- Mahesh S
दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडवून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुडवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन व इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावरून चढून वर पोचली.
खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले?
- MAHARASHTRA TIMES 27-03
खिळवून ठेवणारी युद्धकथा...
युद्धकथा, साहसकथा यांकडे वाचकांचा कामयच मोठा ओढा राहिलेला आहे, मग तो पाश्चात्त्य वाचक असो वा भारतीय. इंग्रजी वाचकांनी डोक्यावर घेतलेल्या अॅलिस्टर मॅक्लीन या युद्धकथा लेखकाची ‘द गन्स ऑफ नॅव्हारन’ ही कादंबरी.’ दुसऱ्या महायुद्धातील एका काल्पनिक लढाईवर आधारलेली ही इंग्रजी कादंबरी वेगवान कथानक, क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी वर्णनात्मक शैली आणि लष्करी डावपेचांचे रंजक तपशील, यांमुळे लोकप्रिय ठरली होती. १९५७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंरीवर साठीच्या दशकात प्रदर्शित झालेला त्याच नावाचा चित्रपटही अफाट यशस्वी ठरला होता. अशा या वेगवेगळ्या माध्यमात पसंती मिळवलेल्या कथानकाचा अशोक पाध्ये यांनी केलेला मराठी अनुवादही तितकाच खिळवून ठेवणारा आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या ऐन धामधुमीत भूमध्य समुद्रातील एका बेटावर अडकून पडलेल्या बाराशे ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्याच्या मार्गातील मोठा अडथळा असलेल्या नॅव्हारन नामक बेटावरच्या अजस्त्र तोफा नष्ट करण्याची, विमाने आणि आरमाराच्या ताफ्यांना प्रयत्नांनी न जमलेली जबाबदारी कॅप्टन कीथ मॅलरी आणि त्याच्या चार सहकाऱ्यांच्या खांद्यावर येऊन पडते. खिळखिळ्या बोटीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास समुद्रातील वादळ, नॅव्हारन बेटावर पोहोचल्यावर सरळसोट उभा कडा, हाडे गोठवणारी थंडी, जायबंदी झालेला सहकारी अशा सगळ्या संकटांच्या मालिका घेऊन येतो. अधूनमधून भेटणाऱ्या शत्रू सैनिकांना कधी आपल्या वेशांतराने चकवत तर कधी लष्करी सराईतपणे दोन हात करत आपल्या लक्ष्याच्या, तोफांच्या दिशेने ही तुकडी मार्गक्रमण करते, हा सगळा प्रवास अत्यंत रोमांचक, वेगवान आहे. लेखक मॅक्लीन यांनी स्वत: काही वर्षे नौदलातील कामाचा अनुभव घेतलेला असल्यामुळे कथेत उतरलेल्या बारीकसारीक तपशिलांमुळे हा थरार वाढत जातो. कथा पुढे सरकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भौगोलिक प्रदेशाचे वर्णन एवढे बारकाईने आले आहे की, नकाशासह तेथील समुद्र, बेटे, किल्ला, गुहा आदी तपशील चित्रासारखे डोळ्यापुढे उतरत जातात. या गुप्त मोहिमेचा नेता न्यूझीलंडचा गिर्यारोहक कॅप्टन मॅलरी, कोणत्याही परिस्थितीत हार न मानणारा ग्रीक अँड्रिया, अमेरिकन धूर्त-हिकमती मिलर, अनुनभवी-कोवळा स्टीव्हन्स, तंत्रज्ञ ब्राऊन आणि त्यांना नॅव्हारनमध्ये भेटणारे लुकी, पनायीस या सर्वांच्या व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण आहेत शिवाय, युद्धकथा असली, तरी रक्तपाताची भडक वर्णने नसल्याने कादंबरी रक्तरंजित होत नाही. मॅक्लीन यांच्या युद्धकथेचा सर्व भर सहज वर्णन, खिळवून ठेवणारी शैली यावर आहे. हा सर्व थरार मराठी अनुवादातही तितक्याच सहजपणे उतरला आहे.
अॅलिस्टर मॅक्लीन यांच्या अनेक कादंबऱ्या मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित केल्या आहेत. या मालिकेतील ही नवीन कादंबरी युद्धकथाप्रेमींच्या निश्चितच पसंतीस उतरेल, अशी आहे.
