिलेबाजी, तर कधी स्वतःच्या माणसांविरुद्ध.
खरतर माझ्यासारख्या एका शहरी वातावरणात वाढलेल्या मुलीला हे पुस्तक वाचताना सुरवातीला शंकाच वाटली होती. हे पुस्तक मला नीट समजेल का? कारण अनेकांकडून ऐकलं होत या पुस्तकातील भाषा ग्रामीण आहे, कथेचा बाज ग्रामीण आहे, आणि सगळ्यांशी माझा संबंध कधी आलाच नव्हता. पण जस जस पुस्तक वाचत गेले, तसं तसं या पुस्तकाशी एकरूप होत गेले. आणि यातच लेखकाचं सर्व यश सामावलं गेलंय. हे पुस्तक कोणत्याही थरातील वाचकांना आपलंस करत यात शंका नाही. ग्रामीण-शहरी असा भेद हे पुस्तक वाचताना आड येत नाही कि कुठेही ग्रामीण भाषा समजून घेण्याची अडचण जाणवत नाही. अगदी सहजरित्या समजून जात सर्व काही नि तितक्याच प्रकर्षानं जाणवत लेखकाचं संघर्षमय जीवन.
शिक्षणपूर्तीच ध्येय असलेला लहान मुलगा आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी लहान वयातच प्रौढ बनून अनंत अडचणींना सामोरं जातो आणि याच अक्षरशः जिवंत वर्णन केलय आनंद यादव यांनी. लेखकाच्या बालमनाचं एकच स्वप्न असत शिकून कोणीतरी मोठं माणूस व्हायचं, घरची गरिबी दूर करायची. पण ते शिक्षण सुद्धा त्यांना सहजासहजी प्राप्त होत नाही एकलव्यासारखी स्थिती असते छोट्या आनंदची, स्वतःची विद्या त्याला स्वतःलाच मिळवावी लागते, ते हि घरच्या लोकांनी कितीतरी वेळा परिस्थितीची कारण देत मागितलेली गुरुदक्षिणा देऊन.
त्या काळात असलेली बालविवाहाची प्रथा, वर्णव्यवस्था, गरिबी या सर्वांविरुद्ध लेखकानं दिलेला लढा म्हणजे झोंबी. शेतकऱ्याच्या मुलाने शेतकरीच झाले पाहिजे हा नियम असलेली समाजव्यवस्था, गरीब मुलांच्या शिक्षणाची नसलेली सोय, अगदी फ्रीशिप सुद्धा सुस्थितीत असणाऱ्या मध्यमवर्गीयांना मिळावी अशी वशिल्याची पद्धत, घरची जबादारी, लहान भावंडांचा सांभाळ, शेतीची काम या सगळ्यातून वेळ मिळाला तर शाळा या सर्वांवर मात करून लेखकानं ज्या जिद्दीनं स्वतःच शिक्षण पूर्ण केलं त्या सर्वांचं यथासांग वर्णन पुस्तकात केलेलं आहे. शेतकऱ्याच्या मुलानं शेतकरीच का झालं पाहिजे? ज्या गरिबांना फ्रीशिपची जास्त गरज आहे ती त्यांना न मिळता आर्थिक सुस्थितीत असणाऱ्यांना का मिळावी ? गरीब मुलांना केवळ त्यांच्याकडे पैसे नाहीत, चांगले कपडेलत्ते नाहीत म्हणून शिक्षणाचा अधिकार का नाकारावा? या सारखे असंख्य प्रश्न छोट्या आनंदच्या मनात रोज उभे राहत नि परिस्थितीमुळे हतबल होऊन मिटून जात.
दोन वेळच अन्न मिळायची मुश्किल असताना त्यांनी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आपल्याला थक्क करतात. आपलं जे वय खेळण्या बागडण्याचं असत तिथे आनंद यादव यांनी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत, एकीकडे शेती करून दुसरीकडे शिक्षण पूर्ण केले. घरात वडिलांचा शिक्षणाला असलेला प्रखर विरोध पाहून त्यांना मधेच एकदोनदा शाळा सोडावी देखील लागली.
नाईलाजास्तव शिक्षण मधेच थांबल्यावर त्यांच्या जीवाची झालेली घालमेल, त्यांना झालेलं दुःख यामध्येसुद्धा ते खचले नाहीत. तर झालेल्या दुःखावर मात करण्यासाठी जेव्हा ते आजूबाजूच्या लोकांशी, त्यांच्या परिस्थितीशी आणि पर्यायाने सर्व समाजव्यवस्थेशी जवळ आले तेव्हा जन्माला आला त्यांच्यातला कवी, लेखक, विचारवंत. समाजाच्या ज्या स्तरातून आनंद यादव आले होते, जी समाजरचना, जे लोक, जी कार्यप्रणाली त्यांनी पहिली होती त्या समाजव्यवस्थेचे जिवंत चित्र त्यांनी आपल्या कथांमधून मांडलं. अगदी आहे तशाच भाषेत म्हणूनच कदाचीत ते आपल्याला जास्त जिवंत वाटत. जनमाणसात त्याच वेगळेपण उठून दिसत.
अथक प्रयत्न करून आनंद यादव यांनी मॅट्रिक पूर्ण केली, नि त्यांच्या याच लढ्याची कथा म्हणजे झोंबी. हा लढा लढताना त्यांना प्रसंगी आपल्याच माणसांशी सुद्धा बंड करावं लागलं. पण त्यांना शिक्षणाचे महत्व ठाऊक होते. अजाणते वयात झालेल्या त्यांच्या आई बाबांचे लग्न, संसारात मुलाबाळांची भर पडत चाललेली, कर्जबाजारी शेतमळा, भावंडांचे मृत्यू, हे सर्व त्यांनी डोळ्यादेखत पाहिलं होत नव्हे तेच आयुष्य ते जगत आले होते. त्यांना ठाऊक होत जर आज आपण शिकून मोठे झालो तर उद्या आपल्या घरची हि परिस्थिती नक्की बदलेल. म्ह्णून सर्व समाजव्यवस्थेच्या जुन्या, बुरसटलेल्या मतांना छेद देत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.
या पुस्तकाने आपल्याला एक अशी शिकवण दिलीय, जी आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडेल. ती म्हणजे माणसानं नेहमी ध्येयपूर्तीसाठी जगावं, आपल्या स्वप्नांसाठीं झगडावं.ती पूर्ण करण्याचे मनापासून प्रयत्न करावेत. कारण जितका मोठा संघर्ष तितकेच मोठे त्याचे यश. छोट्या आनंदचा लढा होता शिक्षणासाठी तेच त्याच ध्येय होत. आपल्यापुढे सुद्धा असंच कोणतं ना कोणतं ध्येय नक्की असेल शिक्षण, करिअर, आपलं घर. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. प्रत्येकाची स्वप्न वेगळी,ध्येय वेगळी पण करावा लागणारा संघर्ष मात्र सारखाच. कधी तो संघर्ष या समाजाविरुद्ध करावा लागेल, कधी परिस्थितीविरुद्ध तर कधी आपल्याच माणसांविरुद्ध देखील. पण जर आपलं ध्येय योग्य असेल तर मागे वळून न पाहता त्या लढ्यात उतरा. आयुष्याच्या त्या झोंबीसाठी सज्ज रहा.
