- Devdutt Kamat
१९०६ ते १९४७ या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील फारच थोडा भाग आपल्या समोर ठेवला गेला होता. टिळक, गांधी, सत्याग्रह, चलेजाव चळवळ, क्रांतिकारकांचे प्रयत्न... बस्स. एवढेच आपल्याला ठाऊक आहे. परंतु याखेरीज असलेला ९० टक्के इतिहास हा श्री. जसवंतसिंग यांनी संशोधन करून बाहेर काढला. जिनांचे चरित्र अभ्यासताना हे सारे त्यांच्या हातात येत गेले. पाच वर्षे ३० माणसांची तुकडी हे काम करत होती. सुमारे ५००० संदर्भ गोळा केले गेले. त्यातील सार या पुस्तकात एकवटले आहे. ‘‘खादीने कुठे स्वातंत्र्य मिळते?’’ नेहरूंचा महात्मा गांधींना सवाल. जिनांनी ठरवून कोलकात्यात दंगल करवली व ६००० हिंदूंची कत्तल घडवली. ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत’ असे प्रमाणपत्र गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडून घेणारे जिना शेवटी हिंदूंचे कर्दनकाळ बनले. आपल्या कौशल्याने, काँग्रेसच्या नेत्यांना भोंगळपणाचा फायदा उठवत, धमकी देत जिनांनी पाकिस्तान निर्माण केले. पुन्हा एकदा दाहीर राजाचा पराभव ८०० वर्षांनी जिना नावाच्या महंमद कासिम याने केला. अत्यंत खळबळजनक माहितीने भरलेले पुस्तक.
- अशोक घैसास, नाशिक
आपण प्रसिद्ध केलेले `जिना` हे पुस्तक वाचले. श्री जसवंतसिंग यांनी मोठ्या परिश्रमाने हे एक इतिहासाचे पुस्तक लिहिले आहे. आत्तापर्यंत उघड न झालेली माहिती त्यांनी प्रकाशात आणली आहे. मी आजवर म.गांधी यांच्यावरची अनेक पुस्तके वाचली आहेत. पण जिना पुस्तकातील गांधींबद्दलची माहिती अत्यंत उद्बोधक आहे. श्री. अशोक पाध्ये यांनी सरस अनुवाद केला आहे.
पुनश्च एकदा आपले आभार.
- NEWSPAPER REVIEW
जिनांनी २७ जुलै १९४६ रोजी मुस्लीम लिगच्या कौन्सिलच्या सभेत भाषण केले. त्यात ‘थेट कृती’ (Direct Action) करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही थेट कृती हिंसक की अहिंसक? यावर जिनांचे उत्तर होते, ‘मी त्याबद्दलच्या कोणत्याही नैतिक बाबींबरोबर चर्चा करणार नाही.’ नंतर मुस्लीम लिगच्या छापलेल्या एका पत्रकातून म्हटलं होतं, ‘केवळ कमनशिबामुळे तुम्ही हिंदूंचे आणि ब्रिटिशांचे गुलाम झालेले आहात. पण तुम्ही या रमजानच्या महिन्यात एका जिहादला प्रारंभ करणार आहात... अरे काफरांनो, तुमचे दिवस आता भरत आले आहेत... आता एक सार्वत्रिक कत्तल सुरू होईल!’ त्यावेळी मुस्लीम लीगचे सुऱ्हावर्दी बंगालमधील महत्त्वाचे पुढारी होते. त्यांच्या चिथावणीचा निदर्शकांनी फायदा उठविला. १६ ऑगस्ट १९४६ रोजी एकट्या कलकत्यांत ६००० पेक्षा जास्त हिंदूंना ठार करण्यात आले. १५००० पेक्षा जास्त हिंदू जखमी झाले. हिंदुस्थानभर त्याचे पडसाद उमटले.. मृत्यू आता थैमान घालू लागला होता... ‘नौखाली’ हा शब्द पुढे अत्याचारांचा निदर्शक बनला. त्याकाळी गांधीजी ‘सेवाग्राम’मध्ये आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर पोहोचले होते. काँग्रेस त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत चालली होती. गांधीजी दंगल शांत करायला पुन्हा बाहेर पडले, नौखालीकडे! हिंदुस्थानची फाळणीची प्राक्रिया या ‘थेट कृती’मुळे जलद होऊ लागली... आता ‘घटना’ माणसांना धरून पुढे नेत होत्या!’
‘जिना : हिंदुस्थान, फाळणी, स्वातंत्र्य’ या जसवंत सिंग लिखित, अशोक पाध्ये अनुवादित पुस्तकातील अखेरच्या भागांतील वरील अंश. ‘माझ्या बऱ्याच हितचिंतकांनी मला ‘जिना व फाळणी’ या विषयावर न लिहिण्याचा सल्ला दिला होता. पण हा निर्णय शेवटी माझा होता. त्याचे भले-बुरे परिणाम भोगण्यास मी तयार होतो. १९४७ची फाळणी का झाली याचा पुन्हा एकदा शोध मला घ्यायचा होता’, असे जसवंत सिंग सुरुवातीलाच सांगतात अन् पुस्तकाच्या अखेरीस ‘फाळणीला जबाबदार कोण’ याचा निष्कर्षदेखील काढतात! यात जिनांची भूमिका कोणती? काहींच्या मते जिना खलनायक होते, तर काहींच्या मते ते प्रतिनायक होते. पाकिस्ताननिर्मितीनंतर तर ते पाकिस्तानसाठी ‘महानायक’ ठरले! खरंच कोण आणि कसे होते जिना?
काठेवाडातील पानेली येथील एका ‘खोजा’ कुटुंबात २५ ऑक्टोबर वा डिसेंबर १८७८ रोजी जिनांचा जन्म झाला. लंडनला ‘बार’ची परीक्षा देऊन ते मुंबईला आले. २४ ऑगस्ट १८९६ रोजी बॉम्बे हायकोर्टात अॅडव्होकेट म्हणून त्यांनी नाव रजिस्टर केले - ‘महंमद अली जिना’ (पूर्वी त्यांचे आडनाव होते ‘जिनाभाई.’) नंतर ५१ वर्षे मुंबई हेच त्यांचे घर होते. बर्नार्ड लुई म्हणतो, खोजा म्हणजे पातळ मुस्लीम आवणाखालील हिंदूच! तर १९१७ मध्ये सरोजिनी नायडू म्हणाल्या, ‘जिना हे मानववंशशास्त्रीयदृष्ट्या हिंदूच आहेत आणि धर्माने मुसलमान आहेत. त्यामुळे ते हिंदू-मुसलमान एकतेचे दूत आहेत. आणि हा केवळ आदर्श कल्पनाविलास नाही!’
अशा धर्मनिरपेक्षतेकडून धर्मांधतेकडे झालेला जिनांचा पन्नासएक वर्षांचा प्रवास या पुस्तकातून उलगडला जातो.
राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांना जस्टिस दावर यांनी सहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तेव्हा जिनांनी टिळकांच्या वतीने जामिनासाठी अर्ज केला, तो फेटाळून दावर यांनी शिक्षा कायम केली. त्याबद्दल जेव्हा ब्रिटिश सरकारने जस्टिस दावर यांना ‘नाईट हूड’ हा किताब दिला, तेव्हा त्यावर टीका करून जिनांनी त्या समारंभावर बहिष्कार टाकला होता! गांधी आणि जिना यांची तुलना कठीण व गुंतागुंतीची, पण दोघांचे राजकीय गुरू एकच होते, गोपाळ कृष्ण गोखले! जिनांना त्या काळात ‘मुस्लीम गोखले’ म्हणत असत. गांधी व जिना दोघांनी लंडनमध्ये असताना ‘ब्रिटिश जेंटलमन’ लकब व शैली उचलली. पण २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत राहून गांधी जेव्हा हिंदुस्थानात परतले, तेव्हा त्यांनी वेशभूषेत आमूलाग्र बदल केला, पण जिनांनी ‘थ्री पीस सूट’ हा वेश कधीच सोडला नाही. त्यामुळे जिनांनी गांधींना नुसताच स्पर्धक न मानता, लोकांच्या भावनांचा फायदा उठविणारा- खोटारडा- बडबड्या राजकारणी मानलं. तरीही गांधींना आव्हान देणारे जिनाच होते तर नेहरूंना प्रतिस्पर्धी ठरलेले जिनाच होते. फाळणीपर्यंत जिनांचा सुसंवाद फक्त गांधींशीच होता. नेहरू-जिना यांच्यात तसा तो कधीच नव्हता.
