* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GHACHAR GHOCHAR
  • Availability : Available
  • Translators : APARNA NAIGAONKAR
  • ISBN : 9789387789920
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"WHEN AN IMPOVERISHED BUT CLOSE-KNIT FAMILY UNDERGOES AN ALMOST MIRACULOUS CHANGE IN FORTUNE, OLD AND TRUSTED CERTAINTIES ARE UNDERMINED: ALLEGIANCES AND DESIRES REALIGN, A MARRIAGE COLLAPSES, AND TENSIONS BUILD UNSTOPPABLY TOWARDS A DEVASTATING CONFLICT. IN THIS TRANSFORMATIVE NOVEL BY THE ACCLAIMED KANNADA WRITER VIVEK SHANBHAG, A FAMILY’S UNEXPECTED ASCENT FROM AN ANT-RIDDEN SHACK TO MIDDLE-CLASS LIVING SKILFULLY PEELS AWAY THE VENEER OF AN ASPIRATIONAL SOCIETY. THE FAMILY’S WORLD BECOMES “GHACHAR GHOCHAR’—A NONSENSE PHRASE THAT, TO THE RESTLESS, UNNAMED NARRATOR OF THE BOOK, COMES TO MEAN SOMETHING ENTANGLED BEYOND REPAIR. TOLD IN CLEAR COMPELLING PROSE, AND UNDERSCORED BY WARMTH AND HUMOUR, GHACHAR GHOCHAR IS A CAPTIVATING AND UNSETTLING STORY ABOUT THE SHIFTING MEANING—AND CONSEQUENCES—OF FINANCIAL GAIN IN CONTEMPORARY INDIA. IT IS A FABLE FOR MODERN LIVING THAT WILL RESONATE EVERYWHERE. "
हातातोंडाशी गाठ असलेल्या पण एका अनामिक धाग्यात बांधलेल्या एका एकत्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एखादा चमत्कार व्हावा तशी बदलते तेव्हा, अनेक जुनीनवी गृहीतं मागे पडतात. इच्छा आणि नाती बदलतात, एक विवाह मोडतो, आणि विनाशक शेवटाकडे जाणारा तणाव निर्माण होतो, जो थोपवणं अशक्य असतं. मुंग्यांचा बेसुमार त्रास असलेल्या घरातून मध्यमवर्गीय सुरक्षित घरात जाणाऱ्या कुटुंबाच्या माध्यमातून सांपत्तिक प्रगतीकडे डोळे लावून बसलेल्या समाजाचं आतलं चित्र, विख्यात कन्नड लेखक विवेक शानभाग यांच्या बदलांचा ठाव घेणाऱ्या या कादंबरीतून स्पष्ट होतं. या कुटुंबाचं विश्वच घाचरगोचर होऊन जातं. इतरांसाठी हा शब्द निरर्थक असला तरी, या कादंबरीच्या अस्वस्थ, निनावी सूत्रधारासाठी ते दुरुस्त करण्यापलिकडचं काहीतरी होऊन जातं. स्पष्ट, वाचत राहावी अशी शैली, त्यासोबतच नर्मविनोदाची पखरण, आणि माणसांमधला ओलावा असलेली ही घाचरगोचर नावाची गोष्ट. सध्याच्या भारतात श्रीमंत होण्याचा अर्थ आणि त्याचे परिणाम यांचे बदलते संदर्भ उलगडून दाखवते. आधुनिक जगण्याच्या या कहाणीचे पडसाद इतरत्रही जाणवतात.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#VIVEK SHANBHAG# APARNA NAYAGAONKAR# GHACHER GHOCHAR#विवेक शानभाग# अर्पणा नायगावकर# घाचरघोचर
Customer Reviews
  • Rating StarRam Jagtap- Maharashtra Dinmaan

