- पद्मा अनंत अभ्यंकर
मी डॉ.आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास हे पुस्तक वाचले.नेटके आणि वेधक असे या पुस्तकाचे संपादन केले आहे.या पुस्तकातून डॉ.यादव यांचे वाड़मयीन कर्तृत्व, त्यांनी प्रवर्तित केलेली ग्रामीण साहित्याची चळवळ आणि एक सहृदय माणूस म्हणून असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व यांवर प्रकाश पडतो.
यांतील लेखांच्या निमित्ताने पुन्हा डॉ.यादव यांची दर्जेदार पुस्तकं आठवली.झोंबी , नांगरणी ही त्यांची आत्मचरित्रात्मक पुस्तकं पुन्हा वाचायला घेतली.त्यांची स्पर्शकमळं, साहित्यिक जडणघडण ही ललित पुस्तकं पुन्हा एकदा वाचायची ठरवली आहेत.
डॉ.यादव यांचे कौतुक अशासाठी वाटते की त्यांनी स्वत:चे आयुष्य तर घडवलेच!हे सर्व जण करीत असतात.पण ते आपल्या गावाकडच्या घराला, तेथील माणसांना विसरले नाहीत.त्यांनाही त्यांनी शिकवलं,त्यांचाही उत्कर्ष केला.याबाबतीत त्यांच्या पत्नीनेही त्यांना साथ दिली.समाजात हे भान फार कमी जणांकडे दिसतं.
- दत्ताजीराव साहेब साळुंके
मी डॉ.आनंद यादव: एक साहित्यिक प्रवास हे पुस्तक वाचले.त्यानंतर कोल्हापूरलाच रहायला असल्याने अनावर इच्छा होऊन डॉ.यादव यांच्या गावी कागल येथे जाऊन आलो.गावाचा परिसर,गैबीचे देऊळ फिरून आलो.त्यांचे सणगर गल्लीतील घर पाहिले.मन पार भरून आले.
डॉ.यादव यांच्या कन्या डॉ.कीर्ती मुळीक यांना फोन केला.त्यांच्याशी भरभरून बोललो.
हे पुस्तक फार अप्रतिम केले आहे.लेखांच्या संपादनामागील संपादकांचे कष्ट आणि नेमकी दृष्टी लक्षात येते.पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉ.आनंद यादव यांचा देखणा फोटो, आतील पानांवर त्यांची बॅग, चष्मा इत्यादी वस्तूंचे फोटो... पुस्तक देखणे झाले आहे.मेहता पब्लिशिंग हाऊसने वाचकांना एक उत्तम, अभ्यासपूर्ण पुस्तक उपलब्ध करून दिले आहे.
- SAPTAHIK SAKAL 04-08-2018
परिपूर्ण संपादनाचा वस्तुपाठ... ‘डॉ. आनंद यादव – एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकताच प्रकाशित केला आहे. आनंद यादव यांची समीक्षक कन्या डॉ. कीर्ती मुळीक आणि आप्पासाहेब जकाते यादव या दोघांनी या ग्रंथाचे साक्षेपी संपादन केले आहे. आनंद यादव यांच्या १९६० पासून ५०-५५ वर्षांच्या लेखकीय कारकिर्दीचा एक परिपूर्ण मागोवा या ग्रंथात घेतला गेला आहे. डॉ. आनंद यादव त्यांनी निर्माण केलेल्या आशयघन, प्रयोगशील, भरघोस साहित्यकृतींमुळे मराठी साहित्यातले एक महत्त्वाचे नाव आहे; परंतु तितकेच ते महत्त्वाचे आहे. कारण त्यांनी ग्रामीण साहित्य लेखनाची, ग्रामीण साहित्याकडे बघण्याची एक नवी वाट शोधली आणि ती वाट पाठीमागून येणाऱ्या नव्या ग्रामीण साहित्यिकांसाठी खुली केली. त्यांनी नव्या लेखकांना जी दिशा, जो विचार, जो दृष्टिकोन दिला, त्यातूनच ग्रामीण साहित्याची चळवळ निर्माण