- DAINIK SAKAL 07-01-2007
प्रांजळ आणि संयत...
आपल्या निवडलेल्या क्षेत्रात आयुष्यभर कष्ट करून गुणवत्तेची असामान्य उंची गाठणाऱ्या नि:स्वार्थी व्यक्तींना ऋषी म्हणतात. ज्येष्ठ आयएएस अधिकारी बी.जी.देशमुख (सर) मला असे आधुनिक ऋषी वाटतात. प्रशासनात काम करताना आम्ही त्यांच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून पाहायचो. त्यांचं शांत, ठाम आणि सात्त्विक व्यक्तिमत्त्व प्रेरणादायक होत आहे आजही आहे. आता तितकंच प्रेरणादायक असलेलं आत्मचरित्रपर पुस्तक ‘पुणे ते पंतप्रधानाचं कार्यालय’ आपल्या सर्वांसाठी मराठीमध्ये उपलब्ध झालं आहे आणि ते अर्थातच सर्वांनी आवर्जून वाचलं पाहिजे.
पुण्यातील मुंजाबाच्या बोळातल्या एका सर्वसाधारण मराठी घरात जन्म घेऊन महाराष्ट्राचे मुख्य सचिव,भारताचे कॅबिनेट सेक्रेटरी आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव, असा त्यांच्या आयुष्याचा प्रवास माझ्या दृष्टीनं तपश्चर्या-प्रेरणादायक आहे; कारण आयएएसमध्ये निवड होऊन त्यांनी केवळ करिअरमध्ये पदं भूषविलेली नाहीत, पदं तर काय सर्वच अधिकारी भूषवितात. त्यांनी जाईल तिथं ठसा उमटविणारं, दिशा दाखविणारं काम केलं. हे सर्व करताना त्यांना कुणीही राजकीय गॉडफादर नव्हता. मुख्य सचिव, कॅबिनेट सेक्रेटरी आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव हा त्यांचा प्रवास कार्यक्षमता आणि अंगभूत गुणांच्या बळावर झाला आहे. म्हणून तो प्रवास प्रेरणादायक आहे. अर्थात, राजकीय नेतृत्वापाशीसुद्धा अशा गुणांची कदर करण्याची प्रगल्भता असावी लागते. ती त्यांच्या बाबतीत लाभली हे देशांचं भाग्य म्हणावं लागेल. श्री. देशमुख यांचा हा सर्व प्रवास ‘पुणे ते पंतप्रधानांचे कार्यालय’ या पुस्तकामध्ये मांडण्यात आला आहे. तोसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच अलिप्तपणे आणि वस्तुनिष्ठपणे मांडण्यात आला आहे. प्रशासनात तीन दशकांहूनही अधिक काळ काम केलेल्या एका व्यक्तीच्या आठवणी असं या ग्रंथाचं स्वरूप नाही, तर स्वतंत्र भारताच्या वाटचालीतील खळबळजनक कालखंडाचं एका सहभागी आणि संवेदनशील मनानं केलेलं अत्यंत बुद्धिमान चित्रण आहे. त्यांच्या वैयक्तिक वाटचालीबरोबरच या ग्रंथात आपल्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळ भेटते. अत्यंत खळबळजनक असलेलं साठीचं दशक भेटतं; चीन, पाकिस्तान, बांगलादेश सर्व लढाया भेटतात. यशवंतराव चव्हाण, इंदिराजी, राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर अशी व्यक्तिमत्त्वं भेटतात. शेषन यांचा सार्वजनिक जीवनात ‘पॉप्युलर’ असलेल्यापेक्षा एक वेगळाच चेहरा पाहायला मिळतो. शाहबानो प्रकरण, बाबरी मशीद-रामजन्मभूमी विवाद, मंडल आयोग, बोफोर्स प्रकरण यांसारखे संपूर्ण देश हलवून सोडणारे विषय या ग्रंथात नीट तपशीलवार भेटतात. अनेक आत्मचरित्रपर पुस्तकांमध्ये लेखक काहीतरी हातचं राखून लिहितोय असं वाटतं, तसं या ग्रंथात वाटत नाही. याउलट काही अन्य आत्मचरित्रपर पुस्तकांमध्ये लेखकानं सनसनाटी, प्रक्षोभकपणा निर्माण केलेला असतो, तसाही या ग्रंथात नाही. प्रांजळ असून, संयत असा संपूर्ण ग्रंथाचा सूर आहे. म्हणून ‘अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक’ या पुस्तकाचा ‘पुणे ते पंतप्रधानांचे कार्यालय’ हा अनुवाद सर्व युवकांनी, नागरिकांनी आवर्जून वाचला पाहिजे.