यातूनच आपल्याला आपला उज्ज्वल भविष्यकाल मिळेल. जो इतरांना जगण्यासाठी प्रेरणा देईल.
म्हणतात ना,
"मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची, तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची, पर्वा बी कुनाची" ...........
- आशिष नेताजीराव शिंदे सरकार
5वि 6वि ला असताना हे पुस्तक वाचलं होतं. अजून सुद्धा मनामध्ये घर करून आहे.
- Makarand Labade
लहानपणात मोठ्या यातना सोसणार अप्रतिम आत्मचरित्र..hats of Anandji
- Ashish Sawant
झोंबी हे लेखक आनंद यादव उर्फ आनंद रत्नाप्पा जकाते उर्फ आंद्या ह्यांचे आत्मचरित्र आहे..
सहसा मला आत्मचरित्र वाचायला आवडत नाही. पुस्तक घेऊन आल्यावर समजले आत्मचरित्र आहे. पण पु.ल. देशपांडेंची प्रस्तावना आहे बघितल्यावर विचार केला पाच दहा पाने वाचून बघू....नाही आवडले तर परत करू.
दुसऱ्याच पानावर मिळालेल्या पुरस्कारांची यादी बघून पुस्तक चांगले असणार वाटू लागले. पु.लं. ची प्रतिक्रिया जवळपास दहा बारा पाने आहे. पूर्ण वाचावी अशी वाटली नाही.
ती सोडून सरळ कथेला हात घातला ...पहिली पाच दहा पाने सटासट वाचली आणि दहा बारा पानावर कथेतल्या `आंदया` चा जन्म एक सहज ओळीमध्ये झाला
"मुलाचा जन्म झाला म्हणून बापासकट सगळ्याना आनंद झाला म्हणून मुलाचे नाव आनंद ठेवले आणि तो `आनंद` म्हणजे मीच"
ह्या दहा बारा पानात जे लेखकाच्या जन्मा आधीचे वर्णन केले आहे.. त्यात लेखकाच्या सहज सोप्या आणि धावत्या लेखन शैलीने धम्माल उडवून दिली आहे. ह्या दहा बारा पानातच समजून गेले ह्या कादंबरी वजा आत्मकथेत दम आहे...पुस्तक बदलून घायचा विचार मनातून काढून टाकला
जवळपास 380 पानाचे हे पुस्तक आनंद यादव ह्यांच्या जन्मापासून ते SSC पर्यंतच्या करकीर्दीवर घडलेला धावता घटनाक्रम आहे. ह्या कादंबरीतून आपल्याला ग्रामीण जीवनाचे, अर्थव्यवस्थेचे, दारिद्र्याचे, माणसांच्या विविध स्वभावाचे, प्रखर गरिबी आणि दुर्गम इच्छाशक्तीचे प्रदर्शन होत राहते
लेखकांचे बालपण सुस्तिथीतून अतिशय गरिबीकडे चाललेले असते...सतत शिव्या घालणारा बाप...दहा बारा बाळंतपणे काढणारी बारीकशी आई... जगलेली सात आठ रोगी भावंडे...आयुष्यभराची मेहनत...गरिबी...वर्षातून एकदाच मिळणारी अंगावर घालायची कापडे.... अस्वच्छता....आजारपण...उपासमार....आणि अतिशय कठिण परिस्थितीत सुद्धा शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असणारा आनंदा बघून डोळ्यात पाणी उभे रहाते.
जमेल तसे राबून....दिवसरात्र उपाशी राहून....बारा पंधरा तास शेतातील मेहनतीची कामे करून....शाळेतला एखादा तास हजर राहून....मोट ओढत रात्रंदिवस केलेला अभ्यास...सतत होणारी मनाची आणि शरीराची उपासमार....वडिलांचा स्वार्थी आणि अप्पलपोटेपणा....शिक्षणाला सतत होणार विरोध...काही शिक्षकांचा मिळणार आधार आणि काही शिक्षकांचा कडवा राग...आणि ह्या सगळ्या अडचणीतून तावून सुलाखून सुद्धा तालुक्यात पाहिले येणे...शाळेत पाहिला...दुसरा नंबर येणे...केवळ आणि केवळ मजबूत ईच्छाशक्ती वरच शक्य होऊ शकते.
मामाशी लग्न करून दिलेल्या आपल्याच लहान बहिणीचा क्षयरोगाने झालेला मृत्यू आणि त्यानंतर मामा आणि त्यांच्या मुलावर आलेले पोरकेपण हे वाचणाऱ्याच्या काळजाला हात घालते...मामाला बायकोची आणि त्यांच्या लहान मुलाला आईची किती गरज होती ह्याचे लेखकाने केलेलं वर्णन अप्रतिमच. ह्या टोकावर वाचकाने काही वेळ नक्की एक पॉज घेऊन ते दुःख अजमावून बघावे.
पु.लं. च्या भाषेत म्हणायचे तर झोंबी म्हणजे एक बाल्य हरवलेलं बालकांड.
नक्कीच वाचण्यायोग्य कलाकृती आहे...ह्याचा असर तुमच्या मनावर नक्कीच खोलवर कोरला जाईल.
- Narendra Wankhede
झोंबी मध्ये आनंद यादव यांचे बालपण, प्राथमिक , माध्यमिक ते अकरावी पर्यंतच्या शिक्षणाची व्यथा त्यांनी मांडली, अवघड परिस्थितीतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले, विशेष म्हणजे या पुस्तकाला साहित्य आकडेमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे, बाकी सर्व पुस्तक बोलेल...
- Sachin Patil
सर्वात आवडते आत्मचरित्र
- Rashmi Tikhe
Far sundar aahe pustak... Shewat pariyant wachat rahawas watat....
- Mahendra Taktode
Khupach Chan ..........
- Shital Mehta
Mast
- Umesh Kothikar
छान आहे.
- Manohar Khairnar
कागलपासुन प्रवास थक्क करणारा...
- Sachin Patil
माझ सगळ्यात आवडत पुस्तक..
- Akash Tandale
प्रेरणादायी आहे .
- Rameshwar Dusane
फार काही आहे पुस्तकात
- बसवराज नंदनवाडे कोल्हापूर
mast pustak
- Sagar Malwe
झोंबी ` हे आनंद यादव यांच आत्मचरित्र . एका अतिशय गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या , शिकायची अतीव इच्छा आणि त्याला वडिलांचा असलेला विरोध , सामाजिक परिस्थितीशी झगडणाऱ्या एका मुलाची गोष्ट म्हणजे ` झोंबी ` . या पुस्तकातली लेखकाची एकंदरीत लेखणी अंगावर काटा उभा करणारी आहे . लेखकाच त्याच्या आई , वडिलांशी असेलला परकेपणा पुस्तकातल्या पहिल्या वाक्यात स्पष्ट होतो आणि संपूर्ण कादंबरीत तो जाणवतो ही . ग्रामीण जीवनात असणाऱ्या अडचणी , साधी गरज भागवण्यासाठी करावी लागणारी धडपड मनात घर करून जाते . पण लेखकाने सहानभूती मिळवण्याचा अजिबात प्रयन्त न करता अतिशय अचूक पद्धतीने कादंबरीची मांडणी केली आहे .