झाली. त्याअगोदर ग्रामीण साहित्याची लेखक, कवी आणि सर्वसामान्य वाचकांच्या मनावर असणारी एक लोकप्रिय पण दिशाभूल करणारी कल्पनारम्य प्रतिमा पुसून टाकून तिथे वास्तवाची धग पेरणे हे काम सोपे नव्हते; परंतु आनंद यादवांच्या साहित्यप्रेरणांची मुळं ग्रामीण भागात घट्ट रोवलेली होती. त्यामुळे अशी भ्रामक प्रतिमा घट्ट करणारं लेखन त्यांच्या हातून होणं अशक्यच होतं. कदाचित यातूनच त्यांच्यातील प्रयोगशीलतेने उसळी मारून जुन्याला नकार देत नवी वाट चोखाळण्याला त्यांना प्रवृत्त केलं असावं. त्यांच्या समग्र लेखनाच्या गाभ्यात आपल्याला ग्रामीण जीवन आणि तिथला माणूस त्याच्या आशा-आकांक्षा, सुख-दु:खं, आशा-निराशेच्या प्रहरांसकट भेटतो. कारण तोच त्यांच्या जीवनास्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच अस्सल ग्रामीण जीवनदर्शन हे त्यांच्या संपूर्ण साहित्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. आनंद यादव यांनी विपुल आणि कसदार लेखन केलं. त्यांनी वेगवेगळे वाङ्मय प्रकार कुशलतेने हाताळले, ते केवळ सगळ्या साहित्यप्रकारात हात मारायचा या हौसेपोटी नव्हे, तर त्या-त्या साहित्यप्रकाराच्या स्वीकारामागे त्यांचा एक स्पष्ट दृष्टिकोन असे. त्यातूनच कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या, समीक्षा असे त्यांचे बहुआयामी लेखन निर्माण होत राहिले. ‘हिरवे जगे’, ‘मायलेकरं’सारखे कवितासंग्रह, ‘गोतावळा’सारखी मराठी कादंबरीला नवे रूप देणारी कादंबरी, ‘नटरंग’सारख्या कादंबरीतून मांडलेली कलावंताची फरपट, ‘झोंबी’, नांगरणी’, ‘घरभिंती’, ‘काचवेल’ हे अनोख्या पद्धतीनं आलेले आत्मचरित्रात्मक कादंबरीचे चार खंड ग्रामीण साहित्याला नवे मापदंड बहाल करणारे समीक्षात्मक ग्रंथ अशी एकूण चाळीस ग्रंथांची समृद्ध संपदा त्यांनी निर्माण केली. त्यांच्यातील प्रगल्भ साहित्य-जाणिवांचे दर्शन त्यातून घडले. ग्रामीण जीवनाचे खरे दर्शन बोलीभाषेतूनच घडवणे शक्य आणि योग्य आहे. अशा आग्रही विचाराने स्वत:ला बोलीभाषेतूनच प्रकट केले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे तर बोलीभाषेतून बोलतात; परंतु निवेदकही बोलीभाषेतून संवादी होतो हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. त्याचबरोबर विविध लेखांतून बोलीभाषेचे समर्थन केले. मराठी साहित्यात एक वेगळा प्रवाह त्यांनी निर्माण केला. त्यांनी ग्रामीण भागातील लेखनाचे अंकुर जपणाऱ्या नव्या, तरुण लेखकांना लिहिण्यासाठी एक पायवाट तयार करून दिली. त्यांच्या प्रेरणेने खेड्यापाड्यातील अनेक तरुण कवी, लेखकांना लेखनाची ऊर्जा मिळाली. ग्रामीणतेचे खरे निकष त्यांनी स्पष्टपणे मांडले. दलित्य साहित्याच्या मराठी समीक्षेप्रमाणे साहित्याच्या समीक्षाला एक नवा आयाम त्यांनी बहाल केला. एक प्रकारे ग्रामीण साहित्याच्या चळवळीतून एक नवा प्रवाहच