१९२८च्या अखेरपर्यंत ‘हिंदू-मुसलमान ऐक्य’ हा शब्दप्रयोग ‘स्वराज्य’ या शब्दाला समानार्थी आहे असे जिना मानीत. तर ‘कोणत्याही धर्माचा, जातीचा हिंदुस्थानचा नागरिक असो’, त्याला घटनेनुसार समान अधिकार मिळण्याची ग्वाही दिली जाईल, एवढे पुरेसे आहे, ही नेहरूंची भूमिका. महंमद इक्बालसारख्या काहीजणांनी १९३० मध्ये याच हिंदुस्थानात आपला ‘मुस्लीम इंडिया’ हा देश साकारावा म्हणून आव्हान केले, तर १९३३ साली रहिमत अलींनी ‘मुस्लीम इंडिया’ हा देश हिंदुस्थानपेक्षा वेगळा असावा असा आग्रह धरला. ‘पाकिस्तान’ हा या रहिमत अलींनी निर्माण केलेला शब्द. त्या वेळीदेखील जिनांनी महंमद इक्बाल यांच्या कल्पनेला विरोध केला होता. १२ नोव्हेंबर १९३०च्या लंडन येथील गोलमेज परिषदेचा ‘मँचेस्टर गार्डियन’ मधील वृत्तांत जिनांसमोरील पेच स्पष्टपणे व्यक्त करतो. ‘मिस्टर जिना यांची गोलमेज परिषदेतील अवस्थाही एकमेव अशी झाली होती. हिंदूंना वाटले की जिना हे एक मुस्लीम जातीवादी आहेत, तर मुस्लिमांना वाटले की जिना हे हिंदूंकडे झुकणारे आहेत. संस्थानिकांना वाटले की जिना हे अति लोकशाहीवादी आहेत. ब्रिटिशांना वाटत होते की जिना हे डोक्यात राख घालून टोकाशी जाणारे आहेत. यामुळे असे झाले की, जिना हे म्हटले तर सर्वत्र आहेत, आणि म्हटले तर कुठेच नाहीत. कोणालाच ते नको आहेत.’ हा जिनांच्या राजकीय कारकीर्दीचा उलटत चाललेला मध्यान्ह काळ होता. १९३३च्या सुमारास जिना एके ठिकाणी म्हणतात, ‘खऱ्याखुऱ्या हिंदू-मुसलमान ऐक्याशिवाय हिंदुस्थानला कसलीही आशा नाही. हे ऐक्य साधणं बहुसंख्य असलेल्या हिंदूंनाच जमू शकेल. मुळात आपल्या अंत:करणात त्यासाठी बदल झाला पाहिजे.’ पुढे १९३८ मध्ये अलीगढ अँग्लो-मुस्लीम कॉलेजात ते म्हणतात, ‘हिदूंच्या भावना-हिंदू मन व दृष्टिकोन पाहिल्यावर मी निष्कर्ष काढला की, ‘हिंदू-मुस्लीम ऐक्याची आशा धरण्यात अर्थ नाही. मला माझ्या देशाविषयी प्रथमच निराशा वाटली. ही स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. मी खचलो आहे... असहाय्य झाल्यासारखे वाटत आहे.’ गांधींची अवस्थादेखील वेगळी नव्हती. ‘मी असहाय्य आहे. माझी ऐक्यावरील श्रद्धा तेवढीच घट्ट आहे. पण माझ्यासमोर घनदाट अंध:कार पसरला असून, कुठेही प्रकाश दिसत नाही, अशा परिस्थितीत मी फक्त देवाला ‘मला प्रकाश दाखव’ अशी प्रार्थना करू शकतो. १९३८ साली काँग्रेसचे अध्यक्ष असताना सुभाषचंद्र बोस यांनी स्वत: हिंदू-मुसलमान प्रश्नात लक्ष घालून तो सोडवायचा प्रयत्न केला. पुढे हे सारे एकांडे प्रस्ताव अपुरे पडले. मार्ग ठप्प झाला. कदाचित हाच फाळणीचा टर्निंग पाँर्इंट होता!
हिंदुस्थानात अशी चमत्कारिक परिस्थिती असताना दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं. २३ मार्च १९४० रोजी मुस्लीम लीगच्या खुल्या अधिवेशनात एक ठराव पास करण्यात आला. बलुचिस्तान-सिंध-पंजाब व वायव्य सरहद्द प्रांत यांचे एक वेगळे फेडरेशन बनवावे. या चारही प्रांतांना स्वायत्तता व सार्वभौमत्व बहाल करावे. हा ‘पाकिस्तान’चा जन्म होता! म्हणून आजही पाकिस्तानात २३ मार्च हा दिवस ‘पाकिस्तान दिवस’ म्हणून पाळला जातो. नंतर इकडच्या १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीमुळे, ऐन युद्धकाळात इंग्रजांना हिंदुस्थान सोडण्यास सांगण्यामुळे बहुतांशी काँग्रेस नेत्यांची धरपकड झाली. १९४२ ते १९४६ या काळात बरेचसे काँग्रेस नेते तुरुंगात असल्यामुळे सरकारशी बोलणी करण्यास कुणीच उरलं नव्हतं, त्यामुळे राजकीयदृष्ट्या जिनांचे फावले! दरम्यान, गांधी तुरुंगात असताना १९४३ मध्ये जिनांनी जाहीर केले की, खुद्द गांधींना मुस्लीम लीगबरोबर समझोता हवा असेल तर त्यांचे स्वागत होईल, अन्य कुणाचे नाही. १९४४ रोजी जिनांच्या १०, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई या घरी जिना-गांधी बोलणी सुरू झाली, ती १८ दिवस चालली... आणि ब्रिटिश अस्वस्थ झाले, हिंदू-मुसलमान ऐक्याच्या भीतीने, हिंदूमहासभावाले चिडले या कृतीनेच, तर लीगची पाकिस्तानची मागणी गांधी मान्य करतील म्हणून शीखही बिथरले अन् बाहेर पडले ते ‘शिखीस्तानची’ मागणी घेऊनच! अर्थात वाटाघाटी फिसकटल्या. गांधींनी जिनांना लिहिलं, ‘इस्लामचा उदय होण्यापूर्वी हिंदुस्थान एक राष्ट्र होते. ते अजूनही एकच राष्ट्र राहावं, जरी त्या राष्ट्राच्या पुत्रांनी आपला धर्म बदलला असला तरीही. तुमची नव्या राष्ट्राची कल्पना मी स्वीकारली तर नव्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.’
यानंतर जिनांच्या ‘थेट कृती (Direct Action)च्या २७ जुलै १९४६च्या आवाहनानंतरचा इतिहास, हा दंगली-अत्याचार-नरसंहार-मानवतेच्या हत्येचा होता. अखंड हिंदुस्थानचे कट्टर पाठीराखेदेखील म्हणू लागले, ‘आता फाळणी झाली तर बरे पडेल. निदान संहार-अत्याचार- हत्याकांडातून तरी सुटका होईल. भूतकाळातील अनेक वर्षातील छळवाद संपेल.’ ६ मे १९४७ रोजी जिना-गांधींची शेवटची भेट दिल्ली येथे घडून आली. जिनांनी गांधींच्या संमतीने एक पत्रक काढले. ‘हिंदुस्थानच्या फाळणीवर आमच्यात चर्चा झाली; परंतु गांधींनी फाळणीचे तत्त्व स्वीकारले नाही. फाळणी अपरिहार्य आहे, हे त्यांना पटत नव्हते. माझ्या मते पाकिस्तान निर्माण होणे हे नुसते अपरिहार्यच नव्हे तर, हिंदुस्थानच्या आजच्या राजकीय समस्येवर तोच एक उपाय आहे.’ तत्पूर्वी १ एप्रिल १९४७ रोजी माऊंट बॅटन यांनी गांधींची भेट घेतली तेव्हा, माऊंट बॅटनला दचकविणारा प्रस्ताव गांधींनी ठेवला, ‘जिना यांना पंतप्रधान करा आणि संघटित हिंदुस्थानचे सरकार बनवा.’ नंतर ५-६ एप्रिलला माऊंट बॅटन जिनांना भेटले, तेव्हा जिना म्हणाले, ‘फक्त एकच उपाय आहे, हिंदुस्थानवर शस्त्रक्रिया नाहीतर हिंदुस्थान नाश पावेल.’ आता जिनांचा धर्मांधतेकडचा ‘पाकिस्ताननिर्मितीचा’ प्रवास पूर्ण होत आला होता!
