- Bhawari Chandrakant
स्वराज्याचे सरनोबत छञपती शिवरायांचा डावा हात तसेच प्रतीशिवाजी म्हणून ओळखले जाणारे सरनोबत नेताजी पालकर स्वराज्यातून तडकाफडकी निघून प्रथम आदिलशाही नंतर मुघलांना जाऊन मिळतात. परंतू छञपतींच्या एवढ्या जवळचा माणूस त्यांच्याशी व स्वराज्याशी गद्दारी करेलच कसा आणि त्यांना परत स्वराज्यात आणण्यासाठी महाराज एवढी धडपड कशाला करतील.महाराजांनी खेळलेला हा एक गनिमी कावा तर नसेल?या सर्व प्रश्नांची उत्तरे कल्याणीरमण बैन्नुरवार यांच्या अग्निदिव्य या कादंबरीतून मिळतात.
- हेंबाडे चंद्रभान
पुस्तक खूप छान आहे.त्यामध्ये महारांजाची दुरद्रुष्टी आणि नेताजींचा कणखर पणा आणि सहनशीलता खूप छान वर्णन केलेली आहे.
- DAINIK AIKYA 03-01-2016
हिंदवी स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर यांचे मोगलांना सामील होणे, दुर्दैवाने धर्मातरित होणे आणि प्रदीर्घ काळानंतर परत येणे, महाराजांनी त्याला कौल देणे आणि शुद्ध करवून हिंदू धर्मात परत घेणे वगैरे मराठा इतिहासातील घटना अचानक किंवा दैवदुर्विलासाने घडून आलेल्या दु:खद घटना नाहीत तर महाराजांनी गनिमी काव्याच्या राजकारणाचा एक भाग म्हणून खेळलेल्या एका धाडसी डावपेचाचा आणि सतत सावध राहून धूर्त, चपळ राजकीय खेळी करणाऱ्या औरंगजेब बादशहामुळे फसलेल्या आणि अंगलट आलेल्या राजकारणाचा अनविार्य परिपाक होता, असा कल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ठाम विश्वास आहे.
अनेक गुप्त मसलतीचे पुरावे कागदोपत्री नोंदवले जात नाहीत. त्यामुळे त्यांचा धांडोळा कागदपत्रांमध्ये घेणे शक्य नसते. परिस्थितीजन्य संदर्भ, पुसटसे उल्लेख आणि सूचक सुत्रे यांच्या मदतीने तर्कावर आधारित कल्पनेतून अशा मसलतींचा उलगडा करता येतो. इतिहासाचे लेखक अत्यंत क्लिष्ट आणि महत्त्वाच्या घटना किंवा प्रदिर्घ कालखंड केवळ एक दोन वाक्यांमध्ये सांगतात पण त्या प्रसंगामध्ये अनेकांचे अपार कष्ट, भाव-भावना, इतकेच नव्हे तर आयुष्ये गुंतलेली असतात. उपलब्ध तुटपुंज्या साधनांचा वापर आणि तर्क यांच्या आधारावरच त्या रसिकांसमोर मांडता येतात. अशा प्रकारेच वास्तवांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.
शिवरायांनी स्वराज्यसाधनेवर आणि स्वधर्मावर असलेली अव्याभिचारी निष्ठा, साध्य आणि साधन याबाबतची स्पष्टता, सहकाऱ्यांबद्दल प्रेम आणि विश्वास यामुळे त्यांचे अनुयायी त्यांच्या इच्छेखातर, शब्दाखातर, एका इशाऱ्यासरशी मती गुंग करणारी अतर्क्य साहसे करून अवघडातील अवघड कामे लीलया पार पाडताना दिसतात. सर्वस्वावर निखारे ठेवण्यात सहज सिद्ध होतात.
- DAINIK SAMANA 07-02-2016
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्थान! हे दैवत आपल्या आदराचे आणि श्रद्धेचे आहे. तसेच त्यांनी ज्यांना आपले म्हटले त्यांचा योग्य तो त्याग महाराजांनी यथोचित सत्कार करून, मानाच्या पदव्या देऊन श्रेष्ठत्व बहाल केले. स्वराज्याचे सरनोबत नेताजी पालकर हे एक श्रेष्ठव्यक्तीमत्व! अफझल खान वधासाठी निघताना महाराजांनी त्यांच्यावर स्वराज्य निरविले होते. वैऱ्यांच्या गोटात प्रतिशिवाजी म्हणून पालकरांचा जबरदस्त दरारा होता. अफाट पराक्रमी शिवसैनिक उच्च पदावर असताना मानमरातबासाठी मुसलमान झालच कसा? या सत्याचा शोध घेता घेता कल्याणीरमण बेन्नुरवार यांनी जे लेखन केले तेच हे ‘अग्निदिव्य.’ शिवराय हे रत्नपारखी होते. त्यांचा लोकसंग्रह मोठा होता. त्यांचे सहकारी बुद्धीमान, पराक्रमी होते. सरदार येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर असे विश्वासू मर्द मावळे त्यांच्या सेवेत होते. आबाजी सोनदेव कल्याणचा सुभेदार होता. त्याचा भाऊ निळोजी हा मुजुमदार झाला. माणकोजी दहातोंडे हा सरनोबत होता. तो वारला म्हणून नेताजी पालकर यांना ती जागा महाराजांनी दिली. पालकरांनी फौज वाढविली. राघोबल्लाळ कोरडे याजकडे फौजेची सबनिशी होती.