- KIRAN BORKAR 16.03.17
1961 साली प्रदर्शित झालेला" द गन्स ऑफ नॅव्हारन हा चित्रपट दुसऱ्या महायुद्धातील एका गोष्टीवर बेतला होता . तेव्हाचा सुपरस्टार ग्रेगरी पेक ह्याने मुख्य भूमिका केली होती . खैसर या बेटावर अडकलेल्या 1200 ब्रिटिश सैनिकांची सुटका करण्यासाठी एका चार जणांच्या पथकाची नियुक्ती होते . खैसर बेटाजवळ जाणाऱ्या बोटींना प्रमुख अडथळा होता तो नॅव्हरान बेटावरील किल्ल्यावर असलेल्या महाकाय तोफांचा .त्या तोफा नष्ट करण्यासाठी उंच कडा पार करून जाणे भाग होते . त्या तोफा नष्ट करायची कामगिरी या पथकावर सोपवली जाते . जर्मन आणि इटालियन सैनिकांच्या कडक पहाऱ्यात आणि ब्रिटिश आरमाराच्या बोटी नष्ट करण्याआधीच तो उंच कडा पार करून त्या तोफा नष्ट करणे जरुरीचे होते . अतिशय थरारक अशी कादंबरी .
- DAINIK AIKYA 08-05-2016
दुसऱ्या महायुद्धात ‘खेरोस’ या छोट्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक अडकून पडले होते. हे बेट तुर्कस्तानच्या जवळ होते. त्यांना सोडवायला जाणाऱ्या बोटींना नॅव्हारन बेटावरील महाकाय तोफांचा अडथळा होता. त्या तोफा त्यांच्या समोरच्या समुद्रातील कोणतेही जहाज सहज बुडवू शकत होत्या. नॅव्हारनवर एक भक्कम किल्ला होता. तिथे जर्मन आणि इटालियन सैन्य होते. अशा या तोफा नष्ट करायला मूठभर माणसांची तुकडी बेटाच्या मागच्या कड्यावर चढून वर पोचली. खेरोस बेटावरील सैनिकांना सोडविण्यास येणारे ब्रिटिश आरमार, तोफांचे त्यावर धरले जाणारे नेम आणि त्या नष्ट करण्यासाठी पुढे सरकलेली ती मूठभर घातपात्यांची तुकडी’ यांच्यात शर्यत लागली. शेवटी कोण जिंकले?
- DAINIK TARUN BHARAT 13-03-2016
मनाची पकड घेणारी कादंबरी…
गन्स ऑफ नॅव्हारन ही मुळातील अॅरिस्टर मॅक्लिन यांची कादंबरी. ते स्वत: दुसऱ्या महायुद्धात होते. त्यावेळी ब्रिटिश नौदलामध्ये आलेल्या अनुभवांवरून कादंबरीची रचना केली आहे. अशोक पाध्ये यांनी तिचा अनुवादही प्रभावीरीतीने केला आहे. नॅव्हारन बेटावरील किल्ल्याच्या बुरुजावर दोन तोफा जर्मनांनी बसविल्या होत्या. त्या तोफा चारशेहे फूट उंचीच्या पुढे आलेल्या सुळक्यावर बसविल्याने त्यांना महत्त्व आले होते. भूमध्य समुद्रात खेरोस नावाच्या बेटावर १२०० ब्रिटिश सैनिक होते. त्यांना सोडवायचे तर नॅव्हरन बेटावरील तोफांचा अडथळा होता. अशा मोक्याच्या ठिकाणी रडारयुक्त तंत्रांनी समृद्ध या तोफा जर्मनांनी अशा जागेवर बसविल्या होत्या की समुद्रमार्गातून शत्रूच्या बोटी जाऊच शकत नव्हत्या.
या तोफा नष्ट करण्यासाठी मोजक्या माणसांची एक तुकडी मागील बाजूने कड्यावर जाऊन पोचते व अनेक संकटांना तोंड देत त्या तोफा नष्ट करून समुद्रमार्ग निर्वेध करते. हे कथानक मॅक्लिन यांनी या कादंबरीत रंगविले आहं. रविवारपासून बुधवारपर्यंतच्या चार दिवसांतील दोस्त सैन्यातील पथकाचा पराक्रम, त्याची दिनचर्या, त्या अधिकाऱ्यांचे संवाद यांचे चित्रण या कादंबरीत आहे. ३२० पृष्ठांच्या या कादंबरीत नाचगाणी, प्रणय प्रसंग, बाष्कळ विनोद, वेगवेगळ्या शहरांचे छायाचित्रण यांना अजिबात स्थान न देता केवळ साहसदृश्ये रंगवून मॅकलीन यांनी या कादंबरीची रचना केली. कथाकार किंवा कादंबरीकार कितीही हुशार असला तरी त्याला पटकथा लिहिणे जमेल असे नाही. यासाठी चित्रपट कंपनीमध्ये पटकथा विभाग हा वेगळाच असून पटकथेचे तांत्रिक ज्ञान असणारे लेखक त्यामध्ये असतात. त्यामुळे चित्रपट लक्षात घेऊन पटकथेवरती संस्कार होतात.