नक्की वाचा ` झोंबी `.
- Chaya Kishor Dani
Angawar kata yeto pan pustak hatatun sodwat nahi.
- NEWSPAPER REVIEW 18-09-1988
आत्मचरित्रात्मक कादंबरी...
डॉ. आनंद यादव यांचा ‘प्रियदर्शिनी’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या ‘झोंबी’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीचा हा मार्मिक परिचय.
शैलीदार ग्रामीण लेखक आणि ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रणेते डॉ. आनंद यादव यांनी आपले आत्मचरित्र लिहून प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांच्या मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणाची कथा प्रामुख्याने दिली आहे. ३७३ पानांची ही हकीकत आहे. ही हकीकत इतकी विस्तारली याचे एक कारण म्हणजे पूर्वार्धात आईवडिलांची विवाहापासूनची कथा त्यात सांगण्यात आली आहे. हा या आत्मचरित्राचा एक नवीन विशेष म्हणावा लागेल. दुसरा विशेष म्हणजे हे एक अभिनव प्रकारचे आत्मचरित्र आहे. ते अभिनव प्रकारचे आत्मचरित्र आहे. ते अभिनव कसे आहे हे स्पष्ट करण्यासाठी डॉ. आनंद यादव यांनी एक परिशिष्ट टाकले आहे. ‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ असे या नव्या प्रकाराला त्यांनी नाव दिले आहे. रूढ आत्मचरित्रात प्रसंग, व्यक्ती, आठवणी यांची कोरडी यादी असते. त्यात मूलभूत जिवंतपणा अगर चैतन्य राखले जावे. असा डॉ. आनंद यादव यांचा प्रयत्न आहे. रूढ पद्धतीने आत्मचरित्र लिहायचा प्रयत्न केला तर आपल्या लेखनप्रकृतीवर बंधने पडतील असेही त्यांना वाटले. आपले ‘आत्मिक लालित्य’ आणि व्यक्तिमत्व विकासाच्या शक्यता रूढ आत्मचरित्रातून व्यक्त होणारे नाहीत असे त्यांना वाटे. यातून मार्ग काढण्यासाठी आत्मचरित्रात्मक कादंबरीची संकल्पना त्यांना सुचली. व्यक्तिगत प्रेरणांच्या सोयीसाठी साहित्य प्रकाराच्या संकल्पना असत नाहीत. हे उघड आहे. साहित्याचे संकरित प्रकार समर्थनीय ठरण्यासाठी आशयाची ताकद फार विलक्षण असावी लागते किंवा आविष्काराची रीत विलक्षण असांकेतिक आणि प्रतिभासंपन्न असावी लागते. याची तुरळक उदाहरणे पाश्चात्य साहित्यात आढळतात. रशियन / इंग्रज लेखक नोबोकॉव्ह (लोलिता या प्रक्षोभक कादंबरीचा निर्माता) याचे उदाहरण सहज आढळते. या दोन्हीचा अढळ ‘झोंबी’त होतो असे वाटत नाही.
आत्मचरित्र लिहिताना यादवांना अधिक मोकळेपणा पाहिजे होता इतकाच याचा अर्थ घ्यावयाचा. सर्जनशील लेखक सिद्धांतवजा समीक्षेचा प्रयत्न करतो तेव्हा या प्रकरणाची तर्कशिथिलता साहजिकपणे येते. चरित्रात्मक कादंबरी असू शकते. कादंबरीत आत्मचरित्राचा मोठा भाग असू शकतो. पण कादंबरीवजा आत्मचरित्र, साहित्य प्रकार म्हणून संभवत नाही. आपले जीवन हीच कादंबरी आहे असे मानून आत्मसन्मान करता येतो. या लेखनासंबंधीचा हा कमी महत्त्वाचा मुद्दा आहे.
‘झोंबी’ या लेखनाचा एक ठळक गुण म्हणजे ते अगदी समरसून लिहिले आहे. ज्याला यादव चैतन्य म्हणतात, ते या सर्व लेखनात ओतण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे खेडेगावात शेतमजुरी करून आयुष्य कंठणाऱ्या माणसांची दैन्यावस्था त्यांनी साक्षात उभी केली आहे. हे आयुष्य काढणाऱ्या एका कुटुंबात ज्ञानाचा दिवा कसा पेटतो आणि त्याचा उजेड कसा वाढत जातो, त्यासाठी किती प्रकारचा आटापिटा आणि जपणूक करावी लागते त्याचे कळवळून केलेले निवेदन या आत्मकथेत आहे. पु. ल. देशपांडे आपल्या जिव्हाळ्यांनी भरलेल्या प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे एका परीने हे एक बाल्य हरवलेले बालकांड आहे. शिक्षणासाठी त्याला बाल्याची किंमत द्यावी लागली. यातले बाल्य सर्वस्वी हरवलेले नाही. ते वेगळ्या प्रकारचे आहे. दारिद्र्य दु:खाने झाकोळलेले आहे. सुखवस्तुपणातल्या बालजीवनाचे संरक्षित काव्य त्यात नाही. लेखनाच्या स्वरूपाचे वर्णन करताना पुल. म्हणतात की, एखाद्या गवयाने राग आळवावा तसा लेखक बालपण आठवत गेला आहे; आळवीतही गेला आहे. या कलापूर्ण आळवण्यामुळे हा केवळ बालपणाच्या कडुगोड घटनांचा अहवाल न होता, ही एक सुंदर ललित कलाकृती झाली आहे.’’
या प्रकारची कृती बहुजन समाजातील शिक्षितांच्या पहिल्या पिढीत निर्माण झाली याचे पु. ल. ना जे अप्रूप वाटते ते रास्तच आहे. या समाजातल्या सर्वसामान्य संसाराची चित्तरकथा मराठी साहित्यात आजपर्यंत इतक्या जिवंतपणे कुणी मांडली नव्हती, हेही खरे आहे. महात्मा फुले यांनी अंकुरित केलेल्या आणि श्री. म. माटे यांनी पल्लवीत केलेल्या ग्रामीण साहित्याला अनेक गुणवान लेखकांचा हातभार लागून आज त्याला भरगच्च स्वरूप प्राप्त झाले आहे यात काहीच शंका नाही. या जीवनाचा ठळक नकाशा आज साहित्यात उतरला आहे.
