Nilesh Dadgal
कन्नड साहित्यातील थोर तत्वविवेचक आणि निर्भिड कादंबरीकार श्री. एस. एल. भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र : तंतू
सर्व प्रथम आमचे काका स्व. अनंत उर्फ गोटू अभ्यंकर यांचे खुप खुप धन्यवाद ज्यांनी मला हि कादंबरी वाचायला दिली आणि काही दिवसाच आम्हाला सोडुन गेले. नंतर बरेच दिवस कादंबरी वाचता आली नाही, पण काका खरच तुमचे खुप उपकार आहेत कि भैरप्पा सारख्या महान लेखकाच्या लिखाणासोबत माझी ओळख करुन त्यांच्या लिखाणाच्या वाचनाची मला ओढ लावली. खुप छान कादंबरी, वाचतांना मग्न करणारी व विचार करायला लावणारे लिखाण.
`हिंसा सहसा नष्ट होत नाही, ती वाढतच राहते आणि नवे शत्रू , नवे मार्ग शोधत राहते. हिंसा जुलूमशाही यांची स्वत:ची एक गती असते, स्वत:चेच तर्कशास्त्र असते.
जुलूमशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही आणि अशाच प्रवृतींचा कल स्वत:ची विचारशक्ती गुंडाळून ठेवण्याकडे असतो; परंतु विचार आणि सर्जकता यांवर कुणाचीही हुकमत चालू शकत नाही; त्यामुळे या प्रवृत्ती आपल्या हल्याचा रोख लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंत, समाजसुधारीण इत्यादींनकडे वळतात. परिणामी, होणारी सांस्कृतिक हानी कधीही भरून येणारी नसते... त्या समाजाच्या संदर्भात कालचक्र जणू गोठले जाते.`
आणिबाणी घोषित होण्यापुर्वी बराच काळ आभाळ झाकोळून आलेले होते. राज्यकर्त्यांच्या हातात सुप्त दमनतंत्राचे नवे दुधारी हत्यार आले होते. `न तू फिर जी सकेगा, और न तुझको मौत आएगी...` अशी भल्याभल्यांची अवस्था करण्यात आली होती.
अशा आणि त्यानंतरच्या कालखंडात एका बुध्दिप्रामाण्यवादी पत्रकारांची आणि त्याच्या कुटुंबीयांची कशी दारुण वाताहत होते, याची राष्ट्रीय पार्श्वभूमीवर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा : तंतू!
NEWSPAPER REVIEWतंतू : प्रभावी कादंबरी…
वंशवृक्ष, जा ओलांडूनी, पर्व या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांचं नाव आता मराठी रसिक वाचकांना अपरिचित राहिलेलं नाही. पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. डॉ. भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांचा उत्कृष्ट मराठी अनुवाद करून डॉ. उमा कुलकर्णी यांनी मराठी साहित्याची अमोल सेवा केली आहे. डॉ. उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केलेल्या ‘तंतू’ या डॉ. भैरप्पा यांच्या साडेआठशे पृष्ठांच्या कादंबरीचा अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसने अतिशय देखण्या स्वरूपात प्रसिद्ध केला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजवटीचा आणीबाणीपर्यंतचा कालखंड ही या कादंबरीची पार्श्वभूमी. इंदिरा गांधी यांच्या नीतीभ्रष्ट आचार-विचारांची लागलेली कीड अशा मनाला अस्वस्थ करणाऱ्या पार्श्वभूमीवर या कादंबरीतील कथानक वेगानं पुढं सरकतं. या काळ्या आणि गडद पार्श्वभूमीला आश्वासक रूपेरी किनार लाभलेली आहे, हीच एक राष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनं जमेची बाजू.
