- NEWSPAPER REVIEW
मूर्तिमंत जिद्द उभी!...
कुरूप, अपशकुनी, पांढऱ्या पायांची, पालीच्या तोंडाची, दळभद्री, रडकी, तुटक्या चपलेच्या तोंडाची. टांग्याच्या टपासारखी मरतुकडी, बिसरी, बेअकली अशी काही विशेषणे घेऊन मुस्लीम समाजातल्या एका मुलीनं आपलं आयुष्य गळ्यातल्या ओढण्यासारखं अनेक वर्षे वाहून नेलं. तिच्या ठेचकाळलेल्या जीवनाच्या पूर्वार्धात ना आनंदाचे क्षण आले. ना शरीर वा मनाला विश्रांती लाभली. शिक्षणाला बंदी. त्यातच मन वा शरीराची कोणतीही तयारी नसताना लग्न करून दिलेलं आणि वयाच्या वीस वर्षांच्या आतच पदरात चार मुली. या मुलीनं उभारी तरी धरायची कोणाच्या आधारानं. कारण त्या मुलीवर हा अन्याय कोणी शत्रू, शेजारी, सावत्र आई वा परके नातेवाईक करीत नव्हते, तर खुद्द तिच्या सख्ख्या आईनंच तिचं आयुष्याच आपल्याकडं ‘गहाण’ ठेवलं होतं. तिच्या ‘व्यक्तिमत्त्वा’चा जणू ‘बोन्साय’च करून टाकला होता. त्या मुलीनं वडिलांकडे मदतीसाठी बघावं तर आईनं त्यांचाही पालापाचोळा केलेला. सतत कानांवर पडणाऱ्या तू कुरूप, अपशकुनी आणि पांढऱ्या पायांची अशा शब्दांनी ती घायाळ होत होती. असले टोमणे आई अन्य मुलींना न मारता आपला व वडिलांचाच पाणउतारा का करते या प्रश्नाचा भुंगा पुढे आयुष्यभर काही सोडवता आला नाही. पण एक टप्पा असा येतो की, गुलामीची तिला जाणीव होते, ती शिकते, नोकरी करते. अपमानाचे असंख्य प्रसंग येतात. पण सर्व जबाबदाऱ्या कुशलतेनं पार पाडते... तिच्या मुलींनाही शिक्षाणात गोडी असते आणि तिची सारी स्वप्ने त्या पूर्ण करतात... ज्या आईनं तिचं आयुष्य नकोसं मानलं. त्या आईला तिनं स्वत:च्या घरातून ‘हद्दपार’ केलं असलं तरी देखभाल करण्यात ती कुचराई करीत नाही. तीच आई नंतर लोकांना सांगू लागली, ‘मेरी बडी बेटी पोपेसर हाय. उन्हेच सब मेरा देखतिया.’ खरंच कोण होती ही मुलगी? स्वत्त्वाची जाणीव होताच आपली ‘स्पेस’ तयार करणारी ही मुलगी होती तरी कोण?
आशा आपराद हीच ती मुलगी. आता आयुष्याचं अर्धशतक पार केलेल्या आशानं जीवनाचे अनेक रंग अनुभवलेत. त्या अनुभवानं कधी ती थरारली. उद्ध्वस्त झाली संघर्षमय कालखंडाचा हा पट तिनं गहिरेपणानं मांडलाय.
संवेदनशील वडील आणि असंवेदनशील आईच्या पोटी जन्मलेली ही आशा वडिलांची आवडती; पण आईची तितकीच नावडती. आशा म्हणते, ‘आईला वस्तू गहाण ठेवून गरज भागविण्याची सवय. तिनं कधी भांडी, दागिने, वडिलांचा लग्नातला जरीचा पटका, कधी मंगळसूत्रही गहाण ठेवलं. तिनं गहाण ठेवलेल्या वस्तू मी सोडवत आले. मला आईपाशी ‘गहाण’ ठेवलेलं आयुष्यही सोडवून घ्यावं लागलं. वडील असेतो आशा शिकत गेली आणि ती नववीत असताना तिचे प्राणप्रिय ‘भई’ मरण पावले. त्याच क्षणी आई पाटी-दप्तर फेकून देऊन तिचं शिक्षणच संपूवन संसाराला जुंपते. ऐन लग्नात सासरच्या मंडळींशी भांडते आणि आशा नवऱ्यासह आईकडेच राहायला लागते. वस्ताद आई त्यांचंही पोतेरं करते. आशाची सारी स्वप्ने आईच्या काळजाच्या दगडावर चक्काचूर होत जातात. धर्म, रूढी, परंपरा दहशत आणि दरारा अशा अनेक दगडांच्या तुरुंगात ती चिणून जाते; पण सभोवतालची चार चांगली माणसं मदतीला धावतात आणि आशाची जडणघडण होते... तिची प्रेरणा घेऊन तिच्या चारही मुली स्वत:च्या पायांवर उभ्या राहतात. नवरेही समजूतदार मिळतात आणि आयुष्याच्या उताराच्या वळणावर तीच आशा त्याच अबोल आणि समजून घेतलेल्या नवऱ्याच्या साथीनं स्वत:च्या गाडी-बंगल्यासह राहते आहे... अलौकिक नात्यानं भोवतालच्या समाजानं जे प्रेम आणि साथ दिली त्या स्नेहसंबंधाचं प्रतीकही पुस्तकातून उमटत राहतं... ही लोकं तरी कोण होती? तिचे शिक्षक, गल्लीतले लोक, कॉलेजातले गुरुवर्य, आधारवड बनलेल्या प्राचार्या लीला पाटील. दलितमित्र बापूसाहेब पाटील. दलितमित्र बापूसाहेब पाटील, रवींद्र सबनीस, अनेक संस्था, महिला दक्षता समिती आणि असंख्य मायेची माणसं. ती ज्या हिंदू गल्लीत जन्मली आणि वाढली तेथल्या संस्काराने ती कवेळ मुस्लीम न राहता भारतीय मुस्लीम बनली. जाती आणि धर्मभेदाच्या पलीकडच्या समाजाच्या प्रेमातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळत गेली... पण त्यासाठी जन्म ते नंतरची पंचवीस वर्षे अक्षरश: नकारात्मक शब्दांचे आसूड आणि अभद्र लेबलं सोसावी लागली. त्या लेबलातून वाट काढण्यासाठी जी धडपड झाली त्या धडपडीची कहाणी म्हणजे ‘भोगले जे दु:ख त्याला... हे पुस्तक.
