Akash Balwanteअहिल्याबाई होळकर यांची पुण्यश्लोक ही ओळख बऱ्याच जणांनी रंगवली आहे. त्याला अनेक कारणे आहेत जसे त्यांचा श्रद्धाळू स्वभाव, त्यांनी केलेला बऱ्याच मंदिरांचा जीर्णोद्धार, त्यांनी केलेला दानधर्म आणि इतर बरेच काही.
पण लेखिकेने या पुस्तकात त्यांच्या पुण्यश्लोक या प्रतिमेबरोबरच त्या कशा कर्मयोगिनी होत्या हे ही उत्तमरीत्या सांगितले आहे. त्यांचा मुत्सद्दी स्वभाव, फडणिशीत केलेले अतुल्य काम, राज्यकारभारी गुण, त्यांची न्यायदानी वृत्ती, राजपूत चंद्रावतांचा केलेला बिमोड, राघोबादादांना युद्ध न करताच घ्यायला लावलेली माघार, आप्त स्वकीय इहलोक सोडून जातानाही दाखवलेला खंबीरपणा अशा अनेक सद् गुणांचे दर्शन यात घडते.
पुस्तकाला दोन भागात विभागले आहे.
पहिल्या भागात त्यांचे बालपण, सासरकडचे सुरुवातीचे दिवस, सासरे मल्हाररावांकडून घेतलेले राजकारणाचे धडे, सासवांबरोबरची जवळीक, पती खंडेरावाकडून झालेला त्रास, स्वतःचे पोटच्या लेकरामुळे आलेली हतबलता लेखिकेने खूप उत्कृष्ठरित्या रंगवली आहे.
दुसऱ्या भागात त्यांचे उत्तर जीवन दाखवले आहे ज्यात सुभेदार तुकोजी बरोबरचे सुरुवातीला असलेले चांगले आणि नंतर बिनसलेले संबंध, दुसरे मल्हारराव , रखमाबाई, नारो गणेश, बापू होळकर आदींशी आलेले संबंध, त्यांनी केलेले राजकारण, महादजी शिंदे सोबत भावांसारखे संबंध असूनही शिंदे आणि होळकर यात भांडणे होत असताना आलेली विवशता ते त्यांचा इहलोकीपर्यंतचा प्रवास छानरीत्या मांडला आहे.
अहिल्याबाईनीं त्यांच्या जीवन काळात बरेच मृत्यू पाहिले. त्यांची सख्खी सासू , सासरे, सती गेलेल्या सावत्र सासवा, नवरा, सती गेलेल्या सवती, मुलगा मालेराव, सती गेलेल्या सुना , नातू नथोबा, सती गेलेल्या नातसूना, जावई यशवंतराव, सती गेलेली स्वतःची मुलगी मुक्ता आणि बरेच आप्तस्वकीय त्यांना सोडून गेले.
अहिल्याबाई सासरे मल्हाररावांच्या विनंतीमुळे सती गेल्या नाहीत पण इतर लोकांकरवी त्यामुळे लागलेले बोल तसेच त्यांचे सती आणि तत्सम रूढी परंपरेवरचे विचार लेखिकेने सुंदररित्या मांडले आहेत.
अहिल्याबाईंच्या जीवनकाळात बरेच पेशवे होऊन गेले. थोरले बाजीराव ज्यांनी छोट्या अहिल्येवर प्रभावित होऊन मल्हररावांना तिला सून करायला सांगितले त्यांपासून ते नानासाहेब, थोरले माधवराव , नारायणराव , रघुनाथराव आणि सवाई माधवरावांपर्यंत त्यांचे सर्वांशी कडूगोड सम्बन्ध राहिले.
पेशवाईतल्या घडामोडी अहिल्येला सुरुवातीला मल्हाररावांकडून, नंतर तुकोजी कडून आणि इतर हेरांकडून खलित्या मार्फत समजताना अहिल्याबाईंचे त्यावरील वैयक्तिक मते आणि विचार मात्र वाचकांना कळत राहतात.
अहिल्याबाईंनी जीवनात स्वकीयांबरोबर खूप झुंज दिली पण त्यांना बदलण्यात वा सुधारण्यात त्या सपशेल अपयशी ठरल्या जसे पती खंडेराव, मुलगा मालेराव, दुसरे सुभेदार तुकोजी, दुसरे मल्हारराव आणि इतर.
त्याकाळच्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी केलेली मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांची नासधूस आणि या अवहेलनेने हिंदू सैनिक आणि लोकांमध्ये आलेली हतबलता रोखण्यासाठी सर्व प्रमुख धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करून त्यांना पुनः प्रेरित करणे ही अहिल्याबाईंची दूरदृष्टी दाखवते.
लेखिकेने पुस्तकात जुनी (18 व्या शतकातली मराठी) भाषा वापरली आहे त्यामुळे अहिल्याबाईंचे आणि इतर पात्रांचे संवाद हे खरे खरे वाटतात.
