Abhijeet Jambhaleपानिपत ,महानायक संभाजी, चंद्रमुखी, पांगिरा अशा महान कादंबरी लिहिणाऱ्या विश्वास पाटलांचे आणखीन एक आगळेवेगळे पुस्तक म्हणजे बंदा रुपया ...... या पुस्तकाचं वर्णन कसं करावं......म्हणजे एखाद्या खवय्याला अतिशय भूक लागली असताना त्याच्यासमोर सर्व प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांच्या पंचपक्वान्नाचे ताट आणून दिल्यास त्या पामराचे जसे मन तृप्त होईल तसे हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला वाटेल......या पुस्तकाचे एका शब्दात वर्णन करायाचे म्हणजे हे एक कॉकटेल आहे.यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, विज्ञान ,साहित्य, संगीत, कला, चित्रपट अशा सर्व क्षेत्रातील खजिन्याचा तुम्हाला वाचावयास मिळणार म्हणून मी या पुस्तकाला कॉकटेल म्हणतोय.विश्वास पाटील नावाच मराठी साहित्यातील एक असं व्यक्तिमत्त्व ज्यांनी अरसिकांना सुद्धा वाचनाचे रसिक व्हायला भाग पाडले.एखादा माणूस एखाद्या क्षेत्रात सर्वोच्च असतो पण विश्वासरावांच्या बाबतीत सरस्वतीची इतकी कृपा आहे की प्रशासकीय सेवेत अधिकारी आणि साहित्य क्षेत्रात साहित्यिक या दोन्ही क्षेत्रात ते सर्वोच्च आहेत.
बंदा रुपया मध्ये छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी या पिता-पुत्रांच्या शौर्याचे चे वर्णन केलेले वाचताना, स्वराज्याचा चा इतिहास वाचताना जणू या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात आपण इतिहासातून जाऊन फिरून येत आहोत असाच भास होतो.छत्रपतींचा पराक्रम वाचताना आपण त्या लढाईत सामील आहोत असा अनुभव येतो.
विश्वासरावांच्या लिखाण म्हणजे पुस्तकातील एखाद्या प्रसंग वाचताना जणू साक्षात्काराच्या अनुभूतीच अनुभवायला मिळते .पुस्तकामध्ये कोल्हापूरच्या लावणी, तमाशा, पोवाडे यांचे वर्णन वाचताना पानिपत लिहिणारा लेखक हाच का ?असा प्रश्न पडतो .प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असल्याने लेखकाचे अनेक क्षेत्रातील दिग्गज लोकांशी संबंध संपर्क आहेत आणि त्यांच्याबरोबरचे किस्से अनुभव, चित्रपट सृष्टीतील दिग्गजांच्या बरोबरचे किस्से वाचण्यासारखे आहेत .पुस्तकामध्ये मृत्यूच्या छायेतील महापुरूष हे प्रकरण खूप उत्कंठा वर्धक आहे जगातील अनेक महापुरुषांच्या मृत्युसमयी घडलेली अनेक रहस्य घटना वाचताना खूप उत्कंठा वाढते
विश्वासरावाणी महानायक कादंबरी लिहिताना त्यांनी सुभाषबाबू ज्या ज्या ठिकाणी फिरले त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सखोल अभ्यास करून कादंबरी लिहिली ब्रह्मदेशात जाऊन तिथे अभ्यास करताना तेथील वर्णन, इतिहासातील घटना, अनुभव हे वाचल्यावर असं वाटतंय कि त्यांनी महानायक लिहिले नाही विश्वास रावांनी महानायक कादंबरी जगली आहे
मराठी साहित्यातील एक शापित गंधर्व चारुता सागर या लेखकाचीओळख या पुस्तकात लेखकाने केले आहे.चारुता सागर या मराठी साहित्यकांची लेखणीत अशी जादूआहे की बंदा रुपया वाचल्यानंतर तुम्ही चारुता सागर वाचल्याशिवाय राहणार नाही.