१४ एप्रिल १९५२ रोजी मुस्लीम कुटुंबात कोल्हापुरात आशाचा जन्म झाला. वडील इस्माईल देसाई त्याकाळच्या इंग्रजी विषयातले एम. ए. व इतर भाषांचे जाणकार. इंग्रजांकडे ते दुभाषा आणि खजिनदार म्हणून काम पाहत. स्वातंत्र्यानंतर इंग्रज परतले आणि इकडे नोकरी-जमीन सारेच गेले. मित्राची जामिनकी अंगावर येऊन प्रेसचा व्यवहार संकटाचा ठरला. गांधी हत्येनंतरच्या कोल्हापुरातल्या दंगलीत सायकलीचं दुकानही लुटलं गेलं. आशाची आई पन्हाळ्याची. तिचे वडील तलाठी. घरात आबादी. सोनं-नाणं भरपूर. सर्व्हिस मोटारीच्या धंद्यातल्या भागीदारीसाठी अम्माचे सगळे दागिने सादोबा मुलावरच्या चुलत भावाकडं दिले जातात आणि शिकारीच्या दौऱ्यावर आईच्या वडिलांचा हृदयविकारानं मृत्यू होतो. नातलग हुसकावून लावतात आणि पहिल्यांदाच ती घरकामासाठी म्हणून घराबाहेर पडते. पुढली तीस वर्षे वडलांच्या श्रीमंतीचा विषय निघाला की, ‘क्या जलाने की उनकी शिरमंती, बडेजावी? बडा घर, पैसा, दागिना हामना क्या मिला?’ अशी ती उपेक्षा करीत राहिली. नवऱ्यावरचा राग मुलीवर काढीत राहिली. आशाचे वडील भई मेहता कंपनीत नोकरीला लागले असले तरी पैसा पुरायचा नाही. भई कविमनाचे तर आई ‘की गे कुत्ते’ असं म्हणून बोलणारी, ‘आगे ए छिनाल इधर आ’ असा ओरडा तर दिवसातून हजारवेळा होई. कोणाकडून आणा घेतला म्हणून तापलेलं उलथनं तळहातावर चर्रकन ओढण्याचीही तिनं तमा बाळगली नव्हती. आठव्या वर्षीच सकाळी लवकर उठून असंख्य कामं मागं लागलेली. थोडा कंटाळा केला की, ‘क्या गे चिपलककी मूँ की’ अशी शेरेबाजी. कामानं थकायला व्हायचं. कधी ताप यायचा, गालगुंडही होत असे, पण आईनं हात लावून कधी विचारपूसही केली नाही. एकदा तर चुलीच्या कोपऱ्यातले जळणाचं लाकूड तिने दोनही पायांवर इतक्या जोरात मारलं की, ती कुत्र्यासारखी केकाटत घराबाहेर पळाली. कधी घरात मटणरस्सा असला तरी भईच्या ताटात मात्र डाळ-आमटीच.