हिंदुस्थान पूर्वी कधीही न पाहिलेल्या सर सिरील जॉन रॅडक्लिफ याला हिंदुस्थान-पाकिस्तान सरहद्द ठरविण्याचे काम देण्यात आले. ‘रॅडक्लिफ अवॉर्ड’ १२ ऑगस्ट १९४७ला तयार झाले. १४ ऑगस्टला हिंदुस्थान अस्तित्वात आला. जन्माला आलेल्या दोन्ही देशांना आपल्या सरहद्दी माहीत नव्हत्या. कारण ‘अवॉर्ड’ १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालं! मग पुन्हा दंगली उसळल्या. नरसंहार-हत्याकांडाचा रक्तरंजित इतिहास पुढे चालूच राहिला!
तत्पूर्वी ७ ऑगस्ट १९४७ रोजी विमान जेव्हा जिनांना घेऊन दिल्लीहून कराचीकडे सुटलं, तेव्हा जिना स्वत:शीच पुटपुटले, ‘इट्स द एन्ड ऑफ दॅट!’ पुढे वर्षभराने ११ सप्टेंबर १९४८ रोजी जिनांचा मृत्यू झाला, तेव्हा दिल्लीत राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला. नेहरूंनी शोकसंदेश दिला, ‘जिनांनी हिंदुस्थानचा इतिहास रचला, पण तो चुकीच्या मार्गाने... भूतकाळातील घटनांबद्दल त्यांना खेद वाटला असेल की पश्चात्ताप झाला असेल? बहुधा असे काहीच वाटले नसेल, कारण त्यांनी आपल्याभोवती द्वेषाचा बुरखा पांघरून घेतला होता!’ पुढे १९७१ मध्ये पाकिस्तान फुटून बांगलादेश निर्माण झाला, हा जिनांच्या सिद्धांताचा पराभव होता हा अलीकडचा इतिहास.
जिनांच्या मृत्यूपूर्वी, ३० जानेवारी १९४८ ला गांधींची हत्या झाली. १९४६च्या नौखालीच्या दंगलीत पीडीतांचे सांत्वन करताना, एका कागदाच्या तुकड्यावर शिसपेन्सिलचे थोटूक वापरून गांधींनी लिहिलं होतं, ‘I don`t want to die a failure, but I may be a failure.’ आपल्या सत्य व अहिंसा या तत्त्वांचा पराभव झाल्याचे त्यांना स्पष्ट दिसत होते! पुस्तकाच्या प्रास्ताविकात जसवंत सिंग कबूल करतात की, अखंड हिंदुस्थानासाठी कुणी आपला आवाज उठवत होते की नाही, याचे उत्तर दु:खाने असे द्यावे लागते की, ‘फक्त महात्मा गांधी.’ पण पुस्तकाच्या अखेरीस, फाळणीची टोकाची भूमिका जिनांना घ्यायला भाग पाडल्याबद्दल, फाळणीला मुख्यत्वेकरून नेहरू’च जबाबदार आहेत, असा निष्कर्ष काढतात.
‘नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली होती. पण पक्षाच्या सर्वोच्च अधिकारपदावर असलेले नेहरू आणि नंतर सत्तेवर आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून नेहरूच होते. तेव्हा नेहरूंकडेच फाळणीची जबाबदारी जाते... काँग्रेसचे १९३४, १९४२, १९४५ व १९४७ चे ठराव अप्रत्यक्षरीत्या पाकिस्ताननिर्मितीला कारणीभूत ठरले.’ पुढे फाळणीची ही शोकांतिका अटळ नव्हती असा निष्कर्ष काढताना ‘जर संघराज्याचा (फेडरल) विस्तृत पाया आपण स्वीकारला असता, तर हे शक्य होते,’ असे देखील जसवंत सिंग सुचवितात. असो. जसवंत सिंग यांच्या या विषयातील अधिकाराबद्दल प्रश्नच नाही. अर्थात स्वतंत्र भारतात अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारात ते परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री होते हा काही योगायोग नव्हे.
१९४८ साली निजामाची राजवट संपल्यावर, हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाल्यावर तिथले मुसलमान स्वत:ला ‘अल्पसंख्याक’ म्हणवून घेऊ लागले. ज्या Minority Syndrome मुळे पाकिस्तानची निर्मिती झाली, त्याचा संसर्ग स्वतंत्र हिंदुस्थानभर पसरला... हेच जर सध्याचे वास्तव असेल, तर मग फाळणीला जबाबदार कोण, हा प्रश्नच निरर्थक आहे. ‘कोणत्याही धर्माचा, जातीचा हिंदुस्थानचा नागरिक असो, त्याला घटनेनुसार समान अधिकार मिळण्याची ग्वाही दिली जाईल,’ या नेहरूंच्या सुरुवातीपासूनच्या भूमिकेचे महत्त्व, आज स्वतंत्र्याच्या साठ वर्षांनंतरदेखील सत्तेच्या लोभपायी मान्य होत नाही, हेच या देशाचे दुर्दैव!
या पुस्तकातील, जिना-गांधी यांच्यातील वाटाघाटी, गांधी-नेहरू यांच्यातील दुरावा दर्शविणारा पत्रव्यवहार, वेव्हेल-गांधी-नेहरू चर्चा, मौ. आझाद यांचे जामा मशिदीतील भाषण, डॉ. लोहियांचे फाळणीच्या योजनेवर झालेले भाषण, बॅ. जिना यांची भाषणे पत्रव्यवहार वगैरे सारं मुळातून वाचण्यासारखे आहे. त्या काळी झालेले विविध काम गोपनीय पत्रव्यवहार, करारांचे मसुदे वगैरे संदर्भासाठी हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. पुस्तक वाचून झाल्यावर एवढंच जाणवतं, फाळणीची घटना हा एक कॅलिडोस्कोप आहे. जसा ‘दृष्टिकोन’ बदलेल, तसं घटनाचित्र बदलत जातं, निष्कर्ष बदलत जातात. इतिहास कधी बदलत नाही!
- DAINIK PUNYANAGARI 4-7-2010
ज्येष्ठ राजकारणी जसवंत सिंग यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिमांचे नेतृत्व करणाऱ्या जिनांवर लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद नुकताच मराठीत आला. या पुस्तकाच्या निमित्ताने जसवंत सिंग यांनी व्यक्त केलेले मनोगत.
महंमदअली जिना यांचे राजकीय चरित्र लिहिण्यासाठी मी फार पूर्वीपासून धडपडत होतो; परंतु हा विचार कल्पनेच्या स्वरूपात खूप वर्षे नुसताच मनात पडून राहिला होता. या कल्पनांचे बीज १९९९ मध्ये रुजले आणि अखेर त्याचा हा पुस्तकरूपी वृक्ष तयार झाला. १९९९ मध्ये ऐतिहासिक दिल्ली-लखनौ बसयात्रेत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर मी होतो.
पाकिस्तानात ‘मिनार-ए-पाकिस्तान’ म्हणून एक ६० मीटर उंचीचा स्मारकस्तंभ बांधलेला आहे. याच जागी २३ मार्च १९४० रोजी मुस्लीम लीगने पाकिस्तान निर्मितीचा ठराव संमत केला होता. कोणत्याही राजकीय व्यक्तीने जिना यांचे चरित्र लिहिलेले नाही. मी हे चरित्र लिहिण्याचे ठरवले.
