- DAINIK TARUN BHARAT 23-05-2004
वायू प्रदूषणाचा भस्मासूर निर्माण केला आहे मानवानेच! निसर्गावर स्वामित्व गाजविण्याचा राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आणि निसर्गातील अमर्याद आणि विनाशकारी ढवळाढवळीमुळे! जगभर वेगाने वाढणारे औद्योगिकरण, लोकसंख्यमुळे फुगत चाललेली शहरे, अमानुषपणे होत चाललेली जंगलांची कत्तल, विषारी वायू आणि धूर ओकणारी असंख्य स्वयंचलित वाहने, यामुळे वायू प्रदूषणाचा अजगर सजीवांनाच नव्हे तर आपल्या वसुंधरेलाच विळखा घालीत आहे. प्रदूषणाचा हा भस्मासुर एक दिवस साऱ्या सजीवांनाच संपवून टाकील. मग उरेल आपली पृथ्वी एखाद्या ओसाड आणि निर्जन ग्रहासारखी!
वायू प्रदूषणाने जगभरातील हजारो निष्पाप लोकांचे प्राण घेतले आहेत. भोपाळ वायुकांडाची साक्ष इतिहास सतत देत राहील. वायू प्रदूषणाच्या भस्मासुराला गाडून टाकला येणार नाही का? त्यासाठी हवी प्रबळ इच्छाशक्ती, पर्यावरणाबद्दल लोकजागृती, पर्यावरण शिक्षणख् सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक संस्थांचा सहभाग आणि कायद्याची कडक अंमलबजावणी.
- DAINIK SAKAL 25-07-2004
वायुप्रदूषणाची समस्या...
जगाला भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार केला तर वायुप्रदूषणाचा क्रमांक फार वरचा लागेल. सध्या ‘औद्योगीकरण म्हणजे देशाची प्रगती’ हे समीकरण रूढ झाल्यामुळे त्याच्या अनेक अपरिहार्य परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते आहे. अशा परिणामांची प्रत्यक्ष झळ बसत नाही, तोपर्यंत आपण जागे होत नाही. वस्तुत: आपण स्वत: सिगारेट ओढत नसलो, तरी त्या धुरानेही आपल्याला जसा त्रास होत असतो, तसा कळत-नकळत होणारा वायुप्रदूषणाचा त्रास मानवी आरोग्याची हानी करतो आहे. नेमकी हीच जाणीव ‘वायुप्रदूषण’ या पुस्तकातून डॉ. किशोर पवार व सौ. नलिनी पवार यांनी आपल्याला करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
वायुप्रदूषण ही जागतिक समस्या असल्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांना वाटणारी जगबुडीची भीती निराधार म्हणता येणार नाही. या भूतलावर वनस्पती, प्राणी व मानव अशा घटकांमधील संतुलन बिघडले की, पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होऊन सजीवांना धोका पोहोचतो. यालाच प्रदूषण म्हणतात. या प्रदूषणाची कारणे प्रामुख्याने मानवनिर्मित व क्वचित नैसर्गिक असतात. अमर्याद औद्योगीकरण, वाढती लोकसंख्या, निसर्गदत्त जंगलाचा विनाश स्वयंचलित वाहनांची गर्दी, रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर यामुळे पाणी, हवा आणि जमीन तिन्हींचे प्रदूषण होते. वायुप्रदूषणाची नैसर्गिक कारणे म्हणजे वनस्पतीचे परागकण विषाणू, जिवाणू व बुरशीचे बीजाणू आणि ज्वालामुखीचा उद्रेक अशी आहेत.