या आत्मनिवेदनात कादंबरीची अगर कल्पित कथेची आवरणे दिसतात ती पहिल्या भागात. आपले आईवडील तारा आणि रतून यांच्या लहानपणी झालेल्या लग्नापासून त्यांच्या गरीब संसाराचे सारे चढउतार, बरेवाईट प्रसंग, भांडणे, वादंग, बोलाचाली यांचे अतिशय तपशीलवार वर्णन यादवांनी केले आहे. या सगळ्याला ते साक्षी नसणार, हे तर उघडच आहे. कागलातले बालपण, शाळा, रानमेव्याची लज्जत, स्त्री-पुरुष संबंधाबद्दलचे कोवळे कुतूहल, घरच्या अज्ञानाने आणि दारिद्र्याने शिक्षणात येणारा अडथळा यांचे संगतवार आणि काही ठिकाणी जाणीवपूर्वक ललित असे वर्णन यादवांनी केले आहे. या आविष्कारात कादंबरी लेखनाची लक्षणे दिसतात. यामुळे सांकेतिक अर्थाने लेखन रंगतदार होते. पण आत्मनिवेदनाच्या निखळपणाला ते पारखे होऊन बसते. या निखळपणाच्या अभावी चैतन्याचे शुद्ध स्वरूप साकार होणे कठीण असते.
बालपणाची खरी हकीकत पहिल्या भागाच्या अखेरीस आणि संबंध दुसऱ्या भागात आली आहे. यातले संथ, तन्मयवृत्तीने केलेले निवेदन परिणामकारक, पटण्याजोगे झाले आहे. ‘झोंबी’चा हा गाभा म्हणायला हरकत नाही. यादवांच्या लेखनाचे उत्तम गुण या भागात प्रकट झाले आहेत. अवघ्या ग्रामीण जगण्याची रीत यात स्पष्ट आणि भावगर्द झालेली आहे.
तिसऱ्या भागात बालपण संपत आले आहे आणि जाणत्या वयाला सुरुवात झाली आहे. यात पुढच्या शिक्षणाचे टप्पे, चित्रकलेचा, सिनेमाचा, लेखनाचा वाढवलेला छंद, नातेवार्इंकांच्या संसाराच्या हकीकती, गरजेपोटी केलेल्या लहान-मोठ्या चोऱ्यांचे कबुलीजबाब आणि अखेरीस मॅट्रिक परीक्षेतले उत्तम यश असा वृत्तांत आला आहे. तोही सरस उतरला आहे.
तशी ललित लेखकाची निर्मिती ही आत्मपरच असते. यातून यादवांना मीचा शोध घेण्याचा सतत ध्यास त्यांच्या साहित्याला आजवर आत्मवृत्त या ना त्या स्वरूपात आलेच आहे. त्याचे धागेदोरे झोंबीत शोधता येतात, हे या आत्मवृत्ताचे महत्त्व एरवी हे एकप्रकारचे पुनर्लेखनच समजले पाहिजे. शिवाय ‘मी’च्या आळवलेल्या आठवणी हा ‘मी’चा शोध होतोच असे नाही. पुस्तकाची निर्मिती आकर्षक वेष्टन लक्षवेधी आहे.
-म. द. हातकणंगलेकर
- SADHANA 11-06-1988
झोंबी : प्रत्ययकारी आत्मकथन…
‘झोंबी’– आनंद यादवांची ही आत्मचरित्रात्मक कादंबरी. आनंद यादव हे आघाडीचे ‘ग्रामीण साहित्य’ लेखक. ‘झोंबी’मध्ये यादवांनी आपल्या जन्मापासूनचा ते एस. एस. सी. अखेरपर्यंतचा जीवनपट दिला. पुस्तक वाचताना त्यातील घटना प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभ्या राहतात. ‘झोंबी’ म्हणजे ‘धडपड’. पुस्तक वाचल्यावर यादवांनी या पुस्तकाला किती योग्य शीर्षक दिले आहे ते लक्षात येते.
आनंद यादवांचा जन्मापासून ते एस. एस. सी. पर्यंतचा काळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी गेलेला. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला. आई-वडिल अशिक्षित, अडाणी. मुलाने लिहायला-वाचायला शिकावे, त्याला हिशेब करता यावा, या मर्यादित हेतूने वडिलांनी आनंदला शाळेत घातलेले. पण आनंदला मात्र शिकण्याची चटक लागते. पहिली ते चौथी आन्दाला सलग शिकावयास मिळते. तो पाचवीत असताना त्याचा बाप दुमजली घर बांधावयास काढतो. होते नव्हते ते पैसे त्यात संपतात. घरही अपूर्णच राहते. आन्दाला परीक्षा फी भरण्यास पैसे नसल्यामुळे परीक्षेस बसता येत नाही. आन्दा बापाला शेतीच्या कामात मदत करू लागतो. मनामध्ये मात्र शिकण्याची तीव्र इच्छा असते. पोरगं कामासाठी हाताशी आलेलं बघून बाप मात्र आन्दाला शाळेत पाठवण्यास तयार नाही. इथेच संघर्ष चालू होतो. आन्दाचा बाप आळशी. स्वत:ची कामे बायका, पोर व गड्यांच्या अंगावर टाकून गावभर चकाट्या पिटत हिंडायला त्याला आवडायचे. त्यातून आन्दाच्या आईला एका पाठोपाठ एक मुलं होत असतात. त्या बिचारीची पण फारच ओढाताण होते. पण आन्दाच्या बापाचा स्वभाव मात्र रागीट. शिव्यांशिवाय बोलणे नाही. बायका-पोरांना मारणे हाच त्याचा पुरुषार्थ. या सर्व परिस्थितीतून आन्दा शिकत राहतो. कधी स्कॉलरशिपसाठी प्रयत्न कर, कधी दुसऱ्यांची पुस्तके घेऊन अभ्यास कर, कधी शिकवण्या कर, असे करत करत तो एस. एस. सी पर्यंत शिक्षण जीवनाशी ‘झोंबी’ घेत पूर्ण करतो.
हे करत असतानाच त्याला मध्यंतरी चोरून बिड्या पिण्याची सवय लागते. पण एकदा मात्र त्याचा बाप त्याला पुराव्यानिशी पकडतो आणि त्याची पिटाई करतो, तेव्हा त्याची ही सवय सुटते. त्याला सिनेमा बघण्याची सवय लागते. पण सिनेमा पाहण्यासाठी पैसे मिळत नाहीत तेव्हा त्याला जुगार खेळण्याची सवय लागते. जुगार खेळताना देखील बाप त्याला पकडतो आणि मरेस्तोवर बडवतो. तेव्हा त्याची तो सवय बंद होते. आन्दाला शाळा शिकता शिकता वाचनाचे वेड लागते. सिनेमा, पुस्तके, फी यासाठी घरून पैसे मिळत नाही हे पाहिल्यानंतर त्याला चोरीची सवय लागते. एकदा तर तो मित्राच्या साहाय्याने शेजारच्या मळ्यातील तंबाखूचे तरू चोरून आणून ते विकतो. एकदा तर घरातले जोंधळे चोरून विकल्याचा आरोप आन्दाचे आई-वडील त्याच्यावर करतात. परंतु प्रत्यक्षात मात्र त्याने तसे केलेले नसते. पण बापाचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. तो त्याला तोंडातून रक्तयेईपर्यंत मारतो, तेव्हापासून त्याची चोरीची सवय मात्र कायमची बंद होते.