जुन्या मराठी भाषेचा साज चढवून लेखिकेने या पुस्तकाला एका वेगळ्या उंचीवर नेले आहे. त्यामुळे हे चरित्र फक्त ऐतिहासिक कादंबरी न राहता अभ्यासपूर्ण इतिहासलेखन झाले आहे. या पुस्तकावर दोन जणांनी M. Phil. केले हे समजल्यावर आश्चर्य वाटायला नको.
एकंदरीत ऐतिहासिक कादंबरी आवडणाऱ्याबरोबर मराठी इतिहास संशोधक तसेच विद्यार्थी यांनी आवर्जून वाचावे असा हा अमूल्य ठेवा आहे.
Shrikant AdhavKARMAYOGINI (AHILYABAI HOLKAR) by VIJAYA JAHAGIRDAR
एका योगिनीचा प्रवास... आपल्याला इतिहासावरून कायमच आकर्षण वाटत आले आहे. इतिहासातील व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला आदर्शवत वाटतात आणि त्या कायमच स्मरणात राहतात. छत्रपती शिवाजी महाराज तर याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेुळे त्यांच्यावर अनेक उत्तमोत्तम पुस्तके, चरित्रे अनेक मान्यवरांनी लिहिली आहेत. परंतु इतिहासात अशा काही व्यक्ती आहेत की, त्यांच्याबद्दल अत्यंत अल्प परिचय आपल्याला आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याची माहिती आहे. पण ते वाचून त्यांच्या कार्याबद्दल आणखी माहिती करून घ्यायची उत्सुकता अधिक वाढते. अशा काही व्यक्तींपैकी एका अग्रणी असणारे नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाई होळकर यांना आपण मराठेशाहीचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्हारराव होळकरांची स्नुषा आणि एक अत्यंत सत्शील, धार्मिक आचरणाची व्यक्ती म्हणून प्रत्येक मराठी माणूस ओळखतो. पण त्यांची ही ओळख म्हणजे त्यांच्या अलौकिक अशा व्यक्तिमत्त्वातील काही अंशच म्हणावा लागेल. कारण अहिल्याबाई म्हणजे शिस्त, अहिल्याबाई म्हणजे एक मुत्सद्दी राजकारणी आणि समाजाकारणी, अहिल्याबाई म्हणजे एक खंबीर नेतृत्व, बाणेदारपणा अशी कितीतरी रूपं आपल्याला विजया जहागीरदार लिखित ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकातून बघायला मिळतात.अहिल्याबाई होळकरांचा ७० वर्षांचा जीवनपट विजया जहागीरदार यांनी ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडला आहे. अहिल्याबार्इंनी केवळ दानधर्म केला, ठिकठिकाणी घाट, देवळे, त्यांचा जीर्णोद्धारच केला असा आक्षेप त्यांच्यावर अनेक टीकाकारांनी घेतला आहे. लेखिकेने सदर पुस्तकाच्या माध्यमातून आहिल्याबार्इंवर घेण्यात आलेल्या आक्षेपांना चोख उत्तर दिले आहे. या पुस्तकातून त्यांनी अहिल्याबाई त्यांनी अहिल्याबार्इंची कधीही प्रकाशात न आलेली, कुणालाही फारशी ज्ञात नसलेली कर्तृत्वे अगदी समर्थपणे मांडली आहेत. अहिल्याबाई या जात्याच हुशार आणि अत्यंत कुशाग्रबुद्धीच्या. याच त्यांच्या कुशाग्रबुद्धीमुळे त्यांनी आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेतले. अहिल्याबार्इंनी त्यांच्या जीवनात अनेक सुख-दु:खांचे चढउतार अनुभवले. यात प्रामुख्याने दु:खद प्रसंगच अधिक होते. अहिल्याबार्इंचा संसार म्हणजे वैशाखातील ऊन्हाप्रमाणेच होता. पतीचा विक्षिप्तपणा, त्यांचा मृत्यू, त्यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती, गौतमाबाई आणि मल्हारराव यांचे मृत्यू, पुत्र मालोरावांचा नाकर्तेपणा, त्यांचा अकाली मृत्यू, तरुण नातवाचा दुर्दैवी मृत्यू, लहानग्या नातसुनांचे सती जाणे अशा कठीण प्रसंगांतही अहिल्याबाई खंबीर राहिल्या. आयुष्यामध्ये आलेल्या वेदनादायी प्रसंगामध्येही धीरोदात्तपणे उभे राहून संसाराचा गाडा अहिल्याबार्इंनी नेटाने रेटला. ज्या काळामध्ये अहिल्याबार्इंनी यशस्वी राजकारण आणि समाजकारण केले तो काळ लक्षात घेता त्यांचे हे कर्तृत्व किती महान होते हे लक्षात येते. पुरुषप्रधान वर्चस्व असलेल्या त्या काळामध्ये एका स्त्रीने एखाद्या संस्थानाचा कारभार बघायचा म्हणजे अत्यंत कठिण असे कर्म होते. राजकीय शत्रूंबरोबरच घरातील छुप्या शत्रूंनाही नामेहरम करण्याचे धारिष्ट्य अहिल्याबार्इंमध्ये होते. त्यांच्यातील कुशल राजकारणी आपल्याला या कादंबरीत अनेक ठिकाणी दिसतो. अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवनालेखाचा आढावा घेणं तसे कठीणच. पण हे लेखिकेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. अहिल्याबाई होळकरांचा जीवनपट उलगडणारी ही कादंबरी लिहिताना लेखिकेने इतिहासाशी कुठेही प्रतारणा केलेली नाही परंतु कादंबरीमध्ये लालित्य आणण्यासाठी काही प्रसंग दंतकथेवर आधारित असल्याचे लेखिकेने नमूद केले आहे मात्र हे प्रसंग कादंबरीमध्ये इतके चपखलपणे बसले आहेत की ते दंतकथांवर आधारित आहेत हे कुठेही जाणवत नाही. संपूर्ण कादंबरीमध्ये बखरींमध्ये जी भाषा वापरली गेली आहे ती वापरण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पानाच्या तळाला जे शब्द वाचकाला पटकन उमगणार नाहीत त्याचे अर्थ दिले आहेत. त्यामुळे ही भाषा कादंबरीचा आस्वाद घेताना कुठेही रसभंग होत नाही. अहिल्याबाई होळकरांचे कर्तृत्व खरोखरच देदीप्यमान आहे यात शंका नाही. अशा थोर आणि पुण्यश्लोक अहिल्याबार्इंचे चरित्र इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि प्रत्येकाने वाचावे असेच आहे.