मराठी साहित्यात दाखल झाला. या ग्रंथात डॉ. आनंद यादव यांच्या या महत्त्वपूर्ण बहुमोल योगदानाचा परामर्श विविध लेखकांनी घेतला आहे. त्यात त्यांच्या कवितांवर प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिले आहे. ते म्हणतात, ‘आनंद यादव हा खराखुरा पहिला शेतकरी कवी होता... यादवांच्या आधी लिहिलेली कविता ही मळ्याच्या मालकाने लिहिलेली कविता होती. आनंद यादवांची कविता मात्र मळ्यात राबणाऱ्या, मजुरी करणाऱ्या शेतमजुराची कविता आहे. म्हणूनच त्यांची कविता लेखन बंद केले याचे मला वाईट वाटते.’’ डॉ. मंदा खांडगे यांनी यादव यांच्या ललित लेखनाचा आस्थापूर्ण परामर्श घेतला आहे. ग्रामीण भागातील दिशाहीन, कसेबसे आयुष्य जगणाऱ्या वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींची व्यक्तिचित्रे आनंद यादव यांनी आपल्या जीवनानुभवातून समर्थ लेखणीने रेखाटली आहेत हे अधोरेखित करून मंदा खांडगे यांनी आनंद यादव यांच्या ललित गद्याची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. उदा. ‘पाटी आणि पोळी’ या ललित लेखात शिक्षणाने आपल्या स्वत:च्या जीवनात परिवर्तन झाले मात्र पाटीची संगत सुटलेल्या त्यांच्या भावाच्या – शिवाच्या जीवनात मात्र तसे परिवर्तन घडले नाही. स्वातंत्र्यानंतरही शेतमजुरांच्या जीवनात फारसा फरक पडला नाही याची खंत यादव यांनी व्यक्त केली आहे. ‘फुला आत्ती’सारख्या लेखात सहा नातींनंतर नातू झाल्यावर सुनेला पोटाशी घेऊन घळाघळा रडणारी फुला आत्तीचे चित्रण आहे. ‘लई छळली बाई तुला. आता सुखानं बसून खा’ असं ती म्हणते तेव्हा सूनही हुंदके देऊन रडते’ अशा शब्दांत ग्रामीण स्त्रीचे दु:खपूर्ण आयुष्याचे चित्रच यादव यांनी रेखाटल्याचे मंदा खांडगे यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘उखडलेली झाडे’ या कथासंग्रहाची वैशिष्ट्ये ठळक करताना ‘उखडलेली झाडे’पासूनच्या आनंद यादव यांच्या लेखनात कसा बदल होत गेला आहे याचा शोध घेतला आहे. ते म्हणतात, ‘येथेही ग्रामीण माणूस हाच चित्रणविषय आहे; परंतु हा माणूस खेड्यांतला मात्र नाही. खेड्यात जगणे कठीण होऊ लागल्याने खेड्यातील माणसे शहरात येऊ लागली आहेत किंवा रोजगारासाठी शहरांवर अवलंबून राहू लागली आहेत. या शहराच्या संपर्कात आलेल्या ग्रामीण माणसाच्या जीवनाची बरेवाईट परिणामे आनंद यादव कथांमध्ये शोधू पाहत आहेत.’ याबरोबरच रवींद्र ठाकूर यांनी ‘यादवांचे कथाविश्व’, डॉ. शुभांगी पातूरकर यांनी ‘आनंद यादव यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या’, डॉ. सुरेश देशपांडे यांनी ‘आनंद यादव आणि ग्रामीण साहित्य’ अशा विविध लेखांतून आनंद यादव यांच्या साहित्याचे मूल्यमापन केले आहे. त्याचबरोबर यादवसरांची बहीण, बंधू आप्पासहेब जकाते यादव, स्वत: कीर्ती मुळीक तसेच रा. रं. बोराडे, इंद्रजित भालेराव यांनी यादवांबरोबरचे वैयक्तिक स्नेहसंबंध उलगडणारे आस्थापूर्ण लेखन केले आहे, ते फार हृद्य झाले आहे. डॉ द.