-अविनाश धर्माधिकारी
- DAINIK SAMANA 15-10-2006
सनदी अधिकाऱ्याच्या आठवणी...
ग्रेट ब्रिटन हा देश आपल्या महाराष्ट्र प्रांतापेक्षाही थोडा लहानच आहे. मग या ब्रिटनने आपला खंडप्राय हिंदुस्थान देश एवढ्या हजारो कि. मी. अंतरावरून कसा ताब्यात ठेवला? इथला राज्यकारभार कशाच्या बळावर चालवला?
अद्ययावत सैन्याच्या बळावर इंग्रजांनी हिंदुस्थान ताब्यात ठेवला नि सनदी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षम यंत्रणेच्या आधारावर त्यांनी त्याचा कारभार चालवला. कारभार हाकणाऱ्या अधिकाऱ्यांची ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिस’ ऊर्फ आय. सी. एस ही यंत्रणा त्यांनी उभी केली. आय.सी.एस. अधिकारी बनण ही अत्यंत अवघड नि त्यामुळेच प्रतिष्ठेची बाब असायची.
स्वातंत्र्य मिळाल्यावर या यंत्रणेचं नाव बदलून इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस - (आय.ए.एस) असं करण्यात आलं. नव्या लोकशाही व्यवस्थेत कायदे करण्याचं काम लोकांनी विधानसभेत वा लोकसभेत निवडून पाठवलेले लोकप्रतिनिधी करणार होते. पण त्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणजेच प्रशासन हे आय.ए.एस. म्हणजेच सनदी अधिकारी करणार होते. स्वातंत्र्योत्तर काळात जी नवी, ताज्या दमाची तरुणाची पिढी आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासनाच्या आखाड्यात उतरली. त्यापैकी एक म्हणजे भालचंद्र किंवा बी.जी.देशमुख.
शिवछत्रपतींच्या राजधानी रायगडच्या घेऱ्यातलं निजामपूर हे देशमुखांचं मूळ गाव. पण देशमुखांचे पणजोबा इंग्रजी आमदानीत पुण्याला आले आणि सरकारी नोकरीत मामलेदार पदापर्यंत चढले.
भालचंद्र देशमुख १९५१ साली आय.ए.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन हिंदुस्थान सरकारच्या प्रशासकीय सेवेत रुजू झाले. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक सेवेत रुजू झाले. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक राज्य हे अगदी नवंनवं होतं. इंग्रजी राज्यकारभाराचा ठसा अजून कायम होता. आता स्वतंत्र हिंदुस्थानचा नवा प्रशासकीय ठसा निर्माण करायचा होता. काळ मोठा आव्हानात्मक होता.
तत्कालीन मुंबई राज्यातील भिवंडी, बनासकाठा, डाग अशा ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत भालचंद्र देशमुखांची कारकीर्द सुरू झाली. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा सचिव, मुंबई महापालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्याचे मुख्य कॅबिनेट सचिव असे टप्पे घेत भालचंद्र देशमुख राजीव गांधीच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे मुख्य कॅबिनेट सचिव बनले. एक मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय स्थानावर आरूढ झाला.
राजीव गांधींबरोबरच विश्वनाथ प्रताप सिंग आणि चंद्रशेखर यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही देशमुख दिल्लीत महत्त्वाच्या स्थानांवर वावरत होते. बोफोर्स, कांड, श्रीलंका समस्या, पंजाब समस्या, मंडल आयोगाची अंमलबजावणी इत्यादी नजीकच्या राजकीय इतिहासाचे देशमुख एक महत्त्वाचे. प्रत्यक्ष साक्षीदार आहेत.
‘अ कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक’ या त्यांच्या आठवणींच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजेच प्रस्तुत ‘पुणे ते पंतप्रधानांचे कार्यालय’ हे पुस्तक अशोक पाध्ये यांनी हा अनुवाद केला आहे. वरील घटनांबद्दल देशमुखांनी बरंच तपशीलवार लेखन केलं आहे. देशमुखांच्या आठवणी गमतीदार आहेत. पण त्यांची वर्णनशैली काहीशी रूक्ष आहे.
मुद्रण, मांडणी, एकंदर निर्मिती दर्जेदार चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ दिलखेचक, अशोक पाध्यांचा अनुवाद नेहमीच सरस असतो.