    ‘घाचर-घोचर’ ही अनुवादित कादंबरी मध्यमवर्गाच्या ‘नैतिक र्‍हासा’चं ‘गुह्यदर्शन’ घडवते! गेल्या सहा वर्षांत भारतातल्या कुठल्या प्रादेशिक भाषेतलं पुस्तक हिंदीसह इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित झालं आणि त्याचा इंग्रजी अनुवाद होऊन ते अगदी आंतरराष्ट्ीय पातळीवरही नावाजलं गेलं? या प्रश्नाचं उत्तर ‘घाचर-घोचर’ असंच द्यावं लागेल. कथाकार, कादंबरीकार व नाटककार विवेक शानभाग हे कन्नडमधले एक नावाजलेले लेखक आहेत. त्यांचे आजवर पाच कथासंग्रह, तीन कादंबर्‍या आणि दोन नाटकं प्रकाशित झाली आहेत. ‘घाचर-घोचर’ ही त्यांची जेमतेम 118 पानांची कादंबरी कन्नडमध्ये डिसेंबर 2015 मध्ये प्रकाशित झाली. तिचा लगोलग इंग्रजीमध्ये अनुवाद झाला. 2018 मध्ये ती हिंदीमध्येही अनुवादित झाली. याशिवाय नेपाळी, बंगाली, कोंकणी अशा भारतीय भाषांमध्येही तिचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. प्रख्यात नाटककार दिवंगत गिरीश कार्नाड यांनी या कादंबरीचं दै. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या 13 फेब्रुवारी 2016च्या अंकात ‘ङर्ळींळपस ळप झीशीशपीं ढशपीश’ या नावानं परीक्षण लिहिलं आहे; तर ‘न्यू यॉर्क टाइम्स’ या अमेरिकन आणि ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वर्तमानपत्रानं ‘2017 मधील सर्वशेष्ठ दहा पुस्तकां’मध्ये तिची निवड केली आहे. एवढंच नाही तर आजवर सुकेतू मेहता, कॅथरीन बू, निलंजना एस. रॉय, रचना सिंग, सत्यव्रत के. के. उमा महादेवन, केशव गुहा, पंकज मिशा, पारुल सेहगल, डेबारा स्मिथ, लॉरीन स्टेन, प्राज्वल पराजुली, एलिन बॅटरर्सी, सॅम सॅक्स, अमित चौधुरी, एलिझाबेथ कुरुव्हिला, इयन जॅक अशा अनेक नामवंत लेखकांनी देश-विदेशातल्या इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये तिची परीक्षणं लिहिली आहेत. सुकेतू मेहता आणि कॅथरीन बू या सुप्रसिद्ध लेखकांनी तर विवेक शानभाग यांची तुलना ‘चेकव्ह’शी केलीय. तर या ‘कन्नड चेकव्ह’ची ही कादंबरी जुलै 2018 मध्ये मराठीतही अनुवादित झालीय. अपर्णा नायगांवकर यांनी तिचा अनुवाद केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलाय. हा मराठी अनुवाद अतिशय चांगला आहे आणि कादंबरी तर खरोखरच भन्नाट आहे. आचार्य अत्रे एकदा तेंडुलकरांचं नाटक पाहायला गेले होते. ते पाहून झाल्यावर ते तेंडुलकरांना म्हणाले, ‘नाटक कसं हवं? तर त्याने प्रेक्षकांच्या नरडीचा अक्षरक्ष: घोट घेतला पाहिजे.’ तेंडुलकरांच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ या नाटकासारखी ‘घाचर-घोचर’ ही कादंबरी आपल्या नरडीचा अक्षरक्ष: घोट घेते. अतिशय हळुवारपणे ती आपला गळा पकडते आणि मग तो हळुहळू आवळत जाते. त्यामुळे इथंच वैधानिक इशारा दिलेला बरा. तुम्ही मध्यमवर्गीय असाल आणि तुम्हाला आपला सुखातला जीव नेहमीप्रमाणेच दु:खात घालायची इच्छा नसेल, तर तुम्ही या कादंबरीच्या वाट्याला जाऊ नये हे उत्तम. करकोचा जसा अचूक नेम धरून मासा पकडतो आणि मग चोच बाहेर काढून त्या माशानं जीवाच्या आकांतानं केलेली तडफड थांबण्याची वाट पाहतो, आणि ती थांबली की, त्याला गट्टम करतो, ही कादंबरी नेमकी तसंच करते. या कादंबरीचा निवेदक तुम्हाला तुमच्या सुरक्षित, आत्ममग्न आणि बेफिकीर जगातून पाहाता पाहाता उचलतो आणि बाहेर काढतो. आणि तेच जग तुम्हाला तटस्थपणे दाखवतो. त्यानंतरचा जीवघेणा अनुभव तुम्हाला अनुभवून पाहायचा असेल तरच तुम्ही या कादंबरीच्या वाट्याला जाऊ शकता. या कादंबरीचा विषय तसा सामान्य आहे. 