DAINIK TARUN BHARAT 30-01-2005एका योगिनीचा प्रवास...
आपल्याला इतिहासावरून कायमच आकर्षण वाटत आले आहे. इतिहासातील व्यक्ती त्यांच्या कर्तृत्वामुळे आपल्याला आदर्शवत वाटतात आणि त्या कायमच स्मरणात राहतात. छत्रपती शिवाजी महाराज तर याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे त्यांच्यावर अनेक उत्तमोत्तम पुस्तके, चरित्रे अनेक मान्यवरांनी लिहिली आहेत. परंतु इतिहासात अशा काही व्यक्ती आहेत की, त्यांच्याबद्दल अत्यंत अल्प परिचय आपल्याला आहे. त्यांच्या अतुलनीय कार्याची माहिती आहे. पण ते वाचून त्यांच्या कार्याबद्दल आणखी माहिती करून घ्यायची उत्सुकता अधिक वाढते. अशा काही व्यक्तींपैकी एका अग्रणी असणारे नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर.
अहिल्याबाई होळकर यांना आपण मराठेशाहीचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्हारराव होळकरांची स्नुषा आणि एक अत्यंत सत्शील, धार्मिक आचरणाची व्यक्ती म्हणून प्रत्येक मराठी माणूस ओळखतो. पण त्यांची ही ओळख म्हणजे त्यांच्या अलौकिक अशा व्यक्तिमत्त्वातील काही अंशच म्हणावा लागेल. कारण अहिल्याबाई म्हणजे शिस्त, अहिल्याबाई म्हणजे एक मुत्सद्दी राजकारणी आणि समाजाकारणी, अहिल्याबाई म्हणजे एक खंबीर नेतृत्व, बाणेदारपणा अशी कितीतरी रूपं आपल्याला विजया जहागीरदार लिखित ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकातून बघायला मिळतात.
अहिल्याबाई होळकरांचा ७० वर्षांचा जीवनपट विजया जहागीरदार यांनी ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडला आहे. अहिल्याबार्इंनी केवळ दानधर्म केला, ठिकठिकाणी घाट, देवळे, त्यांचा जीर्णोद्धारच केला असा आक्षेप त्यांच्यावर अनेक टीकाकारांनी घेतला आहे. लेखिकेने सदर पुस्तकाच्या माध्यमातून आहिल्याबार्इंवर घेण्यात आलेल्या आक्षेपांना चोख उत्तर दिले आहे. या पुस्तकातून त्यांनी अहिल्याबाई त्यांनी अहिल्याबार्इंची कधीही प्रकाशात न आलेली, कुणालाही फारशी ज्ञात नसलेली कर्तृत्वे अगदी समर्थपणे मांडली आहेत.
अहिल्याबाई या जात्याच हुशार आणि अत्यंत कुशाग्रबुद्धीच्या. याच त्यांच्या कुशाग्रबुद्धीमुळे त्यांनी आपले सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेतले. अहिल्याबार्इंनी त्यांच्या जीवनात अनेक सुख-दु:खांचे चढउतार अनुभवले. यात प्रामुख्याने दु:खद प्रसंगच अधिक होते. अहिल्याबार्इंचा संसार म्हणजे वैशाखातील ऊन्हाप्रमाणेच होता. पतीचा विक्षिप्तपणा, त्यांचा मृत्यू, त्यांच्याबरोबर सती गेलेल्या नऊ सवती, गौतमाबाई आणि मल्हारराव यांचे मृत्यू, पुत्र मालोरावांचा नाकर्तेपणा, त्यांचा अकाली मृत्यू, तरुण नातवाचा दुर्दैवी मृत्यू, लहानग्या नातसुनांचे सती जाणे अशा कठीण प्रसंगांतही अहिल्याबाई खंबीर राहिल्या. आयुष्यामध्ये आलेल्या वेदनादायी प्रसंगामध्येही धीरोदात्तपणे उभे राहून संसाराचा गाडा अहिल्याबार्इंनी नेटाने रेटला. ज्या काळामध्ये अहिल्याबार्इंनी यशस्वी राजकारण आणि समाजकारण केले तो काळ लक्षात घेता त्यांचे हे कर्तृत्व किती महान होते हे लक्षात येते. पुरुषप्रधान वर्चस्व असलेल्या त्या काळामध्ये एका स्त्रीने एखाद्या संस्थानाचा कारभार बघायचा म्हणजे अत्यंत कठिण असे कर्म होते. राजकीय शत्रूंबरोबरच घरातील छुप्या शत्रूंनाही नामेहरम करण्याचे धारिष्ट्य अहिल्याबार्इंमध्ये होते. त्यांच्यातील कुशल राजकारणी आपल्याला या कादंबरीत अनेक ठिकाणी दिसतो.
अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या जीवनालेखाचा आढावा घेणं तसे कठीणच. पण हे लेखिकेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. अहिल्याबाई होळकरांचा जीवनपट उलगडणारी ही कादंबरी लिहिताना लेखिकेने इतिहासाशी कुठेही प्रतारणा केलेली नाही परंतु कादंबरीमध्ये लालित्य आणण्यासाठी काही प्रसंग दंतकथेवर आधारित असल्याचे लेखिकेने नमूद केले आहे मात्र हे प्रसंग कादंबरीमध्ये इतके चपखलपणे बसले आहेत की ते दंतकथांवर आधारित आहेत हे कुठेही जाणवत नाही. संपूर्ण कादंबरीमध्ये बखरींमध्ये जी भाषा वापरली गेली आहे ती वापरण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पानाच्या तळाला जे शब्द वाचकाला पटकन उमगणार नाहीत त्याचे अर्थ दिले आहेत. त्यामुळे ही भाषा कादंबरीचा आस्वाद घेताना कुठेही रसभंग होत नाही.
अहिल्याबाई होळकरांचे कर्तृत्व खरोखरच देदीप्यमान आहे यात शंका नाही. अशा थोर आणि पुण्यश्लोक अहिल्याबार्इंचे चरित्र इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि प्रत्येकाने वाचावे असेच आहे.
-अमिता जामखेडकर
DAINIK SAKAL 29-10-2006एका कर्तृत्वसुंदर स्त्रीचा जीवनालेख...
इतिहासकालीन कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा परिचय वेगवेगळ्या कोनांमधून वाचकांसमोर येत असतो. अभ्यासकांच्या ध्यासातून त्यांच्या कर्तृत्वाचे आलेख मांडले जातात. अशाच एका संपन्न व्यक्तित्वाच्या तेजस्वी कर्तृत्वाचा आलेख ‘कर्मयोगिनी’ या पुस्तकात मांडण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील चरित्रकादंबरी लिहिली आहे विजया जहागिरदार यांनी.
या कादंबरीच्या निमित्ताने अहिल्याबार्इंच्या समग्र कर्तृत्वाचा आढावा लेखिकेनं अभ्यासपूर्ण दृष्टीनं आणि त्या व्यक्तित्वावरील निष्ठेनं घेतल्याचं जाणवतं. अहिल्याबार्इंच्या अंगी असलेलं मुत्सदीपण, त्यांच्यातली ज्ञानलालसा, दूरदृष्टी, धर्मपरायणता तसंच प्रजावत्सलता, रणनीती निपुणता, राज्य कारभारातली कुशलता त्याचबरोबर कल्याणकारी वृत्ती, चारित्र्यातली निष्कलंकता, साधी राहणी अशा अनेकानेक गुणांनी लेखिका भारावून गेली असल्याचं सतत जाणवतं. त्यामुळे घसघशीत वाटावी अशी कादंबरी सिद्ध झालेली आहे. अंगणात चिमुरडी अहिल्या परकराचा घोळ सावरत रंगावली रेखत होती, या बालिकारूपापासून अहिल्याबार्इंचा वेध घेत जाणारी ही कादंबरी. त्यांच्यातल्या बाणेदार, तेजस्वी, धैर्यशील अशा विविध पैलूंचे दर्शन घडवत पुढे सरकते. एकामागोमाग येणारे अनेक कौटुंबिक आघात पचवण्याचं बळ या धीरादात्त मनस्विनीजवळ होतं म्हणून त्या कर्मगतीला सामोऱ्या जाऊ शकल्या आणि राज्यकारभार नीटपणे सांभाळू शकल्या. त्याची घडी विस्कटू दिली नाही. पती खंडेरावांनी आणि पुढे स्वपुत्र मालेरावांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यांनी अनेक अपराध केले, अन्याय केले. त्यातूनही त्या घट्टपणे उभ्या राहत गेल्या. त्यांना कर्तव्यकठोर व्हावंच लागलं. या कटकटींमध्ये गुंतून पडत्या, तर राजनीतीची, समाजनीतीची मशाल कशी हाती धरली असती? अहिल्याबार्इंना आधार होतो तो फक्त सासरे मल्हारराव होळकरांचा. त्या गुणग्राहक माणसानं तर अहिल्याबार्इंमधली प्रज्ञा अधिक तेजस्वी केली. त्यांच्यातली क्षमता ओळखली. राजनीतीचा पहिला वस्तुपाठ दिला. संकटग्रस्त अहिल्याबार्इंना ते एकदा म्हणाले ‘‘आपला आवाका मोठा. आपण आहात तर दौलत आहे. तुम्हाला पोरवयात या कुळी उचलून आणली आणि नुसती कामास जुंपली... खंडेराव ते तसे निघाले... मालेराव हे असे... काही काही सुख नाही.’’