- DAINIK AIKYA 01-10-2006
मराठी माणसाने गाठलेले सत्तेचे शिखर...
राजकीय क्षेत्रात मराठी नेत्याला राजधानी दिल्लीचे सत्तेचे सर्वोच्च शिखर पंतप्रधान पद काही गाठता आले नाही. पण प्रशासकिय सेवेत आपल्या कर्तृत्वाच्या बळावर भालचंद्र उर्फ बी. जी. देशमुख यांनी मात्र कॅबिनेट सेक्रेटरी आणि पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी सर्वोच्च अधिकारपदे काबीज केली होती. त्यांनी कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक या ग्रंथात आपल्या प्रशासकीय सेवेतील आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यांच्या या ग्रंथाचे मराठी भाषांतर अशोक पाध्ये यांनी करून मराठी वाचकांपुढे प्रशासकीय सेवेतील गुंतागुंत, सत्तेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या राजकारण्यांचे व्यक्तिमत्व असे अनेक पदर उलगडून दाखवले आहेत.
भालचंद्र देशमुख हे पुण्यातले. मुंजाबाच्या ... राहणाऱ्या आणि नूतन मराठी विद्यालयात शिकणाऱ्या या मुलाने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर १९५१ मध्ये ... मुंबई इलाख्यातून आय. ए. एस. ही सर्वोच्च प्रशासकीय परीक्षा उत्तीर्ण होण्याची कर्तबगारी दाखवली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला युवक प्रशासकिय सेवेत दाखल झाला. प्रशासनाच्या सर्व पायऱ्या देशमुख यांनी टप्प्याटप्प्याने ओलांडत कोणीही गॉडफादर किंवा हितचिंतक नसतानाही आपल्या प्रशासन कौशल्याच्या बळावर आणि कर्तृत्वावर कॅबिने सेक्रेटरीपर्यंतचे पद गाठले. नोकरीतले भलेबुरे अनुभव त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे लिहिले आहेत. या आठवणीत कौटुंबिक आठवणी फारच आहेत.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची पहिली नेमणूक बडोद्यात थर्ड क्लास मॅजिस्टेट म्हणून झाली. त्यांनी टंचाईग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा द्यायचे काम केले. भिवंडीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर काम करताना त्यांनी झोपडट्ट्यांच्या समस्यांतून या शहराची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी झोपडपट्ट्यांची आणि झोपडपट्टीवासियांची गणती केली. १९७५ नंतर मुंबईत एकही झोपडी उभी राहून नये. असे त्यांचे मत होते. पण .... जपणाऱ्या राजकारण्यांना ही कटूता मान्य झाली नाही. परिणामी झोपडपट्ट्यांची समस्या अधिकच भेसूर आणि उग्र झाल्याचे मत त्यांनी परखडपणे नोंदवले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात देशमुख चीफ सेक्रेटरी झाले वसंतराव नाईक हे जितके कुशल राजकारणी होते तितकेच लोकाभिमुखही होते. लोकांची कामे कायद्याचा अडसर न सांगता कशी करावीत, यांची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. १९७२ मधल्या दुष्काळाला त्यांनी निर्धाराने तोंड दिले. महाराष्ट्र धान्योत्पादनात स्वावलंबी केला. रोजगार हमी योजना आणि कापूस एकाधिकार योजनेचे तेच शिल्पकार होते. राज्याच्या शेतीच्या विकासाचे उद्धारकर्ते असल्याचे देशमुख यांनी नमूद केले आहे.