अचानक भई आजारी पडून मरण पावतात आणि त्याबाबत आशा म्हणते, ‘आईकडून होणारी उपेक्षा, छळ ते बघत, सोसत आले होते. ते मुकाट राहत. भर्इंनी प्रेम निर्माण केलं, तर आईनं निर्माण केली दहशत. भीती.’ पंधरा दिवसांनी आशा शाळेत निघाली तर आईनं दप्तर ओढलं आणि फेकून देताना ती म्हणाली, ‘चुल्हे में चाल तेरी साळा.’ भर्इंची इच्छा होती. आशानं बॅरिस्टर व्हावं, पण आता शज्ञळा सुटली, शाळेत निबंध स्पर्धेच्या बक्षिसांचा चषक मिळाला तर आईने तो रस्त्यावर फेकून दिला. चेपलेला तो चषक नंतर पेटते कोळसे घालून धूप म्हणून वापरला. आईनं आशाचं लग्न लावून दिलं तो दिवस अमावस्येचा. लग्नानंतर नवऱ्याबरोबर ही सिनेमा पाहायला गेली तर आल्यावर नवऱ्यासकट तिची कबख्तीच निघाली. पाच बहिणींना स्वातंत्र्य होतं, नव्हतं फक्त आशालाच. कारण तिच्यादृष्टीनं आशा म्हणजे अपशकुनी. पहिले गरोदरपण, कावीळ, अशक्तपणा आणि दिवसभर कानांवर पडणारे ‘ए टांगे के टप के मूँह की’ असले शब्द. बाळंतपणात तर बघालाही कोणीच नाही आणि अशी चार बाळंतपणं. दवाखान्यात कोणी न्यायचं नाही वा बाळंतपणानंतर कोणी भेटायला गेलेलं आईलाही आवडायचं नाही. एकटीनं खुरडत खुरडत घरी यायचं, चारही बाळंतपणाच्या काळातल्या ज्या आपत्तीचं वर्णन आशा आपराद यांनी पुस्तकात केलं आहेत ते पुढं पुढं वाचवत नाही. कधी विजेचा शॉक बसतो. कधी नाहक चोरीचा आळ घेतला जाऊनही नवरा तिची चौकशीही करीत नाही. बहिणींच्या लग्नात भांडी घासायची पाळी आशावर आली. थांबलेले शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे आशा ठरविते तेव्हा माने केलेला घरातला दंगा अभूतपूर्वच; पण सारा जाच आणि त्रास सोसून आशा शिक्षणाला उभी राहते हा तिच्या आयुष्यातला पहिला निर्धार असतो आणि हेच वेगळे वळण ठरते.
या पुस्तकात हादरवून सोडणारे अनेक प्रसंग आहेत. करुणा वाटते तसे प्रेमाचे उमाळेही येतात. आत्मकथेत असंख्य व्यक्तिरेखा आहेत. त्या इतक्या ठसठशीत आहेत की, त्यांच्या वर्तनातूनही आशाचं व्यक्तिमत्व काही अंशी उलगडत जातं. यातली हिंदी भाषाही वेगळीच आहे. याआधी मराठी मुस्लिमांची आत्मकथनं मराठीत आली असली तरी हे आत्मकथन त्यातल्या अनुभवानं वेगळं ठरतं.
- LOKSATTA 4-1-2009
आशा आपराद यांचे आत्मचरित्र `भोगले जे दु:ख त्याला...` हे अनेक अर्थांनी वाचनीय आहे. मनोगतातच त्या म्हणतात की, हे एका सामान्य स्त्रीचे आत्मचरित्र आहे. पुस्तक वाचताना मनात आले की कदाचित म्हणूनच ते वेगळे व सच्चे झाले आहे. म्हणजे प्रसिद्ध व्यक्तींना आत्मचरित्र लिहिताना अनेकदा स्वत:च्या वागण्याचे समर्थन द्यावेसे वाटते किंवा आजूबाजूच्या व्यक्ती दुखावल्या जाण्याचे भय वाटते. आपराद यांच्या आजूबाजूला कुणीही प्रसिद्ध व्यक्ती - तशा लीलाताई पाटील आहेत - नाहीत. त्यामुळे मनमोकळेपणाने जसे घडले तसे त्या सांगत गेल्या. त्यांच्या आईचा स्वकेंद्री व अकल्पनीय स्वभाव, त्यामुळे त्यांची झालेली घुसमट, वडिलांचा लवकर झालेला मृत्यू परंतु मृत्यूपूर्वीच त्यांनी आशावर केलेले संस्कार यांचे चित्रण मनाला भिडेल असे झाले आहेच; परंतु सुशिक्षित वडिलांच्या प्रेमामुळे व जवळिकीमुळे त्यांच्यात असलेली शिक्षणाची जिद्द व त्यामुळे तेराव्या वर्षी आईने जबरदस्तीने लावलेल्या लग्नानंतर पाठोपाठच्या चार मुलींना जन्म देऊन मग परत शिक्षणाला सुरवात करून प्राध्यापकीपर्यंत मारलेली मजल थक्क करणारी आहेच, परंतु हे सर्व करत असताना त्यांच्या आजूबाजूच्या समाजाचे जे चित्रण आहे ते विलोभनीय आहे.
लेखिकेचा समाज म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील मुस्लिम समाज. हा समाज बरीच जमीन बाळगून असणारा खेडवळ समाजही आहे व अशिक्षितपणामुळे गरिबी आलेली कुटुंबेही आहेत. तिचे कुटुंब गरिबी प्राप्त झालेले आहे. परंतु आजोळ हे दरगाहची सेवा करणारे `मुजावर` कुटुंब. दरवर्षीच्या ऊरुसाचे वर्णन वाचताना प्रत्येक ठिकाणाच्या संस्कृतीमुळे विकसित झालेली संमिश्र (कंपोझिट कल्चर) संस्कृती काय असते त्याचा पट आपल्यापुढे उलगडला जातो. उरुसाच्या आधी सर्व मुजावरांनी `संदल` चंदनाचे दाट गंध उगाळून हांडे भरावयाचे - पीराला ते माखायचे. पहिल्या दिवशी सवाष्णींनी शाकाहारी जेवण करून नैवेद्य दाखवायचा. दुसऱ्या दिवशी बकरा कापला तरी इतर जेवण म्हणजे मसालेभात, धपाटे, वाटाण्याची उसळ इत्यादी. पापड - कुरड्या, ओटी भरणे वगैरे गोष्टींचे वर्णन वाचताना गंमत वाटते. त्यांची मुसलमानी भाषाही अशीच, `आशा आटप जल्दी. आज दस्तगीर, तू,मैं, छोऱ्या जंजीर देखने जइंगे, लई भारी पिक्चर हाय, उसमें का एक गाना मुजे लई पसंत आया देक...` त्यांचे शेजारी पाजारी हिंदू अठरापगड जातीचे. त्यांच्याबरोबर लेखिकेवर गौरी-गणपती, हादगा, यांचे संस्कार झालेले. मदतीला हेच शेजारी. त्यांच्याबरोबर भावा-बहिणीचे मनापासून निभावलेले नाते हा खरा आपला समाज. याच समाजातील काही नातेवाईक, शुद्ध शाकाहारी, खुद्द लेखिकेचा नवरा शाकाहारी त्यामुळे त्यांची तब्बेत सुदृढ. हे सर्व सहज. यातलाच एक दीर धर्माची टिंगल उडवणारा तर एक अचानक नमाजी बनलेला. इतके वैविध्य, मान्यता धर्माचा लवचिकपणा याचे मनोरम चित्रण या आधी वाचलेले आठवत नाही.