छत्रपवती शिवरायांना भेटले. स्वराज्य सेवेत पुन्ह हिंदू होऊन रुजू झाले ते कसे? याचे उत्तर या कादंबरीतून मिळते. उत्तम संवाद, सुरस समरप्रसंग, ओघवती भाषा आणि उत्कृष्ट वर्णने हे सारेच शिवप्रेमींना आवडेल, इतके स्फूर्तिदायक आहे. सतीश भावसारांचे झकास मुखपृष्ठ या कादंबरीला लाभले आहे.
- DIVYA MARATHI, NASIK 14-10-2016
अग्निदिव्य ही नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी कल्याणीरमण उर्फ धनंजय बेन्नुरवार यांनी लिहिलेली आहे. या कादंबरीच्या प्रस्तावनेत प्रा. सु. ग. शेवडे म्हणतात की, बेन्नुरवार यांनी श्री शिवरित्राशी संबंधित एक अध्यायच कादंबरीरुपात वाचकांसमोर रसाळपणे व विस्तारपूर्वक मांडला आहे. नेताजी पालकर यांचा संबंध श्री शिवछत्रपतींच्या राष्ट्रस्थापनेच्या कार्यात अगदी प्रारंभापासूनच आला. तो निष्ठावंत सहकारी होता. १६६६ मध्ये त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. (हा दुरावा कृत्रिम होता व त्यामागे शिवरायांचे राजकारण होते असे स्व. बाबाराव सावरकरांचे मत होते.) औरंगजेबाने त्याला बाटवून महम्मद कुलीखान बनविले व अफगाणिस्तानाच असूनही, मोगलांचा निष्ठावंत चाकर असण्याच्या बतावणीत कसा काढला आणि संधी मिळवून महाराष्ट्रात परत आल्यावर शिवरायांना भेटून हिंदवी स्वराज्याच्या सेवेत पुनश्च कसा सुरु झाला हा सर्व विषय ‘अग्निदिव्य’ या कादंबरीत विस्तारपूर्वक आला आहे. हिदूंचे स्वराज्य हा शिवरायांच्या जीवनाचा ध्यास होता. नेताजी परत आल्यावर शिवरायांनी त्याचे शुद्धीकरण करुन त्याला हिंदू धर्मात सामील करुन घेतले. नेताजी पालकरांसारख्या निष्ठावंत हिंदू सैनिकाचे, शिव-सहकाऱ्याचे, मुसलमान म्हणून जगणे आणि अत्यंत कल्पकतापूर्वक धडपड करुन पुन्हा मूळ प्रवाहात सामील होणे हे सारेच ‘अग्निदिव्य होते’. उत्तम संवाद लेखन, सरस प्रसंग चित्रण, भाषाप्रभुत्त्व आणि इतिहासाचे सम्यक ज्ञान या चार स्तंभावर ‘अग्निदिव्य’चा इमला उभारण्याचे अग्निदिव्य लेखकाने उत्तम प्रकारे पार पाडले आहे. लेखक बेन्नुरवार म्हणतात की या कादंबरीचा पाया ऐतिहासिक वास्तवाचा आहे. नेताजी स्वराज्याचे सरनौबत होते, स्वराज्यात त्यांचा दर्जा खुद्द महाराजांच्या खालोखाल होता. गनीम त्यांना प्रतिशिवाजी म्हणून वचकून होता. पन्हाळ्यावरील दारुण पराभवानंतर ते महाराजांना-स्वराज्याला सोडून आदिलशाहीच्या मार्गाने मोगलांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याहून निसटले आणि कोणतीही संधी न देता औरंगजेबाने त्यांना जेरबंद करुन त्याच्या राजधानीत आणले. त्यांनी मुसलमान धर्म पत्करला. बादशहाने तरीही
त्यांना अफगाणिस्तानात दहा वर्षे दडपून ठेवले. त्यानंतर त्यांना स्वराज्यावर सोडले तेव्हा संधी साधून ते महाराजांकडे परत आले. महाराजांनी त्यांना शुद्ध करुन घेतले. हा एवढा मूळ पाया तेवढा ऐतिहासिक वास्तव. बाकी काही महत्त्वाची पात्र आणि प्रसंग वगळता सारा कल्पनाविलासाचा डोलारा आहे.