अशोक पाध्ये यांनी गो. नि. दांडेकरांच्या साहसकथेवर आधारित चित्रपट न निघाल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्या कथेमध्ये एक डोंबरी कुटुंब महाकाय तोफ निकामी करते असे दाखविले आहे. पण चित्रपटनिर्मितीत घातलेला पैसा वसूल होण्याची खात्री निर्मात्यात नसल्याने असे चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत दिसून येत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
या कादंबरीचे सामर्थ्य पाश्चात्य चित्रपटसृष्टीला पटल्याने त्यावर चित्रपट झाला व तोही विलक्षण गाजला. बेळगावला त्यावेळी असणाऱ्या श्रीकृष्ण टॉकीजमध्ये पाश्चात्य युद्धपटांची मांदियाळी होती, आता किर्लोस्कर रोडला जे टॉकीज होते असे सांगावे लागते. त्या ठिकाणी आता रेडिमेड कपड्याची दुकाने झाली आहेत. ‘द ग्रेट एस्केप’, ‘टु हेल अँड बॅक’, ‘गन्स ऑफ नॅव्हारन’, ‘द लाँगेस्ट डे’ सारखे युद्धपट पाहिल्यावर मला असे वाटले की युद्धपट बनवावेत तर त्यांनीच. पटकथेपासून नेपथ्य, पात्रांची निवड, प्रसंग प्रभावी होण्यासाठी केलेले छायाचित्रण इ.गोष्टींचा विचार त्यामध्ये झाल्याने आपण सिनेमा न पाहता प्रत्यक्ष युद्धच पाहात आहोत, असा प्रेक्षकांचा समज होण्यात आश्चर्य नसे. रामायण, महाभारतावर आधारित टीव्हीवर मालिका दाखविल्या गेल्या तरी हा तपशीलवार विचार त्यावर झालेला दिसत नाही. या मालिका पाहणे हे पुण्यकृत्य ही भावनाच त्यामागे होती.
नॅव्हारनच्या तोफा नष्ट करण्याची मोहीम फक्त ४ दिवसांची आहे. त्यासाठी केवळ ५ जणांची टीम, पराक्रम करते. या मोहिमेचा निर्माता ब्रिटिश नौदालातील विध्वंसक मोहिमांचा प्रमुख कॅप्टन जेम्स जेन्सन हा होता. शत्रूला फसविणे, चकवा देणे, गोंधळात टाकणे, वेशांतर यात तो प्रवीण असल्याने त्याच्या निकटच्या सहकाऱ्यांच्याही लक्षात त्याचे वेशांतर येत नसे. कॅप्टन कीथ मॅलरी याच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट अन्डी स्टीव्हन्स, सैन्यात ४० वर्षे काढलेला डस्टी मिलर, कॅसी ब्राऊन आणि लेफ्टनंट अँड्रिया ही ग्रीक व्यक्ती यांचे मिळून हे पथक होते. त्यातील प्रत्येक सदस्य हा वेगवेगळ्या कामात प्रवीण होता. याआधी नॅव्हरनवर पॅराशूटद्धारे उतरण्याचे दोन प्रयत्न विफल झाले होते. त्यापासून बोध घेऊन जेन्सने मोठ्या हुषारीने ही मोहीम बनविली होती.
जर्मन शत्रूच्या लक्षात येऊ नये म्हणून अॅलेक्सपासून वीस मैल अंतरावरून (सायप्रस) लांबचा पल्ला घेऊन कॅस्टेलरोसोपर्यंत विमानप्रवास केल्यानंतर या पथकाने मोटर बोटीने प्रवास केला. त्यानंतर जुन्यापुराण्या दोन डोलकाठ्या असणाऱ्या रेगिऑन नौकेतून नॅव्हारन बेटापर्यंत या पथकाचा प्रवास झाला आहे. हायकमांड केवळ किल्ल्यातला राजा कोण असावा याचाच खेळ खेळत असते. याठिकाणी प्याद्यांना महत्त्व नाही. अशी हजारो प्यादी त्यांना उपलब्ध असतात. फक्त या खेळातील काही प्यादी सरकवण्याची कृती महत्त्वाची, असा जेन्सनने हायकमांडबद्दल मारलेला शेरा या प्रसंगाची आठवण करून देतो.