आन्दा एस. एस. सी. पास झाल्याची गुणपत्रिका घेतो आणि हायस्कूलच्या कंपाउंडच्या बाहेर पडतो. पुढचे वर्णन यादवांनी असे केले आहे– ‘बेडकासारखा उंच उंच उड्या मारत घराच्या दिशेने धावलो. मनातून अनेक बेडूक विहिरीबाहेर पडले होते. त्यांचं आकाश आता मोठं झालं होतं. कष्ट, उपासमार, ओढाताण, अज्ञान, जुलूम यांच्याबाहेर त्यांची उडी गेली होती. नवी विस्तीर्ण क्षितिजं दिसू लागली होती. काय करायचं नक्की नव्हतं. पण एकदम मोकळ्या हवेत आल्यासारखं वाटत होतं.’
या पुस्तकाची प्रस्तावना पु. लं. ची आहे. पु. ल. म्हणतात, ‘आजच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अस्वस्थ होऊन धुमसणे हाच ग्रामीण जीवनाचा स्थायी भाव आहे. त्या अस्वस्थपणाचा स्फोट मराठी साहित्यात सुरू झालाच आहे. हे व्हायला हवेतच होते. शिवाय, साऱ्या जगातलं साहित्य समृद्ध केलं आहे, ते या ‘झोंबी’ सारख्या वाचकाला अस्वस्थ करणाऱ्या ग्रंथानीच!’
‘झोंबी’ वर ते अकारण अधिक ताणल्याचा एक आक्षेप घेतला जातो. याला उत्तर ह्याच पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये मिळते. परिशिष्टामध्ये आनंद यादवांनी ‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ नावाचे एक टिपण लिहिले आहे यामध्ये त्यांनी आपण वैचारिक आत्मचरित्र लिहिण्याऐवजी ललित आत्मचरित्रात्मक कादंबरी का लिहिली हे ते स्पष्ट करतात. हे पुस्तक लिहिताना यादवांनी कादंबरीची संकल्पना गृहीत धरली आहे ती अशी– ‘कादंबरी ही गद्य साहित्यकृती असते. ती सर्जनशील अनुभवाचा आकृतीबंध असते. कथेतील अनुभवाच्या तुलनेने कादंबरीत अधिक व्यामिश्र स्वरूपाचा अनेक व्यक्तींशी संबंधित अशा ताणतणावांतून निर्माण झालेला कलानुभव असतो. तो कथेच्या तुलनेने अधिक विकसनशील, अधिक मोठ्या कालपटावर पसरलेला, अधिक व्यापक जीवनपट असतो. कादंबरीत येणाऱ्या बाकीच्या गोष्टी या अनुषंगिक असतात.’
- Sachin Atkare
Unable to beleive that there can be so much of Struggle in one`s Life with every next step... My thousand salutes and thousand bows to Every-Single-Word of this book... My struggle is nothing, his Struggle, undoubtedly has pinned down me to earth, Speechless...
- Pranav Kulkarni
Its an autobiography of author. Highly recommend to you all!!!
- Amit Pingulkar
Really Amazing !!!! Superb !!!!
- Rushikesh Neeta Ramesh Wadke
bhari book, ekdam nakki vaccha, far bhari aahe
- Best Books to Read FACEBOOK PAGE
Zombee literally means wresting. This is an account of a youth from interior Maharashtra. He fights his way through just to complete his secondary education. His landless father tilling lands for others, thinks his son`s education not only unaffordable but unwise also, He helplessly watches his mothr permanently fated to thankless labour, contineously working for an evergrowing family deep in the cluthes of customs and superstitions. He had to wrestle with hardships and hunger to complete his school education. This autobiographical novel is an authentic tale as much of the author and his family as of any of the hundreds of landless families from rural interiors.
- NEWSPAPER REVIEW
‘जीवघेण्या’ साहित्य प्रकाराची मीमांसा…
झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या चार भागांत ज्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले आहे, त्या डॉ. आनंद यादव यांनी आत्मचरित्राची वाङ्मयीन व तात्त्विक चर्चा करण्यासाठी ‘प्रस्तुत ग्रंथाचा प्रपंच’ केला आहे. कथा-कादंबरीपेक्षा हा साहित्यप्रकार वेगळा कसा, तो वेगळा साहित्यप्रकार म्हणून मानला गेला आहे का, स्वातंत्र्योत्तर काळात आत्मचरित्रे कथा-कादंबऱ्यांपेक्षा जास्त प्रमाणात का आली, तरीही त्यांची एकूण संख्या कमी का, अशा तऱ्हेचे विवेचन कुठेही डॉ. यादव यांना मराठीत आढळले नाही. ही उपेक्षा दूर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.
आत्मशोध ही कल्पना भारतीय तत्त्वज्ञानात पूर्वीपासूनच असली, तरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासूनच मराठीत आत्मचरित्रे येऊ लागली आहे. त्यामध्ये ‘स्व’चा भौतिक शोध असला, तरी पाश्चात्त्य आत्मचरित्रांपेक्षा ती भारतीय दृष्टिकोनामुळे वेगळी झालेली आहेत. आत्मचरित्र लेखनामागे विविध प्रेरणा असू शकतात. दादोबा पांडुरंग किंवा बाबा पद्मनजी यांच्या आत्मचरित्रांमध्ये वैयक्तिक जीवन गौण स्थानी; तर सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे इतिवृत्त सांगण्यावर भर होता. सार्वजनिक जीवनात प्रसिद्ध अशा व्यक्ती, आपल्याबद्दल गैरसमज होऊ नयेत म्हणून आत्मवृत्त लिहितात. व्यक्तिगत इतिहास लिहिणे ही काही आत्मचरित्रांची प्रेरणा असते. तर काही भूतकाळात रमण्याच्या उद्देशाने लिहिली जातात. लिखाणाच्या प्ररेणेप्रमाणे त्या त्या आत्मचरित्राला विशेष आकार प्राप्त झालेला असतो.
आत्मचरित्र हा चरित्राचाच उपप्रकार आहे हे आन्द्रे मौरॉज यांचे मत डॉ. यादव यांना मान्य नाही. ‘नायका’च्या व्यक्तिमत्त्वावरून आत्मचरित्रांचे अंतर्मुख व बहिर्मुख असे प्रकार करता येतील. त्यातील पहिला प्रकार वैयक्तिक, प्रापंचिक, आत्मकेंद्रित असा असून सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची आत्मचरित्रे बहिर्मुख स्वरूपाची असतात. लेखनाच्या मांडणीला प्राधान्य देऊन आत्मचरित्रांचे तत्त्वज्ञानात्मक, इतिहासात्मक आणि साहित्यरूपी असे वर्गीकरण करता येईल. बहुसंख्य आत्मचरित्रे इतिहासात्मक वर्गीकरण करता येईल. बहुसंख्य आत्मचरित्रे इतिहासात्मक असतात. कादंबरीच्या स्वरूपात लिहिलेली ‘पोएटिक’ आत्मचरित्रे (श्यामची आई, तुंबाडचे खोत) ही डॉ. यादवांच्या मते कादंबऱ्याच असतात; कारण त्यात काल्पनिक घटना व पात्रे निर्मिलेली असतात. ‘साहित्यरूपात्मक आत्मचरित्र मला आत्मचरित्रच वाटत नाही,’ असे म्हणतात.
