- मुक्ता नंदकिशोर कुंभार
आदरणीय लीनाजी,
स.न.वि.वि.
मी इयत्ता ९वी वर्गात शिकणारी विद्यार्थीनी आहे. मी तुम्ही मराठीतून अनुवाद केलेले पुस्तक वाचले. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘गोष्टी माणसांच्या’ हे पुस्तक तुमच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचले. तुम्ही पुस्तक मराठीमध्ये अनुवाद केल्यामुळे मन:पूर्वक आभार मानते. मी अनेक पुस्तके वाचली. त्यातून जास्त आवडलेलं पुस्तक ‘गोष्टी माणसांच्या’ हे पुस्तक माझ्या जीवनाचं सार्थक करणारं आहे, हे मला कळालं. त्यातील मला आवडलेला प्रसंग म्हणजे संकटातली हसा त्यात असं लिहिलं आहे, की परीक्षेत नापास झालं तरी त्याला कधी ना कधी यश नक्की मिळते. जीवनात अपयश हे आवश्यक असते, जर माणसाच्या जीवनात सतत यश मिळत गेले, तर त्याच्यामध्ये उद्धटपणा वाढतो. क्वचित तरी अपयश मिळणे आवश्यक आहे. हे वाचल्यानंतर मला कळालं, की संकटांना हसून तोंड देण्यासाठी शिकलं पाहिजे.
माझी तुम्हाला अशी विनंती आहे, की तुम्ही आमच्या शाळेस एकदा तरी भेट द्यावी, ही विनंती.
आपली विश्वासू,
मुक्ता नंदकिशोर कुंभार
- Kedar Joglekar
सुधा मूर्ती यांना परिचयाची काहीही आवश्यकता नाही परंतु त्यांच्या `गोष्टी माणसांच्या` ह्या पुस्तकाविषयी फार ऐकायला मिळत नाही म्हणून हा परिचय.
ह्या कथासंग्रहात सुधा मूर्तींनी त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेल्या व्यक्ती आणि तेव्हा घडलेल्या लहान सहान परंतु मोठा प्रभाव पाडणाऱ्या प्रसंगांचं अगदी ओघवतं वर्णन केलेलं आहे. त्यांचं बालपण, कर्नाटकातल्या लहानशा खेड्यातलं त्यांचं घर, त्यांची आज्जी, त्यांचे शिक्षिका असतानाचे अनेक अनुभव इथपासून ते समाजातल्या थोर व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतरचे त्यांचे अनुभव इत्यादींची फार छान मोट त्यांनी बांधली आहे. सुधा मूर्तींच्या प्रत्येक अनुभवाच्या मांडणीत अत्यंत खरेपणा नेहमीच अधोरेखित होतो तसाच एक बारीकसा उपदेश हलकेच त्या वाचकापर्यंत पोहचवतात.
३२ अनुभव कथनांच्या ह्या संग्रहात कोणताही विवक्षित कथाक्रम नाही त्यामुळेच कोणत्याही क्रमात त्या कथा वाचता येतात. नक्की वाचा!
- एकनाथ मा. डुमणे
आपल्या वतीने प्रकाशित ‘गोष्टी माणसांच्या’ या पुस्तकाचे आमच्या प्रशालेत आम्ही ‘श्रावण अभिवाचन उपक्रमात’ वाचन घेतले. दररोज एक कथा विद्यार्थ्यांना वाचून दाखवायची. सुधा मुर्तींनी इंग्रजीत लिहिलेल्या कथा लिना सोहोनी यांनी मराठीत अनुवादित करताना त्यांच्यातील गोडवा कायम राखला आहे. या कथांचे वाचन ऐकताना विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन जायचे. कथा कधी संपली हे त्यांना कळायचेच नाही. कथा ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावर प्रसंगानुरूप बदलत जाणारे भावही टिपण्यासारखेच असायचे. कथा संपायची अन् विद्यार्थी भारावल्यासारखे होऊन जायचे. ‘वयाची अट नाही’, ‘लाल भाताची कणगी’, ‘खरा दागिना’, ‘वाटणी’ अशा कथातर खूपच खोलवर उतरल्या. या संग्रहाच्या रूपाने सुधातार्इंनी स्वार्थी वातावरणात दुर्मिळ होत चाललेली आजीच्या संस्काराची कुस पुस्तकाच्या माध्यमातून गोष्टीरूपाने उपलब्ध करून दिलीय. ही संस्कार शिदोरी विद्यार्थी व बालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शाळा व ग्रंथालयाची आहे. काल्पनिक कथांपेक्षा चलत फिरत वेचलेल्या अनुभवातून प्रकटलेल्या या कथा आपल्याच घर, परिसरातल्या वाटतात. त्या हृदयात उतरून कधी संस्कार करून जातात. तेच कळत नाही. हे मात्र नक्की! अभिवाचन उपक्रमातून वाचन सुधाराला गती मिळाली.
- Sunetra Potnis
अतिशय उत्तम पुस्तक ...माझ्या संग्रही आहे...
- Swati Mehendale
वाचलंय खुप छान...
अगदी प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे...
- Madhuri Ingle
मी वाचले हे छान लीहले आहे 👍
- Bhagyashri Kulkarni
mi vachalay mastay
- Sonali Shivalkar
माझ्या आवडत्या लेखिका आहेत
- Daya Bapat
मी वाचले आहे छान आहे
- Ravindra Kulkarni
Tyateel pratyek vyaktirekha aaplyateel ek waatate. Chhaan pustak.
- Neha Nadkarni
छान पुस्तक
- Vijay Pragane
छान पुस्तक
- Gauri Chousalkar
मी वाचले आहे छान आहे
- Sandeep Jakkal
सध्या वाचलेले पुस्तक। खूप छान आहे, जमल्यास सगळ्यांनी वाचावे।
- DAINIK TARUN BHARAT 24-04-2005
संस्कारक्षम माणसांच्या गोष्टी …
सुधा मूर्ती.... प्राध्यापिका, समाजसेविका आणि त्याचबरोबर आपल्या आगळ्यावेगळया कथालेखनाच्या शैलीने वाचकांना मोहून टाकणाऱ्या लेखिका! त्यांनी लिहिलेल्या, सत्य घटनांवर आधारित असलेल्या हलक्याफुलक्या, ताज्या व टवटवीत मूलधिष्ठित कथा म्हणजेच गोष्टी माणसांच्या.