राजीवगांधी पंतप्रधान पदावर असताना देशमुख प्रारंभी कॅबिनेट आणि नंतर पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी झाले. राजीव गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याच्या प्रयत्न त्यांनी केला आहे. राजीव गांधी व्यक्तिगत जीवनात अत्यंत प्रमाणिक आणि कुटुंबवत्सल होते. त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याने त्यांच्याभोवती कडक सुरक्षा व्यवस्था असे. तिचा त्यांना वैताग येई. काही वेळा ही व्यवस्था भेदून ते मोकळेपणाने फिरण्याचा प्रयत्न करीत आणि त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडत असे. बोफोर्सचे प्रकरण त्यांच्याच काळात झाले. या साऱ्या घोटाळ्याचा विश्वनाथ प्रताप सिंग यांनी प्रचंड गाजावाजा केला. याच प्रकरणाने बदनाम झाल्यामुळे राजीव गांधीना सत्ताही गमवावी लागली. पण या साऱ्या प्रकरणात ते किंवा त्यांच्या नातेवाईकांनी कमिशन म्हणून पैसे घेतले नाहीत; परंतु परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेता दलाली घेतलेल्यांची नावे त्यांना ठाऊक होती आणि ती नावे उघड करण्यास ते इच्छुक नव्हते. ही नावे काँग्रेस पक्षातील व्यक्तींची असावीत की जवळच्या मित्रांची असावीत, अशी शंका देशमुख यांनी व्यक्त केली आहे. वास्तविक भष्ट्राचाराचा आरोप इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत रुजला. पक्षाला पैसे मिळवून देण्यासाठी संजय गांधीनी हे तंत्र अधिक जोमाने अमलात आणले, पण त्याचे दुष्परिणाम मात्र राजीव गांधींना भोगावे लागले. त्यांच्याभोवती टी. एन. शेषन, मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या खुषमस्करांची फौज जमली होती. हे लोक प्रशासनातही मनमानी हस्तक्षेप करीत असत. त्यांना रोखणे राजीव गांधींना शक्य झाले नाही. त्यांना भारताला एकविसाव्या शतकात नेण्याची घाई झाली होती. भारत अण्ववस्त्रधारी राष्ट्र व्हावे, यासाठी त्यांनीच आदेश दिले होते. खुषमस्कऱ्यांनी घेरल्याने राजीव गांधी बदनाम झाले. लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत ते हजर राहायला नाखुष असत.
माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याही काळात देशमुख हे पंतप्रधानाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते. या दोन्हीही नेत्यांच्या राजकीय निर्णयाचे मूल्यमापन त्यांनी केले आहे. जनता दलाच्या पक्षांतर्गत सत्तासंघर्षात चंद्रशेखर यांना शह देऊन विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान झाले. पण उपपंतप्रधान देवीलाल यांनी त्यांना सातत्याने त्रास दिला. देवीलाल हे त्यांच्या काळातील लोढणे झाले होते. काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा फूट पडेल असे सिंग यांना वाटत होते; पण तसे झाले नाही. भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा बिहारमध्ये अडवली जाताच, त्या पक्षाने सिंग यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. परिणामी अवघ्या अकरा महिन्यात त्यांची सत्ता गेली. सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारून आपण मागासवर्गीय कैवारी आहोत, अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या राजकीय नेतृत्वाला लागलेले ग्रहण काही सुटले नाही. महत्वाकांक्षी चंद्रशेखर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधानपद मिळवले. पण काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्याने अवघ्या साडे सात महिन्यातच त्यांना या पदावरून जावे लागले. चंद्रशेखर हे व्यक्तिगत जीवनात अत्यंत नम्र होते. ते अधिकाऱ्याची नम्रतेने बोलत. त्यांचा स्वभाव मृदू होतो. पण त्यांच्यात कारर्दित केंद्राची तिजोरी खाली झाली. दिवाळखोरीस अवस्था निर्माण झाली.
आपल्या प्रशासकिय सेवेतील कडू गोड आठवणी देशमुख यांनी प्रामाणिकपणे लिहिल्या आहेत. प्रशासकिय सेवेत आपली निणर्यक्षमता वापरून वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना काम करता येत नाही असा समज आहे. पण देशमुख यांना मात्र तसे केले नाही. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने प्रशासकीय सेवा केली. ती करताना अनेक कसोटीचे, मानहानीचे प्रसंगही आले. पण त्यातून त्यांनी मार्ग काढत आपले अधिकार कायम कसे ठेवले, याच्याही आठवणी दिल्या आहेत. सरकारी सेवा करताना ठराविक नियम व मूल्ये पाळली व आपल्यावर हे निष्काम कामाचे ओझे लादले आहे अशी भावना ठेवली नाही तर, ही सरकारी सेवा नवनवोन्मेष असणारी चैतन्यदायी व रोमहर्षक अशी आहे. असा आपला अनुभवही त्यांनी नोंदविला आहे.
देशमुख यांनी सेवानिवृत्त झाल्यावर कर्ज काढून पुण्याजवळ ४ एकर जमीन विकत घेतली या जमिनीत वेगवेगळे प्रयोगही केले. शेतीसाठी काढलेले कर्ज फेडूनही टाकले. स्वच्छ आणि प्रमाणिक प्रशासकीय अधिकारी अशा प्रतिमा असलेल्या देशमुख यांनी टाटा सनचे संचालक पद भूषवले. ते सध्या भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीजचे फौडेंशनचे ट्रस्टी, संचती हॉस्पिटलचे ट्रस्टी अशा विविध पदांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
-सौ. वैजयंती कुलकर्णी
- DAINIK LOKMAT 31-12-2006
अनुभवसमृद्ध आत्मचरित्र...