एक स्त्री शिकली की सारे कुटुंब शिकू लागते हे आशा आपराद यांच्याकडे बघून पटते. त्यांच्या शिक्षणाच्या धडपडीला प्रचंड विरोध करणारे नातेवाईक पुढे आपल्या मुलांना शाळेत घातल्यावर त्यांचे उदाहरण देऊन `आशा भाभी कैसे कष्ट में शिखे, तुमना अब्यास करनं क्या जान जातिया क्ता?` म्हणून त्यांना (मुलींनाही) शिकण्यासाठी उत्तेजन दिले. त्यांच्या चारही मुली शिकल्याच, परंतु त्यांच्या बहिणीचीही काही मुलेही उच्च शिक्षणाकडे त्यांच्या उदाहरणावरुन वळली. आशाताई अभ्यास करत असतानाच आजूबाजूच्या शेतमजूर स्त्रियांशी जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित केला. या स्त्रियांना बचत करायला शिकवून जोडधंदा करायला मदत करून त्यांना आत्मनिर्भर केले. याच स्वभावामुळे कॉलेजमधील विद्यार्थी व नंतर कोल्हापुरातील सामाजिक कामाशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. आजही त्या स्वाधारसारख्या संस्थांत काम करत आहेत.
लेखिकेने स्वत:च्या लोकांकडून उभे केलेले अडथळे पार करत स्वत:च्या प्रगतीचा प्रवास केला. असा प्रवास आजवर अनेकांनी केला आहे.परंतु एक मुस्लिम स्त्री म्हणून समाजाने त्यांच्या मार्गात जे अडथळे आणले त्यामुळे विचार आला की सर्वसामान्य लोक स्वभावाने एकमेकांशी वागत असतात. हीच आपली संस्कृती आहे. परंतु स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजणारे समाजात तेढ निर्माण करतात. हा समाज जो सहजतेने आपला धर्मधारयते इति धर्म - निभवत असतो त्याला कृत्रिमतेने - उर्दूत शिक्षण, पोशाख वगैरे जगायला लावतात. लेखिकेची आई व इतर स्त्रिया नऊवारी नेसत होत्या, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या , पाटल्या घालणे महत्त्वाचे मानत होत्या. त्यांना अलगतावादाचे धडे देऊन व हिंदूंनी त्यांच्यावर आक्रमकपणे बोलण्याने गटाने राहण्याची गरज वाटून, आपणच आपल्या समाजाच्या एकसंधपणाच्या वैविध्याच्या चिरफळ्या करत आहोत का? असो. पश्चिम महाराष्ट्रातील मुसलमान समाजाच्या जगण्याचे, त्यांच्या प्रश्नाचे व त्यावरील काही मार्गाचे लोभस चित्रण आल्याने आशा आपराद यांची कहाणी सामाजिक चित्रणही झाली आहे. या त्यांच्या समाजाविषयी अभ्यासू दृष्टीकोनातून त्यांनी आणखीही लिहावे. महाराष्ट्राच्या सामाजिक दस्तावेजीकरणाच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक ठरेल.
- TANISHKA Jan 2010
मेहता पब्लिशिंग हाऊस (पुणे) यांनी प्रकाशित केलेल्या आशा अपराद यांच्या ‘भोगले जे दु:ख त्याला’ या आत्मचरित्राला आतापर्यंत महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी पुरस्कार, दिल्लीचा काकासाहेब गाडगीळ मातृपितृ पुरस्कार असे सात पुरस्कार मिळाले आहेत. आयुष्यात येणाऱ्या संकटांशी सामना करत लढत राहिलं तर जगणं मनासारखं जगता येतं, हा संदेश देणाऱ्या आशा आपराद यांचं हे मनोगत.
प्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवींचा मला फोन आला. ओलावलेल्या स्नेहमयी आवाजात ते म्हणाले, ‘‘मी तुमचं आत्मचरित्र थांबून थांबून वाचतोय.’’ मला क्षणभर त्याचा अर्थच कळला नाही. ते म्हणाले,‘‘थोडं पुस्तक वाचतो. रडतो. डोळे पुसून पुढचा प्रसंग वाचतो.’’ ते ऐकून माझं मन शब्दांतून त्यांच्यापर्यंत पोहोचल्याचं समाधान मिळालं.