1990 नंतर, विशेषत: 2000 नंतर आणि खासकरून 2014 नंतर सातत्यानं ज्याच्यावर टीका होतेय, त्या मध्यमवर्गातल्या एका कुटुंबाची ही कथा आहे. पण ती ‘रामायणा’सारखी नाही, तर ‘महाभारता’सारखी (मध्यमवर्गीय) जीवनाचं विराटरूपदर्शन घडवणारी आहे. थेटच सांगायचं तर ‘नेकीनं नोकरी आणि टुकीनं संसार’ करणार्‍या बंगळुरूमधल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. आधी नैतिकता हाच जगण्याचा स्थायीभाव असलेल्या या कुटुंबाचं नोकरीकडून व्यवसायाकडे स्थलांतर होतं.. पण या कादंबरीची गंमत या कथानकात नसून ते कसं सांगितलंय, यात खर्‍या अर्थानं दडलेली आहे. या कादंबरीचा निवेदक (मुलगा) आपल्या कुटुंबाची कथा स्वत:पासून सांगायला सुरुवात करतो. मग वडील, आई, बहीण, काका आणि बायको अशी तो सांगत राहतो मध्येमध्ये फ्लॅशबॅक घेत. ही संपूर्ण कादंबरी घटना-प्रसंग आणि त्यांच्या केंद्रस्थानी असलेले कुटुंबसदस्य या पद्धतीनं पुढे जात राहते. पण ती शेवटपर्यंत आपली सहजपणाची लय सोडत नाही. ज्याला ‘अँटी हिरो’ असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं, तसा या कादंबरीचा निवेदक आहे. पण तो नायक नाही. ही कादंबरी नायकप्रधान नसून समूहप्रधान आहे. तिची सुरुवात निवेदकाच्या ‘कबुलीजबाबा’पासून होते. पण हे सांगताना निवेदक ज्या लयीत, ज्या भाषेत आणि ज्या प्रकारे निवेदन करतो, ते कमाल आहे! त्यात शब्दांची उधळमाधळ नाही, चिंतननामक गोष्टीचा बडेजाव नाही, भाष्याचा सोस नाही आणि उपमा, प्रतिमा, अलंकार यांचा तर जवळपास मागमूसही नाही. भारतीय मध्यमवर्गाची भाषा त्याच्या जगण्या-वागण्यासारखीच ‘डबल स्टँडर्ड’वाली असते, तिचा आव मात्र ‘फर्स्ट स्टँडर्ड’चा असतो. पण या कादंबरीचा निवेदक मध्यमवर्गाचा प्रतिनिधी असूनही त्याची भाषा तशी नाही. ती अतिशय धारदार, तीक्ष्ण आहे. ती अचूक लक्ष्यभेद करत राहते. अशी या कादंबरीची कितीतरी वैशिष्ट्यं सांगता येण्यासारखी आहेत. तिचं शीर्षकच पहा ना. ‘घाचर-घोचर’ हा शब्द कुठल्याही कन्नड शब्दकोशात नाही. त्याचा वापर फक्त बोलीभाषेत केला जातो. त्याचा अर्थ आहे ‘गडबडगुंडा वा गुंता’. निवेदक एकेक घटना-प्रसंग सहजपणे सांगत जातो, तसतसा हिमनगाच्या टोकाखालचा एकेक भाग उघड होऊ लागतो. त्यातला भेदकपणा इतका अंगावर येतो की, कधी कधी वाचता वाचता मध्येच थांबावं लागतं. निवेदक एकाबद्दल सांगत सांगत पुढे जातो, तेव्हा आपण त्यालाच ‘दोषी’ मानायला लागतो, तोवर निवेदक दुसर्‍याची गोष्ट सांगायला लागतो आणि आपण आधीच्यावरचा ‘दोषारोप’ त्याच्यावर थोपवू लागतो, तोच निवेदक तिसर्‍याबद्दल बोलायला लागतो. आता हाच असणार ‘कलमुहाँ’ या विचाराला आपण येतो, तोच निवेदक चौथ्यावर जातो. त्यावरून पाचव्यावर. थोडक्यात एखाद्या थरारक सिनेमासारखा पाठशिवणीचा खेळ सुरू राहतो कादंबरीभर. आणि तोही अवघ्या 118 पानांत. सामूहिक पापक्षालन ही काही आपली परंपरा नाही. त्यातही भारतीय मध्यमवर्गाची तर नाहीच नाही. मागे वळून पाहण्याची, थोडं थांबून विचार करण्याची आणि स्वत:ला चार प्रश्न खडसावून विचारण्याची क्षमता गमावून बसलेल्या भारतीय मध्यमवर्गाची ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी अवस्था होऊन बसलीय. स्वातंत्र्यपूर्वकाळात उदयाला आलेला आणि तेव्हापासून सातत्यानं वाढत राहिलेला, 1990 नंतर तर झपाट्यानं वाढलेला हा मध्यमवर्ग 2014 नंतर कुठल्या थराला गेलाय, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. ही कादंबरीही पापक्षालन करत नाही. ना निवेदक करतो, ना इतर कुटुंबसदस्य. उलट या कुटुंबातला प्रत्येक जण वेळ प्रसंगी नैतिकतेचे हवाले देतो, स्वातंत्र्याचं गाणं गातो आणि आपल्या कृत्याचं समर्थनही करतो. पण कुणीच कुणाला जाब विचारू धजत नाही, कुणीच कुणाजवळ प्रामाणिकपणे सत्य कबूल करत नाही, कुणीच कुणाला कशाबद्दलही अडवत नाही. सगळे जण सामूहिकपणे आपल्या सत्त्वाची, प्रामाणिकपणाची, नैतिकतेची, विश्वासाची आणि परस्परसंवादाची हत्या करत राहतात. ‘स्मृतिचित्रे’ या मराठीतल्या ‘क्लासिक’ मानल्या जाणार्‍या आत्मचरित्राची सर्वांत मुख्य वैशिष्ट्यं आहेत – लेखिकेची शहाणीव आणि कुठलाही आडपडदा नसलेलं रोखठोक जगणं-वागणं-बोलणं. त्यामुळे साध्या साध्या घटना-प्रसंगांतून अतिशय उत्तम प्रकारची विनोद निर्मिती होते आणि त्या घटना-प्रसंगांमधून मानवी जगण्याची कितीतरी ‘दर्शनं’ पाहायला मिळतात! ‘घाचर-घोचर’ ही सुद्धा क्लासिक म्हणावी अशीच कादंबरी आहे. पण तिच्यामध्ये हे सगळं उलट्या पद्धतीनं घडतं. निवेदकाकडे शहाणीव आहे, पण त्याचं जगणं-वागणं सत्त्वहीन. स्वत:सह इतरांबद्दलचे साधे साधे प्रसंग तो सांगतो, त्यातून ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ निर्माण होते. कॉमेडी कुणाचीही होऊ शकते, तशीच ट्रॅजेडीही. पण ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ मात्र अध:पाताच्या प्रपातात सापडल्याशिवाय घडून येत नाही. हा प्रपात इतका जबदरस्त असतो की, तो एकट्यादुकट्याला थोपवता येत नाही. परिणामी सगळेच त्याच्या कचाट्यात सापडतात. या कादंबरीतल्या कुटुबाचंही नेमकं तसंच होतं. सगळेच जण सामूहिकपणे शहाणपणाची हत्या करत राहतात! असं का होतं? तर ‘घाचर-घोचर’ अर्थात गडबडगुंत्यामुळे. तो गुंता नात्यांचा आहे, केलेल्या त्यागाचा आहे, भोगलेल्या दारिद्रयाचा आहे, सहन केलेल्या मानसिक त्रासाचा आहे, परस्परांवरील अवलंबित्वाचा आहे, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांचा आहे आणि आपापल्या सोयीचाही आहे. त्यामुळे