या कथासंग्रहातील प्रत्येक कथा, जीवनाला आधारभूत असणारे बीजकथेतून आपल्याला रुजविण्याचा कळत-नकळत प्रयत्न करते. शिक्षणाला वयाची अट नसते. सांगणारी कथा देशासाठी प्राणांची आहूती देणाऱ्यांची आठवण ठेवायला सांगणारी लग्नसोहळ्याची कथा, नियमितपणाचे महत्त्व उशिरा उलगडलेल्या हसनची कथा अशा कितीतरी कथा विविध जीवनमूल्य घेऊन आपल्याला भेटतात, आपल्या जीवनाला उभारी देतात व आपल्याच होऊन जातात. या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्यार्थ्यांची वाचकाचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे. एक नवा व्यवसाय सुरू करण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईची कशी आठवण होते त्याची कहाणी आहे... मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते तू समृद्ध कर’ असं वचन आपल्या नातीकडून घेणाऱ्या, लेखिकेच्या स्वत:च्याच आजोबांची गोष्टसुद्धा यात आहे. तुमच्या शिक्षकांनी तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त गुण तुम्हाला दिले असते तर? या प्रश्नाचं उत्तर सांगणारी कथाही या पुस्तकात आहे. एकाच पुस्तकातील सर्वच कथा जीवन जगत असताना लेखिकेच्या सभोवताली वावरल्या आहेत, घडल्या आहेत. कथेतील पात्रांकडून आलेले खरेखुरे अनुभवसुद्धा लेखिकेने जसेच्या तसे मांडले आहेत. हे वाचताना सहज लक्षात येते.
आयुष्यात जी नीतिमूल्ये आपण आत्मसात केली आहेत तीच कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी आपल्या मदतीला येतील. आपल्याला तारून नेतील हा लेखिकेचा दृढ विश्वास कुठेतरी आपल्या मनातही कथेच्या माध्यमातून रुजू पाहतो. अनुवादाचं काम तसं सोपं नाही परंतु लीना सोहोनी या लेखिकेने ‘हाऊ आय टॉट माय ग्रॅण्डमदर टू रीड अॅण्ड अदर स्टोरीज’ या सुधा मूर्तीच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद अगदी सहजगत्या आशय अबाधित ठेवून केला आहे हे विशेष होय. या पुस्तकातील प्रत्येक कथेला स्वत:चा चेहरा आहे, व्यक्तिमत्व आहे.
या पुस्तकातील ताज्या टवटवीत कथाही सदैव आपल्या साथीला असतील. हसऱ्या चेहऱ्याने असे मनोमन वाटत राहते.
-एकनाथ आव्हाड
- DAINIK SAMANA 13-03-2005
प्रांजळ अनुभव कथा...
सुधा मूर्ती ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सर्वेसर्वा. समाजिक बांधिलकी मानणाऱ्या सामाजाचं देणं परत करण्याचा वसा घेऊन एका ध्येयाने प्रेरित होऊन कायम कार्यस्थ असणाऱ्या रूढार्थानं त्या लेखिका, साहित्यिका नव्हेत. त्यांच्या नावावर फारशी पुस्तकंही जमा झालेली नाहीत. तरीही त्यांनी लिहिलेल्या ‘गोष्ट माणसां’च्या या अनुभव कथासंग्रहाचं मोल अनन्यसाधारण आहे.
सुधा मूर्तीचं बालपण खेडेगावात गेलेलं. त्या मोकळ्याढाकळ्या, निसर्गसान्निध्यातील संस्कार, आजी-आजोबा गोष्टीवेल्हाळ सहवास, इसाप, बिरबल, तेनालीरामच्या चातुर्यकथांनी जीवनाविषयी दिलेली शिकवण, वाचनाचे संस्कार... यामुळे सुधा मूर्तींचा पिंड तयार झाला. त्याचं प्रत्यंतर या अनुभव कथासंग्रहातील ३२ कथांमधून प्रकर्षाने जाणवतं.
या प्रत्येक अनुभव कथेतून त्यांनी जीवनाविषयक एक सत्य, तत्त्व, शिकवण मांडली आहे. आणि तो विचार, अनुभव मांडताना कुठंही चमत्कृती, अथवा दाखवेपणा नाही. ती सहजानुभूती आहे. प्रांजळपणे व्यक्त केलेला तो जीवनानुभव आहे. म्हणूनच त्याचं अस्सलपण भावतं. अंजन घालतं.
या कथांमधून लेखिकेचं संवेदनशील मन जसं जाणवतं, तसं त्यांचं विशाल हृदय, माणुसकी, मानवतेवरचं प्रेम, समाजाच ऋण फेडण्याची असोशीही दिसते. बव्हंशी अनुभव कथांमधून विद्यार्थ्यांशी झालेला संवाद, त्या निमित्ताने आलेला अनुभव, कधी तुलनात्मक घटना, व्यक्ती, प्रसंग यातून जीवनाविषयक तात्त्विक मांडणी आणि त्यांची शिकवण हे त्यांनी आवर्जून दर्शवलंय. त्या तरुण विद्यार्थ्यांचं ऋण मान्य करताना आपल्या अर्पणपत्रिकेत त्या म्हणतात, ‘माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना... ज्यांच्यामुळे या वयातही माझं मन तरुण राहिलं आहे...’ याचा प्रत्यय त्यांच्या प्रत्येक अनुभव कथेतून येतो.