चीनचे प्रवास वर्णन त्यांनी असे केले आहे की आपल्याला जणू एका जागी बसून चीनमध्ये फिरून आल्याचा भास होतो चीनचा इतिहास, तेथील राजकारण, तिथली संस्कृती, अशा अनेक गोष्टीचा तपशीलवार वर्णन आपल्याला वाचावयास मिळते. लावणी तमाशा यावर दोन प्रकरणे या पुस्तकात लेखकाने खर्ची घातली आहे कीर्तनाने हा देश सुधारला नाही. आणि तमाशाने हा देश बिघडलेला नाही असे का आपल्याला हे वाचल्यावर समजते.लावणी तमाशा यामधली रसिकता काय आहे, त्यांच्यातील कलावंताची कलेशी असलेली निष्ठा ,कलावंतांचे हालाखीचे जीवन आपल्याला वाचावयास मिळते
महाराष्ट्रातील रत्ने संगीतकार वसंत पवार ,राम कदम गायिका सुमन कल्याणपूरकर ,सुलोचना चव्हाण, गीतकार जगदीश खेबुडकर या महान रत्नांची नव्याने खरी ओळख आपल्याला वाचावयास मिळते वसंत पवार या संगीतकाराचे उच्च कोटीची प्रतिभा कलावंत माणूस मराठी चित्रपट सृष्टीला त्यांनी संगीतातील अनेक नजारे बहाल केले पण त्यांच्या पदरी आयुष्यभर दारिद्र्य आले
नाट्यक्षेत्रात मोहन वाघ, प्रभाकर पणशीकर इतर नाट्य कलावंतांचे नाट्यक्षेत्रातील नामवंत कलाकारांचे वर्णन विस्तृतपणे वाचावयास मिळते
महाराष्ट्राच्या इतिहासात दोन कवी होऊन गेले एक कविराज भूषण आणि दुसरे कवी कलश दोघेही अमरत्वाचा पोहोचले पहिले भूषण ज्यांनी आपल्या शब्द फुलाचा झेला शिवरायावर उधळून टाकला आणि अमर झाले आणि दुसरे कवी कलश स्वतःच्या रक्तामासाच्या फुलाची शंभूराजा भोवती कुरवंडी ओवाळून अजरामर ठरले .या कवी कलश संभाजी राजें बरोबर शेवटपर्यंत साथ देणाऱ्या कवीची करून कहाणी वाचताना मन खिन्न होतं
पुस्तकाचा शेवट पानिपताच्या ओल्या जखमा या प्रकरणाने केला आहे."पानिपत ",पानिपत म्हणजे मराठी साहित्यातील एक असं सोनेरी पान आहे.छत्रपती शिवाजी महाराज कि म्हणल्यावर ज्याचा ऊर भरून येतो आणि पानिपतचे युद्ध पाठवल्यावर ज्याच्या काळजात चर्र होतं तो मराठी ........वयाच्या 25 व्या वर्षी पानिपत लिहावयास घेतले आणि वयाच्या 28 व्या वर्षे पूर्ण केली खरंच विश्वास रवानी पानिपतला जो न्याय दिला त्याबद्दल त्यांना खरंच मानाचा मुजरा ....नोकरी नवीन ,नवीन लग्न झालेला असताना त्याने पानिपत लिहायला हातात घेतले शुक्रवारी संध्याकाळी ते कामावरून आले नंतर खोलीमध्ये पानिपत लिहायला बसलेत की ते सोमवारी सकाळी अकरा वाजता बाहेर येत .यावरून त्यांनी किती आत्मीयतेने याच लिखाण केला असेल .पानिपत लिहिताना एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे .रात्री अकरापर्यंत लिखाण करायचे परत सकाळी चारला उठून लिहायचे . यामुळे सततच्या अति परिश्रमामुळे त्यांची प्रकृती खालावली व त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.त्याचवेळी त्यांच्या नवख्या पत्नीने हॉस्पिटलमध्ये त्यांचा हात पकडून डोळ्यात पाणी आणून, ऐतिहासिक थाटामध्ये घोगऱ्या आवाजामध्ये विश्वास रावांना म्हणाल्या "इकडून पानिपतावर चुरडल्या गेलेल्या बांगड्यांचा हिशोब जरूर मांडवा परंतु पानिपत लिहीत असताना माझे पानिपत होऊ देऊ नका"....खरंच हा प्रसंग वाचताना अंगावर सर्रकन काटा येतो एखाद्या गोष्टीबद्दल डेडिकेशन काय असतं ते समजतं
बंदा रुपया म्हणजे तुम्हाला कोल्हापूर, पुणे ,मुंबई ,ब्रह्मदेश इंग्लंड, चीन, जपान अशी जगाची सफर करून आणते तसेच साहित्य ,कला ,संगीत ,चित्रपट, नाटक ,इतिहास भूगोल या सगळ्यांची अनुभूती तुम्हाला त्या पुस्तकातून मिळते म्हणून हे कॉकटेलच आहे.विश्वासरावांच्या लिखाण म्हणजे पुस्तकातील एखाद्या प्रसंग वाचताना जणू साक्षात्काराच्या अनुभूतीच अनुभवायला मिळते हे पुस्तक वाचून तुम्ही तृप्तीचा ढेकर नक्की देणार याची खात्री नक्की देतो . 🙏
.....................................✍अभिजीत सर्जेराव जांभळे