ही कादंबरी मध्यमवर्गाच्या दांभिकतेचा, कृतक जगण्याचा, खोट्या प्रतिष्ठेचा, भीतीपोटी येणार्‍या एकोप्याचा, गहिर्‍या जखमेवर थातुरमातुर मलमपट्टी करण्याच्या वृत्तीचा, जगाचा उद्धार करण्याच्या पण स्वत:ला एक प्रश्नही न विचारण्याच्या मानसिकतेचा, हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याच्या स्वभावाचा, अभावग्रस्त भूतकाळातील जगण्यावर उथळ वर्तमानाचा उतारा शोधणार्‍या संस्कृतीचा आणि मध्यमवर्गीय ‘शहामृगी’पणाचा एकेक पापुद्रा कुठलंही भाष्य न करता उलगडून दाखवते. भारतीय मध्यमवर्ग टीकेनं खंतावतो आणि संकटानं अस्वस्थ होतो. पण करतो काय, तर टीका करणार्‍याला उडवून लावतो आणि संकटात आपल्या कुटुंबाचा ‘एकोपा’ दाखवतो. पण त्याला टीकेकडे ‘सद्हेतू’ आणि संकटाकडे ‘संधी’ म्हणून पाहता येत नाही. कारण तसं केलं की, त्याच्या आत्ममग्न मश्गुलतेच्या चिरफळ्या होतात. आणि ते होऊ देण्याची त्याची कुठल्याही परिस्थितीत तयारी नसते. त्यामुळे तो वादळाचा सामना सामूहिकपणे वाळूत डोके खुपसून करतो आणि वादळापूर्वीच्या व वादळानंतरच्या शांततेत बेफिकीरपणे आपला-आपला जगत राहतो. भारतीय मध्यमवर्ग आंधळ्या धृतराष्ट्रासारखा आहे. त्याच्याकडे हजार हत्तींचं बळ आहे, पण तारतम्य नाही. त्याच्याभोवती भारतातलं विद्यमान राजकारण आणि संपूर्ण बाजारपेठ फिरत राहतेय, पण त्याच्याकडे विवेक नाही. जगातली प्रत्येक सेवा-सुविधा केवळ आपल्यासाठीच ‘प्रोव्हाईड’ केली जातेय, असा त्याचा गैरसमज झालेला आहे. अशा समाजाची झेप आपल्या पावलांपलीकडे सहसा जात नाही. त्यामुळे त्याला तुम्ही एकोणिसाव्या शतकातल्या कृतिशील आणि उत्तरदायी मध्यमवर्गाची कितीही उदाहरणं सांगा; त्याला मात्र संघर्ष, अभाव आणि सचोटी यांतच आयुष्य व्यतीत केलेल्या आधीच्या पिढ्यांना धुडकावून लावण्यातच भूषण वाटतं. त्यागाची तर त्याला फार म्हणजे फारच अ‍ॅलर्जी आहे. ‘बुद्धिजीवी’ असलेला, पण ‘बुद्धिवादी’ नसलेला हा वर्ग ‘व्यक्तिवादा’चा फार भोक्ता असतो. त्यामुळे त्याला ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ ही संकल्पना खूप आवडते. पण तारतम्य, विवेक, आत्मसंयम, चिंतन-मनन यांचा मात्र मनस्वी तिटकारा असतो. अशा या मध्यमवर्गाला ‘घाचर-घोचर’ ही कादंबरी त्याचा भेसूर चेहरा आणि रक्ताळलेले हात दाखवण्याचं काम करते. कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रातला मध्यमवर्ग या कादंबरीच्या वाट्याला गेला नसावा. आणि समजा गेलाच तर तेंडुलकरांच्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’मधल्या बेणारेबाईंच्या ‘हे शरीर सगळा घात करतं’ या चालीवर ‘हा पैसा सगळा घात करतो’ अशी सम गाठू शकतो. पण ही कादंबरी केवळ पैशाला, सुबत्तेला किंवा कुणाही एकाला दोषी ठरवून स्वत: नामानिराळं व्हायला साफ नकार देते. ती तुम्हाला (कधीकाळी मूठमाती दिलेल्या) तुमच्याच अंत:पुरात नेऊन उभी करते आणि तुमचाच चलत्-चित्रपट दाखवते. ती तुमच्याकडे