वायुप्रदूषणाची अशी अनेक कारणे असली आणि या प्रदूषणाच्या व्याख्या जरी अनेकांनी केलेल्या असल्या तरी त्यापेक्षा त्याचे भयावह परिणाम जास्त महत्त्वाचे आहेत. कारण ते समस्या मानवजातीला भोगावे लागतात. जगात अनेक ठिकाणी वायुप्रदूषणामुळे घडलेल्या दुर्घटनांची जंत्री फार मोठी आहे. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे ३ डिसेंबर १९८४ ला भोपाळ वायुकांडात जवळपास विकलांग, अपंग झाले. विकृत बालते जन्माला आली. संबंधितांना जरी नुकसानभरपाई मिळाली तरी त्यामुळे लाखमोलाचा जीव कधी परत येत नाही. जगातली आधुनिक काळातली अशा प्रकारची पहिली दुर्घटना बेल्जियममध्ये डिसेंबर १९३० मध्ये घडली. त्यानंतर अमेरिका, लंडन, मेक्सिको, जपान आदी देशांमध्येही अशा दुर्घटना वेळोवेळी घडल्या. तरीही माणसाला पुरते शहाणपण आल्याचे दिसत नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. त्यामुळेच लेखकाने वायुप्रदूषणाच्या उगमापासून त्याच्या नियंत्रणापर्यंतची साद्यंत माहिती दिलेली आहे.
स्वयंचलित वाहने, कीटकनाशके, विविध धातू, रासायनिक खते, किरणोत्सर्गी पदार्थ, औष्णिक विद्युत केंद्रे, पर्जन्य, प्रकाश, रासायनिक धुरके आदी गोष्टींपासून प्रदूषण कसे फैलावते व त्याचे कोणकोणते दुष्परिणाम होतात ते सविस्तर स्पष्ट केले आहे. मानवाच्या बाबतीत डोकेदुखी, थकवा, नैराश्य, कर्करोग, दमा, अंधत्व, त्वचारोग, श्वसनाचे विकार, जन्मजात विकृती, मूत्रपिंड तसेच मेंदूचे विकार, विषबाधा असे अनेक दुष्परिणाम संभवतात. वनस्पती तर बोलूही शकत नाहीत आणि पळूनही जाऊ शकत नाहीत. पण त्यांची वाढ खुंटणे, पाने, पाकळ्या गळणे अशा प्रकारचे परिणाम त्यांच्यावर होतात. निर्जीव गोष्टीही यातून सुटत नाहीत. इमारतींचा रंग, फर्निचर, कपडे, गालिचे, विविध शिल्पे यावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ताजमहाल, चारमिनार, काही सुप्रसिद्ध मंदिरे अशा ऐतिहासिक स्मारकांवरही वायुप्रदूषणाचा प्रतिकूल परिणाम होतो. आर्थिक नुकसानही प्रचंड प्रमाणात होते. फक्त न्यू यॉर्क शहरात १९५५ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात दरवर्षी ६० लाख डॉलरचे नुकसान झाल्याचे आढळते. पश्चिम बंगालमध्ये धुरामुळे गंजणाऱ्या वस्तूंचे नुकसान पाच कोटी रुपये इतके झाले. एकूण या सजीव आणि निर्जीव सृष्टीचे सर्व प्रकारचे होणारे नुकसान टाळण्यासाठी काही ठोस उपाय आवश्यक आहेत. या उपायांची चर्चाही लेखकाने केलेली आहे. सरकारने प्रतिबंधक कायदेही केलेले आहेत. प्रगत देशात त्याची कडक अंमलबजावणी केली जाते, पण मागासलेल्या किंवा विकसनशील देशात मात्र त्याबाबत आजही अनास्था दिसते. कायद्यातूनही पळवाटा काढल्या जातात. काही स्वयंसेवी संस्था पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याचे काम आजही करतात. पण दुर्दैवाने आपल्या देशात गंभीर प्रश्नांना दुय्यम स्थान दिले जाते. या परिस्थितीत आमूलाग्र बदल होऊन एकूण समाजात पर्यावरणविषयक जाणीव निर्माण झाली, तर लेखकाचे श्रम सार्थकी लागले, असे म्हणता येईल.