निदान ६० वर्षांचे होईपर्यंत आत्मचरित्र लिहू नये, असे सांगून डॉ. यादव म्हणतात की, १९७० नंतर नवजागृत समाजातल्या तरुण पिढीने लिहिलेली आत्मचरित्रे रोचक असली, तरी अर्धकच्ची झाली आहेत.
स्वत:पासून अलिप्त होऊन स्वत:बद्दलचा विचार करण्याची एक विघटनाची प्रक्रिया आत्मचरित्रात असते. घटनाची निवड, रचना, त्यातून आकृतीबंध व नीटसपणा यासाठी प्रतिभेची आवश्यकता असते. त्यात स्मरणशक्ती, संवेदनशक्ती, कल्पकता, उत्कटता इत्यादींचाही सहभाग असतो. आत्मचरित्रातील संभाव्य दोषांबद्दल विवेचन करतानाच ते कसे टाळता येतील, अशीही चर्चा डॉ. यादव यांनी केली आहे. विस्मरण, निवडक स्मरण, वस्तुस्थिती विपर्यास, लज्जास्पद गोष्टी टाळणे असे अनेक धोके या लिखाणात संभवतात. त्यावर कालिक परिणामही होतो. मराठीत आत्मचरित्रांची लाट आल्यावर जी आत्मचरित्रे लिहिली गेली, त्यात उत्साह जास्त, अभ्यास कमी होता. तत्कालीन प्रश्नांना प्राधान्य दिल्याने ती खूप प्रसिद्धी पावली; पण नंतर कालबाह्य ठरली.
‘जो ललित लेखक असतो तो आपल्या कथा, कादंबरी किंवा नाटकात एक प्रकारे आत्मचरित्रच लिहीत असतो... त्यामुळे एखाद्या साहित्यिकाचे समग्र साहित्य हे त्याचे एका अर्थाने परिपूर्ण आत्मचरित्रच असते,’ असे मत जयवंत दळवी यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’च्या प्रस्तावनेत लिहिले आहे. परंतु डॉ. यादव यांच्या मते प्रत्यक्ष घटना व त्यावर आधारित साहित्यकृती या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे साहित्यिक आत्मचरित्र लिहू शकतो व त्यात त्या त्या घटनांचा साहित्याचा कसा वापर केला हेही सांगू शकतो; परंतु अनेक साहित्यिकांची आत्मचरित्रे फसली आहेत. कारण त्यात जीवनाचा सर्वांगीण अभ्यास दिसत नाही.
‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ हा डॉ. यादवांना वदतोव्याघात वाटतो. कारण आत्मचरित्र हे घटित; तर कादंबरी काल्पनिक असते. आत्मचरित्र लिहिण्यासाठी लेखनकौशल्य हवेच. घटनांची काटेकोरपणे निवड न केल्यास ‘कऱ्हेचे पाणी’तल्याप्रमाणे अस्ताव्यस्तपणा येतो. निवडीत अतितटस्थता आली तर ते महर्षी कर्वे यांच्या ‘आत्मवृत्ता’प्रमाणे कोरडे होते. एकाच हेतूने लिहिलेली आत्मचरित्रे संकुचित होतात. उदाहरणार्थ, आनंदीबाई विजापुरे, कांचन घाणेकर, कमल पाध्ये यांची आत्मचरित्रे.
आत्मचरित्रे ही झाडाझडती नसून त्यात घटनांची निवड केलेली असते. निवडीचा दृष्टिकोन लेखकाचा असतो आणि तो मान्य करूनच आत्मचरित्र वाचायचे असते, असे डॉ. यादव सांगतात. ‘आत्मचरित्र हा एका व्यक्तीने स्वत:च, स्वजीवनाचा नेटकेपणाने काढलेला चैतन्यपूर्ण व कलात्मक आलेख असतो’ या वस्तुस्थितीद्वारे आत्मचरित्र समीक्षेची सूत्रे निश्चित करता येतील असे मत मांडून अखेर आत्मचरित्र हा एक जीवघेणा साहित्यप्रकार आहे, असा समारोप डॉ. यादवांनी केला आहे. प्रत्यक्ष जीवन जगलेला ‘मी’ आणि आत्मचरित्र लिहिणारा ‘मी’ यांच्यातील सखोल ताणाचा अपरिहार्य परिणाम अभिव्यक्तीवरही होणारच!
आत्मचरित्रांसंबंधी स्वतंत्र असे हे पहिलेच पुस्तक असले तरी ‘चरित्र आणि आत्मचरित्र’ या श्री. सदा कऱ्हाडे यांच्या ग्रंथात आत्मचरित्रावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे; परंतु त्यातल्या पहिल्याच वाक्याशी डॉ. यादव सहमत नाहीत. ते वाक्य असे, ‘आत्मचरित्र हा चरित्राचाच एक प्रकार आहे.’ आत्मचरित्रातील सत्यासत्यता हा फारच गुंतागुंतीचा प्रश्न वाटतो. स्वाभाविक विस्मरण, औचित्यासाठी केलेला सत्यापलाप, आठवणींची कल्पनाशक्तीने केलेली भरपाई, इत्यादींमुळे आत्मचरित्रातील सत्य धूसर बनत जाते. चरित्रातील सत्याप्रमाणे ते पडताळून पाहता येत नाही, हे खरेच आहे; परंतु आत्मचरित्राच्या वाचकांनी लेखकावर पूर्ण विश्वास टाकावा, की इतर मार्गांनी त्याच्या लेखनातील खरेखोटेपण शोधून काढावे, हे स्पष्ट होत नाही. त्यामुळेच ‘प्रांजळपणा’ हे मूल्य कसे सिद्ध करता येईल, ते कळत नाही.
‘एका पानाची कहाणी’च्या प्रस्तावनेत आत्मकथा हा लेखनाचा सर्वांत अवघड प्रकार आहे, असे मान्य करून वि. स. खांडेकर म्हणतात की, ‘पूर्ण सत्य सांगता आलं नाही, तरी मर्यादित सत्याला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न करावा, असं मला वाटू लागलं,’ आणि म्हणून त्यांनी आत्मकथा लिहिली. तर आत्मचरित्र हा एक लपवाछपवीचा खेळ आहे, असे जयवंत दळवींचे मत असल्याने ते आत्मचरित्राऐवजी लेख लिहितात!