प्रश्नांची उत्तरं मागत नाही की, चिंतनशिबिराचं आयोजन करायलाही सांगत नाही. ती फक्त तुम्हाला तुमच्या आचार-व्यवहारांचं ‘गुह्यदर्शन’ घडवते. तुमच्या अहंभावाला चूड लावण्याचं काम करते. हे फार जीवघेणं प्रकरण आहे! त्यामुळे आपल्या आयुष्याचं ‘घाचर-घोचर’ का होऊन बसलंय, हे जाणून घेण्याची इच्छा असलेल्या मध्यमवर्गीयांनीच आणि या वर्गात भविष्यात जाण्याची इच्छा-आकांक्षा-महत्त्वाकांक्षा असलेल्यांनीच या कादंबरीचा नाद करावा ...Read more

  • Rating StarRandhir Shinde

    मध्यंतरी सहज बोलताना आसारामने विवेक शानबाग यांच्या `घाचर घोचर` या छोटेखानी कादंबरीचा उल्लेख केला होता.काल सहज मिळवली. वेगळी वाटली. छोट्या अवकाशात मध्यमवर्गीय कुटुंबाचे भयस्वप्न सांगितले आहे. एका छोट्या कुटुंबाचा दुभंग प्रवास या कादंबरीतून कथन केला आह. काळवेगाने रचलेल्या आकांशा माणसाला कुठे घेऊन जाणार आहे याचे अस्वस्थ चित्र या कादंबरीत आहे. एकमेळीची नांदवणूक सांगणाऱ्या कुटुंब रचनेला घरघर लागल्याची कहाणी यात आहे. पैसा आणि अतिमहत्त्वकांक्षा माणसाला परकेपण,दुरावा आणि दुभंगपणाकडे घेऊन जात आहे काय, कादंबरीत कानडी कुटुंबाचा देखावा चांगला उभा केला आहे. तर अगणित मुंग्यांच्या प्रतिकाचा आणि घाचर घोचर या शब्दाचा खेळ चांगला रचला आहे. मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचा अनुवाद अपर्णा नायगावकर यांनी केला आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 23-09-2018

    मध्यमवर्गीय वृत्तीवर प्रकाश टाकणारं पृथक्करण... ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने विवेक शानभाग यांच्या ‘घाचर घोचर’ या कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध केला आहे. अपर्णा नायगांवकर यांनी हा अनुवाद केला असून, बंगळुरूमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका कुटुंबची गोष्ट यात वाचायला मिळते. एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबाची नवश्रीमंतात गणना होऊ लागते, तेव्हा त्या घरातील वातावरणात होणाऱ्या बदलाबरोबरच जीवनमूल्येही कशी अगदी सहजपणे बदलत जातात, हे या कादंबरीत लेखकाने मोठ्या मार्मिकपणे दाखविले आहे. ललित साहित्यात अभावानेच आढळणारा हलकेपणा असलेली ही कादंबरी. अगदी थोडक्यात पण कुशलतेने मांडलेली कथा, उपरोधाची किनार, कारुण्याची झालर आणि विनोदाचा तडका अशी मस्त जमून आलेली भट्टी म्हणजे ही कादंबरी. मध्यमवर्गामध्ये कोणतीही घटना घडली, की तिची परिणीती अस्वस्थतेत होते. या कादंबरीतील घरातली माणसं एकमेकांना घट्ट धरून आहेत, पण आपल्या अस्वस्थतेतची कारणमीमांसा शोधणं, एकमेकांशी यासंदर्भात चर्चा करणं यापासून ते दूर राहिलेले दिसतात. कादंबरीतून लेखकाने भारतीय कुटुंबाचे अनेक पदर उलगडले आहेत. मध्यमवर्गीयांच्या टिपिकल वृत्तीवर प्रकाश टाकणारं हे पृथक्करण आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more