या पुस्तकामुळे दळवींबरोबर श्रीकांत मोघे यांसारख्या दिग्गजांपर्यंत, चंद्रपूरच्या मनोहर सप्रे यांच्यासारख्या कलंदर व्यक्तीपासून ते मुंबईच्या विद्यासारख्या तरुणींपर्यंत अनेक व्यक्ती आणि घरांशी मी स्नेहाच्या धाग्यांनी जोडली गेले. मी जे भोगलं ते प्रतिनिधिक आहे. माझ्या प्रतिकूल स्थितीतही घराबाहेरच्या अनेक मायेच्या हातांनी मला जाणलं, आधार नि धीर दिला, यथाशक्ती मदत केली. समाजाबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. मदत करणाऱ्या असंख्य प्रेमळ ‘हातांना’याच कृतज्ञतेनं मी मोठ्या विश्वासानं माझं पुस्तक अर्पणही केलं आहे. मी समाजावर जितकं प्रेम केलं, समाजानं त्याच्या कैकपटींनी मला अधिक प्रेम दिलं, समृद्ध केलं. समाजात वाईट गोष्टी आहेत, पण सारा समाज कृतघ्न नाही. समाजात चांगल्या माणसांची संख्या खूप मोठी आहे. माझं दु:ख, सोसणं मी मोकळेपणानं व्यक्त केल्यावर समाजानंही मला तितक्याच आपलेपणानं स्वीकारलं, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. माझं पुस्तक वाचून अनेकांना रडू आलं. त्यातल्या शब्दांचा कीस काढावा किंवा त्यांची चिरफाड करावी असं वाटलं नाही, हे त्याचंच प्रतीक नाही काय?
कोल्हापूर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हिंदी विषय शिकविणारी मी प्राध्यापिका. अत्यंत सामान्य मुस्लिम घरात जन्मले. वडील सुसंस्कृत, पण आई अक्षरशत्रू. लहानपणापासून, किंबहूना जन्मापूर्वीपासूनच तिने माझा रागराग केला, छळ मांडला. माझ्या नवऱ्यासह तिने मला अक्षरश: राबवलं. माझं जीवन पणाला लावण्याचा तिने जणू विडा उचलला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी मी चार मुलींची आई बनले होते. प्रतिकूलतेचा कळस सोसत होते. परिस्थितीच्या या वादळी प्रहारातही माझी अभ्यासाची, ज्ञानाची आस जिवंत राहिली हे माझं भाग्य. कठोर निग्रहाच्या आणि अभ्यासानंतर मनाला मिळणाऱ्या अननुभूत आनंदाच्या आधारानं मी सारे चटके सोसत दहावीपासूनचं शिक्षण घेतलं. बी.ए., एम.ए., एम.फिल. झाले. आता प्राध्यापकाची नोकरी करते आहे. माझं स्वत:चं प्रशस्त, सुंदर, मनाजोगतं घर झालं. महत्त्वाचं म्हणजे माझ्या मुली शिकल्या-सवरल्या, शहाण्या झाल्या, सुस्थळी पडल्या. माझ्या मनीचं गुज समाजरूपी आईजवळ उघड करताना इतरांना प्रेरणा देण्याची सुप्त इच्छा होती. आपण प्रतिकूल परिस्थितीत तग धरू शकतो.
मी जे भोगलं ते प्रातिनिधिक आहे. माझ्या प्रतिकूल स्थितीतही घराबाहेरच्या अनेक मायेच्या हातांनी मला जाणलं, आधार नि धीर दिला, यथाशक्ती मदत केली. मदत करणाऱ्या असंख्य प्रेमळ ‘हातांना’याच कृतज्ञतेनं मी मोठ्या विश्वासानं माझं पुस्तक अर्पणही केलं आहे. माझा निखळ प्रामाणिकपणा, दु:ख हे धागे मला घराघरांशी जोडणारे ठरले. एका अर्थानं माझं दु:ख वैश्विक ठरलं. मी खरं तेच लिहिल्यामुळे पश्चात्ताप होण्याचा प्रश्नच आला नाही. माझं पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मला रसिकांकडून मिळणारी दाद मनस्वी आनंद देणारी ठरली.
तसंच होऊ शकतं, शिक्षणानं माणूस शहाणा होऊ शकतो, आपली इच्छा प्रामाणिक आणि चांगली असेल तर अडचणी सुटू शकतात, हे मला समाजाला सांगायच होतं. शिवाय आयुष्याच्या आणि वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर गत आयुष्याकडे पाहताना मी तटस्थ राहू शकत होते. त्या त्या वेळी मला जे वाटलं ते मी प्रामाणिकपणे लिहिलं. माझ्या घरची माणसं माझ्याशी वाईट वागलीच होती. त्यांनी मारलेल्या बाणांच्या जखमा मी झेलल्या होत्या.
त्यामुळे मी पूर्ण विचार करूनच आत्मचरित्र लिहिलं. माझा निखळ प्रामाणिकपणा, दु:ख हे धागे मला घराघरांशी जोडणारे ठरले. एका अर्थानं माझं दु:ख वैश्विक ठरलं. मी खरं तेच लिहिल्यामुळे पश्चात्ताप होण्याचा प्रश्नच आला नाही.