या ग्रंथावरील प्रत्यक्ष काम २००४ मध्ये सुरू झाले. त्यावेळी मी मंत्री राहिलो नव्हतो. काम सुरू झाल्यावर मी अनेकांशी या पुस्तकाबद्दल बोललो. मला सल्ले दिले जाऊ लागले. ‘जिना व फाळणी’ या विषयाला हा घालणे धोक्याचे असल्याने मी या मार्गावर जाण्याचे धाडस करायला नको, असे बऱ्याचजणांचे मत पडले. मला मात्र १९४७ मध्ये हिंदुस्थानची फाळणी का झाली, याचा एकदा शोध घ्यायचा होता. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे ‘जिना : हिंदुस्थान फाळणी स्वातंत्र्य’ हे पुस्तक. हे पुस्तक लिहायला, पुन:पुन्हा लिहायला, तपासायला, वेगवेगळ्या मार्गांनी माहितीची खातरजमा करून घ्यायला पाच वर्षे लागली. या कामी मला नॅशनल अर्काइव्हज ऑफ पाकिस्तानच्या ‘कैद-ए-आझम’ पेपर्स प्रोजेक्टचे प्रमुख संपादक डॉ. झैदी यांची मोलाची मदत झाली. या पुस्तकासाठी आवश्यक असलेल्या संदर्भग्रंथांची यादी अफाट मोठी झाली. या पुस्तकांमध्ये त्या काळातील, म्हणजे फाळणीच्या कालखंडातील एकूण एक घटनांच्या नोंदींचा तपशीलवार मागोवा आहे. त्या वेळच्या विविध विद्वानांनी ते ग्रंथ लिहिले आहेत. जे जुने ग्रंथ गोळा करून आणले, त्यातले काही एवढे जुने झाले होते की, हाताळताना त्यातील पानांचा तुकडा पडेल अशी भीती वाटे.
या पुस्तकाचा विषय वरवर फारसा महत्त्वाचा वाटला नाही, तरी तो सर्वांच्या अंगात भिनला असून, अत्यंत संवेदनशील आहे. फाळणीमुळे आपल्या हृदयाला झालेली जखम अद्याप भरून निघालेली नाही. म्हणून मी ज्यांच्या-ज्यांच्याकडून सल्ले मागितले आणि अवलंबून राहिलो, त्यांनी ते सल्ले काही पाने भरतील इतक्या विस्तृतपणे दिले आहेत.
या कामामध्ये अनेक भावना दाटलेल्या आहेत. फाळणीचा इतिहास म्हटल्यानंतर असे होणारच. फाळणीला गांधीजी एक अनिवार्य विच्छेदन म्हणत. परंतु हा राजकीय अर्थ झाला. यात गुंतलेल्या मानवी यातना, संवेदना आणि भावना यांचीही चिरफाड झाली, त्याचे काय? इतिहास जुळवून लिहिणाऱ्या तज्ज्ञांना याकडे मानवी दृष्टिकोनातून बघता येणे कठीण आहे. ते अशा गोष्टींकडे नेहमीच भुवया उंचावून पाहतात याची मला कल्पना आहे. पण, तशा थंडपणे, घटनांचे भावरहित कथन करणे मला जमणार नाही. तशा पद्धतीने लिहिलेले लिखाण हे नेहमीच रटाळ आणि कंटाळवाणे ठरते. माझे लिखाण अनेकांच्या हातातून आधी परीक्षणासाठी गेले होते. ते बारकाईने वाचून त्यावर त्यांनी भरपूर कष्ट घेतले. महंमदअली जिना हे सार्वजनिक जीवनात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिनिधी ठरवले गेले होते. तेथून पाकिस्तानचे ‘कैद-ए-आझम’ बनण्यापर्यंतचा त्यांचा सार्वजनिक आणि राजकीय प्रवास कसा झाला, हे मला या पुस्तकात मांडता आले.
- DAINIK AIKYA 3-10-2010
वाजपेयी मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री ही पदे भूषविलेले जसवंतसिंग यांच्या बॅ. जिना यांच्यावरील पुस्तकाने गेल्या वर्षी मोठेच वादळ उठवले. बॅ. जिना यांच्या जीवनचरित्राचे अध्ययन करताना, त्यांना समजून घेताना १९३७ पूर्वीचे काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले जिना आणि त्यानंतर मुस्लीम लीगचे अध्वर्यू आणि पाकिस्तानची मागणी करणारे जिना यांच्यातील दुटप्पीपणा जाणवला. पूर्वाश्रमातील ‘भारतीय’ व धर्मनिरपेक्ष भूमिका आणि उत्तरायुष्यातील कडवा मुस्लीम बाणा यांच्यात मेळ घालणे कोणाही अभ्यासकाला जड जाते. परंतु माणसे बदलतात, त्यांची मते बदलतात, वृत्ती-प्रवृत्ती बदलतात, हे वास्तव गृहीत धरूनच तटस्थ अभ्यासकाला एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन करावे लागते. जे दिसते ते स्वीकारावे लागते आणि ते गैरसोईचे असले, तरी मांडावे लागते. (१९१४ पर्यंत) पूर्वाश्रमातील बॅ. जिना यांचे राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व आणि सत्ता हवी होती. प्रांतवादात रस नव्हता, हिंदुस्थानचे अंतिम हित हे हिंदू आणि मुस्लीम समाजांनी एकमेकांत विलीन होण्यात आहे. भूतकाळात हिंदूंनी नेहमी वेगळ्या प्रतिनिधित्वाला विरोध केला असला तरीही... यावर्षी मुस्लिमांनी हिंदूच्या दिशेने अर्धे अंतर कापून जाण्यास काहीच हरकत नाही... वेगळ्या मतदारसंघाची मागणी केल्याने समाजात दोन अभेद्य कप्पे पडणार आहेत, हे ध्यानात घ्या... अशी जिनांची भूमिका होती.
सर्वसामान्य मुस्लीम समाजाला आणि मुस्लीम नेत्यांना ती मान्य नव्हती. आगाखान यांच्या विरोधात भूमिका घेणारे एकमेव मुस्लीम बॅरिस्टर मिस्टर जिना हे होते.
१९०९मध्ये मात्र त्यांनी ही भूमिका थोडी बदलली. ‘मुस्लिमांना नव्या सुधारणांनुसार पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे’, असे त्यांनी प्रतिपादन केले. १९१३मध्ये ते मुस्लीम लीगचे सदस्य झाले. ते काँग्रेसचेही सदस्य होते. पण राष्ट्रीय हितालाच आपले जीवन समर्पित आहे, हे त्यांच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. जसवंत सिंग यांनी बॅ. जिना यांच्या आधीच्या भूमिकेत नंतर कसा बदल होत गेला याचे तपशील दिले आहेत.
खरे तर जसवंत सिंग यांनी एका राजकीय अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून बॅ. जिना यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, विचारांचे आणि कार्याचे वस्तुनिष्ठ आकलन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. भारताच्या फाळणीपर्यंतच्या घटनांचा साकल्याने आढावा घेऊन फाळणी का आणि कशारीतीने झाली? काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांचे संबंध, गांधी आणि जिना यांचे संबंध, नेहरू आणि जिना, ब्रिटिश सरकार आणि जिना, मुस्लीम समाज आणि जिना, फाळणीपूर्व घटना, पाकिस्तानाबाबत जिनांचा वाढत गेलेला आग्रह आणि ब्रिटिशांनी हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतल्यावर फाळणीची केलेली घाई, विशेषत: शेवटचे व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांनी त्याबाबत केलेला उतावीळपणा अशा अनेक बाबींवर शेकडो पुस्तकांच्या आणि संदर्भ ग्रंथांच्या तसेच अस्सल कागदपत्रांच्या आधारे नेमके काय झाले असावे, याचा शोध घेत जसवंत सिंग यांनी स्वत:लाच पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी या ग्रंथाचा प्रपंच मांडला आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल अकाईव्हजमधील अनेक संदर्भ व कागदपत्रे जसवंत सिंग यांनी मिळवली. जुने ग्रंथ हाताळताना त्यांच्या पानांचे तुकडे पडत हाते. नवनवे संदर्भ रोज सापडत होते. मारूतीच्या शेपटासारखे काम वाढत होते. हा व्याप कुठेतरी आवरायला हवा, म्हणून काळाची आणि विस्ताराची मर्यादा स्वीकारणे क्रमप्राप्त होते. पाच हजारांवर संदर्भ त्यांनी अभ्यासले. त्यातल्या पाच-सहाशे संदर्भांचा उल्लेख त्यांनी पुस्तकात केला आहे, यावरूनच या कामाची व्याप्ती लक्षात यावी. भारताची फाळणी कशी झाली याचा अभ्यास करणाऱ्यांना या संदर्भ नोंदीचा फायदा होऊ शकेल.