ता. भोसले, डॉ. तानाजी पाटील यांनी घेतलेल्या मुलाखतीतून डॉ. आनंद यादव यांची समीक्षकीय विचारव्यूह, त्यांची भूमिका इत्यादी मुद्द्यांवर नेमका प्रकाश पडला आहे, तर डॉ. सुधाकर शेलार यांनी ‘ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक’ असलेल्या आनंद यादव यांच्या तत्संदर्भातील कार्यकर्तृत्वाचा सांगोपांग, चिकित्सक आढावा घेतला आहे. विशेष म्हणजे इतके प्रचंड, मूलगामी कार्य करणाऱ्या आनंद यादव यांना त्यांच्या कार्याला साजेसे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद रीतसर मिळूनही त्यांना त्यावर विराजमान होता आले नाही, या कटू प्रसंगाच्या पडछायेचा परिणाम मनावर न घेता प्रत्येक समीक्षकाने फार निखळपणाने त्यांच्या साहित्यिक कामाचीच उचित दखल घेतली आहे. एक परिपूर्ण ग्रंथ वाचकांच्या हाती ठेवण्याचे श्रेय संपादकद्वयीला पूर्णपणाने द्यायला पाहिजे इतका आशयाने संपृक्त ग्रंथ त्यांनी सिद्ध केला आहे. त्याचबरोबर मुखपृष्ठ मांडणीपासून अत्यंत देखणे, उच्च निर्मितीमूल्य या ग्रंथास लाभले आहे. –अंजली कुलकर्णी
- DAINIK LOKSATTA (LOKRANG) 15-07-2018
ग्रामीण साहित्य चळवळ अग्रणीचा साहित्यवेध...
मराठीतील बहुचर्चित लेखक आनंद यादव यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आढावा घेणारा. ‘डॉ. आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ कीर्ती मुळीक’ आणि आप्पासाहेब जकाते यांनी संपादित केला आहे. या ग्रंथात एकूण १७ लेख संकलित केले आहेत. पैकी पाच लेख आनंद यादवांसंबंधी आहेत आणि बारा लेख त्यांच्या विविध साहित्यकृतींची, ग्रामीण साहित्य चळवळीची चर्चा करणारे आहेत. यात दोन मुलाखतींचाही अंतर्भाव आहे.
मराठीतील दलित साहित्य चळवळीनंतर ग्रामीण साहित्य चळवळीचा उदय झाला. या चळवळीतील अग्रणी म्हणून आनंद यादव यांचा उल्लेख होतो. सर्जनशील लेखक आणि ग्रामीण साहित्य चळवळीतील कार्यकर्ता अशी दुहेरी भूमिका त्यांनी निभावली. त्यांनी लेखनात विविध वाङ्मयप्रकार हाताळले. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक सन्मान त्यांना मिळाले. ग्रामीण साहित्य चळवळीतील यादवांचे सहकारी नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे, रा. रं. बोराडे यांचेही लेख या ग्रंथात आहेत. इंद्रजित भालेराव यांनी यादवांच्या समग्र काव्यलेखनाचा परामर्श घेतला आहे. ‘यादव शेतकरी कवी आहेत. त्यांची कविता शेतात प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्याची कविता आहे. शेतकरी वास्तवाचा सच्चेपणा या कवितेत आहे. कष्टकरी शेतकऱ्याच्या जीवनातील शृंगार, सौंदर्य, दु:ख, दारिद्र्य, संघर्ष याचे चित्रण या कवितेत आहे,’ अशी निरीक्षणे भालेराव यांनी नोंदवलेली आहेत.
यादवांचे व्यक्तिचित्रण करणारा भालेराव यांचाच दीर्घ लेखही या ग्रंथात आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच भालेरावांना यादवांचा सहवास लाभला. तो दीर्घकाळ टिकला. १५ वर्षे दोघांचा पत्रव्यवहार होता. प्रसंगपरत्वे त्यांच्या अनेक भेटी झाल्या होत्या. भालेरावांच्या या लेखात भारावलेपण असले, तरी एक प्रकारची तटस्थताही आहे. ‘ग्रामीण साहित्य चळवळीपेक्षा शरद जोशींची शेतकरी संघटनेची चळवळ व्यापक झाली. परंतु ग्रामीण साहित्य चळवळीने या चळवळीशी समन्वय ठेवला नाही’, अशी खंत भालेराव यांनी व्यक्त केली आहे.
मंदा खांडगे यांनी यादवांच्या ललित गद्याची आस्वादक चिकित्सा केली आहे. त्यांनी यादवांच्या ललित गद्यातील काव्यात्मकता अधोरेखित केली आहे. यादवांच्या ‘उखडलेली झाडे’ या कथासंग्रहाची समीक्षा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केली असून, त्यांच्या आधीच्या कथासंग्रहापेक्षा या कथासंग्रहाचे वेगळेपण काय आहे, हे त्यांनी सप्रमाण निदर्शनास आणून दिले आहे. प्रारंभी आपल्या कथांमधून ग्रामीण जनजीवन चित्रित करणाऱ्या यादवांचा जाणीव विस्तार होत गेला, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे आणि तो मान्य होण्यासारखा आहे.
रवींद्र ठाकूर यांनी यादवांच्या एकूणच कथालेखनाचा आढावा घेतला आहे. यादवांच्या कथालेखनाचा विकास विषयाच्या आणि आविष्काराच्या अंगाने कसा होत गेला, त्यासंबंधी ठाकुरांनी भाष्य केले आहे. ‘आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या’ (शुभांगी पातुरकर) व ‘यादव आणि ग्रामीण साहित्य’ (सुरेश देशपांडे) हे दोन लेख चिकित्सेऐवजी वर्णनात्मक अंगाने लिहिले गेले आहेत. पातुरकर यादवांच्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांच्या प्रेमात इतक्या अडकून पडल्या आहेत की त्यांचे भारावलेपण या लेखातून ठायी ठायी जाणवते.
वासुदेव मुलाटे यांनी यादवांच्या ‘ग्रामसंस्कृती’ आणि ‘साहित्यिक जडणघडण’ या दोन ग्रंथांची मीमांसा केली आहे. यादवांच्या चिंतनशीलतेचा परीघ कसा विस्तारलेला होता; हे नमूद करतातच; परंतु नव्याने लिहू पाहणाऱ्या लेखकांसाठी ही पुस्तके कशी उपयुक्त आहेत, हेही ते नोंदवतात.
‘बहुआयामी लेखक’ (रवींद्र शोभणे) आणि ‘साहित्यातले काटकोनी वळण’ (सुनीलकुमार लवटे) या दोन लेखांतून यादवांची वाङ्मयीन वाटचाल उलगडण्यात आली आहे. त्यांच्या सर्वच लेखनाविषयी या लेखांतून काही मते मांडण्यात आली आहे. विशेषत: सुनीलकुमार लवटे यांनी यादवांच्या लेखनसामर्थ्याचा तिरकसपणे वेध घेतला आहे आणि जाता जाता एकूण वाङ्मयीन पर्यावरणासंबंधी भाष्य केले आहे.
‘ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रवर्तक’ या लेखात सुधाकर शेलार यांनी ग्रामीण साहित्य चळवळीची वाटचाल विस्तृतपणे मांडली आहे. ग्रामीण साहित्य चळवळीचा उदय, प्रेरणा आणि प्रयोजन यांचा आढावा घेऊन त्यांनी या चळवळीची भूमिका आणि सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक योगदान या अंगाने चर्चा करून या साहित्य चळवळीची नेमकी फलश्रुती काय आहे, त्याचा निर्देश केला आहे. हा निर्देश करताना या चळवळीतील अनेक लेखकांच्या मतांचा हवाला त्यांनी दिला आहे.