घटनांच्या निवडीइतकेच त्यांचे शब्दांकनही कठीण असते. कारण लेखनसरावाचा आत्मचरित्राला उपयोग होऊ शकत नाही. हे म्हणजे, ‘पहिल्याच बॉलवर षटकार मारण्याची जोखीम’ आहे, अशा योग्य शब्दात डॉ. यादव त्याचे वर्णन करतात. ज्या आत्मचरित्रांमध्ये स्वत:च्या कर्तृत्वाबद्दल अतिशयोक्ती दिसते ती ‘आत्मपूजेची खाजगी देवळे वाटतात’ हे विवेचनही अतिशय नेटके वाटते. तर ‘मनातली मळमळ व्यक्त करण्यासाठी आत्मचरित्रे लिहिणे म्हणजे ढेकूण, डास मारण्यासाठी तोफा डागण्याचा प्रकार असतो’ या विधानात त्यांना आत्मसमर्थनाची वाटणारी चीड व्यक्त होते.
‘विशेषत: स्त्रियांची आत्मचरित्रे संकुचित भावनेने प्रेरित होऊन पूर्व घटनांच्या केवळ स्मरणावर लिहिली जात असावीत.’ हे डॉ. यादव यांचे मत सहजी मान्य होईलसे वाटत नाही. नवजागृत समाजातल्या तरुण पिढीची आत्मचरित्रे आयुष्यात फार लवकर लिहिलेली म्हणून अर्धीकच्ची राहतात, असे डॉ. यादव म्हणतात; तर चंद्रकुमार नलगे व डॉ. गंगाधर पानतावणे यांना असे वाटते की, त्या आविष्काराला आत्मचरित्र न म्हणता आत्मकथन म्हणावे. आत्मचरित्र आयुष्याच्या मावळतीला लिहिली जातात. प्रौढत्वामुळे ती स्थिर व संयमी असू शकतील; परंतु आत्मकथने आयुष्याच्या ऐन उमेदीत लिहिलेली असतात. त्यात तारुण्याच्या तीव्र प्रतिक्रिया असतात. त्यात प्रवाह असतो. आत्मकथने बहुतांशी नाकारलेल्या समाजघटकांनी लिहिलेली आहेत. त्यामुळे त्यांचा सामाजिक संदर्भ महत्त्वाचा असतो. त्यात आत्मपरीक्षण आढळते, इतिहासलेखन नव्हे.
सैद्धान्तिकदृष्ट्या प्रत्येकच जण आत्मचरित्राचा विषय आहे; परंतु प्रत्यक्ष आत्मचरित्र लेखन हा साहित्यप्रकार किती कसोट्यांमधून उतरावा लागतो हे ‘आत्मचरित्रमीमांसा’ वाचल्यावर लक्षात ये, म्हणूनच तो ‘जीवघेणा’ आहे, या डॉ. आनंद यादव यांच्या मताशी आपण सहमत होतो!
-उषा तांबे
- DAINIK GAOKARI 29-08-2010
झोंबी संघर्षाची हकिगत…
भारतीय साहित्य अकादमीने गौरविलेल्या मराठी ग्रंथांचा मागोवा...
‘झोंबी’ (१९८७) हे आनंद यादव यांचे आत्मचरित्र आहे. सामान्यत: लेखक ‘मी’ आपल्या बालपणाची, मॅट्रिक होईपर्यंतची हकिगत येथे सांगत आहे. या सांगण्यासाठी नैसर्गिक कालक्रमाची निवड केली आहे. प्रारंभी आई-वडिलांचे लग्न, थोडा घराण्याचा पूर्वेतिहास त्रोटक पद्धतीने सांगितला आहे. जन्म व या काळातील इतर घटना यांचे कथन येथील मी तृतीय पुरुषी अलिप्त निवेदक सांगतो. या घटना ‘मी’च्यासमोर घडलेल्या नाहीत. ऐकीव घटितांची माहिती तो स्वत:च्या दृष्टिकोनातून मांडत जातो. जन्मापासून पुढील आठवणाऱ्या घटना जिव्हाळ्याने सांगतो, त्या प्रत्यक्ष जगण्याच्या अनुभवातून स्फुरलेल्या आहेत. सांगण्याचा काळ ‘आत्त्ताचा’ आहे. घडलेल्या घटना मात्र गतकालीन आहेत. पुन्हा एकदा बालपणाचा काळ जगण्याचा हा प्रयत्न आहे.
घटना बालपणीच्या असल्या तरी निवेदक ‘मी’ प्रौढ झालेला आहे. मॅट्रिकपर्यंतच्या शिक्षणाने पुढे तो उच्च विद्याविभूषित झाला, लेखक झाला. ग्रामीण साहित्य चळवळीचा उद्गाता आणि साहित्य मीमांसक झाला आहे. अनुभवसंपन्न व्यक्तित्व सर्जक व्यक्तित्व पुन्हा आपल्या बालपणातला काळ जिवंत करीत आहे.
या आत्मचरित्राला पु. ल. देशपांडे यांची प्रस्तावना आहे. ‘एक बाह्य हरवलेलं बालकांड’ असे पु. ल. देशपांडे यांचे आकलन व अर्थनिर्णयन आहे. ते म्हणतात, ‘लौकिकार्थाने यशस्वी ठरलेल्या लेखकाने ‘झोंबी’ असे नाव देऊन बालपणाची कथा सांगितली आहे. तो आपले बालपण आठवत गेला आहे आणि एखाद्या गवयाने राग आळवावा तसा आळवीतही गेला आहे. या कलापूर्ण आळवण्यामुळे हा केवळ बालपणातल्या नाना प्रकारच्या कडू-गोड घटनांचा अहवाल न होता ही एक सुंदर ललितकृती झाली आहे. ‘झोंबी’ हे आत्मचरित्र सुंदर ललितकृती होण्याची कारणे लेखकाचे संघर्षजीवन, या संघर्ष जीवनातील सत्यकथन ही आहेत. निवेदनात एक अकृत्रिमता सांगण्याचा पवित्रा, स्थानिक बोलीभाषा, प्रसंग निर्मितीतील नाट्यमयता, संवादशैली अशा कथन पावित्र्यांमुळे ‘झोंबी’चे कथन थेट वाचसंवाद साधते. आपण सांगत आहोत आणि वाचक ऐकत आहेत, ही निवेदकांची पक्की खात्रीही आहे. उदा.
त्या दिवशीचे पेपर देऊन मी घराकडे गेलो नि रातचं दादाला म्हणालो, ‘दादा साळंची सा महिन्याची फी तटलीया. मास्तर म्हणालं फी दिलीस तर परीक्षेला बसू देईन. मला बारा आणं दे.’ ‘मूत त्या शाळंवर. तुला मी परवादिशी काय सांगितलं हुतं, आपणाला शाळा नगं म्हणून. आता बारा आणे म्हजे दोन बायकांचा पगार. ते देऊनबी नापास झाल्यास तर, तेवढा पैसा त्या मास्तराच्या मढ्यावर घाटल्यागत हुईल. नगंच जाऊ उद्या पेपराला. उसाची उकटणी चाललीया. चल मळ्याकडं. तेवढच चार चिरं झालं तर एक माणसाचं काम हुईल.’