अशी ही कर्मयोगिनी! प्रसंगी कर्तव्यकठोर झाली. कारण त्यांच्यातली सदसदविवेकबुद्धी खूप धारदार होती. एक लोकोत्तर स्त्री म्हणून इतिहास त्यांची नोंद घेतो. त्यांच्या मृत्यूनं महेश्वरचे ‘पुण्यशील महाद्वार’ कोसळले असा सार्थ उल्लेख आहे. संपूर्ण महेश्वर हळहळावं असं आकाशव्यापी कर्तृत्व त्यांनी केलं होतं.
अहिल्याबाई या तेजोमय स्त्रीचं दर्शन या कादंबरीत समग्रपणे होतं. तत्कालीन बोली भाषा वापरण्याचा चांगला प्रयत्न आहे. एक मात्र खरं, की राजनीतीकुशल अहिल्याबार्इंच्या प्रतिमेपेक्षा कौटुंबिक अहिल्याबार्इंची प्रतिमा यात अधिक ठसठशीतपणे उभी राहते. दोन्हींचा तोल सांभाळला जाता तर अधिक सशक्तपणा आला असता असे वाटते. वाचनाचा ओघ मात्र या कादंबरीत चांगला सांभाळलाय, ही नोंद घ्यायला हवी.
-नंदा सुर्वे
VIVEK , 11-07-1993प्रतिकूल नियतीशी झगडणारी तेजस्वीनी – अहिल्याबाई...
ऐतिहासिक पृष्ठभूमीवर आधारित अशा मराठी कादंबरीला बरीच मोठी परंपरा आहे. मध्यंतरी ही परंपरा काही काळ खंडित झाली होती. परंतु रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’च्या यशाने ती पुनरुज्जीवित झाली. मराठ्यांच्या इतिहासातील अनेक प्रख्यात व्यक्तीप्रमाणेच उपेक्षितांकडेच साहित्यिकांचे लक्ष गेले. इतिहासाचे भान राखून त्यातील अनेक व्यक्तिमत्त्वे या कादंबऱ्यांतून सजीव, साकार झाली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जीवनावर आधारित असलेली प्रस्तुत कादंबरी असाच एक लक्षणीय प्रयत्न आहे.
सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली एक मुलगी योगायोगाने मराठ्यांचे इतिहासातील मल्हारराव होळकरांसारख्या श्रेष्ठ मानकऱ्याची सून झाल्यानंतर त्या काळात स्त्रियांवर असलेली सर्व प्रकारची बंधने आणि मर्यादा पाळूनही केवढी उंची गाठू शकते, याचे अतिशय चित्तवेधक चित्रण लेखिकेले कुशलतेने केलेले आढळते. ऐतिहासिक साधनांचा साक्षेपी अभ्यासही ठिकठिकाणी जाणवतो.
अहिल्याबार्इंच्या दीर्घ जीवनप्रवासात (थोरल्या बाजीरावांपासून सवाई माधवरावांच्या काळापर्यंत) एक नजरेत भरणारी प्रमुख गोष्ट म्हणजे प्रतिकूल नियतीशी दमछाक होईपर्यंत त्यांना करावा लागलेला झगडा. परंतु या झगड्यातही त्यांनी आपली मान सदैव ताठ ठेवली, एकदा हाती घेतलेले होळकर घराण्याच्या आणि पर्यायाने मराठेशाहीच्या उत्कर्षाचे निशाण त्यांनी खाली पडू दिले नाही.
अहिल्याबाई या केवळ देवळे, धर्मशाळा, पाणपोया बांधून व्यक्तिगत पुण्यासाधन करणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या साध्वी नव्हत्या, तर युद्धकला निपुण, मुत्सद्देगिरीने भल्याभल्यांना (राघोबादादा, महादजी शिंदे) थक्क करणाऱ्या, प्रजाहित दक्ष, करूणामयी प्रजामाता पदवीस चढलेल्या अलौकिक कर्मयोगिनी होत्या, याचे सप्रमाण दर्शन लेखिकेने घडविले आहे.
त्यांच्यावर आपत्ती तरी किती याव्या? रंगढंगात रंगलेला हेकट पती खंडेराव, वंशाचा एकमेव दिवा असलेला पण सर्वार्थाने कुलांगार ठरलेला पुत्र मालेराव, सतत चैनबाजीत दौलत उधळून अहिल्याबार्इंचा मानसिक छळ करणारा तुकोजीराव, कुटुंबातील कर्ते पुरुष अल्पायुषी ठरल्यावर त्यांच्या कोवळ्या वयाच्या पोरवसदा बायकांवर रूढीग्रस्त समाजात झालेली सती जाण्याची सक्ती निमूटपणे पहावी लागल्यामुळे होणारी जिवाची तगमग यांचे अतिशय सहृदय दर्शन प्रस्तुत कादंबरीत घडते.