पाकिस्तानचे कैद-ई-आझा ठरले. हा जिनांचा राजकीय प्रवास जसवंत सिंग यांना मानवी पातळीवरून बघण्याचीही जिज्ञासा वाटली.
जसवंत सिंग यांनी आरंभी हिंदुस्थान आणि इस्लाम यांच्या इतिहासावर धावती नजर टाकली, सय्यद यांनी १८९३ मध्ये ‘मुस्लिमांच्या राजकीय हिताच्या संरक्षणासाठी’ मोहमदिन अँग्लो-ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन स्थापन केले. १८९६ मध्ये मुस्लिमांना कौन्सिलप्रमाणेच स्थानिक संस्थांमध्येही प्रतिनिधित्व मिळावे आणि ते प्रतिनिधित्व मुस्लीम मतदारांद्वारेच मिळावे, अशी मागणी सय्यद अहमद-थिओडोर बेक (अलिगढ कॉलेजचे प्राचार्य) यांनी केली. या मागणीचे त्या वेळी मुस्लीम समाजात स्वागत झाले नाही. परंतु पुढच्या सगळ्या मुस्लीम राष्ट्राच्या उदयाची बिजे जनमानसात रोवली गेली, असे दिसते खरे.
काठवाडातील एका खोजा कुटुंबात जिनांचा जन्म झाला. ‘खोजा’ ही व्यापारी जमात. मूळचे लोहाणा समाजातील लोक धर्मांतराने खोजा बनले. शियापंथीय इथना अशारी या उपपंथाचे ते होते. खोजा म्हणजे पातळ मुस्लीम आवरणाखाली असलेले हिंदू, असे बर्नार्ड लुई या अभ्यासकाचे मत. सरोजिनी नायडू यांनी म्हटले, ‘जिना हे मानववंशशास्रदृष्ट्या हिंदू आहेत आणि धर्माने मुसलमान आहेत. त्यामुळे जिना हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत आहेत.’
जसवंत सिंग यांना या सर्व अभ्यास-आकलनानंतर काय वाटते, तेही महत्त्वाचे आहे. अंतर्मुख करणारे आहे.
‘माझ्या मते, महमद अली जिना ह्यांनी मुळातच चुकीचा, मुस्लीम म्हणजे एक वेगळे राष्ट्र, हा सिद्धांत मांडला. त्याचा आग्रह धरला. पाकिस्तान निर्माण झाल्यावर टिकाऊ शांतता, सलोखा व हिंदुस्थानबरोबर मित्रत्व नांदेल, असे म्हणत राहिले. परंतु हे असे घडणे कधीही शक्य नव्हते. भारताशी अविरतपणे वैर धरत राहणे, हेच पाकिस्तानचे आपले प्रमुख राष्ट्रीय धोरण बनले आहे.
फाळणीची ही प्रचंड शोकांतिका अटळ नव्हती, असेही जसवंत सिंग यांना वाटते.
‘जिनांचा हट्ट, न बदलणारे ताठर धोरण, मुसलमानांसाठी सतत वाढत्या मागण्या करीत जाणे, स्वतंत्र हिंदुस्थानातील सत्तेत जास्त वाटा मागणे वगैरे घटकही फाळणीच्या निर्णयास कारणीभूत आहेत. वैयक्तिक संबंध आणि विशिष्ट स्वभाव हेही कारणीभूत आहेत. राजकीय मूल्यमापनामध्ये संघर्षामुळे फाळणी झाली, असे मानणाऱ्यांना केवळ जिना आणि नेहरू हे जबाबदार वाटतील. त्या दोघांचीच भूमिका मध्यवर्ती मानावी लागेल. त्यांच्यातील संघर्षाचे स्वरूप आणि कारणे जाणून घेतल्याने फाळणी कशी झाली, हे समजणे सोपे जाईल, असे जसवंत सिंग यांचे मत आहे. जिनांबद्दलची त्यांची प्रतिकूल मनोधारणा कशी होती याची दोन उदाहरणे व अवतरणे त्यांनी दिली आहेत. त्यावरून ‘नेहरू यांचे हे टोकाला पोहचलेले दृष्टिकोन बघितले, तर त्यातून यातनामय फाळणीखेरीज दुसरे काय निर्माण होणार?’ असे मत जसवंत सिंग व्यक्त करतात.
जिना यांनी पाकिस्तान जिंकून घेतले, असे श्रेय जसवंत सिंग जिनांना द्यायला तयार नाहीत. नेहरू-पटेल यांनी फाळणीला मान्यता दिली, म्हणून जिनांना पाकिस्तान मिळाले. ब्रिटिशांनी सुईणीची भूमिका बजावली.
फाळणीमुळे जिना यांना एक भूभाग मिळाला; राष्ट्र मिळाले नाही. ते राष्ट्र त्यांना निर्माण करायचे होते. त्यात अपयशी ठरले, पाकिस्तान हे पाश्चिमात्य राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक मदतीवर टिकून राहिलेले राष्ट्र आहे. ते एक अंदाधुंदी माजलेले, धोकादायक राष्ट्र आहे. पश्चिमी राष्ट्रांना धमक्या देण्याचे तंत्र त्याला फायदेशीर ठरत आहे. भारतीय उपखंडात अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश या पट्ट्यात एक सामाईक बाजारपेठ आहे. फाळणीमुळे त्या बाजारपेठेच्या मोकळेपणावर बंधने पडली. भारतीयांना आपल्याच उपखंडात निर्वासित व्हावे लागले. बंधने झुगारून स्मगलिंगचा आधार घ्यावा लागला. फाळणीमुळे हिंदुस्थानने खूप काही गमावले. भूमी, माणसे गमावली. सामाजिक, सांस्कृतिक एकात्मता भंग पावली. जिनांनी या दृष्टीने कधी या प्रश्नाकडे बघितलेच नाही. फाळणीने जिना यांना पाकिस्तान नावाचा देश मिळाला. पण संकल्पनेच्या पातळीवर हा देश निर्मात्यावाचून पोरकाच राहिला. त्यांनी जे काही मिळवले, ते सारे ओसाडच ठरले. हो, ओसाड. कारण पाकिस्तानला स्वत:चा वारसा असा काहीच नाही. मुस्लीम म्हणजेच एक वेगळे राष्ट्र, ही कल्पनाही पाकिस्तानला राबवता आली नाही. कारण भाषेवरून त्या राष्ट्राचे दोन तुकडे होऊन बांगलादेशाचा जन्म झाला.
जसवंत सिंग हे शेवटी एक अपेक्षा व्यक्त करतात.
‘अन्य अनेक अडचणींबरोबर पाकिस्तान, भारत, बांगलादेश यांच्यासमोर एक मध्यवर्ती अडचण आहे. आपला सर्वांचा भूतकाळ असा आहे, की त्यात शिरून सतत शोध घेता येतो. सतत नवीन काही हाताशी येते. जे हाताशी येइल, ते वर्तमान बनते. त्यामुळे स्मृतींपासून पळ काढता येत नाही. या अडचणींवर मात करण्यासाठी काहीतरी तोडगा काढायला हवा ते काम आपणच करायला हवे दुसरे कोण करणार?’ फाळणीचे वास्तव हे आपल्याला सतत भेडसावतच राहणार आहे, असे काही तरी केल्यावाचून इतिहास आपल्याला भविष्याचा आनंद लुटू देणार नाही, वर्तमानातही निर्भयपणे जगू देणार नाही.