तानाजी पाटील आणि द. ता. भोसले यांनी घेतलेल्या यादवांच्या मुलाखतीमधून यादवांची लेखक आणि समीक्षक म्हणून असलेली भूमिका समोर आली आहे. यादवांच्या निर्मितीप्रक्रियेवरही या मुलाखतीतून प्रकाश पडतो. लेखकाचा जीवनानुभव, वाङ्मयप्रकारांची अपरिहार्यता, कलावादी दृष्टिकोन, लेखकाची सर्जनशीलता आणि चिकित्सक वृत्ती असे वेगवेगळे मुद्दे या मुलाखतीमध्ये चर्चिले गेले आहेत. साहित्याच्या अभ्यासाला ते पूरक असेच आहेत.
‘आमचे बाबा’ या लेखात कीर्ती मुळीक यांनी यादवांमधील वडील चित्रित केले आहेत. त्यांचा कुटुंबवत्सलपणा वर्णन करतानाच महाबळेश्वरच्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान वडिलांना भूषवता आले नाही याची दुखरी बोच त्यांनी व्यक्त केली आहे. आप्पासाहेब जकाते यांनी यादवांचं मोठेपण, कर्तृत्व आणि कौटुंबिक जबाबदारीचं भान त्यांना कसं होतं, यासंबंधी भावना व्यक्त केल्या आहेत. रा. रं. बोराडे यांनी यादवांशी असलेल्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या आहेत. यादवांसोबत मतभेद असूनही त्यांनी त्या मतभेदांचा उल्लेख न करता, यादवांशी कशी मैत्री झाली, ग्रामीण साहित्यसंमेलने कशी व कुठे आयोजित करण्यात आली आणि ग्रामिण साहित्य चळवळीची बांधणी कशी झाली, याचा ऊहापोह केला आहे. बोराडे लिहितात, ‘ग्रामीण साहित्य परिषदेची घटना तयार झाली खरी, परंतु मनुष्यबळाअभावी तसंच आर्थिक पाठबळाअभावी ही घटना अमलात आली नाही. ग्रामीण साहित्य चळवळीला हळूहळू शैथिल्य येत गेलं...’ लेखाच्या शेवटी ते लिहितात, ‘मनात विचार आला, आनंद यादव अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या फंदात पडले नसते, तर त्यांना आणखी आयुष्य लाभलं असतं का?’
एकूणच ‘डॅ. आनंद यादव : एक साहित्यिक प्रवास’ हा ग्रंथ ग्रामीण साहित्याच्या अभ्यासकांना आणि लेखकांना तर उपयुक्त आहेच, परंतु त्या पलीकडे अभ्यास करणाऱ्यांनीही आवर्जून वाचावा असा आहे.
– डॉ. मनोहर जाधव
- MAHARASHTRA TIMES 01-07-2018
देखणा दस्ताऐवज...
सरसकट ग्रामीण वगैरे न म्हणता एकूणच कथा, कादंबरी, काव्य, ललित गद्य, चरित्र, आत्मचरित्र, वगनाट्य, समीक्षा, विशेषत: साहित्य-निर्मितीची प्रक्रियादी असे सर्वच वाङ्मय प्रकार विलक्षण कलात्मकतेने नि कसदारपणे हाताळणारे डॉ. आनंद यादव यांना जाऊन वर्ष होऊन गेले. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या आगेमागे त्यांची सुविद्य कन्या डॉ. कीर्ती मुळीक व बंधू अप्पासाहेब जकाते-यादव यांनी परिश्रमपूर्वक संपादित कलेले ‘डॉ. आनंद यादव- एक साहित्यिक प्रवास’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
प्रस्तुत पुस्तकात प्राचार्य रा. रं. बोराडे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, इंद्रजित भालेराव, डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. मंदा खांडगे, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. द. ता. भोसले, डॉ. तानाजी भोसले प्रभूतींचे डॉ. यादवांची प्रकृती व प्रतिभा वाङ्मयीन प्रवास नि प्रतिबद्धता यांचा मार्मिक वेध घेणारे लेख आणि मुलाखती समाविष्ट आहेत. ग्रामीण साहित्य चळवळीतील यादवांचे लक्षणीय योगदान, सर्जनशील निर्मितीसाठी घेतलेले कष्ट, समीक्षा लेखनातील नवा दृष्टिकोन अशा विविध गोष्टींचा साकल्याने धांडोळा घेण्याचा प्रयत्न सर्वच लेखांतून दिसून येतो. डॉ. लवटे यांचा लेख नितांत तटस्थ आणि विलक्षण सूचक आहे. त्यातील बहुअर्थाशयी अशा विधानांचा साक्षेपी विस्तार केला, तर एक ग्रंथराज साकार होईल. डॉ. खांडगे यांनी यादवांच्या ललित गद्यांची केलेली चिकित्सा भावणारी आहे.