‘पुणे ते पंतप्रधान कार्यालय’ हा ग्रंथ म्हणजे बी. जी. देशमुख यांच्या २००४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ..... या इंग्रजी ग्रंथाचा अशोध पाध्ये यांनी केलेला सुंदर अनुवाद आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश मुलकी अधिकाऱ्यांनी आपल्या सेवाकाळतील काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत त्या महत्त्वपूर्ण घडामोंडीवर प्रकाश टाकतात. तो आदर्श समोर ठेवून जनतेला सरकारचे कामकाज कसे चालते, याची जाणीव करून द्यावी, या हेतूने भालचंद्र देशमुख यांनी महत्त्वपूर्ण आठवणी सांगितल्या आहेत. त्यांनी सुमारे ४० वर्षे प्रशासकिय सेवा केली. मुख्यमंत्र्याचे सचिव, मुख्य सचिव महाराष्ट्र, कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांच्या कार्यालयातील मुख्य सचिव अशा पदांवर त्यांनी काम केले. त्यांनी काही गोष्टींबाबत निर्णयप्रक्रियेत आणि अंमलबजावणीत सामील व्हावे लागले. या सर्वांच्या नोंदी त्यांनी ठेवल्या होत्या. निवृत्तीनंतर हे अनुभव लिहायचे हे अगोदरच निश्चित केले होते. त्यामुळे एखाद्या कसबी संशोधकाप्रमाणे त्यांनी व्यक्तींची नावे, घटना, काळ यांचे अचूक संदर्भ दिले आहेत. सरकारी यंत्रणेतील कारस्थाने, कारवाया, हेवेदावे, मानवी भाव-भावना, नाट्यपूर्ण घटना अशा अनेक अंगांनी ते अनुभव वर्णन करतात. सरकारी सेवा करताना ठराविक व नियम व मूल्ये पाळली आणि मन:पूर्वक केले तर ती सेवा चैतन्यदायी आणि रोमहर्षक ठरते असा त्यांचा अनुभव आहे.
पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगा आय. ए. एम. सारखी सर्वोच्च परीक्षा देऊन प्रशासन सेवेत शिरतो, पंतप्रधानांचा प्रिन्सिपल सेक्रेटरी होतो आणि तेही कोणी गॉडफादर पाठीशी नसताना हे मराठी माणसांना नक्कीच अभिमानस्पद आहे.
१९५१ ते १९९१ या काळात देशमुख प्रशासकीय सेवेत होते. बोफोर्स प्रकरण, मंडल आयोग, भोंदू तांत्रिक चंद्रास्वामी प्रकरण यांचे ते निकटचे साक्षीदार आहेत. देशातील व शेजारी देशांतील महत्त्वपूर्ण घडामोडींवर त्यांनी भाष्य केले आहे. राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर हे पंतप्रधान आणि राष्ट्रपती झैलसिंग या नेत्यांची त्यांना जाणवलेली स्वभाववैशिष्ट्येही त्यांनी विवेचनाच्या ओघात सांगितली आहेत.
शेवटी केवळ तीन पानांत उपसंहार केला आहे. त्यामध्ये निवृत्तीनंतरही अनेक सामाजिक संस्थांमध्ये आपण कार्यरत कसे आहोत - वैद्यकीय क्षेत्र, कला व संस्कृती, आर्थिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र अशा विविध क्षेत्रात कुठे विश्वस्त, कुठे अध्यक्ष, कुठे सल्लागार म्हणून काम कसे करत आहोत, शेतीमध्ये रस कसा घेत आहेत याचे वर्णन करून आज मी असा आहे असे ते सांगतात.
देशमुख हे साहित्यिक नसल्यामुळे त्यांची भाषा आलंकारिक नाही. कोणावरही टीका न करता किंवा कसलाही अभिनिवेश न बाळगता त्यांनी जे अनुभवले ते प्रामाणिकपणे वर्णन केले आहे. साध्यासुध्या भाषेतील हे प्रांजल आणि प्रवाही निवेदन वाचकांना आकर्षित करते. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे रंगीत मुखपृष्ठ विषयानुरूप व आकर्षक असून ते पुस्तकाचे सौंदर्य द्विगुण्ति करते.