- SAPTAHIK SAKAL 17-7-2010
महंमद अली जीना हे भारतीय स्वातंत्र्यकाळातील वादग्रस्त आणि वादळी व्यक्तिमत्व. अखंड हिंदुस्थानची १९४७ मध्ये झालेली अनेक पिढ्यांना दुभंगून गेली. अनेकांनी त्याचे कटू अनुभवही घेतले. या फाळणीचे जनक म्हणून जीना यांचा उल्लेख केला जातो. आपल्या कौशल्याने, काँग्रेसच्या नेत्यांच्या भोंगळेपणाचा फायदा उठवत, धमकी देत जीनांनी पाकिस्तानची निर्मिती केली.
भारतातील स्वातंत्र्याच्या इतिहासातील (१९०६ ते १९४७) मोजका भाग आपल्याला माहीत आहे. टिळक, गांधीजी, सत्याग्रह, क्रांतिकारकांच्या चळवळी याव्यतिरिक्तचा सर्वसामान्यांना माहीत नसलेला इतिहास जसवंत सिंग यांनी ‘जीना : हिंदुस्तान, फाळणी, स्वातंत्र्य’ या पुस्तकातून समोर आणला आहे.
जीनांचे चरित्र अभ्यासताना हिंदुस्थानच्या फाळणीच्या काळातील परिस्थितीबाबत तपशील त्यांच्या हातात आला. माहिती संकलनासाठी तीस जणांची तुकडी काम करत होती. सुमारे पाच हजार संदर्भाचे सार या पुस्तकात आले आहे. ‘अत्यंत खळबळजनक’ असे या पुस्तकांचे वर्णन करावे लागेल.
- DAINIK LOKSATTA LOKRANG 19-9-2010
जसवंत सिंग यांचे ‘जिना’ हे पुस्तक गेल्या वर्षी प्रसिद्ध झाले आणि भारतात खळबळ उडाली. ही खळबळ एवढी होती की, त्यात खुद्द लेखकाचाच राजकीय बळी गेला. जसवंत सिंग यांना पक्षातून काढून टाकले गेले. खुलाशाची कसलीही संधी न देता त्यांना एका रात्रीत उडवून टाकण्यात आले, ही कृती राजकीय अपरिपक्वतेची जशी होती तशीच जिना यांच्या विरुद्ध जनमानसात असलेल्या विरोधी भावनेमुळेही झाली होती. जसवंत सिंग मूळचे अत्यंत अभ्यासू व कष्टाळू असल्याने कोणत्याही राजकीय नेत्यांमध्ये उठून दिसतात. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व जबरदस्त असल्याने वादविवादात प्रतिपक्षाला त्यांच्यावर इंग्रजी भाषेत मात करणे जड जाते. यामुळे त्यांच्याविरुद्ध पक्षातील अनेकजण धुसफुसत असतात. पुस्तकाच्या चरित्र नायकाचा म्हणजे जिना यांचा उदोउदो पुस्तकात केला असणार अशी समजूत किंवा गैरसमजूत प्रकाशनावेळी सर्वांची झाली होती. त्यातून मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावरती जिनांची छायाचित्रे छापली होती. एका छायाचित्राखाली ‘जिना हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत आहेत’ असे ना. गोपाल कृष्ण गोखले यांचे वाक्य छापलेले. मग तर गैरसमज पक्का होण्यास मदत झाली. जसवंत सिंग यांचे पक्षातील विरोधक एकत्र आले आणि त्यांनी तडकाफडकी जसवंत सिंग यांची पुस्तक न वाचता हकालपट्टी केली. ‘कुणी सांगावे, त्या पुस्तकात काहीच आक्षेपार्ह नसले तर मग हकालपट्टी करता यायची नाही,’ असा विचार त्यामागे होता. कालांतराने पुस्तकात कुठेही जिनांचा उदो उदो केलेला नसून फक्त जे सत्य आहे तेवढेच पुराव्यानिशी पुढे आणले आहे हे कळल्यावर पुस्तकाबद्दल उठलेला धुरळा खाली बसला आणि पुन्हा एकदा गडकरी यांच्या कृपेने जसवंत सिंग यांचा पक्षप्रवेश झाला.
या पुस्तकाचा अनुवाद मराठीत करताना जसवंत सिंग यांनी पुस्तक लिहिण्यासाठी अफाट कष्ट घेतल्याचे माझ्या लक्षात आले. जिनांबद्दलचे संदर्भ पाकिस्तानात अधिक असल्याने तेथून त्यांनी साहाय्य घेतले. एकूण ६००० संदर्भ गोळा केले. ३० माणसांची तुकडी हे काम पाच वर्षे करीत होती. त्या मंथनातून ‘जिना’ पुस्तक निर्माण झाले. जिनांचा १९१५च्या आसपासचा काळ हा टिळकांच्या सहवासात आला होता. त्यांना टिळकांबद्दल आदर होता व टिळकांचा खटला चालविण्याची त्यांची तयारी होती. हा काळ त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ समजला पाहिजे. १९२० नंतर क्राँग्रेससमवेत राहून त्यांनी राजकारणात वर यायचा प्रयत्न केला. हळूहळू ते काँग्रेसपासून दुरावत गेले व १९४० साली पाकिस्तान निर्मितीचा ठराव मुस्लीम लीगकडून त्यांनी पास केला. या पुस्तकातून १९०६ ते १९४७ या काळातील संपूर्ण इतिहास जसवंत सिंग यांनी आपल्या पुस्तकात उभा केला. त्यामध्ये आपल्याला ठाऊक नसलेला बराच इतिहास आहे.
पुस्तकाच्या परिशिष्टात पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल झाल्यावरचे पहिले भाषण दिलेले आहे. त्यातून जिना हे एक बुद्धिमान व मतलबी राजकारणी कसे आहेत ते प्रकट होते. पाकिस्तानच्या कॉन्स्टिट्युअन्ट असेम्बलीसमोर केलेल्या या भाषणात जिना म्हणाले होते, ‘...एका भव्य, अज्ञात व अतुलनीय अशा योजनेखाली ही इंडियन उपखंडाची भूमी आणली गेली. अन् त्यातील महत्त्वाचे हे की, आम्ही अत्यंत शांततापूर्ण रीतीने ही योजना यशस्वी रीतीने राबवून आम्हाला हवे ते साध्य केले...’
सहा लाख हिंदूंची कत्तल, त्याच्या भारतीय भूमीत उमटलेल्या हिंसक प्रतिक्रिया, स्त्रियांवरील अनन्वित अत्याचार, लुटालूट वगैरे जणू काही घडलेच नाही असे ‘शांततापूर्ण रीतीने’ हा शब्दप्रयोग दर्शवतो. जिना हे किती मतलबी होते हे त्यावरून कळेल. आपले पहिले भाषण जगात सर्वत्र जाणार आहे याचे भान असल्याने त्यांनी काळजीपूर्वक शब्द वापरले व एक निधर्मी राष्ट्र पाकिस्तान आहे याचा दावा केला ते म्हणाले, ‘...तुम्ही आता मुक्त आहात, स्वतंत्र आहात, तुम्ही देवळात जाऊ शकता, मशिदीत जाऊ शकता, तुम्ही कोणत्याही धर्मांचे, वंशाचे जातीचे असा त्याचा राष्ट्राशी काहीही संबंध नाही... कालांतराने या राष्ट्रात हिंदू व मुस्लीम हे त्यांच्या धर्माने ओळखले जाणार नाही, फक्त ते पाकिस्तानचे नागरिक म्हणून ओळखले जातील. कारण धर्म ही एक खासगी व वैयक्तिक बाब आहे...’
