* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MOTHER TERESA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177663730
  • Edition : 3
  • Publishing Year : OCTOBER 2003
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 344
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MOTHER TERESA IS A PERFECT PERSONALITY OF THIS 20TH CENTURY. SHE FOLLOWED ALL HER TASKS WITH 100 % COMMITMENT. SHE FOLLOWED ALL HER INTUITIONS WHOLE HEARTEDLY, AND FEARLESSLY.
विसाव्या शतकातील व्युत्पन्न व्यक्तिमत्व असाच मदर टेरेसांचा उल्लेख करावा लागेल. जे मनात येत गेले ते सर्वस्व ओतून त्यांनी पार पाडले. ही ‘इंट्युईशन’ किंवा एका अर्थाने मनस्वीपणा, इतक्या निर्भीडपणे आचरणात आणणारी व्यक्ती किती मोठी होती याचे उत्तम उदाहरण मदर टेरेसा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #MOTHERTERESSA #मदर टेरेसा #ANANTBEDARKAR #अनंत बेदरकर
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 23-11-2003

    अभ्यासपूर्वक, तरीही पूर्वग्रहदूषित... ‘मदर टेरेसा - बिआँड द इमेज’ हे अ‍ॅन सेबा या ज्यू पत्रकार लेखिकेने अलीकडे लिहिलेले मदर तेरेसांचे चरित्र खूपच गाजले आहे. ‘मदर टेरेसा – प्रतिमेच्या पलीकडे’ हा अनंत बेदरकर यांनी केलेल्या त्या पुस्तकाचा अनुवाद अतिशय साळ आहे. अ‍ॅन सेबा ही एक नामवंत पत्रकार आहे. तिच्या संपूर्ण लेखनात तिचा संशोधक स्वभाव स्पष्टपणे जाणवतो. मदरचे चरित्र लिहिण्याआधी तिने साधनांची जुळवाजुळव करताना घेतलेले कष्ट पाहून मन अचंबित होते. प्रत्यक्ष जागेवर जाऊन माहिती मिळविणे, मुलाखती घेणे, थोरापासून सानापर्यंतच्या भेटीगाठी घेणे, वर्तमानपत्रांतील कात्रणांची जमवाजमव करणे, मदरविषयी लिहिल्या गेलेल्या चरित्रग्रंथांचा अभ्यास करणे, चरित्र नायिकेच्या कार्यासंबंधीच्या मुख्य आणि अनुषंगिक विषयांचे परिशीलन करणे, त्यासंबंधी शास्त्रीय आणि अद्ययावत माहिती मिळविणे, अशा अनेक गोष्टी अ‍ॅन सेबा यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे प्रस्तुत चरित्र अभ्यासपूर्ण झाले आहे. पुस्तकांच्या पूर्वार्धात मदर तेरेसांच्या कार्याच्या अनेक पैलूंवर लेखिकेने प्रकाश टाकला आहे. मदरचे गणगोत त्यांच्या अल्बेनियन देशाची राजकीय, सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्यांची झालेली जडणघडण यासंबंधी मोलाची आणि आतापर्यंत उजेडात न आलेली माहिती प्रारंभीच्या प्रकरणांमध्ये वाचायला मिळते. मदर तेरेसा यांना संशयित चारित्र्याच्या व्यक्तींकडून देणग्या स्वीकारल्या, असा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. हैतीचे हुकूमशहा श्री. दुवालियर यांच्याकडून आर्थिक मदत स्वीकारल्याबद्दल प्रस्तुत लेखिकेने मदरवर टीकास्त्र सोडले आहे. मात्र, त्याचबरोबर गेल्डॉफ या जगप्रसिद्ध पॉप सिंगरने