माझं पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मला रसिकांकडून मिळणारी दाद मनस्वी आनंद देणारी ठरली. मी समाजाप्रति आणखी कृतज्ञ, नम्र झाले आहे. कोकणातल्या एका तरुणाने या पुस्तकामुळे आत्महत्येपासून परावृत्त झाल्याचं सांगितलं. अर्चनाने मनातलं इतरांना सांगता न येण्याजोगं दु:ख माझ्याजवळ बोलून मोकळं केलं. मुंबईची विद्या तर फोन करून रडली. नवऱ्याजवळ हट्ट करून ती कोल्हापूरला आली. माझ्या आवडत्या रंगाची साडी, माझा आवडता मोगऱ्याच्या फुलांचा गजरा दिला. माझ्या कुटुंबीयांना मुंबईला बोलावून तिने यथायोग्य आदरसत्कार केला. चंद्रपूरचे मनोहर सप्रे. त्यांचं सुरेख पत्र आलं आहे. सप्रे यांनी परिचितांना लिहिलेल्या निवडक पत्रांचा संग्रह ‘सांजी’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या आगामी आवृत्तीत मला लिहिलेल्या पत्राचा समावेश ते करणार आहेत.
अरुण फडके यांचा ‘मम आत्मा गमला’ असा एक कार्यक्रम आहे. भाषेचा वेगवेगळा लहेजा असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण संवादाचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये माझ्या पुस्तकातील मी ‘ह्यांच्या’ पाया पडून, विनवण्या करून शिकण्याची परवानगी मागते, तो प्रसंग घेतलेला आहे. त्याचं नाट्यरूपांतर सादर केलं जातं. मुंबई-पुण्यात त्याचे प्रयोग झाले आहेत.
गेल्या महिन्याभरात मला सतत पुरस्कार जाहीर झाले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्कारांपासून ते लक्ष्मीबाई टिळक, सोलापूरचा भैरू रतन दमाणी, दिल्लीचा काकासाहेब गाडगीळ मातृपितृ पुरस्कार, अशा दर्जेदार संस्थांच्या पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. मी सामान्य स्त्री आहे, पुरस्कारांमागे धावणारी तर मुळीच नाही, तरी असे चांगले पुरस्कार मला शोधत आले. लहानपणी माझ्यावर माया करणारी पण मध्यंतरी काही काळ सहवासात नसणारी माणसं पुन्हा भेटली. घरातल्या काही व्यक्तींना त्यांचं काय चुकलं हे कळलं. मुख्य म्हणजे अगदी तरुणवर्गाच्या काळजातही मला जागा मिळाली. काहीजणांना जगण्याची प्रेरणा मिळाली. अनेकांना माझ्या भावनांशी समरसता साधता आली. हे सारं माझ्यासाठी आनंदाचं, समाधानाचं, कृतज्ञ आणि नम्र बनविणारं आहे. आज मी कृतार्थ आहे!
- LOKSATTA 17-10-2009
अशिक्षित, अडाणी, अठराविश्व दारिद्र्य असलेल्या एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या आशा अपराद यांचं `भोगले जे दु:ख त्याला...` हे आत्मकथन परिस्थितीच्या कोंडीत सापडलेल्या एका अबलेचं शिक्षणाच्या अविश्रांत ध्यासातून एका सबलेत झालेलं रूपांतर दर्शवितं. आठवीत असतानाच जबरदस्तीनं शाळा सोडायला लावून लग्न झालेल्या आणि अवघ्या १९ व्या वर्षीच चार मुलींची आई बनलेल्या आशा अपराद यांनी सासरच्या प्रतिकूल, कर्मठ व पारंपारिक विचारसरणीच्या कुटुंबीयांना आपल्या शिक्षणासाठी राजी करून मोठ्या जिद्दीनं उच्च शिक्षण घेतलं आणि आपलं व आपल्या कुटुंबाचं भवितव्य घडवलं. ही सगळीच कहाणी आश्चर्यकारक आहे.
- LOKRANG 4-1-2009
‘दस्तगीर, तू मैं, तेरे छोऱ्या जंजीर देखने जइंगे, लई भारी पिक्चर हाय, उसमे का एक गाना मुजे लई पसंत आया देक...’ त्यांचे शेजारी-पाजारी हिंदू अठरापगड जातीचे. त्यांच्याबरोबर लेखिकेवर गौरी गणपती, हादगा यांचे संस्कार झालेले. मदतीला हेच शेजारी. त्यांच्याबरोबर भावा-बहिणीचे मनापासून निभावलेले नाते- हा खरा आपला समाज. याच समाजातील काही नातेवाईक, शुद्ध शाकाहारी, खुद्द लेखिकेचा नवरा शाकाहारी त्यामुळे त्यांची तब्बेत सुदृढ. हे सर्व सहज. यातलाच एक दीर धर्माची टिंगल उडवणारा तर एक अचानक नमाजी बनलेला. इतके वैविध्य, मान्यता, धर्माचा लवचिकपणा याचे मनोरम चित्रण या आधी वाचलेले आठवत नाही.