जिनांचे हे एक आदर्श भाषण होते, धोरण नव्हते. भारताच्या द्वेषावर पाकिस्तान निर्माण झाले होते. जिनांनी पाकिस्तान नावाचे एक भारताचा द्वेष करणारे यंत्र सुरू करून दिले होते. लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानातील राजकारणी नेत्यांसमोर भाषण करताना ‘जिना हे निधर्मी होते’ असे वक्तव्य जिनांच्या भाषणावर आधारित केले. तसेच बोलले म्हणजे पाकिस्तानी नेत्यांची पंचाईत होईल. हिंदूंचा द्वेष करणाऱ्या पाकिस्तानचा महानायक जिना हाच निधर्मी होता हे त्यांना खोडून काढता येणे अशक्य होते, त्यामुळे अडवाणी यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानी नेते चूप बसले. परंतु अडवाणी यांची ही चाल भारतीय वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रे यांना न कळल्याने त्यांनी व भाजपाखेरीज अन्य पक्षीयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
भारतीयांच्या जनमानसात आजवर तीन खलपुरुष ठसलेले होते. रावण, दुर्योधन व औरंगजेब! या तिघांनी मानवतेला काळिमा फासणारी व रक्तपात घडवणारी कृत्ये केली. त्या पंक्तीत भारतीय जनतेने आता जिना यांना बसवले. यापुढेही त्यात काहीही बदल होणार नाही. त्यामुळे जिनांचे चरित्र म्हणजे चरित्रनायकाचा त्यात उदोउदो असणार ही भावना पसरली. त्याचा फायदा जसवंत सिंग यांच्या विरोधकांनी घेतला.
भारतावर अतिरेक्यांच्या माध्यमातून हल्ले चढविल्याने पाकिस्तानचा विजय होणार नाही. अन् हे खुद्द पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनाही ठाऊक आहे; परंतु विजय होत नसला तरी आपली चीड, राग, द्वेष प्रकट केल्याचे समाधान, भारताची अंशत: जिरविल्याचे समाधान पाकिस्तानला मिळत असल्याने असले हल्ले पुढेही चालूच राहणार आहेत. अन् हे सारे जिना यांनी सुरू करून दिलेले असल्याने यापुढेही जनमानसात जिना हे खलपुरुषच राहणार. मग भले एकेकाळी जिना यांनी टिळकांची भक्ती केली असली तरी!
‘जिना’ पुस्तकावरून गदारोळ केला गेला; परंतु त्याचा परिणाम काय झाला? तर पुस्तकाला अफाट प्रसिद्धी मिळाली. हिंदी आवृत्तीसाठी प्रकाशकांनी एकूण ६६ लाख रुपये मोजले. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करताना त्यात जसवंत सिंग यांची काही आक्षेपार्ह मते, जिनांची वारेमाप स्तुती वगैरे काही आहे का ते पाहू लागलो, पण तसे कुठेही मला आढळले नाही. जी छापली आहेत ती निखळ राजकीय सत्ये छापली आहेत अन् तीही कागदपत्रांच्या संदर्भासह. त्यात जनतेपासून झाकलेली अनेक सत्ये उजेडात आलेली आहेत. ते वाचताना आपले त्या वेळचे नेते किती भोळे होते, दूरदृष्टी नसलेले होते व अनेकदा ढोंगीपणे वागत होते हे समजून येते. शाळेत शिकविला जाणारा इतिहास आणि प्रत्यक्षातील इतिहास यात किती अंतर असते हे पुस्तक वाचल्यावर समजून येते. त्यातली काही मासलेवाईक उदाहरणे या लेखात देत आहे.
युरोपातील समाजवादाच्या परिषदेला जाऊन आल्यानंतर नेहरूंनी पत्रातून गांधीजींना लिहिले की, ‘तुमच्या खादीच्या प्रसाराने थोडेच स्वातंत्र्य मिळणार आहे?’ इंग्रजांकडून डोमिनियन पद्धतीचे स्वातंत्र्य मिळावे, या गांधींच्या धोरणाची खिल्ली नेहरूंनी पत्रात उडवली होती. गांधींनी त्यावर उत्तर दिले व नेहरूंपासून फारकत घेण्याची तयारी दर्शविली. तो पत्रव्यवहार अत्यंत खळबळजनक असा आहे. फाळणी होऊ नये म्हणून गांधीजींनी शेवटपर्यंत आटोकाट प्रयत्न केले. जिना यांच्या घरी जाऊन पंधरा दिवस चर्चा केली; परंतु जिना यांनी आपला ताठरपणा सोडला नाही.
आरक्षणाचे खूळ हे मूळचे इंग्रजांच्या डोक्यातील असून ते त्यांनी कसे राबवले हेही पुस्तकातून समजते. आरक्षणाचे धोके सांगताना जसवंत सिंग म्हणतात की, ‘... मुस्लिमांना व इतर काही जातीजमातींना आरक्षण देण्यामुळे दुर्दैवाने दोन समाजांतील भिन्नता दर्शविणारी लक्षणे नाहीशी होत नाहीत. जी भिन्न लक्षणे आहेत तीच त्या समाजाची ओळख ठरत असल्याने ते हीच लक्षणे पक्की धरून ठेवतात. भिन्नताच त्यांची वैशिष्ट्ये जाहीर करते. मग स्वत:च्या समाजास हीच भिन्नता ते पोषकद्रव्ये म्हणून वापरू लागतात, यामुळेच आपले वेगळेपण ते मानू लागतात. आरक्षणामुळे शेवटी समाजात कप्पे निर्माण होतात. आधीच कप्पे असतील तर त्या कप्प्यांच्या भिंती जाड होतात. परिणामी राष्ट्रीय एकात्मतेचे अखेर तुकडे पडतात. हिंदुस्थानातील मुस्लिमांना (इंग्रजांकडून) खास वेगळे आरक्षण दिल्यामुळे देशाचे कसे तुकडे झाले ते आपण पाहतोच आहोत...’ परंतु सध्याचे राजकीय नेते सत्तेच्या हव्यासापोटी तीच चूक पुन्हा करीत आहेत.
भुलाभाई देसाई यांनी भारताची फाळणी टाळणारा फॉर्मुला तयार केला. लियाकत अली यांना तो दाखविला. त्यांनाही तो मान्य झाला होता. गांधीजींनाही मान्य झाला होता; परंतु हे सारे नेहरूंच्या अनुपस्थितीत झाले म्हणून नेहरूंचा गट चिडला. नेहरूही चिडले. त्यांनी भुलाभाई देसार्इंच्या विरुद्ध ओरडा केला. नेहरूंपुढे माघार घेणाऱ्या गांधींना मग काहीही करता आले नाही अन्यथा फाळणी टळली असती. नौखालीमध्ये दंगे सुरू झाल्यावर त्यांचे शमन करण्यासाठी गांधीजी तिकडे गेले होते. त्याचा फायदा घेऊन नेहरूंनी ‘पंजाबची फाळणी हे लोकसंख्येनुसार व्हावी’ असा ठराव काँग्रेसमध्ये मांडून तो पास करून घेतला. मुस्लीम लोकसंख्येला महत्त्व दिल्याने पाकिस्ताननिर्मितीची वाट मोकळी झाली.
१९०६ ते १९४७ या काळात फार सूचक उलथापालथी घडत होत्या. साम्यवादाचा उदय, रशियन राज्यक्रांती, दुसरे महायुद्ध वगैरेंपासून हिंदुस्थान अलिप्त राहूच शकत नव्हता; परंतु आपल्या नेत्यांना त्या घटना नीट जोखता आल्याच नाहीत. आपले नेते हे फक्त विशिष्ट तत्त्वांचे, राजकीय प्रणालीचे कट्टर अभिमानी होते; परंतु राजकीय नेत्याकडे असणारी भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी, मुत्सद्दीपणा, जनतेचे मानसशास्त्र, व्यवहारज्ञान त्यांना बिलकुल समजत नव्हते. कोणाला हे पटणार नाही; परंतु जसवंत सिंग यांचे पुस्तक वाचताना ते समजेल. जिनांच्या आशीर्वादाने झालेली कलकत्त्यातील ६००० हिंदूंची कत्तल, लियाकत अली यांनी नेहरूंना केलेली धक्काबुक्की, गोलमेज परिषदेतील नाट्य, १९३७च्या यूपीतील निवडणुकीनंतर नेहरूंनी मुस्लिमांच्या तोंडाला पुसलेली पाने वगैरे अनेक रोमहर्षक माहिती पुस्तकात आहे.