मदरसाठी निधी जमविण्याची योजना मांडली असताना मदरने त्याला सविनय नकार दिला होता. तसेच ‘स्वयंसेवक’ (को-वर्कर्स) म्हणून कार्य करणारी सर्व विचारांच्या लोकांची एक संघटना मदरने सुरू केली होती. काही उत्साही मंडळी निधी गोळा करीत आहेत, असे समजल्यावर मदरने त्यांना तसे करण्यास मज्जाव केला. ‘देणारा परमेश्वर आहे’ ही त्यांची त्यामागची भूमिका होती. मेणाहून मऊ असलेल्या मदर कधी कधी वज्रदपी कठोर होत असत. गोरगरिबांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ब्रिटनच्या तत्कालिन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना इशारा देण्यासही मदर मागे आल्या नाहीत, याचा गौरवयुक्त निर्देश ग्रंथात केला आहे. रॉबर्ट मॅक्सवेल हे ‘डेली मिरर’चे मालक होते. त्यांनी मदरबरोबर मैत्री केली आणि त्या मैत्रीचा गैरफायदा घेतला म्हणून मदरविषयी गैरसमज निर्माण झाले. त्याबद्दल मदरना दोष देता येत नाही, असे सांगून लेखिकेने मदरची बाजू घेतलेली आहे. सातव्या अध्यायापर्यंत लेखिकेने मदरची उजल प्रतिमा रंगविली आहे. पुस्तकाच्या उत्तरार्धात ग्रंथकर्तीने मूर्तिभंजनाची भूमिका स्वीकारली आहे. मदरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या मुलाखती लेखिकेने घेतलेल्या आहेत. मदरवर त्यांनी आरोप आणि हेत्वारोप उघडपणे केले आहे. मदर हयात असताना लेखिका माहिती गोळा करीत होत्या; परंतु प्रत्यक्ष मदरची भूमिका मदरकडून किंवा मदरच्या निकटवर्ती सिस्टरांकडून समजून घेण्याची तसदी लेखिकेने घेतलेली दिसत नाही. आपल्या माहितीचा स्रोत लेखिकेने सतत लपवून ठेवला आहे. त्यामुळे त्या मतांबद्दल शहानिशा करणे अशक्य झाले आहे. लेखिका पत्रकार असल्याने स्रोत प्रकट न करण्याच्या कवचकुंडलाचा तिने आधार घेतला आहे. मदर तेरेसा या देवदूत नव्हत्या; त्या मानवी होत्या. त्या ‘आकाशाएवढ्या’ झाल्या होत्या. तरी त्यांच्या कार्याचे आणि कार्यपद्धतीचे वस्तुनिष्ठ आणि प्रामाणिक मूल्यमापन करण्यात काही गैर नाही. संशयास्पद व्यक्तीकडून आर्थिक मदत स्वीकारताना किंवा चाल्र्स किटींगसारख्या व्यक्तीसाठी न्यायालयाकडे दयायाचना करताना मदरने सावध राहायला हवे होते, ही लेखिकेची टीका समजू शकते; परंतु क्लिंटनने सहकुटुंब कोलकत्त्याला येऊन मदरच्या आश्रमात छायाचित्र काढले म्हणून मदरना दोषी ठरविणे अप्रस्तुत आहे. जगभर अनेक प्रकारच्या संघटना आपल्यापरी समाजसेवेचे कार्य करीत आहेत. अशा अनेक परिचित आणि अपरिचित संस्थांच्या कार्याची सविस्तर माहिती लेखिकेने सादर केली आहे. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथ मदरच्या चरित्राबरोबर स्वयंसेवी संघटनांचे जणू संदर्भ ग्रंथ झालेले आहे. उदा. डॉक्टर प्रेगरचे कोलकत्ता येथील कार्य, सिसिलि साँडर्सचे इंग्लंडमधील कार्य, डॉ. लुसियो डिसोजांचे मरणोन्मुखांसाठी मुंबई येथील कार्य, रामकृष्ण मिशनचे कार्य इत्यादी तुलना नेहमी अप्रस्तुत असतात, असे इंग्रजीत म्हटलेले आहे. प्रत्येक संघटनेत अधिक आणि न्यून असते. अ‍ॅन सेबा प्रत्येक तुलनेवेळी अन्य संघटनांचे कार्य कसे उजवे आहे आणि मदरचे कार्य कसे निकृष्ट आहे, अशी तुलना करतात. अनंत बेदरकर यांनी मूळ ग्रंथाचा मराठी अनुवाद करताना खूप परिश्रम घेतले आहेत. -फादर फ्रान्सिस दिब्रिटो ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 26-12-2004

