- Rajiv Lute
कश्मिर मध्ये काहीतरी होणार! अफवांचे पेव फुटले आहे.अनेकांना आज झोप येत नाही...आपल्या देशाचा गंभीर प्रश्न सुटावा असे प्रत्येकाला वाटते...भारतीयांना आपल्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. सरकारचा पाठिंबा असेल तर सैन्य काहीही करू शकते हा आतापर्यंत चा अनुभव आहे...अश्याच महान परमवीर चक्र विजेत्या नाटकांची गाथा सांगणारे हे पुस्तक सर्वांना आवडेल!
- Kiran Borkar
लेखक स्वतः एक धाडसी अधिकारी म्हणून नावाजलेले आहेत .१९५७ च्या बांगलादेशातील सिल्हटच्या लढाईत त्यांचा एक पाय सुरुंगावर पडला तेव्हा त्यांनी स्वतः ची कुकरी काढून पाय तोंडाला .अपंग होऊनही त्यांनी पुढे सैन्यदलात राहून देशाची सेवा केली.
परमवीर चक्र हा सैन्यदलातील सर्वात श्रेष्ठ पुरस्कार समजला जातो .आतापर्यंत एकवीसजणांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे .त्या प्रत्येकाची माहिती आणि लढाईतील पराक्रम या पुस्तकात लेखकाने लिहिला आहे .इतकेच नव्हे तर परमवीर चक्राची माहिती . त्याचा इतिहास हेही लिहिले आहे .या पदकाचे डिझाईन एका स्त्रीने केले आहे हे विशेष आहे . पहिल्या पदकाच्या मानकऱ्यापासून ते कारगिल युद्धापर्यंत सर्वांचा इतिहास यात आहे .सर्वांनी आपल्या या शूरवीरांबद्दल वाचलेच पाहिजे
- अरूण भट
नुकतेच आपले ‘परमवीर च्रक’ हे अनुवादित पुस्तक वाचले व थरारून गेलो. मनोगतात लिहिल्याप्रमाणे मराठी वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. सर्वसाधारण नागरीकांना सैन्याबद्दल कमी माहिती असते. सदर पुस्तके अधिक प्रमाणात आली तर सैनिक, आधुनिक युद्धे याबद्दल अधिक माहिती वाचकांना मिळेल.
पुस्तकाची छपाई, मुखपृष्ठ इत्यादी तांत्रीक बाबी उत्तम आहेत.
- DAINIK SAMANA 29-10-2006
परमवीर चक्र हे आपल्या देशातलं सर्वोच्च लष्करी सन्मानचिन्ह आहे. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी अतुलनीय शौर्य, धैर्य, पराक्रम गाजवणाऱ्या रणमर्दाला राष्ट्रपतींच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात येतं. १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाल्याझाल्या पाकिस्तानी सैन्याने पठाणी टोळीवाल्यांच्या वेषात काश्मीरवर आक्रमण केलं होतं. त्या युद्धापासून १९९९ सालच्या कारगिल युद्धापर्यंतच्या विविध समरप्रसंगात पराक्रम गाजवणाऱ्या एकूण २१ योद्ध्यांना आजवर परमवीर चक्राने सन्मानीत करण्यात आलेलं आहे.
कोण आहेत हे २१ परमवीर? त्यांचीच नावं आणि त्यांच्या पराक्रमकथा प्रस्तुत ‘परमवीर चक्र’ या पुस्तकात तपशीलवार देण्यात आल्या आहेत. या कथा सांगणारा लेखक हा स्वत:देखील एक बहाद्दर सैनिक आहे. लेखक मजर जनरल (निवृत्त) इयान कारडोझो हे हिंदुस्थानी सैन्यात ‘५ गुरखा रायफल्स’ या पलटणीत सेवा बजावत असताना, एका लढाईत त्यांचा पाय शत्रूने पेरलेल्या सुरुंगावर पडला. ते जबर जखमी झाले. त्याही स्थितीत या बहाद्दराने स्वत:च्या कमरेची कुकरी काढली आणि आपला चिंधड्या उडालेला पाय सरळ स्वत:च कापून टाकला. अपंग बनल्यावरही त्यांना उच्च सेनाधिकाऱ्यांची सेवेतून काढून न टाकता, त्यांच्या शौर्याची कदर करून त्यांची सेवा पुढे चालू ठेवली, असे ते पहिले सेनाधिकारी होत. १९९३ साली हिंदुस्थानी सैन्यदलाच्या पूर्वेकडील कोअरचे चीफ ऑफ स्टाफ अशा उच्च पदावरून ते निवृत्त झाले.
शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानेच गायिला, की तो श्रोत्यांच्या काळजाला अधिकच भिडतो. त्याचप्रमाणे मेजर जनरल कारडोझोनी लिहिलेली परमवीर चक्राच्या मानकऱ्यांची ही पराक्रमगाथा मोठी वेधक, प्रेरक उतरली आहे.
युद्धात पराक्रम गाजवणाऱ्यांना सन्मानीत करून त्यांचा व सर्वच सैनिकांचा उत्साह वाढवण्याची प्रथा, परंपरा फार प्राचीन काळापासून जगभर सर्व देशांमध्ये आहे. आपल्याकडेही ती होतीच. महाराजा शिवछत्रपती आपल्या बहाद्दर सैनिकांच्या हातात सोन्याचे तोडे घालीत. त्यांना सर्जेराव, हंबीरराव, प्रतापराव, विश्वासराव असे मानाचे किताब देत. पालखी, हत्ती, नौबत, निशाण अशी मानचिन्हे देऊन गौरवीत. इंग्रजी अमदानीत हिंदुस्थानी सैनिकांना इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट, व्हिक्टोरिया क्रॉस इत्यादी मानचिन्हे दिली जात. स्वतंत्र हिंदुस्थानात व्हिक्टोरिया क्रॉस या सर्वोच्च लष्करी सन्मानाला समकक्ष असं परमवीर चक्र हे पदक अस्तित्वात आणलं गेलं. मध्यभागी अशोकस्तंभावरील चार सिंह आणि चार बाजूंना इंद्राच्या वज्राची चार चिन्हं, असं हे पदक सावित्रीबाई खानोलकर या संस्कृत साहित्याची प्रकांड पंडिता असणाऱ्या महिलेने सुचवलं. मेजर जनरल विक्रम खानोलकर या मराठी सेनाधिकाऱ्याची ही पत्नी मूळची स्वित्झर्लंडची होती. तिची आई रशियन आणि वडील हंगेरियन होते. योगायोग पाहा. पठाणी टोळीवाल्यांचा हल्ला उधळून लावून पाकिस्तानी सैन्याला थोपवून धरण्याचा अतुल पराक्रम गाजवल्याबद्दल ज्या मेजर सोमनाथ शर्मांना स्वतंत्र हिंदुस्थानचं पहिलं परमवीर चक्र मिळालं, ते मेजर शर्मा सावित्रीबार्इंच्या मुलीचे दीर होते.
अशा अनेक रोमांचक हकीकतींनी पुस्तक अत्यंत वाचनीय बनलं आहे. मांडणी, मुद्रण, निर्मिती, मुखपृष्ठ सुबक. जोत्स्ना लेले यांचा मराठी अनुवाद ठीक.
-मल्हार कृष्ण गोखले
- DAINIK AIKYA 08-10-2006
सैनिक हो तुमच्यासाठी...
जम्मू-काश्मीरचे युद्ध, भारत-चीन युद्ध, भारत-पाकिस्तान युद्ध, १९७१ चे भारत-पाक युद्ध, १९९९ मधील कारगील युद्ध, सियाचिनचे युद्ध अशा अनेक युद्धांना आपले वीर सैनिक सामोरे गेले. अनेक अनामिक योद्ध्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावल्यामुळेच आपण आज सुखाची झोप घेत आहोत. अशा निष्ठावान सैनिकांची कर्तृत्वगाथा फारच थोड्याजणांनी आपल्यासमोर मांडल्या आहेत.