- DAINIK TARUN BHARAT 06-06-2004
जगभर वेगाने वाढणारे औद्योगिकीकरण, लोकसंख्येमुळे फुगत चाललेली शहरे, आमनुषपणे होत चाललेली जंगलाची कत्तल, विषारी वायू, आणि धूर ओकणारी असंख्य स्वयंचलित वाहने, यामुळे वायू प्रदूषणाचा अजगर सजीवांनाच नव्हे तर आपल्या वसुंधरेलाच विळखा घालीत आहे. प्रदूषणाचा हा भस्मासूर एक दिवस साऱ्या सजीवांनाच संपवून टाकेल. मग उरेल ती फक्त पृथ्वी एखाद्या ओसाड आणि निर्जन ग्रहासारखी. प्रस्तुत पुस्तकात पृथ्वीचा हा ऱ्हास थांबवता यावा यासाठी पर्यावरण लोकजागृती, पर्यावरण शिक्षण आणि कायद्याची कडक अंमलबजावणी याविषयी चर्चा आढळते.
- DAINIK SAKAL 26-09-2004
वायू प्रदूषणाची जाणीव...
झपाट्याने होणारे शहरीकरण व वाढती कारखानदारी यांचा एकत्र परिणाम म्हणजे प्रदूषण. विशेषत: शहरी भागामध्ये नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी विपरीत परिणाम घडवून आणण्याची क्षमता असणारे वायू प्रदुषण’ ही एक जागतिक गंभीर समस्या आहे. वायू प्रदूषणाची व्याप्ती फार मोठी आहे व याविषयी शास्त्रीय माहिती एकत्र मिळवणे ही जिज्ञासू नागरिकांची मोठी गरज आहे. ‘वायू प्रदूषण’ या पुस्तकाच्या रूपाने याविषयीची सर्वंकष व शास्त्रीय माहिती एकत्रित परंतु सुलभ रीतीने मांडून डॉ. पवार यांनी ही गरज पूर्ण केली आहे. वायू प्रदूषणाचे प्रकार कोणते, त्यांची कारणे काय, त्यांचे आरोग्यावर कोणते विपरीत परिणाम होतात याची शास्त्रीय माहिती लेखकांनी दिलेली आहे. वाहनांचे प्रदूषण, कीटकनाशके, धातू, किरणोत्सर्ग, औष्णिक विद्युत केंद्रे, कारखाने अशा विविध स्रोतामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा गोषवारा घेणारी सोळा प्रकरणे म्हणजे याविषयीच्या उत्तम माहितीचा संकलित खजिनाच आहे. याबरोबरच वायू प्रदूषणामुळे होणारे आम्ल पर्जन्य, हरितगृह परिणाम, ओझोन थराचे विरळीकरण व एकूण पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम यांची उत्तम चर्चा या पुस्तकात आढळते.
या माहितीबरोबरच वायू प्रदूषणामुळे ऐतिहासिक स्मारकांवर होणारे परिणाम, आर्थिक नुकसान, सजिवांच्या आरोग्यावरील दुष्परिणाम यांचीही माहिती येथे दिली आहे. वायू प्रदूषण प्रतिबंधक कायदे व वायू प्रदूषण नियंत्रण करण्याची उपकरणे व उपाययोजना यांची चर्चाही लेखकाने केलेली असल्यामुळे ‘वायू प्रदूषण’ हे एक परिपूर्ण पुस्तक बनले आहे. उत्तम छपाई व विषय सुलभ करण्यास व रंजक करण्यास विविध छायाचित्रे, आकृत्या व तक्ते यांचा मोठा सहभाग आहे. लेखकाने संदर्भसूची दिली असती तर जिज्ञासूंना त्याचा अधिक उपयोग झाला असता. पर्यावरण या विषयाचे वाढते महत्त्व व त्याचा शालेय शिक्षणात केलेला समावेश या पार्श्वभूमीवर ‘वायू प्रदूषण’ या पुस्तकाचे स्वागत केले पाहिजे व लेखकांनी हा महत्त्वाचा विषय उत्तम रीतीने हाताळून पर्यावरण शिक्षण व जनजागृतीच्या प्रयत्नांना चांगला हातभार लावला आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये उपयोगी पडेल व जिज्ञासूंना शास्त्रीय माहिती देणारे ‘वायू प्रदूषण’ हे पुस्तक निश्चितच संग्राह्य आहे.