    एका व्यक्तिमत्त्वाचा वेध... मदर टेरेसा हे जागतिक कीर्तीचं असाधारण व्यक्तिमत्व. मन:पूर्वकतेने आपलं ‘मिशन’ चालविणाऱ्या सेवाव्रती मदर अल्बेनियात जन्मल्या, पण त्यांनी आपलं सेवाकार्याचं मध्यवर्ती केंद्र बनवलं. हिंदूस्थानातील कोलकाता हे शहर. एकेकाळच्या बकल शहराला जगाच्या नकाशावर महत्त्वाचं स्थान देण्यात कवींद्र रवींद्रनाथ टागोर, चित्रमहर्षी सत्यजित रे या अलौकिक व्यक्तींबरोबरच मदर टेरेसा या सुप्रसिद्ध जोगिणीचाही मोठा वाटा आहे. स्वत:भोवती प्रसिद्धीचं वलय असणाऱ्या मदर टेरेसा यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि अनुषंगाने त्यांच्या अंतरंगाचा शोध घेण्याच्या मिषाने सुप्रसिद्ध चरित्रकार, अ‍ॅन सेबा यांनी ‘मदर टेरेसा’ नावाचं चरित्र लिहिलं आहे. त्याचं भाषांतर केलं आहे अनंत बेदरकर यांनी. एकूण तेरा प्रकरणांत आशयविषय व्यापलेल्या या चरित्राच्या पूर्वार्धात मदर टेरेसांची कहाणी ज्या कालक्रमाने आणि घटनाक्रमाने घडत गेली तशी सांगण्याचा चरित्रकर्तीने प्रयत्न केला आहे. मदरचं वलयांकित आयुष्य कसं विकसित होत गेलं या कुतूहालातून केलेला हा शब्दप्रपंच. चरित्राचा उत्तरार्ध एका वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे. मदरवरील टीका आणि त्या टीकेचं विश्लेषण हा या उत्तरार्ध लेखनाचा गाभा. साहजिक या भागात घटना-प्रसगांना फारसं स्थान नाही. उपोदघात व उपसंहार ही स्वतंत्र भाष्यं करणारी प्रकरणं चरित्राला वेगळा आयाम देतात. एका शोधनिबंधाची कळा लाभलेलं हे चरित्रलेखन म्हणजे कृष्णधवल छटांवर चिकित्सकपणे प्रकाश टाकणारा एक आगळावेगळा अक्षरपटच आहे. हिंदुस्थानात आगमन झाल्यानंतर ‘अ‍ॅग्नेस’च दार्जिलिंग येथील संन्यास प्रशिक्षण, धार्मिक जीवनासाठी त्यांनी धारण केलेल्या ‘टेरेसा’ या नावामागील कारणमिमांसा, मिशनऱ्यांच्या कार्याची पार्श्वभूमी, कोलकाता येथील लोरेटो शाळेतील अध्यापनकार्य इ. गोष्टींवर दुसऱ्या व तिसऱ्या प्रकरणात प्रकाश टाकलेला आहे. १९४८ मध्ये मदरच्या नव्या जीवनास ‘मिशनरी ऑफ चॅरिटी’ या सेवाभावी संस्थेच्या स्थापनेने प्रारंभ होतो व त्याचं कोलकातामध्ये सेवाकार्य सुरू होतं. ‘नॅशनल कौन्सिल फॉर कॅथॅलिक वुमन्स’च्या मेळाव्यास मदरना भाषणाचं निमंत्रण येतं आणि लासवेगास येथे भरलेल्या या मेळाव्यास त्या जातात. त्या अनुषंगाने त्यांचं विश्वभ्रमण सुरू होतं. शांततेसाठी नोबेल पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी पं. नेहरू