परंतु या सर्व आपत्तींतही निर्धाराने वागणारी परंतु आपल्या पोटच्या मुलास चाबकाने बुडविणारी, सामान्यातल्या सामान्य प्रजाजनांवर ही अन्यास होऊ नये. म्हणून दक्ष राहणारी, ज्यांच्याकडून राज्यकारभाराचे धडे मिळाले त्या सुभेदार मल्हाररावांनाही त्यांच्या काही आक्षेपार्ह राजकीय खेळीबाबत (नजीबखान प्रकरण) स्पष्ट सुनावणारी, दौलतीच्या पैशाच्या हिशेबात काटेकोर राहणारी, शिंदे होळकर, पेशवे यांच्या सहकार्याने घडू शकणारे, पण घरभेदीपणा, भाऊबंदकी, स्वार्थ यामुळे प्रत्यक्षात न येऊ शकणारे, स्वप्न पाहणारी, कलाकौशल्य, व्यापारउदीम, विद्वानांचा परामर्श घेण्यात तत्पर अशी कर्तृत्वसंपन्न स्त्री लेखिकेने उभी केली आहे. अहिल्याबार्इंच्या भोवती वावरणाऱ्या, बाईजी, हरकूआई, मुक्ता, इत्यादींच्या व्यक्तिरेखाही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
या कादंबरीतील अहिल्याबार्इंच्या निर्वाणप्रसंगीचे चित्रण अतिशय प्रत्ययकारी आणि हृदयस्पर्शी झालेले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांच्या राज्याच्या हिताची चिंता करणारे, त्यांच्या विजयाने प्रमुदित होणारे, प्रजावत्सल मन ठायी ठायी जाणवते.
कादंबरीची भाषा विषयाला साजेशीच आहे. त्यामुळे वातावरण निर्मिती साधण्यास मदत झाली आहे. उपराळा, असकत, किलाफ, धुणीपाणी अशा तत्कालीन शब्दांच्या उपयोगामुळे संवाद स्वाभावित वाटतात.
मात्र काही ठिकाणी आधुनिक काळातील स्त्रीमुक्ती संबंधीचे किंवा अन्य विचार लेखिकेने (स्वत:च्या मनात सलणारे असल्यामुळे असेल कदाचित) अहिल्याबार्इंच्या तोंडी घातले आहेत. उदाहरणार्थ, भिल्ल्यांच्या पुंडाव्याचा बंदोबस्त करणारा वीर, मग तो मुसलमान पठाण असला तरी आपली मुलगी त्याला विवाहात देण्यास काय हरकत आहे? असा अहिल्याबार्इंनी स्वत:ची कन्या मुक्ता हिच्या संबंधात मांडलेला विचार. पण यावेळी होळकरांची सुभेदारी होळकरांच्याच (औरस किंवा अनौरसही) वंशात रहावी यासाठी तुकोजीचे बेजबाबदार वर्तनही त्यांना नाईलाजाने खपवून घ्यावे लागले, हे विसरून चालणार नाही.
तसेच दंतकथांचा उपयोग कादंबरीत योग्य असला तरी इतिहासातील मूळ व्यक्तिमत्वाशी त्या सुसंगत असाव्यात. उदाहरणार्थ, बेसावक अवस्थेत थोरल्या बाजीरावांस मल्हाररावांनी गराडा घालणे, हे वर्णन सदासावध अशा बाजीरावाच्या बाबतीत शक्य कोटीतील वाटत नाही.
तसेच कादंबरी आणि चरित्र यात फरक करतांना चरित्राचा संपूर्ण तपशिलात न जाता काही वेचक आणि वेधक प्रसंगच निवडून त्यावर कादंबरीची उभारणी करावयास पाहिजे. प्रस्तुत कादंबरीच्या लेखनातही अनावश्यक तपशील टाळून कादंबरी आटोपशीर करता आली असती.
पण असे काही किरकोळ दोष वगळता, इतिहासातील अेका प्रत्यक्षात, पित्यासमान सासऱ्यांच्या विनवणीमुळे दौलतीसाठी ‘सती’ न गेलेल्या पण जन्मभर जिवंत सतीचे कठोर व्रताचरण करणाऱ्या असामान्य देवी अहिल्याबार्इंना लेखिकेने यथोचित न्याय दिलेला आहे, असे आढळून येईल.
-श्री. वा. खरे
NEWSPAPER REVIEWसन्सस्त कर्मयोगीनीचे उत्कृष्ट चरित्र...
सौ. विजया जहागीरदार यांचे पारितोषिक विजेते पुस्तक कर्मयोगीनी वाचले. साहित्यातील श्रेष्ठ कलाकृती आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता उरत नाही. फक्त सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे ही कळकळ.