प्रत्येक अनुभव कथेच्या शेवटातून त्यांनी जे साररूपात सांगितलं आहे ते जीवनाविषयीचं चिंतन ठरतं, इतकी ताकद त्यांच्या शब्दमांडणीत आहे. मोजकी पण अर्थवाही शब्दरचना हा त्यांच्या कथांचा स्थायिभाव. व्यक्तीवरील त्यांच्या अनुभव कथांमध्ये व्यक्तीचे पैलू दाखवताना निवडलेले प्रसंग खूपच बोलके आहेत. व्यक्तिमत्त्वाची ओळख थोडक्या शब्दांत, उपमा देऊन समर्पकपणे केलेली. त्या व्यक्ती भावणं, लेखिकेचं भारावून जाणं, त्यांच्यासंबंधी अनुभवाचं बोलणं हे अगदी सहज आतून येते. अत्यंत प्रांजळपणे येतं. (उदा. आपरो जे. आर. डी., वयाची अट नाही, अब्दुल कलाम, लाल भाताची कणगी, आम्ही ते करून दाखवलं...)
या अनुभव कथांतून आणखी एक विशेषत्वानं जाणवतं ते हे की आपला कथन विषय स्पष्ट करण्यासाठी त्या जुन्या कथांचा/गोष्टींचा वापर करून नव्याने अन्वयार्थ लावतात. त्यातून येणारा अनुभव कथेचा शेवट अत्यंत सूचक, गर्भितार्थ दर्शविणारा, जीवनाविषयीचं सत्य सांगणारा वाटतो. कधी आपसूकच त्याला सुभाषिताचा दर्जा प्राप्त होतो. उदा. ‘गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जाणं केव्हाही उत्तम.’ ‘परिपूर्णता ही अपघातानं मिळवता येत नाही, ती सरावानंच प्राप्त करावी लागते.’ ‘एका स्त्रीनं शिक्षण घेतलं तर तिचं संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं.’ ‘एकटेपणा आणि एकांत यात फार मोठा फरक असतो. एकटेपणा कंटाळवाणा असतो तर एकांताची माणसाला गरज असते.’
आपल्या या अनुभव कथांविषयीच्या लेखन उद्देशाबद्दल प्रस्तावनेत लेखिका म्हणतात की, ‘माझ्या जवळच्या या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचाव्या, असं मला नेहमीच वाटत आलं आहे.’ या आंतरिक ऊर्मीतून, तळमळीतून हे लेखन झाल्यानं त्यात प्रांजळपणा, तरलता अन् मनाचा मोठेपणाही आहे.
लीना सोहोनी यांनी मूळ इंग्रजी ‘हाऊ आय टॉट माय ग्रॅण्डमदर टू रीड अॅण्ड अदर स्टोरीज’ या सुधा मूर्तीच्या कथांचा सुबक अन् नेटका अनुवाद केलाय. देवीदास पेशवे यांचे सूचक, बोलकं मुखपृष्ठ या संग्रहाचं आणखी एक बलस्थान आहे.
सुधा मूर्तीच्या ‘गोष्टी माणसांच्या’ प्रत्येकानं वाचावं असं, संग्रही ठेवण्याजोगं आणि इतरांनाही भेट देण्याजोगं निश्चितच आहे.
-अरुण घाडीगावकर
- SAHITYA SUCHI - SEPT 2005
सुधा मूर्तींच बालपण खेड्यात गेलं. आजोबा सतत सांगत असलेल्या गोष्टींमुळे या ‘माणसांच्या गोष्टीतही आपल्याला नीतिमूल्य शिकविणाऱ्या, संदेश देणाऱ्या अनेक कथा विखुरलेल्या दिसतील.
‘हाऊ आय टॉट, माय ग्रँडमदर टू रीड अॅन्ड आदर स्टोरीज’ या सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा लीना सोहोनी यांनी केलेला हा अनुवाद!
या गोष्टी आहेत सुधा मूर्तींना भेटलेल्या जे. आर. टाटा, राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्यासारख्या थोरांच्या. या कथा आहेत त्यांचे पती इन्फोसिसचे संस्थापक डॉ. नारायण मूर्ती यांच्याबद्दलच्या, समाजिक कार्य करताना आलेल्या अनुभवांच्या, शिक्षिका म्हणून कार्यरत असताना सान्निध्यात आलेल्या विद्यार्थीमित्रांच्या.
या गोष्टी आहेत मानवी नातेसंबंधाच्या, हव्यासाच्या आणि तृप्तीच्या, असूयेच्या आणि दिलदारीच्या, कृतज्ञतेच्या आणि कृतघ्नतेच्यासुद्धा.
सुधा मूर्तींचं बालपण खेड्यात गेलं. आजोबा सतत सांगत असलेल्या गोष्टींमुळे, त्यांनी लावलेल्या वाचनाच्या गोडीमुळे या ‘माणसांच्या गोष्टीतही’ आपल्याला नीतिमूल्य शिकविणाऱ्या, संदेश देणाऱ्या अनेक कथा विखुरलेल्या दिसतील. लोप पावत चाललेली वाचन संस्कृती टिकवायची असेल तर आजी-आजोबा, आई-वडील किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात ते आपल्याला हे पुस्तक वाचताना नक्कीच जाणवेल.
नातीकडून गोष्टी ऐकता-ऐकता, आपल्याला वाचता येत नाही म्हणून कष्टी झालेली, नातीकडूनच लिहायला-वाचायला शिकून गुरुपौर्णिमेला तिला वाकून नमस्कार करणारी आजी आपल्याला यात भेटते आणि डोळ्यांच्या कडा पाणवून टाकते.
स्त्रियांना नोकरी नाही हे जाहिरातीतलं वाक्य वाचून जे. आर. डी. टाटांनाच पत्र लिहिणाऱ्या तरुण सुधा मूर्तींची ओळख होते. ‘तुझ्या सर्व गरजा भागल्यावर, पैसे उरले तर निदान एका तरी वाचनालयाला पुस्तकं घेऊन देशील’ असं वचन मागणारे त्यांचे आजोबा भेटतात. बचतीचं महत्त्व पटवून देणारी आई भेटते आणि याच धनसंचयाचा उपयोग इन्फोसिसच्या उभारणीसाठी कसा झाला हे वाचायला मिळतं.