- LOUKIK 11-7-2010
ज्येष्ठ राजकारणी जसवंत सिंग यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिमांचे नेतृत्व करणाऱ्या जिनांवर लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद नुकताच मराठीत आला. या पुस्तकाच्या निमित्ताने जसवंत सिंग यांनी व्यक्त केलेले मनोगत.
महंमदअली जिना यांचे राजकीय चरित्र लिहिण्यासाठी मी फार पूर्वीपासून धडपडत होतो; परंतु हा विचार कल्पनेच्या स्वरूपात खूप वर्षे नुसताच मनात पडून राहिला होता. या कल्पनांचे बीज १९९९ मध्ये रुजले आणि अखेर त्याचा हा पुस्तकरूपी वृक्ष तयार झाला. १९९९ मध्ये ऐतिहासिक दिल्ली-लखनौ बसयात्रेत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर मी होतो.
पाकिस्तानात ‘मिनार-ए-पाकिस्तान’ म्हणून एक ६० मीटर उंचीचा स्मारकस्तंभ बांधलेला आहे. याच जागी २३ मार्च १९४० रोजी मुस्लीम लीगने पाकिस्तान निर्मितीचा ठराव संमत केला होता. कोणत्याही राजकीय व्यक्तीने जिना यांचे चरित्र लिहिलेले नाही. मी हे चरित्र लिहिण्याचे ठरवले.
या ग्रंथावरील प्रत्यक्ष काम २००४ मध्ये सुरू झाले. त्यावेळी मी मंत्री राहिलो नव्हतो. काम सुरू झाल्यावर मी अनेकांशी या पुस्तकाबद्दल बोललो. मला सल्ले दिले जाऊ लागले. ‘जिना व फाळणी’ या विषयाला हा घालणे धोक्याचे असल्याने मी या मार्गावर जाण्याचे धाडस करायला नको, असे बऱ्याचजणांचे मत पडले. मला मात्र १९४७ मध्ये हिंदुस्थानची फाळणी का झाली, याचा एकदा शोध घ्यायचा होता. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे ‘जिना : हिंदुस्थान फाळणी स्वातंत्र्य’ हे पुस्तक. हे पुस्तक लिहायला, पुन:पुन्हा लिहायला, तपासायला, वेगवेगळ्या मार्गांनी माहितीची खातरजमा करून घ्यायला पाच वर्षे लागली. या कामी मला नॅशनल अर्काइव्हज ऑफ पाकिस्तानच्या ‘कैद-ए-आझम’ पेपर्स प्रोजेक्टचे प्रमुख संपादक डॉ. झैदी यांची मोलाची मदत झाली. या पुस्तकासाठी आवश्यक असलेल्या संदर्भग्रंथांची यादी अफाट मोठी झाली. या पुस्तकांमध्ये त्या काळातील, म्हणजे फाळणीच्या कालखंडातील एकूण एक घटनांच्या नोंदींचा तपशीलवार मागोवा आहे. त्या वेळच्या विविध विद्वानांनी ते ग्रंथ लिहिले आहेत. जे जुने ग्रंथ गोळा करून आणले, त्यातले काही एवढे जुने झाले होते की, हाताळताना त्यातील पानांचा तुकडा पडेल अशी भीती वाटे.
या पुस्तकाचा विषय वरवर फारसा महत्त्वाचा वाटला नाही, तरी तो सर्वांच्या अंगात भिनला असून, अत्यंत संवेदनशील आहे. फाळणीमुळे आपल्या हृदयाला झालेली जखम अद्याप भरून निघालेली नाही. म्हणून मी ज्यांच्या-ज्यांच्याकडून सल्ले मागितले आणि अवलंबून राहिलो, त्यांनी ते सल्ले काही पाने भरतील इतक्या विस्तृतपणे दिले आहेत.
या कामामध्ये अनेक भावना दाटलेल्या आहेत. फाळणीचा इतिहास म्हटल्यानंतर असे होणारच. फाळणीला गांधीजी एक अनिवार्य विच्छेदन म्हणत. परंतु हा राजकीय अर्थ झाला. यात गुंतलेल्या मानवी यातना, संवेदना आणि भावना यांचीही चिरफाड झाली, त्याचे काय? इतिहास जुळवून लिहिणाऱ्या तज्ज्ञांना याकडे मानवी दृष्टिकोनातून बघता येणे कठीण आहे. ते अशा गोष्टींकडे नेहमीच भुवया उंचावून पाहतात याची मला कल्पना आहे. पण, तशा थंडपणे, घटनांचे भावरहित कथन करणे मला जमणार नाही. तशा पद्धतीने लिहिलेले लिखाण हे नेहमीच रटाळ आणि कंटाळवाणे ठरते. माझे लिखाण अनेकांच्या हातातून आधी परीक्षणासाठी गेले होते. ते बारकाईने वाचून त्यावर त्यांनी भरपूर कष्ट घेतले. महंमदअली जिना हे सार्वजनिक जीवनात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिनिधी ठरवले गेले होते. तेथून पाकिस्तानचे ‘कैद-ए-आझम’ बनण्यापर्यंतचा त्यांचा सार्वजनिक आणि राजकीय प्रवास कसा झाला, हे मला या पुस्तकात मांडता आले.
- DAINIK SAKAL 2-6-2010
‘जीना’च्या प्रकाशनप्रसंगी पाध्ये यांचे प्रतिपादन
‘‘दंगली, सामाजिक पातळीवरचे समज-असमज यांचे मूळ म्हणजे समाजातील ज्ञानतृष्णेबाबत आपण पंगू आहोत. इतिहासातून आपण बोध घेत नसल्यामुळे सामाजिक असहिष्णुता वाढीस लागली आहे, त्यामुळे भविष्याचा विचार करताना सुजाण होऊन इतिहासाचे संदर्भ घेत त्याची वर्तमानाशी सांगड घालणे आवश्यक आहे,’’ असे मत ‘सकाळ’चे संपादक सुरेशचंद्र पाध्ये यांनी व्यक्त केले.
पॉप्युलर बुक हाऊसतर्फे आयोजित ‘मॉन्सून सेल’मध्ये जसवंतसिंह लिखित ‘जीना’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन पाध्ये यांच्या हस्ते झाले. पुस्तकाचे अनुवादक अशोक पाध्ये, पुस्तकाचे प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता, पॉप्युलर बुक हाऊसचे माधव गाडगीळ आणि सुनील गाडगीळ उपस्थित होते.
पाध्ये म्हणाले, ‘‘शिक्षण आणि ज्ञानतृष्णेच्या पातळीवर आपण आज कित्येक शतके मागे आहोत. कोणत्याही घटनेमागील तथ्य जाणून न घेता प्रतिक्रिया न देणे, सामाजिक पातळीवरचे समज-असमज पसरविणे यामुळे घटना घडतात. राजकीय पातळीवरही हीच परिस्थिती आढळून येते. यामुळे सामाजिक असहिष्णुताही वाढीस लागली आहे. इतिहासातील संदर्भ घेत भविष्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.’’
अशोक पाध्ये म्हणाले, ‘‘जीना या पुस्तकासाठी जसवंतसिंह यांच्यासह तीस लोकांच्या तुकडीने पाच वर्षांहून अधिक काम केले आहे. पुस्तकाच्या नावामुळे राजकीय व्यक्तींना ते जीनांच्या बाजूने लिहिले आहे, असे वाटले. पण प्रत्यक्षात मात्र यात आत्तापर्यंत प्रकाशात न आलेला स्वातंत्र्यपूर्व इतिहास उलगडण्यात आला आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं. नेहरू यांसह अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी केलेले महानाट्य संदर्भासह यात मांडले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात झालेले पत्रव्यवहार फाळणी कशी झाली, असे विविध पैलू यात लिहिले आहेत’’, असेही पाध्ये यांनी नमूद केले.