एक स्त्री शिकली की सारे कुटुंब शिकू लागते हे आशा आपराद यांच्याकडे बघून पटते. त्यांच्या शिक्षणाच्या धडपडीला प्रचंड विरोध करणारे नातेवाईक पुढे आपल्या मुलांना शाळेत घातल्यावर त्यांचे उदाहरण देऊन ‘आशा भाभी कैसा कष्टमें शिखे, तुमना अब्यास करनं क्या जान जातिया क्या?’ म्हणून त्यांना (मुलींनाही) शिकण्यासाठी उत्तेजन दिले. त्यांच्या चारही मुली शिकल्याच, परंतु त्यांच्या बहिणीची काही मुलेही उच्च शिक्षणाकडे त्यांच्या उदाहरणावरून वळली. आशाताई अभ्यास करत असतानाच आजूबाजूच्या शेतमजूर स्त्रियांशी जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित केला. या स्त्रियांना बचत करायला शिकवून जोडधंदा करण्यास मदत करून त्यांना आत्मनिर्भर केले. याच स्वभावामुळे कॉलेजमधील विद्यार्थी व नंतर कोल्हापुरातील सामाजिक कामाशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. आजही त्या स्वाधारसारख्या संस्थांत काम करत आहेत.
लेखकाने स्वत:च्या लोकांकडून उभे केलेले अडथळे पार करत स्वत:च्या प्रगतीचा प्रवास केला. असा प्रवास आजवर अनेकांनी केला आहे. परंतु एक मुस्लिम स्त्री म्हणून समाजाने त्यांच्या मार्गात जे अडथळे आणले त्यामुळे विचार आला की सर्वसामान्य लोक समभावाने एकमेकांशी वागत असतात. हीच आपली संस्कृती आहे. परंतु स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजणारे समाजात तेढ निर्माण करतात. हा समाज जो सहजतेने आपला धर्म-धारयते इति धर्म - निभवत असतो त्याला कृत्रिमतेने- ऊर्दूत शिक्षण, पोशाख वगैरे- जगायला लावतात.लेखिकेची आई व इतर स्त्रिया नऊवारी नेसत होत्या, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, पाटल्या घालणे महत्त्वाचे मानत होत्या. त्यांना अलगतावादाचे धडे देऊन व हिंदूंनी त्यांच्यावर आक्रमकणे बोलण्याने गटाने राहण्याची गरज वाटून, आपणच आपल्या समाजाच्या एकसंधपणाच्या वैविध्याच्या चिरफळ्या करत आहोत का? असो. पश्चिम महाराष्ट्रातील मुसलमान समाजाच्या जगण्याचे, त्यांच्या प्रश्नाचे व त्यावरील काही मार्गांचे लोभस चित्रण आल्याने आशा असो. पश्चिम महाराष्ट्रातील मुसलमान समाजाच्या जगण्याचे, त्यांच्या प्रश्नाचे व त्यावरील काही मार्गांचे लोभस चित्रण आल्याने आशा आपराद यांची आत्मकहाणी सामाजिक चित्रणही झाली आहे. या त्यांच्या समाजाविषयी अभ्यासू दृष्टिकोनातून त्यांनी आणखीही लिहावे. महाराष्ट्राच्या सामाजिक दस्ताऐवजीकरणाच्या दृष्टीने हे अत्यंत आवश्यक ठरेल.
- SAPTAHIK SAKAL Oct 2008
`भोगले जे दु:ख त्याला` हे आशा आपराद यांचे आत्मचरित्र आयुष्याची खडतर वाटचाल, शिक्षणाची पहाट, आत्मविश्वासाने वाढलेली जगण्याची उमेद आणि समाजऋण फेडण्यासाठी कार्यरत होणे अशा अनेक अंगांचा वेध घेते. लेखिका भारतीय मुस्लिम कुटुंबातील सुशिक्षित, संवेदनशील वडिल आणि अतिशय कठोर, आणि निर्दयी आईची नावडती मुलगी आहे. लेखिकेने बालपणी आईने केलेली निंदा, निर्भत्सना सहन केलीच, परंतु घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ही अपशकुनी मुलगीच जबाबदार आहे म्हणून आयुष्यभर जबर शिक्षा भोगली. वयाच्या तेराव्या वर्षी लेखिकेचे वडिल मरण पावल्यानंतर तिच्या आयुष्याचा ताबा आईने घेतला. शाळा बंद करून या मुलीचे कोवळ्या वयात लग्न लावून दिले. पुढे वयाच्या एकोणतीसाव्या वयापर्यंत आशा आपराद यांनी चार मुलींची आई होऊन संसारात अखंडपणे सासरच्या माणसांची भांडणे, मारझोड, सख्ख्या बहिणींची लग्न, नातेवाईकांचे मृत्यु, अपघात हे चढ उतार सोसले. वडिलांच्या संस्कारामुळे हळुवार, तरल, मानसिक, भावनिक पातळीवर जगणाऱ्या साध्या, सामान्य स्त्रीच्या वाट्याला आलेले अपार दु:खभोग, मनस्ताप, चटका लावणारे अनेक प्रसंग या आत्मचरित्रात वाचायला मिळतील. यासाऱ्या प्रतिकूलतेतून शिक्षणाची परंपरा नसलेल्या कुटुंबात घरच्यांचा जबरी विरोध, मुलाबाळांची जबाबदारी यांना तोंड देत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. एस.एस.सी ते एम. ए., एम फील आणि प्राध्यापक होण्यापर्यंतचा त्यांचा शैक्षणिक प्रवास वाचनिय आहे. यासाऱ्या कठोर परिक्षा घेणाऱ्या जीवनप्रवासात सहकार्य केलेले गुरुवर्य, मानसिक पाठबळ देणारी अनेक माणसे यांच्याबद्दल लेखिकेने कृतज्ञता भाव व्यक्त केला आहे. जगताना वाट्याला आलेले कडवट अनुभव सोसून झाल्यावर मनातला सद्भाव कुठेही कमी होत नाही, त्याही पलिकडे जाऊन समाजसेवा कराविशी वाटणे, हे या आत्मचरित्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल.