स्वत:चं नुकसान होईल हे माहीत असनूही प्रामाणिकपणे वागणाऱ्या आपल्या मुलाबद्दलही सुधा मूर्तींनी लिहिलं आहे.
इन्फोसिस फाउंडेशनने भारतातील विविध राज्यांमध्ये मानवतेच्या कल्याणाचे अनेक उपक्रम हाती घेतले आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. ‘गरीब लोकांना तू मदत करणार नसलीस तर इतर कोणी ती करेल ही अपेक्षाच ठेवण्यात अर्थ नाही.’ असं म्हणून सामाजिक बांधिलकीची, कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या आपल्या मुलीलाच त्यांनी ह्या बाबतीतला गुरू मानलं. तिच्याचमुळे इथंपर्यंत पोहोचता आलं या भावनेनं तिच्या ऋणात राहू इच्छिणाऱ्या सुधा मूर्तींचा अनुभव आपल्यालाही खूप काही शिकवून जातो.
रशियामध्ये वराच्या लग्नातला लष्करी पेहराव आणि लग्नाच्या दिवशी त्या जोडप्यानं जवळपासच्या हुतात्मा स्मारकांना भेटी द्यायची पद्धत यातून देशप्रेमाचा एक वेगळा धडा आपल्याला मिळतो. आपल्याकडे वाट्टेल त्या खर्च करून होणाऱ्या लग्नसामारंभातून आपण काय साधतो हा विचार मनात रेंगाळत राहतो.
गोष्टी ऐकता-ऐकता त्यातून मूल्यशिक्षणाचे धडे घेऊन यशस्वी झालेला राम या गोष्टींतून भेटतो तसेच बुद्धिमान असूनही आळशीपणानं अयशस्वी ठरलेला हसनही भेटतो.
नैसर्गिक आपत्तीत घरातल्या जुन्यापान्या नको असलेल्या वस्तू मदत म्हणून देणारे उच्चभ्रू भेटतात, तसंच देवळात अतिशय गरिबीत दिवस कंठणारे व तरीसुद्धा देऊ केलेली मदत नाकारणारे मनाचे श्रीमंतही भेटतात.
हालअपेष्टा सहन करून, मोलमजुरी करून आपल्याला शिकवलेल्या म्हाताऱ्या आईसाठी खूप वाढलेला व्यवसाय मुलाच्या हाती सोपवून गावी परतलेला लेक आपल्याला या पुस्तकात भेटतोच. पण ‘तू माझ्यासाठी खूप कष्ट घेतलेस, आता तुला मी पुष्कळ दागिने करणार आहे’ असं सांगणाऱ्या या मुलाला स्वत: अशिक्षित असूनही ‘शिक्षण हाच माणसाचा खरा दागिना आहे. माझ्यासाठी काही करायचंच असलं तर खेडोपाडी तुला शक्य असतील तेवढ्या शाळा बांध’ असं सांगणारी माऊलीही भेटते.
मालमत्तेसाठी भांडणारी जुळी भावंडं या गोष्टीतून भेटतात. पण त्याचबरोबर एकाच आईच्या दुधावर वाढल्यामुळे नोकराच्या मुलालाही स्वत:च्या भावाप्रमाणे वागवणारा एक भाऊही भेटतो.
आई-वडिलांच्या अति काळजी करण्यामुळे, स्वत:चे निर्णय मुलावर लादल्यामुळे स्वत्व हरवलेला तरुण या गोष्टीत आहे आणि आई-वडिलांनी पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळे ‘रानात मुक्तपणे वाढणाऱ्या झाडासारखा मी वाढलो’ असं सांगणारा तरुणही आहे.
संस्कृत शिकवून झाल्यावर, शाळा सुटली तरी असंख्य गोष्टी सांगणारी गौरम्मा यात आहे. मुलबाळ नसल्यामुळे समाजाकडून झिडकारल्या गेलेल्या या गौरम्माकडे कथाकथनाची विलक्षण हातोटी आहे. या गोष्टींनी मला खूप काही शिकवलं हे सुधा मूर्तींच वाक्य तिच्या कानावर गेल्यावर तिला आपल्या शिकवण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. या ‘आपल्या’ मुलीबद्दल तिला अभिमान तर वाटतोच, देवापाशी आता कुठलीही तक्रार नसल्याचे ती सांगते. अशा बत्तीस गोष्टी या पुस्तकात आहेत.
मानवी मनाचे अनेक कंगोरे या कथातून आपल्याला दिसतील. एकाच कथेत दोन टोकाचे अनुभव त्या सांगतात. लहानपणी जे संस्कार होतात तेच आयुष्यात योग्य मार्ग दाखवत असतात. जुन्या बोधप्रद कथांचाही मुलांच्या मनावर खूप खोल परिणाम होत असतो हे हा संग्रह वाचल्यावर लक्षात येतं. विषय कुठलाही असला तरी नीतिमूल्य शिकवण्याचं काम शिक्षक कसं करू शकतात याचाही पाठ मिळेल.
अशा या गोष्टीं आहेत. तुमच्या आमच्यातल्या व माणसांच्या पण खूप काही शिकवून जाणाऱ्या...
-मंजिरी मराठे
- DAINIK SAKAL 27-03-2005
संस्कारक्षम व बोधप्रद...
सुधा मूर्ती यांच्या ‘गोष्टी माणसांच्या’ या पुस्तकात एकूण बत्तीस व्यक्तिचित्रांचा समावेश आहे. प्रत्येक गोष्ट सुधा मूर्ती यांच्या आयुष्यातील एकेक पट उलगडून दाखविते. आत्तापर्यंतच्या जीवनप्रवासात ज्या ज्या व्यक्तींशी संबंध आला त्या सर्वांच्या स्वभावातील बारकावे टिपण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. यामध्ये प्रामुख्याने जे. आर. डी. टाटा, जे. पी. जे. अब्दुल कलाम, नारायण मूर्तींसारख्या दिग्गजांचा समावेश आहे; परंतु त्याचबरोबर सुधा मूर्ती यांच्या आजी, मुलगा-मुलगी, मित्रपरिवार, शिक्षिका, रस्त्यावरील भिकारी, विद्यार्थी अशा कितीतरी व्यक्ती भेटतात.