पुण्यश्लोक अहिल्याबाई कुशल राज्यकर्ती होती. तिने पुष्कळ लोकोपयोगी कामे केली एवढेच इतिहासात अभ्यासले होते. कर्मयोगीनीतून तिचे सांगोपांग दर्शन घडते. तिच्या ठायी असलेल्या गुणांचा प्रत्यय प्रसंगा-प्रसंगातून येतो. विजयातार्इंच्या सिद्धहस्ताने कथानकाचे सोने केले आहे. इतिहासाला जराही धक्का न लावता मल्हारराव होळकरांना वाळूची कोप निर्भयतेने सांभाळणारी चिमुरडी पोर भेटते काय नि तिची पारख होऊन मल्हारराव तिला आपली सून करून घेतात काय मनोरंजक वाटते. मौल्यवान रत्न व रत्नपारखी यांची गाठ पडली. अन् दोघेही धन्य झाले. मुलांचा नाकर्तेपणा याउलट सूनबाईची हुशारी ओळखून मल्हाररावांनी एक कर्तबगार राज्यकर्ती घडविली तिने सासऱ्याचे राज्य प्राणपणाने राखले व भविष्यवाणी खरी ठरवली.
राज्याची राणीपण तिच्या जीवनात आनंदाचा एकही दिवस उगवला नाही. देवाची काय हि विचित्र लिला. छंदीफंदी व्यसनाधीन नवऱ्याशी जन्मगाठ पडली पुत्र (दुर्गुणात बापसे बेटा सवाई निघाला.) एकुलत्या एक नातवाचा डोळ्यासमोर मृत्यू झाला. जावयाचे अकाली निधन, लाडकी लेक सती गेली. दत्तक पुत्र स्वैराचारी निघाला. त्याने मन:स्तापच दिला. दु:खाने होरपळून गेलेली स्त्री, मोडून न पडता सुरळीत राज्यकारभार चालविते हे विशेषच म्हणले पाहिजे.
पती निधनानंतर अहिल्याबाई संन्यस्त वृत्तीने जगली. फळाची अपेक्षा न करता स्वत:चे कर्म करीत राहिली. म्हणूनच ती ‘कर्मयोगिनी’ ठरली. लोकांनी तिची पूजा आरंभिली. इतिहासात ती अजरामर झाली.
‘कर्मयोगीनी’ कादंबरीवर आधारित ‘गाथा कर्मयोगीनीची’ हे विजयातार्इंनी नाट्यरुपांतर केले आहे. नाट्यवाचनाचा कार्यक्रम तेवढाच श्रवणीय आहे. रसिकांनी कार्यक्रम ऐकण्याची संधी सोडू नये.
-जयश्री शहा, सोलापूर
DAINIK LOKSATTA 27-11-2005संदर्भमूल्य असणारी कादंबरी…
घाट, देवळे, जीर्णोद्धार, धर्मशाला, विहिरी, तळे, रस्ते, अन्नछत्रे, पाणपोया, सदावर्ते अशी कोणतीही गावे, राज्ये, खेडी नसतील तिथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा हस्तस्पर्श झाला नसेल. त्यातून त्यांची जनतेविषयीची सहानुभूती व औदार्य दिसून येते. तत्कालीन समाजाची नेमकी नाड ओळखून ते सर्व केले. धार्मिकतेतून करुणा, दातृत्व यांचा सुंदर मिलाप. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू तितकीच परंतु, त्याहूनही विशाल अशी. त्याच समाजाचे रक्षण, राज्यकाराभारातील निपुणता, श्रीमंतांच्या गादीशी असणारी निष्ठा जी नंतरच्या काळात कोणत्याही राजेशाहीकडून आढळली नाही. दुर्मिळ झाली.
‘कर्मयोगिनी’ हे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांचे चरित्ररूपी कादंबरी सुप्रसिद्ध लेखिका विजया जहागीदार यांनी लिहिली आहे. अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून तिच्या तीन आवृत्या निघाल्या आहेत.
एका स्त्रीचे दु:ख स्त्रीच जाणू शकते व यथायोग्य मांडू शकते. इथे विजया जहागीदार यांनी पुरुषार्थ गाजविणाऱ्या स्त्रीच्या हृदयाचा कोपऱ्यात कुठेतरी एखादे शल्य आहे हे ओळखून अत्यंत हृदयस्पर्शी मांडले आहेत. ती एकाच वेळी सून, आई, पत्नी, राणी, सेनापती राहूनही प्रसंगी कोमल हृदय बाजूला ठेवून साम्राज्यांतर्गत व बाह्या शत्रूंशी लढा देते ते एक दूरदृष्टी, धोरणी, राज्यकारभाराचे कौशल्य हे गुणे दाखवून देऊन प्रजेच्या रक्षणासाठी नादान लोकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी दुसरीकडे त्याचबरोबर प्रजेच्या अत्यावश्यक गरजा ओळखून दानधर्माचे महत्व आपल्या कृतीतून भेदाभेद न करता जाणवून देत व त्या पुऱ्या करत. म्हणजेच राणी म्हणून राजभोग घेण्यापेक्षा समाजाचे साम्राज्य आहे, हे ओळखून त्याचे आपण केवळ विश्वस्त आहोत ही श्रेष्ठ भूमिकाही पार पाडली. संस्कृत, फारशी, उर्दू, मराठी, पुणेरी (पेशवेकालीन) भाषांचा मोह अति आदरामुळे व एका स्त्रीच्या दु:खात खऱ्या अर्थाने समरस झाल्याने लेखिकेला आवरता आला नाही असे दिसते. त्यामुळे सलग वाचताना रसभंग होतो. ऐतिहासिक भाषा, राजवाडे, सेतू माधवराव पगडी यांच्यापेक्षा वेगळी वाटते. किंबहुना ती तशी हवी होती असे वाटते. साहेब हा शब्द तेव्हा होता का? की सन्मानाने वापरण्यासाठी वापरला गेला आहे हे कळत नाही. परंतु, कादंबरीचे थोडक्यात सार सांगायचे म्हणजे एकाच दमात वाचून काढावी अशी वाटणारी व ओघवती भाषाशैली पुढे काय? हा प्रश्न व उत्सुकता कायम ठेवणारी ही कादंबरी आहे हे निश्चित.