-डॉ. नीला पांढरे
- DAINIK KESARI 22-10-2006
भारतीय प्रशासकीय, राजकीय इतिहासाचे यथार्थ दर्शन...
भारताच्या प्रशासकीय राजकीय क्षेत्रात दर्जेदार मुलकी, कार्यक्षम अधिकारी म्हणून बी. जी. देशमुख यांनी तब्बल चाळीस वर्षे सेवाकल व्यतीत केला. सत्तेच्या राजकारणात उच्चपदस्थ प्रशासकीय कर्मचारी केवळ एक यांत्रिक बाहुले नसून, तोही आपल्या अक्कलहुशारीने त्या जगड्व्याळ शासकीय यंत्रणेची चाके योग्य प्रकारे फिरवू शकत की त्यामुळे अनेक समस्या व्यवस्थितपणे सुटू शकतात. श्री. देशमुख यांनी असंख्य प्रश्न आपल्या व्यवहारचातुर्याने, चाणाक्षपणे, व्यवस्थितपणे सोडविल्याची हकीगत या पुस्तकातून वाचकाला उपलब्ध होते. एका मध्यमवर्गीय मराठी माणसाने सत्तेच्या शिखरापर्यंत केलेल्या यशस्वी वाटचालीचा आलेख विशेष करून मराठी वाचकाला अभिमानस्पद वाटतो.
या वाटचालीत त्यांचा असंख्य जबाबदार व्यक्तीशी वैयक्तिक संपर्क आला. चर्चा, सल्ला मसलती कराव्याच लागल्या, समस्यांना उत्तरे मिळविता आली. त्यापैकी चारशे सात निवडक व्यक्तींची नावे, प्रसंग, घटना काळ यांचा संदर्भ देत देत येथे माहितीची स्वरूपात साकारलेली आहेत.
आपल्या कर्तृत्वाच्या वाटचालीत श्री. देशमुखांनी जिल्हाधिकारी, मुख्य मंत्र्यांचा सेक्रेटरी, मुंबई महापालिका आयुक्त, महाराष्ट्र राज्याचे चीफ सेक्रेटरी, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे पदाधिकारी, कॅबिनेट सेक्रेटरी, राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर या पंतप्रधानांचे ‘कार्यालयीन’ प्रिंसिपल, सेक्रेटरी आणि इतरही अनेक महत्त्वपूर्णपदे जबाबदारीने सांभाळलेली आहेत. परिणामत: देशाच्या राजकारणावर महत्त्वाच्या प्रश्नांवर आपला भरीव ठसा उमटेल असे निर्णयही घ्यावे लागले आहेत.
सेवाकालाच्या अखेरच्या टप्प्यात पाकिस्तान, श्रीलंका, पंजाब, जम्मू काश्मीर येथील राजकीय घडामोडी त्यामार्फत निर्माण झालेली कटुता, तणावाचे वातावरण, मंडल अयोगाने मागसवर्गीयांच्या आरक्षणाच्या शिफारशी आणि पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी केलेला पाठपुरावा याबद्दलची फर्स्ट इँड डेव्हलपमेंट’ वाचकाला निश्चितच गुंगवून ठेवते.
विशेष करून राजीव गांधीच्या पाच वर्षांच्या पंतप्रधान कार्यक्षेत्राचे वेळी श्री. देशमुख संपूर्णपणे त्यांचे समवेत कार्यरत होते. राजीव गांधीच्या रूपाने भारताला मिळालेला एक तरुण, उत्साही, तरतरीत, नावीन्याची आवड असणारा, विज्ञान तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करणारा पंतप्रधान जवळून निरीखता आला. याचा संपूर्ण वृतांत विशेष आकर्षक ठरला आहे.
राजकारणाच्या मंचावर ठराविक व्यक्ती विशिष्ठ काळात लक्ष्यवेधी ठरतात. त्यांच्या करिश्म्याने हलचल निर्माण होते. त्यांची वाटचाल जबाबदार व्यक्ती या नात्याने मोजक्या शब्दात लेखकाने उत्कृष्टपणे सादर केली आहे. अशा या अनुभवी लेखनातून तरुण व नवीन पिढीला स्फूर्ती मिळून मुलकी सेवामध्ये भरती होण्याची प्रेरणा या पुस्तकातून निश्चितपणे मिळू शकेल.
-अनिल दांडेकर