संबंध कादंबरीमध्ये लेखकाने साध्या भाषेचा वापर केल्याने अर्धशिक्षित वाचकालाही कथानक उत्तमरितीने समजते. नॅव्हारनपर्यंतच्या त्यांच्या प्रवासात मॅक्लीन यांनी साध्या भाषेसह कथानक आणि पात्रांचे संवाद यात विलक्षण प्रभावी व सलग वेगाची जाण ठेवल्याने वाचक कथानकात पूर्णपणे बुडून जातो. इव्हिनिंग स्टँडर्डसारख्या वृत्तपत्रानेही ‘खिळवून ठेवणारे आणि वेगवान कथानक, ताण निर्माण करणारी आणि तपशीलातून ‘अॅक्शन’ निर्माण करणारी शैली यामुळे ही कादंबरी वाचनीय होते,’ अशी तिची भलावण केली आहे.
‘बॅटल’ आणि ‘वॉर’ यामध्ये फरक आहे. स्थानिक स्वरुपातील बॅटल मोठी असली तरी तिला लढाई म्हणतात. वॉरमध्ये युद्ध आघाडी विस्तीर्ण असते. त्यामुळे विविध ठिकाणी होणाऱ्या लढायांतून अंतिम विजय किंवा पराभव यांचा निष्कर्ष काढला जातो. म्हणून त्याला युद्ध म्हणायचे. व्हर्सायच्या तहातून दोस्त राष्ट्रांनी जर्मनी अक्षरश: ओरबाडून काढला होता अशा अवसथेत हिटलरने सहासात वर्षे विस्तीर्ण आघाड्यांवर होणरे तसेच अधुनिक तंत्रज्ञानावर आधारित (अर्थात त्यावेळच्या) व तीन दलांनी युक्त अशा सैन्याचे व्यवस्थापन कसे केले असेल ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. शेवटी दोस्तांचा विजय झाल्याने टीकास्तुती करण्याचा सर्व अधिकार त्यांना प्राप्त झाला व जर्मनी, इटली तसेच जपानवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नसली तरी साम्राज्यावर सूर्य न मावळण्याची प्रौढी मारणाऱ्या ब्रिटिश सत्तेबरोबर अमेरिका, रशिया व फ्रान्स सारख्या देशांना दीर्घकाळ झुंझवत ठेवणे व युद्धात अनेकवेळा ‘हाडे मोडण्याची परिस्थिती’ ब्रिटनवर आणणाऱ्या जर्मनीला कसे यश आले असेल या विचाराने मन खरोखर थक्क होते. युद्धविषयक कादंबऱ्यांचे व चित्रपट लोकप्रिय होण्यामागे शत्रूही तेवढाच सामर्थ्यवान होता, हे कोणालाही विसरता येणार नाही.
अत्यंत कार्यक्षम असणाऱ्या जर्मनांचे लक्ष चुकवून हे पथक तोफांपर्यंत पोचण्यात यशस्वी झाले तरी कोण्यत्याही वेळी आपण सापडू व आपली मोहीम अयशस्वी होईल याची धाकधूक पथकाच्या मनात शेवटपर्यंत आहे. खेरोसा बेटावरील १२०० ब्रिटिश सैनिकांना वाचविण्यासाठी ‘सरदार’ या विनाशिकेची योजना करण्यात आली होती. त्या विनाशिकेवर जर्मन गनर तोफ डागणार ही गोष्ट अटळ होती. त्यासाठी कोठारातून तोफगोळे लिफ्टने वर आणले जाणार ही अटकळ पथकाला होती. त्यामुळे लिफ्टची चाके इलेक्ट्रिक यंत्रणा सुरू करेल ती वर येताना स्फोट घडविणाऱ्या दोन उघड्या वायर्स जवळ आल्या व त्यापासून अर्धाइंच अंतरावर लिफ्टची चाके त्यावरून गेली की महास्फोट होण्याची यंत्रणा त्या पथकाने केली होती. त्यानुसार महास्फोट होऊन ‘हजारो टन’ वजनाचे खडक व महाकाय दोन तोफा खाली कोसळल्याने त्यांचे उद्दीष्ट साध्य झाले असे कथानक या कादंबरीत आहे. म्हणून तिला ‘गन्स ऑफ नॅव्हारन’ असे नाव दिलेले आढळते.