या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा आहेत पत्रकार रवींद्र, त्याची पत्नी कांती आणि मुलगा अनुप. रवींद्रच्या ध्येयवादी आणि तत्त्वनिष्ठ पत्रकारितेच्या अनुषंगानं ज्या घटना समोर येतात त्यामधून देशातील जातिनिष्ठ, नीतीभ्रष्ट, संकुचित आणि स्वार्थी समाजजीवनाचं दर्शन घडतं. रवींद्रचे वडील दिल्लीतील केंद्रीय शासकीय विभागाचे सचिव. अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची तत्त्वशून्य आणि भ्रष्टाचारी प्रशासन व्यवस्थेत जी ससेहोलपट होते तेच जीवन रवींद्रचे वडील अप्पा यांच्या वाट्याला आलेलं. रवींद्रचे आजी-आजोबा व्यंकटसुबय्या आणि शांतम्मा निस्पृह, दानशूर आणि ध्येयवादी. कुटुंबाचा उज्ज्वल वारसा चालविण्याची जिद्द आणि ध्येयनिष्ठ वृत्ती रवींद्रच्या स्वभावात पुरती बाणलेली आहे. कांतीचे वडील बडे सरकारी इंजिनीअर. आपल्या अधिकारपदाच्या कारकीर्दीत प्रचंड माया जमवण्याचा छंद त्यांनी जोपासला होता. अशा अधिकाऱ्याला सर्वच स्तरावरून सहकार्य लाभतं. त्याचा नावलौकिक होतो. कांतीला अशा पैशाच्या बळावर लाभणाऱ्या ऐश्वर्याची विलक्षण ओढ. आपल्या नवऱ्याला ‘गांधीज्वरानं’ पछाडलेलं आहे याची तिला विलक्षण खंत वाटते. कांतीच्या स्वतंत्र, स्वैर आणि काहीशा बहकलेल्या व्यक्तिरेखेमुळं दिल्ली येथील पैसा आणि सत्ता यांच्या मागं कोणताही विधिनिषेध न बाळगता पिसाटपणे धावणाऱ्या श्रीमंत आणि सत्ताधारी समाजाचं विदारक दर्शन घडतं. अनुप या लेकावर कोणते संस्कार व्हावे याबाबतीत पती-पत्नीमध्ये प्रारंभापासूनच मतभेदाला सुरुवात होते. सुरुवातीला पॉकेटमनी आणि तरुणवयात हातात खेळणारा भरपूर पैसा यामुळं अनुपसारख्या बुद्धिमान, कर्तबगार तरुणाची जीवननौका कशी भरकटत जाते याचंही प्रत्ययकारी चित्र लेखकानं रेखाटलेलं आहे. अनुपच्या व्यक्तिरेखेमुळं देशातील एका आदर्श शिक्षणसंस्थेचं स्वरूप जसं पाहायला मिळतं, त्याचप्रमाणं कॅपिटेशन फीच्या प्रभावामुळं नीतीमूल्यांना मूठमाती देणाऱ्या आधुनिक शिक्षण पद्धतीचं भयानक चित्रही आपल्यासमोर येतं.
या कादंबरीचा विशाल जीवनपट आपल्यापुढं उलगडत असताना काही सूचक विचार प्रतिकाप्रमाणं आपल्या मनाच्या गाभाऱ्यात ठाण मांडून बसतात. रवींद्रच्या बसवनपूर या गावी सरस्वतीच्या मूर्तीची झालेली चोरी आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक ठेव्याबद्दल समाजानं दाखविलेली अक्षम्य अनास्था. ग्रामीण भागात पैशाच्या ओघामुळं होणाऱ्या नव्या वास्तूंच्या उभारणीला गावातील वृक्षांचा अडसर. या वृक्षांची पाळंमुळं खणून काढून, ती अॅसिडनं नष्ट करून देखण्या वास्तू उभी करणारी नवी पिढी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर माणसांच खताप्रमाणं होणारा वापर थोपवून अभिनव शैक्षणिक प्रयोगातून, म. गांधींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन नवा मानव घडविण्याची जिद्द बाळगणारे अप्पया. सांस्कृतिक, आध्यात्मिक नीतीमूल्यांची परवड, सांस्कृतिक, आध्यात्मिक अधिष्ठानामुळं समाजजीवनात रुजलेल्या नीतीमूल्यांची पाळंमुळं खणून काढून समाजजीवन पोखरून टाकणाऱ्या तत्त्वशून्य विचारांच्या आधारानं नवसमाजाची उभारणी करणारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या आश्रयाखाली वाढणारी पिढी याचं प्रभावी चित्रण डॉ. भैरप्पा यांनी करून वैचारिक प्रगल्भता लाभलेली एक उच्च दर्जाची कलाकृती वाचकांपुढं ठेवली आहे.