-डॉ. भूषण पटवर्धन
- DAINIK LOKSATTA 25-07-2004
वायू प्रदूषणाचा भस्मासुर...
भोपाळ वायुगळती दुर्घटनेतील पीडितांना आर्थिक मदत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आणि २० वर्षांपूर्वी घडलेल्या त्या भयंकर घटनेच्या स्मृती पुन्हा ताज्या झाल्या. स्वार्थापायी किंवा प्रगतीच्या हव्यासापोटी माणूस माणसाचाच कसा वैरी ठरतो, याचे हे ठळक उदाहरण. वायू प्रदूषणाशी निगडित असलेल्या या घटनेने हजारोंचे बळी घेतले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. अशा अनेक घटनांमुळे मानवी जीवनाचा घाऊक विनाश घडून आला, पण माणूस त्यातून काहीच शिकला नाही. आज याच वायू प्रदूषणाने संपूर्ण पृथ्वीलाच आपल्या मगरमिठीत जखडले आहे. जगातील प्रमुख शहरे या वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. सर्वत्र तापमानात वाढ होत आहे. वायू प्रदूषणाच्या मानवी आरोग्यावरील दुष्परिणामांनी भयानक रूप धाण करायला सुरुवात केली आहे. सुदैवाने या समस्येची जाणीव जगाला होऊ लागली आहे, पण भारतात मात्र अद्याप या समस्येचे गांभीर्य कळलेले नाही. भोपाळ दुर्घटनांग्रस्तांना तब्बल २० वर्षानंतर मदत मिळते यावरूनच आपण या समस्येबद्दल किती जागरूक आहोत याची कल्पना यावी, पण अजूनही वेळ गेलेली नाही. समाजजागृती झाली, तर ही समस्या आटोक्यात आणणे शक्य होईल.
या समस्येच्या अनुषंगाने विज्ञानविषयक अफाट लेखन करणाऱ्या प्रा. डॉ. किशोर पवार व प्रा. नलिनी पवार यांनी लिहिलेले ‘वायू प्रदूषण’ हे पुस्तक या समस्येची पुरेशी जाणीव असलेल्यांना, तसेच या समस्येबद्दल अनभिज्ञ असलेल्यांना मार्गदर्शक ठरेल. या समस्येने संपूर्ण जगात आपली पाळेमुळे कशी रुजवली आहेत त्याची माहिती पहिल्या प्रकरणात येते. आतापर्यंत जगभरात झालेल्या वायू प्रदूषणाशी निगडित दुर्घटनांवर दुसऱ्या प्रकरणात प्रकाश टाकण्यात आला आहे. ही माहिती उद्बोधक आणि रोचक ठरावी. त्यानंतर वायू प्रदूषण व ते निर्माण करणारे विविध घटक यांचा परस्परसंबंध पुढील प्रकरणांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. वायू प्रदूषणाचे मानवी आरोग्यावरील दुष्परिणाम व ऐतिहासिक वास्तूंची हानी याबद्दलचे प्रकरण वाचकांच्या ज्ञानात निश्चितपणे भर टाकेल. त्याशिवाय वातावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी किंवा त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी वापरावयाची नियंत्रक उपकरणे, तसेच प्रतिबंधक कायदे हा महत्त्वाचा भाग पुस्तकाच्या अखेरच्या टप्प्यात येतो. एकंदरीत वायू प्रदूषणासारख्या अक्राळविक्राळ समस्येला आळा बसावा या दृष्टीने केला गेलेला स्तुत्य प्रयत्न म्हणून या पुस्तकाचा उल्लेख करता येईल.