‘परमवीर चक्र’ हे असेच एक नवे पुस्तक आपल्या शूर सैनिकांच्या कर्तृत्वाची साक्ष देते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अडीच वर्षांनी म्हणजे जानेवारी १९५० मध्ये ‘परमवीर चक्र’ पदक देण्याची प्रथा निर्माण झाली. गेल्या ५२ वर्षांत शत्रूशी लढताना दाखवलेल्या शौर्याबद्दल हा सर्वोच्च सन्मान दिला जातो. आतापर्यंत २१ सैनिकांना हा बहुमान मिळालं आहे. त्यापैकी १४ जणांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेला. या वीर जवानांच्या साहसाची गाथा या पुस्तकातून सांगितली गेली आहे. परमवी चक्र या पदकाचा सन्मान जरी या २१ जणांना लाभला असता तरी अनेक अनामिक योद्ध्यांचे ते प्रतिनिधित्व करतात, हे विसरून चालणार नाही.
मेजर जनरल इयान कारडोझो या निवृत्त सैनिकाने हे पुस्तक लिहिले आहे. मेजर मुंबईत जन्मले. सेंट झेवियर्सच्या शाळेत आणि कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. डेहराडूनच्या ‘जॉर्इंट सव्र्हिसेस विंग’ जी सध्या खडकवासला येथे स्थलांतरीत होऊन ‘नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी’ या नावाने ओळखली जाते. तेथे त्यांनी प्राथमिक लष्करी शिक्षण घेतले. ‘नेफा’ मध्ये गस्त घालण्यातील सेनापदकाने सन्मानित झालेले ते पहिले अधिकारी होत. १९५७च्या बांगलादेशातील सिल्हटच्या लढाईत सुरुंगावर पाय पडल्याने ते जखमी झाले. वैद्यकीय मदती अभावी त्यांनी कुकरीने स्वत:चा पाय कापून काढला. पाय नसतानाही नंतर त्यांनी विनंती करून सैन्याचे नेतृत्व केले. इन्फट्री बटालियनचे नेतृत्व करणारे भारतीय सेनादलातील ते पहिले अपंग अधिकारी होते. १९९३मध्ये ते एका कोअरचे ‘चीफ ऑफ स्टाफ’या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही दिलीत ‘स्पास्टिक सोसायटी ऑफ नॉर्दन इंडिया’ या संस्थेत ते कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा सुमित पाचवा गुरखा रायफल्समध्ये अधिकारी आहे. मेजर कारडोझो यांनी नॅशनल स्विमिंग चॅम्पियनमध्ये अपंगासाठीच्या स्पर्धेत दोनवेळा रौप्यपदकही मिळवले आहे. ‘युद्धस्थ कथा रम्य’ असे म्हटले जाते, परंतु रचलेल्य कथांमध्ये अतिशयोक्तीच खूप असते. मेजर जनरल इयान कारडोझो यांनी लिहिलेले ‘परमवीर चक्र’ हे पुस्तक युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या सैनिकांची मर्दुमकी आहे. निवृत्त मेजर जनरलनीच प्रत्यक्ष लिहिलेल्या या कथांची त्यामुळेच विश्वासार्हताही वाढते. ज्योत्स्ना लेले यांनी १६ फेब्रुवारी २००३ च्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाबद्दलची माहिती वाचली आणि या पुस्तकाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. परमवीर चक्र विजेत्यांच्या कहाण्या रंजक तर आहेतच; पण लेखकाने संबंधितांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन या कहाण्या आणखी रोचक बनवल्या आहेत. एकूण सहा प्रकरणात मेजर सोमनाथ शर्मा, कंपनी हवालदार मेजर पिरुर्सिग, लान्सनाईक करमसिंग, नाईक जदुनाथसिंग, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे यांच्या कहाण्या आहेत. भारत-चीन युद्ध १९६२या प्रकरणात सुभेदार जोगिंदरसिंग, मेजर धानसिंग थापा, मेजर शैतानसिंग यांच्या कहाण्या, भारत-पाकिस्तान युद्ध १९६५ या प्रकरणात कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल मोहम्मद अक्रम राजा यांच्या कारगील युद्ध मे ते जुलै १९९९ या प्रकरणात