माखनलाल रंका या गांधीवादी आणि नि:स्पृह, रामशास्त्री बाण्याच्या उद्योगपतीनं चालविलेल्या ‘इंडियन ट्रिब्यून’ च्या दैनिकाचा रवींद्र हा संपादक. सरस्वती मूर्तीच्या चोरीमुळं अस्वस्थ झालेला रवींद्र बऱ्याच वर्षांनी आपल्या बसवनपूर या गावी येतो. स्वतंत्र भारतामध्ये जातीय राजकारणाची, गुंडागिरीची अनिष्ट प्रवृत्ती किती खोलवर रुजली आहे याचा अनुभव रवींद्रला येतो. अल्पसंख्याक आणि असहाय्य ब्राह्मण आणि लिंगायत समाजाचं उच्चाटण करून ‘बहुजन समाजाचं हित’ या गोंडस नावाखाली खादीधारी आणि गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांनी घातलेला हैदोस, मंत्र्यांशी हातमिळवणी करून ग्रॅनाईटचा राजरोस काळाबाजार करून कोट्यवधी रुपयांची अवैध कमाई करणारे आमदार-खासदार, मातृभाषा आणि संस्कृती याकडे पाठ फिरवून इंग्रजी भाषा आणि नवी संस्कृती या नावाखाली विकृतीचं भीषण दर्शन घडविणारे तथाकथित सुशिक्षित हे या नवभारताचं विदारक चित्र. रवींद्र आपल्या वृत्तपत्रामधून या दुष्ट आणि अनिष्ट विकृतीचा बुरखा फाडून सामाजिक आणि राजकीय जीवनाचं बेगडी, ढोंगी स्वरूप उघड करतो. त्याला दिलासा देते ती अप्पया यांची विद्याशाला. एकीकडे एका महिला पंतप्रधानांनी माणसांचा खताप्रमाणे वापर करायला सुरुवात करावी आणि दुसरीकडे अप्पयासारख्या ध्येयधुंद वृत्तीच्या शिक्षण तज्ज्ञानं अनेक उच्चविद्याविभूषित, तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांच्या सहाय्यानं नवा मानव घडविणारी शिक्षण संस्था उभी करावी हा केवढा विरोधाभास ! पण या आदर्श शिक्षण संस्थेला सुरुंग लावण्याची निलाजरी आणि निर्घृण वृत्ती या गांधीवादी काँग्रेसवाल्यांनी प्रकट केलीच. पत्रकार या नात्यानं रवींद्र या दुष्ट प्रवृत्तींविरुद्ध निकराची झुंज देत राहतो. अगदी आणीबाणीच्या काळात रंकांच्या वृत्तपत्रांवर शासकीय नियंत्रणाची कुऱ्हाड कोसळते. तेव्हा प्रमुख संपादक तलवार आणि रवींद्र दिल्ली येथे ‘फॅक्ट’ हे दैनिक प्रसिद्ध करून आणीबाणीतील कारावासाची वाट धरतात. पंतप्रधानांच्या कुटिल नीतीमुळं रंकाही हैराण होतात.
कांतीच्या व्यक्तिरेखेतून स्वतंत्र बाण्याची वृत्ती प्रकट करीत अखेरीस संपत्ती कमावण्यासाठी स्वैर वृत्तीनं जगणाऱ्या महिलेचं चित्र लेखकानं रेखाटलं आहे. तत्त्वशून्य आणि नीतिभ्रष्ट राजकीय नेत्यांच्या आणि त्यांना साथ करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रेमळ सहकार्यानं समृद्धीचा मार्ग खुला होतो याचा अनुभव कांती आणि तिची मैत्रीण शीतल यांना येतो. हेमंत होन्नती या बुद्धिमान संगीत तज्ज्ञाच्या सहवासात रमणाऱ्या कांतीला रवींद्रसारख्या तत्त्वनिष्ठ पतीची घृणा वाटते. रवींद्रचा मित्र होन्नती आणि कांती यांच्या संबंधामधून लेखकाने पैशाच्या समृद्धीमुळं नीतिमूल्यांना मूठमाती देऊन जगणाऱ्या कांतीसारख्या स्वैर वृत्तीच्या बुद्धिमान, कर्तबगार महिलेच्या उद्ध्वस्त जीवनाची कहाणी वाचकापुढं ठेवली आहे. पैशामुळं रवींद्र कांतीच्या कौटुंबिक जीवनाची अखेर होतेच; पण त्यांचा मुलगा अनुपही आपल्या बेगुमान वागण्यामुळं अनैतिक मार्गाला लागतो.
अनुपच्या निमित्तानं विद्याशालेच्या आदर्श शैक्षणिक उपक्रमाचं दर्शन घडतं. कष्ट, अनुभव आणि आदर्श मानव घडविणारं शिक्षण यामुळं मुलं स्वावलंबी वृत्तीनं, आत्मविश्वासानं जीवन जगण्यास सिद्ध होतात. पण कांतीच्या हट्टापायी अनुप बंगलोर येथील इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. कॅपिटेशन फीवर पोसलेल्या या शिक्षण संस्थातील रॅगिंग, मुला-मुलींचे अनिर्बंध लैंगिक संबंध, धनदांडग्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सलगी वाढविणारे प्राध्यापक व प्राचार्य यातून स्वतंत्र भारतातील शिक्षण क्षेत्राच्या दुर्दशेचं भीषण चित्र डॉ. भैरप्पा यांनी या कादंबरीतील व्यक्तिरेखा तटस्थ वृत्तीनं आणि कलात्मक रीतीनं साकार केल्या आहेत, त्यामुळं त्या जिवंत, ठसठशीत आणि वास्तव वाटतात. रवींद्र, कांती आणि अनुप या तीन प्रमुख व्यक्तिरेखांभोवती कथानकाची गुंफण कौशल्यानं करण्यात आली आहे. अतिशय प्रभावी कथानक, ओघवती निवेदनशैली यामुळं ही कादंबरी खिळवून ठेवते. इंदिरा गांधीच्या कालखंडातील समाजजीवनाचं हे विदारक, भीषण चित्रण वाचकाला अस्वस्थ, अंतर्मुख करतं तसंच ध्येयवादी वृत्तीनं, प्राण पणाला लावून या पाशवी शक्तीविरुद्ध लढा देणाऱ्या तत्त्वनिष्ठ व्यक्तींच्या जीवनाकडे पाहून देशाच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल विश्वास वाटू लागतो हे या महान कादंबरीचं यश !