यातील घटिते प्रामुख्याने शिक्षक, राष्ट्रपेम, मतस्वातंत्र्य, गरिबी, लग्न, दातृत्व यांसारख्या विषयांभोवती फिरतात. प्रत्येक घटना ही जीवनातील नैतिक मूल्यांशी निगडित आहे. संस्काराची जोपासना अगदी लहान गोष्टीपासून करता येते. जीवनात यशापेक्षा मूल्यांसाठी आयुष्य वेचणारीसुद्धा माणसे अवतीभोवती वावरत असतात. यात तरुण पिढीचासुद्धा समावेश आहे, हे सुधा मूर्ती यांच्या मूलाने ‘ए फॉर ऑनेस्टी’ यातून दाखवून दिले आहे.
शिक्षण हा खरा दागिना आहे. शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी वयाचे बंधन नसते. वयाच्या बासष्टाव्या वर्षी आजीने शिकण्याची हौस जिद्दीने नातीकडून म्हणजे सुधा मूर्ती यांच्याकडून पुरी केली. आजीने नातीला गुरू मानून नमस्कार केला, यात आजीचे मोठेपण दिसून येते, तर आजच्या युवापिढीत शिकण्याची जिद्द कमी होत असल्याची खंत लेखिकेने केली आहे.
‘स्त्री उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करू नयेत’ जाहिरातीतील या विधानाने सुधा मूर्ती अस्वस्थ होतात. त्यांच्यातील स्वाभिमान जागृत होतो. स्वत:च्या हिमतीवर ‘टेल्को’त नोकरी मिळवून तत्कालीन समाजाला वेगळ्या वाटेन जाऊन दाखविण्याचं धाडस ‘आपरो जे. आर. डी.’ यातून व्यक्त केले आहे. देशासाठी समर्पण केलेल्यांची आठवण प्रत्येक नागरिकाने करणे यातच देशप्रेम आहे. हे ‘रशियातील लग्नसोहळा’ यातून प्रतीत होते. दान म्हणजे आपल्याकडील सर्वश्रेष्ठ वस्तू इतरांना देणे, स्वत:च्या नातेवाइकांना मदत म्हणजे परोपकार नव्हे, चुका सर्वांच्याच हातून होतात, अशा सुभाषितवजा सुविचारांचा कृतिशील वापर सहजपणे केला आहे.
या चरित्रांचे संदर्भ ३०-४० वर्षांपूर्वीचे असले तरी त्यातील वास्तव आधुनिक काळाशी निगडित आहे. आपण ज्या समाजात वावरतो, त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, ही शिकवण लेखिकेच्या मुलीने ‘अम्मा, हे तुझं कर्तव्य नाही का?’ यातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सुधा मूर्ती यांच्या अतिशय सोप्या, हलक्याफुलक्या व मनोरंजनात्मक लेखनशैलीमुळे या गोष्टींची वाचनीयता वाढली आहे. ‘दूध-भाऊ’, ‘यांच्यातील महान कोण?’ या विशेष उल्लेखनीय असल्या तरी सर्वच गोष्टी कोणत्याही वयातील वाचकाला अंतर्मुख करून नकळत संस्कार करतात.
-प्रा. सुनीता पोखरणा
- Prachi Pravin Andhalkar 22.02
सुधा मूर्ती हे नाव माहित नसलेली व्यक्ती क्वचितच आढळेल, म्हणजे सगळेच त्यांना ओळखतात असंही नाही. पण त्या अतिशय उत्तम लेखिका, एक समाजसेविका व एक प्राध्यापिका सुद्धा आहेत. त्यांची पुस्तक ही अतिशय उत्तम धाटणीची असतात. त्यांची लेखनशैली ही वाखाणण्या जोगी आहे. त्यांनी समाजकार्यासाठी म्हणून भरपूर प्रवास केला. शेकडो लोकांना त्या भेटल्या आहेत. त्या स्वतः कॉम्पुटर सायन्सच्या प्राध्यापिका आहेत. फक्त ज्ञानाचं नव्हे तर अनुभवाचाही भंडार आहे.
गोष्टी माणसांच्या हे मुळात इंग्रजी पुस्तक आहे. "हाउ आय टॉट माय ग्रॅण्डमदर टू रीड अँड अदर स्टोरीज" असं त्याचं शीर्षक आहे.
त्यांची पुस्तक ही अतिशय बोलकी आहेत. कोणीतरी आपल्याला खरच गोष्टी सांगत आहे, असंच वाटत. मुळात त्यांच्या गोष्टी ह्या कथा नसून, त्यांच्या आयुष्यातील अनुभव त्या गोष्टी स्वरुपात सांगतात.
या पुस्तकात त्यांनी स्वतःच्या विद्यार्थ्यांचे, आजी -आजोबांचे, स्वतःचे पती व इन्फोसिसचे फाउंडर आणि चेअरपर्सन नारायण मूर्ती, स्वतःच्या काही मित्र -मैत्रिणी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेल्या व्यक्ती ह्या सर्वांबारोबरचे अनुभव त्यांनी ह्या पुस्तकात मांडले आहे.
सुधा मूर्तींना त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या आणि त्यांच्या मनावर छाप सोडलेल्या अनेक माणसांच्या गोष्टी त्यांनी ह्या पुस्तकात दिल्या आहेत.