कॅप्टन विक्रम बात्रा, रायफलमन संजयकुमार, लेफ्टनंट मनोजकुमार पांडे, ग्रेनेडियर योगिंदर सिंग यादव यांच्या कहाण्या आहेत. युनायटेड, नेशन्सच्या शांतता राखण्याच्या मोहिमा आणि सियाचीनचे युद्ध या प्रकरणात कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया, मेजर रामस्वामी परमेश्वरन्, नायब सुभेदार बाना सिंग यांच्या कार्यकर्तृत्वाची कहाणी मांडली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी आणि सुरुवातीला त्या युद्धाची निष्पत्ती काय झाली याचे विवेचन आहे. याशिवाय परमवीर चक्राबद्दलची सविस्तर माहिती, या पदकाची निर्मिती करणाऱ्या सौ. सावित्री खानोलकर या स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेल्या अभारतीय महिलेची जीवनकथा, सरदार वल्लभभाई पटेल यांचे तत्कालीन पंतप्रधानांना पाठवलेले पत्र, ब्रिटिश व भारतीय पुरस्कारातील साम्य, परमवीर चक्र मिळवणाऱ्या सैनिकांची यादी, व्हिक्टोरिया क्रॉस मिळवणारे भारतीय अशी अन्य काही प्रकरणेही या पुस्तकात समाविष्ट आहेत. भारतातील शौर्य पदकांचा इतिहास, परमवीर चक्राचा इतिहास, परमवीर चक्राची रचनाकर्ती, धैर्याचे मूलतत्त्व आदी लेख आणि ‘द अननोन सोल्जर’ ही कविता यांचाही या पुस्तकात समावेश आहे.
परमवीर चक्र, रणांगणावरील आपले महान योद्धे
- MAHARASHTRA TIMES 25-02-2007
धुरंधरांच्या धैर्यगाथा...
युद्धाविषयीच्या काहण्या नेहमीच रम्य असतात. त्यातूनही आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या युद्धाच्या हाकिकती ‘इतिहास’ म्हणून वाचताना, ओळखीच्या घटनांमागचा तपशील ही केवळ आकडेवारी अथवा जंत्री न राहता, त्यात वेगळीच रंजकता असते, ‘परमवीर चक्र : रणांगणावरील आपले महान योद्धे’ हे असंच एक तपशीलवारपणामुळे काहीसं किचकट वाटू शकणारं, पण नजिकच्या कालखंडामुळे आत्मियता निर्माण होणारं पुस्तक आहे. मेजर जनरल अवर हिरोज इन बॅटल’ या इंग्लिश पुस्तकाचा ज्योत्स्ना लेले यांनी केलेला हा मराठी अनुवाद यथातथ्य उतरला आहे.
या पुस्तकामध्ये कारगिलसकट तीन भारतपाक युद्ध, भारत चीन युद्ध, जम्मू-कश्मीर संघर्ष आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमा व सियाचीन अशा एकूण सहा प्रकरणांमधून मानवी पराक्रमांच्या वीरगाथा आपल्यासमोर उलगडतात. लढणं म्हणजे तलवार उपसून ‘हरहर महादेव’ची गर्जना करत मानवी शत्रूवर उडी घेणं किंवा बंदुकींच्या फेरी झाडत शत्रूवर धावून जाणं, अशा कल्पनारम्यतेतमधून वाचकाला बाहेर काढण्याचं काम या पुस्तकाने केलं आहे. आधुनिक काळात घडणाऱ्या युद्धाचं वास्तव म्हणजे आधुनिक यंत्रं, युद्धतंत्र, व्यूह, रणनीती याची तपशीलवार माहिती या पुस्तकात मिळते.
या पुस्तकात, लढाईमध्ये अतुलनीय धैर्य दाखवल्याबद्दल ‘परमवीरचक्र’ हा युद्धातला सर्वोच्च सन्मान प्राप्त झालेल्या सर्व भारतीय वीरपुरुषाचं त्रोटक चरित्र व त्या लढाईचं सविस्तर वर्णन आहे. शत्रूचं ठिकाण आणि रणभूमी यांच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचे फायदे-तोटे, शत्रूची संख्या व बळ, कुमक, रसदपुरवठा, रस्ते, नद्या, कालवे, डोंगर-टेकड्या, मुख्य शहर वा विमानतळाची नजिकता या सर्वांच्या तपशीलवार वर्णनामुळे त्या त्या लढाईची दुर्जेय अर्थात जिंकण्यास अत्यंत कठीण अशी अवस्था डोळ्यांपुढे उभी राहते. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीतल्या साहसयुक्त धैर्याला एक वेगळं परिमाणं लागतं.