पुरस्कार, धर्मातील प्रगतीसाठी टेंपलटन पुरस्कार, मास्टर एट मॅजिस्टा पारितोषिक, संयुक्त राष्ट्रसंघाचे ‘सेरेस पदक’, ‘भारतरत्न’ अशा अनेक पुरस्कारांचा वर्षाव मदर यांच्यावर होतो त्याचा आढावा नेटक्या शब्दांत लेखिकेने घेतला आहे. त्यांच्या जगभरातील कार्याचा विस्तार कसा कसा होत गेला त्याचंही विवेचन रोचक आणि माहितीपूर्ण आहे. ‘टीकास्त्र’ हे चरित्रातील महत्त्वाचं प्रकरण. अमेरिकेतील ख्रिटोफर हिचेन्स यांनी टीव्हीवरील एका सनसनाटी कार्यक्रमात मदरना ‘हेल्स एंजेल’ (नरकाची दूत) म्हटलं आणि त्यांच्यावर बोचरी टीका केली. यानंतरच्या ‘औषधोपचार’, ‘वाद-विवाद’, ‘अहंकार की अहंभाव’ या प्रकरणात मदरवरील अनुकूल-प्रतिकूल टीकेची केलेली छाननी व त्यावरील चरित्रकर्तीचं मार्मिक भाष्य मुळातूनच वाचायला हवं. -डॉ. नेताजी पाटील ...Read more

  • Rating StarDAINIK KESRI 18-04-2004

    मदर टेरेसांच्या कर्तृत्वाचे यथार्थ चित्रण… जगातील अगदी मोजक्या व्यक्तिमत्वांना ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ असे वर्णन खऱ्या अर्थाने लागू पडते. त्यामध्ये अलीकडच्या काळातील ‘मदर टेरेसा’ यांचे नाव वरच्या श्रेणीत समाविष्ट करावे लागेल. भारतरत्न, शांततेचानोबेल पुरस्कार आणि जगाच्या कानाकोपऱ्यांतील अगणित सन्मान पारितोषिके, बहुमान यांनी सन्मानित केलेल्या मदर टेरेसांचा जीवनपट म्हणजे मानवतेच्या सेवेची महानगाथा आहे. मदर टेरेसांच्या वागण्यातील नम्रता, लीनता, निष्ठा, चतुरता, संभाषण चातुर्य, प्रचंड आत्मविश्वास, स्वयंप्रेरणा, दीनदुबळ्यांच सेवाहाच प्रत्येक धर्माचा पाया आहे. यावरचा दृढ विश्वास, निर्भिडपणा, समर्पित भावनेने कार्य करण्याची प्रवृत्ती, जागतिक नेते, धनिक यांच्याशी वाटाघाटी करून, सेवाव्रत संस्थात्मकदृष्ट्या आर्थिक पाठबळ मिळवण्याची हातोटी असे अनेकविध गुण यांच्यात सामावलेले आहेत. त्यांची चतुस्रता पाहून आपण थक्क होतो. अ‍ॅन सेबा या नामवंत ज्यू लेखिकेने परिश्रम करून ‘मदर’चे जीवनचरित्र १९९७मध्ये यशस्वीपणे साकारले. बेदरकर यांनीही परिश्रमपूर्वक त्याचा अनुवाद सुलभ मराठीत करून मराठी वाचकांना एका जागतिक व्यक्तिमत्वाची ओळख यथार्थपणे करून दिली आहे. १९१० मध्ये अल्बेनिया या छोट्या राष्ट्रात सामान्य कुटुंबात जन्मलेली अ‍ॅग्नेस नावाची बालिका. ऑस्ट्रिया, हंगेरी राष्ट्रे एका बाजूस व दुसऱ्या बाजूस काल्कन राष्ट्रांपैकी स्लॉव यांच्या कात्रीत सापडलेल्या अल्बेनियाला अनेक वर्षे अशांततेच्या शापाबरोबर अन्याय, अत्याचार, संघर्ष यांची साथ घ्यावी लागली. स्वातंत्र्यलढ्यात होरपळून निघालेल्या कुटुंबात अ‍ॅग्नेसचे बालपण उडून गेले. लहानपणापासून धार्मिकता, एकत्रित प्रार्थना, शांतता, समंजसपणा, ऐक्य, खिस्ताची शिकवण ‘अग्नेस’मध्ये भिनत गेली. प्रा. ईगन (१९८५), डेव्हिड पोर्टर (१९८६) यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांमधून टेरेसाच्या