- DAINIK LOKSATTA 26-12-2004
आजूबाजूला बागडणाऱ्या गोष्टी…
एका खेडेगावात घडलेल्या मुलीने पाहिलेले जग, त्या गावातील नितांत सुंदर अनुभव आणि या अनुभवातून घडलेली माणुसकी ‘गोष्ट माणसांच्या’मध्ये भेटायला येतात. लेखिका सुधा मुर्ती यांचे अनुभव जगावेगळे नसले तरी ते मांडण्याची पद्धत आणि त्यातून झालेले वाचकाचे उद्बोधन यामुळे ते वेगळे ठरतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा ठराविक दृष्टिकोन बदलून त्याकडे पाहण्याची नवी दृष्टी हे अनुभव देतात. एका चिमुरडीने आजीला मुळाक्षरे लिहायला वाचायला शिकविणे ही शिकवणी पूर्ण झाल्यावर बक्षीस म्हणून आजीला पुस्तक देणे यातील निरागसता वाचकाला जाणवत राहते. स्वत:च्या मुलीकडून मदत करण्याचे नवे तत्त्वज्ञान समजल्यावर स्वत:च्या वागणुकीचे समर्थन न करता अनुभव जीवनाच्या प्रवाहात सामावून घेण्याचा मोकळेपणाही ‘गोष्टी माणसांच्या’मध्ये भेटीला येतो. जे आर.डी. अब्दुल कलाम या श्रेष्ठ व्यक्तीचा मिळालेला सहवास लेखिकेने मोठेपणाचा आव न आणता सहज सांगितला आहे. या व्यक्तींना भेटायला, त्यांच्याशी बोलायला मिळाले याचा बडेजाव त्या मिरवत नाहीत. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती या लेखनात डोकावत नाहीत. एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे त्या अनुभव मांडतात. त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा हिस्सा असलेल्या विद्याथ्र्यांबरोबर त्यांनी अनुभवलेले क्षण, त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, या गप्पांमधून विचारांची झालेली देवाण-घेवाण त्यांनी या गोष्टींमध्ये सांगितली आहे. दैनंदिन जीवन जगताना अनुभवायला मिळणारे चढ-उतार सहज सोप्या शैलीत लिहिण्याच्या लेखिकेच्या हातोटीमुळे हे अनुभव कंटाळवाणे होत नाहीत. त्यामुळे वाचकाच्या विचारांनाही चालना मिळते. कथेच्या अंती वाचकाच्या विचारांनाही चालना मिळते. कथेच्या अंती वाचकाच्या मनात नवीन विचार रुजवायचा, या कथेतून त्याला आत्मचिंतन करायला उद्युक्त करायचे पण हे काम वाचकाच्याही नकळत करायचे, अशी पद्धत लेखिकेने स्वीकारली आहे. त्यामुळेच या कथा आणि यातून मिळालेली शिकवण यावर विचार करताना मेंदूला बधीरपणा येत नाही आणि आपल्याच आजूबाजूला बागडणाऱ्या घटनांकडे पाहायला नवी दृष्टी मिळाल्याची जाणीव होते.
- CHETNA AADESH MASIK 15-01-2006
पदवी अभ्यासक्रमात पुस्तकांचे वाचन करताना अर्पण पत्रिकाचं वेगळेपण शोधण्याचं वेड लागलं होतं, ते दिवस आत सरले. एका पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेने मात्र पूर्ण पुस्तक वाचायला लावलं. ‘‘माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना... ज्यांच्यामुळं या वयातही माझं मन तरुण राहिलं आहे...’’ ही अर्पणपत्रिका ‘गोष्टी माणसांच्या’ ह्या पुस्तकाची आहे. ‘हाऊ आय टॉट माय ग्रॅन्डमदर टू रीड अॅन्ड अदर स्टोरीज’ या सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाची मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी ‘गोष्टी माणसांच्या’ या नावाने केला आहे.
टेल्कोच्या शॉप फ्लोवरवर काम करणारी पहिली मुलगी, इन्फोसिसची भांडवलदार, ट्रस्टी, चेअरपर्सन, अध्यापिका अशा अनेक भूमिकेतन जीवनाची वाटचाल केल्यावर सुधा मूर्ती यांनी विविध अनुभवाचं संस्काराच्या माध्यमातून विश्लेषण करून कथेच्या स्वरूपात मांडले आहेत. विद्यार्थ्यांच्या अगदी खऱ्याखुऱ्या घटना यात आहेत. स्वत: लेखिकेची विद्यार्थीदशासुद्धा यात चित्रित होते. बारा तेरा वर्षांच्या नातीकडून कन्नड शिकणारी लेखिकेची आजी आहे. तशीच १५-१६ वर्षांच्या लेकीकडून सामाजिक भान शिकणारी स्वत: लेखिका आहे. आजच्या इन्फोसिसच्या यशामध्ये नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहकाऱ्याइतकाच सुधा मूर्ती याचादेखिल सहभाग आहे. नितीमूल्यांवर अढळ विश्वास, कायदेशीर मार्गाने धनसंचय आणि उदात्त व्यवहाराने दानधर्म हा केवळ इन्फोसिसचा बाणा नाही तर मूर्ती दांपत्यांचा वैयक्तिक आयुष्यक्रम आहे.
राष्ट्रपती अब्दुल कलाम, जे.आर.डी. टाटा या दोन महान व्यक्तीविषयीचा आदर द्विगुणीत करणाऱ्या गोष्टी आहेत. ‘आम्ही ते करून दाखवलं या गोष्टीत नारायण मूर्ती यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवला आहे. माणसाचं आयुष्य घडविणं हे कुठल्याही संस्थेच्या हातात असतं हा विचार नारायण मूर्तीनी प्रत्यक्षात आणून दाखवला. आर्थिक परिस्थितीमुळे बुद्धीमत्ता असूनही आय.टी.त जाऊ शकले नाहीत तरीही नारायण मूर्ती यांनी भारतात बौद्धीक क्रांती आणली आणि जागतिक पातळीवर भारताला नेऊन ठेवलं. ‘इकॉनॉमिस्ट’ नियतकालीकाच्या आदर्श नेत्यांच्या यादीत त्याचं स्थान आठवं आहे. हा सारा प्रवास अद्भूतच वाटतो.