‘आनंदाचे डोही,’ हा लक्ष्मीकांत रांजणेंचा लेख खूपच हृदयस्पर्शी आहे. कीर्ती व अप्पासाहेब यांचे लेख यादवांच्या कौटुंबिक वातावरणातील ताणेबाणे, त्यांचा पिंडधर्म व त्यातील पीळ उलगडून दाखवतात. डॉ. कोतापल्ले यांचा लेख सर्वांत सरस व संतुलित आहे. डॉ. ठाकूर यांनी यादवांच्या कथाविश्वाचा काढलेला आलेख मनोज्ञ वाटावा. इतर लेखही आपापल्या मखरात ठीक आहेत.
हा देखणा असा सर्वांगसुंदर ग्रंथराज चंद्रमोहन कुलकर्णींना ज्या सौंदर्यदृष्टीने सिद्ध केला आहे, त्याला मात्र सलामच केला पाहिजे. या ग्रंथाच्या निमित्ताने अनिल मेहता आपल्या एका अत्यंत जिव्हाळ्याच्या लेखन-मित्राच्या ऋणातून अंशत: तरी मुक्त झाले आहेत, असे मुद्दामच म्हणावे वाटते.
– वसंत केशव पाटील
- PROF. DR. D- T- BHOSALE
एखाद्या लेखकांची वाङ्मयनिर्मिती प्रक्रिया, त्याचा वाङ्मयीन विकास, त्याचे साहित्याला लाभलेले योगदान, विषयांची नाविन्यता, रचनेतील प्रयोगशिलता, साहित्य आणि मानवी जीवनाचा असणारा अनुबंध, त्याने यशस्वी केलेले वाङ्मयीन प्रकार आणि त्याची समीक्षादृष्टी या साऱ्या गोष्टींचा सुंदर परिचय तुमच्या या डॉ. आनंद यादव - एक साहित्यिक प्रवास’ या देखण्या आणि दर्जेदार ग्रंथातून झाला आहे. प्रा. यादवांच्या साऱ्या साहित्यकृतींचे प्रत्येकाने वेगळेपण सांगितले आहे आणि ग्रामीण चळवळीला दिलेले नेतृत्व यांचाही परामर्श घेतलेला आहे.
त्या प्रमाणेच एक माणूस म्हणून, कुटुंबवत्सल गृहस्थ म्हणून व गावाकडच्या नातेवाईकांचा कर्ता म्हणून घडविलेले दर्शन मनोज्ञ आहे. सारेच लेख खूप दर्जेदार असल्याने त्यांचा स्वतंत्र्यपणे उल्लेख केला नाही. मी घेतलेली त्यांची मुलाखतही लेखक म्हणून स्वीकारलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकणारी आहे.
तुम्ही हा ग्रंथ मनापासून अगदी जीव ओतून सिद्ध केला आहे. ग्रंथाचा आकार, मांडणी, लेखांची सजावट, त्यांचे दिलेले फोटो अन् सुंदर मुद्रण यामुळे इतका परिपूर्ण आणि उच्च निर्मितीमूल्य असणारा ग्रंथ खूप दिवसांनी पाहिला. उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार तुमच्या या ग्रंथाला मिळायला हवा. तो जर मिळाला नाही तर परीक्षकांना निर्मितीसौंदर्याची जाण अल्प वा अपुरी आहे असेच म्हणावे लागेल.