प्रसंगनिर्मिती आणि प्रसंगाचा उपरोक्त आशय हे ‘झोंबी’ या आत्मचरित्राचे केंद्र आहे. ही झोंबी परिस्थितीशी आहे आणि त्याचवेळी प्रत्यक्ष वडिलांशीही आहे. कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक विपन्नावस्था आणि दादाचा स्वभाव, कृती यांच्याशी संघर्ष करीत इप्सिताच्या दिशेने केलेली वाटचाल, अशी ‘झोंबी’ची आशयात्मकता आहे. सामान्यत: १९०४ ते १९५५ अशा कालिकतेचा, ग्रामीणतेचा प्रत्यय येथे आहे. रयत-कूळ असलेल्या शेतकऱ्यांच्या घरातली ही ‘झोंबी’ आहे. खेड्यातल्या शिकू पाहणाऱ्या पहिल्या पिढीची ही लढाई आहे. शेतकऱ्याच्या घरात भरपूर मुले, अन्नाची दशा, शिक्षणाबद्दल अनास्था, दुष्काळातले अभाव, कष्ट-यातना हे सारे असते. म. फुले यांनी शेतकऱ्याच्या दुःखाचे कारण ‘अविद्या’ हे सिद्ध केले होते. येथे पहिल्या पिढीतला शिकू पाहणाऱ्या पिढीतला ‘आंदा’ या अविद्येचा नायनाट करण्यासाठी धडपडतो आहे. शेतात राबण्याशिवाय गत्यंतर नाही आणि शिक्षणाशिवाय राह्येचे नाही, अशी कोंडी आंदाची होते. खाणारी तोंडे जास्त, नाकर्ता आळशी-दिखावू दादा, सतत कष्टाने गांजलेली आई, मधूनच भेडसावणारे दुष्काळ अनेक पातळ्यांवरचे अभाव, निर्मितीसाठीचे जीवनसंबद्ध निर्माणक्षम आणि कष्टाळू मन या आंदाच्या उभारणीत ऊर्जेचे काम करते. जिद्द, आत्मविश्वास, कष्टाची तयारी, ज्ञानाची लालसा, कलासक्तता असे गुण आंदाच्या व्यक्तिमत्वात आहेत. मॅट्रिक उत्त्तीर्ण झाल्यावर आणि ‘झोंबी’च्या अखेरीस येते, ते चिंतन या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
‘बेडकासारखा उंच उंच उड्या मारत घराच्या दिशेनं धावलो. मनातून अनेक बेडूक विहिरीबाहेर पडले होते. त्यांचं आकाश आता मोठं झालं होतं. कष्ट, उपासमार, ओढाताण, अज्ञान, जुलूम यांच्याबाहेर त्यांची उडी गेली होती. नवी विस्तीर्ण क्षितिजं दिसू लागली होती. काय करायचं नक्की नव्हतं, पण एकदम मोकळ्या हवेत आल्यासारखं वाटत होतं.’
बेडकाच्या रुपकाचा जगण्याशी-झुंजण्याशी लावलेला संबंध अन्वर्थक आहे. बेडूकउडी ही काठावरची, फार उंच झेप घेता येत नाही, पण क्षितिज पाहणारे मन-जिद्द या निवेदक ‘मी’मध्ये आहे. पाचवीत शाळा सोडावी लागणे, सातवीनंतर शाळा सोडावी लागणे, मध्ये मध्ये शाळेत जाताच न येणे अशा ज्ञान अविरुद्ध करणाऱ्या घटनांनी आणि यातनांनी गाजलेला ‘मी’ म्हणतो -
‘मराठी भाषाही अशुद्ध बोलणाऱ्या मला कुणबटाला, संस्कृतमध्ये सर्वांत जास्त मार्क्स होते.’ आत्मचरित्रातील व्यक्तिजीवनाची वाटचाल ‘कोठून-कोठपर्यंत’ हे सांगणारी असते. कुणब्याच्या घरातला ‘आंद्या’ मॅट्रिकपर्यत पोहोचणे, ही झुंज आहे, उडी आहे, गतिमान असा सामाजिक बदल आहे. पुढील काळासाठीदेखील गतिमान परिवर्तनाच्या शक्यता राखल्या गेल्या आहेत.
येथील ‘मी’चा आत्मविष्कार व्यक्तिकेंद्री न होता कुटुंब-समाज यांनाही आपल्यासोबत घेणारा आहे. शेतकऱ्याच्या घरातले दारिद्र्य-दुःखेही येथे प्रातिनिधिक स्वरुपात व्यक्त झाली आहेत - ‘त्यात हा दुष्काळ, घरदाराला, रेशनचं सातू, मिलो जोंधळा पिवळा किडका डुकरी मका, सजगुऱ्याची चव असलेला तांदूळ. हा तांदूळ दळून-भरडून, कण्या, भाकरी करुन, उकडून आमटीबरोबर, नाही तर ताकाच्या पाण्याबरोबर खावा लागायचा.
हातात रेशनला पैसा पाहिजे म्हसरांचं सगळं दूध रतिबाला जात होतं. शेळीचं नि गाईचं दूध घरात ठेवलं जात होतं. सजगुरं उकडल्यागत भाताची चव लागे. सातूची चपाती चमड्यासारखी वातड होई. पिवळ्या मक्याच्या भाकरीचा कुबट, कसनुसा वास मारत असे.’ या तपशिलवार वर्णनामुळे काळ-जीवन यांचे प्रत्ययकारी दर्शन घडते. शिवाय यापेक्षा वेगळे जगणे इतरांच्या, शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेले नसायचे.
या आत्मचरित्रातील घटनाकथन जे घडले, जसे घडले अशा पद्धतीने आणि सत्यप्रतिज्ञेने सांगितले आहे. आत्मगौरव किंवा स्वकीय गौरव, आत्मसमर्थन असे या घटनाकथात काही नाही. दारिद्र्याचे वा अभावांचे दाखवेगिरीने कथनही आलेले नाही. हा निवेदक स्व-वर्तनांची चिंतनशील चिकित्सा करतो. विशिष्ट परिस्थिती वा माणसे यांच्या कचाट्यात आपण कसे सापडलो होतो हे तटस्थतेने पाहतो. स्वरसरंजनात्मकता किंवा दु:खाचे उदात्तीकरण, यातनांचे कौतुक असे येथे काही नाही.
आंदा शेतकरी कुटुंबातील असल्याने या आत्मचरित्रातील तपशील शेतीकामाशी निगडित असणे, शेतकरीबोलीत असणे स्वाभाविकच ठरले आहे. ‘झोंबी’चे सामाजिक दस्तऐवजी स्वरुपही महत्त्वाचे आहे. दु:ख-संघर्षाचे दस्तऐवजीकरण करताना रोमँटिक हळवेपणा येण्याची शक्यता असते. आनंद यादवांनी प्रत्यक्ष जीवनवास्तवाची उभारणी करताना हकिगतीला रोमँटिक होऊ दिलेले नाही.
एक निखळ ग्रामजीवनातील ही संघर्षाची हकिगत गतकाळाला, शेतकरी कुटुंबाला, खेडेगावाला जिवंतपणा देणारी ललितकृती ठरली आहे.