लहानपणाचा तपशील समजतो. गोरगरिबांची सेवा, खिस्तधर्माचा अभ्यास व भारताबद्दल आकर्षण यामुळे ती डिसेंबर १९२८ मध्ये भारताकडे निघाली. भारतात पोहोचल्यानंतर भूगोलाची शिक्षका, प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका, संन्यासीन, मुख्याध्यापिका, समाजसेविका, स्वयंसेविका, मिशनरीज ऑफ चॅरिटीची अध्यक्षा व संस्थापिका, १९५०मध्ये भारताचे नागरिकत्व स्वीकारून कोलकत्यामध्ये अभूतपूर्व सर्व समाजसेवा केंद्र उभारून अथकपणे केलेली वाटचाल., १९९०मध्ये चार हजार सिस्टर्स, १३० देशांमध्ये ६००च्या जवळपास विविध प्रकारची सेवा केंद्रे व त्या सर्वांचे समर्थपणे नेतृत्व करणारे हे असामान्य व्यक्तिमत्व तेरा प्रकराणांतून वाचकांसमोर सादर केले आहे. संस्था आणि पंथ उभारणी, संस्थात्मक विकास विस्तार, विश्वभ्रमण, प्रस्थापना, धर्म आणि शास्त्र ही प्रकरणे म्हणजे टेरेसांच्या कर्तृत्वाच्या आलेखाचे यथार्थचित्रण आहे. या ठाम परंतु काहीशा अबोल, निगर्वी व्यक्तिमत्त्वाचे सेवाभावी व्रतचे ते व्यक्तिमत्त्व लहान लहान वाक्यांतून, घटनांमधून ठिकठिकाणी वाचकाला खिळवून ठेवते. त्यांनी अल्बेनियन वंशाची नम्रता, लीनता आणि निष्ठा जगभर प्रसारित केली. जागतिक नेते आणि जबरदस्त धनिक व्यक्ती यांच्याबरोबर त्यांनी निपुणतेने व्यवहार पार पाडले. मार्केटिंग तंत्रज्ञान कुशलतेने वापरून प्रति वर्षी तीन कोटी डॉलर इतका निधी मदर टेरेसांकडे येत असावा, असा अंदाज रॉयटर्स नावाच्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने खात्रीलायकरित्या व्यक्त केला. त्यावरून त्यांच्या व्यावहारिक सक्षमतेची कल्पना येऊ शकते. १९२८मध्ये अ‍ॅग्नेसने (टेरेसा) लेफ्टनंट बोयाझिक यांना पत्र लिहिले. ‘२० लाख लोकांच्या राजाची तू सेवा करशील. मी संपूर्ण जगाच्या राजाची, स्वामीची सेवा करणार आहे.’ (पान ३३) १९२५मध्ये टेरेसाचे नाव पोपनी संतांच्या यादीत समाविष्ट केले. (पान ५०) चौरंगी परिसरात पुढच्या बाजूस भव्य इमारती, तर परसदारी घाणेरडे वातावरण, पदपथावर रहात असलेले लोक, सारे घाणेरडे गलिच्छ, अस्वच्छ, भीक मागणारे कुष्ठरोगी, देवी रोगाचे थैमान, कचरापेटीत नवजात अर्भके. (पान ५५) १९२४ मधील तुफानी वादळ, भयानक पूर, १९४३ मधील अभूतपूर्व दुष्काळ, लोअर सेक्र्युलर रोडवर दहा फूट अंतरावरूनही फासळ्या मोजता येतील, अशा प्रकारचे असंख्य निर्वासित, बेघर, १९९४४ मध्ये ३५ लाख व्यक्ती मृत झालेला दुष्काळ, १९४७ मध्ये हिंदुस्तानची फाळणी व त्यानंतर पूर्व बंगालमधून आलेले लक्षावधी निर्वासित, ऐतिहासिक हत्याकांड, दंगली, १९७१च्या बांगला युद्धामुळे भारतात घुसलेले दीड कोटी निर्वासित या संकटाच्या वेळी मदतीसाठी कार्य केलेली टेरेसा खऱ्या अर्थाने समाजसेविका म्हणून मान्यताप्राप्त ठरली. कोलकत्यामधील त्यांनी स्थापन करून वृद्धिंगत केलेल्या प्रेम-धन, शिशु-भक्त, फिरता दवाखाना, मरणोन्मुखांसाठी मदत केंद्र, निर्मळ हृदय वसतिगृह इत्यादी समाजोपयोगी भरीव कार्यांमधील क्षमता डॉ. बी सी. रॉय (मुख्यमंत्री) यांना उमगली. शासनतर्फे जमिनी बहाल करण्यास सुरुवात झाली. मदर टेरेसा यांना कट्टर कम्युनिस्ट विचारसरणीच्या कोलकत्याने आपले मानले. रवींद्रनाथ टागोरानंतर तुम्हीच जगमान्य व्यक्ती आहात, याची मनोमन पावती दिली. सरकारतर्फे झालेल्या भव्य नागरी सत्कारात ज्योती बसूसारखा राजकारणी हेलावला. त्याने उद्गार काढले, ‘आजपर्यंत तुम्ही कोलकत्याच्या मदर होतात; परंतु आता मात्र तुम्ही अखील जगाच्या मदर झालेल्या आहात. निराश्रित, मरणोन्मुख झोपडवासीय, दीनदुबळे, कुष्ठोगी, कुमारी माता, नवजात अर्भके, लाखोंच्या संख्येने आलेले निर्वासित, गर्भपाताला कडाडून विरोध करताना हजारो नवजात बालकांना सांभाळण्याची मर्दुमकी, व्यसन मुक्ती केंद्र, प्राथमिक आरोग्यसेवा, मोफत औषधोपचार, औषधे वाटणे, कुपोषितांना मदत, समाजातील अनेक पीडितांना सेवाभावी वृत्तीने त्यांनी सहकार्य केले. एड्सवर त्यांनी केलेले कार्य म्हणजे सेवाभावाचा मेरुमणी ठरला. मोफत शाळा, वसतिगृहे, महिलांसाठी अनाथालये यांची साखळीच भारतभर उभी केली. या पार्श्वभूमीवर १९९५मध्ये शहीद कपूर या मुस्लिम विवाहित मुलीवर व तिच्या मुलावर झालेला अन्याय, दलित ख्रिश्चनांबदलचा त्यांचा दृष्टिकोन या अप्रतिम घटना क्लेशदायक वाटतात. अशात या अभूतपूर्व चरित्रात्मक पुस्तकात मोजकी छायाचित्रे, त्यांचा ठळक जीवनपट समाविष्ट केल्यास ग्रंथाची वाचनीयता वाढेल. -अनिल दांडेकर ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 21-03-2004

    चिंतनात्मक चरित्र… सामा समुद्रापलीकडून केवळ नि:स्वार्थ भावनेने गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आलेल्या आणि हा देश आपलाच आहे असे अभिमानाने सांगणाऱ्या मदर तेरेसा यांचे संपूर्ण चरित्र प्रथमच पुस्तकरुपाने वाचकांपुढे आले आहे. मदर तेरेसा नेमक्या कोण आणि कुठूनआल्या, त्यांनी काय केले यांची सरळ मांडणी न करता त्यांच्या आयुष्यातील विविध घटनांचा वेधही या पुस्तकात घेण्यात आला आहे. मदर तेरेसा यांना विरोध करणाऱ्यांचा विरोध नेमका कशाला होता आणि त्यातून मदरची प्रतिमा कशी उजळली याचे केवळ विश्लेषण या पुस्तकात नाही; तर मदर तेरेसा यांचे वस्तुनिष्ठ कार्यकर्तृत्वच या पुस्तकात रेखाटण्यात आले आहे. जे घडले ते तसेच वाचकांपुढे सादर करण्याचा प्रयत्न अ‍ॅन सेबा यांनी केला आहे. अ‍ॅन सेवा या ज्यू असून त्यांनी मदरच्या जीवनचरित्रासाठी किती परिश्रम घेतले आहेत, कोणकोणत्या कोनातून मदरच्या जीवनाचा आढावा घेतला आहे, हे पाहून थक्क व्हायला होते. एका अत्यंत श्रेष्ठ चरित्रनायिकेला एका असामान्य चरित्रकर्तीने केलेला मानाचा मुजरा असून मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे अनंत बेदरकर यांनी! -प्रसाद मोकाशी ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more