विशेष: अब्दुल हमीच्या धैर्यगाथेत हे तपशील अगदी जिवंत होऊन समोर येतात. धैर्य आणि निव्वळ शौर्य यामधला फरक स्पष्ट करून धैर्याची संकल्पना सविस्तरपणे मांडणारी दोन अत्यंत वाचनीय प्रकरणं हे या पुस्तकांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. नेतृत्व गुणाचं विश्लेषण करताना नीतिमत्ता आणि चारित्र्यावर दिलेला भरही विचार करायला लावतो. लेखांच्या सुरुवातीच्या अवतरणाचा चपखलपणा व विचारगर्भतेसाठी विशेष उल्लेख करायला हवा. पुस्तकामधली आनुषंगिक माहिती व तत्कालीन राजकीय परिस्थितीवरची सूचक भाष्यं पुस्तकाची वाचनीयता वाढवतात. परवीरचक्र पदकाची रचना व त्याची रचयित्री या विषयीची माहिती वाचकांना नवीन व उद्बोधक वाटेल.
मात्र, हे पुस्तक भाषांतरित असल्याचं ठायी ठायी जाणवतं. त्यातली भाषा, विशेषत: निर्भिड सारख्या काही शब्दांचा विपरीत अर्थाने वापर हा पदोपदी ठेच लावतो. तसेच मूळ पुस्तकात लढाईच्या तपशीलवार वास्तव वर्णनावर भर असल्यामुळे असेल कदाचित, पण भाषांतरात एक प्रकारची रूक्ष वास्तवता जाणवते. रोमहर्षक व शब्दबंबाळ अशा भावनात्मक आवाहनाला इथे वाव नाही. पण ती उणीव यातल्या कथानायकांनी भरून काढली आहे. त्यांनी आपल्या धीरोदात्त नेतृत्वाद्वारे कठीण परिस्थितीवर कशी मात केली हे वाचणं हाच एक रोमहर्षक अनुभव बनून जातो. अगदी कोवळ्या वयात म्हणजे एकविसाव्या वर्षी परमवीर चक्राचा सर्वांत युवा मानकरी ठरलेला सेकंड लेफ्टनंट, अरुण खेत्रपाल व त्याचे तितकेच धीरोदात्त वडील ब्रिगेडियर मदन खेत्रपाल यांची कहाणी या दृष्टीने अतिशय हृद्य उतरली आहे, युद्धातला भीषण नरसंहार व त्यातली अंतिम निरर्थकता मन विषण्ण करते.
अखेरीस, सैनिकासमोरच्या शत्रूची केवळ पाकिस्तानी, चिनी, मुसलमान अशी मानवी ओळख नसते तर आजूबाजूची भौगोलिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती हाच त्याचा मोठा शत्रू असतो. बिगरसैनिकी, लोकांच्या आयुष्यालाही परिस्थितीशी संघर्ष हे एक महत्त्वाचं परिमाण असतं. त्यामुळेच या अतुल धैर्यशाली, शस्त्रधारी धुरंधरांच्या पराक्रमगाथा आपल्या सारख्यांच्या शस्त्रविहीन नागरी जीवनातही प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत.
- NEWSPAPER REVIEW
अरुण भट
नुकतेच आपले ‘परमवीर चक्र’ हे अनुवादित पुस्तक वाचले व थरारून गेलो. मनोगतात आपण लिहिल्याप्रमाणे, मराठी वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. सर्वसाधारण नागरिकांना सैन्याबद्दल कमी माहिती असते. सदर पुस्तके अधिक प्रमाणात आली तर सैनिक, आधुनिक युद्धे याबद्दल अधिक माहिती वाचकांना मिळेल.