अलीकडे वयात येणाऱ्या मुली-मुलींना पाश्चात्त्या संस्कृतीच्या धर्तीवर लैगिक ज्ञानाची आवश्यकता हवी म्हणून जो मुक्त, वैचारिक गोंधळ चालला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्याच्या आईने व सासूने किती समंजसपणे हळुवारपणे समजावून सांगून संसाराची सुरुवात करताना सर्वंची मने राखून आपले ईप्सित साध्य करून घ्यावे तसेच आपला आब व मान आपणच राखावयाचा असतो हा भाग अप्रतिमच.
पतीवियोगाचे व पुत्रवियोगाचे पहाडासारखे दु:ख पचवून केवळ जनकल्याणसाठी व राज्यशकट हाकलण्यासाठी ही माता आपली पडलेली जबाबदारी न कंटाळता व न टाळता अतिशय धीरोदत्तपणे येणाऱ्या अस्मानी व सुलतानी संकटांना सामोरी जाते हे प्रसंग अतुलनीय आहेत. लेखिकेने हुबेहूब मांडले आहे. असे वाटते की साक्षात आपणच तेथे जातीने उपस्थित आहोत.
स्त्रीनेच स्त्रीला आधार द्यायचा असतो. ताठ मानेने जगणे व जगवणे या सुखाशिवाय सुख नाही हे आपल्या कर्तृत्वाने तिने दाखवून दिले आहे.
इतरत्र धर्मसत्ता व राजसत्ता यांची एकमेकांवर कुरघोडी होऊन अराजक माजले असताना आहिल्येने मात्र या दोघांची समसमान स्तरांवर उभारणी करून योग्य ती सांगड घालून त्यांचे परस्परालंबित्व दाखवून राज्यकाराभारात त्याचा उपयोग करून एक आदर्श निर्माण केला. त्याचे उदाहरण देताना लेखिकेने एक प्रसंग फारच सुंदर रीतीने मांडला आहे. खंडेरायाच्या मृत्यूनंतर ज्या कोणी हिंदू स्त्रिया सती गेल्या त्या वेळेस त्यांची अंगवस्त्रे सकिना, शबनम या मुस्लिम स्त्रियाही सती गेल्या. सहामासी व वार्षिक श्राद्धप्रसंगी ब्राह्मण, नातलग, समाज विरोधात असूनही साऱ्यांच्या खंबीर पाठिंब्यावर त्यांनाही पिंडदान, तर्पण करण्याचा विनंतीवजा हुकूम त्या करतात. ‘नाती काय केवळ धर्मानेच बांधली जातात? माणुसकीचा धर्म श्रेष्ठ नव्हे का? की मौलवींकडे जाऊ त्यांचे श्राद्ध करावयास?’ अशा कडक शब्दात प्रसंगी परधर्माकडेही श्रेष्ठत्व देतात हेही यातून दिसून येते.
तसेच विज्ञान व अध्यात्म ज्ञान यांचेही परस्परसंबंध त्यांनी पटवून दिले आहे. तुकोजी व त्यांची पत्नी रखमाबाई यांच्या तंट्याबखेड्यात नारो गणेशाचे जे क्रूर हाल होतात ते या सतीला बघवत नाही. त्या समजुतीच्या सुरात रखमाबार्इंना सुनावतात, ‘‘माणूस करायला वर्षे लागतात... आब घ्यायला एक दीन पुरतो.’’
जेव्हा या पुण्यश्लोक कर्मयोगिनीची अखंड कर्मयज्ञाची अखेर झाली तेव्हा नर्मदा अनावर रडू लागली. तिचाही ऊर भरून आला. पूर भरून आला.
ही कादंबरी ऐतिहासिक आहेच परंतु संदर्भग्रंथ म्हणूनही उपयुक्त दस्तऐवज ठरेल. लेखिकेने भावुक व भाविक होऊन आपल्यासमोर हा शब्दपट साक्षात चित्रपटरूपाने मांडला आहे.
-रवींद्र गाडगीळ