इतर गोष्टी ज्यांच्या आहेत त्यांना आपण व्यक्तिश: ओळखत नाही पण त्या प्रवृत्ती आपल्याही अवतीभवती असतात. मुख्यत: सुधा मूर्ती यांचे विद्यार्थी या कथेतून डोकावतात. वाचनाचे संस्कार घडविणारे आजी आजोबा आहेत. पौराणिक गोष्टीचं भांडार खुलं करणाऱ्या गौरम्मा आहेत. मुंबईत जाऊन अनेक हॉटेल्स सुरू करून पुन्हा आईसाठी सारा धंदा मुलाच्या सुपूर्त करून आपण आईजवळ खेड्यात येणारे आणि खेड्यातील मुलांसाठी शाळा काढणारे ऐथप्पा आहे. अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर जुळ्या बहिणींशी लग्न करून सुद्धा वितुष्ट आलेले राम व गोपाल हे जुळे भाऊ आहेत. शहराच्या आकर्षणापायी कुंडीत जगू पाहणाऱ्या सिद्धार्थ आहे तर खेड्याच्या खुल्या हवेत प्रसन्नपणे राहत साऱ्या सुविधा उपभोगणारा गुरूप्रसाद आहे. नितीमूल्यांवर विश्वास ठेवणारे लोक त्यांना मिळालेलं यश समाधान आणि या नीमितूल्यांकडे पाठ फिरवणाऱ्यांचं अपयश या पुस्तकात अधोरेखित केलं आहे. संस्कार टिपणारं बालमन ते संस्कार करणारं शिक्षकी मन असा हा प्रवास आहे.
खरं पाहता आजच्या घडीला रोज उघड होणारे गैरव्यवहार, सतत होणारी स्टिंग ऑपरेशन्स, खून, मारामारी अशा बातम्याच आपल्या हातात येत असतात अशावेळी ध्येयवादी, प्रामाणिक माणसाला आपल्या संस्काराचं ओझं होतं. अशावेळी सुधा मूर्ती नावाचा ‘‘होरेगल्लू’’ मदतीला येतो. ‘‘होरेगल्लू’’ म्हणजे खांद्यावरचं ओझं काही काळ टेकवून पांथस्थानं विसावावं असा दगड. प्रत्येकाला स्वत:च ओझं स्वत:च वाहावं लागतं पण वाटेत एखादा होरेगल्लू मिळाला की थोडं टेकायला मिळतं, विसावा मिळतो आणि नव्या जोमानं डोक्यावरचा भार सावरत चालता येतं. ‘‘गोष्टी माणसांच्या’’ हे असंच विसाव्याचं स्थान आहे. जिथं क्षणभर टेकून नव्या उत्साहानं पुढच्या मार्गी लागता येतं.
अमेरिकेत अॅन्ड्रयू कॉर्नेजी या कोट्याधिशाने आपली संपत्ती खेडेगावात वाचनालय उभारण्यासाठी खर्च केली. ही गोष्ट सुधा मूर्तींनी लहानपणी आपल्या आजोबांकडून ऐकली. मोठी झाल्यावर एकातरी वाचनालयाला देणगी देईन असं वचनच आजोबांनी तिच्याकडून घेतलं. इन्फोसिसच्या माध्यमातून दहा हजारांवर वाचनालय बांधली. पुस्तकं भेट दिली आहेत. आपल्या वडिलधाऱ्यांकडून ऐकलेल्या कथा सुधा मूर्तींनी आपल्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी ऐकवल्या आहेतच. पण कथाकथनाचं सुधारित रूप पुस्तकाद्वारेही ही परंपरा जोपासली आहे.
बत्तीस गोष्टी समाविष्ट असणाऱ्या या पुस्तकात, प्रत्येक गोष्टीत जीवनमूल्यं आढळतील सहजसोपी भाषा अनुवादातपण प्रवाहीपणे आली आहे. ‘‘सांगा कसं जगायचं– कण्हत कण्हत की गाणं म्हणत’’ अशा आपल्या मनातल्या प्रश्नाला या पुस्तकात नक्कीच उत्तर मिळेल.
– सौ. माधुरी केस्तीकर
इचलकरंजी.
- Radha Pai
Awesome book
- DAINIK LOKSATTA 19-10-2009
लहानपणापासून घडलेल्या घटना - प्रसंगांमधून कादंबरीप्रमाणे आपली जीवनकहाणी सांगण्याऐवजी गतकाळावर एखादा बिलोरी ऐना फिरवत आपला जीवनमार्ग तेजोमय बनवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची त्यात उमटलेली प्रतिबिंबे पकडून ती शब्दबद्ध करणारी, ग्रंथालयातील आत्मचरित्रांच्या खणातून आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांनी उठून दिसणारे हे आत्मचरित्र - गोष्टी माणसांच्या
संगणक क्षेत्रातील नावाजलेल्या इन्फसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, स्वत: प्राध्यापिका, समाजसेविका आणि आणि आपल्या साध्या सरळ लेखणीने वाचकांना भारावून टाकणाऱ्या लेखिका सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद असलेले `गोष्टी माणसांच्या`. इन्फोसिस फौंडेशनचा व्याप सांभाळत असतानाच तंत्रक्षेत्रात अध्यापन करणाऱ्या सुधा मूर्ती यांचा रोज असंख्य तरुणांशी संपर्क येतो. त्या त्यांच्या विद्यार्थ्यांविषयी तसेच वेगवेगळ्या वळणांवर त्यांना भेटलेल्या अनेक सामान्य व असामान्य व्याक्तींविषयी त्या `गोष्टी माणसांच्या` मध्ये भरभरून बोलतात आणि त्यातूनच त्यांच्या जीवनविषयक निष्ठा, मूल्ये यांचे दर्शन वाचकांना घडते.