हे आत्मचरित्र वाचल्यानंतर कवी बा. भ. बोरकर यांच्या दोन कवितांची आठवण होते. त्यापैकी पहिली आहे, `रे अजून थोडे सोस मना/ जळल्या वाचून नाही ज्योत/ काढल्यावाचून नाही मोती/ ही एक कविता आठवते. दुसरी त्यांचीच एक कविता - जळणाऱ्या जळत रहा : जळती सारेच आम्ही/ जळण्याच्या लाख तर्हा : राख मात्र जास्त कमी... असल्या या जळण्याने जळ घनांत साकळते/ गवसले न जे युगात तें पळात आकळते.
- KOLHAPUR 26-4-2008
सोसणं हेच स्त्रीचं आयुष्य... दु:खाने पोळलेल्या आयुष्याच्या राखरांगोळीतून नव्या उभारीनं जगण्याचा ‘आशावाद’ सांगणारं ‘भोगले जे दुख त्याला’ आत्मकथन हे केवळ एक पुस्तक नसून प्रेरणेचा झरा आहे, असे प्रशंसोद्गार मिळून साऱ्या जणी मासिकांच्या संपादिका विद्या बाळ यांनी व्यक्त केला.
प्रा. आशा आपराद लिखित ‘भोगले जे दुख त्याला...’ या आत्मकथनाचे प्रकाशन श्रीमती बाळ यांच्या हस्ते झाले. शाहू स्मारक भवनात झालेल्या या हृद्य सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अॅड. गोविंद पानसरे होते. मेहता प्रकाशनचे अनिल मेहता, प्रा. राजेखान शानेदिवाण आदी मान्यवर उपस्थित होते.
एका स्त्रीच्या कष्टाचे... जिद्दीचे... महत्त्वाकांक्षेचे हे शब्दचित्र असल्याचे सांगून श्रीमती बाळ म्हणाल्या, जन्मानं ठेवलेलं ‘आशा’ हे नाव कर्तृत्वानं सिद्ध करणारं असामान्य व्यक्तिमत्वच आशातार्इंच्या रूपानं घडलं. फुलून घमघमण्याच्या वयात कोमेजलेलं आयुष्य वाट्याला येऊनही स्वत: नवं बीज पेरून ते फळाफुलाला आणण्यासाठी आशातार्इंनी रक्ताचं पाणी केल्याची प्रचिती या आत्मकथनाच्या पानोपानी येते.
जन्मदात्या आईच्या हातून झालेल्या छळाच्या डागण्यांनी आशाचं आयुष्य होरपळलं... बालपण.... तारुण्य... त्यात पुरतं करपलं... मात्र तो प्रवास आशाने मनाच्या पानावर टिपून ठेवलाय. स्त्री सोसते खूप पण बोलत नाही. आशा मात्र स्वत:शी बोलत राहिली. तो तिचा आणि मनाचा संवाद म्हणजेच हे आत्मकथन. माहेरपण... रक्ताची नाती... नात्यातील मृदूता याला पारखी झालेल्या निराश मनातून आशेचा किरण तिने सोडला नाही. हे आत्मकथन मनात साठवताना प्रत्येकाच्या मनात हे वाक्य नक्कीच उमटेल, ‘आशा तू जगलीसच कशी?’ असे सांगून विद्या बाळ यांनी आशातार्इंच्या जगण्याला सलाम ठोकला.
मनोगत व्यक्त करताना आशा आपराद म्हणाल्या, ‘‘आत्मकथनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा भूतकाळ जगले, मात्र आता तो प्रवास आठवताना तो पचवण्याचे बळ आत्मविश्वासानं दिलं. रक्ताची नाती खोटी झालेल्या माझ्या आयुष्यात जोडलेल्या माणसाचं धन मी जमवत गेले. त्या माणसांनीच माझ्यात लेखनाची प्रेरणा जागृत केली.’’
अध्यक्षीय समारोपात अॅड. पानसरे यांनी आशातार्इंच्या भूतकाळातील कौटुंबिक पार्श्वभूमीकडे लक्ष वेधले. अशिक्षित आईमुळे जीवनाला चुकीची कलाटणी मिळालेल्या आशाने स्वत:च्या मातृत्वाला सुशिक्षित विचारांनी घडवले. याप्रसंगी प्रा. शानेदिवाण यांच्या हस्ते अनिल मेहता यांचा सत्कार करण्यात आला. आशातार्इंचे पती दस्तगीर आपराद यांचा सत्कार अनिल मेहता यांच्या हस्ते करण्यात आला. नीना मेस्त्री-नाईक यांनी सूत्रसंचालन केले.