मुळात लहानथोर सर्वांनाच गोष्टी ऐकणे आवडते. सुधातार्इंचे स्वत:चे व्यक्तिमत्त्वही त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सांगितलेल्या कथांमधूनच आकाराला आल्याचे त्या सांगतात. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांच्या मृदू मनावरही आदर्श विचारांचे व नैतिक मूल्यांचे रोपण करण्यासाठी त्या वेळोवेळी कथाकथनाचाच आश्रय घेतात. त्याच कथाकथनाच्या शैलीतून साकार झालेली अनेक व्यक्तिचित्रे `गोष्टी माणसांच्या`मधून पाहायला मिळतात. यात सुधातार्इंनी वाचून दाखवलेल्या कथा, जिवाचे कान करून ऐकणारी आणि बासष्टाव्या वर्षी सुधातार्इंकडून अक्षरओळख करून घेणारी त्यांची आजी दिसते. या नाशवंत जगात केवळ ज्ञानच अविनाशी असल्याची जाणीव होऊन निदान एका तरी वाचनालयाला पुस्तकं देण्याचं वचन आपल्या नातीकडून घेणारे सुधातार्इंचे आजोबा आणि त्या वचनाला जागून `इन्फोसिस फौंडेशन`च्या माध्यमातून दहा हजार वाचनालये उभी करणारी त्यांची नात दिसते. स्वत: लाल तांदळाचा भात खाऊन गोरगरिबांना देण्यासाठी पांढराशुभ्र तांदूळ साठवणारे सुधातार्इंचे आजी-आजोबा दिसतात. जीवनातील दुर्गम मार्ग पार करताना नीतिमूल्यंच महत्त्वाची असतात. तीच माणसाला सावरतात, आधार देतात आणि तारूनही नेतात हे उमजून `ए` ग्रेडपेक्षाही प्रामाणिकपणाला महत्त्व देणारा सुधातार्इंचा मुलगा दिसतो, तर कधी अंध मुलांना गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवणारी, `मी मेरीच्या दृष्टीहीन नेत्रांमधून जग पाहिलं` हा निबंध लिहिणारी आणि आपल्या आईला सामाजिक बांधीलकीची परखड जाणीव करुन देणारी सुधातार्इंची मुलगी अक्षताही दिसते. कधी सतत थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवण्याचा सल्ला देणाऱ्या सुधातार्इंच्या आई या गोष्टींमधून पाहायला मिळतात तर कधी केवळ जिद्द आणि निर्धार यांच्या जोरावर शून्यातून `इन्फोसिस`चं साम्राज्य उभे करणारे कर्तृत्ववान नारायण मूर्तीही पाहायला मिळतात. या सुहृदांखेरीज, वैज्ञानिकता आणि भारतीय मातीत रुजलेली अध्यात्मिकता यांचा संगम असलेले अब्दुल कलाम यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आणि सामान्यांच्या छोट्या पत्राचीही आस्थेने दखल घेणारे, चेहऱ्यावर तेज असलेले, पण अहंकाराचा लवलेश नसलेले जे.आर.डी.टाटा यांसारख्या असामान्य व्यक्तींच्या सहवासातून त्यांचा साधेपणा, काटेकोरपणा, सामान्य व्यक्तींशी संवाद साधण्याची धडपड यांचे सुधातार्इंच्या मनावर उमटलेले हृद्य ठसेही प्रकर्षाने जाणवतात. या सर्वच व्यक्तींनी सुधातार्इंमध्ये सामाजिक भान जागवून त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगसुंदर तर केलेच, पण त्यांच्या जीवनाला महत्त्वपूर्ण अशी तात्विक बैठकही प्रदान केली.
हृदयावर कोरल्या गेलेल्या या अनुभवांखेरीज अगदी रोजच्या जीवनात घडणाऱ्या किरकोळ प्रसंगांमधूनही जीवनाचं, जगण्याचं मर्म वेचून मार्मिकपणे ते वाचकांपर्यंत पोहोचवणारे अनेक किस्सेही सुधाताई या गोष्टींमधून सांगतात. यात शिक्षणाचा मार्ग खडतर असला तरी संपूर्ण जीवनाचं सोनं करणारा असतो, ही सुधातार्इंची शिकवण लक्षात ठेवून कष्टाने गॅरेजचा मालक झालेला राम आणि वाटेत येणारी संकटे छोटी करून टाकत त्यांना हसत हसत तोंड देण्याची शिकवण इतरांना देणारा बाळू यांच्या कथा वाचकांच्या मनाला जास्त भिडतात. तसेच कधी एकुलत्या एक मुलाला अतिसंरक्षण देऊन त्याची वाढ खूरटवून त्याचं बोन्साय करुन टाकणाऱ्या पालकांचा किस्सा सांगताच, `आपण मुलांना जीवनात अत्यावश्यक असलेल्या दोन गोष्टी देऊ शकतो. घट्ट मुळं आणि मजबूत पंख त्यानंतर ती मुलं स्वबळावर कोठेही भरारी घेऊ शकतात. स्वतंत्रपणे जगू शकतात`हा पालकत्त्वाचा मूलमंत्र सुधाताई वाचकांना देतात, तर कधी लग्नाचा थाटमाट अनुभवल्यानंतर काही दिवसांनी त्याच वधूचे पाणावलेले डोळे पाहून `लग्न म्हणजे केवळ आर्थिक सुरक्षितता, एक समारंभ अथवा आपली जबाबदारी दुसऱ्यावर सोपवणं नसून आयुष्याचा प्रवास दोघांनी हातात हात घालून करणं आहे` हा लग्नाचा खरा अर्थही उद्धृत करतात. अशा असंख्य अनुभवांच्या कवडश्यांनी सुधातार्इंचा जीवनमार्ग प्रकाशमय केला आणि सामाजिक ऋण फेडण्यासाठी दातृत्वाचं उत्तम उदाहरण घालून देणाऱ्या, समाजासाठी ललामभूत असलेल्या सुधातार्इंची एकूण घडणही त्यांनी सांगितलेल्या कथांमधून वाचकांपुढे समूर्त झाली.